घारे डोळे, दणकट शरीरयष्टी, पाच फुटाची उंची, हातात सतत पिशवी, त्यात असंख्य पेपर (शब्दकोडं नसेल तर तो पेपर भिकार), विडी बंडल, दोन तीन माचिस (संपलेल्या पण असायच्या एक दोन, आपण फेकू लागलो की चिडायचा 'राहू दे रे खायला मागतायेत का तुला, पावसात उपयोगी येतात सादळल्या बाकीच्या की'), प्यांट राजकपूर सारखी कधी लांडी तर कधी चप्पल झाकेपर्यंत, शर्टला इस्त्री वगैरे भानगड बापजन्मात नाही, दोरीवरचा वाळलेला शर्ट अंगात घालणे इतकी सोपी क्रिया, झालर लावल्यासारखे केस आणि मधे अगदी सागरगोट्यासारखं तुळतुळीत डोकं, मानेभोवती कायम उपरणं कापून त्याचे केलेले मोठ्ठाले रुमाल, उजव्या हातात एचएमटीचं घड्याळ, भुवयांच्या मधे लावलेलं बोटभर उंचीचं लालगंध आणि तोंडात विडी नाहीतर शिव्या.
गावाला त्याचं कुणीही नव्हतं आता. पोटासाठी पुण्यात आला आणि इथलाच झाला. तुटपुंजा पगार, आजारी आई वडील यामुळे त्यानी लग्नं केलंच नव्हतं. त्याला सगळा स्वयंपाक यायचा. तल्लख बुद्धी, तिरकस भाषा, अफाट वाचन, दुस-याला चांगलं सांगण्याची तळमळ आणि स्वच्छ चारित्र्यं अशा सगळ्या गुणावगुणांसकट तो वाड्याचा झाला होता. वाड्याचा रखवालदारच तो. मधलं अंगण रोज सकाळी झाडून काढताना पुटपुटल्यासारखे मनाचे श्लोक म्हणायचा. माझे बाबा त्याला कोकणी रामदास म्हणायचे. सुट्टीत रात्री जागवायचा पोरात पोर होऊन. कोडी घालायचा, भसाड्या आवाजात मराठी न ऐकलेली गाणी, श्लोक म्हणायचा. कदाचित त्याचं हरवलेलं बालपण शोधायचा. केवळ शालेय शिक्षण नसलेला हा तल्लख ब्रम्हचारी आम्हांला काय काय देऊन गेला याची यादी नाही करता येणार. वाचा, ज्ञान मिळवा, वाया जाणार नाही हे सांगतानाची त्याची तळमळ आता कुणात दिसत नाही.
वयं वाढत गेली. वाटा बदलत गेल्या. वाडा आणि माणसं म्हातारी झाली, काही संपली, काही दुसरीकडे गेली, जनाकाका आहे तिथेच आहे. आम्हीही वाडा सोडला, कोथरूड वरून हल्ली गावात येणं होत नाही फार. परवा वाड्याच्या मालकांनी बोलावलं होतं, वाडा बिल्डरला द्यायचा म्हणून मिटिंग होती. वाड्यात ब-याच वर्षांनी गेलो. मिटिंग झाली. जनाकाकाही होता. 'घर घेऊन करू काय? मला पैसे द्या. माझ्यासाठी नकोत, अनाथ विद्यार्थी गृहाला देणगी द्या तेवढ्या रकमेची ग्रंथालयासाठी. माझी भाजी भाकरीची तजवीज मी केलीये.' वाड्याच्या मालकांचा मुलगा आला होता मिटींगला. त्याच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव होते. सगळं असून सुद्धा वाटा मागायला आलेलो आम्ही जनाकाका पुढे पार खुजे ठरलो.
निघताना त्याच्या घरात गेलो. डोक्याचा पार सागरगोटा झालेला. ह्यांगरला लावतात तसा शर्ट दिसत होता त्याच्या अंगावर. बस म्हणाला. 'सिगरेट असेल तर दे, विडीनी त्रास होतो'. मी सिगरेट दिली. 'कसा आहेस'? 'आहे अजून, एवढंच. आता वाचन होत नाही. डोळ्यातून पाणी येतं चष्मा लावून पण. ऐकूही थोडं कमी येतं. पण ऐकतो गाणी, टेप बंद झाला तरी कळत नाही पण माझ्या कानात ती वाजत असतात. वाचतोस की नाही काही रोज? का फक्तं पेपर हेच वाचन? वाचत जावं रे रोज चार ओळी तरी. माझं आयुष्यं संपत आलंय, शेवटची पानं राहिलीत. मला वाटलं संपेल लवकर पण खंड दिसतोय बहुतेक. असो! येत जा रे अधून मधून, तेवढंच बरं वाटतं. जूनला ये, पोरांच्या वह्या पुस्तकांना कव्हरं घालून देतो, सकाळचेच या, जेवा आणि जा दुपारी.' मला हुंदका आवरला नाही. माझ्या पाठीवरून हात फिरवून म्हणाला, 'अरे, रडतोस कशाला. तुला माया आहे म्हणून ये म्हटलं. आता तुमची ती ई-बुक की काय आली एकदा शाळेत की कशाला कव्हरं लागतील मग. काळाचा महिमा. असो! येत जा, उलथलोय की नाही ते कळणार कसे नाहीतर तुला?'
मी उठून पाया पडलो आणि येतो रे म्हणून निघालो आणि नात्यागोत्याच्या नसलेल्या माझ्या काकासाठी वाड्याबाहेर येउन हमसाहमशी रडलो फक्तं.
--जयंत विद्वांस