Monday 25 May 2015

वन्स अपॉन अ टाईम (१७).....

निखळ कौतुक ऐकायला नशिबात लागतं. 'याचा चेंडू आत्ता वळेल मग वळेल याला कंटाळून फलंदाज आउट होतो. शेवटचा कधी वळलेला रे? याला लेग स्पिनर का म्हणतात? मुनाफ पटेलचा स्पीड एवढाच आहे की' असे आणि इतर अनेक कुत्सित टोमणे त्यानी ऐकले आणि कानामागे टाकले. मुळात तो मिडीयम पेस टाकायचा (उंची ६' २") आणि कोर्टनी वाल्श (उंची ६' ६") लेगस्पिन टाकायचा. दोघांच्या कोचला सुबुद्धी सुचली आणि त्यांनी खांदेपालट केला. म्हणून वाल्शच लेगकटर खतरा होता आणि याचा गुगली.

मला वेस्ट इंडीज विरुद्धची एका कपची फायनल आठवतीये. त्यानी १२ मधे सहा घेतलेल्या. अम्ब्रोजला बोल्ड काढलेलाबॉल भन्नाट स्पीडचा यॉर्कर होता, कुणीही आउट झालं असतं. तो जिगरबाज होता, न कंटाळता गोलंदाजी करायचा. त्यानी एका डावात काढलेल्या दहा विकेट मी पाहिल्यात. खतरा बॉलिंग होती. जबडा फ्र्याक्चर असतानाही तो खेळायला उतरला होता वेस्टइंडीजमधे आणि तो सामना आपण वाचवला होता. भारतात त्याच्या सोबतीने अजूनही काही लोक पैसे कमवून गेले सॉरी टेस्ट खेळून गेले (राजू, फेकी राजेश चौहान) कारण टेस्ट आपण भाराभर जिंकायचो इथे. वार्नच्या स्पिनची दहशत होती तशी याच्या स्पीडची आणि गुगलीची. भल्याभल्यांना मी स्टंप समोर माती खाताना बघितलंय, प्लम एलबी. कुणाच्या नशिबात काय रेकॉर्ड असेल सांगता येत नाही. चामिंडा वाझनी ९६ टेस्टनंतर शतक काढलं होतं यानी ११८ सामने घेतले शतक काढायला. भारताचा कप्तान झालेला तो एकमेव लेगस्पिनर आहे.

भारतातर्फे खेळलेल्या काही सभ्य लोकांपैकी हा एक होता. तो, लक्ष्मण, सचिन, द्रविड, गांगुली एकावेळी खेळले हा मात्रं अत्यंत सुंदर योग होता भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला. अत्यंत सभ्यं, आल तेंव्हा चष्मा लावणारा, अभ्यासू, कमी बोलणारा, अथक मेहनती माणूस होता तो. शेवटपर्यंत तसाच राहिला तो, चष्मा गेला फक्तं, लेन्स आल्या एवढाच काय तो फरक. एक उत्तम माणूस, चारित्र्यसंपन्न खेळाडू म्हणून तो कायम लक्षात राहिला. त्यानी जिंकायची सवय लावली, म्याच विनिंग बोलर, विकेट टेकिंग बॉलर ब-याच कालावधीनंतर लाभला होता. तो बी.ई.(मेक्यानिकल) आहे. आधीची एक मुलगी असलेल्या मुलीशी त्यानी लग्नं केलंय. केरळमधल्या कुंबळा गावात त्याच्या नावाचा रोड आहे.

नका का त्याचा चेंडू वळेना. शिस्तं आणि अचूकता याच्या जोरावर त्यानी टेस्ट/वनडे/फर्स्टक्लास मधे अनुक्रमे ६१९/३३७/११३६ विकेट्स घेतल्यात. त्यानी एकूण ४०८५० चेंडू टाकलेत टेस्ट मधे (मुरलीधरन ४४०३९), खायचं काम नाही महाराजा. चेंडू वळत नाही तर ही परिस्थिती, वळला असता पंचेचाळीस अंशात तर? रिझल्ट बघा रे, तीन नंबरला आहे तो, चेंडू वळत नाही म्हणे….

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment