Thursday 24 October 2013

मन्ना डे


भारतीय सिनेसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातला राहुल द्रविड म्हणजे मन्ना डे. प्रत्येक मोठ्या हिरो साठी त्यांनी आवाज दिलाय पण तरीही 'ते फक्त शास्त्रीय बेस गातात', 'विनोदी गाण्यांसाठीच ते जास्त सूट आहेत' असं लेबल लाऊन त्यांना कायम दुर्लक्षित ठेवण्यात आलं. जो आवाज महमूद ला शोभला तोच राज कपूर ला आणि तोच राजेश खन्ना ला ही. पण पडद्यावरच्या व्यक्तिरेखे प्रमाणे आपण लेबल लाऊन मोकळे होतो. लगेच लो ग्रेड होते. 

बलराज सहानी - ए मेरी जोहराजबीं, ए मेरे प्यारे वतन, तू प्यार का सागर है; प्राण - क़समें वादे प्यार वफा सब, यारी है इमान मेरा, राज कपूर - ये रात भीगी भीगी, आजा सनम, लागा चुनरी मैं दाग; ए भाय जरा देखके चलो, आगा - फुल गेंदवा ना मारो; महमूद - मै तेरे प्यार मै; एक चतुर नार करके सिंगार, राजकुमार - हर तरफ अब यहीं अफ़साने हैं; अशोक कुमार - पूछों ना कैसे मैंने रैन बिताई. काळ्याकुट्ट अशोक कुमारची विषण्णता गाण्यातून पण अंगावर येते. आणि चक्क अमिताभ साठी ये दोस्ती…एका पेक्षा एक सरस गाणी. अलीकडचच प्रहार मधलं 'हमारी ही मुट्ठी में आकाश सारा' ऐका. प्रार्थना आहे हे सांगावं लागत नाही इतका धीरगंभीर आवाज आहे. ही गाणी जेवढी त्या अभिनेत्यांची तेवढीच ती मन्नादांची म्हणून ओळखली जातात हाच कदाचित त्यांचा दोष असेल. दादासाहेब फाळके पुरस्कार जाणीवा शाबूत असताना त्यांना मिळाला हे त्यांचं भाग्यच म्हणावं लागेल. 

आजा सनम, ये रात भीगी भीगी, लागा चुनरी में आणि यारी हैं मी कितीही वेळा ऐकू शकतो. अभिनेता पण चांगला लागतो त्यासाठी. यारी हैं ला प्राण ने २००% न्याय दिलाय तेवढाच न्याय राज कपूर ने लागा चुनरी में दाग ला दिलाय. शेवटचा तराना म्हणताना आरके चे फक्त ओठ हलत नाहीत तर शब्द ही बाहेर येतात, अर्थात आरके ला सुद्धा संगीताची  अफाट जाण होतीच. मन्नादांचं नशीबच फुटकं आपल्या द्रविड सारखं. आरके ला मुकेश चा आवाज आवडला आणि सूट पण झाला. त्यामुळे मन्नादा मागे पडले. तरीही ए भाय जरा देख के चलो साठी हाच आवाज लागला कारण शेवटच्या तीन ओळी फक्त मन्नादांनीच गाव्यात. 'बिना चिड़िया का बसेरा हैं' हे थेटर च्या अंधारात ऐकताना ही काटा येतो अंगावर. तो निर्मनुष्य तंबू त्या आवाजामुळे अजूनच भयाण वाटतो. या शिवाय छम छम बाजे रे पायलिया, झनक झनक तोरी बाजे पायलिया, प्यार की आग में, ज़िंदगी कैसी हैं पहेली हाए, कौन आया मेरे दिल के द्वारे, तेरे नैना तलाश कर जिसे आणि दिल की गिरह खोल दो सारखी अनेक युगुल गीतं.                        
किशोर, मुकेश, रफी आणि मन्नादा ही सुरेल चौकडी होती. हेमंत कुमार, तलत ही मंडळी ही होतीच पण ही चौकडी महान होती. एक एक करत सगळे गेले. मन्नादा शेवटचा मालुसरा. चौकडीत प्रत्येकाची काही ना काही खासियत होती. मन्नादांची आठवण मात्र फक्त शास्त्रीय बेस किंवा विनोदी गाण्यांसाठीच व्हावी हा विरोधाभास अनाकलनीय आहे. अनेक भाषांतून हा माणूस गायलाय. यादी काढली आठवली तर कित्तीतरी सुरेल गाणी देत येतील. पण वरची गाणी मनात घट्ट रुतून आहेत. मन्नादा म्हटलं की ही गाणी डोळ्यांपुढे हजर होतात, कानात वाजू लागतात. त्यांची मराठीतली काही गाणी सुद्धा लक्षात राहण्यासारखी आहेत. अ आ आई,  गोपाला गोपाला देवकीनंदन, घन घन माला नभी, हाऊस ऑफ बॅम्बू, होम स्वीट होम अशी बरीच. या शिवाय भजनं आणि चित्रपट व्यतिरिक्त ही बराच गायलेत मन्नादा. त्यांनी हरिवंश राय बच्चन यांचं 'मधुशाला' खूप सुरेख गायलंय.     

ही सगळी मोठी माणसं. केवळ अंगातल्या कलेमुळे नाही गाजली तर विनम्र स्वभाव, एकमेकांबद्दल आदर आणि निरोगी स्पर्धा यामुळे गाजली. 

बसंत बहार मध्ये त्यांना भीमसेन जोशींबरोबर केतकी गुलाब जुही हे गाणं होतं. पडद्यावर मक्ख चेहऱ्याच्या भारत भूषणला मन्नादांचा आवाज होता आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याला पं. भिंसेन जोशींचा. चित्रपटाच्या कथेनुसार भारत भूषण जिंकतो. झालं. मन्नादा काही केल्या रेकॉर्डिंग ला यायलाच तयार होईनात. पडद्यावर का होईना पण भीमसेन जोशींना हरवायचं??? छ्या!!! 'मी येणार नाही' असं सरळ कळवून टाकलं त्यांनी. शेवटी भीमसेनजींनी समजूत काढली - अहो हे खोटं आहे. या तुम्ही. अत्यंत नम्रतेने हा माणूस त्या रेकॉर्डिंग ला गेला.      

आता मन्नादा ही नाहीत आणि भीमसेन ही नाहीत. मुळात ती विनम्रताच आता नाही. सभ्य कलाकार हा शब्दही आता दुर्मिळ आणि माणसंही.   

--जयंत विद्वांस

Monday 7 October 2013

प्रिय राहुल...

प्रिय राहुल 

आम्ही पु.लं.चा नारायण वाचला, ऐकला आणि गेली 15-16 वर्षे पाहीला पण. काल भारतीय संघाचा नारायण निवृत्त झाला. द्यानेश्वरांनी चालवलेली पहिली आणि ही दुसरी, अश्या दोन भिंती आम्हांला माहीत आहेत.

तो जोकर होता बावन पत्त्यातला. ट्रायो, सेकंड सिक्वेनस् हवाय, वापरा बिनधास्तं. त्यानं काय केलं नाही? त्यानी जे सांगितलं ते सगळं केलं संघासाठी. फक्तं त्यानी कधी रडीचा डाव खेळला नाही, त्यानी अंपायरला शिव्या दिल्या नाहीत, तो कुणाच्या अंगावर धाउन गेला नाही, मॅच फिक्सिंग मधे साधा उल्लेख नाही, वादळी मुलाखती नाहीत, लफडी नाहीत.

तो म्हणजे क्रिकेट मधला आशा काळे, अलका कुबलचा वारसदार. त्याची बॅट म्हणजे पतिव्रताच. जरा पदर ढळणार नाही. कव्हर चा फटका तर किती मोहक. चेंडूला फार त्रास तर होणार नाही ना, गोलंदाजाला राग तर येणार नाही ना अश्या सगळ्या काळ्ज्या त्यानी घेतलेल्या असायच्या. सेहवागसारखा स्पीड, रिचर्डसची ताकद, गॉवरची नजाकत काही काही नसायचं त्यात. त्यात असायचं परफेक्शन्.

संयम शब्दाचा अर्थ जास्तं त्रास न घेता पटवून द्यायचा असेल तर त्याचं नाव घ्या, पटेल लगेच्. सभ्यं लोकांचा खेळ असं म्हणतात क्रिकेटला, आताही म्हणतील, पण आत्ता खेळणा-या काही मोजक्या सभ्यं माणसांपैकी एक काल निवृत्त झाला.

द्राविडी प्राणायाम चा खरा अर्थ त्याला ज्यांनी गोलंदाजी केली त्यांना विचारा. तू केंव्हा निवृत्त व्हावस्, व्हायला हवं होतं या बद्दल बरेच जण बोलत होते, बोलतील. ज्यांना स्‍वतःला कधी निवृत्त व्हावं हे कळलं नाही, ते तर सल्लागार म्हणून आघाडीला होते. आम्ही साधे भारतीय, व्यक्तिपूजक प्रेक्षक, फार काही कळत नसल्यामुळे आम्ही खेळाचा आनंद लुटू शकतो. तुला मोफत सल्ला देण्याएवढा अधिकार नाही आणि पात्रताही नाही. असो.

राहुल, तू आम्हांला जो आनंद दिलास् त्या बद्द्ल शतशः आभार.
--- जयंत विद्वांस   



-- 

Thursday 3 October 2013

प्रिय ‘ती’स् .....


किती वर्षांनी दिसलीस? जवळजवळ १९-२० वर्षांनी. जग फार छोटं आहे म्हणतात तरीही एकाच शहरात एवढा काळ लागला नुसतं दिसायला, समोरासमोर येणं अजून लांबच आहे. 

काळाचा फार परिणाम तुझ्यावर झाला नाही, याचं कौतुक वाटलं. सगळेच् देखणे चेहरे वाढत्या वयात तसेच रहात नाहीत. काहीवेळेस जुने चेहरे आठवणीतून पुसून टाकावेत इतके बदलतात. तू फेसबुकावर आहेस की नाहीस माहित नाही. तुझ्यावर ती-1 ते 15 अशा तब्बल पंधरा कविता झाल्यात… इतर सौंदर्यकवितांचं  प्रेरणास्त्रोत पण तूच तर आहेस त्यामुळे फक्त १५ नाहीत. त्याची रॉयल्टी काय देउ??? 

मनात असूनही हाक मारू शकलो नाही कारण आपण परत न भेटणच इष्टं असं मला वाटलं. काही जपलेल्या गोष्टी असतात त्या तशाच राहिलेल्या ब-या, नाही का? अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, जबाबदा-या, संसार, मुलं, समाज या सगळ्या जंजाळातून त्या पूर्वीच्या भावना उरतीलच असं नाही. असतील उरल्या तरी दर्शविता येतीलच असंही नाही. सगळीच कुचंबणा आणि बंधनं. त्यामूळे जे जपलय तेच छान आहे असा विचार केला.



असेल योग तर भेटूच आपण आज ना उद्या. दोघांकडेही सांगण्या ऐकण्यासारखं खूप असेल, फक्तं काळ तेवढा शिल्लक असला म्हणजे झालं.

(कुठल्याही मृत अथवा जिवंत, एक किंवा अनेक व्यक्तिशी संबंध आढळल्यास तो योगायोग समजू नये.)
......

जयंत विद्वांस