'नूतन'. माहेरची नूतन समर्थ, नंतर बहल, हम आपके… च्या मोहनीश बहलची आई, तनुजाची बहिण, काजोलची मावशी या असल्या इतर ओळखींची तिला गरज भासणार नाही असं काम तिनी चौपन्नं वर्षाच्या आयुष्यात केलंय. नर्गिस सारखीच ती कॅन्सरनी गेली. फक्तं सत्तर चित्रपट केले तिनी. रुढार्थानी ती सुंदर नाही. मग खरं तर रुढार्थ आता बदलायला हवेत. पण हाय चिक बोन्स, तरतरीत नाक, सावळी असली तरी आकर्षक पण सोज्वळ चेहरा, अमिताभ सारखी इम्पेरियल स्लिम आणि पडद्यावरही जाणवणारी उंची आणि सहज वावर तिला सुंदर करून सोडतात. (आता नाविन्यं नाही राहिलं, तब्बू, सोनाली बेंद्रे सारखे बांबू भरपूर आले.) अभिनयाशी व्यस्तं असते का उंची? तसं असेल तर नूतन अपवाद. वास्तववादी, परीघाबाहेरचा, अमुक तमूक स्कूलच्या पठडी मधला असं कुठलंही लेबल न चिकटलेला अभिनय करायची.
किशोरकुमार बरोबर सी ए टी क्याट म्हणताना ती जेवढी सुंदर दिसली तेवढीच धीरगंभीर आणि सुंदर घालमेल बलराज सहानीच्या 'तू प्यार का सागर है' च्या पार्श्वभूमीवर तिनी दाखवली. नूतननी पण एकदा बिकिनी घातली होती दिल्ली का ठग मधे, शर्मिलानी एकदा बहुतेक इव्हिनिंग इन प्यारिस मधे, राखीनी एकदा शर्मिली मधे (हेमा मालिनीनी माझ्या माहितीप्रमाणे नाही, ईशा देवलनी कसर भरून काढली म्हणा).तिला गरज नव्हती अशा प्रसिद्धीची पण आपणही हे करू शकतो, उगाच कुणाचा गैरसमज नको किंवा नूतन बिकीनीला घाबरते असं पसरायला नको म्हणूनही घातली असण्याची शक्यता आहे. शेवटपर्यंत तिचं कुणाशीही नाव जोडलं गेलं नाही. एक संसारी, वादात, लफड्यात न पडणारी सुसंस्कृत, मितभाषी उत्तम स्त्री अशीच तिची प्रतिमा मला तरी दिसत आली आहे. आई आणि बहिणीच्या पावलांवर न जाता तिनी संसार केला. भंकस मुलाखती नाहीत, मी अमुक एक चित्रपटाकरिता किती मेहनत घेतली असले किस्से नाहीत, तिच्या मौनात, अभिनयात काहीतरी खंत लपलेली आहे असं मला कायम वाटत आलेलं आहे.
नूतनची 'सरस्वतीचंद्र'मधली 'मै तो भूल चली…', 'छोड दे सारी दुनिया.. .' 'चंदनसा बदन…' आणि 'फुल तुम्हे भेजा ही खतमें…' अविस्मरणीय आहेत. 'मै तो भूल चली….'.ती जेवढी गोड दिसलीये तेवढीच दु:खी ती 'छोड दे सारी दुनिया…' म्हणताना वाटते. पिक्चरची स्टोरी नसेना का लक्षात किंवा माहित बघणा-याला, नूतन अर्थ मात्रं पोचवते. 'मेरी जंग' आधी अमिताभ करणार होता आणि जावेद जाफरीची भूमिका अनिल कपूर. पुढे कास्ट चेंज झाली. वेडी झालेली नूतन आणि ज्वालामुखी बच्चन बघायला मजा आली असती. उंच आईचा उंच मुलगा.
तिनी राजकपूर बरोबर अनाडी, छलिया, देवानंद बरोबर पेईंग गेस्ट, तेरे घरके सामने, अमिताभ बरोबर सौदागर, सुनील दत्त बरोबर सुजाता, खानदान, मिलन आणि उतारवयात दिलीपकुमार बरोबर एकंच चित्रपट केला 'कर्मा'. खरं खोटं देवाला माहित आणि त्या दोघांना. एका चित्रपटात ते दोघं होते. लव्ह सीन होता. दिलीपकुमार मुद्दाम डोक्याला जास्तं तेल लावून आला होता. तिच्या गालावर डोकं घासून तो मेकअप मुद्दाम बिघडवायचा. स्टारपणाची मस्ती. नूतननी दोन-तीन वेळा समजावलं मग शेवटी थोबाडीत ठेवून दिली. आत्मसन्मान राखला तिनी, सिनेमा गेला. मला या गुणामुळे ती जास्तं सुंदर वाटते.
जयंत विद्वांस