Saturday 24 January 2015

वेंधळा…

साल एक्याण्णव. तीच ती मसाला डोसा आणि सवाई पोस्ट मधली. डेक्कनला भेटूयात म्हणाली. तेंव्हा लायसन काढलेलं नव्हतं. वडिलांची लुना होती, ती किती वजन खेचणार त्यामुळे तिला गाडीवरून फिरवायच्या भानगडीत मी पडायचो नाही. मी फेदरवेट होतो पण ती गुटगुटीत होती. अर्थात तेंव्हा सहवास मिळतोय याचाच आनंद इतका होता की गाडीवरून कुठे जात नाही याची खंत वगैरे वाटायची नाही. डेक्कन थिएटरच्या बाजूला जे रोड पार्किंग आहे तिथे गाडी लावायची आणि चालत जेएम रोडला फिरायचो आम्ही. 

तर त्यादिवशी गाडी लावली आणि ती आल्यावर निघालो, फिरून झालं मग पूनमला गेलो नेहमीप्रमाणे, तिथे तानाजी वेटर आमच्या ओळखीचा होता. कितीही तास बसलं तरी कटकट वगैरे करायचा नाही. ती बसनी यायची आणि मग जाताना मी तिला घराच्या अलीकडे सोडायचो. तर आम्ही लुना शोधायला सुरवात केली. गाडी गायब. एक तर तिथे पार्किंग कायम फुल्ल असायचं. कुणीतरी चावटपणा करून गाडी हलवली का ते पण बघून झालं. इथे माझ्या अंगाला घाम सुटायची पाळी आलेली. गाडी चोरीला गेली म्हणून पुढची कम्प्लेंटची सगळी दिव्यं करावी लागणार त्याचं टेन्शन आलेलं. एक तर घरी फोन पण नव्हता. माझ्याकडे लायसन नाही. म्हणजे आता घरी जावून बाबांना स्टोरी सांगून रिक्षेनी त्यांना कागदपत्रं, लायसन घेऊन डेक्कन पोलिस चौकीला यावं लागणार, मग कम्प्लेंट, हे राम. परत उद्यापासून ते कामावर कसे जाणार ही चिंता. 

माझे तीनेक टाके उसवल्याचा इफेक्ट चेह-यावर आला असणार, ती म्हणाली 'आपण एक राउंड मारून बघुयात का? कुणीतरी मुद्दाम दुसरीकडे लावली असेल, लुनाचं लॉक काय कुणीही काढतं'. या वाक्यानी माझा अजून एक टाका उसवला हे तिच्या गावीही नव्हतं. आता दाभण नाही चालणार, मशिनवरच फाटलेली शिवावी लागणार असं वाटू लागलं. तिच्या (?) समाधानासाठी आम्ही गरवारे ओव्हरब्रीज वरून गुडलककडे निघालो. हा राउंड निरर्थक आहे हे मला माहित होतं. तरीपण निघालो. गुडलक कॉर्नरवरून परत डेक्कन थिएटरकडे. बर तिथे मधे पार्किंग नव्हतं. मग ती म्हणाली, रोड क्रॉस करून पलीकडे चेक करू नाही मिळाली तर मग कम्प्लेंट एवढाच मार्ग. 

क्रॉस करतानाच मला भरून आलं. गाडी समोर होती. ती म्हणाली, 'ती बघ गाडी समोर आहे. "कुणी आणली असेल बरं इथे?" असं म्हणालास तर इथेच बुक्का घालीन. मला खात्री होती तू मुर्खासारखी दुसरीकडे लावली असणार.' तर झालं असं होतं की गुडलकला चौकात पोलिस उभा असल्याने मी दिसेल तिथे गाडी लावून चालत गेलेलो, ते तिच्या बरोबर गप्पांमधे रमल्यामुळे विसरलो. त्यावेळी असं हरपून जायला व्हायचं खरं, आता विसरायला होतं. वेंधळेपणात एवढाच काय तो फरक.

जयंत विद्वांस        

Saturday 10 January 2015

लल्याची पत्रं (१९) ..... नाच रे मोरा .....

प्रिय लल्यास,

तुला 'नाच रे मोरा' ऐकलयेस का? हा प्रश्नं विचारून मी माझा मूर्खपणा सिद्ध करणार नाही. काऊ चिऊची गोष्टं, इथे इथे बस रे काऊ, आईचं पत्रं हरवलं, लपाछपी, स्ट्याचू आणि 'नाच रे मोरा' याशिवाय आपल्या  बालपणाच्या सुरस कथा पूर्ण नाही होऊ शकत. त्रेपन्न सालचं गाणं आहे. एकसष्ठी झाली त्याची. खूप लहानपणी पाहिलेला 'देवबाप्पा' मी 'अलका'ला. विवेक, चित्रा आणि मेधा गुप्ते एवढी नावं आणि हे गाणं एवढंच लक्षात आहे. माझ्या माहितीत तरी हा चित्रपट सीडी, क्यासेट स्वरुपात उपलब्ध नाही, थिएटरलाही लागत नाही. पुण्यात नागनाथ पारापाशी एकजण प्रायव्हेट शो करतो पंधराशे रुपयात अशी ऐकीव माहिती आहे. दिग्दर्शक राम गबाले, विवेक, गदिमा, पुलं सगळे काळाच्या पडद्याआड गेले. मेधा गुप्ते बद्दल माहिती नाही, ती सुद्धा आजी/पणजी असेल आता. आशाताई आणि चित्रा नवाथे अजून आहेत.

या गाण्या एवढी व्हर्जन्स मी दुसऱ्या गाण्याची ऐकलेली नाहीत. लहान मुलांच्या क्यासेट, डीव्हीडीज, अनिमेटेड, इन्स्ट्रुमेंटल आणि असंख्य नविन शिकणा-या गायिका हे गाणं म्हणण्याची हौस भागवून घेतात. पण भोसलेबाईंच्या आवाजात पहिल्या 'नाच'ला जो आर्जव आहे तो कानात एवढा रुतून बसलाय ना की दुसरं कुणी म्हणू लागलं की त्याच्या गळ्यात तो लडीवाळपणा शोधण्याची वाईट सवय लागलीये. आजवर फार  सापडला नाही हा भाग वेगळा. आता रंगीत मोर दिसतो, नाचणा-या, सुंदर रंगीत कपडे घातलेल्या प-या दिसतात पण मेधा गुप्तेचा कृष्णधवल गोडवा आठवतोच.जमून येतात काही गोष्टी हेच खरं. विसुभाऊ बापट त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमात हे गाणं उलटं म्हणतात, मजा येते ऐकायला - 'चना रे रामो, च्याम्ब्याआ तनाव, चना रे रामो, चना…… म्हणून बघ एकदा संपूर्ण गाणं तसं, धमाल येते.   

बालहट्ट पुरवणं जेवढं अवघड असतं ना तेवढंच त्यांच्यासाठी, त्यांच्या वयाला शोभेल, त्यांचं वाटेल अशा भाषेत साधं, सहजसुंदर लिहिणं फार अवघड असतं असं मला वाटतं. आजकालच्या सिरियल्समधे हा हास्यास्पद प्रकार तुला बघायला मिळेल. एकतर ती मुलं वयापेक्षा जास्त किंमतीचे सुविचार बोलतात किंवा वयाला न शोभेल असं लाडं लाडं तरी बोलतात, एक मात्रं आहे अगदी समंजस वगैरे दिसतात ही पोरं किंवा वाटतात. खरंतर त्याच्यासाठी त्या वयात, भूमिकेत शिरणारा कवी/लेखक हवा. गदिमांबद्दल मी काय बोलावं? मनात मूल जपलेला माणूस (पुलंनी त्यांच्यावर लिहिलेलं वाच). 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान…. ' त्यांचंच. मला त्यांची ही दोन्ही गाणी जाम आवडतात.   

असो! जोपर्यंत मराठी/इंग्रजी बालवाड्यातून ग्यादरिंगमधे विविध गुणदर्शन कार्यक्रम जिवंत आहे, होईल तोपर्यंत त्यात 'नाच रे मोरा' वर पार्श्वभागावर खोटी मोरपिसं लावून ती चिमुकली देखणी पोरं डान्स करणारच आणि जोपर्यंत पुण्यात गणेशोत्सव चालू आहे, नातुबागेला लायटिंग करतील तोवर 'नाच रे मोरा' तिथे वाजणारच हे निश्चित (मग इतर भाषिक जबरा ऱ्हिदमची गाणी किती का वाजेनात). चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय. 

--जयंत विद्वांस
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...
झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...
थेंब थेंब तळयात नाचती रे टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ..... 
 
 
 

Saturday 3 January 2015

लोकमान्य - एक युगपुरुष.....

साल १९९८, स्थळ बांगलादेश, अंधार पडलेला, शेवटच्या दोन चेंडूत तीन धावा हव्या असताना सकलेनला फोर मारणारा हृषीकेश कानिटकर लक्षात राहतो पण आधी ३१४ चा पाठलाग करत तिथे पोचवणा-या सौरव गांगुलीच्या १२४ धावा विस्मरणात जातात तसंच झालं टिळकांच्या बाबतीत. १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९२० साली गेलेले टिळक आणि इतर नेते विस्मृतीत गेले. पिढी बदलल्यामुळे किंवा सोयीचं असेल म्हणून स्वातंत्र्याचा इतिहास फक्तं गांधी आणि नेहरू यांच्यावर केंद्रित झाला. 

चित्रपटाचं कठोर समीक्षण वगैरे करायच्या भानगडीत मी पडणार नाही पण थोडं न आवडलेलं पण आहे. खरंतर असे चित्रपट मी श्रद्धेनी, भाबडेपणानी बघतो. तर चित्रपट दोन समांतर पातळीवर चालतो, आजचा तरुण - चिन्मय मांडलेकर - टिळकांच्या भाषणाची ध्वनिफीत ऐकून भारावतो आणि आजच्या काळाची टिळकांच्या आयुष्याशी सांगड घालू पहातो. जी चित्रपटात फार परिणामकारक दिसत नाही. एका भाषणानी तो एवढा बदलतो, विचार करायला लागतो हे जरा खटकेबल आहे पण फार चर्चा करण्याएवढ नाही.

मुळात चित्रपटात टिळकांच्या आयुष्यातले मोजकेच प्रसंग आलेत. आगरकर टिळकांचे वाद, जहाल अग्रलेख टिळक सांगत आहेत, कोर्ट केसेस वगैरे भाग जास्ती असता तरी चाललं असतं, गणेशोत्सव, रंडचा खून, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, आगरकरांशी वाद तुकड्या  तुकड्यांनी समोर येतात, मधेच चालू काळाशी सांधा जुळवल्यामुळे आधीच्या प्रसंगाचा इफेक्ट कमी होतो. पूर्ण टिळक दाखवले असते अडीच तास तर ते जास्तं परिणामकारक झालं असतं असं माझं मत.

चित्रपटात जुना काळ मात्रं उत्तम उभा केलाय. वेशभूषा, कंदील, जुने वाडे, शनिवारवाडा, केसरी वाडा सुंदर दाखवलंय सगळं. टिळकांची दूरदृष्टी  केवढी अफाट होती याची साक्ष देणारी वाक्यं स्मितीत करतात. १८९७ ला कोकण रेल्वेचं स्वप्नं, नोकरीकरता नको तर ज्ञानाकरिता शिका, त्याचा वापर देशासाठी करा, स्वदेशी वापरा (आत्ताही तोच नारा चालू आहे अजून) असे विचार त्यांनी शंभर वर्षापूर्वी सांगितलेत, हे कळतं. 

सुबोध भावे हा मोठा नशीबवान माणूस आहे. 'अरे, हा तर बालगंधर्व' म्हणणारे टिळक आणि ज्याला म्हणाले तो 'बालगंधर्व', त्याला दोन्ही साकार करता आले. नशिबवान हा शब्दं फक्तं रोल मिळण्याच्या दृष्टीनी मी वापरलाय. सुबोध 'टिळकांचं' चालणं आणि भेदक डोळे मात्रं दृष्टं लागण्याजोगे. वयातले फरक देहबोलीतून फार सुंदर दाखवलेत त्यानी. 'सरकारचं डोकं…' आणि 'स्वराज्यं हा माझा….' ही सुप्रसिद्ध वाक्यं म्हणताना त्याचा लागलेला आवाज आणि ते पाणीदार डोळे पहात रहावेत. बेन किंग्जलेचा गांधी जितका सुरेख तितकाच आमचा सुबोध 'टिळक'  ही सरस. आयुष्याच्या संध्याकाळी मंडालेहून परत आल्यावर पुण्यात टिळक संध्याकाळच्या वेळी कंदील घेऊन उभे राहिलेल्या प्रचंड जनसमुदायाला दर्शन देतात तो शॉट गहिवर आणतो.

बाहेरच्या जगात मोडर्न असलेले प्रेक्षक थिएटरच्या अंधारात अजूनही टिळकांच्या एन्ट्रीला, रान्डच्या खुनाला, स्वराज्यं हा माझा…. या वाक्याला टाळ्या, शिट्ट्या वाजवतात आणि चित्रपट संपल्यावर उभे राहून हात जोडतात तेंव्हा जे वाटतं ते सांगता नाही येणार. न पाहिलेला, ज्यांच्याबद्दल काही मोजकेच प्रसंग माहित असलेला हा लोकमान्यं जाऊन आता चौ-याण्णव वर्ष झाली पण तरीही तो करारी, मिशाळ माणूस शेवटी काहीतरी कालवाकालव  करून गेला.


जयंत विद्वांस