Tuesday 17 May 2016

उद्योग (१)…

आडनावाच्या अपभ्रंशाला साजेसे उद्योग मी लहानपणापासून करत आलो आहे. त्याकरता अनंतवेळा मारहाण होऊनही अजून काहीही फरक पडलेला नाही. वय वाढल्यामुळे आता ते चुकून झालं असं म्हणता येतं एवढाच फायदा, बाकी नुकसान करण्याचं कार्य इमानेइतबारे चालू आहे. हात मोडून झालाय (माझाच), दुसरीत असताना स्टोव्हवरून नुकत्याच उतरवलेल्या पिठल्याच्या कढईत बसून झालंय. चार दिवस वाडियाला अर्धदिगंबरावस्थेत पालथं झोपावं लागलं होतं. मलम ब्रशनी लावावं लागलं होतं. तुझी का ** जळते असं कुणी म्हणू शकत नाही मला, आधीच बेक्ड आहे. बोलताना अवस्था अशी होती की 'बोलतोय बघ कसा तोंड वर करून' ही वस्तुस्थिती होती. ती सवय मला तेंव्हा पासून लागली असावी नाहीतर मी तसा मुखदुर्बळ माणूस आहे. तर असे अनंत विध्वंसक उद्योग करून मी आता सोबर झालो आहे. 

आईनी एकदा मोठ्या मेहनतीनी मोठ्ठ्या बरणीभर तूप साठवलं होतं. पुरणपोळी केलेली आणि ती घरात नव्हती. म्हटलं तूप थोडं पातळ करून घेउयात पोळीसाठी. ग्यास लावला, झाकण काढलं, वरती मानेपाशी बरणी धरली आणि होळीत ते ढुमकं जसं फिरवतात तसं बर्नरवर झोका दिल्यासारखं पातळ करत होतो तूप. काचेची क्वालीटी भंगार असणार. एका मिनिटात वरची थ्रेडची काचेची रिंग माझ्या हातात आणि मनसेच्या खळखट्याकसारखं टोलनाका फोडल्यासारखा आवाज करत सगळ्या ओट्यावर काचा, बर्नरवर तुपाचा अभिषेक, ग्यास गेला. त्या लहान वयात पण मी कामसू होतो. सगळं पुसून घेतलं, खुनाचा पुरावा गायब करतात तशी परिस्थिती अगदी. आई आली. मी चिडीचूप. ग्यास लावायला गेली कशाकरता तरी. बर्नरचं सर्दी झाल्यासारखं नाक चोंदलेलं, तो कशाला पेटतोय. बरं दुसरा पेटतोय त्यामुळे सिलेंडर हयात आहे. कुठल्याही गोष्टीत परकीय शक्तींना जसं जबाबदार धरतात त्याप्रमाणे संशयाची सुई आधी होकायंत्रासारखी कायम माझ्याकडे वळते. अत्यंत निष्पाप चेह-यानी मी फार अंगाशी येणार नाही इतपत सगळं सांगितलं पण अभिनय कमी पडला असावा. नाके फोडणा-यांना आत घेतल्यावर जशी चूक कळते तसंच झालं माझं. शब्दश: अंगाशी आलं. 

तेंव्हा दरवर्षी डिस्टेंपर द्यायचो आम्ही. बाबा जायचे त्या दुकानात नाना बहिरट म्हणून अत्यंत गरीब व्यक्तिमत्व होतं एक. बाबांच्या भाषेत तोंडात बोट घातलं तरी चावणार नाही, इतका गरीब. ते यायचे मदतीला. शनिवार सकाळची शाळा. लवकर सुटायची. 'नाना. मुलांना घेऊन येता का सायकलवरून?' 'हो. आणतो की'. नानांना बघून आम्हांला चालत जायला लागणार नाही याचा प्रचंड आनंद झाला. आनंद झाला की माणसाला सुचत नाही काय करायचं ते. मी पुढे, भाऊ मागे. तेंव्हा एवढी गर्दी नसायची रोडला. नाना बुलेट ट्रेनच्या स्पीडनी चालवायचे सायकल. मधे उतरा, कुणाशी बोला, जॉगिंग करत परत सायकल पकडा. प्रवास निरस वाटायला लागला मला. मोजून सहा सात चौकावर घर. पुढे बसलेलो मडगार्डवर पाय ठेऊन. चुकून स्यांडल लागला टायरला. मस्तं आवाज आला खर्रखर्र असा. दहाबारा वेळा ट्रायल घेतली. भारी वाटत होतं. वडिलांच्या गाडीला मागे आर्मिचर होता दिव्यासाठी तो असाच वाजायचा पण आवाज जरा कमी. म्हटलं जरा एकसारखा पाय धरला तर सलग आवाज येईल. अंदाज घेऊन मी टायरला पाय लावला. अर्धा मिनिट सलग तान झाली असेल. पुढे घात झाला, शनिवार जन्मवार असून घातवार बघा. 

सारसबागेच्या आधी पाय सटकला आणि चाकात गेला. अर्ध्यात स्वप्नं तुटावं तसं झालं सायकलचं. मी नाही जाणार पुढे, रागावलीये मी, असं म्हणत ती जागीच थांबली. नाना समरसॉल्ट मारून सायकलच्या पुढे, भाऊ मागे पडला, मी ऋणानुबंध असल्यासारखा साथ न सोडता स्पोक तुटलेल्या चाकात पाय घालून सायकलला कवटाळून पडलेलो. तुरळक पब्लिक धावलं. नानांना उपदेशपर डोस पाजून झाले. मूडदूस झाल्यावर पोट मोठं होतं फक्तं तसा उजव्या घोट्याजवळ फुगा आलेला. एकानी स्पोक पिळून दुस-यात गुंतवले. परत लफडं नको म्हणून आम्हांला दोघांना बसवून त्यांनी चालत घरी आणलं. त्यांची काहीही चूक नसताना त्यांनी माफक ऐकून घेतलं. रक्तचंदन, आंबेहळद यांचा फेसप्याक लावून झाला घोट्याला. कुठलाही काम करावं लागलं नाही रंगाचं. तसंही सांडलवंड जास्ती असल्यामुळे कमी नुकसान होईल अशीच कामं मला दिली जायची आधीपासून. 'मैं चूप रहूंगी'च्या मीनाकुमारी सारखं मी मौन धारण केलं आणि 'काय माहित कसं झालं पण पाय आत गेल्यावरच मला समजलं' या एका वाक्यावर मी ठाम राहिलो. मला डबलसीट घेऊन चाललेत हे स्वप्नं पडून नाना अर्धवट झोपेत दचकून उठायचे म्हणे. 

हुशारी जशी उपजत असते तसा वेंधळेपणाही उपजत असतो. सांडणं, फुटणं, तुटणं हे नक्षत्रगुण आहेत त्याला मी काय करू. काप-या आवाजाच्या तलतचं कौतुक होतं, तो हृदयाचे तुकडे करतो तर त्याचं कौतुक. इथे कप-या हातांनी वस्तू पडतात इतकाच फरक. कौतुकसुद्धा नशिबात लागतं. :P 

जयंत विद्वांस          

Monday 9 May 2016

फणस…

फणस…
 
आता पासष्ठीचे झालेत बाबा. पद्मनाभ दिक्षित हे त्यांचं खरं नाव. श्री.दुर्वास फणसे आम्ही ठेवलेलं. आता जरा निवळलेत. नाहीतर जमदग्नी, दुर्वास हे शांतीदूत माझे चुलत वगैरे काका म्हणून खपतील इतके ते भडक डोक्याचे होते. अजून आहेत असं आईचं म्हणणं. बाबा मोठे शिस्तप्रिय होते, आहेत. काय करतील ते वेळेत, काटेकोर, शिस्तीत. बेशिस्त दिसली की त्यांचं डोकं फिरलंच म्हणून समजायचं. सख्खी मुलगी असो नाहीतर अजून कुणी सगळ्यांना नियम एकंच. आईला एकदा मी म्हटलं होतं, 'कसे दिवस काढलेस ते तुझं तुला माहित'. आई म्हणाली होती, 'शिस्तीचा, नियमांचा, पथ्थ्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. मलाही झाला सुरवातीला. पण कसं आहे माहितीये का एकदा कळलं नं आपल्याला, या या गोष्टींचा राग येतो समोरच्या माणसाला, त्या करायच्याच कशाला आपण? बरं, ते सांगतात ते वाईट नाही, फायदाच आहे त्याचा. अर्थात जगाला शहाणं केलं नाहीतर जग बुडणार लवकरच हा स्वभावाचा भाग आहे त्यांच्या. त्याचा त्रास आपण करून कशाला घ्यायचा? आपण शक्यतोवर वाद होणार नाहीत ते बघावं'. मला काही तिचं बोटचेपे धोरण पटलं नाही पण मी वादही घातला नाही.

मी एकुलती एक मुलगी त्यांची. बाबा शिक्षक होते (शाळेतून मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाले म्हणून 'होते' म्हणायचं फक्तं). घरची परिस्थिती तालेवार होती, अजूनही आहे पण यांनी पत्रिकेत वरून येतानाच लिहून आणलं असेल ते शिक्षक होतील असं. प्रॉमिसरी नोट पण लिहून दिली असेल 'शिक्षक' म्हणूनच काम करेन अशी. 'अभ्यास करून माणूस मेला असं आलंय का पेपरात कधी? तुम्ही गेलात तर तुम्ही बाकी कशात नाही तरी यात तरी पहिले म्हणून नाव होईल, रेकॉर्ड होईल, जगलात तर हुशार व्हाल. दोन्हीकडून तुमचाच फायदा आहे, त्यामुळे मला कारणं सांगू नका' अशा शब्दात ते वासलात लावायचे कारणांची. बाबांची बोलणी खाल्लेली सगळी मुलं कायम वरच्या नंबरात पास झाली पण कुठेतरी कटुता शिल्लक राहिलंच असंच बाबा बोलायचे. दहावी झाल्यावर सुटलो एकदाचे असं प्रत्येकाचं मत होतं. मला वाटायचं हे सुटले पण माझं काय? अर्थात तो सगळा त्या वयातला खुळेपणा होता हे नंतर कळलं.

अर्थात मी काही सारखी नाही बोलणी खायचे पण महिन्यात एकदा तरी पूजा व्हायचीच माझीही. बाबांची काही वाक्यं ठरलेली होती. ती ऐकण्यापेक्षा अभ्यास केलेला बरा. 'दारोदार करवंट्या घेऊन भिका मागायच्या असतील तर देवाला पास कर म्हणून जो नारळ फोडताय तो नीट निम्म्यात फोडा, तो ऐकणार नाहीये दहा रुपयाच्या नारळात, पॉलीश पेपरचे पैसे मी देतो, एकदम गुळगुळीत करा करवंट्या आणि मागा भिका, तोंडाकडे बघून नाहीतर निदान देखण्या करवंटीकडे बघून तरी कुणी टाकेल काहीतरी'. 'हागस्तोवर खाता तसा अभ्यास का करत नाही ओ येईस्तोवर, अभ्यास केलात तर मेंदू फुटेल अशी भीती आहे का?' 'पाच आंब्यातले कुठलेही तीन खा म्हटलं तर ऐकता का, भिका-यासारखे पाचही खाल ना? मग तसेच पेपरात सगळे प्रश्नं सोडवा. 'कुठलेही तीन' हा तुमचा अपमान समजा परीक्षकांनी केलेला'. गाईड बघीतलं कुणाच्या हातात की त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जायची अगदी. 'मुलींकडे चोरून कसं बघायचं ते कसं स्वत:चं स्वत: शोधता, उत्तरं पण शोधता आली पाहिजेत तशी, परत गाईड दिसलं किंवा त्यातलं छापील उत्तर लिहिलं तर त्याची सुरनळी करेन आणि ***त घालेन'.   

पोराच्या समर्थनार्थ बोलणा-या आईबापाला पण ऐकावं लागायचं, 'मी शिकवण्या घेतो ते माझ्या संसाराला हातभार म्हणून नाही, त्यांची पोटं भरायला माझा पगार आणि इस्टेट पुरेशी आहे, तुमचे शंभर रुपडे आत्ता अंगावर फेकू शकतो, मस्ती म्हणून नाही, ऐपत आहे म्हणून, घरात कुणी गेलं असेल, पोर आजारी असेल तर यायचं नाही फक्तं शिकवणीला, दुसरी फालतू कारणं असतील तर आपला राजकुमार/कुमारी घरात मखरात ठेवा'. बाबांनी खूप जणांना फुकट शिकवलं पण कधीही त्याची वाच्यता केली नाही. ते एकदा एका उर्मट, पैशाचा माज असलेल्या पालकाला म्हणाले होते. 'मी पैसे घेतो ते नाममात्रं, फुकट दिलं की किंमत नसते म्हणून. इतकी वर्षे शिकवणीचे सगळे पैसे मी कर्व्यांच्या 'अनाथ हिंदू महिलाश्रमाला' देतोय. तुमच्या बायकोनी आत्तापर्यंत पेपरच्या जाहिरातीत जेवढं सोनं पाहिलं असेल तेवढं माझ्या तिजोरीत अस्ताव्यस्त पडलंय त्यामुळे पैशाचा रुबाब मला दाखवू नका, निघा.'

ताकद असूनही बाबांनी कुणावरच कधीही, कितीही राग आला तरी हात मात्रं उचलला नाही. लोकाची मुलं, त्यांना कशाला मारेन मी, माझ्या मुलीला कुणी फटकावलं तर मी त्याची मान मोडेन राग येउन असं त्यांचं त्याबाबतचं तर्कशास्त्रं होतं. त्यांच्या बोलण्याचाच मार जास्ती परिणामकारक होता. मी दहावी झाले. मला म्हणाले, 'तू म्हणशील त्या दिशेचा खर्च मी करू शकतो. तुला काय आवडतं ते तू ठरव. प्रत्येक मूल पहिलं येऊ शकत नाही, येऊही नये, किंमत रहाणार नाही. पण जे काय शिकशील ते साठ टक्के तुला येत असेल तर त्या साठ टक्क्यातलं शंभर टक्के ज्ञान तुला हवं, एवढं लक्षात ठेव. पैसे कमावण्यासाठी शिकायचं असेल तर माहिती मिळेल, ज्ञान नाही. स्वत:ला नविन काही कळावं, त्यात अजून काही भर घालता येईल का असं वाटलं पाहिजे शिकताना'. मी इंग्लिश मधून एम.ए.केलं. जर्मन शिकले. मी दुभाषी म्हणून काम करते. लहान वयात जगभर फिरले पण बाबांनी कधी तोंडावर कौतुक म्हणून केलं नाही. आईजवळ म्हणतात, 'कायच्या काय शिकली गं पोरगी, मला मागे टाकलंन तिनी'.

माझ्या लग्नात सुद्धा ते ढसाढसा वगैरे रडले नाहीत. थोडेसे पाणावलेत की काय अशी शंका येईल इतपत डोळे ओलसर होते. आम्ही दोघंही दुभाष्याचंच काम करतो. प्रेमविवाह माझा. मला म्हणाले होते, 'आम्ही जुळवला असता म्हणजेच तुझं भलं झालं असतं असं अजिबात नाही. आईबाप आयुष्याला पुरे पडत नाहीत. तुझा जोडीदार तू निवडलास यात राग नाही, फक्तं विचार करून निर्णय घे म्हणजे झालं. निर्णय चुकला असं वाटलं तर तो चुकीचा कसा आहे हे पटवून द्यावं लागेल, ही भातुकली नव्हे, मग मी तुझ्या पाठीशी आहे याची खात्री बाळग आणि निर्धास्तपणे लग्नं कर'. माझ्याकडे दिल्लीला ते फार येत नाहीत. आत्तापर्यंत दोनवेळा आलेत फक्तं चार वर्षात. मलाही फार जमत नाही सुट्ट्यांमुळे जायला वरचेवर. आता ते दोघंही थकलेत. आईशी बोलणं होतं दिवसाआड तरी, बाबांशी फार नाही. 'कशी आहेस, बाकी बरंय ना, जावई काय म्हणतात' यापुढे आमची गाडी सरकत नाही. 

आज सकाळची गोष्टं. परवा एक लग्नं आहे त्यासाठी मी काल रात्री आले उशिरा, दीड वाजला असेल. बाबांमुळे पाचच्या ठोक्याला उठायची सवय इतकी वर्ष अंगवळणी पडलीये, गजर होण्याची गरज लागत नाही. बाबाच आले होते मला घ्यायला एअरपोर्टला. दोन विमानं बदलून दमल्यामुळे हॉल मधेच झोपले आल्या आल्या सोफ्यावर. जाग आली म्हणून मोबाईल बघितला. उठणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला मग तशीच झोपले मुद्दाम डोळे मिटून. उगाच म्हटलं लवकर उठ्ण्यावरून लेक्चर नको. पण भलतंच घडलं. डोळ्यावर ऊन येऊ नये म्हणून बाबांनी पडदे सरकवले, आईला बघून तोंडावर बोट ठेवलं आणि दोघं किचनमध्ये गेले. मुद्दाम दरवाज्यापाशी जाऊन आड उभी राहिले. बोलूच देत म्हटलं उठण्यावरून, भांडतेच आज मुद्दाम. दोघं चहा पिता पिता बोलत होते. 

'अहो आठ वाजले, आत झोपायला सांगू का तिला?' 'झोपू दे गं, घरी उठतच असेल पाचाला, मी प्रत्येकाला शिस्त लावायचा प्रयत्नं केला तो त्याच्या आयुष्याला अर्थ यावा म्हणून, माझा अट्टाहास तुम्हांला जाचक वाटला असेलही पण नाईलाजाने असेल किंवा पटलं म्हणून असेल तुम्ही तसं वागलात. तुम्ही तसं वागला नसतात तर मला राग नसता आला, दु:खं वाटलं असतं. बाहेरचा कुणी म्हणू शकला असता, ' आधी घरातल्यांना लावा शिस्तं मग बाहेरची धुणी धुवा'. पण तशी वेळच आली नाही कधी तुमच्यामुळे. किती फरक आहे आपल्या दोघांच्या स्वभावात. तू स्पंजसारखी, सगळं टिपून घेणारी आणि मी नदीतल्या दगडासारखा, कितीही पाणी गेलं तरी कोरडा ठाक अगदी.  पण आज मलाही रडू आलं'. 'का ते?' 'आम्ही आलो तेंव्हा तू झोपली होतीस, सगळं सामान आत आणलं तिनीच आणि तिथेच झोपली सोफ्यावर लगेच. मी नेहमीप्रमाणे उठवणार होतो आणि सांगणार होतो, आत झोप म्हणून'. 


'पण तिचा तो माहेरी आल्याचा आनंदी चेहरा बघून मला भरून आलं. मी आतून शाल आणली आणि घातली तिला. थोपटलं जरा डोक्यावर तर झोपेत म्हणाली, 'बाबासारखं थोपटतोयेस तू' आणि माझा हात घट्ट धरला. आतापर्यंत कधी कुठल्या मायेच्या पाशात मी फार गुंतलो नाही पण काल हात सोडवून घेताना खूप कष्ट पडले बघ मला. समोरासमोर बोलणार नाही ती काही, पण किती लहानपणचं लक्षात आहे बघ तिच्या. दातात कण अडकावा तसं कुठे काय मेंदूत अडकून राहतं बघ. आज इतक्या वर्षांनतर तो स्पर्श तिच्या डोक्यात आहे.' आई हसत रडत होती आणि बाबा रडत हसत होते आणि मी दाराशी मुग्ध होऊन पहात होते. 

फणस. पिकल्यावर थोडा उकललाय, गळायच्या आत सगळे गरे काढून घ्यायला हवेत.      
   
जयंत विद्वांस


Wednesday 4 May 2016

रद्दी…


टीव्हीच्या बातम्या बघणं मी कधीच सोडलंय, पेपर वाचायची सवय अंगवळणी पडल्यामुळे तो वाचला जातोच पण हल्ली पेपर मी अतिशय विनोद बुद्धीनी वाचतो. वास्तविक पहाता वांझोटी चीड आणणा-या, हताश करणा-या, त्रास होणा-या बातम्याच जास्ती असतात पण तेच तेच वाचून सगळं बोथट झाल्यामुळे तशा बातम्या नसल्या तर चुकल्याचुकल्यासारखं होतं. जुनाच पेपर आजची तारीख टाकून छापला तरी चालेल अशी परिस्थिती आहे. अधूनमधून चांगल्या बातम्या मधल्या पानात, कोप-यात येतात कुठेतरी, वाचताना धक्का बसू नये म्हणून त्या तिथे छापत असावेत. भारताची स्वत:ची जीपीएस प्रणाली, अनेक देशांचे उपग्रह एकावेळी सोडले वगैरे क्षुल्लक बातम्या पण छापतात. माणसाला काय बोलू नये आणि कुठे बोलू नये एवढं कळलं पाहिजे असं म्हणतात. त्याच चालीवर निदान काय छापू नये आणि कितव्या पानावर छापू नये एवढं कळायला हवं. 'दाउद मधुमेहानी त्रस्तं' ही बातमी फ्रंट पेजवर कशी काय येऊ शकते? काय अपेक्षित आहे? औषधं पाठवावीत की डॉक्टर्स पाठवावेत की मेणबत्त्या लावून प्रार्थना करावी की घंटा बडवून (देवळातल्या) आवाहन करावं?


मला बातमी वाचली की कंसातलं स्वगत दिसतं. मल्ल्याचा खासदारकीचा राजीनामा त्याची सही नाही म्हणून फेटाळला (ती सही त्याची नसेल तर मग बँकेत केलेली कुठलीच सही त्याची नाही, त्याच्या नावावर कर्ज दाखवणे हे षड्यंत्र आहे - जेठमलानी, प्लीज नोट), ऑगस्टा हेलीकॉप्टर वरून काँग्रेस अडचणीत (हेरॉल्ड बोर्डावर यायला अवधी आहे, हे कधी येणार?), अमक्याला पुढच्या महिन्यात नक्की अटक होणार (इतकी वर्ष या यंत्रणा कुठे गायब होत्या? पुरावे अचानक सापडले का? समजा पाच वर्षानंतर सत्ताबदल झाला तर  हे चालू राहील का?), पुणे सुपरजायंट्सची वाट खडतर (शेतक-याच्या आयुष्याबद्दल कुठेही, कुणालाही चिंता नाहीये), १५ जुलै पर्यंत पाणी पुरणार नाही (गाळ काढला तर पाणीसाठा वाढू शकतो ही बातमी नेमेची येतो पावसाळा या धर्तीवर मी बालपणापासून ऐकत आलो आहे, तो कधी काढणार?), ट्रंपला उमेदवारी मिळून अध्यक्ष झाल्यास भारताला अवघड जाणार (आधी काय मोठा अमेरीकेनी आपल्याला मांडीवर बसवून घास भरवलाय), बलुचिस्तान स्वतंत्र करण्याची भारताला गळ (ही मागणी अशी बोंब मारून का होते? चिडीचूप काम दाखवता येत नाही का, इस्राइलसारखं), तीन वर्षाच्या मुलीवर अमानुष बलात्कार (सौदीतले कायदे कधी लागू होणार?), कीटकनाशक पिऊन शेतक-याची आत्महत्या (कोकणातला शेतकरी आत्महत्या का करत नाही? कर्जमाफी एवढा एकंच उपाय आहे का? तीच रक्कम वापरून धरण बांधता येत नाही का?), बिपाशाचं आणि तिच्या नव-याचंही तिसरं लग्नं (लिझ टेलर आणि इंद्राणीला मागे टाकणार ही), या आणि अशा अनंत बातम्या.

यात नेत्यांची, शंकराचार्यांची बेताल वक्तव्यं, धर्मावरून, जातीवरून होणा-या चर्चा, परस्परविरोधी बातम्या, फसवणुकीच्या फक्तं रक्कम आणि स्कीम बदललेल्या बातम्या, न्यूनगंड वाटेल असे घोटाळ्यांचे आकडे, आपण सोडून बाकीच्या देशात घडणा-या चांगल्या गोष्टी, महिनाभर चालू असलेली जंगलाला लागलेली आग, कुपनलिकेत पडून मेलेलं मूल, सीमेवरचा गोळीबार आणि त्यात किडामुंगीसारखे मरणारे आपले जवान, अशा अनेक त्रासदायक गोष्टींची भर असते. मग का वाचतो आपण पेपर? कारण आपल्याला पण ते व्यसन आहे, अंगवळणी पडलंय, फक्तं चांगल्या बातम्या आल्या तर आपल्याला अळणी वाटेल. उथळपणा आला, सवयीनी तो हवाहवासा वाटू लागला हा आपलाही दोष आहे. अग्रलेख वादग्रस्त असेल तर वाचला जातो किंवा त्यावर बोललं जातं. माधव गडकरी, तळवलकर यांसारखे लोक अस्तंगत झाले. अभ्यासपूर्ण, तटस्थ अग्रलेख दुर्मिळ झाले. एकूणच सगळं सवंग होत चाललंय.

आपल्या आयुष्यात पेपरच्या बातमीत नाव येणं शक्यं नाही. आता फक्तं प्रिपेड गृह्यसंस्कार सुरु झालंय का विचारणं तेवढं बाकी आहे. ती बातमी आपली आपण दिली तरी स्वत:ला वाचता येणार नाही म्हणून निदान आकर्षक ड्राफ्ट तरी देऊन ठेवावा असं वाटतंय, तारीख टाकतील ते लोक. त्याच त्याच बातम्या वाचून कंटाळलेल्या कुणाला तरी मधली पानं वाचावीशी वाटली आणि वाचून मनात स्वगत उमटलं तर ठीक नाहीतर दुस-या दिवशी रद्दी आहेच.

जयंत विद्वांस