साधना….
दिलीपकुमार
९३, धर्मेंद्र ८०, वैजयंतीमाला, माला सिन्हा ७९, मनोजकुमार ७८, शशी कपूर,
हेलन, वहिदा ७७, संजयखान ७४, आशा पारेख, जितेंद्र, अमिताभ ७३, तनुजा ७२,
तबस्सुम, सायरा बानू ७१, विनोद खन्ना ६९, मुमताझ, रणधीर कपूर ६८, डयानी,
हेमा मालिनी, बबिता, मौशुमी, जया भादुरी ६७. राकेश रोशन, फरीदा जलाल ६६,
मिथुन, शबाना, लीना चंदावरकर ६५, झीनत ६४, ऋषी कपूर, अमितकुमार ६३, रेखा
६१. काळ काय झटझट सरला. ज्यांच्या चित्रपटावर मोठे झालो ते सगळे आता
साठीच्या पुढे गेलेत किंवा गेलेत. प्रेमापोटी ते आपल्याला अजून तरुण वाटतात
पण ते नाहीत आणि आपणही पन्नाशीकडे वाटचाल केल्याचं जाणवतं. सत्तरीच्या
पुढचा फक्तं अमिताभ काय तो कार्यरत आहे. २००७ सालच्या जॉनी गद्दार मधे
धमेंद्र दिसल्याला सुद्धा आठ वर्ष झाली. बाकी सगळे अधून मधून कुठेतरी
दृष्टीस पडतात. देखणा जॉय मुखर्जी असाच विपन्नावस्थेत गेला, त्याच्या
स्टेशनरीच्या दुकानात बसायचा म्हणे. त्याला शम्मी म्हणालेला, तू परत काम
कर, त्यानी नकार दिला कारण त्याला त्याचं ते म्हातारं रूप दाखवायचं नव्हतं.
काल साधना शिवदासानी नय्यर गेली. बबिताची चुलत बहिण, करीना करिष्माची
चुलत मावशी.
कराचीवरून फाळणी झाल्यावर सिंधी शिवदासानी
कुटुंब मुंबईत स्थिरावलं. सिंधी असून पण ती सुटलेल्या अंगाची, तुपट
चेह-याची नव्हती. अतिशय नितळ आणि लोभस चेहरा. कुठलंही खास वैशिष्ठ्य नसलेली
ती एक सुंदर चेह-याची साधी मुलगी होती. वडिलांना नृत्यांगना साधना बोस
आवडायची म्हणून तिचं नाव साधना ठेवलं होतं. साधनाला पहिल्यापासूनच
अभिनेत्री व्हायचं होतं. १९५५ च्या 'श्री ४२०' मधल्या 'मूड मूड के ना देख'
मधे ती कोरस डान्सर होती. साठ साली आलेल्या निर्माता शशधर मुखर्जीच्या
'लव्ह इन सिमला'मधे त्याचा मुलगा जॉय हिरो होता आणि साधना होती आणि तिला
कपाळ लहान दिसण्यासाठी 'ऑड्री हेपबर्न'चा कट देऊन 'साधना कट' फेमस करणारा
दिग्दर्शक होता आर के नय्यर यांनी साठ सालचा हिट सिनेमा दिला. तिनी मग
त्याच्याशीच लग्नं केलं, ९५ ला नय्यर जाईपर्यंत तिचं वैवाहिक जीवन होतं,
तिला मुलबाळ काही नव्हतं. तिच्या केशरचनेची क्रेझ होती. अंगाला
चिकटवल्यासारखा फिट्ट सलवार कमीझ घालायची आयडिया पण तिचीच होती जी पुढे पोट
सुटलेल्या, शोभो न शोभो, नायिकांनी पण वापरली.
रहस्यमय मराठी 'पाठलाग' वरून आलेला 'मेरा साया', 'वह कौन थी', 'राजकुमार', 'वक्त', 'आरजू', लतानी गायलेलं एकमेव मादक 'आ जाने जा' असलेला 'इंतकाम', लुळ्या देवानंदचा 'हम दोनो' असे मोजकेच सिनेमे मला पाहिल्याचे आठवतात तिचे. सदाबहार 'झुमका गिरा रे'च्या स्टेप्स 'एक दो तीन'वाल्या तेंव्हा नृत्यंदिग्दर्शक सोहनलालची सहाय्यक असलेल्या
सरोजखानच्या आहेत. तिचा चेहरा गीताबाली, फरीदा जलाल सारखा गोबरा नव्हता पण
लोभस होता. मला साधना म्हटलं की कृष्णंधवल रंगात टेरेसवर 'असली नकली' मधलं
'तेरा मेरा प्यार अमर' म्हणणारी सिल्क साडीतली, अंबाड्यावर वेणी घातलेली, प्रसन्न चेह-याची सोज्वळ, सात्विक सुंदर दिसणारी, कोपरापर्यंत बाह्यांचा ब्लाउज घातलेली
साधना आठवते. संपूर्ण गाण्यात फक्तं तिच्या चेह-यावरचा गोडवा बघावा.
'राजकुमार' बघताना मला त्याचं नाव राजकुमारी हवं होतं असं अनेकदा वाटलं
होतं. संपूर्ण चित्रपटात ती अफाट सुंदर दिसली होती. मेकप वगैरे असतो मान्यं
आहे पण मूळ मटेरीअल देखणंच होतं, मेकपनी फारतर शार्पनेस वाढला असेल
सौंदर्याचा. तिनी एकूण ३३ चित्रपटात काम केलं आणि त्यातले २७ हिट होते पण
तिला फिल्मफेअर कधीच मिळालं नाही, वह कौन थी आणि वक्त साठी नामनिर्देशित
होती ती फक्तं.
एकदा तिचा फोटो
बघितला आणि काळ किती भीषण सूड उगवतो ते जाणवलं. थायरॉइडमुळे तिच्या
डोळ्यांवर परिणाम झाला होता. जागा सोडलेले बटाट्यासारखे डोळे, आत गेलेले
गाल, खप्पड दिसत होती, हीच का ती? असा प्रश्नं पडावा अशी. आशा पारेख,
वहिदा, नंदा आणि हेलन एवढंच तिचं शेवटचं मैत्र होतं. मधे नंदाही गेली.
तबस्सुम सांगत होती, 'ढासळणारी तब्येत आणि मागे लागलेलं कायद्याचं झेंगट'
यासाठी तिनी अनेकांची मदत मागितली आणि कुणीही पुढे आलं नाही शेवटपर्यंत.
कदाचित तिचे भोग संपल्यावर ती कर्करोगाने गेली. आशा भोसलेच्या मालकीच्या
बिल्डींगमधे ती भाड्याने रहात होती. तिच्या अंत्ययात्रेला तरुण म्हणावी अशी
दीप्ती नवल (५८) तेवढी होती बाकी सगळे तिच्या मागचे पुढचे.
प्रसिद्धीची सवय झाल्यावर वयानी आलेली हतबलता किती त्रास देत असेल याची कल्पना करायची पण मला इच्छा होत नाही. काय करत असतील हे लोक? प्रचंड रिकामा वेळ, सोडून गेलेलं सौंदर्य, तारूण्य, बरेचवेळा ओढवून घेतलेली विपन्नावस्था, एकाकीपण, आपल्या वयाचं, आपलं ऐकणारं माणूस आसपास नाही, विचार केला तरी अंगावर काटा येतो. काय वाटत असेल आरशात बघताना की आपलेच जुने फोटो बघत असतील, यशाच्या बातम्या वाचत असतील, आठवत असतील?
प्रसिद्धीची सवय झाल्यावर वयानी आलेली हतबलता किती त्रास देत असेल याची कल्पना करायची पण मला इच्छा होत नाही. काय करत असतील हे लोक? प्रचंड रिकामा वेळ, सोडून गेलेलं सौंदर्य, तारूण्य, बरेचवेळा ओढवून घेतलेली विपन्नावस्था, एकाकीपण, आपल्या वयाचं, आपलं ऐकणारं माणूस आसपास नाही, विचार केला तरी अंगावर काटा येतो. काय वाटत असेल आरशात बघताना की आपलेच जुने फोटो बघत असतील, यशाच्या बातम्या वाचत असतील, आठवत असतील?
तिचं 'तेरा मेरा प्यार
अमर' मला कायमचं आवडून गेलेलं गाणं आहे कारण त्यात तो साधना कट नाही, फिट्ट
ड्रेस नाही, आहे ते एक सोज्वळ, सुंदर, सालस सौंदर्य, ठसलेलं (अशीच 'सुवासिनी' मधली अंबाडा घातलेली सीमा देव). त्या गाण्यात शेवटच्या कडव्यात ती म्हणते न तशी ती काल 'चलती हू मैं तारों पर, फिर क्यो मुझ को लगता ही डर' म्हणत जिथे कसलीही भीती नाही अशा ठिकाणी तारोंपे चलते हुए निघून गेली एवढं खरं.
जयंत विद्वांस