Thursday 7 August 2014

वागणूक.....


ऐंशी सालची गोष्ट असेल. हल्लीच्या तरुण पिढीचे चाळे बघितले तर ही गोष्ट काळाच्या फार पुढची आहे आणि ती माणसंही अर्थात. माझ्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट आहे ही. तेव्हा हसू आलं होतं. वाटलं असं कसं असू शकेल. पण कळायला लागल्यावर त्या वृद्ध जोडप्याची कुचंबणा लक्षात आली. आपल्या बाबतीत असं किंवा या सदृश्य काही घडलं तर आपण काय करू हा भिकार खेळ सुरु होतो मग. 

बाबा दुकानात काम करायचे. त्या काळचा तो डेक्कनचा मॉलच होता एकप्रकारचा. जोशी-अभ्यंकर खून खटल्यातले अभ्यंकर कुटुंबीय, प्रो.करमरकर, किर्लोस्कर, प्रतिभाताई पवार, शोभना रानडे, नृत्यांगना मनीषा साठे अशा दिग्गज लोकांची ये-जा असायची. अगदी घरगुती संबंध असल्यासारखं दुकान होतं. एकतर सगळी पॉश वस्ती. नुसते खाऊन पिऊन सुखी नाही तर चार पैसे चांगले राखून असणाऱ्या माणसांची वस्ती. 

एक दुकानात नेहेमी येणारे आजोबा रोज सकाळी आठच्या सुमारास दुकानात येऊ लागले. दहा साडेदहा पर्यंत गप्पा मारायचे आणि जायचे. पहिले दोन दिवस वडिलांना काही विशेष असं वाटलं नाही. नंतर जाणवलं की ते आठच्या ठोक्याला येतात आणि दहाला निघतात. कसं विचारायचं हा प्रश्न होता. आठवड्यानंतर धीर करून बाबांनी विचारलं. 'काका, काही प्रॉब्लेम आहे का?' आजोबांना रडूच फुटलं. सांगेन म्हणाले. बाबांनीही पुन्हा विषय काढला नाही. दोन चार दिवसांनी तेच म्हणाले बाबांना, या, चहा पिऊया शेजारच्या टपरीवर. 

आजोबांचं सांगून झाल्यावर हतबुद्ध होण्यापलीकडे बाबा काही करू शकले नाहीत. सल्ला द्यावा असं काहीच नव्हतं कारण त्यात. आजोबांनी सांगितलं - 'सांगताना सुद्धा लाज वाटतीय हो, पण काय करू, माझाच मुलगा आणि सून हल्ली जे वागतात ते माझ्या वयाला सहन होण्यापलीकडचं आहे. बाबा - छळ वगैरे करतात का? आजोबा - छे हो, तो परवडला असता. दोघेजण एकत्र आंघोळीला जातात. जाऊ देत पण फोन आला, कुणी आलं, कुठे आहेत असं विचारलं तर सांगताना माझी फार कुचंबणा होते. हे ही एक वेळ मान्य केलं पण सकाळी उठल्यापासून दोघेही जण घरभर अंतरवस्त्रात फिरतात. मुलाचं ठीक आहे, सुनेकडे बघायची सुद्धा मला लाज वाटते, सांगून पाहिलं तर म्हणे तुम्ही बघू नका ना. म्हणून मी बाहेर पडतो आणि ते गेले की घरी जातो. 

नंतर काही दिवसच ते आले दुकानात. कदाचित नंतर त्यांनी गल्ली बदलली असावी किंवा सून मुलगा सुधारले असावेत, माहित नाही. लक्षात घ्या. गोष्ट ३४ वर्षांपूर्वीची आहे. अजून सुद्धा घरात बायका अंतरवस्त्रात फिरत नाहीत. मुंबई सारख्या शहरात एका खुराड्यात चार चार जोडपी एकत्र राहतात त्यांना प्रायवसी नाही मिळत, ते सुद्धा असं वागत नाहीत. माणूस एवढा का बदलतो अचानक? आई वडिलांनी काय संस्कार केले नसतील का? मग असे अचानक जादू झाल्यासारखे गायब कसे होतात? काय करायचय ते बंद खोलीत करा की लेको. काळ बदललाय असं म्हटलं तरी ही गोष्ट अजून तरी आपल्या घरात घडत नाहीये, पुढचं कुणी सांगावं??? 

-- जयंत विद्वांस  

No comments:

Post a Comment