मला
बाळदमा होता दहाव्या वर्षापर्यंत साधारण. मी म्हणालो बोलताबोलता एकदा, मला
आता दम लागत नाही. त्या पटकन म्हणाल्या, 'विषयसुद्धा काढू नकोस, बरा झालाय
ना, मग मनातसुद्धा आणू नकोस'. त्यांना दमा होता. थंडीचे चार महिने त्या
रात्री कॉटवर बसून असायच्या. कफ निघायचा नाही, दम लागायचा, आडवं झालं की
श्वास थांबल्यासारखं व्हायचं म्हणून खोकत किंवा श्वास गोळा करत रात्रंभर
बसून रहायच्या. अशी अनेक वर्ष त्यांनी काढली होती. कुठले भोग असतात माहित
नाही पण अशा माणसांना देव पुरवणी आयुष्यं लिहित असावा कपाळावर. आयुष्याचा
प्रवास सिंगल मीटर गेज लाईनवरच्या पॅसेंजरसारखा हळू आणि न संपणारा. न
पाहिलेल्या देवाच्या आशेवर आणि या जन्मातलं चांगुलपण पुढच्या जन्मात कामाला
येईल असल्या न पटणा-या विचारांवर अनेक आयुष्यं जगत राहिली फक्तं त्या
काळी. काहीच अनुकूल घडत नसताना कधीतरी चांगलं होईल, घडेल ही आशा जगायला भाग
पाडत असावी.
माझी आर्या किंवा कुठलीही लहान मुलं हल्ली
दूध पिताना कटकट करतात, आईबापांवर मेहेरबानी करतात. एक शेवटचा घोट त्यांनी
शिल्लक ठेवायचा आणि आपण आरडाओरडा केला की राग आल्यासारखं दाखवून तो
नाईलाजानी त्यांनी प्यायचा हा ड्रामा बरीच वर्ष चालतो. चूक त्यांची नाही,
त्यांनी कित्त्येक गोष्टी पाहिलेल्या नाहीत म्हणून आपण त्या सांगायला
हव्यात. आता पिशवीतून दूध येतं. तेंव्हा सकाळी किंवा दुपारी केंद्रावर जाऊन
बाटल्या आणाव्या लागायच्या. त्यांची मुलं त्याची लाईन टाकायची. व्याप होता
तो. लोक बाटल्या धुवून न देता तसेच द्यायचे. दुस-याची बोलणी घेणा-याला
खावी लागायची. एकानीच अनेक घेतल्या की मागचं पब्लिक आरडा ओरड करतं, वेळ
जातो म्हणून दोघांनी रांगेत उभं राहून त्या बाटल्या घ्यायच्या. त्या सगळ्या
बाटल्या घरी आणायच्या. त्याच्यावर अतिशय नाजूक सील असायचं, एक निळ्या आणि
एक तांबड्या रंगाचं असायचं. ती जमवून त्याचेही खेळ व्हायचे त्याबद्दल परत
कधीतरी. तर त्या बाटल्यांना वरच्या बाजूल रिंग असायची ज्यावर ते सील फीट
बसायचं.
स्किलफुली ते सील जरा काढायचं आणि त्या
साधारण तीन एमेम उंच आणि एक इंची डायमीटर रिंग मध्ये जेवढं दूध असेल तेवढं
पातेल्यात घ्यायचं, सील परत बसवायचं म्हणजे रिंगच्या भागात दूध नाही हे
कळायचं नाही. 'जळो जिणे लाजिरवाणे' असं वाटतं अगदी, आठवलं की. ते वापरून
सगळ्यांना सकाळचा चहा मिळायचा. कुणी याला चोरी म्हणत असेल तर असा विचार
करणं सुद्धा पाप आहे मी म्हणेन. कसलं आलंय पाप नी पुण्यं. आता ती पिढी हयात
नाही, संपत आली पण त्यांना रात्री शांत झोप लागायची, हसतमुख असायचे,
संसार झाले, मुलबाळं रांगेला लागली पण त्यांच्या आयुष्यात कायम उन्हात उभे
राहिल्यामुळे सुखाचा कवडसा क्वचितच पडला. माणसानी स्वत:चे किंवा दुस-याचे
असतील तरी आधीचे दिवस विसरू नयेत. सतत त्याच आठवणी काढून टिपंही गाळू नयेत
पण आपण मस्तवालपणे वागत असू तर मात्रं पाय जमिनीवर रहाण्यासाठी कुठेतरी
आयुष्याच्या पुस्तकाची आरंभाची जीर्ण पानं परत वाचावीत.
जेंव्हा
मी ओरडतो आर्याला की 'एक घोट आहे अजून, टाकायचा नाही, पी सगळं' तेंव्हा
माझ्या डोक्यात त्या दुधाची किंमत किती, हे नसतं तर डोळ्यासमोर **ची आई
असते. त्यांना कळत नसेल तर 'खाऊन माजा पण टाकून माजू नका' हे आपणच सांगायला
पाहिजे, सांगायलाच पाहिजे.
जयंत विद्वांस
No comments:
Post a Comment