Saturday 23 February 2013


मी काय म्हणते...

मी काय म्हणते, आल्यासरशी रहा अजून चार दिवस
हे काही बोलणार नाहीत, मग चार दिवस मौन असेल
मला मेलीला निदान रडू तरी येतं,
यांच्या डोळ्यात आभाळ दाटून् येतं… 

नातीची भातुकली डोळ्यापुढून हलत नाही
तिचा गोड पापा मी ओठावरनं पुसत नाही
अरे महिनाभर अन्नं गोड लागत नाही, हे
म्हणतात मला हल्ली भुकच् लागत नाही… 

नातीचा फ्रॉक छातीजवळ धरतात, त्याचे
हात स्वतःच्या गळ्याभोवती टाकतात
सोनू आता झेपत नाही म्हणतात, आणि
मग शून्यात नजर लावून बसतात… 

तुम्ही सगळे गेलात की कॅलेंडर काढतात
गणपती कधी ते बघत असतात
सप्टेंबरचा गणपती ऑगस्टला आणू
साळगावकरांना फोन लावू म्हणतात… 

लेक सासरी जाईल ना तेंव्हा कळेल
आमच्या दुःखाशी मग नातं जुळेल
आताशा आम्ही वाट बघतो दोनच् गोष्टींची
एक तुमच्या येण्याची आणि एक...

म्हणून मी काय म्हणते,
आल्यासरशी रहा अजून चार दिवस....

--जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment