Saturday 26 December 2015

साधना….

साधना….

दिलीपकुमार ९३, धर्मेंद्र ८०, वैजयंतीमाला, माला सिन्हा ७९, मनोजकुमार ७८, शशी कपूर, हेलन, वहिदा ७७, संजयखान ७४, आशा पारेख, जितेंद्र, अमिताभ ७३, तनुजा ७२, तबस्सुम, सायरा बानू ७१, विनोद खन्ना ६९, मुमताझ, रणधीर कपूर ६८, डयानी, हेमा मालिनी, बबिता, मौशुमी, जया भादुरी ६७. राकेश रोशन, फरीदा जलाल ६६, मिथुन, शबाना, लीना चंदावरकर ६५, झीनत ६४, ऋषी कपूर, अमितकुमार ६३, रेखा ६१. काळ काय झटझट सरला. ज्यांच्या चित्रपटावर मोठे झालो ते सगळे आता साठीच्या पुढे गेलेत किंवा गेलेत. प्रेमापोटी ते आपल्याला अजून तरुण वाटतात पण ते नाहीत आणि आपणही पन्नाशीकडे वाटचाल केल्याचं जाणवतं. सत्तरीच्या पुढचा फक्तं अमिताभ काय तो कार्यरत आहे. २००७ सालच्या जॉनी गद्दार मधे धमेंद्र दिसल्याला सुद्धा आठ वर्ष झाली. बाकी सगळे अधून मधून कुठेतरी दृष्टीस पडतात. देखणा जॉय मुखर्जी असाच विपन्नावस्थेत गेला, त्याच्या स्टेशनरीच्या दुकानात बसायचा म्हणे. त्याला शम्मी म्हणालेला, तू परत काम कर, त्यानी नकार दिला कारण त्याला त्याचं ते म्हातारं रूप दाखवायचं नव्हतं. काल साधना शिवदासानी नय्यर गेली. बबिताची चुलत बहिण, करीना करिष्माची चुलत मावशी. 

कराचीवरून फाळणी झाल्यावर सिंधी शिवदासानी कुटुंब मुंबईत स्थिरावलं. सिंधी असून पण ती सुटलेल्या अंगाची, तुपट चेह-याची नव्हती. अतिशय नितळ आणि लोभस चेहरा. कुठलंही खास वैशिष्ठ्य नसलेली ती एक सुंदर चेह-याची साधी मुलगी होती. वडिलांना नृत्यांगना साधना बोस आवडायची म्हणून तिचं नाव साधना ठेवलं होतं. साधनाला पहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. १९५५ च्या 'श्री ४२०' मधल्या 'मूड मूड के ना देख' मधे ती कोरस डान्सर होती. साठ साली आलेल्या निर्माता शशधर मुखर्जीच्या 'लव्ह इन सिमला'मधे त्याचा मुलगा जॉय हिरो होता आणि साधना होती आणि तिला कपाळ लहान दिसण्यासाठी 'ऑड्री हेपबर्न'चा कट देऊन 'साधना कट' फेमस करणारा दिग्दर्शक होता आर के नय्यर यांनी साठ सालचा हिट सिनेमा दिला. तिनी मग त्याच्याशीच लग्नं केलं, ९५ ला नय्यर जाईपर्यंत तिचं वैवाहिक जीवन होतं, तिला मुलबाळ काही नव्हतं. तिच्या केशरचनेची क्रेझ होती. अंगाला चिकटवल्यासारखा फिट्ट सलवार कमीझ घालायची आयडिया पण तिचीच होती जी पुढे पोट सुटलेल्या, शोभो न शोभो, नायिकांनी पण वापरली. 

रहस्यमय मराठी 'पाठलाग' वरून आलेला 'मेरा साया', 'वह कौन थी', 'राजकुमार', 'वक्त', 'आरजू', लतानी गायलेलं एकमेव मादक 'आ जाने जा' असलेला 'इंतकाम', लुळ्या देवानंदचा 'हम दोनो' असे मोजकेच सिनेमे मला पाहिल्याचे आठवतात तिचे. सदाबहार 'झुमका गिरा रे'च्या स्टेप्स 'एक दो तीन'वाल्या तेंव्हा नृत्यंदिग्दर्शक सोहनलालची सहाय्यक असलेल्या सरोजखानच्या आहेत. तिचा चेहरा गीताबाली, फरीदा जलाल सारखा गोबरा नव्हता पण लोभस होता. मला साधना म्हटलं की कृष्णंधवल रंगात टेरेसवर 'असली नकली' मधलं 'तेरा मेरा प्यार अमर' म्हणणारी सिल्क साडीतली, अंबाड्यावर वेणी घातलेली, प्रसन्न चेह-याची सोज्वळ, सात्विक सुंदर दिसणारी, कोपरापर्यंत बाह्यांचा ब्लाउज घातलेली साधना आठवते. संपूर्ण गाण्यात फक्तं तिच्या चेह-यावरचा गोडवा बघावा. 'राजकुमार' बघताना मला त्याचं नाव राजकुमारी हवं होतं असं अनेकदा वाटलं होतं. संपूर्ण चित्रपटात ती अफाट सुंदर दिसली होती. मेकप वगैरे असतो मान्यं आहे पण मूळ मटेरीअल देखणंच होतं, मेकपनी फारतर शार्पनेस वाढला असेल सौंदर्याचा. तिनी एकूण ३३ चित्रपटात काम केलं आणि त्यातले २७ हिट होते पण तिला फिल्मफेअर कधीच मिळालं नाही, वह कौन थी आणि वक्त साठी नामनिर्देशित होती ती फक्तं.    

एकदा तिचा फोटो बघितला आणि काळ किती भीषण सूड उगवतो ते जाणवलं. थायरॉइडमुळे तिच्या डोळ्यांवर परिणाम झाला होता. जागा सोडलेले बटाट्यासारखे डोळे, आत गेलेले गाल, खप्पड दिसत होती, हीच का ती? असा प्रश्नं पडावा अशी. आशा पारेख, वहिदा, नंदा आणि हेलन एवढंच तिचं शेवटचं मैत्र होतं. मधे नंदाही गेली. तबस्सुम सांगत होती, 'ढासळणारी तब्येत आणि मागे लागलेलं कायद्याचं झेंगट' यासाठी तिनी अनेकांची मदत मागितली आणि कुणीही पुढे आलं नाही शेवटपर्यंत. कदाचित तिचे भोग संपल्यावर ती कर्करोगाने गेली. आशा भोसलेच्या मालकीच्या बिल्डींगमधे ती भाड्याने रहात होती. तिच्या अंत्ययात्रेला तरुण म्हणावी अशी दीप्ती नवल (५८) तेवढी होती बाकी सगळे तिच्या मागचे पुढचे. 

प्रसिद्धीची सवय झाल्यावर वयानी आलेली हतबलता किती त्रास देत असेल याची कल्पना करायची पण मला इच्छा होत नाही. काय करत असतील हे लोक? प्रचंड रिकामा वेळ, सोडून गेलेलं सौंदर्य, तारूण्य, बरेचवेळा ओढवून घेतलेली विपन्नावस्था, एकाकीपण, आपल्या वयाचं, आपलं ऐकणारं माणूस आसपास नाही, विचार केला तरी अंगावर काटा येतो. काय वाटत असेल आरशात बघताना की आपलेच जुने फोटो बघत असतील, यशाच्या बातम्या वाचत असतील, आठवत असतील?

तिचं 'तेरा मेरा प्यार अमर' मला कायमचं आवडून गेलेलं गाणं आहे कारण त्यात तो साधना कट नाही, फिट्ट ड्रेस नाही, आहे ते एक सोज्वळ, सुंदर, सालस सौंदर्य, ठसलेलं (अशीच 'सुवासिनी' मधली अंबाडा घातलेली सीमा देव). त्या गाण्यात शेवटच्या कडव्यात ती म्हणते न तशी ती काल 'चलती हू मैं तारों पर, फिर क्यो मुझ को लगता ही डर' म्हणत जिथे कसलीही भीती नाही अशा ठिकाणी तारोंपे चलते हुए निघून गेली एवढं खरं.  

जयंत विद्वांस 

 

Saturday 12 December 2015

अज्ञानात सुख असतं.....

अज्ञानात सुख असतं..... 

'अज्ञानात सुख असतं' या वाक्यात खूप काही दडलंय. अफाट आनंद आहे, बालसुलभ औत्सुक्य आहे, अचानक काहीतरी नवीन गवसल्याचा भारावून टाकणारा हर्ष आहे, ज्ञानानी होणा-या दु:खापासून, क्लेशापासून वंचित ठेवणारं अमृत आहे, आपल्याला जे ज्ञात आहे तेच अंतिम, चांगलं अशी वरवर कुपमंडूक वाटणारी पण सुखी ठेवणारी वृत्ती आहे, एक निरागस बाल्यं जपता येईल असं काहीतरी त्यात आहे. तुम्ही जेंव्हा नवीन असता तेंव्हा रहस्यकथा असो नाहीतर एखादं कोडं किंवा अगदी सुडोकू असो, ते सुटेपर्यंत जी बौद्धिक मजा येते त्यात अज्ञानाचा मोठा वाटा असतो. एकदा तुम्ही सराईत झालात की ती मजा जाते. अर्थात एखादी गोष्टं अनुभवाने, अनेकवेळा केल्याने अंगवळणी पडते आणि अज्ञान उघड्यावर ठेवलेलं पेट्रोल जसं गायब होतं तसं नकळत नाहीसं होतं. त्याचेही फायदे आहेतच पण अज्ञानात मिळणारा आनंद किंवा ते निष्पाप सुख त्यात नाही. अज्ञानातलं सुख आणि लहानपणा देगा देवा या एकाच दर्जाच्या गोष्टी आहेत. 

आम्ही एकदा नागपूरला गेलो होतो लग्नासाठी ८४ ला. सगळेजण एअरपोर्ट जवळ म्हणून तो बघायला गेलो होतो. नात्यातलीच एक बाई पहिल्यांदाच घर सोडून नागपूरला म्हणजे एवढ्या लांब गेली होती. तिनी अत्यंत आणि ख-या निरागसतेने विचारलं, 'यातून चक्कर मारायचे किती पैसे घेत असतील?' सगळेजण हसले, ती खट्टू झाली. एकानी तिला समजावून सांगितलं, ते किती खर्चिक आहे ते. खरंतर ८४ साली उपस्थितातल्या ९९ टक्के लोकांना खरंच किती पैसे घेतात हे ही सांगता आलं नसतं पण हसलो मात्रं सगळेच. तिला ज्ञान प्राप्तं झालं हे मान्यं आहे पण त्यातून निष्पन्न काय झालं? तर चक्कर मारण्याएवढे पण पैसे आपल्याकडे नाहीत हे दु:ख तिच्या पदरात आलं. काहीवेळेस न मिळालेल्या गोष्टी पण आनंद देणा-या असतात कारण अज्ञानामुळे आपण त्या प्राप्त झाल्याची स्वप्नं पहात असतो. 

त्या अजरामर 'अमर अकबर' मधे निरुपा रॉयला रक्तं देतात त्या शॉटला मी कायम ढसाढसा हसलोय. पण अजाणतेपणी पहिल्यांदा पाहिला तेंव्हा मात्रं आईचं आणि मुलांचं रक्तं एकसारखंच असतं आणि एकमेकांना कडेला झोपवून ते लगेच भरता येतं असं खरं कळेपर्यंत कितीतरी वर्ष माझा समज होता. पण त्या अज्ञानामधे विश्वास होता, एक दिलासा होता - उद्या समजा काही झालं आपल्याला तर आईचं रक्तं मिळेल किंवा तिला काही झालं तर आपलं तिला देत येईल - हा विश्वास ज्ञानामुळे मिटला. ज्ञान गरजेचं आहे हे मान्यं आहे पण त्या रक्तात पण ग्रुप असतात, अमक्याला अमुकच चालतो, वेळप्रसंगी ती बाटली मिळवण्यासाठी कसं दर दर की ठोकरे खात फिरावं लागतं, दुर्मिळ ग्रूप पण असतो म्हणे त्यात, या बाकी चिंता वाढल्या त्याचं काय? एका विशिष्ठ ठिकाणी डोक्यावर फटका बसून वर बघितलं आणि नेमक्या त्याच वेळी साईबाबांच्या डोळ्यातून निघणा-या दिव्यज्योती डोळ्यात शिरल्या की अंधा आदमी डोळस होतो, फक्तं सरपटत जाउन पायरीवर डोकं आदळायचं टायमिंग जमलं की झालं असंही वाटायचं तेंव्हा. साला मनमोहन देसाई एकदम निरागस माणूस असणार (ज्ञानप्राप्ती झाल्यामुळेच त्यानी जीव दिला असणार). 


त्या 'उत्सव'मधे एकदा तो शेखर सुमन रेखाचा एकेक दागिना काढतो (तो अजरामर हेवा आहे मला आजवर वाटलेला, मी त्या शॉटचे दहाबारा रिटेक करून विनामोबदला काम केलं असतं शिणमात), नंतर रेखा कंचुकीतली एक क्लिप काढते आणि सगळे दागिने झटक्यासरशी काढते. चारुदत्त खुळाच म्हणावा लागेल लगेच क्लिप काढणार असेल तर, काहीवेळेला मठ्ठ असल्याच्या किंवा तसं दाखवल्याचा फायदा असतो. समोरच्याला ते कळत असतं तरीपण त्यात मजा असते. सगळ्या ठिकाणी ज्ञान आहे म्हणून लगेच पाजळायचं नसतं, ना वसंतसेनेला मजा न चारुदत्ताला. वपु म्हणाले होते. 'नाविन्यासारखी चटकन शिळी होणारी दुसरी गोष्टं नाही'. त्यामुळे दरवेळेला ती क्लिप काढणे म्हणजे तो आनंद शिळा करणं आहे, घाईच्या वेळची गोष्टं अलाहिदा :P .   

आता तर काय नेटमुळे ज्ञान कमी आणि माहिती जास्ती मिळते. त्यामुळे धड अज्ञान पण नाही आणि पूर्ण ज्ञान पण नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला खेड्यातून आलेल्या माणसांच्या निरागसतेचा, भोळेपणाचा फार हेवा वाटतो. त्या बिचा-यांना ओढ वाटते शहराची, न्यूनत्व जाणवतं पण ते किती सुखी आहेत याची त्यांना कल्पना नाहीये. मधे एके ठिकाणी वाचलं होतं. कुठल्यातरी देशात एक माणूस तीस वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला. कोल्ड्रिंक्स कलर मधे मिळतात, कानाला हेडफोन लावून बोलता येतं हे बघून तो आश्चर्यचकित झाला म्हणे. ही दुनिया माझी नाही असं त्याला वाटलंही असेल कदाचित. ज्ञान मिळणं म्हणजे माघारी न येता येणारी प्रक्रिया आहे. नॉन रिटर्निंग व्हॉल्व्ह, पुढे जायचं, मागे एन्ट्री बंद. ज्ञान म्हणजे फूल होणं, एकदा ते झालं की कळीत्वं संपलं. ज्ञान म्हणजे  दुध - दही - ताक - लोणी - तूप अशी साखळी आहे. एकदा पुढे गेलात की मागच्या स्थितीतला आनंद संपला. 

म्हणून वर जरी म्हटलं ना अज्ञानात सुख असतं तरी फक्तं एकाच बाबतीत ते नसतं. 'शेवटी' आपण जातो म्हणजे नक्की कुठे जातो हे अज्ञान अजून तरी दूर झालेलं नाही याचं मात्रं प्रत्येकाला दु:खं आहे, भीती आहे. देव मोठा मजेशीर माणूस असणार. नियम सिद्ध करण्यासाठी तो त्याला अपवाद तयार करून ठेवतो. अज्ञानात सुख असतं म्हणतोयेस ना, घे, म्हण मग या बाबतीत पण. ते ज्ञान कधी प्राप्त होणार नाही हे ही निश्चित आहे त्यामुळे त्याची चिंता न करता सुखासाठी गरजेचं असलेलं अज्ञानाचं दही घुसळायची घाई करायची नाही म्हणजे झालं. 'शेवटी' ज्ञान किती मिळवलं हे कोण मोजतंय, सुख किती मिळालं याची गणती जास्ती झाली म्हणजे हस-या चेह-यानी तिकडे गेलं की झालो सुखी. 

जयंत विद्वांस 


Tuesday 8 December 2015

सौ.शिल्पा केळकर उपाध्ये…

सौ.शिल्पा केळकर उपाध्ये… 
 
आयुष्यात माणसं येतात, काही काळ रमतात, निघून जातात. काही लक्षात रहातात. माणूस आयुष्यातून गेल्यावर आपण त्याच्याबद्दल चांगलं बोलतोच, एकूणच आपल्याकडे तो बरोबर असताना, सहवासात असताना त्याचं कौतुक करणं, त्याच्या गुणांवर बोलणं कमी असतं. कुठलाही माणूस पूर्ण सद्गुणी नसतो तसा पूर्ण अवगुणीही नसतो, तो कसा आहे हे ब-याच वेळा आपण आपल्या सोयीनुसार, मतलबानुसार ठरवतो. कुठलाही माणूस 'आंधळे आणि हत्ती' या गोष्टीतल्या हत्तीसारखा असतो. सहवासात आलेल्या किंवा ओळखणा-या प्रत्येक माणसाबद्दलचं मत हे त्याला आलेल्या अनुभवातून, त्याच्या बुद्धीनी केलेल्या पृथ्थकरणातून, त्याच्या आवडीनिवडीनुसार असतं त्यामुळे अमुक एक माणूस असाच आहे हे कुणी ठामपणाने सांगू शकत नाही, सांगूही नये. अनेक लोकांचं एखाद्या व्यक्तीबद्दल जे समान मत असेल ते प्रमाण मानावं फारतर. उदा : एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला एखाद्या व्यसनी माणसाला दुस-या समव्यसनी माणसाबद्दल असणारं प्रेम किंवा तेच मत असणार नाही, एका क्षेत्रातल्या हुशार माणसाबद्दल दुस-या हुशार माणसाला असते तशी असूया असेलच असं नाही, त्यामुळे अमुक एक माणूस मला समजला असा सर्वंकष दावा कुणी करू नये. पुलं रावसाहेब लिहिताना हेच म्हणून गेलेत. म्हणून आपल्याला जी बाजू दिसली ती मांडावी, सांगावी, दुस-याला किंवा खुद्द त्या व्यक्तीला ती पटेलच असं नाही. पटो न पटो, आपण आपल्या मतांशी प्रामाणिक असलो की झालं. तर मूळ विषय शिल्पा केळकर उपाध्ये.....  

शिल्पाचा आणि माझा मेलव्यवहार ७-८ जुलै १५ च्या दरम्यान चालू झाला. ती अमेरिकेत असल्यामुळे एक बरंय, तिच्या कामाच्या वेळेत मी झोपलेलो असतो आणि माझ्या कामाच्या वेळेत ती. आम्ही 'काय अप्पा' वर खूप बोललोय, बोलतो, फोनवर बोललोय (अर्थात तीच करते म्हणून). तिच्यात समोरच्याचं ऐकण्याचा अतिशय दुर्मिळ गुण आहे. माझ्या पाल्हाळापुढे ती लक्षणीय कमी बोलते. आपण कितीही रस्ते सोडून पळत सुटलो तरी 'पडोसन'मधे मेहमूद जसा पेटीवर 'एक चतुर नार…' गाण्यात मूळ स्वर शोधून सुनीलदत्तला मूळ चालीवर आणतो ना तशी ती मूळ मुद्द्यावर सहज येते. अवांतर फोलपट तिच्या बुद्धीच्या वा-यात ती उडवून लावते त्यामुळे तिच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं, भीती म्हणून नाही तर ती एखादं वाक्यं, त्याचे संदर्भ, स्पष्टीकरण ती चार पाच दिवसांनी विचारू शकते, विचारते म्हणून. लॉजिकल थिंकिंग तिला आवडतं. एखाद्या गोष्टीची तर्काच्या कसोटीवर उकल झाली की तिला बरं वाटतं. फरक असतो, मी मत मांडतो, ती मला असं वाटतं असं म्हणते (केवढा बदल झालाय नं माझ्यात). 

तिची स्मरणशक्ती दांडगी आहे. तिला संदर्भ टपाटप आठवतात. वेगवेगळ्या वेळी केली तरी परस्परविरोधी विधानं ती झटक्यात पकडते. ती लगेच निष्कर्षावर येत नाही, प्रत्येक गोष्टीला वेळ दिला पाहिजे हे तिच्या स्वभावात आहे. राहूल द्रविड महान होता कारण फलंदाज चेंडू जेवढा उशिरा खेळेल तेवढे कुठे खेळायचं ह्याचे इतरांपेक्षा जास्ती पर्याय त्याच्याकडे असतात म्हणून तो महान असतो/होतो. तिच्याकडे पेशंस आहेत. लिखाणातल्या एखाद्या मुद्द्यावर ती मत लगेच व्यक्तं करत नाहीत, ती त्यावर चर्चा करते. माझ्यासारखा उतावळा माणूस त्यात काय चुकलं हे पहिलं सांगेल, ती आपल्याकडून वकीलासारखं काढून घेईल, आपण बदल मान्य करूच असे मुद्दे ती मांडेल याची मला खात्री आहे. लिखाणातली कुठलीही गोष्टं काल्पनिक असली तरी तिचे धागेदोरे आपल्या गतायुष्याशी, आलेल्या अनुभवाशी, बघितलेल्याशी, वाचनाशी संदर्भ सांगतात हे तिच्यामुळे मला लक्षात आलं, मी लिहायचो हे मान्यं पण हा विचार कधी माझ्या मनात आला नाही. चेह-यापाठीमागचा माणूस वाचायची मला सवय आहे तसं तिला कथेमागची प्रेरणा, मूळ शोधायची हौस आहे. आपण आपल्याबद्दल काही बोललो तर एखाद्या लिखाणात ते डोकावलं का हे तिला पटकन सापडतं.        

तिला चटपटीतपणा, नेटकेपणा, मुद्देसूदपणा आवडतो. माझ्या लिखाणावर तिचा एवढा लोभ असण्याचं कारण तेच आहे (माझ्या मते) कारण माझ्या लिहिण्यात तिच्यात असलेले गुण तिला दिसत असावेत. आठ जुलैच्या मेल मधे ती म्हणाली होती  - What I like the most about all these stories is the size and the twist. कोब्राटांचे जन्मत: काही गुण अवगुण असतात. पाल्हाळ नसतो, नेटकेपणा, काय सांगायचंय ते ठाम आणि ठरलेलं असतं, कष्ट पडले तरी चालतील तरी पण जे करतोय ते नीट, फ़्लॉलेस असावं, परफेक्शनची हौस आणि तिरकस बोलणं (इतर लोक त्याला कुचकेपणा म्हणतात, आपण लक्ष नाही द्यायचं). तिच्याकडे ती टोकदार विनोदबुद्धी निश्चितच आहे. स्मृतिचित्रे, ओव्हरड्राफ्ट, सूर्यास्ताची दिवाळी या सगळ्या वाचनात तिचा परफेक्शनचा सोस जाणवतो. हे ती कुणी चांगलं म्हणावं म्हणून करत नाही तर आपण जे करतोय ते चांगलं झालं पाहिजे या भावनेतून करते. ते स्वभावात लागतं. आनंद मिळवायचे अनेक प्रकार असतात. काही आनंद मानसिक असतात जे इतरांना कळोत न कळोत, त्या माणसाला कळतात, अवीट आनंद असतो तो. परफेक्शनचा आनंद तसाच असतो. ठरवल्याप्रमाणे ती गोष्टं झाली की तो मिळतो. ती तशी व्हायला दरवेळेला योगायोग उपयोगी पडत नाही त्याकरता ध्यास लागतो. ओव्हरड्राफ्ट वाचताना काही वाक्यं वेळेत बसण्यासाठी गाळावी लागत होती. कथेला बाधा येउन नये म्हणून तिनी मला विचारलं, कुठली वगळू? वास्तविक ती ते करू शकत होती पण ढवळाढवळ नको, लेखकाला ठरवू दे हा कोब्राट गुण आहे तिच्यात (बाकी लोक त्याला अलिप्तपणा म्हणतात, आपण लक्ष नाही द्यायचं).

Not a penny more, not a penny less अशी ती स्लिम ट्रिम आहे. आनंदानी कुठलीही गोष्टं करता यायला हवी. ती नेमाने चालायला जाते म्हणजे ती शिस्तीशी निष्ठावान आहे. किती किमी चाललो, किती वजन कमी झालं, किती दिवस खाडा न करता चालतोय असले हिशोब ती ठेवत नसावी म्हणून मग चालायला जाताना तिला सिगारवाला सापडतो. माणसं वाचायचा चाळा फार वाईट. तिचे डीपी आणि जे काय फोटू मी बघितलेत त्यात जाणवण्यासारखा एक मुद्दा आहे. सगळे कपडे प्लेन आणि मोस्टली सिंगल कलर आहेत. 'ए हास, फोटो काढतोय' असं म्हटल्यावर माणूस जसा उभा रहातो तसे तिचे फोटो आहेत, पोझ बिझ भानगड नाही. सगळ्या फोटोत ती एकसारखी हसलीये. याचा अर्थ फार शो करायची हौस तिला नाहीये. गुणांनी ओळख असावी असंही तिचं मत असावं. कसे दिसताय हे चिरकाल नसतं. पण कसे वागताय, गुण काय हे लॉंगरनमधे कळतं. मी काही तिने केलेलं खाल्लेलं नाही पण ती सुगरण असावी कारण दिवाळीला तिनी शंभर लाडू केले ते खप आहे म्हणूनच केले असणार ना? Either you are born host or guest असं म्हणतात. ती होस्ट आहे. सतत तिच्याकडे कुणी न कुणी येतं, जमतं, रहातं म्हणजे ती लोकांशी चांगली वागत असावी अशी दाट शंका घेण्यास वाव आहे. तिच्या तोंडून आज ती निवांत आहे असं मी क्वचित ऐकलंय इतके तिचे व्याप आहेत. सतत काहीतरी करत रहाण्याचं तिला व्यसन आहे.  

ती स्वत: वाचनीय लिहिते पण तिनी मला कितपत जमतंय हे बघण्यासाठी एक स्टोरी प्लॉट मला दिला आणि चक्कं मी एकांकिका लिहू शकलो. मजा आली लिहिताना कारण दृश्य लिहिण्याची मला आवड आहेच पण संवादातून ते लिहिण्याचं कसब मी कधी अजमावलं नव्हतं. नाटक, एकांकिका या विषयवार बोलण्याइतका माझा अभ्यास नाही, ज्ञान नाही पण तरीही मी लिहू शकलो (त्याची क्वालिटी काय यावर वाद होऊ शकतात पण मी लिहिलंय ते बघावं माणसानं) कारण तिची मूळ कथा छानच होती. मला फक्तं त्यात जागा भरणे एवढंच काम करायचं होतं. तिनी मला स्टोरीलाईन दिल्यामुळे अनेक शक्यता माझ्या बुद्धीच्या कुवतीनुसार मला अजमावता आल्या, मी लिहू शकेन याची तिला खात्री कशामुळे वाटली ते माहित नाही, नाही जमलं याला तर मी लिहीन असंही असावं तिच्या डोक्यात, माहित नाही. पण तिच्यामुळे एक नवीन प्रकार लिहून बघता आला. पुढेमागे ती अजून प्लॉट देईन आणि मी उच्छाद मांडेनही त्या प्रकारात.    


मी काही तिला अजून तरी भेटलेलो नाही. तिचा काय माझ्या बांधाला बांध नाही त्यामुळे वाद नाहीत. अजून पंचवीस वर्ष दोघं हयात राहू असं धरलं घटकाभर आणि ती आली दरवर्षी एकदा भारतात तरी आम्ही जास्तीत जास्ती पंचवीस वेळा भेटू शकतो. त्याच्यामुळे एकमेकांबद्दल वाईट मत होण्याचं काही कारण नाही. पुढेमागे तिची माझ्याबद्दलची आणि माझी तिच्याबद्दलची मतं बदलतीलही पण मला माझ्याच लिखाणावर प्रश्नं विचारून, त्याची उकल करून मला नविन दृष्टीकोन देणारी ती पहिली आहे, माझी साधी सोपी सरळ कथा वाचनात अभिनय केला की रिपीट व्ह्यालू असणारी होऊ शकते हे तिच्यामुळे समजलं (वाचनाचा प्रथम क्रमांक अर्थात स्वरूपाचा आहे, शिल्पाप्रमाणेच ती ही माझ्या लिहिण्यावर प्रेम करणारी आहे). माझी कथा वाचण्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी पाहिले नसले तरी ऐकून आहे, पुढेमागे अजून काही कथा तू नळी वर टाकूयात असं ती म्हणाली होती, ते होईल न होईल पण मला माझ्याच लिखाणात उमटणारा मी सापडवून देण्याकरता मी तिचा ऋणी आहे.

जयंत विद्वांस  

(यातला कुठलाही गुण तिच्यात कुणाला आढळल्यास तो योगायोग समजू नये ही विनंती. :P)


Monday 9 November 2015

मोठेपणी कोण होणार?.....

मोठेपणी कोण होणार?.....

आपण जन्माला येतो तेंव्हा काही माहित नसतं आपण पुढे कोण होणार ते. हाक मारायला बरं म्हणून आपलं नाव ठेवतात. मग ते आपल्याला चिकटतं ते कायमचंच. ते पुढं मोठं होतं की नाही ते आपल्या बुद्धीवर, मिळणा-या संधीवर, लायकीवर, कर्तुत्वावर अवलंबून असतं. लहानपणापासून आपले कुणी न कुणी वयपरत्वे आदर्श असतात. फार काळ प्रभाव टिकेल असं कुणी नसतं खरंतर पण आपल्याला अमक्या ढमक्या सारखं वागायची, रहायची सुरसुरी येते आणि आपण कळत नकळत अनुकरण करतो. आपण काय वाचतो, बघतो त्याप्रमाणे हंगामी विचार मनात रुजतो आणि नाहीसा पण होतो. माझ्या मनात तर नेते स्टेटमेंट नाकारायला जेवढा वेळ घेतात त्यापेक्षा फास्ट बदल घडतात.

लहानपणी कुणाचं तरी चरित्रं वाचलं आणि ठरवलं, आपल्यालाही या माणसासारखं मोठं व्हायचंय. काय करता येईल? त्यांनी जे जे केलं ते आपण करायचं म्हणजे नाव होईल असा माझा समज. 'ते' दिवे नसल्यामुळे कंदिलात अभ्यास करायचे असं होतं त्यात. मी मुळात लहानपणापासून स्वयंघोषित हुशार आहे. हे मी सोडून कुणालाही आजतागायत पटलेलं नाही हा भाग वेगळा. माळ्यावरून मी कंदील काढला कुणाला समजू न देता. दिवसभर काहीही अभ्यास केला नाही, अंधार पडायची वाट बघितली. आईनी लाईट लावला आणि कुठेतरी बाहेर गेली. मी आधीच पुसून ठेवलेला कंदील काढला, त्यात रॉकेल घातलं, वात वर काढून कात्रीनी कापली, अजून थोडी वर घेण्याच्या नादात ती त्या खाचेतून बाहेर आली आणि रॉकेल सांडलं. तरीही मी तिला परत आत घालून सेट केलं. काच व्यवस्थित बसवून वात मोठी केली आणि लाईट घालवला. सवय नसल्यामुळे काहीही दिसत नव्हतं पुस्तकातलं. म्हणून वात मोठी केली तर कंदील भगभगला आणि वर काच काळी व्हायला लागली. 


लहान मूल म्हणजे किती निरागस असतं सांगा. उठलो, फडकं ओलं करून घेतलं, म्हटलं रोज अभ्यास करायचाय, मोठं व्हायचंय, काच स्वच्छ पाहिजे. पुसायला गेलो, काडकन आवाज आला, तडकली काच, सगळीकडे तुकडे, हात काळे, तोंडावर काळं, रॉकेलचा वास सगळीकडे. तेवढ्यात आई आली. तिला वाटलं दिवे गेले. काळजीने मला हाक मारली. म्हटलं, बटण दाब, आहेत लाईट. बटण दाबल्यावर दिवा लागला आणि मग मी लावलेले दिवे दिसले, त्याच्या नंतरचं फार सांगण्यासारखं नाही. काचा गोळा करून, कंदील जागेवर ठेऊन मग मला तोंडानी सांगून समजत नसल्यामुळे ठोकून काढण्यात आलं आणि महाराष्ट्र कंदीलाच्या उजेडात अभ्यास करून मोठा होऊ घातलेल्या माणसाला मुकला. कसा अभ्यास करणार सांगा ध्येयं संपल्यावर. अशी किती असेल काचेची किंमत? पण पुढे एक नररत्नं पूर्णत्वाला गेलं नाही याचा तोटा किती हे कुणी लक्षात घेत नाही याचं दु:खं (अर्थात मला एकट्यालाच) जास्ती आहे. 

पुण्यात ते टोळी युद्धं चालू होतं त्यावेळी. मला वाटायला लागलं भाई व्हावं. काय साली दहशत असते. हिंदी पिक्चरमूळे तर अजूनच भारी वाटायचं. आजूबाजूला बघायची खोटी, 'हुकुम' म्हणत माणसं धावत येतात, रिझल्ट दिला नाही, खाली हाथ वापस आया, डायरेक्ट गोळी घालायची. सगळ्या स्कॉचच्या बाटल्या भिंतीला लावलेल्या, हातात सिगार, गॉगल, एकापेक्षा एक टंच बायका अंगाला सतत चिकटून, फोन आला तर उचलून द्यायला सुद्धा माणूस, प्लायमाउथ सारख्या लांबसडक गाड्या, फिटिंगचे भारी कपडे, पॉलीश्ड शूज, बप्पी लाहिरी सारखे अंगावर दागिने, हिरोईनला पाहिजे तेंव्हा पळवता येण्याची मुभा. बरं मला सगळं असंच हवं होतं असंही नाही, मध्यमवर्गीय अपेक्षेप्रमाणे यातलं पन्नास टक्के पण चाललं असतं. मग निरीक्षणाला सुरवात केली. पहिल्यापासून माझं ते काम चोख आहे, डिटेलिंग परफेक्ट पाहिजे. मी तर यावेळी लिस्टच केली. भ आणि इतर वर्णाक्षरापासून सुरवात होणा-या शिव्या लिहून काढल्या. काही आल्टर करून नवनिर्मिती केली. आई** ऐवजी आय**, भेंचो* ऐवजी भैsssन्चो* असं आलाप, तानयुक्तं म्हटलं की वजन येतं हे लक्षात आलं. त्या कुणी ऐकायला नसेल त्यावेळेस उच्चारून पाठ केल्या.  

शरीराचे विविध अवयव गुंफून, हाताची बोटं वापरून पण शिव्या देता येतात त्याची माहिती गोळा केली. (ही कला लोप पावतीये हल्ली याचा विचार व्हायला हवा). असो! तर हिंदी प्रथमा, द्वितीया परीक्षा द्याव्यात तसा मी ज्ञानसंपन्नं होत होतो. आता थिअरी पक्की झाली होती. इतर अभ्यासात पुढील गोष्टींची टिपणं काढली  - दम कसा द्यावा, भांडण कसं उकरून काढावं, खुन्नस देण्यासाठी विशिष्ठ पद्धतीनी कसं थुंकावं, शर्टची बटणं कुठल्यावेळी एक, कुठल्यावेळी दोन उघडी ठेवावीत, कल्ला, हेअरस्टाईल कशी हवी, पारदर्शक पांढ-या शर्टात हिरवी, लाल बनियन कधी घालायची, गळ्यात काळा दोरा, मनगटाला चार पाच विविध रंगाचे दोरे कसे बांधावेत, सिग्रेट काडेपेटीनी कधी, लायटरनी कधी पेटवायची, खिशात सफरचंद कापायचा चाकू ठेवायचा की बटण दाबल्यावर फाटकन बाहेर येतो तो की खाली वाकून बुटातून करकर आवाज करत उघडल्यावर तळपतो तसा ठेवावा. एक मुद्दा म्हणून सोडला नव्हता बघा पण व्हायचं तेच झालं, ते ही स्वप्नं धुळीला मिळालं. 

आम्ही क्रिकेटची म्याच घेतली होती. मागची खुन्नस होतीच. मागच्या वेळेला त्यांनी, आमच्या ब्याटिंगची वेळ आल्यावर, तुम्ही जिंकलात असं म्हणून फुकट फिल्डिंग करून घेतलेली. यावेळेला आम्ही वचपा काढायचं ठरवलं. आधी आमची ब्याटिंग या बोलीवर ठरवली म्याच. आमची इनिंग झाल्यावर मी अप्रेंटीस भाई पुढे आलो आणि म्हणालो, 'तुम्ही जिंकलात, आम्ही चाललो घरी' आणि आम्ही निघून आलो. आता जलद चालण्याला कुणी पळणं म्हणत असेल तर बोलणंच खुंटलं. येताना फक्तं चारी बाजूंनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव चालू होता, महागुरू सचिन सारखं मी ही 'गेल्या पंधरा सोळा वर्षातले माझे दमदाटीचे किस्से' यावर सांगत माझ्याबद्दल आणि फक्तं माझ्याबद्दलच बोलून हातभार लावत होतो. घरापाशी आल्यावर मुलं कौतुकमिश्रित नजरेनी पहात आपापल्या घरी गेली. मी ही आलो घरी. पाऊल ठेवल्या ठेवल्या आईनी विचारलं, ब्याट कुठाय? जेम्स ह्याडली चेसच्या पुस्तकात शेवटच्या क्षणी अचूक आखणी केलेला, त्रुटी रहीत मास्टर प्लान सुद्धा जसा धुळीला मिळतो नं तसं झालं.

मी सर्वस्वं गमावल्यासारखा, एके हंगल पेक्षा पडलेला चेहरा घेऊन परत एकटा मैदानावर गेलो.  त्याच्या नंतरचं फार सांगण्यासारखं नाही. गेल्या गेल्या सगळ्यांनी कानफटवून झालं, शरीराच्या शक्यतो सगळ्या अवयवांचा वाक्यात उपयोग करून झाला, तीन तास उन्हातान्हात फिल्डिंग करून घेतली. थिअरी शिकलो पण कर्णासारखा आयत्यावेळी महत्वाचा मुद्दा विसरलो, "दुश्मन के अड्डे पर कभी अकेले नही जानेका". लहान मूल म्हणजे किती निरागस असतं सांगा. ब्याट मिळाली पण स्वप्नं धुळीला मिळालं, त्यामुळे आत्मविश्वास पार दो गज जमीन के नीचे गेला. मी काय म्हणतो, गेला बाजार राजनसारखं इंडोनेशियातून नसतं आणलं अगदी मला पण नेपाळ बॉर्डर, गोव्यातल्या एखाद्या बोटीवरून, काहीच नाही तर निदान तळजाईच्या टेकाडावरल्या एखाद्या झुडपातून तरी उचलून आणलाच असता की. स्वप्नं बघणं आपल्या हातात असतं पूर्ण होऊ देणं, न देणं त्याच्या हातात असतं म्हणा. 


त्यानंतर अनेक वेळा काय बनायचं ते ठरवत गेलो आणि फिसकटतही गेलं. फक्तं अंगावर माप घेणारा अशी पाटी लावून लेडीज टेलर व्हावं, तहहयात सुग्रास जेवणासाठी हॉटेलमालक व्हावं, सतत गाड्यातून फिरायला मिळावं म्हणून ड्रायव्हर व्हावं, स्वप्नात येणा-या नट्यांबरोबर लव्हसीन मनासारखे होईपर्यंत रिटेक घेणारा परफेक्शनिस्ट कलाकार व्हावं, गर्दीचा त्रास नको म्हणून मोटरमन किंवा गार्ड व्हावं, जाहिराती मिळतील म्हणून क्रिकेटर किंवा टेनिसपटू व्हावं, रग्गड पैसे खाता यावेत म्हणून पीडब्ल्यूडी मधे लागावं, कुणालाही हाणता येतं म्हणून इन्स्पेक्टर व्हावं, प्रसिद्धी, मानमरातब मिळतात म्हणून गायक, वादक व्हावं अशी भुछत्राएवढीच टिकणारी हंगामी आणि कुवतीबाहेरची स्वप्नंही पाहून झाली. मुळात ठरवल्याप्रमाणे सगळं व्हायला पण तसं नशिबात असावं लागतं. त्या त्या वेळेला सुचेल ते आपण करत जातो. मोठी माणसं आपल्यावर कळत नकळत लादत रहातात आपण काय व्हायचं ते. "तुला काय वाटतंय, काय व्हावंस तू?' असं विचारायला हवं खरंतर. मला मात्रं असं कुणी, काहीही लादलं नाही. मिळेल ते करत गेलो एवढंच, त्यामुळे अपयश काही असेल तर ते माझ्या एकट्यामुळे आहे.

आता मागे वळून बघताना वाटतं आपण हे अमूक अमूक होऊ शकलो असतो, हे जरा अजून बरं करता आलं असतं, हे जरा चुकलंच, ते जरा सुधारता आलं असतं पण फार काही खंतावण्यासारखं नाहीये हे ही आहे. प्रत्येकाची एक कुवत असते आणि ती त्याला माहित असते. त्यामुळे चारचौघात कितीही बढाया मारल्या तरी स्वत:ला माहित असतं खरं काय ते. अशावेळी मला 'यादोंकी बारात' मधे कणेकर कुंदनलाल सहगलवर लिहितात ते आठवतं. सहगल गेल्यावर त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा एक मित्रं सगळं चंबूगबाळं आवरून कायमचा कलकत्त्याला निघून गेला. सहगलबद्दल तो म्हणाला, 'कुंदन दोस्त बडा अच्छा था'. मला कायम त्या वाक्याचं कौतुक वाटत आलाय. एखादा माणूस त्याच्या गायकीबद्दल, अभिनयाबद्दल बोलला असता, त्याच्या मी किती जवळचा होतो वगैरे सांगितलं असतं पण त्याच्या दृष्टीने तो एक चांगला मित्रं, माणूस म्हणून प्रथमस्थानी होता. मानमरातब, हुद्दा, श्रीमंती, कर्तुत्व हयात असताना मोजलं जातं, नंतर तुम्ही कसे होतात, कसे वागलात याचीच चर्चा जास्ती होते. 

कदाचित मोठेपणी मी फक्तं वयानी मोठा झालो असेन पण सहगलच्या मित्राप्रमाणे चार लोकांनी हयातीत किंवा नंतर ''तसा माणूस बरा होता'' एवढं जरी म्हटलं तरी पुष्कळ आहे, बाकी काही नाही.  

जयंत विद्वांस     



 

 

     

Saturday 31 October 2015

विन्या पानसे....

विन्या पानसे....

"कपाळ, नाक, कान, तळपाय आणि तळहात सोडले तर अळीव टाकल्यासारखे केस आहेत लेका तुझ्या अंगावर. लहानपणी कुठे शेतात सुफला १५:१५:१५ टाकल्यावर लोळला वगैरे होतास का डुकरासारखा". कुठलीही ओळख नसताना विनय पानसे या महाभागानी मला हा प्रश्नं विचारलेला. महिनाभर लेट आडमिशनमुळे अड्ड्यात मी नविनच होतो, विनय गावाला गेल्यामुळे ओळख झाली नव्हती. बाकीच्यांच्या बोलण्यात सतत त्याचं नाव यायचं. मी ही उत्सुक होतो या प्राण्याला भेटायला. त्याचे उद्धटपणाचे किस्से कानावर आलेच होते.

चेह-यानी (फक्तं) अतिशय सालस, गोरापान, दाट काळेभोर कुरळे केस, व्यायामानी अगदी पिळदार झालेला सहाफुटाचा दणकट सागवानी खांब दिसायचा तो. मधाच्या रंगाचे पिंगट डोळे, व्यवस्थित कापलेली ट्रिम मिशी आणि विनोद खन्नासारखे कानापर्यंत जाड कल्ले असा सगळा एकूणच देखणा मामला होता. तो गावाहून आला ते बॅग रूमवर टाकून थेट अड्ड्यावर म्हणजे टपरीवर आला. टपरी मालक आबा पालकरना जोरात हाक मारलीन आधी बाहेरून 'आबा, आहात ना?' आतून आबांनी पण तितक्याच जोरात उत्तर दिलं 'आहे, मायझ्या मी मरायचीच वाट बघ. गिळलं आहेस का काही? गरम वडे टाकतो थांब'. गेल्या आठ दिवसात न खाल्लेले गरम वेगळ्याच चवीचे वडे आणि आख्ख्या दुधातला चहा आला.

आठवडाभराचा वृत्तांत ऐकून झाल्यावर त्यानी सगळ्यांकडे अत्यंत कौतुकानी बघितलं आणि अचानक आठवण झाल्यासारखं मला विचारलं, 'नाव काय रे तुझं?' मी आपलं पुर्ण नाव सांगितलं. 'मयताचा दाखला काढायचाय का? पुर्ण नाव तिथे सांगायचं. आजपासून तू जया'. जसं काही मी माझं नाव ठेवायलाच आलो होतो तिथे. खिशातून विल्सचं पाकिट काढलं, सिगरेट काढली, पेटवली. 'तुला हवीये? ही घे, सेपरेट पेटव, माझी कुणाला देत नाही, कुणाच्या तोंडातली मी ओढत नाही'. मी माझी सेपरेट विकत घेउन पेटवली. 'रागावला काय रे? असशील तर ह्याच्या मारी माझ्या' म्हणून हसत सुटला. प्रथमभेटीत वाईट मत होईल असाच होता तो.

वर्गात मात्रं तो सगळ्या तासांना बसायचा मागच्या बाकावर. तल्लफ आली की बाहेर टपरीवर जाऊन धूर काढून यायचा. त्याला कुणीच काही बोलायचं नाही. आम्ही सगळे लास्ट इयरला होतो इंजिनिअरिंगच्या. बाबांची बदली झाल्यामुळे मी या आडगावात आलेलो. हळूहळू ओळख झाली विन्याशी. त्याला आई नव्हती, वडिलांचा कारखाना होता. त्याला त्यामुळे बरीच माहिती होती आधीच मेकॅनिकलची, डिग्री हवी म्हणून तो आलेला फक्तं. 'काय करतोस घरी संध्याकाळी? अभ्यास सांगू नकोस, इथेच मारेन'. 'का रे?' 'योनेक्सच्या दोन रॅकेट आहेत. येशील?'. मग आम्ही रोज बॅडमिंग्टन खेळू लागलो. मी ही पावणेसहा होतो पण पावफुटाचा फरक पडायचाच. मजा यायची. खेळ झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसायचो. हळूहळू कवचातला विन्या दिसू लागला होता.

एक दिवस अचानक म्हणाला 'कधी प्रेमात पडलाएस?' 'हो, अजून आहे, का रे?' 'नशीबवान आहेस. फक्तं कविता बिविता देउ नकोस हा'. नंतर तो माझ्या घरी येउ लागला. घरचाच एक झाला. अनंत वेळा आला. जाताना आईच्या पाया मात्रं पडायचा कायम. एकदा आईनी काहीतरी काम सांगितलं, मी उद्या आणेन म्हटलं. हा तिरसटल्यासारखा उठला आणि ते काम करून आला आणि म्हणाला, 'भडव्यो, आई आहे म्हणून किंमत नाही तुम्हा लोकांना'. तो घरी फार कमी जायचा. मी विचारलं एकदा त्याला दिवाळीला. 'काय करू जाऊन, बाप पैसा जमवतोय फक्तं माझ्यासाठी, मोठेपणासाठी. लॉज आहे माझं घर, फाईव्ह स्टार एकदम. चेक इन,  चेकाउट, नोबडी आस्क मी, हाउ आर यू, व्हाय सो लेट, इज नेसेसरी टू गो टूडे? रहा अजून दोन दिवस कुणी म्हणायला हवं ना?' गाडीला किक मारून गेला सुद्धा तो.

आबा पालकर आजारी पडले म्हणून दवाखान्यात होते. सगळे गेलो होतो तर विन्या तिथे लाल डोळ्यानी बसलेला. '##मारीच्यान्नो आत्ता येताय होय, आहेत अजून' आणि ढसाढसा रडायला लागला. ' डॉक्टर म्हणालेत चोवीस तास काढायला हवेत हे'. चोवीस तास पार पडले, आबा वाचले. मी डिस्चार्जला गेलेलो विन्याबरोबर. चार पाच हजाराचं बिल यानीच भरलं. आबांनी घरी गेल्यावर डब्यातून दोन हजार काढून विन्यासमोर धरले. 'सुरनळी करा आणि घाला माझ्यात, खायला घालताना हिशोब केला होतात का? चार पाच महिन्यात मी जाईन, त्याच्या आत जा म्हणजे घोर नाही रहाणार मला'. आबा ढग फुटल्यासारखे रडले. लहान मूल रडतं तसा विन्या रडला त्यादिवशी.

'तुझी कविता दे की रे एखादी वाचायला, मी ही केल्यात मागे, थांब देतो'. अतिशय सुवाच्यं मोत्यासारख्या अक्षरात लिहिलेली एक वही त्यानी दिली. पहिल्याच कवितेला मी गार झालो.

नक्षी.....

तिनी नक्षी काढल्यासारख
माझ्या तळहातावर
नाजूक बोटांनी कोरलं
'माझं तुझ्यावर प्रेम आहे'
आज इतकी वर्ष झाली
पुसलंही जात नाही, दिसतही नाही

माझा चेहरा ओंजळीत धरत
तिनी बाण मारल्यासारखे
माझ्या डोळ्यात डोळे घालून
टोकदार तीर सोडले
आज इतकी वर्ष झाली
निघतहि नाहीत, मारतही नाहीत

माझ्याकडे बघत हात हलवत
डोळ्यांना रुमाल लावत ती
कधीतरी परत येईन म्हणत
दूर अज्ञातात निघून गेली
आज इतकी वर्ष झाली
येतही नाही, कळवतही नाही

आणि खाली फक्तं तिरक्या अक्षरात ठोंब्या लिहिलेलं त्याखाली दोन टिंबं. मी त्याच्याकडे पाहिलं. 'ती म्हणायची मला, चल दे इकडे, वाच परत कधी, खेळायला उशीर होतोय'.

हाहा म्हणता वर्षं संपलं, परीक्षा झाल्या, रिझल्ट लागला. आईनी विन्याला जेवायला घरी बोलावलं होतं. जाताना आईला त्यानी भारीतली कांजीवरम आणली होती ती दिली आणि पाया पडला. 'परत कधी भेट होईल माहित नाही पण तुमच्या घरचं मीठ खाल्लंय त्याचे ऋण फिटणार नाहीत, फेडणारही नाही'. रात्रीची गाडी होती. तासभर आधी आबांकडे गेलो. आबांनी त्याला डबा भरून दिला होता. म्हाता-याला शब्दं फुटेना. विन्या पाया पडला, त्यांचा पत्ता लिहून घेतला आणि आम्ही निघालो. 'एकदा टपरीवर जाऊ चल' टपरीच्या बंद दरवाज्याला त्यानी खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, 'अन्नं खाल्लय रे इथे' आणि रडू लागला.

त्यानी आमच्यातलाच एका गरजूला गाडी अशीच देउन टाकली होती. माझ्या गाडीवर स्टेशनला सोडायला गेलो त्याला. 'पत्ता कशाला घेतलास आबांचा'. 'अरे कढईजवळ बसून खोकं झालंय पार, पैसे पाठवीन दर महिन्याला. कुणाला माहित नाही, मी आजारी होतो मागच्या वर्षी पंधरा दिवस. आबा चहा, नाश्ता, दोन वेळचं जेवण घेउन रुमवर यायचे. असो. फोन नंबर दिलाय तुला, कळवत रहा, चल बाय'. स्मशानातून परत यावं तसा मी परत आलो.

बाबांची बदली झाली दोन महिन्यात आणि आम्ही सगळे मुंबईला आलो. विन्याला सांगितलं. तो पुढे शिकायला यूएसला गेला तेंव्हा भेटून गेला. आबा गेले म्हणाला मागच्याच महिन्यात. पुढे संपर्क तुटला. मी ही नोकरीच्या निमित्तानी अनेक शहरं बदलली. विन्याचा काही तपास नाही. पंचविसेक वर्षं झाली. आईनी जीर्ण कांजिवरम अजून जपून ठेवलीये. येईल म्हणते शोधत बरोब्बर तो, भूत आहे ते. यायला तर पाहिजेच. अनंत गोष्टी अर्धवट सांगून गेलाय त्या विचारायच्यात आणि खूप काही. 

कॉलेजच्या रोडला टपरी दिसली की मी अजूनही थांबतो. एक वडा, एक कटिंग आणि दोन विल्स घेतो, एक सेप्रेट माझी, एक सेप्रेट विन्याची.

जयंत विद्वांस




Tuesday 27 October 2015

विनासायास वेट लॉस - लेखक डॉ.जगन्नाथ दिक्षीत

विनासायास वेट लॉस - लेखक डॉ.जगन्नाथ दिक्षीत 

वीतभर पोटाची खळगी वगैरे शब्दंप्रयोग आता बाद होणार अशी परिस्थिती आहे. तमन्ना, करीना कपूर आणि काही तत्सम सपाट तलम पोटं सोडली तर बाकीची सगळी पोतं दिसतात. वीतभर पोट मीटरभर होतं, शिंप्याच्या टेप ऐवजी सुताराचा मेझरिंग टेप लागेल अशी पाळी येते मग माणसं झटून विचार (फक्तं विचार, नथिंग एल्स) करायला लागतात. सौंदर्य काही आपल्या हातात नसतं पण फिट राहणं निश्चितच आपल्या हातात आहे. तरुण माणूस त्याच्या केशरचनेकडे, कपड्यांकडे फार लक्ष देत नाही पण जिमला मात्रं जातो अर्थात फिट रहाण्यापेक्षा वेगळा हेतू त्यात असतो पण निदान तो ती नाटकं चार सहा महिने तरी करतो.

दिखाव्याला जग भुलतं असं म्हणतात. माणूस एकदा तिशी ओलांडून गेला की त्याच्या पाठीमागे व्याप लागतात. पैसे कमावून तो आधी घर सजवतो, मग बायका, मुलं सजवतो, पैसे साठवतो. या सगळ्यात चाळीशी येते आणि मग पुढची वर्ष पटापट चालली आहेत असं त्याला वाटतं. केस शिल्लक राहिले असले तर पांढरे होऊ लागतात, मान, पोट, मांड्या, दंड, पार्श्वभागावर चरबीच्या अनधिकृत वसाहती उभ्या रहातात. मार्करनी नकाशावर मिठी नदीचा मूळ प्रवाह मार्क करतात तसं 'इथे हनुवटी संपते किंवा मूळ इथंपर्यंत होती ' अशी रेघ आणि पाटी लावायला लागेल अशी परिस्थिती येते. आपण महापालिकेला उगाच नावं ठेवतो, 'डोळ्यांसमोर उभ्या रहात होत्या तेंव्हा दिसली नाहीत का अनधिकृत बांधकामं?' हे वाक्यं आपल्यालाही लागू होतं. मग आपल्या एकूणच पळ काढण्याच्या वृत्तीनुसार समस्येच्या मुळाशी न जाता निरुपयोगी बाह्य उपाय चालू होतात.

ढगळे शर्ट, टी शर्ट घालणे, प्यांट वर नेसणे, शर्ट इन न करणे, आपण कसे फिट आहोत याच्या आपल्याच ढेरपोट्या मित्रांबरोबर चर्चा करणे, 'आयुष्यं एकदाच मिळतं, खा प्या मजा करा' असे वरकरणी छान वाटणारे कोट्स फेकायला सुरवात होते. डाय लावायला सुरवात होते. मग कुणाच्या तरी सांगण्यावरून बर्मुडा, टीशर्ट, चारपाच हजाराचे शूज खरेदी करून रनिंग, योगा (योग कोण म्हणालं रे? गावठी कुठला), जॉगिंगचं प्लानिंग होतं. नेट आणि अर्धवट माहिती असणा-यांकडून डायेटिंग चार्ट तयार होतात. अर्धा किलोमीटर चालून आल्यावर येता येता रुपया खर्चून २०० ग्रॅम वाढलेलं वजन शूज मुळे असणार असा दिलासा देता येतो. आलेला घाम व्यायामामुळे नसून न झेपलेल्या कष्टामुळे आलाय हे फक्तं मनाला माहित असतं. रक्तात साखर वाढते आणि जीभ मात्रं कडवट होते, रक्तं उसळ्या मारतं ते पेटून उठल्यामुळे नाही तर वाढलेल्या दाबामुळे, त्यात मग छातीत हलकीशी चमक जरी उठली तरी जीव घाबरा होतो.

तात्पर्य, आपण अस्ताव्यस्त वागून शरीर जुगारी माणसाच्या कर्जासारखं आटोक्याच्या बाहेर जाऊ देतो आणि सरकारसारखं समस्येच्या मुळाशी न जाता कर्ज माफीसारखे वरवरचे उपाय वारंवार करतो, निष्पन्न काही होत नाही. आयुष्यं एकदा मिळालंय हे कळतं पण ते कसं जगावं हे कळत नाही. जाहिरातींना भुलून कचरा आपण सोन्याच्या भावात खातो आणि नको असलेले नातेवाईक चिकटतात तशी बिनकामाची चरबी अंगात मेहनत न करता साठवतो. मिळेल तेवढं खातो आणि ताण सहन झाला नाही की अजून खातो. दुष्टंचक्रं आहे ते. वेळीच बाहेर पडायला हवं असं मन सांगत असतं पण मन, मसालेदार, चमचमीत खायला चटावलेली जीभ ऐकत नाही. शिस्त कुणाला प्रिय असते तशीही? टाळण्याकडे कल असतोच प्रत्येकाचा. अर्थात जमिनीत तोंड खुपसून बसलं म्हणून वादळ यायचं काही थांबत नाही.

परवा डॉ.जगन्नाथ दिक्षीत भेटले होते. एबीसीडी लिहावी तशा या माणसाच्या नावापुढे डिग्र्या आहेत. नावाखाली दोन तीन ओळी सहज भरतील एवढा मजकूर आहे ज्ञानाचा. माणूस साधा आहे, जमिनीवर पाय असलेला आहे. त्यांनी मला परवा पुस्तक सप्रेम दिलं. एका बैठकीत वाचून होईल एवढं छोटं आणि नगण्यं किंमतीचं आहे. अतिशय सोप्या शब्दात आणि मराठीत सगळ्यांना समजेल असं आहे. ये दिक्षीत भी पागल आदमी मालूम पडता है! रिझल्ट मिळत असताना असं कमी पैशात साधे सल्ले कुणी देतं का? कसं मस्तं अवघड इंग्लिशमधून गुळगुळीत कागदावरचं, अनेक स्लीम देखण्या बायकांचे फोटो टाकून, आधीचा एकशेवीस किलोचा लाल भोपळा आणि नंतरचा सत्तर किलोचा दुधी भोपळा (ते पण फक्तं चार महिन्यात [फक्तं चार महिन्यात बोल्ड लेटरिंग]) असे चार पाच जणांचे फोटो त्यांच्या मुलाखती सकट टाकून हार्ड बाउंड चार पाचशे रुपयाचं पुस्तक काढायला हवं होतं. बल्क एसेमेस वर जाहिरात करून चार पाच शहरात आठवड्यातून एकदा एसी रुमात कन्सल्टंसी ठेवायला हवी होती. लई पैका ओढला असता.

आपणांसी जे जे ठावे…या भावनेनी त्यांनी पुस्तक लिहिलंय. स्वत:वर प्रयोग करून लिहिलंय. ऐकीव, वाचलेल्या माहितीवर लिहिलेलं नाही. सगळ्यांनी निरोगी रहावं इतका आणि इतकाच स्वच्छ हेतू आहे त्यात. काय खा, कधी खा, केवढं खा इतकंच सांगितलंय त्यांनी. उपाय साधा आणि स्वस्तं असला की तो लायकीचा नाही अशी आपली मानसिकता आहे. "भोपळी मिरचीची भाजी साठ रुपये? लुटतात साले". "स्टफ्ड कॅप्सीकम अडीचशे रुपये, यू नो, इट्स रिअली माउथ वॉटरिंग". दिक्षीत साध्या शब्दात सांगतायेत ते लक्षात घ्या. पुढचा काळ वाईट आहे. किती पैसे साठवाल असे? कितीचा काढाल मेडिक्लेम? त्यानी फारतर बिल भरलं जाईल पण भोग तुम्हांलाच भोगावे लागणार ना? It's better late than never. नुसता पश्चात्ताप होऊन उपयोग नाही, अंमलात आणाल तर निरोगी जगाल.

मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी काढलंय पुस्तक. मिळतंय सगळीकडे. नवी पेठेत वजन जास्ती म्हणून कुणी खांदा देणार नाही अशी वेळ आणू नका. अजून या कामाला जेसीबी वापरल्याचं ऐकिवात नाही. एकतर पुस्तक वाचून अंमलात आणा नाहीतर जेसीबीचं कोटेशन आणून बिझनेस करा. सोप्पं काय ते तुमचं तुम्ही ठरवा. 

जयंत विद्वांस        




Thursday 22 October 2015

सत्तर एमएम चे आप्तं (९)…. हेलन रिचर्डसन खान…

सत्तर एमएम चे आप्तं (९)…. हेलन रिचर्डसन खान… 

पुढच्या महिन्याच्या म्हणजे एकवीस नोव्हेंबरला ही देखणी बाई वयानी सत्त्याहत्तर वर्षाची होईल. सलीम खानची दुसरी बायको. त्याच्या घरात एक सर्वधर्म समभाव, अनेकतामें एकता वगैरे स्लोगन न ठरवता आचरणात आहेत. त्याची पहिली बायको धारकर, मुलाची बायको मलाईका हिंदू, हेलनचा बाप अंग्लोइंडियन तर आई बर्मी, त्यांच्या मुलीशी लग्नं केलंय तो अग्निहोत्रींचा अतूल. हेलनचा सगळ्यात पहील्यांदा पाहिलेला चित्रपट म्हणजे शोले. मेहबूबा मेहबूबाला एवढ्या कमी कपड्यात नाचणारी बाई म्हणजे हेलन हे खूप नंतर समजलं. दुस-या महायुद्धात तिचे वडील वारले आणि ती  पाच वर्षाची असताना लपत छपत  कुटुंबासकट भारतात आली. आसामला त्यांचा गट पोचला तेंव्हा निम्मा राहिला होता. वाटेत तिच्या आईचा गर्भपात झाला, ती आणि तिची आई हाडांचा सापळा झाली होती. तिथून ते कलकत्त्याला आले. आईचा पगार पुरेना चारजणांच्या कुटुंबाला म्हणून तिनी शिक्षण सोडून एकोणिसाव्या वर्षी कामधंदा बघायला सुरवात केली आणि तिला पहिला ब्रेक मिळाला 'हावडा ब्रिज' मधे.    

आद्य उत्तम नर्तिका कुक्कूच्या मदतीनी तिला कोरस डान्सरचं काम मिळालं मग ती गाजली ती 'हावडा ब्रिज'च्या 'गीता दत्तनी म्हटलेल्या मेरा नाम चिन चिन चू' पासून (त्यातला मेरा, मेर्रा म्हटल्यामुळे सुरवात काय झकास होते ना). दारासिंघच्या चित्रपटात हिरोईन होण्याचं तिच्या नशिबात होतं त्यामुळे ती हिरोईन म्हणून बी ग्रेड राहिलीपण डांस मधे ती एवन होती. किती नाच-या आल्या नी गेल्या, हेलन अढळ आहे. अजूनही तिचं गाणं एका ठिकाणी आणि दुसरीकडे स्टीम हॉट आयटम सॉंग लागलं असेल तरी मी हेलनचंच बघतो. गवयाच्या गळ्यातला सूर जसा मुळात अंगात असला की जास्ती छान लागतो तसा हेलनच्या अंगातच नाच होता. कमनीय बांधा म्हणजे काय ते हेलन. नॉट अ पेनी लेस, नॉट अ पेनी मोअर, तिच्या अंगावर काय, नाचण्यात काय, उगाच अतिरिक्तं काही नाही. माला सिन्हा, मुमताज, योगीताबाली, चंदावरकर भरल्या अंगाच्या स्फोटक होत्या पण हेलन म्हणजे स्लिम ट्रिम बॉंब होती. 

हेलन कधीही चीप, व्हल्गर, बीभत्सं वाटली नाही. आशा भोसलेचा आवाज तिला लाभला हे तिचं भाग्यं आणि आशा भोसलेचंही. हेलनच्या सुसंस्कृत थिरकण्यामुळे आशाची गाणी थिल्लर झाली नाहीत. परवाच कुणीतरी काण्या लोकांसाठी मालस असा शब्दं सांगितला. हेलन, अमिताभ, गौतम राजाध्यक्ष, भूमिका चावला हे या क्रमानी सुंदर दिसतात, आशा पारेख मात्रं लिस्टच्या शेवटच्या टोकाला. हेलनचा चेहरा मला कायम लोभस आणि हसरा दिसत आला आहे. म्हातारपणातही ती काय गोड दिसते अजून. हेलनसारखे रसाळ, लुसलुशीत नाजूक ओठ, आताच्या नट्यांच्या रंगवलेल्या आणि घडवलेल्या आताच्या मादक ओठांपेक्षा लाखपटींनी सरस आणि कामुक आहेत (क्यातरीना कैफ सोडून अर्थात). 

'गुमनाम'मधे काय तो तिला मोठा रोल होता. 'गम छोडके मनाओ रंगरेली' म्हणणारी हेलन लैच ग्वाड दिसलीये. भावाच्या खुनाचा बदला घ्यायला आलेली सोनिया त्या आनंदात 'ये मेरा दिल'ला काय भन्नाट नाचलीये पण 'सोनिया, ये तुम जानती हो के ये रिव्हाल्वर खाली है…' या नंतर तिचा क्षणार्धात उतरलेला चेहरा, हात तोंड बांधून नेतानाची धडपड असहाय्यता बघा, अभिनय असा चमकून जातो एखाद्या क्षणी. 'मेहबूबा मेहबूबा' मधे त्या काळाच्या काय आताच्या मानानीही तिच्या अंगावरची कापड तोकड्या शब्दाला लाजवतील इतकी तोकडी होती पण तो ठेका, चाल आणि अमजदमुळे त्याचा फार गवगवा नसेल झाला. त्या ठेक्यावर ती जी काय कंबर हलवते ना, तोड नाही. आताच्या कुणी तशी हलवली तर मणक्यात ग्याप येईल किंवा कमरेचं सुटण्याची शक्यता आहे असं मला सारखं वाटत रहातं. 'कारवा' मधलं 'पिया तू अब तो आजा' बघा, चेंज म्हणून 'इन्तकाम' मधलं लतानी मादक गायलेलं 'आ जाने जा' बघा. 

'तिसरी मंझिल' मधलं 'ओ हसिना जुल्फोवाली' बघा. पाण्यात मासोळी सुळसुळ फिरावी तशी हेलन नाचलीये. पब्लिक तिच्या देहाकडे बघूच शकत नाही इतकी फास्ट आणि लुब्रिकेटेड नाचते ती. आशा पारेख ला मार्केट व्ह्यालू होती नाहीतर विजय आनंदनी तिलाच घ्यायला हवं होतं त्यात हिरोईन म्हणून असं आपलं मला प्रेमापोटी वाटतं. स्मूथनेस म्हणजे काय तर हेलन, बोनलेस हेलन. मी चार लिहिली की वाचणारा अजून चार गाणी सांगेल तिची. 'आओ ना गले लगाओ ना', 'आजकी रात कोई आने को है' बाकी आहे पण 'इन्कार'चं 'मुंगडा मुंगडा' मात्रं अजरामर आहे, त्याचा उल्लेख नाही केला तर अपमानच तिचा. पिवळ्या चेक्सची चोळी आणि हातात कोयता घेतलेली हेलन. दारूच्या अड्ड्यावरती विजेसारखी हलणारी, अमजदला भुरळ घालू पहाणारी हेलन. उषा, आशा, लता - तिघी बहिणींनी तिला आवाज दिलाय. आशाचा जास्ती फिट. एकमेकांना पूरक अगदी.  

उदबत्ती गरागरा फिरवल्यावर कशी डोळ्यापुढे ती लाल सर्पिल रेषा फिरते तशी हेलन नाचायची. पहिला आकार, स्टेप बघतोय तर पुढे निघून गेलेली असायची ती, जिभा बाहेर काढून काय बघणार तिच्याकडे डोंबल. सुलोचना चव्हाण अंगभर पदर घेऊन, खाली मान घालून सोज्वळपणाने शृंगारिक, चावट, सूचक लावण्या अत्यंत शालीनतेनी म्हणतात तसा हेलन क्याब्रे करायची, एक कला म्हणून, नृत्याविष्कार म्हणून. सोळा वर्ष ती तिचा गॉडफादर पी.एन. अरोरा बरोबर तशीच राहिली आणि मग त्यानंतर आठ वर्षांनी तिनी सलीमखान बरोबर लग्नं केलं तेंव्हापासून ती तिथेच आहे. 'हम दिल दे चुके सनम' मधे ती सलमानची पडद्यावरची आई होती. चांगली गुटगुटीत झालेली हेलन गोड दिसली.तिच्यापेक्षा तरुण स्मिता जयकर त्यात फुगलेली, सुजरट चेह-याची दिसते पण हेलन मात्रं  तृप्तं, गोड आणि मायाळू दिसली मला तिच्यापेक्षा. 


काळ बदलत राहील, माझ्या म्हातारपणात कुणी डांसचं कौतुक केलं की मी नातवाला/नातीला सांगेन, 'तुला ग्रेसफुल, हलणारं रबर, फ्लेक्झिबल देह बघायचाय? गुगलला सर्च कर हेलन सॉंगज म्हणून, कशावरही क्लिक कर', त्यावेळेस एट जी वगैरे कनेक्शन असेल, माझा चष्मा लावून होईपर्यंत ती उदबत्तीच्या वलयासारखी पुढे निघून गेलेली असेल. रिवाइंड करेन आणि बघेन. 'हेलन, तुझ्या काळात बाकीचे टू जी स्पीडला नाचत होते तेंव्हा तू फोर जी ला इझीली नाचत होती हे आत्ता लक्षात आलं, एवढं मात्रं खरं. फार लवकर आलीस जन्माला.  

जयंत विद्वांस 
            

Friday 16 October 2015

किती देते रे...

आयुष्यातली पहिली गाडी होती सेकंड ह्यांड स्प्लेंडर. तिच्यावर मी खूप फिरलो. नंतर नविन गाडी घ्यायचा विचार चालू झाला. सीबीझ आणि फिएरो नव्या आल्या होत्या दोन हजार साली. सीबीझला किक मारताना फूटरेस्ट आत घ्यावं लागायचं म्हणून मी ती घेतली नाही. एकतर माझ्या लक्षात राहिलं नसतं आणि किका बदलायचा खर्च झेपला नसता सारखा आणि नडगी किंवा घोटा पांढरा स्कार्फ घालून ठेवावे लागले असते..

मग पर्याय उरला फिएरो. तेंव्हा बावन्न हजाराला होती फिएरो. ऐपतीच्या बाहेरचीच गाडी खरंतर. दीडशे सीसी. मला झेपायचीही नाही. पण हौस दांडगी. तीन बारा दोन हजारला मी ती दाराशी लावली तेंव्हा मेन स्ट्यांडला लावताना तोल जात होता. एकतर त्या गाडीला लूक नाही. विचित्रं टाकी आहे तिची. एकंच फायदेशीर गोष्टं म्हणजे पुढे आणि मागे साईड इंडिकेटर आणि ल्याम्प एकाच साडग्यात आहेत. बाहेर कान आल्यासारखे नाहीत. त्यामुळे ते धक्का लागून तुटण्याची भीती कमी होती आणि ते आजतागायत शाबूत आहेत.

पंधरा वर्षात मी त्यावर रग्गड हिंडलो. अष्टविनायक, कोल्हापूर, महाबळेश्वर, अलिबाग, रोहा आणि अगणित वेळा बदलापूर, डोंबिवली. टायर, ट्यूब, बॅटरी, लॉक सोडल्यास एकही पार्ट चेंजलेला नाही. कुत्रं मधे आलं म्हणून चार जून चारला अपघात झाला एवढाच डाग तिच्यावर, बाकी अजूनही ती थंडीतसुद्धा फर्स्ट किकला स्टार्ट होते.

आता जरा वय मात्रं जाणवायला लागलंय तिचं. धापा टाकते चढावर. पण मी तिला काढणार नाहीये. तिच्या ब-याच गमतीजमती माझ्या आठवणीत आहेत. स्पीडोमीटर बंद होउन बरीच वर्ष झाली. तसंही असता चालू तरी मी ते अॅव्हरेज वगैरे चेकायच्या भानगडीत पडलो नसतो. लोकांनी सांगितलेलं अॅव्हरेज बाईनी सांगितलेल्या वयासारखं असतं, मजेशीर प्रकार आहे तो. कॉंट्रीब्युट असेल तर ते नेहमीच कमी असतं.

परवा पार्किंगमधे नेहमीप्रमाणे माझी फिएरो चेष्टेचा विषय होता. नेहमी पब्लिक एक प्रश्नं विचारतंच 'किती देते रे?'. म्हणतो मी, माहित नाही. जो पर्यंत ती चालतीये तोवर ती किती देते याची काळजी मला नाही. तिनी किती दिलंय ते मला माहितीये.

आता ती रुपवान नाही. पंधरा वर्ष उघड्यावर राहिलीये. दिवसातून किमान दोनदा माझ्या लाथा खातीये. तिच्या अंगावर तिसरा माणूस बसला तेंव्हा ती शहारली असेल, आनंदली असेल. निर्जीव असली म्हणून काय झालं तिच्यात माझा जीव अडकलाय एवढं मात्रं खरं.

परत कुणी विचारलं ना 'किती देते रे?', विचारणारा पाठमोरा दिसू दे, दोन पायातून पुढचं चाक काढणार आहे.

--जयंत विद्वांस
.



Tuesday 13 October 2015

घास….

घास…. 

काल घराघरातून खिडक्यात, अंगणात, टेरेसवर पान वाढून ठेवलं गेलं. श्रद्धा अंधश्रद्धा भाग सोडून देऊ. त्यावरच्या चर्चेतून निष्पन्न काही होत नाही. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी. ती अंध आहे की डोळस हे आपण कशाला ठरवूयात. मला त्याच्या मागची भावना दिसते. खरंतर अनेक माणसं आयुष्यातून भरल्या पानावरून उठून जावं तशी कायमची निघून जातात परत न येण्यासाठी. त्यामुळे ठेवलेलं पान नेमक्या कुणासाठी हा प्रश्नं चेष्टेने विचारतात लोक, त्याला उत्तर नाही आणि देऊही नये.

जीनी ठेवलं तिला ते रिकामं उचलताना हुंदका फुटला असेल. तीच्या मनातला माणूस येउन गेला, जेवला, आशीर्वाद दिला आणि गेला. या न घडलेल्या गोष्टी कदाचित तिच्या दु:खावर पांघरुण घालत असतील. ते शल्यं/सल यावर फुंकर बसत असेल. वर्षभर आठवण येतेच की, येतंच असणार पण रोज रडू येणं शक्यं नाही, तसं केलं तर जगणंही मुश्किल होईल. आपणही त्याच मार्गावर आहोत, पुढे गेलेल्यांच्या आठवणी काढत आपणही तिकडेच चाललोय मग का जीव गुंततो एवढा? गुंततो, त्याला उत्तर नाही.  

माणूस निर्वतला म्हणजेच आठवण येते? काही लोक आयुष्यातून दूर जातात. चूक कुणाची, कारणं काय वगैरे मुद्दे सोडा, प्रत्येकाची एक बाजू असते आणि ती त्याच्या मते खरी असते. तरीपण त्या मोकळ्या जागा आपल्या लक्षात रहातात. घासातला घास आपण ज्याला देत होतो किंवा जो आपल्याला देत होता, त्याची आठवण होते. आपण कुणासाठी किंवा कुणी आपल्यासाठी काही चांगलं चुंगलं केलं तर दोन घास बाजूला काढायची पद्धत होती. आज्जी म्हणायची, 'राहू दे थोडं, मूलं डोकावली तर हातावर द्यायला राहू दे'. माया असायची. गुप्तंधन ठेवल्यासारखं भांड्यात ठेवलेला खरवस, साखरभात, मोडकळीला आलेली अर्धी पुरणाची पोळी, नारळाच्या दोन वड्या, बेसनाचा बुडाला चिकटलेला लाडू, खारट गाळ जास्ती असलेला चिवडा कुणी मायेचं माणूस घासभर काढून ठेवायचं. जिभेवर ती काढलेल्या घासाची अमृतचव अजून रेंगाळतीये

'हॉटेल रविराज'ला असताना ऑफिसमधे आम्ही चार पाचजण एकत्रं जेवायला बसायचो. एक दिवशी जेवताना मी नव्हतो, उशिरा आलो आणि दुष्काळातून आल्यासारखा जेवायला बसलो, *** जेवायची थांबली होती, मला माहित नव्हतं. कुणीच काही बोललं नाही. माझं जेवण झालं, मी जागेवर येउन बसलो. सगळे हसत होते. तिनी डबा काढला, कोप-यात जाऊन जेवायला बसली. नकळत घडलं माझ्याकडून, त्या चुकीला माफी नव्हतीच. मी कडेला जाऊन बसलो आणि 'सॉरी' म्हणालो. काहीवेळा काहीच बोलू नये चूक झाल्यावर, समोरच्याला पश्चात्ताप कळतो. हातातला घास तसाच ठेऊन तिला हुंदका फुटला आणि ती हमसाहमशी रडायला लागली. ऑफिसमधे मी तिला जवळ घेऊ शकलो नाही. बेसिनपाशी जाऊन आवाज न करता रडलो, तोंड धुतलं आणि परत आलो. कधीतरी डबा खाताना ती आठवते. घास अडकतो, डोळ्यात पाणी येतं मग उरलेले दोन घास तसेच घरी जातात.   

आता सुबत्ता आली. पैसा, माणसं मुबलक झाली, लोक घास जेवढे खातात त्याच्यापेक्षा दुप्पट वाया घालवतात. आता लोक वगळून खातात, दोन घास वगळून, काढून ठेवायचे दिवस गेले. कधीतरी आज्जी आठवते, जेवायला थांबणारी ती आठवते, आठवण उफाळून येते आणि मग घास अडकतो. डोळ्यात पाणी येतं. त्या सगळ्यांसाठी प्रथा म्हणून आपण घास ठेवत नाही तर ज्यांच्यासाठी घास अडकतो त्यांच्यासाठी ठेवतो, एवढाच मी त्यातला काढलेला अर्थ आहे.   

जयंत विद्वांस 





Friday 9 October 2015

ऐकत रहावं फक्तं....

वाचाळ असणं हा खरं तर दुर्गुण आहे पण इथले काही वाचाळ मला आवडतात. वृत्तांत, कौतुक सोहळे मला अण्णांनी गळ्यात मारलेत आणि मलाही ते आवडतं आणि खोटी स्तुती करायला कुठे फार कष्टं आहेत, त्यामुळे ती मी अधूनमधून करतोही.

गेटूगेला समजलेला पहिला वाचाळ राजेश मंडलिक. हा माणूस सुंदर कविता वाचतो. स्पष्टं शब्दोच्चार मला मोह घालतात. बरं तो छापील वाचत नाही. त्या छापखान्यातल्या खिळ्याला चिकटून आलेला कवीच्या मनातील अर्थ तो शब्दं इकडचा तिकडे न करता आव न आणता पोचवतो. माणसाचा स्वभाव त्याच्या कृतीत, कलेत कुठे न कुठे डोकावतो असं म्हणतात. राजेश मोकळा माणूस आहे, कलासक्तं आहे हे त्याच्या वाचण्यात दिसतं. प्रोफेशनल तयारी त्याच्यात दिसत नाही पण अभियंत्याचा काटेकोरपणा मात्रं दिसतो. आनंद द्यायची सुद्धा वृत्ती लागते. फक्तं स्वत: आनंद घेणं वेगळं आणि स्वत: घेत असताना तो हसमुख चेह-यानी दुस-याला देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

काही गवई गाताना अतिशय विद्रूप हावभाव करतात. सतत बद्धकोष्ठं झाल्यासारखा चेहरा असतो. लहान मूल जसं न ठरवता कागदावर कुठलाही आकार, चित्रं मनात न धरता रेघा मारतं तसं राजेश सहज वाचतो. त्याची आणि अण्णांची संपू नये अशी वाटणारी जुगलबंदी ज्यान्नी पाहिली ते लोक भाग्याचे. 

दुसरी वैशाली. ती लहान मुलासारखा आवाज काढते, कार्टून्सना बोलतं करते यात मला काही आश्चर्यं वाटत नाही. ती मोठ्यानी ओरडली तरी नाजूक आणि लयबद्ध ओरडेल अशी मला खात्री आहे इतकी ती गोड आहे. काही शब्दं काही भाषांमधून घ्यावेच लागतात. प्लेझंट फेस. हाच शब्दं योग्यं आहे तिच्यासाठी, गोड पेक्षा सरस आहे तो. ती एरवी बोलताना सुद्धा मंजूळ बोलते. सिंथेसायझरवर काढलेला आणि मूळ वाद्यावर काढलेला आवाज यात फरक असतो. यंत्रावर भास निर्माण करता येतो फारतर, मूळ वाद्यात आस निर्माण करता येते. तसा वैशालीचा गळा मूळ वाद्यासारखा आहे.

एखाद्या माणसाबद्दल आपण प्रथमदर्शनी ठोकताळे मांडत असतो. ती चेह-यानी जेवढी आनंदी दिसते तेवढीच आवाजानीही आहे. गेटूगेला ती आवाज काढत असताना मी एकटक तिच्या आनंदी चेह-याकडे बघत होतो. तो चेहरा मी विसरणार नाही.

तिसरी वाचाळ, स्वरूपा. हौशी आणि एकूणच दणकट प्रकरण आहे. तिचा एरवी फोनवर आवाज ऐकलात तर तुम्ही फोन पुढे धरून नंबर चेक कराल की मी फोन तर स्वरूपाला लावला आणि कुठल्यातरी बाप्याला कसा काय लागला. तिच्या आवाजाला एक कोकणी मालवणी अनुनासिक स्वर, हेल आहे. एकदा तुम्हाला सवय झाली की तुम्हाला तो मंजूळ वगैरे वाटण्याची पण शक्यता आहे. मकर राशीच्या माणसाला एकानी सांगितलं पुढची दहा वर्ष तुम्हाला खडतर आहेत. त्या बिचा-यानी उत्साहानी विचारलं, नंतर? तो म्हणाला, नंतर सवय होईल. असा प्रकार आहे.

श्रीनिंच्या वर्कशॉपला जाउन तिनी मेहनत घेतलीये. तिनी वाचलेल्या काही कथा माझ्याकडे आहेत. अतिशय मन लावून वाचल्यात तिनी. प्रत्येकवेळेला तिच्यातला तो नविन काहीतरी करण्याचा उत्साह मला मोहवून जातो. उपजत कला असणं हे भाग्यं लागतं आणि आपल्यालाही हे यायला पाहिजे या हौसेनी शिकणं हे वेगळं असतं. (श्रीनीचा आवाज बिघडायला लागलाय त्यामुळे ते आता ती यायच्या आत दार घट्ट बंद करून घेतात असं कानावर आलंय. लोक बोलतात काहीही, आपण लक्ष नाही द्यायचं).

चौथी लेटेस्ट सापडलेली वाचाळ शिल्पा केळकर. ती सराईत वाचाळ आहे. ती अभिनय करते वाचताना. लहानपणी रेडिओवर श्रूतिका लागायची. ती ऐकून सुद्धा समोर घडत असल्याचा फील यायचा. बातम्या देताना पण वाचतातच की पुढ्यात लिहिलेलं (भक्ती बर्वे इथून तुला एक सलाम) पण अर्थात त्यात भावना, अभिनय अपेक्षित नसतो. पण पुढ्यातला कागद असा वाचायचा की कागद नाहीसा व्हावा आणि समोर सगळं घडतय असं वाटायला लागण्याची ताकद शिल्पाकडे आहे.

उशाशी, शिक्षा, गोष्टं, काढायची या शब्दातले ष श क्ष च तिच्या तोंडातून मूळ रुपात बाहेर येतात. उच्चारात पण अर्थ असतो. वेद, ऋचा, मंत्र शुद्ध त्यासाठीच म्हणतात. प्रत्येक व्यंजनाला, स्वराला वजन आहे, अर्थ आहे, त्याचे वेगवेगळे परिणाम आहेत. शिल्पानी ते कसोशीने जपलंय. (श फार वेळा येतोय का माझ्या लिहिण्यात?). माणसं चेह-यानी आज सुंदर असतील, उद्या नसतील पण ती असं काही सादर करताना, बोलताना जेवढी सुंदर दिसतात तेवढी इतर वेळी मला दिसत नाहीत.

'ओव्हरड्राफ्ट'मधलं तिचं '.. ऐकत रहावं फक्तं' हे वाक्यं ऐका. ऐकत मधे ऐ वर दिलेला जोर, आपण सहसा राहावं म्हणतो तसं न म्हणता म्हटलेलं 'रहावं' ऐका आणि सांगा. गोष्टं छोटी असते पण फार आनंद देउन जाते.

असा एक छुपा रुस्तूम आहे विशाल वाड्ये. त्याचा आवाजही ऐकत रहावा असा खर्जातला आहे. त्याच्याकडे सादरीकरण आहे, आवाजात सुत्रसंचालन आहे.

स्टेजवर राजेश वैशाली स्वरुपा शिल्पा श्रीनी नंदू बसलेत, विशाल आणि अण्णा त्यानां बोलतं करतायेत, मधूनच स्वत: आपल्याला चकित करताहेत. आपण सगळे समोर बसलोय. शोची सगळी तिकिटं मुकुंदा आणि शैलेशनी प्रेमळ भाषेत विकली आहेत. शो फूल आहे. समोर कधीही संपू नये असं वाटायला लावणारा काव्यं कथा गझल सुर गाणी यांचा उत्सव चालू आहे. टाळ्या वाजवून हात थकतील. नेमकं काय सुख प्राप्तं झालं हे सांगता येणार नाही अशी अवस्था असेल.

जमवा राव एकदा, नवी पेठेत जायच्या आधी अशा काही आठवणी सोबत घेउन जाउयात.

--जयंत विद्वांस



Monday 21 September 2015

रावसाहेब

रावसाहेब म्हणजे आमच्या छोट्याश्या गावचा राजाच म्हणा नं तुम्ही. तसं त्यांचं नाव भारदस्त होतं एकदम, श्रीमंत सत्यजितराजे पटवर्धन. रावसाहेब म्हणजे आमच्या गावाची शानच म्हणा ना. वय काही तसं फार नव्हतं. साधारण तीस-एकतीसच्या आसपास असेल. पण त्यांच्याकडे बघून तेवढंही वाटायचं नाही. चांगली सहा, सव्वासहा फुटाच्या आसपास उंची, गरुडासारख धारधार नाक आणि समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे निळसर झाक असलेले डोळे, व्यायाम करून चांगली धष्टपुष्ट केलेली सुडौल अंगकाठी आणि थोडासा खर्ज असलेला दमदार आवाज. विदेशात राहिल्यामुळे नुसते गो-या साहेबासारखे दिसायचे. 

त्यांचे पूर्वज सांगलीच्या राजघराण्याशी संबधित आहेत असं म्हणतात. सगळे त्यांना रावसाहेब असच म्हणायचे. त्यांच्या वडिलांना 'रावबहादूर' पदवी मिळाली होती. यांना कुणी दिली नव्हती. पण सगळं गाव त्यांना 'रावसाहेब'च म्हणायचं. त्यांचे वडील रावबहादूर लवकर गेले त्या मानानी, एकुलते एक रावसाहेब पंधरा वर्षाचे असतील जेमतेम. एवढ्या लहान वयात पण ते डगमगले नाहीत. त्यांच्या आईसाहेब म्हणजे मोठं प्रस्थ होतं एकदम. रावसाहेबांच इंग्लंड मधलं शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकटीन सांभाळल त्यांनी सगळ. खटलं काय लहान होतं होय. पण बाईमाणूस म्हणून कुठे काही दुर्लक्ष झाल नाही. गावाच्या बाहेर एक साखर कारखाना, दाराशी बाहेरून आणलेल्या चार पाच किमती गाड्या, मोजता येणार नाही इतकी चहूकडे पसरलेली शेती, ऊस, गहू, फळबागा, कुठल्यातरी जीपची एजन्सी, पुण्याकडे मालकीची दोन थेटर आणि बरच काही. तुम्हाला सुचेल तो आणि आठवेल तो धंदा त्यांच्या मालकीचा होता म्हणाना. 

एकवीस बावीस वय असताना ते शिक्षण पूर्ण करून आले परत आणि त्यानंतर साधारण वर्षभरानी आईसाहेब गेल्या. खूप वाईट झाल हो. पण रावसाहेबांनी दोनेक वर्षात असा काही जम बसवला की सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. चोविसाव्या वर्षी त्यांचं लग्नं झालं बघा, ते इंदूर की काय तरी गावाचं नाव आहे ना तिथल्या राजघराण्यातल्या मुलीशी. वहिनीसाहेब म्हणजे नुसत्या फोटोतल्या लक्ष्मीसारख्या. आमच्या रावसाहेबांच्या तोडीस तोड एकदम, त्यांच्या खांद्यापर्यंत येणा-या, गो-यापान आणि गुडघ्यापर्यंत केस असलेल्या. त्या चुकून कधी बोलल्या तर आपल्या तोंडून तर शब्दच नाही निघायचा बघा. इतकी रूपवान, श्रीमंत बाई पण गडी माणसांशी पण अहो जाहो करत मध सांडल्यासारख बोलणार. आवाज नुसता कानात साठवावा. 

उगाच म्हटलं का आमच्या गावची शान होते म्हणून. रावसाहेबांनी गावात शाळा काढली, कांलेज पण काढलं. गरिबांना फी नाहीच. पुस्तकं पण फुकट. एवढा श्रीमंत राजा पण देवमाणूस एकदम. कधी अंगावर दागिना म्हणून दिसायचा नाही, एक बोटातली हि-याची अंगठी सोडली तर. त्यांची श्रीमंती बघावी दस-याला. एवढा मोठा चौसोपी वाडा राजवाड्याच्या तोंडात मारेल असा सजलेला असायचा. मखमली लोड तक्क्याची बैठक घातलेली असायची. दोन्ही हाताच्या चारी बोटांत वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या, गळ्यात बोराएवढ्या टपो-या मोत्यांची माळ आणि खाली लोंबणारा मुठीएवढ्या आकाराचा हिरवाकंच पाचू, सोन्यात गुंफलेली पोवळयाची माळ, डोक्यावर पगडी, कानात भिकबाळी, सिल्कचे उंची कपडे घालून रावसाहेब झोकात बसायचे. पण हे काहीच नाही. दागिने आणि श्रीमंती बघायची असेल तर आमच्या वहिनी साहेबांना बघायचं त्या दिवशी. मगाशी म्हटलं न तश्या साक्षात फोटोतल्या लक्ष्मी सारख्या. काही काही दागिन्यांना काय म्हणतात ते ही सांगता यायच नाही मला. नखशिखांत हि-या मोत्याच्या दागिन्यांनी मढलेल्या असायच्या. जरा हलल्या की कुठल्या हि-याच्या किरणानी डोळे दिपले सांगता यायच नाही. रावसाहेब येईल त्याच्याकडून वयाप्रमाणे सोन द्यायचे किंवा घ्यायचे. सगळ काम कस आदबीनं एकदम, सोन घेता देताना त्यांचा हात जरी आपल्या हाताला लागला तरी धन्य वाटायचं. अख्खा गाव जेवायचा त्या दिवशी वाड्यावर. पण ही सगळी श्रीमंती सणापुरती. एरवी वागण्या बोलण्यात हा माणूस अगदी साधा. 

रावसाहेबांचा दिनक्रम ठरलेला असायचा, एकदम शिस्तीचा माणूस. सगळी कामं कशी वेळेत. रोज संध्याकाळी रावसाहेब चालत निघायचे आणि गावात एक चक्कर मारायचे. अगदीच टेकले तर लखीचंद सराफाच्या पेढीवर नाहीतर बँकेच्या साहेबाकडे, नाहीतर कुठेही थांबायचे नाहीत. गळाबंद कोट, हातात सिंहाच तोंड असलेली चांदीच्या मुठीची काठी हातात खेळवत ते फिरायचे. काठीची काही गरज नव्हती खरतर त्यांना पण त्यांच्या एकूण रुबाबात ती भर घालायची. त्यांनाही ती आवडायची. सगळ गावच त्यांना ओळखायचं आणि ते गावाला. रस्त्यात दिसेल त्या माणसाकडे बघून ते हलकंसं, ओळखीचं हसायचे. रावसाहेबांनी आपल्याकडे बघाव, हसावं, बोलावं असा रस्त्यातल्या प्रत्येकाला वाटायच. काही चौकशी करायला रावसाहेबथांबले आणि बोलले तर तो दिवस एकदम भारी गेल्यासारखा वाटायचा. 

आयुष्यात काही बनायचं असेल, चांगला माणूस व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल तर रावसाहेबांसारख असं प्रत्येकाला वाटायचं. हे स्वप्नं खरं होवो न होवो पण प्रत्येकाला ते बघायला आवडायचं आणि ते एकमेकांजवळ कबुल करताना पण काही कमीपणा वाटायचा नाही आम्हाला. आमची गरिबी सुसह्य करायला त्यांचं आमच्या सोबतचं अस्तित्वही कारणीभूत आहे असं वाटायचं. माणूसच तसा होतो हो तो. आदर्श ठेवावा असा. निष्कलंक चारित्र्याचा, सरळ मनाचा, एवढ रुबाबदार श्रीमंत व्यक्तिमत्व पण माणुसकी शिल्लक असलेला. त्यांची असूया नाही वाटली कधी, उलट आपणही त्यांच्या सारखं व्हाव असच वाटायच. 

आठवडा होईल आता त्या गोष्टीला विपरीतच घडलं म्हणा ना एकदम. आदल्या दिवशीच तर मी बोललो न त्यांच्याशी, त्यांनी माझ्या मुलाबाळांची चौकशी पण केली. एवढा आनंद झाला होता म्हणून सांगू तुम्हाला. कशामुळे काय कळल नाही अजूनपर्यंत तरी पण त्या दिवशी रात्री पंख्याला टांगून आमच्या रावसाहेबांनी गळफास घेतला. 

जयंत विद्वांस 

(आम्हाला बारावीला E.A.Robinson यांची 'Richard Cory' कविता होती. तिचा शेवट अजूनही डोक्यातून जात नाही. का केलं असेल त्यांनी असं? याच्या अनेक शक्यता मी पडताळून पाह्यला आणि त्या रिचर्ड कोरीनी मला अस्वस्थ केलं. रावसाहेबांशी मिळतं जुळतं काही असेल तर त्यांचा शेवट. पण रावसाहेबलिहायला रिचर्ड कोरी पर्यायानी त्याचा निर्माता रोबिनसोन तेवढाच कारणीभूत आहे, त्यामुळे ते श्रेय त्यांच. मूळ कविता खालीलप्रमाणे – 

Whenever Richard Cory went down town, 
We people on the pavement looked at him: 
He was a gentleman from sole to crown, 
Clean favored, and imperially slim. 

And he was always quietly arrayed, 
And he was always human when he talked; 
But still he fluttered pulses when he said, 
"Good-morning," and he glittered when he walked. 

And he was rich – yes, richer than a king – 
And admirably schooled in every grace: 
In fine, we thought that he was everything 
To make us wish that we were in his place. 

So on we worked, and waited for the light, 
And went without the meat, and cursed the bread; 
And Richard Cory, one calm summer night, 
Went home and put a bullet through his head. 

(E.A.Robinson)