Wednesday 30 April 2014

Have A Nice Night - James Hadley Chase

चेस हा मोठा विचित्रं माणूस आहे. काहीवेळेस नाईलाजानी वाईट काम करणा-या माणसाबद्दल पण तो तुमचं चांगलं मत तयार करतो. दुस-या बाजूला परिस्थितीच्या रेट्याने, चुकीच्या माणसावर  आंधळं प्रेम केल्यामुळे वाईट काम करणा-या माणसाबद्दल तो राग आणि कणव युक्तं भावना निर्माण करतो. नेहमीप्रमाणे Have A Nice Night चा जीव लहानच आहे पण घडणा-या घटनांचा वेग अफाट  आहे. कुणीही चांगली स्टारकास्ट घ्यावी आणि सरळ शुटिंगला सुरवात करावी अशी पटकथाच त्यानी लिहिली आहे. प्रत्येक पात्रं त्यानी इतकं सुरेख रेखाटलंय की फक्तं योग्यं कलाकार निवडायचाय. 

फक्तं लक्षाधीश, अब्जाधिश लोक ज्या 'स्प्यानीश बे हॉटेल' मधे उतरतात तिथे सगळं हे घडतं. श्रीमंतीचं, हिऱ्यांचं, दागिन्यांचं ओंगळवाणं प्रदर्शन करणारे, पैशांनी मस्तवाल झालेले '(खूप) आहे रे' वर्गातले श्रीमंत आणि दुस-या बाजूला '(काहीच) नाही रे' वर्गातले रोजच्या जगण्यासाठी लढणारे गरीब यांच्यातलं युद्धं न संपणारं आहे.  पण शेवटी पैसा महत्वाचा असतो. त्यानी खूप गोष्टी विकत घेता येतात, आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने घटना घडवता येतात. 

मेक्सिकोच्या धनाढ्याचा मुलगा विल्बरटन आणि त्याची बायको मारिया हनिमूनसाठी तिथे उतरलेत. अंगावर वडिलांनी दिलेले जवळपास १ कोटी डॉलर्सचे हि-याचे दागिने घालून मिरवण्याची तिला हौस आहे. लोकांना दागिने बघून वाटणारा हेवा तिला हवाहवासा आहे. हॉटेलच्या सेफमधे अजून चाळीस-पन्नास लाख डॉलर्सचे दागिने आहेत ते वेगळेच. ज्वेल थिफ Hadin आणि त्याचा प्लान अंमलात आणणारा विश्वासू सहकारी Lu Bradey यांची मागची चोरी फसलेली आहे. त्यांना मोठा हात मारणं आता गरजेचं आहे. लू ची प्रेयसी Magie पण आता सामील आहे. स्फोटक शरीर आणि कुणालाही त्याच्या सहाय्यानी जाळ्यात ओढू शकणारी. ती एक सहृदयी वेश्या आहे. त्यांच्या सोबत आहे एक्स-मिलिटरीमन माईक बनियान, जो शुटिंग एक्सपर्ट आहे. त्याला कॅन्सर झालाय आणि फक्तं सहा महिन्यांचं आयुष्यं हातात आहे. त्याच्या मतिमंद मुलीसाठी त्याला पन्नास हजार डॉलर्स हवेत जी अजून फारफार तर पंधरा वर्ष जगू शकते. त्या हॉस्पिटलचा पुढच्या पंधरा वर्षासाठीचा तो खर्च आहे. 

दुस-या बाजूला अजून एक टोळकं आहे. ज्यांचा चोरी हा हेतू नाही. पण घडणा-या घटना त्यांना भाग पडतात. त्याच हॉटेल मधे साफसफाईचं काम करणारी क्युबातून स्थलांतरित झालेली अनिता, परत  क्यूबात जाण्याची नुसतीच स्वप्नं बघणारा, काहीही कामधंदा न करणारा  तिचा  नवरा पेड्रो, त्याला पिस्तूल देवून चोरी करायला फूस लावणारा त्याचा क्यूबन मित्र फ्यूएन्तस आणि  क्यूबन लोकांचा म्होरक्या म्यनुएल. भाडं गोळा करणा-या माणसाकडून ते पैसे चोरताना त्या माणसाचा पेड्रो कडून खून होतो आणि त्याला पकडताना इंस्पेक्टर लेपस्की कडून त्याला गोळी लागते. तो हॉस्पिटलमधे बेशुध्द अवस्थेत  आहे. त्याला शुद्धीवर आल्यावर पोलीसांपासून वाचवायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागणार. पेड्रोवर जिवापाड प्रेम करणारी अनिता, नाईलाजानी म्यनुएलच्या आश्रयाला गेलेला फ्यूएन्तस आणि म्होरक्या म्यनुएल एकत्रं येतात. 

विल्बरटन जोडप्याला ओलिस धरून पन्नास लाख डॉलर्स खंडणी मागायची, पेड्रोला बोटीवर घेऊन क्यूबाला जायचं असा त्यांचा प्लान आहे.  पैशांपैकी चाळीस म्यनुएलला आणि दहा फ्यूएन्तसला, अनिताला फक्तं पेड्रो हवाय. दोन्ही टोळकी एकाच दिवशी एकाच वेळी त्यांचा प्लान अंमलात आणतात. मग नेहमीप्रमाणे चेसची माशी शिंकते आणि घटना घडतात. कोण होतं यशस्वी? अनिता की Hadin? कोण जगतं, कोण मरतं, कोण अपयशी,  कोण यशाचं धनी होतं? त्यासाठी पुस्तकंच वाचावं लागणार. :)


जयंत विद्वांस


Sunday 27 April 2014

लल्याची पत्रं (८) …. 'जिंदगी के सफर में'

लल्यास…... 

काही गाणी ना काळाच्या पलीकडची असतात बघ. चित्रपटात ती कधी येतात, कशाशी रिलेटेड आहेत हे नसेल माहित तरी ऐकताना काही  फरक पडत नाही. स्वत:चं एक वेगळं अस्तित्व, एक वेगळी ओळख  असते त्यांची. 'जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम…' असच  एक गाणं आहे बघ. 'आप की कसम' मधलं, आर. डी. आनंद बक्षी, किशोरचं. जे.ओमप्रकाशचा पहिला चित्रपट हा. यानंतर त्यानी सगळे  सिनेमे 'अ' नी सुरवात असलेलेच काढले. अर्पण, आखिर क्यो, अगर तुम ना होते, आशा इ.इ. त्याचे सगळेच सिनेमे एकाच पठडीतले.  प्रेमाचा त्रिकोण, एकीचा/एकाचा त्याग, उदात्त प्रेम, ओठांवर खेळतील अशी गाणी, माफक  मारामारी, फार क्रूर नसलेला व्हिलन, वगैरे वगैरे असा ठरलेला  साचा सगळीकडे. राकेश रोशनचा सासरा हा, जावई फक्तं 'के' नी सिनेमे काढतो एवढंच. एकता कपूरचा मात्रं कुणीही नाही तो.  :P  
आनंद बक्षी या माणसाचं मला मोठं कोडं आहे. तो 'अच्छा तो हम चलते है' अशी बोलगाणी पण लिहितो, यमक जुळवायला दुसरं काहीही न  सुचल्यामुळे नाईलाजानं कुठलाही संबंध, अर्थ नसलेली ' ठेसनसे गाडी जब  छूट जाती है तो एक दो तीन हो जाती है' (म्हणजे नेमकं काय  होतं गाडीचं ते तोच एक जाणे) अशी निरर्थक ओळ लिहितो, पण तो 'चिंगारी कोई भडके' ही लिहितो  (त्याच्या वहीत सापडलेली एक  अप्रकाशित जुनी कविता, जी आर.डी.च्या  हट्टामुळे सिनेमात घेतली) आणि 'जिंदगी के सफर में गुजर जाते है' पण लिहितो.

रेल्वेत खिडकीशी बसलेला दाढीतला राजेश खन्ना नैराश्यं आणतो इतके सुरेख शब्द आणि चाल आहे. पार्श्वभूमीवर वाजणारी गाणी अशीच अंगावर येतात काहीवेळेस. तत्वज्ञान अवघड नसतं जेंव्हा ते सोप्प्या शब्दात सांगितलं जातं. आनंद बक्षींनी तेच केलंय. 'जिस मकाम से एक बर गुजर गये तो गुजर गये, मग त्याबद्दल दु:ख करा, करू नका, जे निसटलं एकदा ते निसटलच.'फिर नही आते' ही ओळ ठसवण्यासाठीच रिपीट असणार बहुतेक. काय जीवघेणं अवघड लिहिलंय साध्या शब्दात. एकदा कोमेजलं फूल की मग काही करा, पाणी घाला, जोपासा, काळजी घ्या, काही काही  उपयोग नाही. काचेला तडा, चुरगाळलेला कागद, कोमेजलेलं फूल आणि गेलेलं आयुष्यं बदलता नाही येत. विशिष्ठ माणसाला पर्याय नसतो गं आयुष्यात. मग कित्ती का येईनात आयुष्यात.    


दुस-या कडव्यात तर भरूनच येतं.  संशयानी पछाडलेल्या आणि त्यामुळे आयुष्याची माती केलेल्या माणसाचं कळवळून सांगणं आहे ते. तुमच्या जवळचं कुणी जात असेल तर उठा, थांबवा त्याला. राग,प्रतिष्ठा, अहं याच्या बेड्या इतक्या दणकट असतात ना की हात, पाय, जीभ जड होतात. पुढे होऊन, हाक मारून थांबवणं नाही होत. तेंव्हाचा त्या कोसळक्षणाचा एक अनुच्चारित शब्द, एक  राहून गेलेला स्पर्श याला पर्याय नाही. नंतर तुम्ही माफिनाम्याचे ग्रंथ लिहिलेत तरी काही काही उपयोग होत नाही. पाठमो-या व्यक्तीचे 'थांब' ऐकण्यासाठी आसुसले कान डोळ्यांसमोर नसल्यामुळे दिसत नसावेत.

दिवस आणि रात्रं, काळाचे चाक त्याच्या त्याच्या वेगात धावतच बघ. आपल्या मन:स्थिती प्रमाणे त्याचा वेग आपल्याला कमी जास्तं वाटतो. कधी क्षणात युगं सरतात तर कधी युगं सरली तरी क्षणभर वाटतात. रागाचे, द्वेषाचे, संशयाचे पडदे डोळ्यांवर आले की समोरचं दृश्यं आपण ठरवलंय, आपल्याला वाटतंय तसंच दिसतं. उलगडा होतो तोपर्यंत मुठीतून वाळू निसटावी तसं आयुष्यं, माणसं ओघळून जातात. एकाकी, मग ते चुकीनी, नशिबानी किंवा नाईलाजानी असेल, आयुष्याला ओढ नसते. दिवस, रात्रं, तारीख, वेळ, क्रम असला काय नसला काय किंवा चुकला काय, फरक नाही पडत. पश्चातापानी पाप धुतलं जात असेल, खंत, शल्यं मात्रं अजूनच टोकदार होतात. धड जगूही देत नाहीत, मरूही देत नाही.


बदलापूरचं गावदेवीचं देऊळ आणि कल्याणहून कसारा कर्जतचे फुटणारे फाटे या गाण्यात दिसतात. त्या गावदेवीच्या नितांत शांत देवळात मी अनेकदा बसलेलो आहे. इतकी वर्षं झाली हे गाणं ऐकलं की गावदेवीचं देऊळ आठवतं. कित्त्येक वर्षात गेलेलो नाही तिथे. पण एकदा जाईन, बसेन, काय सांगावं माझ्या डोळ्यासमोर बांधकामांच्या आड अदृश्यं झालेल्या रेल्वे लाईनवर धावणा-या रेल्वेच्या डब्यात खिडकीत बसलेला विमनस्कं, दाढीतला राजेश खन्ना दिसेल. त्याचे आटलेले अश्रू कदाचित माझ्या डोळ्यातून सांडतील. :(
चल, पुढच्या गाण्यापर्यंत बाय.

https://www.youtube.com/watch?v=Fr-r5NAhOZo

जयंत विद्वांस

One Bright Summer Morning - James Hadley Chase

चेसचा हा प्लॉट भन्नाटच आहे. लेखक कितीही आवडीचा असला तरी तो ही माणूसच आहे. एवढी पुस्तकं लिहिताना शैलीमधे तोच तोच  पणा येणारच. मग कंटाळा येऊ शकतो, पण चेसचं वेगवेगळे प्लॉट घेऊन कथा रंगतदार करणं मोठं मजेशीर आहे. श्रीमंताच्या एकुलत्या एक मुला/मुलीला पळवून न्यायचं आणि बदल्यात काही रक्कम मागायची हा काही फार नाविन्यपूर्ण प्लॉट नाही.  पण चेस गंमत आणतो.  (अमजदचा 'इन्कार' मस्तच होता). गुन्हेगारी आणि प्रेम करणं यात एक साम्यं आहे. अपयशाची उदाहरणं जास्तं असतानाही कुणी रयत्नं  करणं मात्रं सोडत नाही.
 
बिग जिम क्रामर : माजी डॉन, आता तो रिटायर झालाय. परफेक्ट प्लानर. तो पोलिसच्या एकदाही हातात सापडलेला नाही. त्याला पकडणं एफ.बी.आय.चं अर्धवट राहिलेलं स्वप्नं आहे. चाळीस लाख डॉलर त्यानी बाजूला  काढले आहेत. बायकोबरोबर सुखवस्तू जीवन जगतोय. पैशाची ताकद मोठी असते. वरच्या थरात वावरत तो एका उच्चभ्रू माणसाचं जीवन जगतोय. मस्तं बंगला, दिमतीला पॉश गाड्या, नोकर चाकर, गोल्फ अशा  सगळ्या पैशांनी विकत घेता येणा-या साधनांनी तो आता आदरणीय वगैरे पण झालेला आहे. त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा एके दिवशी सकाळी डोक्यात गोळी मारून घेतो आणि तो रस्त्यावर  येतो. आपल्या चाळीस लाख डॉलरला चुना लागलेला आहे हे त्याला समजतं. आयुष्याच्या संध्याकाळी आहे ते स्टेटस टिकवण्यासाठी त्याला पैसा गरजेचा  आहे. तो मिळवण्यासाठी त्याच्यापुढे बंद केलेल्या  इतिहासाची पाने परत एकदा नव्यानी लिहिणे एवढाच मार्ग शिल्लक आहे. 
 
मो झेगेट्टी : बिग जिम चा एकेकाळचा सहाय्यक. त्याला स्वतःचा मेंदू नाही पण आखून दिलेला प्लान अंमलात आणायचा ह्यात तो माहीर आहे तो ही आता वयस्कं आहे. त्यानी सहा वर्ष तुरुंगात  घालवली आहेत आणि त्याचा धसकाही घेतलेला आहे. एका हॉटेलमधे तो फालतू वेटरचं काम करत अपमानित  जिणं जगतोय. एकेकाळी ब्रोथेल चालवणारी त्याची आई आता मरणापासून फार लांब नाही. त्यानी बॉसला सहा-सात वर्षात पाहिलेलंही नाही. आणि एक दिवस त्याला फोन येतो. काम आहे, लवकर ये. तुझा वाटा अडीच लाख  डॉलर. जेलमधे खाल्लेला मार अजून त्याच्या अंगावर शहारे आणतो पण एवढी रक्कम असेल तर  आयुष्यं दानाला लावायला तो तयार होतो. काय व्हायचं ते एकदाच होऊन जाऊ दे. झालोच यशस्वी तर उर्वरित आयुष्यं सुखात जाईल नाहीतर या लाचार जगण्यातून सुटका तरी होईल. 
 
झेल्डा वायली : अब्जाधीशाची मुर्ख मुलगी. तिला पळवल्यावर तिचा बाप चाळीस लाख डॉलर देणार याची बिग जिमला खात्री आहे.
 
चिता आणि रीफ क्रेन : जुळी आहेत ही बहिण भावंडं. वाटमारी, जगण्यासाठी शक्यं तेवढी वाईट कामं करण्यात कुठलाही कमीपणा न वाटणारी. पण त्यांची आत्तापर्यंतची मजल फार मोठी नाहीये. दोघांमधे एक  विचित्रं नातं आहे. एकमेकांना ते ओळखून आहेत, एकमेकांवर निरातिशय प्रेमही आहे. संकटाची चाहूल दोघांना पटकन लागते. त्यांचं नातं फक्तं 'बहिण भावाचं' नाही. झेल्डाला उचलण्यासाठी या दोघांची निवड मो  झेगेट्टीनी केलीये. त्यासाठी त्यांना दहा हजार डॉलर मिळणार आहेत. हक्कं भावना, हव्यास, अचानक घडणा-या घटनांनी यश मिळणार नाही याचं दु:खं आणि चं.गों.नी त्यांच्या चारोळीत म्हटलंय तसं 'निघत नाही म्हटल्यावर पतंग फाडायला निघतात', तशी आलेली अपरिहार्यता यांच्या नशिबी आहे.              
 
व्हिक्टर डरमॉट : प्रथितयश नाट्यलेखक. नवीन नाटक लिहिण्यासाठी तो, त्याची बायको आणि लहान मुलगा एकांतवासात गेल्यासारखे आजूबाजूला अजिबात वर्दळ  नसलेल्या घरामधे रहायला गेलेत. या माणसाचा वरच्या स्टोरीशी काहीही संबंध नाही. (इथे चेस वेगळा ठरतो). बिग जिमच्या वतीने पैसे घेण्यासाठी आणि आणून देण्यासाठी त्याची निवड झाली आहे. त्याची बायको आणि मुलगा ओलिस  असल्यामुळे त्याला पर्याय नाहीये.       
 
सगळ्यात कलाटणीचा भाग आहे तो जबर आहे. मुर्ख झेल्डा रिफच्या प्रेमात पडलीये. ती लग्नाला पण तयार आहे. चेसला हव्या असलेल्या क्षणी त्याची स्पेशल माशी शिंकते आणि सगळं कसं पत्त्याच्या  बंगल्यासारखं कोसळतं. झेल्डा लग्नं करते? बिग जिम, मो, क्रेन ट्विन्स ला पैसे मिळतात? वाचा म्हणजे समजेल. :)
 
जयंत विद्वांस  
 

Saturday 19 April 2014

लल्याची पत्रं (७) ….


एकच गाणं दोन वेगळ्या गायकांनी म्हटलं की त्याला ट्यांडम म्हणतात. काहीवेळेस चाल वेगळी असते, शब्दं वेगळे असतातच पण मुखडा तोच. दिल धुंडता है फिर वही, अजनबी तुम जाने पहचानेसे लगते हो एकदा स्लो एकदा फास्ट. अशी बरीच आहेत. ऐ मेरे दिल कही और चल, नीले नीले अंबरपे,  छोटीसी ये दुनिया, चंदा  ओ चंदा, यादोंकी बारात चं टायटल आणि किशोर रफी मधे श्रेष्ठं कोण वादाला पूरक ठरलेलं 'तुम  बिन जाऊ कहां' (डायरेक्टर कोण माहित नाही, पण किशोरचा आवाज भारत भूषणला आहे. इस्त्रीच्या चेह-यानी तो गाणं म्हणतो आणि मातेरं करतो. त्यामुळे किशोरचं फक्तं श्रवणीयं आहे). असंच आर.डी., किशोरचं 'ओ हंसिनी…' आहे, श्रवणीयं फक्तं. असो, मी  सांगणार आहे आज तुला ते वेगळंच आहे 'रिमझिम गिरे सावन' एक लताचं एक किशोरचं.

एकतर बासू चटर्जी आणि अमिताभ हा कॉम्बो न पचणारा. पिक्चर खूप बालपणी बघितलाय त्यामुळे लक्षात नाही स्टोरी पण ही दोन्ही गाणी मात्रं संपूर्ण लक्षात आहेत. गाणं चालीला जेवढं भन्नाट आहे  तेवढंच शब्दांनीही आहे. कवी जेंव्हा गाणं लिहितो ना तेंव्हा ते अर्थपूर्ण असतंच पण नादमय ही असतं. संगीतकाराला फार धडपड करावी लागत नाही चालीत बसवण्यासाठी, ते बसतच. योगेशचं गाणं आहे हे ('आनंद'ची कविता गीतं पण त्यांचीच).  एकच माणूस स्त्री आणि पुरुषाच्या भावना मुखडा तोच ठेवून किती सुरेख मांडतोय बघ.
 

पेटीवर बसून गाणं म्हणणारा  अमिताभ आणि लाजल्याचा, लट्टू झाल्याचा वगैरे अभिनय करण्याचा प्रयत्नं करणारी ढप्पू, गायक हेमंतकुमारची सून, मौशुमी चटर्जी. अमिताभ असा निवांत बसून पेटीवर गाणं वगैरे म्हणतोय ही कल्पनाच लई भारी आहे. त्याच्या चित्रपटातल्या प्रतिमेशी साजेसे शब्दं तर आहेतच पण त्याचे कपडेही बघ किती साधे आहेत. गाणं म्हणताना एकदाही तो मौशुमीकडे बघत नाही, अत्यंत तन्मयतेने किशोरच्या आवाजाला न्याय देतो. त्याचा सज्जनपणा शब्दातून सगळं पोचवतो.  सर्वप्रथम 'पावसाचे घुंगरासारखे वाजणारे थेंब' या नादमय ओल्या कल्पनेसाठी मी इथे एक सलाम ठोकलाय. एका अनोळख्या व्यक्तिवर प्रेम  बसू पहातंय ही चारचौघात सांगण्यासारखी गोष्टं नाहीये, असं म्हणतो तो. डोळ्यांची भाषा कळायची तेंव्हा, शब्दावाचून शब्दांच्या पलीकडलं बरोब्बर पोचायचं. आता प्रेम व्हायची शक्यता आहे आणि  झालं असेल तर ते सगळ्या जगाला कळवायलाच हवं असा खाक्या आहे हल्ली. कदाचित आपणही कुणाला तरी आवडू शकतो हा आश्चर्याचा धक्का असू शकतो. :P

लतादीदी म्हणतात ते गाणं मात्रं फास्ट आहे आणि मुखड्याशी नातं सांगणा-या पावसातही आहे पण हा राजकपूर, मनोजकुमारचा अंगाला चिकटणारा पाऊस मात्रं नाही. हा नवं काहीतरी गवसल्याचा, नवं काहीतरी  अंकूरल्याचा आनंद देणारा  पाऊस आहे. योगेशनी काय संयत वर्णन केलंय पण, जबरदस्तं. हा पाऊस काय पहिल्यांदाच पडतोय का? पदर, अंग काय पहिल्यांदाच भिजलंय का? पण ही  लागलेली आग मात्रं नविन आहे. माणूस प्रेमात पडला ना की उत्तरं माहित असलेले प्रश्नं पण त्याला समोरच्याला विचारायला आवडतात. मूळ उत्तराकडे न येता कडेकडेनी सूचक बोलत जो संवाद होतो ना तो फार रोम्यान्टीक असतो.  तिनी वेड्यासारखं करायचं, बालिशपणे वागायचं, प्रश्नं विचारायचे आणि त्यानीही किती गं तू भोळी, अजाण असा चेहरा करत तिला खुश करायचं. खरं तर हा विषय रुक्ष चर्चेचा नाहीच तो अनुभवावा हे उत्तम. मौशुमी सगळा दोष मात्रं निसर्गालाच देते. यावेळचा श्रावणच वेगळा आहे. वैशाखवणवा असतो तसा हा श्रावणनिखारा आणि तिचं मन तरी काय करणार, वारा सुद्धा साथ देतोय काहीतरी नशा केल्यासारखा. छे गरीब बिचा-या मौशुमीचा काही एक दोष नाही.

मागे भक्ती बर्वेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की 'ती फुलराणी' मधे काम करताना त्यांना सतीश दुभाषींचा त्रास व्हायचा. त्यांचे संवाद झाले की ते भक्तीकडे बघायचेच नाहीत. तिची अपेक्षा की  आपल्या बोलण्याचं प्रतिबिंब समोरच्या नटाच्या/नटीच्या चेह-यावर उमटायला हवं तर ती भूमिका करण्यात मजा आहे. नंतर ते त्यांना मान्यं झालं. अमिताभ, नसीर, रेखा, स्मिता इथे सरस ठरतात. मी कोण यापेक्षा माझ्या भूमिकेची गरज काय आहे हे त्यांना कळतं. संपूर्ण गाण्यात अल्लडपणा दाखवण्याचं काम मौशुमी चोख करते आणि अमिताभ तिच्याकडे कौतुकाने बघत फक्तं तिच्याबरोबर चालतो, पळतो. उगाच आपलं काहीतरी वेगळेपण दाखवायचा प्रयत्नं वगैरे अजिबात नाही.

चल पुढच्या पत्रापर्यंत अच्छा. ते तेवढं 'चलते चलते, मेरे ये गीत'चं 'अलविदा तो अंत है' हे तिसरं कडवं मिळालं तर दे मला. 


जयंत विद्वांस

Monday 14 April 2014

शब्दं पुसटसे.....

शब्दं पुसटसे.....

ओठांवरती शब्दं पुसटसे
लिहून गेली ती ओठांनी
काठावरले थेंब निसटते
पूसून गेली ती बोटांनी

वळणावर दिसे ओझरती
गायब झाली ती वाटांनी
दिल्याघेतल्या कुंवार शपथा
तोडून गेली ती मौनानी

वाळूवरचे घर इवलेसे
तोडून गेली ती हातांनी
काळीजभेदी स्वर भैरवीचे
म्हणून गेली ती श्वासांनी

जयंत विद्वांस

लल्याची पत्रं (६) ….दिल आज शायर

लल्याची पत्रं (६) …. दिल आज शायर
तुला मागच्या पत्रात म्हटलं ना  तसंच अजून एक गाणं आहे. तो पिक्चर काही मी पाहिलेला नाही. पहाणारही नाही. कारण देवआनंद मला सहन होत नाही फारवेळ. तर गाणं आहे 'दिल आज शायर हैं, ग़म आज नग्मा हैं. खुर्चीत बसून अजिबात न शोभणा-या मिशा लावून ('हम दोनो' मधल्या मिशा पण विनोदीच होत्या) तो ते म्हणतो आणि पिक्चर आहे 'ग्याम्ब्लर'. त्यात अजून एक मस्तं गाणं होतं किशोरचं 'चुडी नही ये मेरा, दिल है'. त्यात जाहिदा होती, संजय दत्तची मावस की मामे बहिण. तुला त्या काळातील क्याड्बरी बघायची असेल तर त्या गाण्यात दिसेल. ती खातानाचे देवानंदचे हावभाव माझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत. असो!


या माणसाला गाणी मात्रं चांगली मिळाली सतत. पहिल्यांदा एस.डी. मग आर.डी., किशोरचा आवाज आणि कवी दर्जाच्या गीतकारांची सरस गाणी. मग त्याचं ते बावळट चालणं, ते लुळे हातवारे, उगाचच हसताना तो  डबल दात दाखवण्याची धडपड आणि अत्यंत विनोदी, पोट धरून हसायला लावणा-या मारामा-या (शंकेचं पूर्ण निरसन हवं असेल तर 'जॉनी मेरा नाम' मधली प्राण बरोबरची शेवटची मारामारी बघच, हसू फुटलं नाही तर शिक्षा म्हणून मी त्यानी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट पाचवेळा पाहीन) असं असूनही चित्रपट मात्रं चालायचे. कारण गाणी अफाट असायची.


तर हे नीरजचं गाणं आहे. 'शोखीये में घोला जाये, फुलोंका शबाब, उसमें फिर मिला दी जाये थोडीसी शराब, होंगा यू नशा जो तय्यार, वो प्यार है' अशी प्रेमाची भन्नाट व्याख्या करणारा तोच तो नीरज (हीच टीम सगळी, एस. डी., देवानंद, किशोर - चित्रपट प्रेमपुजारी, तरी रंगीलारे, फुलोंके रंगसे यातच आहेत. 'शोखीये में' वर परत कधीतरी). तात्पर्य, हा माणूस ओळ किती लांब होतीये, संगीतकाराला झेपेल का  वगैरे बघण्याच्या भानगडीत न पडणारा असावा. त्याचा याच गाण्याचा मुखडा बघ ना केवढा लांबसडक आहे ते. मी अर्थपूर्ण लिहिणार, मला त्रोटक बिटक आवडत नाही, ते चालीचं तुम्ही बघा काय ते असा खाक्या असावा.  अर्थात बर्मन बापलेक त्यात माहीर होते. गद्यं वाटणा-या परिच्छेदाला ते सुंदर चाल लावायचे (ऐका 'मेरा कुछ सामां, तुम्हारे पास पडा है').
   


आपण ना नुसतंच ऐकतो, कित्त्येक वेळेला अर्थ डोक्यात घुसतोच असं नाही कारण चाल चांगली असते. एके ठिकाणी 'दिल आज शायर' वर मी जे वाचलं होतं ते तुला सांगतो, मोठं गमतीशीर आहे.  रुढार्थानी हे गाणं नाही होत. कारण याचं धृवपद रिपीट होत नाही. मी उडालोच. खरंच की हे कधी लक्षातच नव्हतं आलं. मग मी ते परत ऐकलं. पहिल्या दोन ओळी झाल्या की मग आ के ज़रा देख तो, हैं प्यार हम ने किया जिस, ये प्यार कोई खिलौना नहीं हैं ही तीन कडवी सलग येतात, नो धृवपद. बरं तिन्हीची चाल एकच आहे. त्यामुळे तसं ते एकसुरी आहे कारण कडवं संपल्यानंतर चेंज म्हणून वेगळ्या चालीचं धृवपद येत नाही. तरीही ते अनेक लोकांना पाठ आहे कारण किशोर, एस.डी. नीरज यांची जादू. देवानंद नुसता बसून तिन्ही कडव्यात चालीसारखाच सेम, अजिबात न बदलणारा चेहरा ठेवलाय ती मदतच म्हणायची. 

      

कदाचित धृवपद परत येतच नाही गाण्यात अशी मजा, वेगळेपण असणारी अजून गाणी असतीलही. माहित नाही. पण एक लक्षात आलं बघ माझ्या,  एकाच गोष्टीकडे प्रत्येकाची बघण्याची नजर वेगवेगळी असू  शकते. कुणीतरी यातली गंमत शोधली, लिहिली म्हणून आपल्याला समजली. अशाच काही गमती सापडतायेत का बघ, तो पर्यंत बाय बाय. 
जयंत विद्वांस 

   

Sunday 6 April 2014

लल्याची पत्रं (५) - सैंय्या झूठों का बड़ा सरताज निकला

लल्याची पत्रं (५) ….
 
लल्यास,
 
वारुळातून मुंग्या निघाव्यात ना तशी गाणी येतात बघ समोर लिहायचं म्हटलं की. सगळ्याच गाण्यांवर फार काही लिहिता बोलता येत नाही पण काही असतातच अविस्मरणीयं. काहीवेळेस ती ज्या चित्रपटात असतात तो चित्रपट आपण पाहिलेलाही नसतो, काही वेळेस पाहिलेला असतो पण काहीही आठवत नाही ती गाणी सोडून. सचिन, बिंदिया गोस्वामीचा 'कॉलेज गर्ल' पाहिलाय? सुतराम शक्यता नाही पण त्यातलं किशोर, 
बप्पीचं 'प्यार मांगा है तुम्हीसे…' अनेकवेळा ऐकलं असशील. ते सोडून बाकी काहीही माहित नाही. 
 
काल एक गाणं ऐकलं. 'दो आंखे बारह हाथ' मधलं 'सैय्यां झुठो का बडा सरताज निकला… हा काय, 'संत तुकाराम', 'श्यामची आई'  काय, अवीट गोडीचे. दणकट पटकथा (ग.दि.माडगूळकर), हुकमत असलेला  दिग्दर्शक (व्ही. शांताराम), अर्थपूर्ण साधी सोप्पी गाणी आणि तितक्याच सुरेल चाली या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या जन्माच्याही आधीचा हा चित्रपट आपल्याला भूरळ  घालतो. यातली सगळीच गाणी अफाट होती. थोडासा नाटकी अभिनय आहे, नाही असं नाही. संध्याचे कुठल्याही गाण्यातले डोळ्यांचे, मानेचे हावभाव पाहून मला कायम हसू फुटत आलं आहे तरीही हे गाणं मात्रं मला आवडतच.
 
हल्ली काही शब्दं गाण्यातून बादच झालेत बहुतेक. जुनं तेच चांगलं असं मला अजिबात म्हणायचं नाहीये पण काही शब्दं कानाला गोड लागतात. उदा.सैय्या, मोरा, लई ले, सजनवा. गुलझार आणि जावेद अख्तर लिहितायेत अजून ते एक बरंच आहे नाहीतर फक्तं दिल, नींद, सीना, धडकना, चुराया आणि अर्थ माहित 
नसलेले पंजाबी शब्दं याशिवाय इतरही काही शब्दं लागतात, असतात हेच विसरायला झालंय.  
 
हल्लीच्या जत्रा पण मॉडर्न झाल्या. पहिल्यांदा खास जत्रेतच मिळणारी काही खेळणी होती. संध्याच्या 
मागे जे तडतड वाजतं ते खरं तर डोकं उठवणारं आहे पण या गाण्यात ते आधीच चिडलेल्या संध्याला वात आणत  नाही. तिच्या त्या तडतड करणा-या भूमिकेचं प्रतिकच आहे ते. मुझे छोड चला नंतर तिच्या हातातल्या वाद्यावर (माझ्या माहिती प्रमाणे त्याला 'धनुकली' म्हणतात) जे काही वाजतं ना ती त्या गाण्याची ओळख आहे. 'आ लौटके आजा मेरे मित' मधलं ते टयांव टयांव पण असंच भारी होतं बघ. इंट्रो किंवा इंटरल्यूड पीस सुद्धा पाठ असतात बघ जुन्या गाण्यांचे. बघ ना, तेरे बिना जिंदगीसे, ओ मेरे  दिल के चैन, बचना ऐ हसिनो, अरे दिवानो, ये मेरा दिल आणि नाच रे मोरा व इतर अशी कित्त्येक गाणी आहेत जी इंट्रो ऐकून सांगता येतात. असो!  
 
 
खेडवळ माणसं खरंच प्रेमळ असतात पण. आपल्याला ती भाबडी असल्यामुळे बावळट वाटतात. मागे एक पोस्ट वाचली होती मी - शेतक-याच्या मुलानी आई वडिलांना कधी वृद्धाश्रमात ठेवल्याचं ऐकलेलं नाही. संध्याचं जेलर आदिनाथ वरचं अव्यक्तं प्रेम जसं तिच्या डोळ्यातून व्यक्तं होतं तसंच कैद्याच्या मुलांवर ते कृतीतून व्यक्त होतं. ह्या गाण्यातला लटका राग दाखवण्यासाठी शब्दं मदत करतात संध्याला. कडव्यातल्या ज्या ओळी आहेत ना त्याचं क्रियापद मला भुरळ घालतंय. व्याकरणदृष्ट्या वगैरे माहित नाहीये मला काय ते पण ते अर्धवट आहे आणि त्यामुळेच मोहक आहे असं माझं मत. वाच या ओळी आणि  सांग       
 
चल दिया जुल्मी मुझसे बहाना बना 
मेरे नन्हेसे दिलको निशाना बना  
 
'बनाके' असं असतं ना खरंतर? पण 'बना' ची मज त्यात नाही बघ. एकूणच या गाण्यातला, तो अनपॉलीश्ड असल्याने आलेला, प्रेमळ लटका राग मला मोहित करत आलेला आहे. 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे  सुद्धा भन्नाटच आहे. त्याबद्दल परत कधीतरी. चल तो पर्यंत बाय. 'चल दिया जुल्मी मुझसे बहाना बना' ह्या गाण्यातल्या शब्दांचा लगेच चपखल वापर तुला सुचणार नाही, ही अपेक्षा. :) 
 
जयंत विद्वांस

Wednesday 2 April 2014

लल्याची पत्रं (४) ….

लल्याची पत्रं (४) ….
 
लल्यास….
 
गाण्यांवर लिहायचं ठरवलं ना की मोठा गोंधळ उडतो बघ. जे आधी सुचलंय त्यावर लिहिता लिहिता मधेच दुसरंच आठवतं बघ. आत्ता पण तसंच झालं 'ए भाय, जर देखके चलो' वर लिहिणार होतो तर 'मंझिले अपनी जगह' इन्स्ट्रुमेंटल लागलं. परवाच्या 'छू कर मेरे मनको' चंच त्रिकूट परत. अमिताभ, किशोर आणि गीतकार अंजान, संगीतकार फक्तं चेंज, बप्पी लाहिरी.
 
बप्पी लाहिरी हा काही फार गुणी, ओरिजिनल म्हणावा असा संगीतकार नाही पण काही गाणी मात्रं त्यानं छान दिलीत. हे त्यातलच एक. बाकी तो अन्नू मलिक वंशाचा मूळ पुरुष. इंग्लिश गाण्यांचा चालींचा मूळ अनू'वादक' असं खरं तर म्हणायला हवं त्याला. 'चलते चलते' च्या टायटल सॉंग नंतर तो झळकला. त्याचं तिसरं कडवं फार लागत नाही, टी.व्ही, रेडीओ वर, मिळालं कुठे तर ऐक, 'अलविदा तो अंत है, अंत किसने देखा…'. मुद्दा हा की किशोरनी अत्यंत तरल लावलाय आवाज तिस-या कडव्याला. कितीही भिकार गाणं असलं तरी किशोर मनापासून गायचा बप्पीची गाणी, कारण एकच.  बप्पी त्याचा भाचा आहे. (पण बप्पी साला टिकून आहे अजून, 'उलाला, उलाला', 'शोला  या है बिजुरिया'चा गायक म्हणून.) तसाच तरल आवाज किशोरने या ही गाण्याला लावलाय. दारुड्यावर चित्रपट कथा काय असू शकते खरं तर पण अमिताभ आणि गाण्यांमुळे चित्रपट तुफान चालला (आणि हो ओमप्रकाशचा 'मुन्शीजी पण कारणीभूत. मनमोहन देसाई गमतीनी प्रकाश मेहराला म्हणाला होता, शराबी 'शराबी' निकालता है, मर्द 'मर्द'  निकालता है. मनमोहन देसाईनी तरीही आत्महत्या केली हा भाग वेगळा.) असो!       
   
मद्यपी अमिताभच्या जगण्याची दोनच कारणं आहेत एक मुन्शीजी आणि एक जयाप्रदा. त्यामुळे तो या दोन बाबतीत फार हळवा आहे. किशोरचा आवाज काही तलत सारखा कापरा वगैरे नाही पण या गाण्यात  त्यानी जो काही स्वर लावलाय ना तो ऐकत रहावा असा आहे. 'कश्तिया साहिल पे अक्सर डूबती हैं प्यार की; नंतरचा म्युझिक पिस मात्रं अगदी लक्षात राहिलाय. रेडीओला रात्री ते  'बेला के  फूल' लागायचं  बघ, माझा मामा ते ऐकूनच झोपायचा. निरव शांततेत अंधारात ही अशी गाणी फार मनाला भिडतात असा माझा अनुभव आहे.  
 
काही प्रश्नांची उत्तरे सोप्पी असतात, काही अवघड असतात, काही शोधावी लागतात पण या गाण्यात प्रश्नं हताश करणारे आहेत. पावलं साथ देत नाहीत तर काय उपाय असू शकेल? पहिल्या कडव्यात तर मी अंजानच्या प्रेमातच पडलोय. आशा निराशेचा खेळ काय मस्तं मांडलाय त्यानी. बुडत्याला काडीचा आधार, दूर कुठेतरी आशेचा किरण आणि बुडणा-या माणसाला जर कुठे हुरूप येतोय तर तो सर्वव्यापी अंगावर वीज पाडतोय, काय करावं बरं माणसानी? अज्ञात शक्तीशी लढतानाचा हताशपणा क्लेशदायक आहे.
दुस-या कडव्यात पण हताशपणाच आहे. प्रेम करायचा गंभीर गुन्हा केलाच आहे मी, मला शिक्षा व्हायलाच पाहिजे, हे जग, माझी प्रेमिका पत्थरदिल आहेत, दगडाला कधी पाझर फुटतो का? मग माझी उमेद कितीही मोठ्ठी असली तरी काही कामाची नाही. सुंदर लिहिणं म्हणजे काय? तर दुस-यानी लिहिलेलं आपल्याला ते स्वत:शी, स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी साम्यं सांगणारं आहे असं  वाटणं. याचा अर्थ अंजान सुंदर लिहितो.
 
चांगलं काम केल्यावर शाब्बासकी मिळतेच असं नाही. पण या गाण्यासाठी किशोरला आणि चित्रपटासाठी बप्पीला फिल्मफ़ेअर मिळालं होतं, अंजानला मात्रं नाही. आपल्याकडे तसंही योग्य माणसाला दरवेळी बक्षिस मिळतच असं नाही. अन्नू मलिकला 'बाजीगर' साठी मिळालं होतं. परिक्षक ही जमातच महान बघ. त्यातलं 'ऐ मेरे हमसफर' एल.पी.च्या 'मि.एक्स इन बॉम्बे' मधल्या 'खूबसूरत हसीना, जानेजां जानेमनची' कार्बन होती. बहुतेक परीक्षक लोकांनी ओरिजिनल गाणंच ऐकलं नसावं.
 
चल पुढच्या पत्रापर्यंत बाय. तोपर्यंत 'तुम अपनी जगह, मैं अपनी जगह'. :)
 
जयंत विद्वांस