Monday 30 June 2014

रेस....

रेस - सगळीकडेच आहे. शिक्षण घेतोय आपण, ज्ञान नाही. आपण सुशिक्षित असू कदाचित सुसंस्कृत नाही अजून. त्याची फळं आहेत ही. बदलती सामाजिक परिस्थिती, लक्झरीचे बदलणारे निकष, स्टेटसच्या भ्रामक कल्पना आणि त्यासाठी वाढवलेल्या गरजा, वाढणारे खर्च अशा ब-याच गोष्टी कारणीभूत आहेत. प्रगतीकरता 'अजून' हा शब्दं गरजेचा असतो. अजून चांगलं काय करता येईल, सुधारता येईल, सोप्पं करता येईल. असा विचार येणं हेल्दी आहे पण 'अजून' ला हवं चिकटलं की त्याची हाव होते. 'भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी?' या भावनेतून सगळी रेस सुरु होते. माझ्याकडे का नाही? मी येनकेन मार्गाने  हवं ते मिळवेनच मग माझी लायकी ते कमावण्याची, भोगण्याची असो, नसो.

सगळ्या कन्सेप्टच बदलल्यात. बायको आणि फोन एकाच लेव्हलला आलेत, टच आणि कॉन्फिगरेशन महत्वाचं. मिरवणं महत्वाचं, उपयोग नंतर. मग त्याकरता पैसे हवेत, मोठ्ठ घर, कार पाहिजे, २-४ क्रेडीट कार्ड्स पाहिजेत, बँक ब्यालंस पाहिजे. नाहीये? मग  कर्ज  काढण्यात  काही  गैर  नाही.  मग  त्याचे  हप्ते  आले. ते फेडायला जास्तं कष्ट आले. मग आयुष्यं गहाण टाकायचं. अधून मधून या सगळ्या गोष्टींचा जमलं तर वापर करायचा. पण हे झुगारून देणं अवघड होतं मग रेस मधे धावत रहायचं. मनाला लावून घ्यायचं नाही, खरं तर काय लागतं सुखी व्हायला? प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या त्यामुळे निकष वेगळे पण आनंद वाटून घेणं आणि आनंद होणं  यात  फरक आहे. उन्हातून आल्यावर नरड्यातून माठातलं  गार पाणी आत गेल्यावर होतोच की आनंद.  पण  फ्रीज  मधून  कोल्डड्रिंक काढून एसी चालू करून सोफ्यावर पडण्यात पण सुख आहेच की. पण मग ते मिळवण्यासाठी धावणं गरजेचं आहे. कुठे  थांबायचं कळत नाही, कळलं तरी वळत नाही, जगायचं, उपभोगायचं मात्रं राहून जातं. कासव व्हायचं की ससा ज्याचं त्यांनी ठरवायचं.          




जगून घे जरा.....

 
काळ धावतोय, तू ही पळतोस,
काळ जिंकतोय, मागे टाकतोय,
जमलंच तर जगून घे जरा

अर्धवट स्वप्नं, उडालेली झोप,
पैश्यांचा राशीत, हरवली नाती,
सापडली तर जगून घे जरा

तारुण्य सरलं, कितीसं उरलं,
जर्जर होशील, मातीत जाशील,
जाण्याआधी थोडं जगून घे जरा

-- जयंत विद्वांस 

Tuesday 24 June 2014

'आनंद'…

हा चित्रपट बघून दरवेळेस मी मानसिक त्रास करून घेत आलोय. धड जीव जातही नाही आणि रहातही नाही अशी परिस्थिती होते. परवा म्हणजे १५ जूनला सेट म्याक्स टू ला परत एकदा बघितला आणि परत बघायचा नाही असं मी ठरवलंय. सांगितलंय कुणी वेळ घालवून दु:खी व्हायला. 'शोले' मधलं प्रत्येक पात्रं किती मिनिटं पडद्यावर आहे याला महत्वं नाही, तरीही ते लक्षात रहातं. 'आनंद' मधे ही तसंच होतं. पेशंट 'असित सेन', 'मिस्टर आणि मिसेस कुलकर्णी' 'श्री व सौ.सीमा रमेश देव', पहिलवान 'दारासिंह', 'रेणू' सुमिता संन्याल आणि तिची फक्तं एकाच शॉट मधे दिसणारी आणि खाऊन टाकणारी, डोळ्यात टचकन  पाणी आणणारी प्रेमळ, गोड खळ्यांची मालकीण आई 'दुर्गा खोटे', चिरक्या  आवाजात  बोलणारा  आणि  बाकावर बसून हमसून हमसून रडणारा बद्रुद्दिन काझी उर्फ 'जॉनी वाकर', कडक मेट्रन 'मिसेस डिसा' 'ललिता पवार', थोड्या दिवसांची ओळख असलेल्या आणि थोड्याच दिवसांची सोबत असलेल्या आनंद साठी देवाला कौल लावायला जाणारा घरगडी 'रघू काका', आनंदसाठी आपण काहीही  करू शकत नाही त्यामुळे चिडचिडा झालेला, आतून तुटत चाललेला, देवाला न मानणारा पण रघूकाकाला परवानगी देणारा गंभीर डॉ. भास्कर 'अमिताभ' आणि ज्या माणसाच्या भोवती या बाकी सगळ्यांचा जीव घुटमळतोय तो आनंद सहगल 'राजेश खन्ना'. 



ही झाली पडद्यावर दिसणारी माणसं. पडद्यामागून वार करणारी पण भरपूर आहेत. लेखणीला सुरीसारखी धार लावून भोसकणारा संवाद लेखक गुलझार (ते कमी पडेल की काय म्हणून 'योगेश' बरोबर दोन गाणीही लिहिलीत), 'कही दूर जब' आणि 'जिंदगी, कैसी ये पहेली है' असं  काव्यं  लिहिणारा  योगेश,  संध्याकाळच्या कातरवेळेचा नेमका फिल देणारा मुकेश, संगीतकार सलिल चौधरी. सगळे मिळून कट केल्यासारखे मिळेल तेंव्हा दोन तास भोसकत असतात. 







या चित्रपटाबद्दल ब-याच गंमतीशीर गोष्टी मी वाचल्यात, ऐकल्यात. चित्रपटाच्या सुरवातीला 'राजकपूरला समर्पित' अशी पाटी येते. त्याचं कारण चित्रपट बघताना कळत नाही. हृषीकेश मुखर्जी आणि राजकपूर चांगले मित्रं  होते. राजकपूर गंभीर आजारी होता तेंव्हा बेचैन झालेल्या हृषिदांना ही कथा सुचली. आर.के. त्यांना 'बाबू मोशाय' म्हणायचा. आधी म्हणे किशोरकुमार 'आनंद' आणि मेहमूद 'बाबू मोशाय' करणार होता. दोघांबद्दल आदर आहेच पण त्यांनी नाही केलं तेच बरं झालं. 'आराधना'चं यश किशोरकुमारच्या पाठीशी असून सुद्धा सलिलदांनी मुकेशचा आवाजच हवा तो करूण फील देईल असं म्हटलं आणि खन्नानी ते ऐकलं पण. ज्या ज्या वेळेस त्यानी ऐकलं आणि हातवारे कमी केले ते त्याचे सुंदर चित्रपट होते. 'आनंद' आणि 'नमकहराम' मधे त्याच्या बरोबर काम केल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की मीच मला तगडा प्रतिस्पर्धी उभा केलाय आणि ती माझी घोडचूक होती. 'आनंद' मधे त्यानी चेह-यावर दाखवलेली उद्विग्नता माझा अभिनयाच्या तोडीस तोड होती ज्यानी मी धास्तावलो खरं तर' असं  राजेश खन्नानी एका मुलाखतीत कबूल केलं होतं. 

अमिताभचं नवखेपण चित्रपटभर जाणवतं. बुजलेला, शामळू, सुशिक्षित, सरळमार्गी, ज्ञानाची किंमत माहित असलेला पण त्यालाही मर्यादा आहेत हे समजल्यावर त्याने दाखवलेली घुसमट मात्रं लाजवाब. आनंदवर तो चिडतो तेंव्हा तो उत्स्फूर्त वाटतो, अभिनय नाही वाटत तो. त्याच्या आनंदी रहाण्याचा राग येतोय त्याला. तो कुढत रडत बसला असता तर कदाचित नसता रागावला तो, त्यानी त्याला सहानुभूती दिली असती पण ती संधीही आनंद देत नाही याचाही राग त्यात आहे.


 ललिता पवारांबद्दल काय बोलावं. श्री ४२० ची केळेवाली, अनाडी मधली (पण) 'मिसेस डिसा' लाजवाबच होत्या. एकाच बारीक डोळ्याचा वापर खुनशीपणा, कपटीपणा दाखवण्यासाठी व्हायचाच  पण माया दाखवताना तो कधी आड आला नाही त्यांना. मराठीतल्या इंदिरा चिटणीस एक त्यांना तोडीस तोड होत्या. खाष्ट दिसायच्या पण फणसासारख्या होत्या. ललित पवार आणि ओमप्रकाश  फार मेलो ड्रामा न करता एखाद्या शब्दाने पण टचकन पाणी आणायचे. रमेश, देव सीमाच्या घरी गेल्यावर डॉक्टर म्हणून देहबोलीतून दाखवलेला आदर, सीमावर दाखवलेली माया आणि आनंद यायच्या आत, बांध फुटू नये म्हणून जाण्याची लगबग काय सुरेख दाखवलीये त्यांनी. हे असे अभिनयसंपन्न लोक केशारासारखे असतात, काडीभर टाकतील पण असा काही रंग आणतील की ज्याचं नाव ते.

परत बघायचा नाही 'आनंद' असं ठाम ठरवलंय. पण कधी ब-याच दिवसात डोळे नाही स्वच्छ झाले तर बघावाच लागणार, नैसर्गिक उपाय बरा. 
--जयंत विद्वांस 

अमर अकबर अंथोनी.....

अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, योगायोग हा जीवनात महत्वाचा घटक आहे, मुर्खपणा भाबडेपणाने मांडला तर जास्तं भावतो. ही सगळी एकमेकांशी संबंधित नसलेली विधानं आठवायचं कारण म्हणजे मनमोहन देसाई. काल सेट म्याक्स २ ला  अमर अकबर अंथोनी कितव्यांदा तरी बघितला. या पिक्चरचं गारुड काही संपत नाही. मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलेला लास्ट शो. पाचवीला असेन, सोनमर्गला  पाहिला  होता मी. त्यानंतर खूप वर्षांनी. पहिल्या फटक्यात तो आवडला होताच नंतरही आवडत राहिला. 
 
 
निरुपा रॉयला रक्तं देतात त्या शॉटवर अनंत वेळा अनंत जणांनी लिहून झालंय. मी दवाखान्यातच काम करत असल्याने काल मात्रं ढसाढसा हसलो. पण पहिल्यांदा पाहिला तेंव्हा मात्रं आईचं आणि मुलांचं रक्तं एकसारखंच असतं आणि एकमेकांना कडेला झोपवून भरता येतं असा खरं कळेपर्यंत कितीतरी वर्ष माझा समज होता. पण त्या गैरसमजामधे विश्वास होता - काही झालं आपल्याला तर आईचं रक्तं मिळेल किंवा आपलं तिला - हा विश्वास ज्ञानामुळे मिटला.
याची स्टोरी, स्टारकास्ट, गाणी, अमिताभचा आरशासमोरचा सीन याबद्दल बच्चा बच्चा जानता है. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम म्हणजे मनमोहन देसाई. पहिल्याचा दुस-याशी संबंध असेल असं अजिबात नाही पण बघायला मजा येते ना तसं. डोकं वगैरे अवयव वापरायचे असतील तर तुम्ही त्याचे सिनेमे बघायला लायकच नाही. हे असं कुठे असतं का, हे  अतीच होतंय, आम्ही एवढे मुर्ख आहोत का असे प्रश्नं पडत असतील तर तुम्ही देसाई ऑप्शनला टाका. दिसायला सोप्पा विषय पण अभ्यास कराल तर प्रचंड अवघड. ते त्याचं तोच करू जाणे.

'परदा है परदा' मधे 'तो तो तो अकबर तेरा नाम नही है…' ही एकंच ओळ रेकॉर्ड करून किशोरकुमार अमेरिकेला कार्यक्रमासाठी निघून गेला. ७७ साली एल.पी.नी ते कसं मिक्सिंग केलं ते तोच जाणे. गाणी तर सगळी अफाटच. दोन कव्वाल्या,  माय नेम इज, तय्यब अल्ली  प्यार का दुष्मन, हमको तुमसे आणि शेवटचं अनहोनी को होनी करदे झकासच. मुकेश आणि महेंद्र कपूर विनोद खन्ना साठी, रफी आणि शैलेंद्र ऋषी कपूर साठी आणि किशोर एकटा अमिताभ साठी. सगळ्या बायका लताच्या आवाजात. अनहोनी ला रफी आणि  हमको तुमसे ला महेंद्र कपूर का नाही (किंवा उलट) हे विचारायचं नाही. मनमोहन देसाईना हे कुणीही विचारायचं नाही.
 
आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत याची जी काय लिंक आहे ना त्यासाठी आपले फूल मार्क्स आहेत. सगळं कसं वेळेत कुठलाही गोंधळ न होता एकमेकाला ते बरोब्बर समजतं. सर्वधर्मसमभाव तर कुठलाही प्रचारकी आव न आणता तो जपतो. हिंदू किशनलाल रॉबर्टच्या मुलीला जेनी म्हणून वाढवतो. जीवनवरचा राग  त्याच्या मुलीवर नाही काढत. त्याच्या ड्रायव्हरची मानसिकता बघा किती उच्चं दर्जाची आहे ती. अशी सगळी चांगली मुल्यं मात्रं तो कसोशीने जपतो. अकबर, अंथोनी अनाथ असल्यामुळे ज्याला सापडतात त्याचा धर्म त्यांना मिळतो. बरं प्रत्येकाची प्रेयसी त्याच्या त्याच्या धर्माची, उगाच वाद नको. देसाई म्हणजे सरळ माणूस बघा. सगळ्यांना खुश ठेवणार.  



म्हणाल तर विनोदी, म्हणाल तर मुर्खासारखे प्रश्नं, उपप्रश्नं मलाही पडलेत. 
१) हिरोंच्या वयाच्या क्रमानुसार सिनेमाचं नाव 'अमर अंथोनी अकबर' असं का नाही?
२) ऋषी कपूर उजवीकडून डावीकडे उर्दू मधे जी चिठठी लिहून देतो ती चिठठी नितू सिंह डावीकडून उजवीकडे एका सेकंदात कशी वाचते?
३) डॉ.नीतूसिंहला नाडी बघून परवीन बाबी गरोदर आहे हे कसं कळतं? (ते खरं किंवा शक्यं असेल तर प्रेग्नन्सी टेस्टला लोकं पैसे का फुकट घालवतात?) 
४) आघाताने डोळे गेल्यास डोक्यावर नेमका कुठल्या भागावर आघात केल्याने दिसू लागतं?  


रामानुजन यांची गणिती कोडी सोडवायला लोक धाव घेतात पण मेडिकल सायन्सचा अभ्यास करणारे लोक यात लक्ष घालत नाहीत याचं दु:खं होतं. मनमोहन देसाईनी माझ्या सगळ्या प्रश्नांना निश्चित उत्तरं दिली असती याची मला खात्री आहे. 
१) मुर्खा, 'अमर अकबर अंथोनी' ला जो -हिदम आहे तो 'अमर अंथोनी अकबर' ला आहे का? (नावाच्या क्रमवारीत काही नसतं हे त्याचं क्रेडीट हुकलंच).
२) त्या क्षणाला  घाई होती, परवीनच्या मदतीला जाणं गरजेचं होतं तिथे असल्या फालतू गोष्टींना महत्वं द्यायची गरज नाही.
३) जुने वैद्य नाडी परीक्षेवरूनच सांगायचे. (नीतूसिंहनी आयुर्वेदात एम.डी.केलेलं असतं असंही कदाचित त्यानी सांगितलं असतं). 
४) ये, एका फटक्यात तुझे डोळे घालवतो, परत तिथेच फटका मारून नाही आले तर सांग. (माझी माघार)



मनमोहन देसाईंचे डेव्हिड धवन सारखे पाचकळ वारस बघितले की मग त्याची किंमत कळते. वरकरणी निर्बुद्ध, असंबंध वाटणारी पण स्वच्छ, निखळ, मूल्यं जपणारी, सर्व गुणदोषांचे कंगोरे दाखवणारी सांगितिक करमणूक करणं सोप्पं काम नाहीये. त्यानी त्याच्या हिशेबाप्रमाणे, कुवतीप्रमाणे चित्रपट काढले आणि लोकांना ते आवडले. दादा कोंडके आणि देसाई यांच्यात हे  फार मोठं साम्यं आहे. कुणीही कितीही टीका करू दे, नाकं मुरडू देत ते चित्रपट काढत राहिले, लोक  पहात राहिले. 
 
 
मी पहिल्यांदा ज्या वयात अमर अकबर बघितला तेवढ्याच वयाची माझी मुलगी आत्ता हा चित्रपट ती वारंवार बघते आणि तिला तो आवडतो. सदतीस वर्षं झाली. ती तिच्या मुलांनाही कदाचित हा दाखवेल आणि वाढलेल्या ज्ञानामुळे तिलाही असेच प्रश्नं पडतील आणि उत्तरंही सापडतील. 

एम.डी.वुई रियली मिस यू. तुझ्या भाबडेपणात, अशक्यं योगायोगात पण मजा होती राव. 
 
 
--जयंत विद्वांस 

Monday 16 June 2014

लल्याची पत्रं (१४) …'सजन रे झूठ मत बोलो…'

'शंकर'सिंह रघुवंशी-'जयकिशन' पांचाळ, शंकरदास केसरीलाल उर्फ 'शैलेन्द्र', 'मुकेश'चंद माथूर आणि  रणबीर'राज' कपूर ही चौकडी स्वप्नंवत होती बघ. (हो, त्याचं पूर्ण नाव तेच होतं. त्यांच्या सगळ्यांच्या नावापुढे  'राज' असतंच. शमशेरराजउर्फ शम्मी, बलबीरराज उर्फ शशी, असो! नातवाला आजोबाचं नाव काय ठेवलं, लफडी करण्याचे गुण मात्र घेतलेत बघ). फणीश्वरनाथ रेणूंच्या 'मारे गये गुलफाम' या कथेच्या प्रेमात शैलेन्द्र पडला आणि पूर्ण झोपला. त्यानीच काढला होता हा सिनेमा. 
 
सगळे योग जुळून आले होते. सुंदर कथा, गाणी स्वत: शैलेंद्र (मारे गये गुलफाम फक्तं हसरत जयपुरी), सगळी गाणी हिट, राजकपूर, वहिदा, बासू भट्टाचार्य. पण…  सिनेमा फ्लॉप झाला. आर.के.च्या निवांतपणामुळे शुटींग लांबलं, खर्च वाढला त्यात सिनेमाही पडला. त्या धक्क्यानी आणि  आर्थिक अडचणींनी त्रासून शैलेंद्रनी परत सिनेमा म्हणून काढायचा नाही ही 'आखरी कसम' पाळण्यासाठी १४ डिसेंबर ६६ ला कायमची विश्रांती घेतली. ६७ साली याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. क्लासिक चित्रपटांच्या यादीत नाव मिळवण्यासाठी तो चित्रपट लोकांना आधी न आवडणं गरजेचं असतं की काय माहित. 
 
एका पेक्षा एक सरस गाणी होती. 'आ, आ भी जा…', चलत मुसाफिर…', 'दुनिया बनानेवाले…', 'सजनवा बैरी हो गये…' आणि आशाताईंच्या कडक आवाजातलं 'पान खाओ सैय्या हमारो…'. अफाट आहे बाबा ती  बाई एक. हसते  काय, विजेसारख्या ताना काय घेते पण त्या गाण्याविषयी परत कधीतरी. आज मी म्हणतोय ते आहे 'सजन रे झूठ मत बोलो….'. आपल्याला इयत्ता पहिलीमधे धडा असायचा बघ - शरद डोंगर बघ, सरू चटई घाल, रमेश चेंडू टाक. शैलेंद्र तशी गाणी लिहायचा. साधी, सोपी, सरळ, सुटसुटीत. उगाच शब्दांचा बडेजाव नाही, अलंकारिक भाषा नाही, यमक वगैरेचा अट्टहास नाही, नाकासमोर चालल्यासारखं पण काळजाला हात घालणारं लिहायचा. 
 
'वर' गेल्यावर ज्याच्या त्याचा कोण भगवान, अल्ला, येशू असेल त्याला जाब द्यावा लागतो हे सगळ्यांनीच म्हटलंय. ते पटावं म्हणून संत लोकांनी अभंग लिहिले, कव्वाल्या झाल्या, पुस्तकं झाली, भाषणं, प्रवचनं झाली. पण गाण्यातून जो संदेश मिळतो नातो जास्तं परिणामकारक असतो कारण ते आपण गुणगुणतो. अर्थ कळो न कळो तोंडात ते येतं सतत, ज्या दिवशी अर्थ कळतो त्या दिवशी मग ते फिट्ट बसतं डोक्यात. ग्रेट मेन थिंक अलाईक असं म्हणतात. भाषा, मांडणी काय ती वेगळी बघ. चढता सूरज धीरे धीरे…. मधे या गाण्यातलं सगळंच आहे, फक्तं बाज वेगळा. तो म्हणतो, 'याद रख सिकंदरके हौसले तो भारी थे, जब गया था दुनियासे दोनो हाथ खाली थे...'. शैलेंद्र म्हणतो, 'न हाथी है न घोडा है, वहां पैदल ही जाना है.., तुम्हारे महल चौबारे, यहीं रह जायेंगे सारे'. अजीज नाझा शिरा ताणून सांगतो, 'कल जो तनके चलते थे अपनी शान शौकत पर….', शैलेंद्र म्हणतो, अकड़ किस बात की प्यारे, ये सर फिर भी झुकाना है'. 
 
 
 
'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतसे ईश्वर…' हे आपलं मराठी झालं, शैलेंद्र काय वेगळं सांगतोय, 'भला कीजे भला होगा, बुरा कीजे बुरा होगा, बही लिख-लिख के क्या होगा, यहीं सब कुछ चुकाना है'. 'कट्यार काळजात घुसली' मधे 'भजनाविण सारे दिन गेले….' मधे दारव्हेकर म्हणतात 'बालपणा रमविण्यात गमविला, यौवनात धन लौकिक सारे', सुधीर मोघे म्हणतात, 'बालपण उतू गेले अन्‌ तारुण्य नासले, वार्धक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी, दयाघना! आणि याच अर्थाचं शैलेंद्र म्हणतो, 'लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देखकर रोया, वही किस्सा पुराना है'. सांगायचा मुद्दा हा आहे की ही मोठी माणसं एकसारखा विचार करतात. प्रत्येकाची शैली वेगळी, त्याला दिलेली चाल वेगळी, काही अवघड तर काही सोप्प्या, तोंडावर रुळणा-या पण अर्थ एकच. 
 
मरणापेक्षा मरणाची भिती जास्तं त्रासदायक आहे नाही. जगताना धर्मानी, संस्कारांनी, समाजानी, मनानी घालून घेतलेल्या, ब-याचवेळा लादलेल्या बंधनांनी जखडलेले आपण खरं तर मनासारखं किती जगतो हा प्रश्नंच आहे. न पाहिलेल्या परमेश्वराला घाबरतो, त्याला जाब देताना काय द्यायचा याच्या काळजीत सतत सावध वागतो आणि आयुष्यातला आनंद नासवून तर नाही ना टाकत आपण असं वाटतं. समाजात. शिस्तं रहावी म्हणून गरजेचं असेलही म्हणा ते. जाऊ दे, फार विचार नको करायला. मनाला उत्तर देताना भिती वाटणार नाही असं जगणं आपल्या हातात आहे, ते करणं उत्तम. चल, पुढच्या गाण्यापर्यंत बाय.         
  
            
--जयंत विद्वांस 
 
सजन रे झूठ मत बोलो
खुदा के पास जाना है
न हाथी है न घोडा है
वहां पैदल ही जाना है

तुम्हारे महल चौबारे
यहीं रह जायेंगे सारे
अकड़ किस बात की प्यारे
ये सर फिर भी झुकाना है
सजन रे झूठ...

भला कीजे भला होगा
बुरा कीजे बुरा होगा
बही लिख-लिख के क्या होगा
यहीं सब कुछ चुकाना है
सजन रे झूठ...

लड़कपन खेल में खोया
जवानी नींद भर सोया
बुढ़ापा देखकर रोया
वही किस्सा पुराना है

Tuesday 10 June 2014

लल्याची पत्रं (१३) …'लागा चुनरीमें दाग…'

काही काही गाणी अजरामर आहेत बघ. १९६३ चा 'दिल ही तो है', जन्मं पण नव्हता झाला तेंव्हा आपला. ५१ वर्षं झाली. लिहिणारा साहिर, संगीतकार रोशन, गायक मन्ना डे आणि राज कपूर, नूतन  आज  कुणीही हयात नाही. गाणं मात्रं टिकून आहे. स्पर्धांमधून हुकमी मार्क मिळण्यासाठी का होईना लोक  म्हणतात  अजून.  पण  प्रत्येकालाच  झेपतं  असं  नाही.  मुळात  मन्नादांची अमिट छाप त्या गाण्यावर आहे. ऐकताना  आपण त्यांच्याप्रमाणे कितपत म्हटलंय हे लक्षात ठेवूनच ऐकतो त्यामुळेही असेल पण ते दुस-याच्या आवाजात आवडत नाही मग. 
 
 
 
रोशन बद्दल काय बोलावं (त्याचं आणि साहीरचं 'बरसात की रात' मधलं 'ना तो कारवांकी तलाश है…' असंच एका अजरामर गाणं आहे). मागे मी या मोठया लोकांची एक गंमत वाचली होती. मदन मोहननी ६४ साली 'आपकी परछाइया' मधे एक गाणं दिलं होतं 'यही हैं तमन्ना…'. रोशन त्या चालीच्या प्रेमात पडला. त्यानी रीतसर परवानगी घेतली आणि ६६ च्या 'ममता' मधे हिट गाणं दिलं 'रहे न रहे हम…'.  आर.डी.नी त्यावरून ८५ ला 'सागर' मधे 'सागर किनारे….' आणि राजेश रोशननी ९६ ला 'पापा कहते है' मधे 'घरसे निकलते ही…'. सांगायचा मुद्दा हा की १९६४ ते २०१४ शब्दं, गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेते बदलले पण सुरावट अजरामर आहे. जुनं नव्या रुपात आलं की ते जास्तं आकर्षक होतं (म्हणजे रिमिक्स नव्हे). 
 
सुफी गाण्यांमधे किंवा काही उर्दू गझलांमधे ती वरकरणी प्रेयसीला किंवा अन्यं कुणाला उद्देशून असली तरी ती ईश्वराला उद्देशून पण असते असं मी वाचलंय. बुलेशाहनी लिहिलेलं नुसरत फतेह अलीचं 'मेरा पिया घर आया…' त्याच धर्तीवर होतं (अन्नू मलिकने त्याला चहाटळ केलं). तसंच हे गाणं आहे. गाण्यात वरकरणी वडिलांना घाबरणारी तरुणी असली तरी शेवटच्या कडव्यात ईश्वराचं आणि आपलं नातं साहीर सांगतो. सर्वसामान्यं लोकांना मरणाची भीती वाटते ती आपण या जगात आता असणार नाही म्हणून, विचार करणा-या लोकांची भीती वेगळीच. 'त्या'ला उत्तरं काय द्यायची असा मोठ्ठा प्रश्नं त्यांना  पडतो. खोटं बोलता येणार नाही कारण 'त्या'ला सगळंच कळतं, माहिती पण आहे, काय गंडवणार.          
 
येताना कसा हा आत्मा कुठलाही रंग, अभिनिवेष न घेता, कोरा करकरीत, मातीच्या गोळ्यासारखा आणला होता. त्याला कुठलाच आकार नव्हता, अमुक एक आकार, रंग हवाच असा आग्रहही नव्हता. जगण्याच्या धडपडीत, षडरिपुंच्या सहवासात त्याला हवा तसा आकार येत गेला, 'त्या'ला हवा तसा मात्रं नाही. या जगातून 'त्या'नी बोलावलं की परत यायच्या बोलीवर सगळ्याला हो म्हणालो. 'त्या'नी फक्तं एवढंच सांगितलं होतं की तुला हवं   ते कर, फक्तं मला जाब देताना डोळ्यात डोळे घालून देता आला म्हणजे झालं. उत्सुकता होती, नवीन  दुनिया बघायची, अनुभवायची, भोगायची. वाईट गोष्टींची, आरामाची, सुखाची चटक लवकर लागते. मन भरत नाही, वासना तृप्तं होत नाहीत, अतिभोगानी शमवू म्हटलं तर उलटंच होतं, ठिणगीला वारा लागावा अन क्षणात वणवा पेटावा असं होतं. कधी मायेपोटी, कधी असूयेपोटी, कधी सत्तेसाठी, कधी संपत्तीसाठी मूळ सचोटीचा मार्ग पायाखालून निसटून अध:पतनाचा मार्ग कधी सुरु होतो कळतच नाही. तकलादू ध्येयं गाठण्यासाठी जगणं राहूनच जातं. ज्यासाठी जीव टाकला, अनंत लटपटी केल्या ते यश नव्हतंच हे समजल्यावर फुटलेला भ्रमाचा भोपळा. अशावेळी सगळं सगळं आठवतं, मनाला कसं फसवणार, ते ही जमत नाही, 'त्या'ला काय उत्तर देणार हा तर चिंतेचाच भाग मग. 
 
आपण तर सर्वसामान्यं. इतके डाग पडतात की मुळ वस्त्रं स्वच्छ करण्यासाठी आपल्याला परत नेणं 'त्या'ला गरजेचंच होत असणार. आपली भीती वेगळी, 'त्या'ची काळजी वेगळीच. 'त्या'चा हा खेळ  शतकानुशतके चालू आहे. 'तो' दमत नाही आणि आपणही नाही, रिमोट 'त्या'च्याकडे आहे एवढाच काय तो फरक. असो.     
 
साहीरनी अर्क दिलाय. फाफटपसारा नसलेला, गागर में सागर म्हणतात  तसा.  राजकपूरला  संगीताची  नुसतीच  जाण  नव्हती  तर  तो वाद्यंही वाजवू शकायचा (जाने कहा गये वो दिन… ची मुखड्याची चाल त्याची  होती). मन्नादा म्हणतात त्याप्रमाणेच त्याचं तोंड हलतं, अगदी तराण्यात सुद्धा, समेवर मान हलते, एक प्रेक्षणीयं आणि श्रवणीयं आनंद आर.के.नी दिलाय हे मात्रं  खरं. अगदी असंच नाही पण साधारण याच प्रकारातलं (लिखा कुछ है, कहता कुछ है) भैरवीतलं 'बाबुल मोरा….' पण मला आवडतं. मी सैगल, भीमसेन जोशी आणि हृदयनाथ मंगेशकरांचं ऐकलंय. त्याबद्दल परत कधीतरी. 
 
लागा चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे
चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...

हो गई मैली मोरी चुनरिया
कोरे बदन सी कोरी चुनरिया
जाके बाबुल से नज़रें मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...

भूल गई सब बचन बिदा के
खो गई मैं ससुराल में आके
जाके बाबुल से नज़रे मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...

कोरी चुनरिया आत्मा मोरी
मैल है माया जाल
वो दुनिया मोरे बाबुल का घर
ये दुनिया ससुराल
जाके बाबुल से नज़रे मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग...
--जयंत विद्वांस 

लल्याची पत्रं (१२) …'जीवनसे भरी तेरी आंखे …'

मागच्या पत्रात तुला  म्हटलं ना की किशोरकुमार गांगुली काही गाण्यांना जरा आतलाच सूर लावतात. 'गीत गाता हुं मैं…' तसंच हे ही गाणं, 'जीवनसे भरी तेरी आंखे…'. काही नटांच्या नशिबात शब्दंसुरांचे अप्रतिम योग होते. राजेश खन्ना, देव आनंद त्यात अग्रणी. यांच्या एकाच चित्रपटातली सगळी गाणी हिट, सुंदर, अर्थपूर्ण असायची. गाणी हा हिंदी सिनेमांचा अविभाज्यं भाग आहे. पहिल्यांदा तो श्रवणीयं असायचा हल्ली  प्रेक्षणीयं असतो एवढाच काय तो फरक.

'सफर'ची इंदीवर आणि कल्याणजी-आनंदजी जोडीची सगळी गाणी हिट होती. 'हम थे जिनके सहारे…', 'नदिया चले चले  रे धारा…', 'जो तुमको हो पसंद….' आणि किशोरचं अजरामर 'जिंदगी का सफर…' ही  बाकीची. शर्मिला टागोरचा अतिलाडिक अभिनय गाण्यांमुळे सुसह्य होतो. 'आनंद' आणि 'सफर' दोन्हीत कर्करोगी पण गाल  चांगले वर असलेला राजेश खन्ना. मुळात त्या आजारामुळे मिळणारी सहानुभूती, जोडीला अशी गाणी मग  काय लोक गर्दी करणारच की बघायला.

काही शब्दांचे अर्थ माहित नसले की अर्थ लागत नाही ओळीचा किंवा विचित्रं लागतो. या गाण्यातल्या 'सागर भी तरसते…' यात 'सागर' म्हणजे मद्द्याचा चषक हे फार नंतर समजलं  तो पर्यंत समुद्रं  तुझ्या रूपाचा रस पिण्यासाठी आतुर आहे हे काही पटायचं नाही. मरण समोरच्या वळणावर दबा धरून बसलेलं आहे हे माहित असताना जगण्याची निर्माण होणारी अनावर इच्छा आणि ते शक्यं नसल्यामुळे येणारी हताशता मोठी जीवघेणी आहे. (जॅकी, डिंपलचा 'काश' पण असाच सुरेख होता, हताशपणा म्हणजे काय ते सांगणारा). माणसाला मरण समजलं की तो भरभरून जगण्याचा प्रयत्नं करतो. डोळ्यात प्राण आणून वाट  बघणं आणि डोळ्यात प्राण, जिवंतपणा असणं किती फरक आहे ना. जगण्याशी संपलेली आशा, निरुत्साह, कशातच रस न  वाटणे अशा स्टेजला एखादं आनंदाने भारलेलं, भारावून टाकणारं, क्षण न क्षण उत्साहात जगणारी  व्यक्ति सामोरी आली तर ती हताशता अजूनच वाढत असावी.         

स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन जो तो आपापल्या परीनी शब्दाभांडाराच्या, अनुभवाच्या जोरावर करत असतो. अतिशयोक्ती हा अलंकार वापरणं जास्तं सोयीस्कर असतं बघ त्यासाठी. एखाद्या गोष्टीची परमोच्चता कशी  दाखवणार नाही तर. लैला मजनू मधली लैला काळी, कुरूप होती असं म्हणतात पण कवी लोकांनी, गीतकारांनी तिला सुंदर केलंच. व्यक्ती सुंदर असणं आणि समोरच्याला ती वाटणं यात फार फरक आहे. इंदीवर  म्हणतो, सौंदर्य एवढं अफाट आहे की चित्रात, कवितेत कशातूनही व्यक्तं होऊ शकत नाही. फार तर फार जवळपास जाऊ शकतो आपण. त्याच्या हृदयाचं स्पंदन ती, शरीराचा प्राण ती. वा-याची झुळूक, चाफ्याचा गंध, हरणाच्या पोटाचा मलमल स्पर्श, लहान बाळानी मुठीत बोट घट्ट पकडल्यावर झालेला आनंद, तिनी चोरून बघताना नेमकं आपण बघणं, शब्दात कसा सांगता येणार.
 
माणूस एकदा प्रेमात पडला ना की त्याला सगळं सुचतं बघ आणि आपटला की काहीच सुचत नाही. इंदीवरनी तिला अगदी अप्सराच करून टाकलंय. श्वासात फुलबाग, कमळाचा कोमल देह, सोनेरी चेहरा, हरणाची चपळता, काय नी काय एकेक. प्रत्येकालाच असं सगळं कसं मिळणार? म्हणून तर चित्रपट चालतात. सत्यं विसरून स्वप्नं बघायला, स्वप्नातलं बघायला, त्यात काही काळ रमायला तर आपण त्या अंधारात जातो. चित्रपट, त्यातले संवाद, गाणी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मानसोपचारच आहे. कुणी पहात नाही गं अंधारात. आपण लहान मुलासारखे खदखदून हसतो, कधी दबलेल्या हुंदक्याला अजिबात थांबवत नाही, कधी घाबरून घट्ट खुर्ची पकडतो, कधी लवकर संपलं स्वप्नं म्हणून चुटपुटतो तर कधी नवं काही गवसल्याच्या आनंदात बाहेर पडतो.

बरं, चल पुढच्या गाण्यापर्यंत बाय. तुला पत्रं लिहिणं हा ही मानसोपचारातलाच एक भाग आहे. :)

"जीवन से भरी तेरी आँखें
मजबूर करे जीने के लिए
सागर भी तरसते रहते हैं
तेरे रूप का रस पीने के लिए

तसवीर बनाए क्या कोई
क्या कोई लिखे तुझ पे कविता
रंगों छंदों में समायेगी
किस तरह से इतनी सुन्दरता
एक धड़कन हैं तू दिल के लिए
एक जान हैं तू जीने के लिए

मधुबन की सुगंध हैं साँसों में
बाहों में कमल की कोमलता
किरनों का तेज हैं, चहरे पे
हिरनों की हैं, तुझ में चंचलता
आँचल का तेरे हैं तार बहुत
कोई शाख जिगर सीने के लिए"

--जयंत विद्वांस   

Thursday 5 June 2014

पाऊस.....

पाऊस कधीचा पडतो
पानांना मोती लगडतो
द-या डोंगरी बागडतो
पाऊस.....

पाऊस सुगीचा पडतो
एकाचे हजार करतो
सुखाचे गाणे म्हणतो
पाऊस.....

पाऊस असा का पडतो
फासाचे दोर विणतो
जगणे वाहून नेतो
पाऊस.....

पाऊस कधी का हरतो
होत्याचे नव्हते करतो
अस्तित्वं मिटवूनी जातो
पाऊस.....

--जयंत विद्वांस