Tuesday 7 June 2016

नमूने (४)…

काही माणसं इथे धाडण्याआधी त्यांच्यातला विशिष्ठ अवगुण चेक करून पाठवायची सिस्टीम असावी वर, काही उगाच न्यून राहिलं तर विचित्रं दिसेल म्हणून किंवा उगाच आपल्यावर यायला नको म्हणून थोडा अंश वाढवत असेल तिथला डिसप्याचचा (देव) माणूस आणि मग रवाना करत असावा. भोगलेले वाईट प्रसंग, कटू आठवणी, आधीच्या ओढग्रस्तीची परिस्थिती या वा इतर कारणांमुळे आलेला कंजूसपणा मी समजू शकतो. काही जातीत तो अंगभूत असतो. खरंतर पैसा, वेळ ही उधळायची गोष्टं नाही पण आपण दोन्ही उद्याचा विचार न करता उधळत असतो आणि उतारवयात हतबल होतो. काटकसर आणि उधळेपण ही दोन्ही टोकं आजूबाजूला दिसतात. पण अती काटकसर म्हणजे कंजूसपणा. काटकसरच्या नावाखाली जगण्याला कसर लागल्यासारखे लोक वागतात.

माझ्या पाहण्यातला हा नमुना विलक्षण आहे. सतत शेजा-यांवर लक्ष ठेवणे, त्यांनी काय नविन आणलं (आणलं असल्यास कुठून, केवढ्याला, आपल्या पेक्षा स्वस्तं की महाग, रोख की कर्ज काढून हे पोटउद्योग), त्यांच्यात भांडणं, वाद चालू आहेत का?, कर्ज आहे का, असल्यास किती, त्यांच्या मुलामुलींच्या काही भानगडी चालू आहेत का (असल्यास त्याचे पाठपुरावे, पुरावा जमा करणे, चाचपणी करून अधिक माहिती मिळवणे, पसरवणे हे पोटउद्योग), लोकांचे पगार किती, त्यांनी शर्ट जरी नवीन घातला की 'आज काय वाढदिवस का?, तुमचं काय बाबा भारी काम आहे', बाहेर निघताना सापडला कुणी सहकुटुंब तर 'कुठे? गावाला का? कसे जाणार, कधी परत? अशा चौकश्या. स्वत: जगप्रदक्षिणा करून आला तरी कळणार नाही.रक्तात असावं लागतं ते. कदाचित हे सगळं अतिशयोक्त वाटेल पण पुढे जे सांगणार आहे ते खोटं वाटण्याची जास्ती शक्यता आहे.

माणूस खाऊन पिऊन सुखी आहे. जमिनीवरचं ग्राउंड प्लस वन घर आहे. खालच्या दोन्ही रूम भाड्यानी आहेत. एक फ्ल्याट आहे तो भाड्यानी आहे. घरात नवरा बायको मिळून येणारा पगार लाखाच्या आसपास आहे, घराचे हप्ते केवळ आयकर भरायला नको म्हणून आहेत, पन्नासेक हजाराची एफडी दरमहा करत असावेत. येणा-या भाड्यावर घर चालतंय. गावाकडून ज्वारी आणि इतर धान्यं येतंय. आईला पेंशन आहे, त्याच पैशातून ती शेती बघते म्हणजे तिकडेही खर्च नाही. लग्नाच्या जोड्या वरूनच जमतात हे मात्रं इथे अचूक आहे अगदी. बायको थोडा तरी खर्च करू शकेल पण हा मात्रं खरा चिकट आहे. बायकोला एलटीए असतानाही इतर खर्च नको म्हणून साताठ वर्ष हा कुठेही गेला नव्हता, बायको जातायेता गरम भांड्यातला पॉपकॉर्न लाजेल अशा स्पीडनी त्याला बोलत असते त्यावरून विषय निघाला की. त्याच्यासारखं वागायला आपल्याला या जन्मी शक्यं नाही. मी कायम त्याच्याकडे एक मानसिक रुग्ण म्हणूनच बघत आलोय.

त्यानी पेरू, नारळ, आंबा, डाळींब, पपई अशी प्रत्येकी एक झाडं लावलीयेत. फळ धरली की कामावर जायच्या आधी तो ती मोजतो (हो, हे खरंय) आणि संध्याकाळी आल्यावर परत मोजतो. आंबा मोठा झाल्यामुळे त्याला किती दु:खं होत असेल आणि त्यानी बोराचं लावलं नाही याबद्दल मला होणारा आनंद एकाच दर्जाचे किंवा मापाचे आहेत. बरं समजा दिसला एखादा पेरू कमी तर कुणाला धरणार आहे. चोरी केली तर माणूस एक नेत नाही. भाडेकरूला सबमिटर लावलाय. बरं रीडिंग x सहा रुपये असा पठाणी रेट आहे. म्हणजे त्यानी जास्ती वापरलं तरी याचा फायदाच आहे. तरीही हा संध्याकाळी आल्यावर मेन आणी सबमीटरचं रिडिंग उड्या मारून चेक करतो. किती वाढत असेल असं चोवीस तासात? मेंदू फालतू आकडे लक्षात ठेवण्यात किती खर्ची टाकावा म्हणतो माणसानी. मी कुठल्याही लहान मुलाला माझ्या गाडीवरून चक्कर मारतो. त्यानी नविन टू व्हिलर घेतली होती. ते चौघं कायम बायकोच्या स्कुटीवरूनच बाहेर जायचे पण. मला मोठं आश्चर्य वाटायचं. तिचा जीव किती, माणसं किती.

त्याच्या बायकोनी सांगितलं, त्यांची गाडी खराब होते म्हणून ते नेत नाहीत ती गाडी. लोकाच्या सोडा, स्वत:च्या मुलाला त्यानी चक्कर मारलेली नाही त्या गाडीवरून. टाकीजवळचा भाग खराब होतो, मुलं काही न काही हातात घेऊन आपटतात त्यामुळे गाडी खराब होते. त्याच्या आईला डॉक्टरनी भांडभर गार दूध प्यायला सांगितलं होतं काही दिवस. तुझ्या आजारामुळे माझा खर्च वाढतोय म्हणून तो तिच्याकडून अर्ध्या लिटरचे पैसे घ्यायचा. एका भांड्यात अर्धा लिटर बसतं का? आणि जीभ कशी रेटते हे पैसे मागायला? त्याचा भाऊ पलीकडेच सोसायटीत रहातो. तो जरा मागे आहे आर्थिक बाबतीत. आई त्याच्याकडे जाऊन आली की हा भावाला एकटा गाठून चौकशी करतो आईनी काही पैसे दिले का? मग आईला चक्कर मारायला घेऊन जातो, तिच्याकडून माहिती काढतो, नसतील दिले तर हा दु:खी होतो कारण तेवढेच मला पण हवेत हे कसं बोलणार? वर्षाच्या पेंशनचा हिशोब घेतो तो, कुठे खर्च केले ते. त्याचा पुतण्या आलेला दिवाळीच्या दिवशी. तो निघाल्यावर 'थांब रे, फटाके वाजवून जा' म्हणत त्याला थांबवला. लहानच तो, थांबला. लवंगीच्या दोन तीन माळा, प्रत्येकी एक फुलबाजी पाकीट, झाड, चक्रं या कर्णानी त्याला भेट दिलं. हसू फुटलं मला. देऊ नको ना, ऐपत नसती तर गोष्टं वेगळी पण असून द्यायला पण दानत लागते, हेच खरं.

तरी त्याला व्यसन काही नाही, लागूच शकत नाही, तिथे पैसे खर्च होतात. पण ही माणसं पैसा मात्रं चांगला राखून असतात. पण उपभोग कधी घेणार? वरून मिसकॉल आला की संपलं सगळं. उद्या त्यानी मृत्युपत्र जरी करून ठेवलं ना तरी अनेकदा तो ते बदलेल याची खात्री आहे. अंत्यविधीच्या खर्चाची तजवीज पण लोक करतात म्हणे त्यात. तो बंबफोड/चंदन/डिझेल/विद्युतदाहिनी असे ऑप्शन ठेवेल आणि पुढे लिहील कुणी तयार असल्यास चंदन चालेल अन्यथा या पैशात जमेल त्या प्रकारे विधी उरकावा. अवघड आहे. सूड घ्यायला परवा कुणीतरी तुमच्या झाडावरून दोन पपया घेऊन पळून जाताना दिसलं एवढं म्हणायचं म्हणजे तो दोन दिवस हैराण होईल, आपण चकटफू गंमतीचा आनंद घ्यायचा, वर चौकशी करायची आठवडाभर, 'कळलं का कुणी नेल्या ते?' :P  

जयंत विद्वांस    

No comments:

Post a Comment