Saturday 30 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१२)… केश्तो मुखर्जी…

सत्तर एमएम चे आप्तं (१२)… केश्तो मुखर्जी…
 
सुंदर निखळ विनोद करणं मोठं अवघड काम असतं, तो जमला नाही तर हसू येत नाही, हसं होतं. अनेक विनोदवीर होऊन गेले. कुणी शब्दं खेळ करून हसवलं, कुणी आचरटपणा करून हसवलं (राजेंद्रनाथला तोड नाही यात), कुणी अंगविक्षेप न करता हसवलं (उत्पल दत्त, देवेन वर्मा, सुधीर जोशी), कुणी टायमिंगवर हसवलं (अशोक सराफ नं १ ते १०, परेश रावल, अर्शद वारसी), कुणी आवाजाच्या लकबीवर हसवलं (जॉनीवॉकर, ओमप्रकाश) आणि ज्यांना पाहिलं की मला हसू येतं असे म्हणजे राजपाल यादव, जगदीप, केश्तो मुखर्जी. जुही चावला, फरीदा जलाल, आगा हे मला त्यांच्या भन्नाट सेंस ऑफ ह्यूमर साठी आवडत आलेत. यांच्या चेह-यावर आगामी विनोदाची जी हालचाल होते ना ती मोठी बघणीय असते. दिग्दर्शक चांगला असेल तर काहीजण उत्तम विनोद करू शकतात (सुनील आणि अक्षय - हेरा फेरी आणि फिर हेराफेरी).  अशी यादी देत बसलो तर संपणार नाही.

तर काही काही रोलवर काही काही माणसांचे ठसे असतात, नाच्या म्हटलं की गणपत पाटील तसं दारुडा म्हटलं की दारूचा एकही थेंब आयुष्यात न पिता अट्टल दारुड्याचं काम करणारा केश्तो मुखर्जी. केश्तोचे फार सिनेमे मी पाहिलेले नाहीत किंवा पाहिले असतीलही पण लक्षात नाहीत. 'शोले'तला हरिराम नाई, 'बॉम्बे टू गोवा' मधला झोपलेला दारुडा, 'पडोसन' मधला किशोरचा दोस्त, 'इन्कार'मधला साब, पानीमें आग, आगमें पानी' म्हणणारा दारुडा आणि 'जंजीर'मधे अमिताभला लटकावणारा गंगू - हे मात्रं मी विसरू शकत नाही. काटकोळी शरीरयष्टी, कायम नशा न उतरलेला चेहरा, चाप्लीनसारखी मिशी आणि लेट करंट असल्यासारखं त्याचं ते मंद माणसासारखं बघणं, ते डोळे फिरवणं, खालचा ओठ दाबत ते मान तिरकी करून लाचार बघणं याची कॉपी नाही झाली कधी कारण ते सगळं ओरिजिनल होतं. त्याला हशा निर्मितीसाठी बोलायची गरज नव्हती. त्यानी डोळे उघडले तरी लोक हसायचे. 


रवीना टंडनचा मामा म्याकमोहन उर्फ सांभा नाराज होता सिप्पीवर, रोल कट केला म्हणून. सिप्पीनी त्याला सांगितलं होतं, रिलीज होऊ दे मग सांग. त्यातला अंग्रेजोके जमानेका जेलर असरानी आणि खब-या हरिराम नाई केश्तो पाच दहा मिनिटच असतील एकूण पडद्यावर पण त्यांनी धमाल केलीये. बच्चन धर्मेंद्रला प्लान सांगतो पिलरच्या आड, तेंव्हा चोरून ऐकताना केश्तोच्या चेह-यावर जे उमटलंय ते बघाच, त्याची ती बिरबलची अर्धवट दाढी ठेवून जेलरकडे जाण्याची टिपिकल चुगलखोर माणसाची असते तशी घाई, तिथे खबर देताना चेह-यावर असलेली मतलबी लाचारी, असरानी राउंड घेतो तेंव्हा आता कसे पकडले जाणार याचा आनंद त्याच्या चेह-यावर बघावा, तो केश्तोपाशी थांबतो तेंव्हा डोळ्याने कडेच्या माणसाकडे खुणावणं, आपलं बिंग उघडं पडेल याची भीती. अनंत वेळा शोले बघताना काय घडणार हे माहित असूनही मला कायम हसू फुटलेलं आहे.

'बॉम्बे टू गोवा' मधला झोपलेला दारुडा म्हणजे विनोदाचा 'मूक'प्रकार होता. बसला धक्का मारताना तो हवेत हात टेकवून ढकलत असतो. बसमध्ये काय काय घडत असतं पण हा पठ्ठा सदानकदा झोपलेला. सतत बेअरिंग सांभाळणं मोठं अवघड काम आहे. 'परिचय'मधला ज्याला मुलं पळवून लावतात तो मास्तर होता तो. 'इन्कार'मधे मासे पकडायला बसलेला असतो तो. विडी पेटवून पाण्यात टाकलेल्या काडीनी आग लागल्यावर केश्तोच्या चेह-यावर कपाळात गेल्याचा भाव आहे. तो पळत जातो आणि चौकीत जे असंबंद्ध बडबडतो ते हसू फुटणारंच आहे. 'पडोसन'मधल्या 'मेरे सामनेवाले खिडकी'ला खराट्यावर कंगवा फिरवणारा केश्तो, किशोरचा मित्रं होता. त्याचं ते ओठ दाबून बघणं, ती डोक्यावर उभी असलेली बट, हसू आणते.  


'जंजीर'मधला गंगू त्या मानानी मोठा होता. त्याचं ते अमिताभला 'आईये ना' म्हणणं अगदी गळ्यात पडणारं होतं, गरीबाच्या घरी कुणी मोठा माणूस येत असला की त्याची एक वेगळीच लगबग असते. आपलं दारिद्र्य त्याला दिसू नये म्हणून मोठा पाहुणचार करतात मग ते, तशी त्याची लगबग बघावी त्यात. त्याला पकडून दिल्यावर त्याची ती शरमेने खाली गेलेली मान शॉटमधे जे कदाचित लिहिलेलं नसावं आणि असलं तर ते त्यानी ते शंभर टक्के पोचवलंय. प्राण बरोबर ट्रेनमधून जाताना त्याच्या चेह-यावरची भीती बघा. असल्या अभिनयाला बक्षीस नाही मिळत हे दुर्दैवं. क्रिकेटमधे फोर सिक्स मारणारे जास्ती फेमस असतात पण इमाने इतबारे धावा करणारे यशपाल शर्मा, ख्रिस हरीस, गेव्हीन लार्सन, रहाणे मागे पडतात तसंच असतं या लोकांचं. कमीतकमी वेळात चमकीतला हिरा चमकावा तसे चमकून जातात पण त्यांचं अस्तित्व मोठा उजेड पडला की काजव्यासारखं पटकन संपतं.  

त्याचा मुलगा बबलू मुखर्जी काही मालिका आणि चित्रपटातून चमकला पण तो देखणा, गोलमटोल होता. केश्तोला कायम आर्थिक चणचण असायची असं वाचलं होतं. फुटकळ भूमिकातून किती पैसे मिळणार म्हणा. दिग्गज बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटकच्या मर्जीतला होता तो, त्यामुळे त्याच्या चित्रपटात छोटा पण महत्वाचा रोल त्याला मिळायचाच. ८१ ला मरायच्या एक वर्ष आधी त्याला बेस्ट कॉमेडीयनचं फिल्मफेअर पण मिळालं, एवढंच काय ते बक्षीस.  

दारू पिणारे बिचारे आपण शुद्धीत आहोत हे दाखवण्यासाठी किती खटाटोप करतात आणि तरीही पितळ उघडं पडायचं ते पडतंच, इकडे हा आणि 'जॉनीवॉकर' बद्रुद्दिन काझी मात्रं थेंबाला स्पर्श न करता अट्टल दारुडा उभा करतात. अभिनय म्हणजे वेगळं काय असतं, जे आपण वास्तवात नाही ते पात्रातून उभं करणं. केश्तो, जबतक शोले और जंजीर देखुंगा तबतक तेरा हरिराम नाई और गंगू भूलुंगा नही! हसता हसता कृतज्ञेतेने डोळ्यात पाणी येईल एवढं निश्चित. 
 
जयंत विद्वांस 
 

Friday 29 January 2016

वर्तुळ...

वर्तुळ... 

नव्यानीच हौशी नाटक, सिनेमात काम करणा-या किंवा त्यासंबंधित क्षेत्रात काम करणा-या, गायक, वादक, नट लोकांची एक वेगळीच भाषा असते, त्यात नुसती मौखिक भाषा नाही तर देहबोली पण आली. त्याचं नाव झालेलं नसतं, त्यांना त्यांचा ग्रूप सोडून फार कुणी ओळखत नसतं आणि प्रसिद्धीची हौस तर तुंबलेली असते. आपल्याच क्षेत्रातला दुसरा माणूस हजर नसेल तर उपस्थित माणसांसमोर ते जास्ती खुलतात. त्यांना श्रोते हवे असतात. ते पण अचंबित होणारे, 'फार बाबा ओळख तुझी' अशा अर्थाचं कौतुकाने बघणारे, उगाच टाचणी लावून स्वप्नं फुगा फोडणारे श्रोते पुढच्यावेळी टाळले जातात. आपण काय करतो आणि मनात 'काय करता आलं असतं अजून' याची सरमिसळ झालेली असते त्याला वाचा फुटते अशा वेळी. सगळ्यांमध्ये एक साम्यं काय तर 'आपण इतरांपेक्षा किंवा अमुकतमुकपेक्षा कसे वेगळे आहोत' हे ठसवणं.

नाटकाच्या इंटरव्हलला या गप्पा ऐकाव्यात. एखाद्या प्रामाणिक माणसानी त्याला जे वाटतंय ते समजा प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा, नाटक छान आहे, की त्याचा पार भुगा करतात हे लोक. 'यापेक्षा आम्ही सरस करतो', 'किती घाईत उरकलंय', 'तिची एंट्री तर धावत आल्यासारखी झाली, तिला सांगा रे कुणीतरी बालनाट्यात काम कर म्हणाव आधी', 'छ्या, त्यापेक्षा त्या ह्याला गेलो असतो तर बरं झालं असतं'. बरं, हे लोक अर्ध्यात निघून जात नाहीत, उरलेला भाग संपूर्ण बघतात. मनातून जे चाललंय ते आवडलेलं असतं पण पहिल्या भूमिकेशी ठाम राहायचं हे ठरलेलं असतं. मी एकदा विचारलेलं एकाला, 'का रे भंगार होतं तर थांबलास कशाला?' त्या बेडकानी मला चीतपट करणारं उत्तर दिलं होतं, 'नाटक कसं करायचं नाही याचा पण अभ्यास असतो रे, तुला नाही कळणार'. 

फलाणा नट, नटी, दिग्दर्शक किती जवळचा आहे हे सांगण्याची पण एक स्टाईल असते. मी एका बरोबर गप्पा मारत होतो एकदा, असेल साल ९४-९५. माणूस हौशी नाटकात काम करायचा म्हणजे असं त्यानीच सांगितलेलं. 'काय रे दिसला नाही बरेच दिवस?' 'अरे, xxxx करतोय सध्या त्यामुळे वेळ नाही, आत्ता पण लकीली भेट झाली. सवितानी सांगितलंय, 'भरत'ला येच, ब-याच दिवसात भेटलो नाहीये आपण, नऊला ये डॉट, तिकडेच निघालोय'. मी घरी आलो नी पेपर बघितला, 'भरत'ला 'चार दिवस प्रेमाचे होतं सहा वाजता. मला खात्री होती की सविता प्रभुणेनी याला अजिबात बोलावलं नसणार. एखाद्या नाटकाच्या वेळेस दोनचार शब्दं बोलली असेल एवढंच. छान काम करतोस एवढं म्हणाली असेल फार फार तर. पण मला दिपवून टाकण्यासाठी ते बोलणं त्याच्या दृष्टीने गरजेचं असावं. खरंतर नंतर 'काय म्हणाली सविता' किंवा त्याच वेळी 'मी पण येऊ का, सही घ्यायचीये फक्तं' असं बोलायचं असतं मला पण जीभ रेटत नाही माझी. मला खरं वाटावं हा त्याचा हेतू असफल झाला असता, कुणाचं स्वप्नं तोडायचं पाप नको उगाच. 

एकजण 'पंतां'च्या संस्थेत होता. कधीही बघा, माणूस 'लखोबा लोखंडे' तोच करत असल्यासारखा सगळा भाव असायचा. आतल्या स्टो-या, किस्से ऐकून आम्ही गपगार व्हायचो. हा गेला नाही तर प्रयोग होणार नाही असं आम्हांला वाटायचं. एवढं असून पण कधी पेपरातल्या जाहिरातीत नाव का येत नाही असा भाबडा आणि सहानुभूती वाटणारा प्रश्नं पडायचा. अनेक वर्ष मी बघत होतो. त्यांची अनेक नविन नाटकं आली सगळ्या नाटकात पण याचं नाव कधी जाहिरातीत नाही आलं. नंतर समजलं की पोस्टमन, नटीचा भाऊ, दीर, निरोप्या, नुसता बसणारा, एखाद दोन वाक्यं बोलणारा जज्ज अशीच कामं असायची. पण त्याचा जीव रमायचा एवढं खरं. खरंतर माझ्यासारख्या माणसाला त्या तालमीच्या प्रोसेसचं फार आकर्षण आहे. स्टेजवरच्या नाटकापेक्षा ते उमलत जाणारं नाटक बघण्यात जास्ती मजा आहे. ती प्रोसेस त्याला पण आवडायची म्हणूनच तो जायचा पण आपण काय असायला हवे होतो हे तो आम्हांला तो ते आहे असं सांगायचा. त्याचा जीव रमायचा हेच खरं.  

खरा अभ्यास करणारा माणूस विरळ असतो. अफाट वाचन वगैरे लांबच्या गोष्टी. ऐकीव माहितीवर आधारित स्वत:ची चार वाक्यं घालून हे लोक बोलतात मात्रं स्टायलिश. त्यांच्यापेक्षा बुद्धिमान माणूस आला तर हे म्यूट होतात. तो माणूस एकदा गेला की मग त्याची निंदा करण्यात वेळ घालवतात. 'नशीब आहे रे त्याचं', 'लाळघोटेपणा करत नाही ना आम्ही म्हणून मागे आहोत', 'एकदा स्टेजवर आला पाहिजे समोर, परत काम नाही करणार, मी असलो की', वगैरे हेडलाईन्स स्क्रोल होतात. त्यातला फोलपणा बोलणारा आणि ऐकणारा दोघांना जाणवत असतो. यांच्या नशिबात त्यांना कुणीतरी आदर्श मानेल असाही ही एक स्तर असतो. तुमची लिडरशीप, विधानं करण्याची पात्रता, दाखवायचा बिनधास्तपणा, आपल्याला काही फरक पडत नाही यावर भक्तगणसंख्या अवलंबून असते. हळूहळू डबकं तयार होतं, मग तोच समुद्र वाटायला लागतो हे वाईट आहे.

बिचारे जागरणं करतात, फुकट राबतात, दाढ्या वाढवतात, त्यांचा कुठला तरी आदर्श ओढतो ती आणि तशी सिग्रेट ओढतात, तंबाखूचे बार भरतात, दारवा पितात. खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवतात, डोळे उघडे ठेऊन बुर्ज खलिफा एवढ्या उंचीची  स्वप्नं बघतात. हळूहळू वास्तव कळायला लागतं. कुणी पॅराशुट लावून अलगद जमिनीवर येतात, कुणी दाणकन आदळतात. काहीजण स्विकारतात, काहीजण स्वप्नातच रमतात. प्रत्येक नव्या प्रयोगाला अंकुर फुटतो, नविन पिढी मागे रेटत असते. वयामुळे कुणी फटकन बोलत नाही तरी हे अक्कल शिकवायला जातात, अपमानित होतात पण मागे हटत नाहीत. तिथलाच त्यांच्याइतकाच नवखा, स्वप्नाळू जमाव शोधतात आणि त्यांना 'पुरुषोत्तम'ला काय काय केलंय, कुणी कुणी कौतुक केलं होतं, नंतर आपल्याला संधी कशी मिळाली नाही, आपल्यावर अन्याय कसा झाला अशा स्टो-या सांगायला सुरवात करतात. ते भाबडे लोक ऐकतात, हळहळतात. याला तेवढंच बरं वाटतं. त्याला त्यानी जिथून सुरवात केली तो दिवस आठवतो आणि एक वर्तुळ पूर्ण होतं.  

जयंत विद्वांस

Friday 22 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (११)… सी.रामचंद्र…

सत्तर एमएम चे आप्तं (११)… सी.रामचंद्र…


प्रत्येक चित्रपटसृष्टीचा एक विशेष असतो. हॉलीवूडला गाण्यांचा दुष्काळ तर आपल्याकडे गरज नसली तर कोंबतील. आपल्याकडेही परत अनंत प्रकार आहेत. साउथकडे पैलवान हिरोईनी, अतर्क्य फाईट सीन्स, भन्नाट डान्स स्टेप्स, लाउड अभिनय (यांचे रिमेक जास्ती चांगले वाटतात), मराठीत दोन टोकं, काहीवेळेस बांधेसूद पटकथा, उत्तम अभिनय तर कधी अश्रुधूराचा बाँब फोडतात नाहीतर मग हसू न येणारे विनोदी चित्रपट. पण हा झाला आत्ताचा काळ. साठ ते नव्वदच्या दरम्यान संगीत हा प्राण होता चित्रपटाचा, मराठी असो की हिंदी. हिरो पंजाबी गोरा, देखणा, हिरोईन साउथकडची चांगली डान्सर, चरित्र भूमिकेला मराठी लोक, गायला लता, आशा, संगीत बंगाली मॉब जास्ती (एसडी, हेमंतकुमार, सलील चौधरी, अनिल विश्वास) की झाला चांगला हिंदी चित्रपट. या सगळ्यात एक मराठी माणूस वेगळेपण  टिकवून राहिला - सी.रामचंद्र.

पुणतांब्याला १२ जानेवारी १९१८ ला जन्माला आलेला आणि ५ जानेवारी १९८२ ला स्वत:च्याच नावातला राम म्हटलेला हा रामचंद्र नरहर चितळकर नावाचा बेफाट, हुन्नरी आणि देखणा माणूस जगला असता तर आत्ता अठ्ठ्याणव वर्षांचा असता. मोठी गंमत असते. आपण ठरवतो ते आयुष्यात होतंच असं नाही किंबहुना न ठरवलेलं जास्ती होतं. आधी त्यांनी चित्रपटात केलं, मग तमिळ चित्रपटात संगीतकार झाले, अण्णासाहेब, राम चितळकर, शामू आणि सी.रामचंद्र अशी चार नावं लावून संगीत दिलं, मराठी चित्रपटात आर.एन.चितळकर असं नाव लावून कामं केली, गाणी म्हटली, चित्रपट काढले, 'माझ्या जीवनाची सरगम' नावाचं आत्मचरित्रं लिहिलं आणि या सगळ्याला बाजूला सारून लक्षात रहातील अशा अजरामर चाली दिल्या.

'अपलम चपलम, चपलाई रे' हे मी त्यांचं सगळ्यात पहिलं ऐकलेलं गाणं. संगीतकार, गीतकार, गायक कोण वगैरे काहीही कळायचं वय नव्हतं तेंव्हा ऐकलेलं. पुढे कळलं की या माणसाचं नाव सी.रामचंद्र. न कळत्या वयात मी त्यांचं आत्मचरित्र वाचलं होतं. भिकारदास मारुतीपाशी गोवित्रीकरांची लायब्ररी होती. त्यांच्याकडून घेऊन मामानी दिलं होतं. खूप वर्ष मी ते शोधतोय, मिळत नाहीये. 'आम्ही चौपाटीच्या वाळूवर रत झालो' असं काहीतरी वाक्यं त्यात होतं. 'रत' शब्दाचा अर्थ विचारल्यावर मामा म्हणाला होता, मोठा झालास की कळेल आपोआप. वयानी मोठा झालो आणि आणि जगण्यातले तोटे लक्षात येऊ लागले, तो तोट्यातला धंदा अजूनही चालूच आहे, अर्थ समजले, अज्ञानातली मजा गेली. माणूस मोठा कलाकार, हुन्नरबाज, असामान्य असला की वादग्रस्त असतो की वादग्रस्त माणसात हुनर असतो, हा मला कायमस्वरूपी पडलेला प्रश्नं आहे. आपण चांगलं ते बघावं, उचलावं, अनुकरण करावं. उगाच गुडघ्यावर शाल टाकून गायला बसलं म्हणजे कुणी भीमसेन होत नाही. आपण सोप्पं ते उचलतो. आज्जी म्हणायची, 'अरे, शेणसुद्धा रस्त्यावर पडलं तर उठताना माती घेऊन उठतं, आपण जिथे जातो तिथल्या माणसात चांगला गुण असेल तर चिकटवून घ्यावा'.

लोकांना त्यांची चांगली गाणी आठवणार नाहीत पण 'ए मेरे वतन के लोगो'ची स्टोरी पदरची चार वाक्यं घालून बोलतील. सत्यं हे मोहरी शोधण्यासारखं असतं, कोण कष्ट घेणार. मी वाचलंय एका ठिकाणी - नेहरू रडले वगैरे सगळं सपशेल खोटं आहे. ते रडले हे गाणं चांगलं असण्याचं सर्टिफिकेट आहे का? समजा ते रडले नसते तर आपल्याला आवडलं नसतं का? पण आपल्याला कुणा मोठ्या माणसाच्या नावाचा टेकू लागतोच. मुळात अचानक सादर करायला सांगितलेलं हे गाणं होतं म्हणे. प्रदीपनी या गाण्याची शंभर कडवी लिहीली होती म्हणे. अर्धवट माहितीवर छातीठोकपणे बोलण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागत नाही. त्यामुळे शहाण्या माणसांनी ऐकावं सगळं पण ते पुढे पोचवताना तारतम्य ठेवावं ही पोच आपल्याला कधी येणार काय माहित. माणूस गेला की तो आरोपांना उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे नंतर केलेले आरोप मूर्खपणाचे असतात. मोठ्ठी माणसं अशावेळी मौन धारण करतात आणि तेलपाणी घालतात, ज्यांना सत्यं माहित असतं ते घाबरून गप्पं बसतात. 'ये जिंदगी उसीकी है' 'मूर्तिमंत भीती उभी' वरून बेतलय हे स्वत: चितळकरांनी सांगितलं होतं, मग कशाला चिखलफेक हवी होती. पण शेवटी मातीचेच पाय असतात सगळ्यांचे. कसलातरी राग कुठेतरी काढत असावेत. त्यावर आधारित आहे म्हणून त्याची गोडी कमी होत नाही आणि मुळात त्यांनी ते लपवलेलंही नाही. अनेक चीजांपासून स्वत: गाणी बनवली की ती क्रिएटीव्हिटी आणि दुस-यांनी बनवली की ती चोरी असते. आरोप प्रथितयश माणसांनी केला की साला त्याला सुद्धा वजन असतं कारण लोक बोलतात पण दबक्या आवाजात, तिथे फावतं. असो!

अर्थहीन पण उच्चाराला -हिदम लटकलेले शब्दं चालीत बसवणं हे काम सी.रामचंद्रनी सुरु केलं असावं. 'आशा' मधलं 'इना मीना डिका' त्याची सुरवात होती. 'शिनाशिनाकी बुबला बू' अशा नावाचा चित्रपट पण त्यांनी केला होता. त्यांची सगळी गाणी मी काही ऐकलेली नाहीत. पण जी ऐकली आहेत ती अफाट आहेत. त्यांचा आझाद, नवरंग, अलबेला, अनारकली पुरेसे आहेत मला. राधा ना बोले ना बोले, तलत न आल्यामुळे म्हटलेलं 'कितना हसीं ही मौसम', जा री जा री ओ कारी बदरिया, अपलम चपलम - आझाद (आधी नौशाद कडे गेला होता 'आझाद' पण तीस दिवसात दहा गाणी पाहिजे म्हटल्यावर त्यांनी 'हे काय वाण्याचं दुकान आहे का' म्हणून निर्माता नायडूला हाकललं होतं), जा रे हट नटखट, आधा है चंद्रमा, कारी कारी अंधियारी, श्यामल श्यामल वरन, तू छूपी है कहा  - नवरंग, धीरेसे आ जारी अखियनमें , शोला जो भडके, शाम ढले खिडकी तले, किस्मत की हवा कभी नरम आणि एव्हरग्रीन भोली सुरत दिलके खोटे - अलबेला, जागे दर्द इश्क जाग, मोहब्बत ऐसी धडकन है, आजा अब तो आ जा आणि 'मूर्तिमंत भीती उभी' या नाट्यसंगीतावरून घेतलेलं 'ये जिंदगी उसीकी है' - अनारकली, निगार सुलतान आणि गोप वर चित्रित झालेलं सी.रामचंद्रनीच म्हटलेलं 'मेरे पिया गये रंगून'.


मला काही गाण्यातलं एवढं कळत नाही पण ' जा री जा री ओ कारी बदरिया' मधे दोन्ही 'ग' आहेत असा माझा समज आहे (चुकीचा असला तर असो बापडा) पण ती चाल बदलते ना तिथे आणि कडव्याच्या शेवटी शब्द आणि सुरांना अस्तर लावल्यासारखा ठेका येतो तिथे जीव टाकावा असा प्रकार आहे अगदी. 'अपलम चपलम'चा ठेका ऐका, अवीट गोडीचं गाणं, कितीही वेळा ऐका. त्यात 'काहे को ये आग लगाई रे, लगाई रे, लगाई रे, 'रोए, रोए, जान गवाई रे, गवाई रे, गवाई रे' आणि 'सुदबूद सब बिसराई रे' नंतर जी धावपळ आहे ना ती आणि ती शब्दांची जी पुनरावृत्ती आहे नं ती मला अत्यंत आवडून गेलेली आहे. एके ठिकाणी मी वाचलं होतं ' गायकाला गाता ठेवेल असा हवा, वरचढ नको'. आताच्या गाण्यात ठेका ऐका फक्तं, शब्दं समजून घ्यायच्या भानगडीत पडू नका. मोजक्या वाद्यात मजा येतेच की पण आहे घरात, ठेवून खराब होईल अशा भीतीनी वाजवतात हल्ली सगळी वाद्यं. त्यांच्या 'ये जिंदगी उसी की है'ला फुफ्फुसं गळ्यापाशी येतील म्हणायला गेलो तर आणि 'मोहब्बत ऐसी धडकन है' ला मोरपीस फिरेल. सगळा 'नवरंग' घ्या, सुरेल श्रवणीय गंमत सगळी (महिपाल आणि संध्या - नाही काही बोलत). 'नवरंग'चा रिमेक व्हायला हवा. 

एका संगीतकारानी सांगितलं होतं, 'स्वर सातच आहेत पण तुम्ही कुठल्या स्वरानंतर कुठला घेताय, कितीवेळा घेताय, तिथे किती रेंगाळताय यावर चालीचं वेगळेपण ठरतं'. चाल म्हणजे सुरांची कुठल्यातरी क्रमाने मांडलेली आरास नव्हे तर तो फ्लो आहे, उतारावरून पाणी जसं लयीत खाली येतं तशी हवी चाल, न अडखळता आलेली, धाप न लागलेली, प्रवाह न तुटलेली, मधे आलेल्या खड्यांना किंवा खडड्यांना ओलांडताना ठेका समजून त्याच्याशी गुजगोष्टी करून पुढे जाणारी. आताचा गोंगाट ऐकला की जुन्याची किंमत कळते, मेलडी म्हणजे काय ते कळतं. अनेक शोध लागतील, नवनवीन वाद्य निघतील पण चाल, सुरेलता यंत्रातून येत नाही, नाहीतर चाली करायचं मशिन किंवा सॉफ्ट वेअर निघालं असतंच की.

जोपर्यंत गणशोत्सव आणि लग्नाची वरात आहे तोवर तीन गाणी अजरामर आहेत 'नाच रे मोरा', 'मुंगडा मुंगडा' आणि 'भोली सुरत दिल कॆ खोटे'. झोपडपट्टीत कुणाच्या तरी लग्नात बेंजो आणि ढोलक वर वाजलेली ट्यून त्यांच्या डोक्यात होती. त्यांनी आणि भगवानदादांनी त्याला बोलावून त्याच्याकडूनच ती वाजवून घेतली ती. ज्याला चाली चोरायच्यात तो माणूस असं कशाला करेल. शेवटी शेवटी ते रग्गड प्यायचे एवढीच गोष्टं लक्षात ठेवण्यासारखी आहे त्यांची?

चितळकर, हल्ली एका चित्रपटात दोन (खूप होतायेत ना) सुरेल, शब्दं समजतील, गुणगुणावीशी वाटतील अशी गाणी सापडणं हा दुर्मिळ योग आहे आणि तुम्ही एकाच सिनेमात सगळी गाणी हिट देण्याची करामत करत होतात. खरं खोटं एक तुम्हांला आणि एक हयात व्यक्तीला माहित, माझ्यासाठी 'आझाद', 'नवरंग', अलबेला', 'अनारकली' 'पतंगा'ही वस्तुस्थिती आहे, बाकी काय करायचंय मला.  
जयंत विद्वांस 







    

Monday 18 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१०)…बिंदू

सत्तर एमएम चे आप्तं (१०)…बिंदू

आपल्याकडे वास्तवातील प्रतिमा चांगली असून चालत नाही, पडद्यावरची प्रतिमा पण चांगली लागते. वास्तवात चार माणसांना दारू पिऊन गाडीखाली चिरडा पण पडद्यावर निरागस, भोळा, मातृभक्तं, सगळ्यांवर 'प्रेम' करणारा अशी प्रतिमा असेल तर ती खरी धरली जाते. सौ.बिंदू झवेरी आणि अजून असे अनेक याच मानसिकतेचे बळी आहेत. बिंदू पडद्यावर दिसली की बुब्बुळं मोठी होतात, जीभ ओलसर होऊन बाहेर सटकते, हात शिवशिवतात अशी तिची प्रतिमा आहे. आता वास्तवात ही आत्ता चौसष्ठ वर्षांची आज्जीबाई समोर दिसली तर आपण तिला निदान वयाप्रमाणे नमस्कार करू? नाही, करणार. कारण तिची पडद्यावरची प्रतिमा आपल्याला जास्ती आवडते, आपण त्यावर स्वप्नं रंजन केलेलं असतं, तो ठसा पुसायला मन तयार होत नाही आणि त्या प्रतिमेच्या आपण पाया वगैरे पडत नाही, इतकंच. एखादा विनोदी नट अभ्यासपूर्ण, वैचारिक काही बोलला तर आपण किती गंभीरपणे ते ऐकतो? कारण त्यानी फक्तं विनोदी बोलायचं, करायचं, लिहायचं हे आमच्या डोक्यात ठरलेलं आहे.    

देमार चित्रपटांचा निर्माता नानूभाई देसाईची ही सर्वात मोठी मुलगी, वयाने आणि शरीराने पण. ती तीन वर्षाची असतानाच नानूभाईनी 'दि एंड'ची पाटी लावली आणि नकळत्या वयातच तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. धर्मेंद्रच्या 'अनपढ' मधे ती अकरा वर्षांची होती. मूळची सणसणीत शरीरयष्टी तिला वयापेक्षा मोठं दिसायला कामी आली. 'इत्तेफाक'मधे ती फक्तं अठरा वर्षांची होती (वाटत नाही ना). ती रूढार्थाने सुंदर नव्हती. 'गॉडझिला'च्या जाहिरातीत 'साईझ डज म्याटर' अशी ओळ होती. दारासिंह, झीनत आणि बिंदूला चेह-याची आवशक्यता नव्हती कारण काहीवेळेला 'साईझ डज म्याटर'. हसत हसत म्हटलेलं गाणं किंवा गाता गाता मधेच हसलेलं  'कटी पतंग'चं गाणं 'मेरा नाम शबनम' तिला यशाच्या हमरस्त्यावर घेऊन गेलं. पद्मा खन्ना 'हुस्नं के लाखो रंग' नी जेवढी प्रकाशझोतात आली तेवढी पुढे टिकली नाही. हेलन, बिंदू, अरुणा इराणी, काही प्रमाणात जयश्री टी असा मॉब होता तेंव्हा, व्ह्याम्प, डान्सर, बदचलन औरत, कुटील सहकारी यापुढे त्यांना काहीही जमणार नाही अशी पब्लिकला खात्री होती. त्यामुळे या सगळ्या वेगवेगळी नावं घेऊन त्याच त्याच भूमिका करत राहिल्या. 

त्यामानानी बिंदूला काही चित्रपट चांगले मिळाले. 'इत्तेफाक' मधली खन्नाची मेव्हणी, 'अभिमान' मधली बच्चनची मैत्रीण, 'अमर प्रेम'मधली विनोद मेहराची कुचकी, सावत्र आई, 'इम्तिहान'मधली विनोद खन्नावर एकतर्फी प्रेम करणारी कॉलेजकुमारी, 'लावारीस'मधली अमजदची दुसरी बायको, 'बिवी हो तो ऐसी'मधली फारूक शेखची कडक आई, 'किशनकन्हैया' मधली छळ करणारी सावत्र आई ('सीता और गीता'ची मनोरमा डोळ्यात सरस होती, काही म्हणा) आणि 'जंजीर' मधली अजितची मोना डार्लिंग. शब्बो आणि मोना म्हटलं की बिंदूच येणार डोळ्यासमोर, इतकी ती नावं तिला चिकटली. ललिता पवार आणि बिंदू अत्यंत विषारी बघायच्या. खलप्रवृत्ती दाखवण्यासाठी त्यांचं बघणंच पुरेसं होतं. त्यात बिंदू भारदस्त पण होती. मराठीत तिची तोड म्हणजे पद्मा चव्हाण. कमलाकर तोरणे दिग्दर्शित, मराठीतील प्रति शोले अशी विनोदी जाहिरात असलेल्या 'दरोडेखोर'च्या (यात वाळक्या अंगाची, गालफडं बसलेली रिमा भडभडे - लागू आहे) प्रिमिअरला मी त्यांना पाहिलं  होतं. न्यूनगंड वाटेल अशी देखणी आणि भारदस्त बाई.

तिनी बालपणापासून माहित असलेल्या, शेजारी रहाणा-या चंपकलाल झवेरीशीच लग्नं केलं. त्यानीही तिला चित्रपटात काम करायला प्रोत्साहन दिलं. स्किन कलरचं कापड लावून ती कायम वावरली. कुठल्याही फिल्मी पार्टीला ती नव-याशिवाय गेली नाही आणि शुटींग संपल्यावर स्वत:च्याच घरी गेली त्यामुळे तिच्याबाबत कुठलीही वावडी उठली नाही. पडदा आणि वास्तव यात तिनी जमीन आसमानचं अंतर ठेवलं. आपण कुणाला किती जवळ येउन द्यायचं हे एकदा ठरलं की त्रास होत नाही. ती एकदाच प्रेग्नंट राहिली पण मिसक्यारेज झालं, नंतर परत तिला मूलबाळ झालं नाही. 'हम आपके है कौन'मधे एका शॉटला अजित वाच्छानी तिला म्हणतो, 'इसलिये तुम्हारी गोद खाली है'. बिंदू आणि मी, दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. तिला ग्लिसरीन नसेलच लागलं त्या वाक्याला. 'जंजीर'मधे एक शॉट आहे. तेजा त्याचा बॉस पाटीलची तारीफ करत असतो. मोना त्याला म्हणते, पहिल्यांदाच तू कुणाचंतरी कौतुक करतोयेस. त्यावेळचा तिचा तो उत्कंठावर्धक चेहरा बघा, ती पुढे विचारते, पाटीलसाहेब कुठे असतात आता. तेजा थंडपणे त्यानीच त्याला मारल्याचं सांगतो, तेंव्हा धक्का बसलेला बिंदूचा चेहरा बघा. अभिनय काही फक्तं रेखा, शबाना, स्मिता, हेमाच नव्हत्या करत. 


फिल्मफेअरसाठी सात वेळा नामांकन मिळालं पण तिला ते कधीच मिळालं नाही. मुळात ते कुणाला मिळालंय याची कुणाला आठवण होत नाही इतका त्याचा दर्जा खालावला आहे. लक्ष्मी-प्यारे मधल्या लक्ष्मीकांत कुडाळकरची ती मेव्हणी. त्यांनी तिच्या बहिणीशी लग्नं केलं होतं. आता ती पुण्यातच कोरेगाव पार्कला रहाते. रेसकोर्सला दिसेल ती सिझनला, कुणाला बघायची हौस असेल तर. शेक्सपिअर म्हणून गेलाय, नावात काय आहे? काहीवेळेस खरंही आहे ते. शाई पडल्यावर ब्लॉटिंग पेपरनी टिपल्यावर त्या पेपरवर हा भला मोठा ठिपका पसरतो तशी होती बिंदू चंपकलाल झवेरी पण नाव मात्रं बिंदू. :D

जयंत विद्वांस 


 

   

Thursday 14 January 2016

टेलीशॉपिंग…

टेलीशॉपिंग…
 
मी सिरिअल्स बघत नाही त्यामुळे टीव्ही बघितला तर इ.स.२००० पू.चा हिंदी सिनेमा, इंग्लिश मारधाड, जुनी गाणी किंवा म्याच असेल तरंच बघितला जातो. काहीच नसेल तर आधी बातम्या बघायचो, आता त्याही सोडल्या. त्यापेक्षा मग अर्धा एक तास टाईमपास म्हणून चोवीस तास टेलीशॉपिंगला वाहिलेले च्यानल्स बघतो. धमाल येते. ते च्यानल बघण्यात मला तर फायदे आणि मानले तर काही किरकोळ तोटे दिसत आलेत. फायदे बघा :

०१) बाजारात काही नवं असेल तर कळतं
०२) बाहेर विकत घ्यायचं असेल तर किंमतीचा साधारण अंदाज येतो
०३) भिकार वस्तूचं आकर्षक मार्केटिंग कसं करावं ते कळतं
०४) आपल्याला आपल्या जवळ असलेल्या वस्तूचा दुकानदार म्हणून किंमत सांगताना, त्या वस्तूचं कौतुक करताना न्यूनगंड वाटू शकेल अशी वस्तूसुद्धा विकणेबल आहे हे समजतं
०५) कुठलीही वस्तू विकत न घेता कल्पनेत आपण ती वापरली तर जगणं किती सुखकारक होईल या आनंदानी फील गुड की काय ते वाटू लागतं (एक दमडा खर्च न करता हे अतीव आनंदाचं, कारण जन्म पुणे)

काही काही प्रॉडक्ट मला पाठ झालीयेत कारण मी त्यांचा रेग्युलर(?) कस्टमर नसलो तरी रेग्युलर व्ह्यूअर आहे. पुलं म्हणाले होते तसं असतं यांचं सगळं, मुलगी धडधाकट आहे, घरातलं सगळं करते म्हणजे शिक्षण कमी (हे आपण ओळखून घ्यायचं असतं). तसे यांचे पोपट आणि पोपटीणी असतात. मूळ प्रॉडक्ट कसा उपयुक्त आहे असल्या क्षुल्लक गोष्टी सांगण्यात ते फार वेळ घालवत नाहीत. तुम्ही कधीही बघा, शेवटचे गिनेचूने नग राहिलेले असतात, त्वरा केली नाही तर इच्छुकांच्या पदरी किती घोर निराशा येत असेल या कल्पनेनीच मी कासावीस होतो. निकटच्या हजाराला एक रुपया कमी असलेली किंमत असते, हा शोध ज्यानी लावला तो मानसोपचार तज्ञ असणार. 'फक्तं', 'ONLY' या शब्दांचे अर्थ इथे पटकन कळतात. रुपये दहा हजार नऊशे नव्व्याण्णव फक्तं. नुसतं ऐकून पण मला खजील व्हायला होतं. मला मोठ्ठी वाटणारी रक्कम जगाला 'फक्तं' वाटतीये हे उमजून मी काळाच्या मागे आहे या बायको (माझ्या) आणि मुलीच्या मताला दुजोरा मिळतो आणि त्या दोघी आनंदी होतात.   

त्यांच्या काही प्रॉडक्टवर मात्रं माझा जीव जडलाय. एक ते रोटी मेकर. नुसती लाटी आत सारायची, झाकण दाबायचं, कंपास घेऊन मोजावी अशी गोल पोळी तयार, पलटी मारली की झाकण अलगद सोडायचं, भटू-यासारखी टम्म फुगलेली पोळी तयार. ते झाकण जे स्लो मोशनमधे वर येतं ना ते बघायला मला जाम आवडतं. दबावाविरुद्ध उफाळून येण्याचा गुणधर्म कणकीच्या गोळ्यात पण असतो हे ज्ञान मिळतं. बरं त्याच्या बरोबर पीठ मळायचं भांडं फुकट असतं. या सगळ्या जाहिरातीत सगळ्यात जास्ती जोर कशावर असेल तर तुमचे किती पैसे वाचतील, सोबत मोफत किती आणि काय काय आहे, तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडतील आणि तुम्ही कसे सुखी व्हाल यावर असतो. 


दुसरं एक ते सिक्स प्याक उर्फ पोटावर आयत बनवायचं मशिन. काय एकेक बायका असतात त्यात. त्या मशीनची गरज म्हणून पोट दाखवतात हे समजू शकतो पण अत्यंत कमी कपड्यात त्या मशिनवर व्यायाम करताना जे काही आळोखे पिळोखे देतात ना तेंव्हा त्यांच्या पोटाकडे लक्षच जात नाही आणि मग ती जाहिरात परत बघावी लागते. त्यात पण ते आधीचं भोपळा पोट आणि नंतरची पोटावरची शिल्पाकृती जेवढ्या सेकंदात दाखवतात न तेवढ्या सेकंदात जादू होणारं मशिन यायची मी वाट बघतोय. सगळे बाप्ये आणि बाया लोक हेवा वाटावा अशा कमावलेल्या शरीराचे असतात. माझ्या पोटाकडे बघून एवढं जादुकारी मशिन आपल्याकडे नाही याची खंत वाटते. समजा आणलं आणि झालो बिस्किटपोट्या तरी शेजारी जाहिरातीतल्या बाईएवढ्या कमी कपड्यात कुणीही उभं रहाणार नाहीये याची खात्री असल्यामुळे मी अजून त्याची ऑर्डर नोंदवलेली नाहीये.

याचाच एक उपप्रकार म्हणजे वजन कमी करणा-या प्रॉडक्टसच्या जाहिराती. फार मजेशीर प्रकार आहे तो सगळा. पोटाला अमूक एक तेल लावून गरम पाण्यानी शेका, संत्र्याची साल सोलावी तशी सहजरीत्या चरबी कमी होईल. अमका हर्बल टी प्या (एक्झरसाईजची गरज नाही हे वाक्यं रिपीट असतं त्यात, घेणारच की मग पब्लिक) आणि शेवग्याची शेंग व्हा. तुम्हांला पोटाशी, मांड्यांशी (चरबी जास्ती आहे तिथे, थोडक्यात) गदागदा हलवणारं एक मशिन असतं, पाच मिनिटात तुम्ही मुंबईच्या उन्हात उभे असल्यासारखे घामेजता. त्यामुळे मुंबईला एकही माणूस ओव्हरवेट नसणार असं मला वाटत आलंय. कुठलंही काम करताना ते वापरता येतं म्हणे. एका 'विशिष्ठ' क्रियेत कमरेला ते मशीन लावल्यावर त्याचं व्हायब्रेशन उपयोगी येईल का असा मला एक वात्रट प्रश्न पडलेला आहे. असो! याच्या उलट उंची, वजन वाढवायच्या भुकट्या आणि गोळ्या विक्रेते असतात. आयुष्यात वजन नाही म्हणून लग्नं ठरत नाहीत, मैत्रिणी हसतात, न्यूनगंड येतो वगैरे सगळे प्रॉब्लेम्स चार पाच हजारात सुटू शकतात. बरं ती भुकटी खाऊन नुसतं वजन नाही वाढत, मसल्स एकदम अर्नोल्ड लाजेल असे होतात. एकदा आणेन म्हणतोय ते. 

असे अनेक विनोदी प्रकार त्यावर आहेत. एक तो चायनीज की कोरियन टकला माणूस डोक्यावर पीक काढल्यासारखे केस उगवून दाखवतो (शेतक-यांनी ट्राय केलं तर मायंदाळ पीक येउन आत्महत्या तरी करणार नाहीत), रु.२४९९/- 'फक्तं' मधे दोन शूज, एक स्लीपर, एक गॉगल, एक घड्याळ, एक टी शर्ट, एक डफल ब्याग, रु.४९९९/- 'फक्तं' (कृपया हा शब्दं विसरू नये) मधे आयफोन स्वत: दगडावर जाउन स्क्रीन फोडून घेईल असे फिचर्स असलेला स्मार्टफोन असतो, घाण टाकायची आणि ती सेकंदात साफ करायचा मॉप असतो (तसं खरंच होत असेल तर मलासुद्धा साफसफाई जमेल या भीतीपोटी मी तो घेणार नाहीये), होलमधून हनुमान चालीसा वाचता येईल असा खास आपल्याकरिता तयार केलेला  मंतरलेला चांदीचा सर्वसंकटनाशक हनुमान असतो, घरात कुठेही भोक पाडू शकेल असं ड्रिल मशिन, ड्रिल, स्प्यानर, स्क्रू ड्रायव्हर सेट अत्यंत अल्पं किंमतीत असतो, ज्याच्यावरून ट्रक नेला तरी फरक पडत नाही असा हवा भरून तयार होणारा सोफा, बेड आहे, काठीला फडकं गुंडाळल्यासारख्या दिसणा-या बायका आणि जॉर्जेटच्या साड्या आहेत, डिनर सेट आहेत, भांडी कुंडी आहेत. एकूण सगळं 'अच्छे दिन आये' असं वाटायला लावणारं आहे.  

खरंतर या सगळ्यात खरोखर उपयोगी असणा-या किंवा काम हलकं करणा-या वस्तू फार कमी आहेत अस आपलं माझं मत आहे. जाहिरात ही कला आहे हे टेलीशॉपिंगचे च्यानल बघितलं की कळतं. सगळं दुष्टंचक्र आहे. न लागणा-या वस्तू विकत घ्या, पैसा असो नसो, क्रेडीट कार्ड आहे की. रक्कम फुगली की त्याचे हप्ते करून घ्या आणि तीस टक्क्यानी ते फेडा म्हणजे मूळ स्वस्तात मिळाली अशी वाटणारी वस्तू खरंच आपल्याला कितीला पडली हे कुणीच बघत नाहीये. नितांत गरज असताना बराच काल प्रतिक्षा करून वस्तू आली की ती प्राणप्रिय होते, वाटते. निर्जीव वस्तूवर पण माया जडते. आता वस्तू मुबलक झाल्या, वापरा, फेजून द्या, आवडल्या नविन किंवा अपग्रेडेड काही आलं तर तर जुन्या चांगल्या असतील तरी बाद करा, त्यात अडकून राहू नका असा मंत्र आहे आजचा. 'जुने जाऊ द्या मरणालागूनी' ते आपण चुकीच्या विचारांना, प्रथांना लागू करत नाही, चांगल्या गोष्टींना मात्रं लगेच करतो.

एक बरंय त्यावर अजून सुख, आनंद विकायला नाहीये, तो आपला आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत मिळवता येतोय, यायला हवा. त्यांची ती पोपटपंची, भलावण निर्हेतुकपणे ऐकणं, बघणं हा ही माझ्या छोट्या गोष्टीतून आनंदी होण्याच्या भागच आहे. बाकी आडिश (आमरणच्या धर्तीवर) ही करमणूक चालूच राहील.  

जयंत विद्वांस

Sunday 3 January 2016

एकपात्री 'नटसम्राट'….


एकपात्री 'नटसम्राट'…. 
 
एकपात्री प्रयोग तसा सोप्पा नसतो. स्वत:च्या खांद्यावर सगळं पेलण्याची जबाबदारी असते, मोठी रिस्क असते, हसं होण्याचे चान्सेस असतात. पण अनेक पात्रं असतानाही एकपात्री करणं अजून अवघड असतं. नानानी एकपात्री केलाय 'नटसम्राट'. बाकीचे कलाकार कमी आहेत म्हणून तो ग्रेट वाटलाय असं आहे का? तसंही अजिबात नाहीये. सुनिल बर्वे, नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे, परब सुसह्य आहेत, कामं चांगली केलीयेत.

थोड्या खटकलेल्या गोष्टींवर आधी  बोलून घेतो. मेधा मांजरेकरही वाईट नाही, ती खटकत नाही, दोन तीन प्रसंगात ती छान बोललीये (फक्तं पहिल्या शॉटमधे तिची नऊवारी रेडीमेड तिच्या मापाची असावी का अशी एक शंका येईल एवढी ती ऑकवर्ड दिसलीये). मूळ नाटकात नसलेला विक्रम गोखले आहे म्हणून खटकत नाही, नसता तरी अडलं नसतं. पण त्यानी वडिलांसारखं स्टेजवर नटसम्राट करायला हरकत नाही. काळ जुना दाखवलाय, नंबर प्लेट एमएलयू आहे, लग्नातली गाडी पण जुन्या काळातली आहे आणि चोरीचा संशय येतो ते पैसे पाचशेच्या हल्लीच्या पिवळ्या नोटांमध्ये आहेत. मध्यंतरापर्यंत जरा ढिल्ला वाटतो. नटसम्राट दारुडे होते की काय असं वाटेल नविन पिढीला असे प्रसंग आहेत. असो!


किरण यज्ञोपवीतचे संवाद अप्रतिम. कुसुमाग्रजांना लाज आणतील असं काहीही त्यात नाही. नाटकाचा सिनेमा मात्रं सुंदर केलाय. पटकथा प्रवाही आहे. मुळात मूळ कलाकृतीचं संचित पाठीशी आहे, त्यामुळे त्याचं बोट धरून जरी चाललं तरी प्रवास सुखकर होऊ शकेल असं असतानाही कुठे ताल सुटला तर सगळं चांगलं मातीत जाईल अशी भीतीही आहे. महेश मांजरेकरनी ती कसरत दोरीवर चालणा-या डोंबारणी सारखी छान पेलली आहे यात शंका नाही. डायरेक्टर डोकावतो तेंव्हा चित्रपट काही ठिकाणी अंगावर येतो. ५४ इंचीला सुद्धा बघण्यात मजा नाही, थेटरच पाहिजे असा सुंदर केलाय त्यानी. लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, मोहनदास सुखटणकर, राजा गोसावी, लक्ष्मण देशपांडे (द्विपात्री), गिरीश देशपांडे यांना ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी हा नटसम्राट बघावा.  

आता उरला नाना. त्याच्या कौतुकासाठी किती लिहावं हा प्रश्न पडलाय. तिरंगा, यशवंत, क्रांतिवीर, अंकुश, अब तक छप्पन आणि इतर कुठलाही नाना यात डोकावत नाही एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. नटाला ते पात्रं कळलं की त्यासारखी मजा नाही. तो त्या पात्राच्या प्रेमात पडायला हवा मग ते त्याला जमलं की तो स्वत:च्या प्रेमात पडतो आणि मग चालू होतो तो नट आणि त्या पात्राचा रोमांस. मग आजूबाजूला कुणी आहे, नाही याचं भान उरत नाही आणि तो ते पात्रं जगत जातो, आतून बाहेर काढतो आणि अजरामर करतो. मूळ नाटक नानासाहेब फाटकांना डोळ्यापुढे ठेऊन लिहिलं गेलं होतं कारण तो आवाजाचा बादशहा होता. संगीत नाटकात तीन सप्तकात फिरणारा गळा हवा असतो तसा गद्य नाटकातला तो तीन सप्तकात फिरणारा बुलंद आवाज होता असं ऐकलय. त्यांचं आत्मचरित्र वाचलंय मी, यातली स्वगतं त्यांच्या अनेक नाटकात केलेल्या भूमिका डोळ्यापुढे ठेऊन लिहिली गेलीयेत. 

मूळ नाटककाराला अभिप्रेत असणारा नटसम्राट कदाचित वेगळा असेल पण फाटक गेले आणि लागूंनी तो केला, त्यांनी पहिला केल्यामुळे नंतरच्या लोकांना तुलना नशिबी आली आणि त्यात गैर काहीही नाही. नाना बघायला जाण्याआधी तुमची पाटी कोरी असो नसो, त्याचं नाव लिहिण्यात तो यशस्वी झालाय. या अजरामर शोकांतिकेतले भाव त्यानी मेहनतीनी पोचवलेत. विषण्णता, हतबलता, उद्वेग, सात्विक संताप, चीड, हळवेपणा, कातरता, वैराग्यं, द्वेष, कटुतेच्या पलीकडे गेलेलं म्हातारपण, सरकार गेल्यावर सर्वस्वं हरवणं म्हणजे काय ते त्यानी अफाट दाखवलंय. त्याचं चालणं, पडलेले खांदे, प्रत्येक प्रसंगातली वेगळी देहबोली, डोळ्यांचा अप्रतिम वापर, त्याच्या चेह-यावर उमटणा-या प्रतिक्रिया परत परत पहाव्या अशा आहेत. 

मुलीला रागानी हाक मारताना लागलेला आवाज आणि ते स्वगत अंगावर काटा आणतं. राजा त्याला विचारतो 'नाटक पाहिलंय का कधी?' तेंव्हा, कावेरी म्हणते, 'ती सुया शोधत नव्हती', तेंव्हाचा त्याचा चेहरा बघा. नाटकावर तो पोटतिडीकीनी जितेंद्र जोशीला बोलतो तेंव्हाची त्याच्या आवाजातली तळमळ ऐका, त्याचं थेटरातलं स्वगत ऐका, जळलेल्या थेटरात त्याच्या अंगात शिरणा-या पात्रावर तो स्वार होतो तेंव्हाची त्याची तडफ आणि तो आवेग ओसरल्यावर गलितगात्र झालेला नाना बघा. वयानी आलेली हतबलता आणि वय विसरून आलेला राग क्षणात दाखवलेत, ते बघाच एकदा थेटरात जाउन. परत बघितला की परत लिहीन त्याच्यावर अजून.  नाना आणि विक्रम गोखलेंनी ते स्टेजवर करावं अशी एक वेडी इच्छा आहे. काय धाय मोकलून रडायचं राहिलंय ते एकदा  रडून घेईन, ती स्वगतं ऐकून मोहरून जाईन, तोंड फाटेस्तोवर किंवा समोरचा बंद करेस्तोवर त्यावर बोलेन आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवेन एकदा, इतक्या क्षुल्लक अपेक्षा आहेत माझ्या.  

काळ बदलेल, आपणही म्हातारे होऊ, मुलं विचारत नाहीत ही शोकांतिका वाटणार नाही अजून काही वर्षांनी, इतकं ते प्रथा असल्यासारखं घडत राहील, त्यामुळे आज घळाघळा पाणी आलं तेंव्हा तसं येईल न येईल माहित नाही, तेंव्हा नटसम्राटची कथा कालबाह्य होईलही पण ती स्वगतं रहातील, शेक्सपिअर राहील तसे शिरवाडकर पण रहातील. लागू रहातील, नाना राहील, नविन कुणीतरी बेलवलकर म्हणून उभाही राहील. तेंव्हा तो त्याच्या पद्धतीने करेल हे सगळं. एखादा माणूस सांगेल त्याला 'मागे विश्वनाथ पाटेकर नावाच्या बापमाणसानी सुंदर केलं होतं, ते बघ एकदा म्हणजे तुझं तुला नवीन काही सापडायचं राहिलं असेल ते सापडेलही'.

जयंत विद्वांस 
 
   

Saturday 2 January 2016

नेव्ही कट…

नेव्ही कट… 
 
तुझा सहवास सुटल्याला किंवा सोडल्याला आज महिना झाला. साधारण २८-२९ वर्षाचा सहवास म्हणजे काही कमी काळ नाही. अधेमधे दुरावा निर्माण झाला म्हणा काहीवेळा पण तो तात्पुरता होता. सवय सततची झाली की ती सवय रहात नाही, त्याला व्यसन म्हणतात. माणूस एकदा प्रेमात पडला की त्याला समोरच्याचे दुर्गुण दिसत नाहीत असं म्हणतात, तसंच तुझ्याबाबतीत झालं. दु:खाच्या क्षणी, ताण आल्यावर तुझी आठवण झाली वगैरे माझ्या बाबतीत कधी घडलं नाही कारण तुझ्या सहवासामुळे तो दूर होतो हे मला कधीच पटलेलं नाही. तुझा संग केल्याचे दुष्परिणाम माहित नव्हते? माहित होते, उगाच खोटं कशाला बोला पण फार परिणाम होईल एवढा आपला संग कधीच नव्हता. 

तुझं आकर्षण प्रत्येकाला असतं. कधी आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसाला, फिल्मी हिरोला आपण फॉलो करायला जातो, कधी तुला जवळ केल्याने आपण आता मोठे झालो असं वाटतं, दोन बोटात, विडीसारखी चिमटीत, मुठीत (एकापेक्षा जास्ती) धरून जवळीक साधायचे आचरट प्रयत्नं होतात. फुशारक्या चालू होतात, पाणी घालून ताक वाढवावं तसं तासात किती, दिवसात किती वगैरे रेकॉर्डसचे आकडे  फुगवले जातात. आरशासमोर आधी पेन, काडी, उदबत्ती धरून सराव परीक्षा होते. एकदम भारी वाटायला लागतं. क्लिंट इस्टवूड, रजनीकांत, विडी फेकून उठणारा कुली अमिताभ वगैरे डोळ्यापुढे तरळत असतात. अनेक उपप्रकार असतात त्यात पुढे पुढे. आधी किंमत जास्ती ती ओढतात लोक. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं दाखवायचं असतं. मग मेंथोल असलेली, तपकिरी रंगाची लांबसडक, स्टेट एक्स्प्रेस किंवा ५५५ या नावाची पडलेली भुरळ काही काळ चमकून जाते. किंग साईझ मित्रांत ओढताना खूप वेळ टिकते हे खरं कारण असतं. सगळी थेरं असतात. शेवटचा गोल्डन पफ नावाखाली मारलेला चटका बसणारा कोकणस्थी झुरका खरा. 

सगळी नाटकं होतात. तोंडाचा चंबू करून सर्कल काढायला शिकतात आधी, त्यात आपण ज्याला भेटण्याची सुतराम शक्यता नाही असा माणूस दहा बारा सलग सर्कल्समधून सरळ रेषेत धूर सोडून दाखवतो ही अठ्ठी अनेक पिढ्या अव्याहत चालू आहे, सांगणा-या माणसाचा तो सध्या दुरावलेला किंवा परगावी रहाणारा मित्रं असतो किंवा त्याला त्याच्या कुठल्यातरी मित्रानी सांगितलेलं असतं. पुढून लवंग किंवा मेंथोलचा तुकडा सारून, कधी घरी ओव्याची बनवून ओढली जाते. कुणी सांगतं थोडीशी ओलसर करायची म्हणजे कडक झुरका होतो (माझी भिजून लोळागोळा झालेली ओलसर करायला गेलो तर, कारण मी ती नळाखाली धरली होती, नाहीयेत एखाद्याला जजमेंट, हसू दे कुणी हसलं तर आपण लक्ष नाही द्यायचं). जो राख सांडेल त्यानी नवी घ्यायची असल्या गंमती असतात. रात्री संपल्यावर दुकानं बंद असतील तर जी घालमेल होते ती शब्दात सांगता येणार नाही. मग एसटी स्थानक, रेल्वेस्टेशन जवळची वाटतात. पहाटे कामाला जाताना जो पहिला उघडा ठेला दिसतो त्याचे आपण ऋणी वगैरे रहातो. 

कुणी विचारतं, "सिगार' ओढला आहेस का?" मग तो एकदा ओढून होतो. तोंडाला अत्यंत घाणेरडा वास येतो एकतर नाहीतर गाल आतून चिकटतील एवढा तो ओढावा लागतो, त्यात तो विझला तर त्याचा उग्र वास तोंडात नको होतो असा माझा अनुभव आहे. कुठलीही नशा वाईटच पण एकदा तरी अनुभवायला हवी प्रत्येक गोष्ट यापोटी मी पाईप, हुक्का, गांजा, चरस, ब्राऊन शुगर, हातभट्टी, देशी सोडून सगळे उद्योग करून बघितलेत.  तुझ्याएवढं फार कशात मन रमलं नाही. लोकांचे ब्र्यांड असतात. पिवळा हत्ती एकेकाळी फेमस होता. लोक पगार झाला की चार दिवस चारमिनार, पनामा, क्याप्स्टन, पिवळा हत्ती ओढायचे मग परत लाल धागा चालू व्हायचा. शिवाजी, संभाजीचं नाव ठेवलं म्हणून कधी कुणाला राग आल्याचं ऐकिवात नाही, ५०१ होती एक. यात पण कमी लेखणं आहेच, कार मधले टू व्हीलरवाल्यांकडे बघतात तसे गोल्ड फ्लेकवाले इतरांकडे तुच्छतेने बघायचे. बेन्सन हेजेस, रॉथमन्स ज्याच्या हातात तो माणूस अमीर आदमी, आय.टी.रिटर्न बघायची गरज नव्हती तेंव्हा.
 
'राम' अरुण गोविल म्हणे दिवसाला १०० 'स्टेट एक्स्प्रेस' ओढायचा, अजय देवगण आणि त्याची सासू तनुजा यांचं सतत अग्निहोत्र चालूच असतं म्हणे. त्यांचं त्यांच्यापाशी, यात त्यांचा हेवा वाटावा असं काही नाही. काही माणसं माझ्या लक्षात आहेत मात्रं. एक बदलापूरचा रजनदा, हाताला सहावं बोट असल्यासारखी तू त्याच्या हातात असायचीस. तो कुठेही असो, कायम हातात छोट्या फोरस्क्वेअरचं पाकीट आणि काडेपेटी. श्वास घेताना त्यात निकोटीन आढळलं नाही तर मेंदू त्याला श्वास रोखून धरायला लावायचा बहुतेक. सतत चालूच मुळी ते धुरांड, त्याचं बोलणं शब्दश:धुरकट होतं असं म्हणता येईल इतकं. आमचे बापट, विजय केतकर अगदी मन लावून गोरा चेहरा तांबूस होईल इतपत दमदार कश मारायचे. टोकाला तो ग्लो अगदी चिडल्यासारखा फिल्टरकडे धावायचा. लोक कश मारला की तो धूर आत घेतात, नाका तोंडावाटे व्हाल्व्ह गेल्यासारखा  चित्रपटात तो स्वप्नातल्या गाण्यात पांढरा दात धूर सोडतात ना तसा सोडतात आणि राख झटकून किती राहिली ते बघतात. पैसा वसूल कसा होणार बोलण्यात वेळ घालवला तर म्हणून अजून एक दमदार कश लगेच. कर्नल सोमण होते रविराजला. ते जेवण झालं की तो पांढरा पेपर काढायचे, त्यात तो क्याम्पातून आणलेला सेंटेड तंबाखू टाकून सुरनळी करायचे, मग जिभेवर ती फिरवून सीलबंद करायचे आणि सुखाचा आस्वाद घेतल्यासारखे तुला ओढायचे. त्यांच्या त्या धुरला पण एक सुगंध होता. ती संपूर्ण प्रोसेस ते अत्यंत तन्मयतेने उपभोगायचे. 

माझीही अनेक थेरं करून झाली. आधी फोरस्क्वेअर, मग काही काळ चेसरफिल्ड, बर्टन, चार्म्स, छोटी फोरस्क्वेअर वगैरे प्रकार झाले. पण मला आठवतंय ८५-८६ साल असेल, पासष्ठ पैशाला नेव्हीकट मिळायची (आता आठ रुपये, काय ही महागाई) आणि पाच पैशाला खुशबू किंवा बडीशोप पुडी. मी केवळ नेव्हीतले लोक ही ओढत असणार या अज्ञानापोटी तुझी निवड केली आणि ती चिरकाल टिकली. कावेरी विचारते ना. 'मैत्रिणी किती होत्या हो?' आणि अप्पासाहेब हसतात फक्तं. तसं काहीसं आहे, नेव्हीकट म्हणजे 'सरकार' होतं माझं.  


जयंत विद्वांस