Wednesday 29 June 2016

बढती का नाम...

दाढी हा खरडण्याचा विषय आहे? एकार्थाने आहे, एकार्थाने नाही. वयात आलेली मुलगी जशी सारखी आरशात बघते, तशी मुलं दिवाळीत किल्ल्यावर अळीव टाकून येते तशी ती आलेली नाजूक लव कुरवाळत वेगवेगळ्या कोनातून बघत असतात. एकदम त्याला आपण आता पुरुष, मोठा माणूस वगैरे झाल्यासारखं, रुबाबदार दिसायला लागलोय असं वाटायला लागतं. काही जणांना उपेंद्र लिमयेसारखी हिटलर जेवढी ठेवायचा त्या जागी मिशी येतंच नाही आणि अंबुजा सिमेंटची दिवार मधे असल्यासारखी त्यांच्या मिशीची फाळणी होते. कित्त्येक जणांना टी.व्ही.वर हवामानाच्या अंदाजात चार कोप-यात चार ढग दाखवावेत तशी मधली शहरं वगळून दाढी फुटते. बोकडासारखी हनुवटीवर, कानाच्या बाजूला कल्ला लांबल्यासारखी येते बाकी मधला भाग वाळवंट असतो. मग एखाद्या त्याच्याच वयाच्या मुलाच्या गालावर पीक काढल्यासारखी संपूर्ण दाढी दिसली की त्याला असूया वाटते. मग नापीक जमिनीवर शेतकरी लावतो त्यापेक्षा जास्ती आशेवर आज ना उद्या दाढी उगवेल म्हणून पहिल्यांदा झिरो मशिन किंवा कात्री मग वस्तरा चालवून मशागत केली जाते. सगळ्यांनाच तिथे खुंट फुटतात असं नाही. अशा लोकांबद्दल मला सहानुभूती आहे. बिचा-यांना सतत दाढी करावी लागते, पूर्ण दाढी वाढवून ती कोरायचा वगैरे आनंद घेता येत नाही.

प्रत्येक गोष्टीतलं नवखेपण गंमतीशीर असतं. पोरगा नेहमी वडील कशी दाढी करतात ते बघून शिकतो. मग कुणी नसताना तो ट्राय करतो. आता जेल आली, फोम आलं, मशिन्स आली, एकशे ऐंशी डिग्रीत झोपवणा-या आणि मग रेट बघून तिथेच बेशुद्ध पाडणा-या खुर्च्या, स्वप्नात बघाव्यात अशा अप्राप्यं बायका आफ्टर शेव्ह लावल्यावर चिकटतात असं स्वप्नं दाखवणारी आफ्टरशेव्ह, अनंत फळांच्या वासाचे फेसवॉश, फेसपॅक, मसाज आले. पण मी केली ती पहिली दाढी वेगळीच होती (अर्थात माझीच). बाबा करायचे तशी. गोदरेजचा तो पांढ-या झाकणाचा निळा गोल डबा, त्यात मधे पोट खपाटीला गेलेली ती पांढरी साबणाची रिंग, एक प्लास्टिकचा मग, एक स्टीलचा रेझर, गुबगुबीत केसाळ ब्रश, टोपाझचं ब्लेड, फोल्डिंगची कात्री आणि तुरटी हा सरंजाम ठेवायला एक पत्र्याचा डबा (शक्यतो वनदेवी बांधानी हिंगाचा) असायचा. स्टुलावर आरसा ठेवून बसायचं, गालफडं बसली असतील तर गालात जिभा घालून टेंगळं आणायची आणि तिथे साफसफाई चालू करायची.

आम्ही कटिंगला जायचो लहान असताना बजरंग न्हाव्याकडे. त्याच्याकडे तो चामडी पट्टा अडकवलेला असायचा वस्त-याला धार लावायला. त्याची ती अल्युमिनियमची पाण्याची वाटी, एकमेव लाकडी खुर्ची, धुरकट आरसा, गुन्हयांवर पांघरुण घालावं तसं ते त्याचं काळं कापड वर्षानुवर्षे तसंच होतं. एक तर त्याला सोडा वॉटर चष्मा होता. वाढलेले केस कापणे हे एकंच काम त्याच्याकडे व्हायचं. 'काय करू?' 'नेहमीसारखी, बारीक'. यापुढे कुठलाही संवाद तिथे झाला नाही. नंबर असेल तर दाढीचं जि-हाईक बघावं त्याचं. गुगल मॅप दोन बोटांनी जसा मोठा करून बघतात तसा तो गालाचा साधारण एक स्क्वेअर इंच एरिया ताणून धरायचा आणि कुठे तीळ बीळ आहे का शोधल्यासारखा अगदी डोळे चिकटवून दाढी करायचा. कानाचे केस, नाकपुड्या तिरक्या आणि वर करून तिथले केस कापणे वगैरे फुकट काम. गालफडं बसलेल्या वृद्धांची दाढी मात्रं हे लोक काय छान करतात, स्किल हवं त्याला. बजरंग दाढी झाल्यावर पाण्याचा फवारा असा मारायचा की कुणाला वाटेल, माणूस बेशुद्ध पडलाय आणि उठवण्यासाठी हा तोंडावर पाणी मारतोय. माणूस घाबरेल असा हल्ला, मग तुरटीची ती रिनच्या आकाराची वडी फिरवायची, खसाखसा तोंड पूसून मागचा लिव्हर हलवला की उठायचं गप.   

तोंडाला फेस आणण्याचे म्हणजे लावण्याचे पण अनंत प्रकार असतात. एकारांती आडनाव असेल तर तोंडाला दिसतोय तो साबणाचा फेस असावा असा संशय येईल इतपतच. ती गोदरेज डबी एका पिढीला एक अशी पुरेल इतका कमी. रोज दाढी करणा-यांचं तर मला फार कौतुक आहे. ते सटासट आल्यापासून जास्ती सोपं झालं असावं. माझ्या माहितीत एकजण दात घासून झाले की तोंडावर पाण्याचा हात फिरवतो की लगेच दाढी उरकून घेतो. एक अजून वस्त-यानी घरी दाढी करतो. एकाला लक्स लागतो फेस करायला. एक रेझरला त्या ब्लेडची खालची पट्टी लावतंच नाही, काय तर म्हणे एकदा हरवली म्हणून तशीच दाढी केली तर जमली, कशाला उगाच नवा आणायचा रेझर. एक सांताक्लॉझसारखा फेसाची दाढी काढतो. मग अगदी लोण्यात बुडवल्यासारखा रेझर गायब होतो. घरी दोन्ही कल्ले, मिशीची दोन्ही टोकं मापात कापणारे लोक महान आहेत. मला ते कधीच जमलं नाही. एकदाच मिशीला दोन्ही साईडला काट मारत मारत त्या मांजराच्या गोष्टीत खवा जसा दोन्हीकडून संपतो तशी ती चार्ली चॅप्लिनच्या वळणावर गेली तेंव्हा काढून टाकायची वेळ माझ्यावर आली होती आणि घोटाळ्यात सापडलेला माणूस कॅमेरामन अमुक अमुक सकट तमुक तमुक पुढे जसा चेहरा लपवतो तसा मी दोन दिवस फिरत होतो.

मी दाढी न करण्याची अनेक कारणं आहेत. आळस, आधी अगदी स्केलेटन तब्येतीमुळे होणारा रक्तपात, दाढी वाढल्यामुळे जरा मुरूम टाकून भर घातलेल्या खड्डयासारखे दिसणारे गाल, आज केली तर फार तर दुस-या दिवशीची सकाळ एवढाच वेळ ती केल्यासारखी वाटेल अशी लगेच येणारी सरला येवेलकर सारखी उफाड्याची दाढी या सगळ्याचा परिणाम दाढी ठेवणे हा आहे. सगळ्यात पहिला आवडलेला दाढीवाला म्हणजे 'अब्दुल्ला' मधला संजय खान. मग असे अनेक दाढीवाले दिसले. प्रत्येकाची स्टाईल वेगळी. टागोर, अनंत भावे, प्रणब रॉय, अनुपम गुलाटी, बाबासाहेब पुरंदरे, अच्युत गोडबोले, मंगेश तेंडुलकर, प्रकाश झा, मॅकमोहन 'सांभा', शेखर कपूर, कबीर बेदी, शॉन कॉनरी, प्रकाश जावडेकर, कलमाडी, प्रफुल्लकुमार महंत, रामदेवबाबा, वागळे, ब्रिजेश पटेल, संदीप पाटील, बॉर्डर, हशिम अमला, इम्रान ताहीर, नदीम(श्रवण), फ्रेंच 'कटा'तले बाळासाहेब, अमिताभ, विजय तेंडुलकर, आय.के.गुजराल आणि मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रत्येकाचा करिष्मा वेगळा, गाजण्याची कारणं वेगळी. 

पण या सगळ्या दाढीवाल्यांपेक्षा एक दाढीवाला खूप वेगळा होता. त्या खप्पड चेह-याच्या माणसाला एका अकरा वर्षाच्या अनोळखी मुलीनी - ग्रेस बेडेलनी - दाढी वाढवायचा सल्ला दिला होता. तो त्यानी मरेपर्यंत पाळला. एवढ्यातेवढ्या अपयशानी खचून जाणा-या माणसांनी त्याचा जीवनप्रवास बघावा. एकतर देवीचे व्रण असलेला खप्पड चेहरा, कृश शरीरयष्टी पण मनानी पोलाद असलेल्या या माणसाची १८३२ ला नोकरी गेली, सिनेटच्या निवडणुकीतही तो हरला. पुढच्या वर्षी तो धंद्यातही बुडाला. १८३५ मधे त्याच्या प्रेयसीचं निधन झालं. पुढच्या वर्षी त्याला नैराश्याचा झटका बसला. १८३८ मधे तो स्पीकरची निवडणूकही हरला. १८४३ मधे तो काँग्रेसच्या नॉमिनेशनसाठी उभा राहिला आणि पुलंच्या अण्णू गोगटयासारखा पडलाही. परत १८४८ ला रीनॉमिनेशनसाठीही पदरी निराशाच आली. १८४९ ला लँड ऑफिसर या पदासाठी पण त्याला नाकारण्यात आलं. १८५४ ला तो सिनेटची निवडणूक पण हरला. १८५६ ला उपाध्यक्षाच्या नॉमिनेशनसाठी पण हरला. १८५८ ला तो सिनेटची निवडणूक यशाचा बट्टा लागू नये म्हणून परत एकदा हरला. एवढ्या वेळा अपयश पदरी पडूनही तो लढत राहिला.

१८६१ ला मात्रं तो अमेरिकेचा अध्यक्ष झाला. त्याला ज्यांनी आधी हरवलं ती माणसं काळाच्या ओघात विस्मृतीत गेली पण आयुष्याची शेवटची निवडणूक जिंकलेला आणि हत्या झाल्यामुळे फक्तं चार वर्ष अध्यक्ष झालेला दाढीवाला अब्राहम लिंकन टिकून आहे आणि राहील. दाढी काय आम्हांला निसर्ग नियमाने आली, अशी जिद्द आणि कर्तृत्वं निसर्ग नियमाने मात्रं आलं नाही त्याचं काय करायचं? :)

जयंत विद्वांस

Tuesday 28 June 2016

यमन (२)...

परवा यमनवर लिहिल्यावर त्यातली बरीच मराठी गाणी उल्लेखायची राहिली अशी तक्रार आली म्हणून हा दुसरा भाग. हिंदी गाणी सतत कानावर पडतात, ते चित्रपट बघितले जातात त्यामुळे ती जास्ती लक्षात रहातात पण मातृभाषेतही अतिशय सुंदर गाणी झालेली आहेत. मराठी गाणी ऐकताना अर्थ जास्ती पोचतो किंवा त्याकडेच जास्ती लक्षं असतं आधी. द्रविड, सचिन, लक्ष्मण, गांगुली, कुंबळे एकाचवेळी देशासाठी खेळले हा खरा योग. त्या अर्थाने ब्रायन लारा दुर्दैवी. वॉल्श आणि अँब्रोज सोडले तर तो खेळायचा ती टीम डबघाईला आली होती. ग्रिनीज, हेन्स, लॉईड, रिचर्ड्स आणि लारा असा योग असता तर? असाच योग मराठी संगीतात मात्रं आपल्या नशिबात होता. गदिमा, खेबूडकर, पी.सावळाराम असे कवी गीतकार, बाबूजी, पुलं, तीन वसंत (प्रभू, पवार, देसाई), राम कदम असे दिग्गज संगीतकार एकाच काळात जन्माला आले आणि आपल्या कानांना सोन्याची कर्णफुलं घालून गेले. योग्यं वेळी जन्मं घ्यायला पण नशीब लागतं. आपलं आहे. 
पुलं साहित्यिक म्हणून जितके गाजले तितकं त्यांच्या संगीताचं कौतुक नाही झालं असं माझं आगाऊ मत आहे. सायीचा मऊपणा, गोधडीची उब, आजीच्या सुरकुतलेल्या हाताचा स्पर्श आणि माणिक वर्मांच्या आवाजातला शांत स्नेहगोडवा शब्दात कसा सांगता येईल? तसंच हे पुलंचं यमनातलं गाणं 'कबीराचे विणतो शेले', गदिमा तर काय डोक्यात १६ जीबी रॅम बसवल्यासारखा सीपीयू त्यांचा, टेन जी कनेक्शन असल्यासारखे योग्यं, पर्यायी शब्दं सापडायचे त्यांना, माणसानी किती साधं लिहावं? तर गदिमांसारखं, त्यापेक्षा साधं, सोप्पं वाचण्यात नाही. या गाण्यात 'एकएक धागा गुंते, रूप ये पटास' या ओळीत पट (म्हणजे वस्त्रं) हा म्हटलं तर एकंच अवघड शब्दं आहे. डोळ्यांवर काकडीचे काप ठेवून जेवढा गारवा जाणवणार नाही तेवढी शीतलता माणिकताईंच्या आवाजात आहे. कबीर सगळीकडे पोचला पण गदिमा नाहीत कारण ते अनुवादीत झाले नसावेत आणि चित्रपटगीत म्हणजे प्रतिष्ठा नाही हे कारण असावं. संतांच्या तोडीची रूपकं, सोपा परमार्थ हा माणूस अनंत गाण्यातून श्वास घ्यावा इतक्या सहजपणे सांगत आलाय पण चित्रपटगीत यापुढे आपण त्याची किंमत करायला तयार नाही हा आपला करंटेपणा.  
बाबूजींची अनेक गाणी या रागात आहेत. ते, गदिमा आणि आशाबाई अफाट त्रिकूट होतं. एकाचढ एक गाणी त्यांनी दिलीयेत. तिघांचं यमनातलं 'का रे दुरावा, का रे अबोला' आणि यमनाची तीट लावलेलं 'जिवलगा, कधी रे येशील तू' ऐका. हनुवटी हा शब्दं गाण्यात यातच असावा फक्तं. 'नीज येत नाही मला एकटीला, कुणी ना विचारी धरी हनुवटीला'चा आवाज अगदी ढाकेकी मलमल सारखा सुळसुळीत आहे. केवढी शृंगारिक तक्रार. 'जिवलगा'चा ठेका तर काय अप्रतिम आहे. एखाद्या संगीतकाराकडे एखादा गायक/गायिका फुलतो/फुलते. आशा/आरडी-ओपी-बाबूजी, किशोर/एसडी, आरडी या जोड्या वेगळ्या भासतात. केमिस्ट्री जुळल्यासारखी वाटते अगदी. त्यांचं अजून एक यातलं गाणं म्हणजे 'धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना'. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा' यात 'तुझा सूर हा, शब्दं हा, अमृताचा' अशी परिस्थिती आहे. फास्ट, -हिदम बेस्ड गाणी म्हणायला सोपी असतात. पण अशी ठहराव असलेली, प्रेयसीच्या बटा हळुवारपणे बाजूला केल्यासारख्या निवांत चाली म्हणायला तयारी हवी. शोएब अख्तरच्या १५५ केएमपीएचला मजा आहेच पण वॉर्नच्या हळुवार लेगीत पण मजा आहे. तशी गाणी आहेत ही. संमोहित करणारी.   

बाबूजींची संगीत दिलेली 'तोच चंद्रमा नभात', 'आकाशी झेप घे रे पाखरा', गायलेलं 'समाधी साधन, संजीवन नाम' यातलंच आहे. 'कशी केलीस माझी दैना', 'राधाधर मधुमिलिंद जय जय', 'देवाघरचे ज्ञात कुणाला', 'सुकांत चंद्रानना पातली', ही नाट्यगीतं, पांडुरंगकांती दिव्यं तेज झळकती', 'प्रभाती सूर नभी रंगती', 'टाळ बोले चिपळीला', वसंतरावांचं 'प्रथम तुला वंदितो' ही भक्तिगीते, 'बाळा जो जो रे' आणि 'निंबोणीच्या झाडामागे' ह्या अंगाई, 'सांज ये गोकुळी', 'बाई मी, विकत घेतला श्याम', 'जिथे सागरा धरणी मिळते', 'चाफा बोलेना', यशवंत देव आणि लताचं 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' ही गाणी, 'लाखांमधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं, तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं', शोभा गुर्टू यांनी गायलेलं 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' या लावण्या यातल्याच आहेत. सूर काय, चाल काय, राग काय आणि छापखान्यातले खिळे काय, जुळवणा-यावर अवलंबून असतं काय दाखवायचं ते. मुळाक्षरं आणि सूर स्वतः:काही सांगत नाहीत. कशापुढे काय ठेवायचं आणि काय निर्माण करायचं हे निर्मात्याच्या प्रतिभेवर ठरतं आणि आपल्या आकलनशक्तीवर. रामायणातलं 'लीनते चारुते सीते' यमन बिलावल आहे. 'मी मज हरपून बसले गं', 'मागे उभा मंगेश', अरुण दात्यांच्या बरोबर आजीवन जोडलं गेलेलं खळ्यांचं 'शुक्र तारा मंद वारा' ही यमनकल्याण आहेत. दोन गाणी मात्रं यमन कल्याण मधली कधीही ऐकावी अशी आहेत, एक ग्रेसांचं 'भय इथले संपत नाही' आणि रामायणातलं 'पराधीन आहे जगती'. 

आजीनी आईला घेऊन दिलेलं काही 'आणे' किमतीचं 'गीतरामायण' घरी आहे. भूर्जपत्रावर लिहिलं असावं असं वाटेल अशी आता पानं पिवळी पडलीयेत. राममंदिर बांधायला विटेला पैसे जमवतात कारण पुढे स्वतः:च्या घरावर सोन्याची कौलं चढवता येतात, सत्ता मिळू शकते पण गरजच काय मंदिराची. एक गीतरामायण घरी ठेवलत तरी पुरेसं आहे. सगळं रावणाचं सैन्यं आहे पण बांधायचंय राममंदिर. असो! ९१ साली 'सावरकर' चित्रपटासाठी बाबूजी निधी गोळा करण्यासाठी परत गीतरामायण करणार होते. हॉटेल स्वरूपला ते उतरायचे आणि त्यांचं त्या कार्यक्रमाचं तात्पुरतं ऑफिस 'हॉटेल रविराज'च्या ऑफिसमध्ये होतं. क्वचित यायचे ते तिथे. अतिशय मितभाषी आणि तापट माणूस असं कानावर आलेलं. एकदाच त्यांना मी तिथे पाहिलेलं, चार फुटांवरून. बुटकेसे, चेह-यावर प्रसन्नं भाव आणि चित्रपटाचा विषय कायम डोक्यात असलेले त्यामुळे थोडेसे तणावग्रस्त. मोठ्या माणसांना मी बघतो फक्तं, ते जवळ जाऊन सह्या वगैरे मागायचं माझं धारिष्ट्य नाही होत. त्यांच्याकडे फक्तं बघत रहावं. सहीचा कागद हरवू शकतो, डोळ्यातली प्रतिमा सेव्ह असते. 

तर मूळ मुद्दा 'पराधीन आहे जगती'. बाबूजींचे सहाय्यक प्रभाकर जोगांनी सांगितलेला किस्सा आहे. नेहमीप्रमाणे फक्तं एक दिवस आधी महाकवींकडून गाणं मिळालं. त्याला बाबूजींनी दरबारी कानडा मधे चाल पण लावली. सकाळी पावणे आठाला लाईव्ह ब्रॉडकास्ट करायचं होतं. दोघं रिक्षातून निघाले आकाशवाणीकडे. रिक्षात बाबूजी म्हणाले, 'मी चाल लावलीये दरबारी कानडामध्ये पण मला ती योग्यं वाटत नाहीये'. स्टुडिओत गेल्यावर मुखड्याची नविन चाल त्यांनी ऐकवली. 'ही बसवून घ्या वादकांकडून तो पर्यंत मी अंतरे बसवतो'. साडेसातला रिहर्सल झाली. पावणेआठला लाईव्ह ब्रॉडकास्ट. या महान माणसानी दहा अंत-याचं गाणं डायरेक्ट सादर केलं. देव माना, मानू नका पण अशावेळी कोण उभं राहतं मागे डोक्यावर हात ठेवायला? काहीतरी अज्ञात दैवी शक्ती असणारच. पावसाची सलग धार असावी तशी गदिमांची लेखणी होती. कुठलाही अडथळा न येता ती जशी अखंड येते तसे गदिमांच्या लेखणीतून शब्दं झरत असावेत.   

'दैवजात दुःखें'. संचिताने सगळं मिळत असतं असं आपल्याला वाटतं. मला कायम प्रश्नं पडत आलाय, देवाचं संचित कसं वाईट असेल? दशरथाच्या वंशात येताना कुठलं पूर्वसंचित येतं मग? त्या वंशाचं येत असावं. कसे सुचत असतील पर्यायी शब्दं. आपण वनवास म्हणतो, गदिमा काननयात्रा म्हणतात. 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे', असं रामदास म्हणाले. गदिमांच्या ओळी बघा, 'जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात, दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत', 'मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा' किंवा अजरामर 'दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट, एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ, क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा' बघा. पद्यरूपी संवाद आहे सगळा. राम सांगतोय भरताला. त्याच्या लेव्हलचं सांगणं पाहिजे. गदिमा पटकथा लिहायचे यात नवल ते काय. रामायण लिहिताना कित्त्येक पात्रात ते फिरून आलेत. 'निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता' हे कसं आलं असतं मग सहज. शुर्पणखेचा राक्षसीपणा 'सूड घे त्याचा लंकापती' मधून कसा आला मग सहज. 

सगळे शब्दं डिक्शनरीत पण असतात. गदिमांनी शब्दांचे कुंचले केले आणि या माणसांची गाण्यातून रेखाचित्रं काढली. मग त्यात बाबूजींनी सुरांचे रंग भरले आणि त्याच्या तसबिरी केल्या. आपले फोटो दिवाणखान्यात आपण गेल्यावर कुणी लावेल का माहीत नाही पण या माणसांनी मोफतमध्ये आपल्या आयुष्याच्या दिवाणखान्यात काय भरगच्चं दालनं मांडून ठेवलीयेत बघण्यासाठी. अरे किती द्याल? 'अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने' अशी अवस्था आहे. आपलीच बुद्धीची झोळी फाटकी. मधुबाला, नूतन, माधुरी, रेखा एकाचवेळी पडद्यावर असतील तर कुणाकडे बघावं असा प्रश्नं पडेल, तसं होतं इथे, शब्दं बघू, अर्थ बघू, चाल बघू की आवाज बघू? डोळे मिटून आस्वाद घ्यावा म्हणून. बाबाजी का बायोस्कोप सारखं होतं मग. चित्रं बंद डोळ्यापाठीमागे दिसत असतात, कानात सूर आणि मेंदूत अर्थ शिरत असतो. तो हृदयात पोचला की पावसाची ओल यावी तशी डोळ्यांच्या भिंतींना ओल येते.  
देखावा प्रेक्षणीय असतो, ठिकाण रमणीय असतं, ललना कमनीय असते तशी ही सगळी गाणी 'यमनीय' आहेत. ऐकते रहो, जीते रहो. :)

जयंत विद्वांस

Saturday 25 June 2016

शिवरंजनी...


'थोडा है थोडेकी जरुरत है' हे गाणं' मला फार आवडतं. कितीही मिळालं तरी माणसाची ओढ संपत नाही. 'अजून' या शब्दाला मरण नाही. जगणं, खाणं, पैसा, संपत्ती, इंद्रियसुख, सत्ता 'अजून' हवी असते. व्हिडिओकॉनचे धूत म्हणाले होते, 'कितीही मोठं घर असलं तरी एक खोली कमी पडते आणि पगार कितीही असला तरी नेहमी हजार रुपयांनी कमी पडतो'. कोंड्याचा मांडा करून जगणारी पिढी आता दुर्मिळ प्रजातीत मोडेल. कर्ज उपलब्ध आहे म्हणून घेणं वाढलं आणि नंतर पर्यायाने देणं वाढलं, गरजेसाठी घेणारे कमी झाले. आहे त्यात सुखी राहणं याकरता कसब लागतं. आहे म्हणून उधळण केली तर छानच दिसते की, पण असलं तरी मोजकं निवडून पण काही सुंदर करता येतं. माझी आजी एक वाटी चक्का होईल एवढ्याच दह्याला फाशी द्यायची आणि फडक्याला बोटं पुसावीत तेवढं जेवताना वाढायची सगळ्यांना, आता चार किलो आणून आंबे, सुकामेवा घातलात तरी तशी चव येणार नाही. सात शुद्ध स्वर, चार कोमल आणि एक तीव्र असा डझनभर ऐवज आहे म्हणून उधळण न करता निगुतीने कसं करायचं हे भूप आणि शिवरंजनीत बघायला मिळेल. 
भूप, शिवरंजनी आणि सामान्य माणसाचा खिसा यात साम्यं काय तर तिघातही 'म' 'नी' नाही, भूपात शुद्ध गंधार आणि शिवरंजनीत कोमल एवढाच, काय तो फरक. जुन्या लॉईड, रिचर्ड्सच्या विंडीज टीममध्ये एकटाच गोरा असलेला लॅरी गोम्स उठून दिसायचा तसा इथे सगळ्या शुद्ध स्वरातला कोमल गंधार लॅरी गोम्स सारखा आहे. शिवरंजनी हा अतिशय करूणरस ओतणारा राग आहे. रागात, दु:खात माणूस जसा तिरमिरत निघतो तसं इथे आहे. काही वगळल्याची भावना या 'रागा'ला पण होत असावी का? दुवा तोडावा तसं सारेग नंतर म कडे दु:खी नजरेने बघत पुढे जायचं आणि नंतर नी ला टाटा करून जावं लागत असल्यामुळे खंतावलेला राग असावा का हा? मोजक्या स्वरात असल्यामुळे याच्या सुरावटी कदाचित लवकर ओळखता येत असाव्यात किंवा त्यातल्या चाली सारख्या वाटत असाव्यात.
वाटव्यांची दोन गाणी सापडली शोधता शोधता या रागात, नावडीकरांनी म्हटलेलं 'रानात सांग कानात' आणि वाटव्यांनी म्हटलेलं 'वारा फोफावला', अजूनही असतील. वर्तुळाकार चेह-याचे नावडीकर आम्हांला मराठी शिकवायला होते सहावीला पण ते भावगीत गायक आहेत हे कुठे तेंव्हा कळायला. ते भावगीत गायन मागेच पडलं आता. एखाद्या अल्बमच्या जोरावर आणि दोनचार तुरळक हिट गाण्यांवर जगणारे गायक आले. सगळी बत्तीशी दाखवून, खूप त्रास होत असल्यासारखी तोंडं करून, बद्धकोष्ठ झाल्यासारखे हावभाव करून, शब्दं थुंकल्यासारखे बाहेर फेकणारे गायक आता जोरात आहेत. तिस-या आघाडीचं सरकार जितके दिवस टिकायचं तेवढे दिवस त्यांची गाणी कानावर पडतात म्हणजे तशी व्यवस्था असते. पेटीच्या मागे बसलेले तोळामासा वजनाचे वाटवे कुठलाही आव न आणता भाव असलेलं गीत गायचे. माणिक वर्मांचं 'सावळाच रंग तुझा' त्यातलंच. एक धागा सुखाचा' वर मी मागे लिहिलं आहे त्यामुळे परत इथे लांबी वाढवत नाही. त्या हातमागाच्या ठेक्यावर गाणारे हताश राजा परांजपे, गदिमांच्या शब्दातलं जीवनसार आणि बाबूजींचा आवाज असा सगळा तो सुरेल योग आहे. जोगांनी संगीत दिलेलं 'बाजार फुलांचा भरला', निसर्गराजा ऐक सांगतो' हे संवादगाणं, भीमसेनजींचं 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा', राम कदमांचं 'दिसला ग बाई दिसला' आणि अतिशय सुंदर ठेका असलेलं हृदयनाथ मंगेशकरांचं आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे सगळी शिवरंजनी मधली गाणी आहेत.

'बाबुल मोरा' लिहिणा-या बहादूरशहा जफरचं 'लाल किला' मधलं रफीचं 'न किसकी आँख का नूर हू' या रागातलं सुंदर गाणं आहे. वैषम्यं, विफलता, हताशपणा शब्दात तर आहेच पण चालीत पण आहे. रफीची यातली अनेक गाणी  मला सापडली. 'गझल' मधलं 'रंग और नूरकी बारात किसे पेश करू', 'सूरज'मधलं 'बहारो फूल बरसाओ', 'ब्रह्मचारी'मधलं 'दिलके झरोकोमें तुझको बिठाकर', लता बरोबरची तीन 'प्रोफेसर' मधलं 'आवाज दे के हमे तुम बुलाओ', 'जनम जनम के फेरे मधलं 'जरा सामने तो आओ छलिये' आणि अंजाना'मधलं 'रिमझिमके गीत सावन गाये', लताची पण अनेक लोकप्रिय गाणी आहेत यात - 'जंजीर'मधलं 'बनाके क्यू बिगाडा रे', घुंघट'मधलं   'लागे ना मोरा जिया', 'तुम्हारे लिए' मधलं जयदेवचं 'तुम्हे देखती हूँ, तो लगता है ऐसे', 'एक दुजे के लिए'चं 'तेरे मेरे बीचमें', 'मेहबूब की मेहंदी मधलं 'जाने क्यू लोग मोहब्बत करते है', 'आँखें' मधलं 'मिलती है जिंदगीमे, मोहब्बत कभी कभी', लता मुकेशचं 'संगम'मधलं 'ओ मेरे सनम'. लताचं आणि किशोरचं एक टँडम आहे 'मेहबूबा'चं 'मेरे नैना सावनभादो, फिर भी मेरा मन प्यासा', करूणरस तर यात दिसतोच पण हॉन्टेड मटेरिअल पण यात आहे. जुन्या 'बीस साल बाद'चं लताचं 'कही दीप जले, कही दिल' पण यातलंच आहे. 'जिस देशमें गंगा बहती है'मधलं अप्रतिम 'ओ बसंती पवन पागल' यातलंच आहे. डोंगर कुठला आहे माहीत नाही तो पण तो डोंगर आणि पद्मिनी छान दिसते या गाण्यात.

बाकी मग 'साथी'मधलं मुकेश, सुमन कल्याणपूरचं 'मेरा प्यार भी तू है' आहे. शम्मीकपूरची नक्कल केलेल्या राजीव कपूरच्या पदार्पण चित्रपट 'एक जान है हम'चं टायटल सोंग 'याद तेरी आयेगी' आहे, अन्वर, शब्बीरकुमार, मोहम्मद अझीझ भाग्यवान माणसं, हिमेश रेशमियाच्या तुलनेत खूप बरी म्हणा, नाकात म्हणूनही, केवळ रफीची नक्कल म्हणून ही माणसं चालली. 'मर्द'मधली गाणी(?) ऐकून अझीज आणि शब्बीरकुमारनी कान मेण ओतून बंद केले असते. प्यार झुकता नही'चं शब्बीर लताचं 'तुमसे मिलकर ना जाने क्यू' याच रागात आहे. एरवी नाक मुरडणा-या गायिकेला हे गेंगाणे आवाज का खटकले नाहीत याचं आश्चर्य वाटतं. 'कर्मा'चं किशोर कविता कृष्णमूर्तीचं 'ना जैय्यो परदेस' यातंच आहे. 'प्रेमरोग'चं 'मेरी किस्मतमें तू नही शायद' यातलंच आहे. वाडकर लागले की मी गाणं म्यूट करतो. कुठलंही गाणं त्यांच्यावर चित्रित झालंय असंच गातात ते, हिरो ओळखता येणार नाही तुम्हांला. एक अपवाद, 'सत्या'चं 'सपनेमें मिलती है' पहिल्या फटक्यात आवडलं होतं मला. माधुरीला हिट एन हॉट करणारं 'बेटा'मधलं 'धक धक करने लगा' पण यातलंच आहे

वेळ झाला की कधीतरी बैजवार 'मुकद्दर का सिकंदर'वर लिहीन. त्यातली सगळी गाणी सुंदर होती. त्यातलं 'ओ साथी रे' शिवरंजनीत आहे. सात विभागात निवड झाल्यामुळे असेल एकही फिल्मफेअर नव्हतं याला. अतिशय सुंदर व्यक्तिरेखा त्यात छोट्या छोट्या तपशिलांनी उभ्या केल्या आहेत. राखीला मनोमन चाहणारा, मालकीण म्हणून तिच्याबद्दल आदर वाटणारा अमिताभ. त्यानी तिकिटं घेतलेली राखीला आवडलेलं नाहीये, त्याच्या रस्त्यावर गाण्याबद्दल ती कुचकं बोलून माईक त्याच्याकडे देते. मितभाषी सिकंदर नंतर जे बोलतो ते त्या गाण्यासाठी परफेक्ट इंट्रो आहे.डबडबलेल्या डोळ्यांनी गाणारा अमिताभ, काहीही माहीत नसलेला विनोद खन्ना आणि कोड्यात पडलेली 'मेमसाब' राखी. जोहराजानचा रोल भावखाऊ होताच पण राखीचा रोल ही छान होता त्यात. विविध भावना तिनी काय सुंदर दाखवल्यात. परिस्थिती पालटल्यावरची गंभीर, विनोद खन्नाचं आहे असं समजून मिळालेल्या पत्रानंतर झालेला आनंद, शेवटी मेमसाबला झालेला उलगडा. बाई एखाद्याचा तिरस्कार कसा करते हे बघायचं असेल तर तिची मेमसाब बघावी यातली. 

आणि आता मला या रागात आवडलेलं शेवटचं गाणं. 'मेरा नाम जोकर' यशस्वी न होण्याचं एक कारण जसं अपप्रचार होतं तसंच थकलेला आर.के.हे पण होतं. आधीच तो सहा वर्ष चालू होता, लेंग्दी होता, त्याचं वय जाणवतं. पहिले दोन प्रेमभंग फार वरवरचे वाटतात त्यात मला तरी. सगळ्याजणी एकेक करून आयुष्यातून निघून गेल्यावर आलेलं एकाकीपण पद्मिनी गेल्यावर जास्ती जाणवतं. सिमी ग्रेवालच्या सोडून जाण्यात दु:खं फार नव्हतं, ते होणारच होतं, मुळात ते एकतर्फी प्रेम होतं. रशियन सुंदरी मरीना परत जाण्यात ती परदेशी आहे हे मनाला समजवायला कारण होतं पण प्रसिद्धीसाठी स्टेपिंग स्टोन करून पुढे गेलेली पद्मिनी जरा जास्तीच जिव्हारी लागते. अंधारात डोळयांवर गॉगल लावून बसलेला आर.के., त्याच्याजवळ राहिलेला 'तो'च, मागे ती रंगीत जळमटं आणि त्याच्या हातातला तो छोटा जोकर तो खाली सोडतो, तो चालतो हे तेंव्हाच कळतं. या गाण्याची चाल आर.के.चीच होती. एकटेपण फार भीषण असतं. हात विस्फारून सगळीकडे धावणारा आर.के. डोळे ओलसर करतो. सोडून गेलेली माणसं त्याला बोलावतायेत असा निव्वळ भास आणि त्या रंगीत जळमटलेल्या एकांतातून तो आरश्याच्या तुकड्यात दिसणा-या पद्मिनीपाशी येऊन थबकतो. 'जाने कहां गये वो दिन'....
आयुष्यं जगावं लागतंच. सगळी सप्तकं, साती सूर लाभतीलच असं नाही. भूप, शिवरंजनी सारखं काही वगळून तुटपुंज्या स्वरांचं काही नशिबात आलं तरी त्यातून स्वर्ग निर्माण करता यायला हवा. आनंद महागडा गोल्फ खेळून पण मिळतो आणि पत्त्यांचा बंगला करून पण मिळतो. शेवटी तात्पर्य काय, प्रत्येकाच्या पेटीचे सूर निराळे. काहींच्या काही स्वरपट्ट्या रिकाम्या असल्या म्हणजे रुसायचं नसतं. आपल्या आवडीची सुरावट त्यावर वाजत नसेल तर ते दु:खं जोपासण्यापेक्षा जी वाजतीये ती ही वाईट नाही हे समजून घेण्यात जास्ती आनंद आहे. :)

जयंत विद्वांस

Wednesday 22 June 2016

यमन...

आर.बी.आय.ची रेपोरेट, व्याजदर पॉलिसी, जीडीपी, अर्थसंकल्प या आर्थिक बाबी, ब्रिज, पोकर, गोल्फ, बेसबॉल, स्क्वॅश हे खेळ, राग, शास्त्रीयसंगीत, आपलं परराष्ट्रधोरण, फिजिक्स, वाद्यंवादन, एफबीवरच्या अनेक दुर्बोध कवितांमधले अर्थ, स्वतः:च्या पोस्टला स्वतःच लाईक करण्यातलं लॉजिक आणि इतर एकूणच ब-याच बाबीतलं मला फार कळत नाही. त्यातलं माझं ज्ञान अनेक वर्ष एकाच म्हणजे अतिशय खालच्या पातळीवर आहे. तरीही मला न्यूनगंड येत नाही कारण प्रत्येक गोष्टं प्रत्येकाला कशी येईल असं कुठेतरी वाचलं होतं मी. त्यामुळे तरीपण मी त्यावर बोलतो हा निव्वळ आगाऊपणा किंवा अतिशहाणपणा आहे असं माझं स्वतः:चं ठाम मत आहे. माझ्यापेक्षा कमी माहिती असलेला माणूस मला बरा पडतो अशावेळी. त्याच्या नजरेत कौतुक दिसलं की अगदी 'याचीसाठी केला होता अट्टाहास' अशी भावना होते. परवा भैरवीवर लिहिलं तेंव्हा माझं पितळ उघडं पाडण्यासाठी असेल पण कुणीतरी म्हणालं, 'इथे थांबू नका, येऊ दे अजून'. :P 

मला आवडलेलं गाणं महत्वाचं, ते अमुक एक रागात आहे असा माझा समज किंवा गैरसमज असला म्हणून त्याची गोडी काही कमी होत नाही, फार तर फार मी कसं आत्मविश्वासाने चुकीचं बोलतोय एवढंच सिद्ध होईल त्यातून. तर माझा दुसरा आणि शेवटचा आवडता राग म्हणजे यमन आणि त्याचा भाऊ यमनकल्याण. आयत्यावेळी घरी पाहुणे आलेत, भाजी आणायला जायला वेळ नाही, सुगरण बाई काय करते? तर ती बटाट्याची भाजी करते. तसा यमन आणि यमनकल्याण हा बटाटा आहे. एक संगीतकार म्हणाला होता, 'चाल सुचत नाहीये, वेळ कमी आहे पण चाल तर सुरेल हवीये मग 'यमन' घ्या. सोप्प्या, सहज गुणगुणता येतील अशा सुरेल चाली त्यात आपोआप होतील'. एक संगीतकार म्हणाला होता, 'सात तर सूर आहेत, किती चाली कराल? कुठल्या स्वरानंतर कुठला घेता, तिथे किती थांबता, कुठला सोडता, कुठला वेगळा पकडता यावर तुमच्या चालीचं वेगळेपण ठरतं'. एकाच रागातल्या अनेक गाण्यांमध्ये काही गाणी एकसारखी वाटू शकतात, त्यात गैर काही नाही पण सतत तेच करत राहणं गैर आहे. अर्थात सोन्यापेक्षा पितळ काहीवेळा चमकूनही जातं.

इन्स्पिरेशन घेणं आणि जसंच्या तसं उचलणं यात फरक आहे. १९६४ च्या 'मि.एक्स इन बॉंबे' मधलं 'खूबसूरत हसीना' 'एल.पी.'चं होतं आणि १९९३ च्या 'बाजीगर'मधलं 'ऐ मेरे हमसफर', हे इन्स्पिरेशन नाही (अन्नू मलिक - बेस्ट म्युझिक डायरेक्टर - फिल्मफेअर होतं) कारण स्वतः:अन्नूच्या सुरेल चाली अमाप नाहीत म्हणून. इन्स्पिरेशन म्हणजे काय? एस.डी.नी 'ठंडी हवाए, लहराके आये' केलं यमनमध्ये (नौजवान - १९५१) मग १९६४ च्या 'आपकी परछाईयाँ'' मधे मदनमोहननी यमन मधे 'यही है तमन्ना' केलं. मग एस.डी.ला रीतसर रोशननी ती चाल घेऊ का विचारलं, तो ही घे म्हणाला मग त्यानी त्याच चालीत 'रहे ना रहे हम' (ममता - १९६६) केलं. त्यावर  पुढे मग आरडीनी त्यात 'सागर किनारे दिल ये पुकारे' (सागर - १९८५) बसवलं. तसंही राजेश रोशन कशाला परवानगी घेईल कुणाची, त्याच्या पण वडिलांचं गाणं होतं की मग त्यानी पण 'घरसे निकलतेही' (पापा कहते है - १९९६) उरकून घेतलं यमनात. 

काहीवेळेस मला वाटतं जुन्या चाली जरा घासूनपुसून नव्याने यायला हव्यात. तेंव्हाची जरा बोजड भाषा, गायक नसलेल्या माणसांचे आवाज, तांत्रिक मागासलेपण यामुळे कितीतरी सुंदर चाली अज्ञात आहेत त्या तुकारामाच्या गाथेसारख्या जाणकार माणसांनी वर काढून ब्रासो लावून चमकवायला हव्यात. काळाचा गंज निघून गेला की कशा उन्हात चमकणा-या पितळी कळसांसारख्या मान वर करून उभ्या रहातील. याचा अर्थ नविन वाईट आहे सगळं असं नाही. पण मेलडी अस्तंगत झालीये. ठेका महत्वाचा ठरतोय, शब्दं अर्थवाही नाहीत. चाल कशी पाण्याच्या धारेसारखी हवी. सतत, सलग, ओघ असलेली. सैगलची काही मोजकी गाणी मी ऐकलीयेत, जी मला आवडतात. त्याची कित्त्येक गाणी मला माहीत नाहीत. त्या चाली नव्या रूपात बाहेर येऊ शकतात. 'मैं क्या जानू क्या जादू है', 'नुक्तंची है गमेदिल', 'दो नैना मतवारे तिहारे' ही त्याची गाणी यमन रागात आहेत हे समजल्यावर मला या रागाचं काहीतरी गवसल्यासारखं झालं. कुठलीही मात्रा, काना, अनुस्वार, रफार, वेलांटी, उकार नसलेला यमन हा अत्यंत सरळमार्गी राग आहे. राहुल द्रविड आणि यमन यात साम्य आहे मग. सरळमार्गी, प्रथमदर्शनी चित्ताकर्षक नाही वाटणार पण काहीतरी जादू आहे त्यांच्यात एवढं खरं. ग्लॉसी नसेल काही त्यांच्यात पण मॅट फिनिशमध्ये पण एक रॉयल टच असतो तसे आहेत दोन्ही.  

किशोरची संथ गाणी घ्या ही - 'आपके अनुरोधपे', 'इस मोडसे जाते है', 'हजार राहे मुडके देखी', 'जिंदगी का सफर', 'सवेरे का सूरज' आणि 'वो शाम कुछ अजीब थी'. सगळी यमन. धबधबा आकर्षक असतो, तिथे गर्दी होतेच (कुणी उंचावरून पडतंय म्हटलं की आपल्याला आनंद होतो त्याचं मूळ इथे असावं का? :) ) पण संथ लयीत वहाणारी नदी सुद्धा तालबद्ध असते, खळखळाट नसेल फार पण एक उपजत लय असते तसा हा राग आहे. सगळे शुद्ध स्वर आणि मधे दगड आल्यावर प्रवाह जरा वळसा घेतो तसा तीव्र मध्यम. बाकी चालीत तीव्रता डोकावणार नाही ती. आर्ट फिल्म मधे काहीवेळा एक जीवघेणा संथपणा असतो, काहीच घडत नाही पण ते अंगावर येतं तसं त्या 'वो शाम कुछ अजीब थी'ला होतं. जुने संगीतकार विचार करत असणार, चाल देताना. अर्थ, चित्रपटातला प्रसंग, मूड असं सगळं बघून राग निवडत असावेत का? 'सवेरे का सूरज' एक असंच गाणं आहे त्याचं. 'इस मोडसे जाते है' मधे 'कुछ सुस्त कदम रस्ते' ऐकताना पण एक वातावरणातली शांतता अनुभवायला येते. त्यात राहे आणि रस्ते असे दोन शब्दं का असावेत? रस्ता शब्दात डांबरीपण आहे आणि राहे मधे एक पायवाटेचा, मातीचा फील वाटत आलाय मला कायम. 'एक राह तो वो होगी, तुम तक जो पहुचती है'.   

शुद्ध 'म' घेतलात की त्याला 'यमनकल्याण' म्हणायचं. 'यमनकल्याण'मधली ही गाणी काही फार वेगळी नाहीयेत - 'जिया ले गयो रे', 'चंदनसा बदन', 'रसिक बलमा', 'एक प्यार का नगमा है', 'जिंदगीभर नही भुलेगी', 'जब दीप जले आना', 'प्रिय प्राणेश्वरी', 'जहां डाल डालपर', 'ढलती जाये रात', 'जरासी आहट होती है', 'बीती ना बिताई रैना', 'मैं जिंदगीका साथ निभाता चला गया', 'सारंगा तेरी यादमें'. 'जिया ले गयो रे मोरा सावरिया' तर अगदी बांधून ठेवतं ऐकताना. 'चंदनसा बदन'तर नूतन एवढंच सोज्वळ आणि शांत आहे. पेटी किंवा सिंथेसायझर शिकताना सुरवात करायला 'एक प्यार का नगमा है' एकदम सोप्पं गाणं आहे. 'सा रे ग, ग म प, मम ग' हे त्याचं नोटेशन झालं. पण दोन स्वरांमध्ये पूल बांधल्यासारखं जोडून वाजवता आलं पाहिजे तर त्या पुस्तकी ज्ञानाचा उपयोग. नुसते वादी संवादी स्वर, आरोह अवरोह कळले म्हणजे राग समजतो असं नाही.    

'पाकिजा'चं यश पहाणं संगीतकार गुलाम महंमद आणि मीनाकुमारीच्या नशिबात नव्हतं. दारिद्र्यात गेला तो. नौशादचा कित्त्येक वर्ष तो असिस्टंट होता. तो गेल्यावर नौशादनी पूर्ण केला पाकिजा. 'इन्ही लोगोने' आणि 'मौसम है आशिकाना' ही कालातीत गाणी यमनमध्ये आहेत. 'इन्ही लोगोने'चा तबला कुणी वाजवलाय माहीत नाही पण अजून लक्षात राहिलेले दोन म्हणजे 'शोले'चा पाठलाग आणि 'मेरी सुरत तेरी आँखे'च्या 'नाचे मन मोरा मगन धिक धा धिगी धिगी'चा सामताप्रसादांनी वाजवलेला. शब्दं सापडत नाहीत त्या ठेक्याचं वर्णन करायला. लहान मूल जसं आपण त्याला त्रास होणार नाही पण आनंद मिळेल अस खेळवतो ना तसा ठेका आहे तो, शब्दांना इजा न होईल याची काळजी घेणारा आणि रूळ जसे समांतर एकसारखे पळतात तसा सोबत चालणारा. आई जसं कौतुकाने मुलाकडे बघते ना तसा ठेका आहे 'इन्ही लोगोने'चा. तळहाताच्या फोडाप्रमाणे शब्दांना, चालीला जपणारा, उठाव आणणारा आणि वेगळं अस्तित्व असलेलाही. 'मौसम है आशिकाना'च्या ओळी म्हणजे तर बोलायलाच नको (कैफी आझमी). विरोधाभास, वैषम्य काय तलम शब्दात आलंय. 'बेखाब मेरी आँखे, मदहोश है जमाना'. काळजाला चीर पडेल असं आक्रन्दून पण दु:खं सांगता येतं आणि नि:शब्द करेल असंही सांगता येतं. शल्यं, बोच, सल हळुवारपणे सांगणारा राग आहे हा.      

मुकेशचा आवाज आधीच उदासवाणा होता. सानुनासिक, वर फाटणारा अशी वैगुण्यं असलेला आवाज असून सुद्धा त्याची गाणी मात्रं हृदयाला हात घालणारी होती. 'आंसू भरी है', 'कभी कभी मेरे दिलमें', 'भुली हुई यादों' आणि कदाचित 'तुम्हे जिंदगीके उजाले मुबारक' हे गाणी यमन मधली आहेत. 'न जाओ सैय्या', 'एहसान तेरा होगा', 'वो जब याद आये', 'ये दुनिया अगर मिल भी जाये', 'रंजीश ही सही', 'बडा दुख दिना तेरे लखन'ने ही पण यमन मधलीच आहेत. कुठलाही गोंगाट नाही, धावपळ नाही. वेदनेचं, आर्ततेचं शांत लयीतलं कथाकथन आहे हे. 'बाई मी विकत घेतला श्याम', 'निंबोणीच्या झाडामागे', सांज ये गोकुळी' ही पण त्यातलीच गाणी आहेत. दिवसात कधीही म्हणता येईल असा पण सहसा संध्याकाळी गायला जाणारा हा राग आहे. सांजेची कातरता उतरत असेल का त्या स्वररचनेत? की म्हणूनच तो संध्याकाळी म्हणतात? शास्त्रं असावंच काहीतरी. खूप विचार करूनच या रागांचे गायनसमय ठरवले असावेत. एरवी गायले तर आनंद मिळेलंच पण कार्तिकी आणि आषाढीला जसं एक वेगळेपण जाणवतं एकादशीचं तसं काहीसं असावं.

आशा भोसले या बाईबद्दल मला कायम अचंबा वाटत आलेला आहे. त्यांची दोन यमन मधली गाणी मी मुद्दाम शेवटी ठेवलीयेत. १९६३ चा रोशननी रोशन केलेलला 'दिलं ही तो है' काही मी पाहिलेला नाही पण त्यातली 'भुलेसे मोहब्बत कर बैठा', 'तुम अगर मुझको न चाहो, 'लागा चुनरीमे दाग आणि ' निगाहे मिलानेको जी चाहता है' ही सदाबहार गाणी मला आवडतात. तेंव्हाची निर्मला नागपाल उर्फ आताची सरोज खान तेरा वर्षाची होती या गाण्यात ग्रुपमधे. साहिरनी लिहिलेल्या या गाण्याची सुरवातीपासून ते शेवटपर्यंत एक खटकेबाज सफर आहे. 'जिस घडी मेरी निगाहोको तेरी दीद हुई' पासून 'वो जलवा जो ओझल भी है सामने भी, वो जलवा चुरानेको दिल चाहता है' पर्यंत नुसते रोमांच आहेत. ती फार डांबरट लोकं होती. रिपीट व्हॅल्यू येण्यासाठी सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्रं दाखवायच्या आणि माणसाला हे बघू की ते बघू की ऐकू असं संभ्रमात पाडून परत परत यायला भाग पाडायचं. शेलाटी नूतन काय अप्रतिम दिसते या गाण्यात, तिचे हावभाव, तो सोज्वळपणा, ते निरागस सौंदर्य, परफेकट लीप मूव्हमेंट्स हे बघेपर्यंत गाणं संपतं. मग आशाचा आवाज कधी ऐकायचा आम्ही? परत बघणं आलं ना म्हणजे. ' बरसात की रात'चं 'ना तो कारवां की तलाश है' पण आशा, रोशनचंच होतं.   

तिचं दुसरं यमन मधलं अफाट गाणं म्हणजे १९६६च्या शैलेंद्रला रस्त्यावर आणणा-या 'तिसरी कसम' मधलं शैलेंद्र आणि शंकर जयकिशनचं 'पान खाओ सैंय्या हमारो'. 'बुगडी माझी सांडली गं' मधलं 'हाये' आणि या गाण्यामध्ये ते 'सांवली सुरतीया'च्या आधीचं 'ओय होय' आणि 'मलमल का कुर्ता'च्या आधीचं 'हाय हाय' आणि मधे ते हसणं. हे गाण्याच्या क्लासमधे शिकवत नाही, शिकता येत नाही. तो पिसारा वरूनच येताना घेऊन यावा लागतो. गरिबाघरी कार्य निघालं की श्रीमंत माणसं लागले चार पैसे तर असावेत म्हणून तयारीने जातात तसं भोसलेबाई करतात. 'तुमची मुलगी आहेच सुंदर पण मी येताना ठुशी आणलीये तिच्यासाठी, ती पण घाला, बघा किती सुंदर दिसते अजून' असं कुणी मोठ्या मनाने म्हटल्यासारखं स्वबुद्धीने स्वतःची हिरे माणकं त्यात जडवतात. भरून येतं. शब्दं तुटपुंजे ठरतात कौतुकाला. किती छान क्षण जगले ते वादक, गीतकार, संगीतकार. इतिहास असा घडताना त्याचा एक भाग असणं हे भाग्याचं लक्षण. आशा भोसलेला वय आहे, वर्ष नाहीत. काय खट्याळपणा आहे त्या बाईच्या स्वरातच. त्या गाण्यामधल्या तलवारीसारख्या धारधार ताना नायगारासारख्या आहेत. अशा कोसळतात की आ किंवा कान वासून ऐकत रहाव्यात फक्तं. सेहवाग, अमिताभ आणि आशा यात साम्यं काय तर 'वन मॅन शो' सगळा. बाईच्या गाण्यात फेरारीचा स्पीड आहे.

यात इतर उल्लेख केले त्यातलं एखादं गाणं असेलही यमनमध्ये, माहीत नाही. त्या अज्ञानचं मला दु:खंही नाही. अज्ञानात सुख असतं. ती गाणी ऐकून मला सुख मिळालं एवढं खरं. सगळी माणसं सारखी म्हटली तरी शेवटी वैकुंठात गोत्रं लागतंच. त्याप्रमाणे ही काही सगोत्री गाणी मला सापडली. एखादं नसेलही त्यातलं, काय फरक पडतो. भैरवी आणि यमन हे दोन राग मात्रं मला प्रिय झाले त्याचं कारण त्याच्या सुरावटीत दडलं असेल. बाकीचे कळत नाहीत फार. राग सगळेच चांगले. धानी आणि सलगवरळी ही रागांची नावं आहेत हे कुठे माहिती होतं पण त्याच्यातलं म्हणून दोन वेगळ्या चालीतलं 'घेई छंद मकरंद' ऐकताना कुठे काय अडतंय. चार ज्ञानी माणसं लिहितात ते वाचून लक्षात राहिलं की काहीतरी समजल्याचा आनंद होतो. गाणी सुंदर मुलीसारखी असतात. कुणाची, कॉलेज कुठलं, कुठे रहाते कळलं म्हणजे तेवढंच एक पाऊल पुढे पडल्यासारखं वाटतं एवढंच. :)

जयंत विद्वांस

Wednesday 15 June 2016

श्रद्धा…

गेल्या कित्त्येक वर्षात मी आवर्जून कुठल्या देवळात गेलेलो नाही, खास असं कारण नाही किंवा मी नास्तिक आहे वगैरे असं अजिबात नाही. पण कुठलीही गोष्टं मनातून वाटली तर करावी, जुलमाचा रामराम काही खरा नाही. अज्ञानामुळे असेल किंवा अतिज्ञानामुळे असेल माहित नाही पण काही गोष्टी केल्या म्हणजेच श्रद्धा असते, हे मला मान्यं नाही. बालपणाचा बराच काळ अनेक देवळांच्या सानिध्यात जाऊनसुद्धा असं का झालं असावं हा विचार मलाही पडतो. आजी भिकारदास मारुतीच्या वर रहायची. खाली हणमंतराव, समोर सदावर्ते राममंदिरबाजूला नारद मंदिर. तिथे रोज संध्याकाळी किर्तन असायचं, अजूनही असतं बहुतेक. आफळ्यांच्या इथे खाली कीर्तन शिकायला मुलं होती, त्यांचे अभ्यास कानावर पडायचे. सिन्नरकर, कोपरकर, गोविंदस्वामी आफळे, त्यांची मुलगी क्रांतीगीता महाबळ, सज्जनगडावरून आलेले रामदासी आणि अशा अनेक बुवांची किर्तनं मी तिथे ऐकली आहेत. आठवड्यातून दोनदा पुणतांबेकर भजनं घ्यायचे. प्रवचनं असायची.
दर शनिवारी रात्री मारुतीच्या पुढे भजन असायचं. कधी असायचं ते लक्षात नाही पण हातात विणा घेऊन ती खाली ठेवता अखंड नामसप्ताह असायचा. राम आणि हनुमानाचे वाढदिवस जोरात असायचे. लक्ष्मण आणि सीतेच्या जन्मं तारखेबाबत घोळ असावा म्हणून त्यांच्या नशिबी तो नाही असा माझा थोडं मोठं झाल्यावर समज होता. देवांमध्येसुद्धा आपलं आवडता नावडता प्रकार असतोच बघा. शेकडो वर्ष मिसेस राम आणि मिस्टर लक्ष्मण हे दीर भावजय मुकाट हा अन्याय सहन करत आहेत. भक्तीपेक्षा कथा ऐकण्याच्या ओढीने किर्तनं, तो भजनी ठेका आणि ते कच्चे, असंस्कारित आवाज आवडतात म्हणून भजनं ऐकली आहेत मीअंजिओग्राफित तो नॉन आयनिक डाय फिरतो शीरेतून तसा श्रवणानंतर भक्तिरस अंगातून मात्रं कधीही फिरला नाही. कुठलंही मत ठाम व्हायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. चटकन तयार झालेलं मत चुकीचं असण्याची शक्यता असते.
आयुष्यंभर सतत रामनाम घेऊन सुद्धा माझ्या निष्कांचन आजीच्या आयुष्यात सुखाचा एकंही दिवस कधी आला नाही. तिच्यावर लिहिताना मी म्हटलं होतं 'ज्या हातानी तिनी सतत जपमाळ ओढली त्या हातातली, ज्या पायांनी तिनी प्रदक्षिणा घातल्या त्या पायातली, ज्या तोंडानी तिनी फक्तं त्याचंच नाव घेतलं त्या तोंडातली ताकद शेवटी त्यानी का काढून घेतली? गरजेपेक्षा जास्तं पुण्य जमवलं म्हणून?' 'थोडं मोठं झाल्यावर म्हणजे आपल्याला आता सगळं कळतं असा भ्रम झाल्यावर मी तिच्या भक्तिची, नामस्मरणाची चेष्टा करायचो. 'इतकी वर्ष नाव घेतेस, कुणाचं वाईट केलेलं नाहीस मग तुला त्यानी एकही दिवस का सुखाचा दाखवला नाही?' ती शांतपणे म्हणायची, 'अरे मागच्या जन्माचं देणं राहिलं असणार आणि मला नाही उपयोग झाला तरी तो तुम्हाला होईल. बरे दिवस आले की वाटतं ही तिची पुण्याई उपभोगतोय आपण'. पण हे तिच्यावरच्या प्रेमापोटी आलंय. एकूणच तेंव्हा पाहिलेला ढोंगीपणा लक्षात मात्रं राहिला. निरीक्षणाची सवय वाईट, उगाच काय काय लक्षात रहातं आणि आठवतं मला.

आजीमुळे एकदाच पंढरपूरला गेलोय आत्तापर्यंत. खूप लहान होतो. चल म्हणाली, गेलो. पावसाळ्यात जागोजाग भुछत्रं उगवावीत तसं लोकांनी चंद्रभागेपर्यंत 'विधी'पूर्वक ठिपक्यांची रांगोळी काढली होती, ती चुकवत अंघोळीला गेलो चंद्रभागेत आणि आत्मा क्लीन करून येताना पायाला भौतिक घाण लावून आलो. त्यानंतर आजतागायत माझी आणि विठ्ठलाची भेट नाही. आता एकेक गोष्टी आठवून हसायला येतं. माळ घातल्यावर आमच्या शेजारचे मारणे श्रावणात पोथी वाचायचे. दहा साडेदहाच्या पुढे सगळा कारभार सुरु व्हायचा. रात्री कॉल रेट कमी असल्यामुळे जास्ती बोलतात लोक तसं ट्राफिक कमी असल्यामुळे डायरेक्ट देवाशी विदाऊट डिस्टर्बंस बोललं जात असावं. बरं नुसतं वाचन नाही तर ते अर्थही सांगायचे त्याचा. जे वाचायचे तेच अशुद्ध असायचं, अर्थ पोथीत नसलेला असायचा. कित्त्येकवेळा झोपेने विष्णूसारखे अर्धोन्मिलित नेत्रं झाल्यामुळे तेच पान परत वाचलं जायचं आणि त्यावर कुणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही कारण ते चुकीचं ऐकण्यापेक्षा झोपलेलं उत्तम म्हणून घरातलं निम्मं पब्लिक निद्रासमाधीत गेलेलं असायचं. आत्मानंद मिळण्यासाठी करणारे लोक कमी आणि मी करतोय हे दाखवण्यासाठी करणारे जास्ती.
किर्तन ऐकताना एक आजी वाती करायच्या, अफाट स्पीड होता त्यांचा. काही मागच्या बाजूला आत्ता करतोय त्यापेक्षा अमुक एक कसा चांगला करतो यावर बोलायच्या, काही बाहेर उभे राहून ऐकणार, आत बसण्याचा आग्रह केला कुणी, तरी ऐकणार नाही त्याचं कारण कधीही सटकायला बरं पडतं, मधेच उठून गेल्याचा वाईटपणाही नाही. अखंड नामस्मरणात झोप आल्यावर वीणा खाली ठेऊन आडवे झालेले भक्तं मी पाहिलेत, चारला पहाटे उठून तोंड धुवून परत फ्रेश जप चालू. अट्टाहास का पण? जेवढं जमतंय तेवढंच करा की. मामा खाली मंदिरात झोपायचा. मी पण जायचो. शनिवारी जे भजन असायचं ते बाराच्या पुढे चालायचं. मधे टाईमप्लीज घेऊन रात्री चहा करायचा त्यांच्यापैकी कुणी एक आणि ते मस्तं चिलीम ओढायचे. तो दाट पांढरा धूर मला बघायला फार आवडायचा. एकदा गांजाला पैसे नव्हते तर एकानी कोळसे हलवायचा लांब चिमटा काढला, दक्षिणा पेटीतून पाचाची नोट काढली आणि एकाला धाडून दिला. मारुती दर शनिवारी फुकट ऐकतो म्हणजे काय, घेतले पाच रुपये तर कुठे बिघडलं, इतका शुद्ध विचार असणार. चोरी हा उद्देश असता तर त्यानी अजून नोटा काढल्या असत्या की, तो खरा भक्तं. मामा गाढ झोपायचा, चहा केला की त्याला उठवायचे, तो दोन विड्या ओढून चहा ढोसून परत घोरायला लागायचा. मारुती आणि तो दोघंही ब्रम्हचारी. कुठलीही करमणूक त्यांच्यासाठी नव्हती, इतके अलिप्त.
जपाचे, प्रदक्षिणेचे प्रकार तर बघत रहावेत. कुणी दोन्ही गालांवर 'याराना'मध्ये बच्चन 'कच्चा पापड, पक्का पापड' म्हणताना घेतो तसे आलटून पालटून हात घेऊन पुटपुटतात, कुणी घाईची लागल्यामुळे टमरेलासकट धावतो त्या स्पीडला प्रदक्षिणा घालतात, काही दिसेल त्या घंटीला वाजवून, कासवाला, नंदीला नमस्कार करून मगच पुढे येणार, साईड हिरोसारखे डाव्या उजव्या बाजूला जे देव, फोटो, मुर्त्या असतील त्यांच्या पायाला हात लावणार, नेमका त्यातला एखादा पापपुण्याचा हिशेब ठेवणारा असला तर नाराज नको व्हायला, सरकारी ऑफिसमध्ये आपण वेगळं काय करतो नाहीतरी. प्यून पासून सुरवात ते आतल्या केबिनपर्यंत, काहीजण वेळ घालवायला आल्यासारखे लांबून प्रदक्षिणा घालतात, देवाच्या मागे आले की लेन सोडून तिथे डोकं टेकवणार किंवा हात लाऊन परत हेवीच्या थर्ड लेनला जाणार, त्यात एखादा उसेन बोल्ट त्याला धडकतो पण कितीही तापट असला माणूस तरी तिथे शिव्या देत नाही, एवढंच. काहीजण पिशवी हाताला बांधून आणतात, त्यात माळ असते, जप गुप्तं असतो त्यांचा. हा विनोदी प्रकार मात्रं माझ्या बुद्धीबाहेरचा आहे. काहीजण एन्ट्रीलाच शंभो, मारुतीराया, रामा वगैरे जोरात खणखणीत हाक मारतात. उगाच देव दुसरीकडे बघण्यात दंग असेल तर मी आलोय हे सांगितलेलं बरं.  
काहीजण कोण कोण आहे उपस्थित, ओळखीचे कुणी आहेत का, प्रेक्षणीय काही आहे का म्हणजे प्रदक्षिणा वाढवायला असा सगळा हिशोब करून पुढे सरणार. तरी मी ब्लॉकबस्टर देवाकडे जातंच नाही. तिथे ती 'तबकं घ्या, चपला ठेवा दादा इथे'चा हल्ला, सुरक्षा यंत्रणेतून पास व्हायचं, त्या यू आकाराच्या रेलिंगमधून फिरत जायचं, सांगितलाय कुणी नसता व्याप. सारसबागेसमोर महालक्ष्मीच्या देवळात नवरात्रात अफाट गर्दी असते. आमचा एक दोस्तं फार आतुरतेने रोज जायचा. मला कळेना एवढी भक्ती लेव्हल वाढली कशानी. 'अरे ते रांगोळी काढतात ना बायका उकिडव्या बसून, मागून गो-या पाठी आणि इतर भाग फार मस्तं दिसतात आणि वाकून काढतात त्यामुळे पुढूनही काय काय दिसतं'. हे कारण मला नविनच होतं देवळात जाण्यासाठीचं. नारायणभाऊ तीर्थ आणि खोबरं द्यायला बसायचे तेंव्हा लोक समोर नोट किंवा रुपया टाकून दान वगळून उरलेली चिल्लर उचलायचे म्हणजे सगळी नोट जायची नाही. आईसक्रीम करता मी एकदाच कमी पडत होते म्हणून चार आणे टाकून आठ आणे उचलून आणले होते. आले परत की टाकलेले पेटीत. ओव्हरड्राफ्ट म्हणतात त्याला हे नंतर समजलं.
लोक देवळात पावत्या घेतात दानाच्या, अभिषेकाच्या (प्रसाद घरपोच आला नाही बर्का मागच्या वेळेला पोस्टानी). ज्यानी दिलंय त्यानी कधी हिशोब ठेवला नाही आणि त्याचेच त्याला परत देताना पावती घेता? बरं आपली पोन्झी स्कीम असते. एक दिला की पटीत हवं असतं. एक बरंय, देवळं अजून रेडी रेकनर काढत नाहीयेत, नाहीतर बढती, अचानक धनलाभ, चांगली (म्हणजे देखणी, गोरी, एकुलती एक, कमावती) बायको, परीक्षा पास, कुणापेक्षा तरी जास्ती हवंय, घर अशा प्राईम मागण्यांसाठी दर ठरले असते. परवाच कुठेतरी वाचलं, 'देवाच्या समोरची ती दानपेटी काढून टाका, तुम्हांला आत जाताना अडवायला कुणी नसेल'. अब्जात संपत्ती असणारे 'देव' पाहिले की हसू येतं. ज्याला कुणी पाहिला नाही त्याला खूष करण्याकरता माणसं वेडी झालीयेत. देव आपणच तयार केला आणि आपणच त्याचे नियम केलेत. ओमपुरीसारखा देवीचे व्रण असलेला देव मिळणार नाही तुम्हांला. सगळे देव कसे चिकणे, बायकीपणाकडे झुकणारे चेहरे आणि खाली बलदंड शरीरयष्टी, अत्यंत सुरेख डोळे, लालचुटुक जिवणी आणि कमनीय, गो-यापान देव्या असतात. राक्षस काळाकुट्ट, कुरूप आणि अवाढव्य असतो हे गोष्टीतून, सिनेमातून अगदी बालनाट्यातूनसुद्धा सांगतात. म्हणून फेअर एन लव्हली खपतंय कारण ते मनावर ठसलंय आपल्या.  
देव कसा मित्रासारखा हवा. ब-याच दिवसात भेट होवो न होवो, दोस्त रुसत नाही. त्याला आपल्याकडून काही अपेक्षा नसते, तो आपलं ऐकून घेतो. अमूक एक केलं नाहीतर तो रागावतो हे कसं काय? सगळे मार्ग संपतात आणि अडचणी दूर होत नाहीत त्यावेळी जी जागा उरते ती देव. आपण त्याला पार खालच्या पातळीला आणलाय. पैसे, सोनं नाणं, पशुबळी घेऊन काम करणारा एजंट असतो, देव कसा असेल? आपली पातळी जशी घसरत जाते तशी देवाची पण आपण खाली आणतो असं मला वाटतं. आपल्याला सोयीस्कर ते आपण एरवीही करतोच की. कुणीतरी पाठीशी आहे याने मानसिक ताकद येते, हुरूप येतो. परीक्षेला जाताना देवाला नमस्कार करण्यामागे तोच हेतू असतो.कुणापुढे तरी आपण खुजे आहोत, नतमस्तक होतो याची जाणीव रहावी म्हणून त्याच्या देवळात जायचं असतं. जर तो खरंच आहे आणि त्यानीच सगळं घडवलंय तर मग त्यानी दिलेलंच त्याला देऊन अजून पदरात पाडून घेण्यात काय अर्थ आहे. जो एवढं देऊ शकतो, त्याला तुमच्या देण्यानी काय फरक पडणार आहे? एकूणच 'अजून हवं' यापोटी मागणं संपत नाही.    

सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी शब्दांकन केलेलं 'मनश्री' वाचल्यावर मला जाणवलं. "देवाकडे काय काय मागावं हेच अजून आपल्याला कळलेलं नाही तिथे त्याचे आभार मानायचे वगैरे भानगडीत आपण पडतच नाही. मनश्री सोमण, सांगलीची वल्लरी करमरकर या लोकांचं समजलं, वाचलं की आपल्या देवाकडच्या मागण्यांची लाज वाटते. धडधाकट शरीर दिलंय याचे आभार कधी मानणार आपणनुसतं आपल्याला नाही तर आपल्या प्रियजनांना पण. पुस्तक वाचून रडू येईल, चार जणांना सांगू, त्यांच्या दु:खाची, कष्टाची, कल्पना येईल पण जो माणूस या दिव्यातून गेला त्याच काय? जिद्द आपोआप येते की लादली जाते? मन होतं तयार की करावं लागतं? देवाचा राग त्यांनी केला तर काय चूक आहे? आपण मात्रं साधे आभार सुद्धा मानत नाही". तेंव्हा मी त्याला सांगितलं होतं, 'देवा, एकवेळ पैसा देऊ नकोस, मान मरातब नको, गोरा रंग नको, देखणेपण नको, दीर्घायुष्य नको पण या पुढे निदान प्रत्येकाला फक्त धडधाकट शरीर तरी दे रे. तुला यात काही आनंद मिळत नसणार हे माहित आहे. दुस-याच्या दु:खात आनंद मानायला लागलास तर मग तुझ्यात आणि आमच्यात फरक तो काय? त्यामुळे लई नाही मागणं. बघ काही जमतंय का'. 

श्रद्धा भाबडी असते, तिला हेतू चिकटला की त्याची अंधश्रद्धा होते. त्यामुळे तो आहे ही माझी श्रद्धा आहे पण मी देवळात गेलो नाही तर रुसेल ही अंधश्रद्धा आहे माझ्या दृष्टीने. आम्ही दोघं एकमेकांना अजिबात त्रास देत नाही. त्याच्याकडे मी काहीही माझ्यासाठी मागत नाही, उलट काही चांगलं घडलं तर त्याची कृपा म्हणतो. जर असेल तो आणि झाली भेट तर विचारेल तो मला, 'काय रे भोसडीच्या, दिसला नाहीस कधी देवळात तो'. काय उत्तर द्यायचं ते बघू तेंव्हाचं तेंव्हा.  

जयंत विद्वांस