Wednesday 29 April 2015

वन्स अपॉन अ टाईम (१६).....

लंकेचा मर्वान अटापटटू, अमिताभ आणि अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यात साम्यं काय? काहीही नाही. पण तिघांचं आयुष्यं एका बाबतीत वंदनीय आहे, तिघांनाही वारंवार अपयश आलं पण तिघांनीही हार न मानता प्रयत्नं चालू ठेवले हे विशेष. पडणं हा गुन्हा नाही, परत उठण्याची इच्छा संपणं हे वाईट आहे. एडिसननी बल्ब करता केसापासून ते नायलॉनच्या धाग्यापर्यंत शंभर एक वस्तू बल्बच्या फिलामेंट करता वापरून बघितल्या. एकानी कुत्सिततेनी म्हटलं, शंभर प्रयोग फुकट गेले. एडिसन म्हणाला, 'चूक, या शंभर गोष्टींनी दिवा लागत नाही हे मला कळलं की त्यातून'. तात्पर्य आपला दृष्टीकोन महत्वाचा. लोकांचा आपल्यावर किती विश्वास आहे ये पेक्षा आपला आपल्यावर किती आहे ते महत्वाचं. अटापटटू, अमिताभ आणि लिंकनची अपयशं बघा म्हणजे कळेल. 

एकतर देवीचे व्रण असलेला खप्पड चेहरा, कृश शरीरयष्टी पण मनानी पोलाद असलेल्या लिंकनची १८३२ ला नोकरी गेली, सिनेटच्या निवडणुकीतही तो हरला. पुढच्या वर्षी तो धंद्यातही बुडाला. १८३५ मधे त्याच्या प्रेयसीचं निधन झालं. पुढच्या वर्षी त्याला नैराश्याचा झटका बसला. १८३८ मधे तो स्पीकरची निवडणूकही हरला. १८४३ मधे तो काँग्रेसच्या नॉमिनेशनसाठी उभा राहिला आणि पुलंच्या अण्णू गोगटयासारखा पडलाही. परत १८४८ ला रीनॉमिनेशनसाठीही पदरी निराशाच आली. १८४९ ला ल्यांड ऑफिसर या पदासाठी पण त्याला नाकारण्यात आलं. १८५४ ला तो सिनेटची निवडणूक पण हरला. १८५६ ला उपाध्यक्षाच्या नॉमिनेशनसाठी पण हरला. १८५८ ला तो सिनेटची निवडणूक यशाचा बट्टा लागू नये म्हणून परत एकदा हरला. १८६० ला मात्रं तो अमेरिकेचा अध्यक्ष झाला. एवढ्या वेळा अपयश पदरी पडूनही तो लढत राहिला. त्याला ज्यांनी आधी हरवलं ती माणसं काळाच्या ओघात विस्मृतीत गेली पण आयुष्याची शेवटची निवडणूक जिंकलेला आणि फक्तं चार वर्ष अध्यक्ष झालेला लिंकन टिकून आहे आणि राहील.  

घोड्यासारखा चेहरा, जिराफासारखी उंची, ओळीनी पहिले साताठ चित्रपट फ्लॉप दिलेला, जया भादुरी सोडल्यास कुणी बरोबर काम करायला तयार नसलेला, आकाशवाणीवर निवेदकाची नोकरी न  मिळालेला, मायस्थेनिया ग्रेव्हिस या दुर्मिळ आजारानी आणि कुलीच्या अपघातानी आयुष्यातून जवळपास उठलेला, केवळ राजीव गांधीचा मित्रं म्हणून बोफोर्स प्रकरणात विनाकारण बदनाम झालेला, धंद्यात कर्जबाजारी झालेला, कर्ज फेडायला यश चोप्राच्या दारात जाऊन चित्रपट मागणारा, दिवाळखोरी जाहीर करण्याचा सल्ला मिळालेला, आयकराची थकबाकी वळती करण्यासाठी 'दो बुंद जिंदगीके' ही जाहिरात करणारा अमिताभ आज तरुणाला लाजवेल असा भक्कम आणि कार्यरत आहे. इतरांपेक्षा जास्ती पैसे घेतोय हे दिसतं फक्तं पण एवढी अपयशं झेलली ते आपण विसरतो. अजूनही तो दोन तास जिम करतो, दारू, सिगरेट, नॉन व्हेज पासून लांब आहे आणि फिट रहाण्यासाठी घरात किराणा मालाच्या यादीत साखरेऐवजी मध लिहितो.    

अटापटटूनी पदार्पणात पहिल्या दोन्ही डावात शून्यं काढलं. एवढा स्कोअर कुणी पण करेल म्हणून त्याला काढलं आणि एकवीस महिन्यांनी त्याला परत घेतलं कारण त्यानी फर्स्ट क्लासमधे पोत्यानी धावा काढल्या. यावेळेला मात्रं त्यानी प्रगती केली  पहिल्या डावात शून्यं आणि दुस-या डावात चक्कं एक धाव काढली. मग परत त्याला काढल. तो पण येडाच, त्यानी परत फर्स्ट क्लासमधे जाऊन शतकांची माळ लावली. सतरा महीन्यांनंतर परत एकदा त्याला संधी देण्यात आली आणि त्यानी सिलेक्टरला तोंडावर पाडत दोन्ही डावात शून्यं काढलं.  त्याच्याकडे मोठ्या स्तरावर खेळण्याचं टेंपरामेंट, टेक्निक नाही असा निष्कर्ष काढण्यात आला. तो बिचारा परत एकदा वाळूचे कण रगडायच्या नादाला लागला.  

तीन वर्षांनी त्याला परत संधी मिळाली. यावेळी मात्रं तो चमकला. सोळा शतकं त्यात सहा डबल काढत त्यानी साडेपाच हजार धावा टेस्टमधे आणि वनडेत अकरा शतकांसह साडेआठहजार धावा कुटल्या. तो लंकेचा कप्तानही झाला. हे सगळं दुस-या संधीत सिद्ध करायला त्याला सहा वर्ष गेली. सहा वर्ष कशाला म्हणतात महाराजा. तेवढ्या काळात तो कौंटी कडे गेला असता, दुस-या खेळाकडे वळू शकला असता किंवा करिअर थांबवून दुसरं काहीतरी केलं असतं किंवा मी कसा दुर्दैवी, कसे प्रयत्न केले पण कसं नशिबात नाही याच्या आवृत्त्या काढत बसला असता.  

यश कुठल्या वळणावर भेटेल हे आपल्याला माहीत नसतं. यशस्वी लोकांची चरित्रं वाचावितच पण सतत अपयशी होऊनही जिद्दीनी यश मिळवणा या लोकांची मुद्दाम वाचावीत. यांच्या बाबतीत अपयश ही यशाची पहिली पायरी नव्हती तर अपयशाच्या अनेक पाय-या होत्या, काळ बदलला की संदर्भ बदलतात, त्याच्यानुसार काही वाक्यं बदलायला हवीत. अपयशाच्या अनेक पाय-या उत्तुंग यशासाठी गरजेच्या असतात असं म्हणायला हवं आता. मुकेश अंबानी विमानातून रोज चार वेळा एव्हरेस्टवर गेला तरी पाठीवर वजन घेऊन बर्फात हालअपेष्टा सहन करत जो वर जातो ना त्याचा आनंद अंबानीपेक्षा मोठा आहे हे खरं. चला तर शेर्पा होऊयात सगळे यशाच्या वाटेवरचे. 
 
आपण थांबलो की द एंड असतो. तोपर्यंत फारतर इंटरव्हल घ्यायचा, पण शो चालू ठेवायचा.

--जयंत विद्वांस

Tuesday 14 April 2015

घेता घेता एक दिवस…….

हॉटेल रविराजला ९१ ला कामाला होतो अकौंटसला. शिकाऊ म्हणजे कमी पगारात पडेल ते किंवा कुणाला नकोसे झालेले काम करण्यासाठी घेतलेला त्यापेक्षा ठेवलेला माणूस. तर तेंव्हा रिकव्हरीचं काम पण माझ्याकडे होतं. हॉटेलची म्हणजे दारूची वर्षानुवर्षे थकलेली बिलं होती तिथे. दिग्गज लोक होते, मोठ्या नावांचा फायदा घ्यायचे. पैशाची मस्ती आणि त्यामुळे समोरच्याला तुच्छ लेखण्याची अंगभूत गुर्मी. पैशांनी गरीब असलेला माणूस एखाद्याचे पैसे बुडवतो ते नाईलाज म्हणून पण त्याच्या चेह-यावर ती खंत, लाज कायम बाळगतो तो. आताच्या काळातही बँकांची कर्ज प्रामाणिकपणे कोण फेडत असेल तर तो नोकरदार किंवा गरीब ज्याने दोन जामीनदार वगैरे रीतसर दिलेत आणि जो बँकेचा फोन आला तर अपमान समजतो तो. 

थकितची यादी भली मोठी होती, कंपन्या होत्या, वैयक्तिक खातीही होती. त्याकाळात १५ लाख जुन्यापैकी येणं बाकी होतं. 'वसूल कर, दोन टक्के तुला'. पगार पाचशे. गेला बाजार दहा लाख आणले तर वीस हजार मिळणार. घरी गेल्यावर लगेच झोपलो आणि मुंगेरीलाल के हसीन सपने चालू. बावीस हजार खर्चाची यादी सकाळपर्यंत तयार. वीसशे सोडा, दिवाळीला आम्ही टेम्पररीला बोनस देत नाही असं सांगितलेलं मला. तर येणेका-यांमध्ये एक किर्लोस्करांपैकी होते, पाच-दहा हजार काय अवघड नव्हते त्यांना त्या काळातही एकावेळी द्यायला. औंधला मी जायचो, एकदा सकाळी आठला गेलो कारण ते कधीच भेटायचे नाहीत. आडनावामुळे फार बोलायचो नाही मी. ते गार्डनमधे आठ वाजता अंब्रेला लावून हातात व्हिस्कीचा ग्लास घेऊन बसलेले. त्यांच्या बायकोला लाज वाटली, ती म्हणाली नका येऊ तुम्ही, किती अमौंट आहे मी पाठवते चेक दोन दिवसात. पैसे आले ते. 

एफसी रोडला एक सुपर शॉपी होती चांगली दोन मजली. तेंव्हा मॉल नव्हते, त्यामुळे सगळा कन्सेप्टच नवीन होता. नवरा बायको दोघं बघायचे सगळा खेळ. रोज दुपारी दीड दोनच्या सुमारास आणि रात्री उशिरा एक-दोन पेग आणि जेवायचे येउन, मग घरी. टेबल रिझर्वड लागायचं, वागण्यात मस्ती होती ती वेगळीच. सहा महिने एक रुपया दिलेला नव्हता. दीड एक लाख असतील बाकी. क्रेडीट बंद केलं त्याचं मालकांनी एक दिवस. मग त्याचा इगो दुखावला. तीन महिने रोज जात होतो मी चेक साठी, आणले सगळे पैसे. केबिनच्या आत बसून सांगायचा मी नाहीये सांग, मागच्या दारानी पळायचा, चेक भिरकावल्यासारखा फेकायचा. मग मी ही अरे तुरे करायचो. 'आहे का रे, बघ थाप सुचतीये का नवीन, नाहीतर मी सांगतो' हे त्याच्या माणसाला बोलताना ऐकलं त्यानी. जाम झाली चारचौघात. सोडला नाही, वयानी मोठ्या माणसाचा अपमान मी करत नाही पण जिरवली त्याची. गृहस्थ, घर, बायको असलेला माणूस रोज हॉटेलमधे कसा काय जेवू शकतो हा मला तेंव्हा पडलेला गहन प्रश्नं होता. पैसा आला की सुख मिळवण्याच्या व्याख्या बदलतात.

एक प्रसिद्ध, सेलेब्रेटी चित्रकार, फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या इंटेरिअरची काम घ्यायचे त्यामुळे भेट मुश्किल. एकेक चित्रं लाखाच्या हिशोबात विकलं जायचं, माणूस सतत विमानात फिरणारा. दोन वर्षापूर्वी पार्टी केलेली त्यातलं थोडं बिल बाकी होतं. पत्रं टाकली, मेसेजेस ठेवले दरवाज्याला लावून, उपयोग काही नाही. मालक म्हणाले, अरे तो वैशालीला येतो रविवारी काहीवेळा सकाळी. आम्ही सातला हजर. नशिब असं की तो एकटाच बसलेला. विषय काढला, तेंव्हा त्यानी अशा तुच्छतेनी बघितलं की आम्ही भिकारी आणि काहीतरी लाचारासारखी मदत मागतोय. समोरच रहायचा वैशालीच्या. चेकबुक मुंबईच्या घरी आहे म्हणाला, मग पोस्ट करतो म्हणाला, मालक म्हणाले मला पैसे आज हवेत, मग रागानी घरी नेवून सगळे पैसे दिले रु.सात हजार असतील फक्तं. शक्यं नव्हतं देणं? पण मी कलाकार आहे, वेगळा आहे, असामान्यं आहे, मला पैसे मागून लो लेव्हलला आणताय तुम्ही असा सगळा थाट होता. 

विंदा करंदीकर चुकलातच तुम्ही, "देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणा-याचे प्राण घ्यावे" असं लिहायला हवं होतं तुम्ही, विजय मल्ल्यानी सगळ्या ऑफिसमधे या ओळी लावल्या असत्या अर्थात त्याचे पैसे नसतेच मिळाले म्हणा तुम्हांला. 

--जयंत विद्वांस     

Saturday 11 April 2015

वन्स अपॉन अ टाईम (१५).....

जुन्या क्रिकेट टीम मधली विशेषत: महाराष्ट्रीयन खेळाडूंची नावं वडिलांच्या नावासकट लक्षात ठेवायची खोड होती तेंव्हा मला. उदा  सु.मनोहर गावसकर. दि.बळवंत वेंगसरकर, रविशंकर जयंद्रथ शास्त्री, सं.मधुसूदन पाटील. पण दोन नावांशी आलो की मला प्रश्नं पडायचा एक एस.एम.एच.किरमाणी आणि दुसरं आर.एम.एच.बिन्नी. तीन इनिशियल कशी काय या दोन नावात तेंव्हा काही गुगल नव्हतं त्यामुळे ते शोधायला बराच काळ गेला. असल्या निरुपयोगी गोष्टी शोधण्यात पण मजा असायची तेंव्हा. दोन वेगवेगळ्या मासिकात मला ती माहिती मिळाली 'सैद मुजतबा हुसेन किरमाणी' आणि 'रॉजर मायकेल हम्फ्रे बिन्नी'. कसलं भारी वाटलेलं तेंव्हा. 

८३ च्या वर्ल्डकपला नाकाशी सूत धरण्याची वेळ आली होती झिम्बाब्वेविरुद्ध त्यावेळी नवव्या विकेटकरीता कपिल देव बरोबर नाबाद एकशेसव्वीसच्या भागीदारीचं गाठोडं बांधायला हाच उभा होता. ८३ च्या वर्ल्ड कपला त्याला बेस्ट कीपरचं अवार्ड मिळालं होतं. रामानी सेतू बांधताना ज्या खारीच्या पाठीवर हात फिरवून डिझाईन काढलं त्यांच्या वंशातली अनेक लोकं आजूबाजूला दिसतात, ते बिचारे आपली कामं करत असतात, कुणी कौतुक करो न करो, श्रेय मिळो न मिळो, रामाचा एकदा हात फिरलाय पाठीवरून यांना हाच आनंद मोठा, याची उत्तम उदाहरणं म्हणजे आपला किरमाणी, यशपाल शर्मा आणि न्यूझीलंडचे गेविन लार्सन आणि ख्रिस हरीस. तीस चाळीस रन हमखास करतील, एक बाजू लावून धरतील, ओव्हर्स खेळून काढतील, पार्टनरशिप करतील, ओव्हर्स टाकतील, फिल्डिंग करतील, व्यवस्थित क्याचेस घेतील बट नथिंग मि-याक्युलस. हेच त्यांचं दुर्दैव. एकदा तुम्ही स्वामी समर्थ झालात की आयुष्यं भर लोकांना सांगायचं 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे'. हे कायम मागेच उभे त्यामुळे. 
 
तेंव्हा प्रत्येक देशाचा एकेक भन्नाट आणि लायक कीपर होता आणि तो दीर्घकाळ असायचा. वासिम बारी, नॉट, रॉडनी मार्श, जेफ दुजां, इयान स्मिथ सगळे टीममधे फिक्स असायचे. आपला किरमाणी दहा वर्ष टीममध्ये होता. त्याच्यानंतर जास्ती काल खेळलेला धोनीच असेल माझ्या मते. साबा करीम, पार्थिव पटेल, दीप दासगुप्ता, विजय दहिया, सदानंद विश्वनाथ, चंद्रकांत पंडित, समीर दिघे असे अनेक आले नी गेले. त्यामानानी नयन मोंगिया, किरण मोरे बरंच खेळले. आत्ता एवढ्या टेस्टस तेंव्हा नव्हत्या नाहीतर किरमाणी किती सरस होता ते लोकांना आकड्यांवरून समजलं असतं. इयान हिली आणि किरमाणी यांच्यात साम्यं काय तर दोघंही बॉल स्पिन कुठे होणार ते फलंदाजाच्या आधी ओळखायचे आणि फरक काय तर हिलीला मजा घ्यायला स्पिन आणि पेस दोन्ही होतं, किरमाणीची कपिल आणि घावरी मधेच यादी संपायची. आकडे बघा हिली (अनुक्रमे झेल/स्टंपिंग) ११९ टेस्टस - ३६६/२९, वनडे - १९४/३९, किरमाणी - ८८ टेस्टस - १६०/३८, वनडे - २७/९). वनडे सोडा, पण टेस्टमधे ऑस्ट्रेलिया सारखी बॉलरची फौज आपल्याकडे असती तर किरमाणीचे आकडे म्हणजे सुके बोंबिल - कितीही झाकले तरी दरवळत उठले असते. 

मिशी ठेवलेल्या गावस्करच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्ड सिरीज खेळलो होतो आणि जिंकलोही होतो. त्यात बॉर्डरचा भन्नाट झेल घेताना त्याचा पाय वाईट्ट दुखावला गेला आणि त्याला राहिलेल्या सामन्यात बाहेर बसावं लागलं आणि मग कायमचंच घरी बसावं लागलं. सदानंद विश्वनाथ तरुण होता, तो जास्तं फीट होता. संदीप पाटीलच्या 'कभी अजनबी थे' मधे त्यानी छोटासा रोल केला होता. पण सज्जन माणूस, उगाच वादविवाद नाहीत, स्लेजिंग नाही, आपलं काम भलं नी आपण भलं. 

हिलीच्या देशात जन्माला आला असता किंवा आपल्याकडे बॉलरची रेलचेल असती तर किरमाणी त्याच्यासारखे किंवा इतर यशस्वी कीपरसारखे आकडे बाळगून असता. काही म्हणा, योग्यं ठिकाणी आणि योग्यं वेळी जन्माला येणं याला सुद्धा नशिब लागतं आणि असलं समजा नशिबात तरी फायदा घेता येतोच असंही नाही म्हणा (भेटा अथवा लिहा - विनोद कांबळी). 

--जयंत विद्वांस

Tuesday 7 April 2015

लाईक्स आणि कॉमेंट्स…

कौतुक! कौतुक प्रत्येकाला हवं असतं. एक वर्षाच्या मुलाला सुद्धा लक्ष दिलेलं, कौतुकमिश्रित प्रेमानी बघितलेलं आवडतं त्यामुळे ते आपल्या बरोबर रहाणारच. एफबीचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. साहित्यिकांची वीण तिथे जोरात प्रसवली गेली कारण इतकी वर्ष तशी काही उमटायची सोय नव्हती. ती अचानक मिळाली. माणूस हा सहवास प्रिय आणि वसाहत करून रहाणारा प्राणी आहे कारण त्याचेही फायदे तोटे आहेत. तीच आयडिया एफबी वर आहे. नविन गोष्टं आत्मसात करताना ती आपल्या सोयीची कशी करता येईल हा विचार आपण प्रथम करतो. ग्रुप्स करा, एकमेकांना उचलून धरा, विरोध करणा-याची खिल्ली उडवा, त्याला पळवून लावा हा वसाहतवाद आला, प्रत्येकाची टेरिटरी ठरली. 

एफबीनी ती मानसिकता कॅश केली आणि ग्रुप्स, पेजेस, इनबॉक्स, स्टेटस प्रकार आणले. एफबीवर सगळेच वाईट लिहितात? नाही, पण चांगलं वाचायला तिथे कुणी येत नाही फार. वेळ घालविणे, खिल्ली उडवणे, जोक्स, कोट्स, फोटो पेस्ट करणे, काड्या घालणे, वाट्टेल त्या कॉमेंट करून वाद निर्माण करणे, चेहरे बघून रिक्वेस्ट पाठवणे, जमलंच काही तर संपर्क वाढवून च्याटिंग करणे, अंदाज घेत इप्सित साध्यं करणे, दुस-याचे विचार नाव वगळून आपल्या नावावर खपवणे आणि अशी अनेक कारणं आहेत एफबीवर येण्याची.

ट्याग हा एक त्रास त्यामुळेच चालू झाला. या, बघा आणि माझं कौतुक करा. ग्रोइंग, ग्रोन अप असे दोन शब्दं फार महत्वाचे आहेत. एफबी नवीन होतं तेंव्हा ग्रोइंग स्टेज समजू शकतो पण अजूनही ग्रोन अप व्हायला आपण तयार नाही. आपण बायकांना नावं ठेवतो पण पुरुष तेचं करतात की, "तू नाही ना माझी पोस्ट बघितलीस, जा, कट्टी, मी पण नाही बघणार तुझी". हा रोग आहे त्याला इलाज नाही. एफबी हा न्यूजपेपर आहे. उद्या शिळा होणारा. मग त्यासाठी 'दिसामाजी काहीतरी लिहित जावे' याचा सोयीस्कर अर्थ काढून मी कुठे आहे, काय खातोय, गावाला कधी जाणार आहे, काय ऐकतोय, काय फील करतोय वगैरे प्रकार टाकायचे आणि चार जणांच्या सेम प्रकाराला लाईक करायचं, अर्थात वसाहतवादी लोकांच्याच फक्तं.

मागे एक किस्सा ऐकून मी गार पडलो होतो. एका गृपवर एक कविवर्य रोज साधारण एक कविता पोस्टायचे. साठीच्या आसपास असतील. मोतीचुराच्या एकसारख्या नाजूक बुन्द्या पाडाव्यात तशा ते साचेबद्ध बुंद्या झा-यातून पाडायचे. मुद्दा तो नाही. तर त्यांची एक कविता कुणीतरी त्याच्या नावाने पोस्ट केली आणि ते ह्यांना सापडलं. मग त्यावर चर्चा चालू झाली त्यावेळी त्यांनी चोरी कशी सापडली याचं दिलेलं स्पष्टीकरण वाचून मी वेडा झालो. 'मला एक कविता पोस्टायला साधारण दीड तास लागतो इतक्या ग्रुप्स मधे मी आहे, त्यामुळे पोस्टवर माझं टायमिंग आहे की जे चोरणा-याच्या आधीचं आहे म्हणून त्यानी ते चोरलंय हे मी सिद्ध करू शकतो'. मी सर्वसाधारण हिशोब केला. दीड तास? म्हणजे कमीत कमी पन्नास ग्रुप्स तरी असावेत. बरं तिथल्या नोटिफिकेशंस येणार. लाईक आणि कॉमेंटवाल्यांचा नाव ट्याग करून आभारसोहळा होणार (प्रत्येक नावाला वेगळी कॉमेंट, परत त्याला लाईक किंवा उत्तरादाखल कॉमेंट येईल तो हिशोब वेगळाच) म्हणजे नोटिफिकेशंस अनलिमिटेड. साठी पार केलेल्या माणसाची ही त-हा तर नवीन माणसाला काय बोलावं.

आपण जे लिहितो, व्यक्तं होतो ते चिरकाल स्मरणात राहील अशी आपल्याला खात्री नाही त्यामुळे हे घडतंय.नाव निघाल्यावर त्याचं लिखाण आठवावं असं प्रत्येकाच्या बाबतीत घडणार नाही हे मान्य आहे पण मग अट्टाहास निर्माण झाला की हे चालू होतं. अटेन्शन सिकिंग सिंड्रोम. माझी लायकी नाहीये हे मला माहित आहे पण म्हणून काय मी मागे रहायचं का? माझ्यासारखे भरपूर आहेत की इथे, चला टोळी बनवूयात. एकता हीच शक्ती. आयपीएलचं तत्वं. वेगवेगळ्या टोळ्या, मेंबर कधीही बदलू शकतात, जे आहेत त्यांच्या बरोबर करमणूक करा विसरून जा. मास महत्वाचा, क्लास गेला …. त. लाईक्स आणि कॉमेंट्स, पॉपकॉर्न आणि पेप्सी, जोडीनं रहायला शिका, एकटे पडाल नाहीतर!!!! :D :P ;)

--जयंत विद्वांस
(कृपया यातील कुठलाही मुद्दा कुणीही वैयक्तिक घेउ नये कारण तो कुणालाही उद्देशून लिहिलेला नाहिये.)




Wednesday 1 April 2015

वन्स अपॉन अ टाईम (१४)..... वीरेंद्र सेहवाग

मनमोहन देसाई आणि विरेंद्र सेहवाग यांच्यात मला कायम साम्यं वाटत आलंय.

१) दोघंही त्यांना आवडेल, रुचेल तेच करायचे


२) लॉजिक वगैरे गोष्टीशी त्यांच्या काहीही संबंध नसायचा 
३) हिट/फ्लॉप असल्या क्षुल्लक गोष्टींची ते फिकीर करायचे नाहीत 
४) दोघंही मास एंटरटेनर होते
५) दोघांचाही शेवट चांगला झाला नाही


सेहवाग, तेंडूलकर, अमला आणि रोहित शर्मा ओपनिंगला बढती मिळाल्यावर जास्ती चांगले खेळायला लागले (सन्माननीय अपवाद रवि शास्त्री). सेहवाग आला तेंव्हा तो तेंडूलकरसारखे हुबेहूब फटके मारायचा, अगदी झेरॉक्स काढल्यासारखे. पण फटके मारताना त्याला पुस्तकी शिक्षण वगैरे मान्यं नव्हतं. इच्छा झाली की तो त्याला हवा तो फटका मारू शकायचा कारण डोळे, हात आणि मेंदू याचा समन्वय त्याला उपजत होता, पायांची हालचाल, कोपर अमुक अंशामधे हवं असले किचकट, वेळखाऊ प्रकार त्याला जमले नाहीत. ब्रॅडमन म्हणालेला, ब्याट चेंडू मारण्यासाठी आहे, सोडण्यासाठी नाही. त्या लायकीचा खेळ व्हिव रिचर्डस आणि आपला सेहवाग करायचे. बरं तो उपजत क्रिकेटिंग उर्मट होता, समोरच्या बॉलरचं नाव मोठं आहे, पिच कंडिशन काय आहे, स्विंग मिळतोय का, फिल्डिंग काय लावलीये असले विचार त्याच्या डोक्याला त्रास द्यायचे नाहीत. 

टेस्टच्या तीन स्लीप, गली या फिल्डिंगचा सगळ्यात जास्ती फायदा यानी घेतला असेल. कव्हर मधून मागे शिकारी कुत्रं लागल्यासारखा बॉल पळायचा त्याचा. रजनीकांतच्या बालचित्रपटात ती बंदुकीची गोळी कशी स्लोमोशन मधे दाखवतात तसा याचा कव्हरचा चौकार स्लोमोशनला दिसायचा. तो आणि तेंडूलकर आळीपाळीनी वाजवायचे, बरं पहिला आउट होण्याचा बट्टा तो सचिनला लागू द्यायचा नाही हा बोनस होता. माझं मी काम केलंय, चेचून आलोय, तुम्हांला जमतंय तर धुवा नाहीतर माझ्या करणीवर फिरवा बोळा. ते काम विकेट पडल्याच्या नावाखाली आपले बाकीचे लोक प्रामाणिकपणे प्रयत्नं करून रनरेट दारिद्र्य रेषेखाली आणायचे. 


बॉलरना ओपनिंगलाच धुतलं की मग ते आणि त्यांचे साथीदार शांत पडतात हे जयसूर्या आणि कालुवितरणानी पहिलं शिकवलं ते सेहवाग तेंडूलकरनी पुढे नेलं. तो अपमान केल्यासारखा मारायचा बॉलरला. बरं ते करताना तो ते सगळं शांतपणाने करायचा त्यामुळे अजून चिडचिड व्हायची बॉलरची. रेकॉर्ड वगैरेचा हिशोब ठेवणारा हा माणूस नव्हे. पुण्यं केल्यासारखं तो आपलं काम करत जायचा. तरीही त्याच्या नावाला पुढचे रेकॉर्ड चिकटलेच आपोआप - वेगवान अडीचशे (२५०-२०७ चेंडू) त्रिशतक (३००-२७८ चेंडू), भारतातर्फे फास्टेस्ट शंभर (६० चेंडू), कसोटीत त्रिशतक आणि वनडे मधे द्विशतक काढलेला पहिला खेळाडू (वर्ल्डकपमधे गेलनी त्याची बरोबरी केली). 


२०११ च्या वर्ल्डकपला टीम मिटिंग होती ओपनिंग म्याचच्या आधी (बांगलादेश विरुद्ध - कारण त्यांचा २००७चा दणका जिव्हारी लागला होता). कर्स्टन आणि मंडळी प्लानिंग करतायेत आणि हा आपला काही संबंध नसल्यासारखा गाणी ऐकत होता. कर्स्टन त्याच्यावर उखडला. तो म्हणाला, बांगलादेश विरुद्ध काय करायचाय प्लान, जायचं आणि धुवायचं. आपण ४-३७० केल्या त्यात ह्याच्या १७५ होत्या. आत्मविश्वास म्हणायचा की बोलण्यातला आगाऊपणा हे ज्याचं त्यानी ठरवावं. पण निदान त्यानी बोलला ते करून दाखवलं.   


त्याला तसंही एका कानानी ऐकायला कमी यायचं, त्यात त्यानी चष्मा लावायला पण उशीर केला, आयपीएलच्या एका म्याचला रनरेट वाढावा म्हणून सिंगल घेऊन समोरच्याला स्ट्राईक देणारा वीरू पाहिला आणि वाईट वाटलं. काळाचा महिमा. कुठे थांबायचं हे कळायला हवं. कळत असावं पण मोह जिंकत असेल. वाढतं वय, कमी झालेले रिफ्लेक्सेस आणि हरपलेला फॉर्म. वाईट काळ आला की आजवरच्या दुर्लक्षित चुका पहिल्या दिसतात. लोकांना आधी चौकार, षटकार दिसायचे, पडत्या काळात लगेच त्याचे न हलणारे पाय दिसू लागले. हत्ती दलदलीत सापडला की बाहेर पडायचा मार्ग सांगायला त्याच चिखलातला बेडूकपण सल्लागार होतो म्हणा. 


तर तात्पर्य निरोपसमारंभ सुद्धा नशिबात लागतो. वगळल्यावर ते कौतुक नशिबात नाही म्हणून संसारात काय, खेळण्यात  कुठल्याही क्षेत्रात, ऐन भरात असताना, शिखरावर असताना निवृत्ती स्विकारता यायला हवी. गावसकर म्हणालेला ते कोरलं गेलंय अगदी "लोकांनी 'का' विचारलं पाहिजे, 'कधी' नाही"


जयंत विद्वांस