लल्यास,
शैलेंद्र
विषयी काय बोलू. म्हातारी अनुभवी माणसं जशी साध्या बोलण्यातून आयुष्याचं
सार सांगून जातात तसं शैलेंद्र लिहितो. मला तो, खेबुडकर आणि गदिमांच्यात
एक कायम साम्य वाटत आलंय, साधे शब्द हात जोडून पुढे उभे असल्यासारखे असायचे
यांच्या. चपखल बसतील असे बोजड शब्दं कुणालाही सापडतील पण आपलंसं करणारे
साधे शब्दं लिहिणं अवघड आहे. खुर्चीच्या कडेला बसलेल्या लहान मुलीच्या
डोक्यावर हात फिरवत प्रार्थना म्हणणारा अशोक बाबू आणि इकडे घुसमटलेली
बंडखोर गौरी. पहिल्या कडव्यात नूतनबद्दल वाटणारी काळजी किती सुंदर मांडलीये
त्यानी. अभी बच्ची है, नादान है वो, हे वेगळं सांगावं लागत नाही. पंख है
कोमल, आंख है धुंदली आणि जायचय हा भवसागर पार करून. मधेच गळाठली तर? ही
काळजी आहे त्याला. बाप होणं सोपं असतं, पालक होणं अवघड आहे. चांगल्या
वाईटाची पारख नसलेलं, विरुद्ध जाण्याची इर्षा असणारं, बंडखोर वय असतं, एक
मुरलेलं लोणचं, एक उमलू पहात असलेली कळी. एक संयम, एक उत्साह, उतावीळपणा.
जो तो स्वत:च्या मते योग्यं. बाप रागावतो, पालक समजावतो. त्यानी जास्ती
पावसाळे काढलेले असतात, त्याला लांबचं वादळ दिसत असतं त्यामुळे त्याचा जीव
तुटत असतो. मी सांगून झालं, आता तू सांग म्हणतोय तो परमेश्वराला, 'अब तू ही
इसे समझा, राह भुले थे कहांसे हम'.
तारुण्यात जगण्याचा
वेग जास्ती असतो, ब्रेक नसलेली, वंगण घातलेली, न कुरकुरणारी गाडी असते.
सगळ्यांचेच अपघात होतील असं नाही पण रस्ता चुकण्याची, क्वचित संपण्याचीही
शक्यता असते. दुर्लक्ष केलं तर मृत्यू कदाचित येणार नाही या भ्रमात जगत
असतो आपण. 'इधर झूमके गाए जिंदगी, उधर है मौत खडी' या ओळीनी डोळे खाडकन
उघडतात. जिंदगी पे मौत का हक है, जब मर्जी बुला लेगी. कुठपर्यंत? याचं
उत्तर माहित नाही म्हणून जगण्यात मजा आहे. प्रत्येकाला मरणवर्ष माहित असतं
तर शेवटची वर्ष भीतीच्या सावटाखाली जगले असते सगळे, इन्शुरन्स प्रकार
अस्तित्वात आला नसता, इस्टेटीकरता खून करायची गरज पडली नसती. कुठून आलो
माहित नाही, कुठे जाणार माहित नाही. सगळाच कल्पनाविलास. आयुष्यं म्हणजे सहल
असते पण आपण तंबू ठोकतो, जमवाजमव करतो, माणसं जोडतो. ठसा नाही उमटवता आला
प्रत्येकाला तरी छाप सोडून जायला हवी काहीतरी. परत एकदा शैलेंद्र किती
सुंदर म्हणून गेलाय बघ 'दो बिघा जमीन' मधे, 'अपनी कहानी छोड जा, कुछ तो
निशानी छोड जा, कौन कहे इस और तू फिर आये ना आए'. शहर काय आयुष्यं काय,
सोडताना नाव सोडून जाता येईल असं काहीतरी करायला हवं.
किशोरचा
आवाज जसा काही गाण्यांना वेगळा लागतो तसा मन्नाडेचा पण लागत असावा. हे,
लागा चुनरीमे दाग, ए भाय..च्या शेवटच्या ओळी, यारी है इमान मेरा, ऐ मेरे
प्यारे वतन, ऐ मेरी जोहराजबी, 'प्रहार'मधलं 'हमारी ही मुठ्ठीमे आकाश सारा'
ही आणि अशी अनेक गाणी आहेत. प्रार्थनेचा दर्जा दिला जावा अशी गाणी म्हणजे
'ऐ मालिक तेरे बंदे हम' (पाकिस्तानात हे प्रार्थना म्हणून म्हटलं जातं)
आणि 'तू प्यार का सागर है'. तत्वज्ञान रुक्ष असतं पण गाण्यातून आलं की सोपं
वाटतं. शैलेंद्र काय या गाण्यातले सगळेच 'जाना है उसपार' म्हणायच्या
पलीकडे गेले. उसपार काय आहे ते माहित नाही, जे गेलेत ते सांगत नाहीत.
म्हटलं ना सगळा कल्पनाविलास, तोपर्यंत इसपार आहे ते बघून घेऊ, तिकडचं तिकडे
गेल्यावर.
(सीमा, १९५५, शैलेंद्र, शंकर जयकिशन, मन्ना डे)
No comments:
Post a Comment