Wednesday 27 July 2016

बाई आणि सर...

ते गुरुपौर्णिमा वगैरे ठीक आहे. फुलवाल्यांचा धंदा होतो. पण माझ्या बालपणी जी किंमत होती शिक्षकांना तेवढी तीव्रता आता नाही राहिली. गुरु म्हटल्यावर एक प्रचंड आदरार्थी भावना असायची, वचक असायचा. त्यांच्या चारित्र्याचा, राहणीमानाचा, ज्ञानाचा, आपलेपणाचा, रागाचा, माराचा एक जाचक वाटणारा पण हवाहवासा वचक असायचा. जुन्या आठवणी काढून अश्रू येण्याचे, हुरहूर लागण्याचे दिवस हळू हळू नाहीसे होतील. आताचे शिक्षक हे गाईड, वर्कबुक, शिकवण्या यातच गुंतले आहेत. कित्त्येकजण शिक्षक आहेत हे सांगावं लागतं. काळानुसार वेष बदलतो हे मान्यं आहे पण प्रत्येक पेशाला एक ग्रेस असते, जी त्याच्या कपड्यातून दिसते. युनिफॉर्मचा खरा उपयोग त्यासाठी होतो. उद्या एखाद्या हॉस्पीटलमध्ये बर्म्युडा, स्लिव्हलेस जाळीचं लाल बनियान, डोक्याला हैड्रोजन लावून केलेले कलरफुल मातेरं असा न्यूरो किंवा दुसरा कुठला सर्जन दिसला तर पेशंट आहे ती हाडं आणि तब्येत गोळा करून ऑपरेशनच्या आधी दुस-या हॉस्पिटलात जाईल. त्या पांढ-या कोटाला, स्टेथोला एक रिस्पेक्ट असतो. माणूस त्या पदाला गेला इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्यामुळे ते पद शोभेल इतकं ज्ञान, वागणूक हवी.

कीर्तनकार भा.रा.घैसास आमचे मुख्याध्यापक होते. मराठी शिकवायचे दहावीला. डोक्यावर टोपी, क्वचित धोतर घालून पण यायचे. काय टाप होती त्यांनी हाक मारल्यावर पोरगा पुढे जाण्याची असा त्यांचा दरारा होता. कायम दोन जाडजूड पुस्तकं हातात, मितभाषी, ज्ञानी माणूस, ते जवळून गेले तरी आवाज बंद व्हायचे. द.मु.आंबेकर आम्हांला इतिहास शिकवायचे. धडा कधीच शिकवला नाही, इतिहास सांगायचे. काय वाणी होती त्यांची ओघवती, ऐकत रहावं नुसतं, एकपात्री प्रयोगच तो. मला इतिहासात मार्क नाही पडले फार कधी पण शिवाजी डोळ्यसमोर उभा रहायचा. अत्यंत हसतमुख माणूस. विनोद करणारे, समजणारे, जाता जाता टोपी उडवणारे. संस्कृतला आम्हांला गुर्जर बाई होत्या. नुकत्याच गेल्या त्या. जोकरला नाकाला, गालाला जसे ते लाल गोळे लावतात तसे त्यांचे गाल होते. अतिशय प्रेमळ, स्पष्टवक्त्या आणि ज्ञानी. आमचा एक दोस्त आणि त्या एकाच वाड्यात रहायच्या पण म्हणून फेव्हर नाही.

तिसरीला खोचे बाई होत्या आम्हांला. नऊवारी घालून येणा-या, मागे चिक्कूच्या आकाराचा अंबाडा घालणा-या, सगळे दात पडलेल्या. कुणी मुलगा रडला की त्याला मांडीवर घेऊन बसायच्या. इंदिरा कुलकर्णी (बहुतेक) म्हणून एक होत्या, गडद वेस्टइंडीज काळ्या अगदी पण त्यांचा रंग तेंव्हा कुणाच्या नजरेवर आघात वगैरे करायचा नाही. अनेक शिक्षक लाभले, तेंव्हा कुठे काय कळायचं त्यांचं महत्वं (याचा अर्थ आता कळतं असा होतो, पण तसं काहीही नाहीये). संस्कार आणि ज्ञान ते लोक आव न आणता देत होते. आमची बुद्धी भांड्याएवढी, त्यांनी घागरीच्या घागरी ओतल्या, आमचं भांडं जेमतेम भरलं एवढंच. त्यांच्या फटक्यात जादू होती. ज्याची त्याची कुवत त्याप्रमाणे कुणाची बुद्धी ठोक्याच्या भांड्यासारखी झाली, कुणाला पोचा आला. आज जाणवतं, कुठला संस्कार डोकावला, सद्सद्विवेकबुद्धी टोचणी द्यायला लागली की, हे त्यांचं देणं आहे. तेंव्हा रुजलं पण लक्षात नव्हतं आलं.

चिंचेच्या तालमीजवळची अडीच वर्ष मॉन्टेसरीं , मग मारुतीच्या देवळातली बदलापूरची पहिली, दुसरीला आपटे प्रशाला, तिसरी ते दहावी सरस्वती मंदिर, अकरावी विमलाबाई गरवारे हायस्कुल,  काही दिवस स्वाध्याय महाविद्यालय मग आदर्श विद्या मंदिर, बदलापूर, मग एम.जी.कॉलेज, अंबरनाथ अशा साताठ शाळातून फिरून आलो. मला कुणी लक्षात ठेवलं असेल असं माझं कर्तृत्व नाही पण या सगळ्यातले गुरुजन कडू गोड आठवणींसकट माझ्या लक्षात आहेत. आता आपल्याला खूप समजतं असं वाटायला लागलं आणि विद्यार्थीदशा संपली. बाकी दुस-याला अक्कल शिकवायला नाहीतरी कुठे अक्कल लागते हल्ली. आता सगळेच शिक्षक, कुणी विद्यार्थी नाही अशी परिस्थिती.

आता मिस आणि सर रग्गड झाले पण आम्ही मिस करतो ते आमच्या 'बाई' आणि सरांना. टाका एक आवाज त्या कोप-यातून, बघा थांबतो की नाही ते.

जयंत विद्वांस

मालस...

काल 'डोळ्यात डिग्री चुकलेली पारेखांची आशा मला कधीच आवडली नाही' असं म्हटल्यावर लोकांचा ती त्या कारणाकरता मला आवडत नाही असा समज झाला. पण मला ती त्याकरता नावडती नाहीये. ती अतिलाडिक आणि चिरक्या आवाजात बोलायची. सतत लाडात बोलणा-या नट्या माझ्या डोक्यात जातात (उदा : निशिगंधा वाड, किशोरी शहाणे) तशी मला सरळ डोळ्यांची तनुजा पण कधी फारशी आवडली नाही. प्रत्येक गोष्टीला कारण नसतं. नाही आवडली तर नाही आवडली. बात खतम पण तिच्या काणेपणाबद्दल बोलण्याचा, नावडण्याचा हेतू नव्हता म्हणून हे लिहिणं आलं. त्यांचं माझ्यावाचून काही अडलं नाही आणि माझंही नाही. :D

शारीरिक वैगुण्यं असणं आपल्या हातात नाही. पण ज्याच्या नशिबी असतं त्याला न्यूनगंड असतो अशी आपल्याकडे परिस्थिती आहे. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत असं वाटणं वेगळं आणि आपल्यात काही कमतरता आहे हे वाटणं वेगळं. तिरळेपणा हे सगळ्यात मोठं चेष्टा होणारं वैगुण्यं आहे. तिर्री, तिकडम, हेकण्या, कर्जत कसारा, लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो (LLTT ) असे अनेक कुचेष्टेचे शब्दंप्रयोग मी लहानपणापासून ऐकत आलोय, बोलतही आलोय कारण तेंव्हा तेवढी अक्कल नव्हती. तिरळा हा फार अपमानास्पद शब्दं आहे. आपल्याकडे निखळ विनोदनिर्मिती फार कमी असते. कुणाच्या तरी वैगुण्यावर आधारित विनोदाला लोक खूप हसतात हे त्यामुळेच असावं. इंग्रजांची तरल, सूक्ष्म विनोद बुद्धी आपल्यात नाही, आपल्याला स्वतःवर हसता येत नाही, दुस-याच्या कुठल्याही गोष्टीवर मात्रं विनोद झाला नाही तरी आपल्याला मनमुराद हसता येतं. इथे मला पुलं त्याकरता वंदनीय वाटतात. त्यांनी व्यंग लिहिलं पण कधीही व्यंगाचा विनोद केला नाही.

बुटकेपणा हा त्यातलाच एक विनोदाचा भाग. अतिउंची हे मात्रं लोकांना व्यंग वाटत नाही. जमैकाची शेली फ्रेझर पाच फूट होती फक्तं पण तिची उंची तिच्या आड आली नाही ऑलिम्पिकमधे १०० मीटरच्या गोल्ड मेडलला. एका दिव्यं माणसाचं अफाट मत मी ऐकलंय, 'हे निग्रो लोक उंच असतात त्यामुळे त्यांचा ढांगा लांब पडतात म्हणून ते इतरांपेक्षा फास्ट पळू शकतात'. आपण लक्ष नाही द्यायचं, गेल डेव्हर्स (५'३") शेली फ्रेझर कोण वगैरे त्याला माहितीच नसणार. ब्रॅडमन, गावसकर, तेंडुलकर, विश्वनाथ - चौघेही साडेपाचफुटांच्या आसपास. पण तेंडुलकर जे पळायचा बावीस यार्डात त्याचा ढांगेशी संबंध नाही हे त्याला कोण सांगणार. बाउन्सर डोक्यावरून जायचे न वाकता म्हणून गावसकर विंडीजविरुद्ध विनाहेल्मेट खेळू शकला असं मत ऐकून तर मी गार पडलो होतो. बुद्धीनी बुटकीच, सॉरी बोन्साय राहिलेली माणसं अशीच बोलणार म्हणा.

पाकिस्तानचा गोलंदाज अझीम हफीजच्या उजव्या हाताला दोन बोटं मिसप्लेस होती पण तो डाव्या हातानी सुसाट टाकायचा. वैगुण्याचा सगळ्यात सुंदर फायदा कुणी करून घेतला असेल तर आपल्या भागवत चंद्रशेखरनी. त्याचा पोलिओ झालेला हात मनगटातून कसा वळेल हे त्यालाही सांगता यायचं नाही. फलंदाज काय डोंबल हात बघून ठरवणार की गुगली आहे की लेगब्रेक. सैन्यात असताना चाचणीत बॉंम्ब कडेलाच फुटल्यामुळे दृष्टी अधू झालेला आफ्रिकेचा फॅनी डिव्हिलीअर्स लवकर निवृत्त झाला नाहीतर तेंडुलकरला १०० x १०० साठी अजून थोडं खेळावं लागलं असतं. वैगुण्यावर मात करायला जिद्द लागते. लाकडी पायाची सुधाचंद्रन जिद्दीमुळे लाडकी झाली. आता खुनी असेल तो पण वयाच्या अकराव्या महिन्यात गुडघ्याखाली दोन्ही पाय कापलेला ऑस्कर प्रिस्टोरीअस ब्लेड रनर झाला. वैगुण्यं असतं पण त्याच्यावर मात करायला जिगर लागते.

तर मूळ मुद्दा होता किंचित तिरळेपणा. काहीवेळेला थोडे डिफेक्ट असलेल्या वस्तू कमी किंमतीत मिळतात. मागे मी एक शर्ट आणला होता, बाराशेचा तीनशेला. मनात आलं, मूळ किंमत दीडशे असेल पण शर्ट झकास होता. उत्सुकता म्हणून मी विचारलं की पाव किंमतीला का विकताय हा. सेल्समन पण हौशी होता, त्यानी सांगितलेला डिफेक्ट मला बापजन्मात समजला नसता. पहील्या बटणाचं अंतर कॉलरपासून ठरलेलं असतं आणि मग पुढच्या बटणांचंही अर्थात. तर ते एकदीड सेंटीमीटरनी वर झालं होतं म्हणून डिफेक्टेड पीस. तसं कुणाला काय डिफेक्ट वरून येताना असेल ते सांगता येत नाही. ठार तिरळा माणूस बघितलं की हसू येतंच. केश्तो मुखर्जी बघा, तो काहीही बोलण्याची गरज नसते, त्यानी ते डोळे फिरवून ' आईये ना' म्हटलं की हसू येतंच. आमच्या वर्गात अकरावीला एक आंगणे म्हणून मुलगा होता. स्लाइट काणा होता तो, त्याला मुलं मुद्दाम कांगणे म्ह्णून हाक मारायची. पण तो स्मार्ट दिसायचा उलट त्यामुळे. अमिताभ, आशा पारेख, व्ही.शांताराम, गौतम राजाध्यक्ष ही सगळी काणी मंडळी. पण त्यांचं कुठंही अडलं नाही.

मधे कुणीतरी एफबीवरच मला त्या 'काणे'पणाला अजून एक शब्दं सांगितला, 'मालस'. सालसशी साधर्म्य असल्यामुळे असेल पण मला तो जाम आवडला. निळ्या, हिरव्या डोळ्यांचं आपल्याकडे कौतुक का? कारण ते क्वचित आढळतात. तसेच हे मालस लोक. एखादा राग गाताना तयारीचा गायक मुद्दाम वर्ज्य स्वर लावून जशी गंमत करतो तशी ही देवानी केलेली गंमत आहे. सगळं परफेक्ट नसावंच, छोटीशी उणीव सौंदर्यस्थळ होऊन जाते. मुकेशचा नाकातला, मीनाकुमारी, तलत, ऋजुता देशमुखचा कापरा आवाज ऐकताना किती गोड लागतो. जॉनीवॉकरचा चिरका आवाज, मुमताजचं अपरं नाक, हृतिक रोशनचं सहावं बोट, मीनाकुमारीच्या डाव्या की उजव्या हाताला नसलेली करंगळी, ए.के.हंगलचं टक्कल, ललिता पवारांचा अर्धोन्मीलित डोळा, मुक्रीची उंची, मधू आपटेंचं तोतरं बोलणं, जेफ्री बॉयकॉट, सिल्व्हेस्टर स्टॅलनचं - डिलिव्हरीच्या वेळेस फोरसेप लागून त्याच्या चेह-याचा डाव्या बाजूचा खालचा भाग पॅरलाईझ झाला होता - ओठ जीभ आणि हनुवटी - त्यामुळे तोंडातल्या तोंडात बोलणं त्यांच्या प्रसिद्ध होण्याला कुठे आड आलं नाही.

वैगुण्यं असतंच प्रत्येकात. माणूस ते दुस-याचा कमीपणा दाखवण्यासाठी शोधून लक्षात ठेवतो, हातचा असावा म्हणून. मन्सूर अलीखान पतौडीचा एक डोळा बक-याचा होता पण काय देखणा दिसायचा तो. महाराज रणजितसिंहांना एक डोळा नव्हता. त्यांचं पोर्ट्रेट करायला एक चित्रकार यायचा. चित्रं काढल्यावर महाराज खुश झाले. शिकार करताना काढलं होतं चित्रं. त्यामुळे बंदुकीचा नेम धरताना एक डोळा आपोआप बंद दाखवता आला. डोळे सगळ्यांनाच असतात, 'नजर' 'दृष्टी'  असेलंच असं नाही. 'नाही'ची यादी संपत नाही आपली, आहे त्यात समाधान कधीच नसतं. शारीरिक वैगुण्यं शोधण्यापेक्षा ज्यादिवशी आपल्यात एखादा चांगला गुण नसणं हे स्वतः:चं वैगुण्यं वाटेल त्यादिवशी कदाचित आपण माणूस म्हणून जगायला सुरवात करू.   

एवढं सगळं मान्यं केलं तरीपण पारेखांची आशा नाही आवडत म्हणजे नाही आवडत. :P  ;)

जयंत विद्वांस


बढती का नाम...

दाढी हा खरडण्याचा विषय आहे? एकार्थाने आहे, एकार्थाने नाही. वयात आलेली मुलगी जशी सारखी आरशात बघते, तशी मुलं दिवाळीत किल्ल्यावर अळीव टाकून येते तशी ती आलेली नाजूक लव कुरवाळत वेगवेगळ्या कोनातून बघत असतात. एकदम त्याला आपण आता पुरुष, मोठा माणूस वगैरे झाल्यासारखं, रुबाबदार दिसायला लागलोय असं वाटायला लागतं. काही जणांना उपेंद्र लिमयेसारखी हिटलर जेवढी ठेवायचा त्या जागी मिशी येतंच नाही आणि अंबुजा सिमेंटची दिवार मधे असल्यासारखी त्यांच्या मिशीची फाळणी होते. कित्त्येक जणांना टी.व्ही.वर हवामानाच्या अंदाजात चार कोप-यात चार ढग दाखवावेत तशी मधली शहरं वगळून दाढी फुटते. बोकडासारखी हनुवटीवर, कानाच्या बाजूला कल्ला लांबल्यासारखी येते बाकी मधला भाग वाळवंट असतो. मग एखाद्या त्याच्याच वयाच्या मुलाच्या गालावर पीक काढल्यासारखी संपूर्ण दाढी दिसली की त्याला असूया वाटते. मग नापीक जमिनीवर शेतकरी लावतो त्यापेक्षा जास्ती आशेवर आज ना उद्या दाढी उगवेल म्हणून पहिल्यांदा झिरो मशिन किंवा कात्री मग वस्तरा चालवून मशागत केली जाते. सगळ्यांनाच तिथे खुंट फुटतात असं नाही. अशा लोकांबद्दल मला सहानुभूती आहे. बिचा-यांना सतत दाढी करावी लागते, पूर्ण दाढी वाढवून ती कोरायचा वगैरे आनंद घेता येत नाही.

प्रत्येक गोष्टीतलं नवखेपण गंमतीशीर असतं. पोरगा नेहमी वडील कशी दाढी करतात ते बघून शिकतो. मग कुणी नसताना तो ट्राय करतो. आता जेल आली, फोम आलं, मशिन्स आली, एकशे ऐंशी डिग्रीत झोपवणा-या आणि मग रेट बघून तिथेच बेशुद्ध पाडणा-या खुर्च्या, स्वप्नात बघाव्यात अशा अप्राप्यं बायका आफ्टर शेव्ह लावल्यावर चिकटतात असं स्वप्नं दाखवणारी आफ्टरशेव्ह, अनंत फळांच्या वासाचे फेसवॉश, फेसपॅक, मसाज आले. पण मी केली ती पहिली दाढी वेगळीच होती (अर्थात माझीच). बाबा करायचे तशी. गोदरेजचा तो पांढ-या झाकणाचा निळा गोल डबा, त्यात मधे पोट खपाटीला गेलेली ती पांढरी साबणाची रिंग, एक प्लास्टिकचा मग, एक स्टीलचा रेझर, गुबगुबीत केसाळ ब्रश, टोपाझचं ब्लेड, फोल्डिंगची कात्री आणि तुरटी हा सरंजाम ठेवायला एक पत्र्याचा डबा (शक्यतो वनदेवी बांधानी हिंगाचा) असायचा. स्टुलावर आरसा ठेवून बसायचं, गालफडं बसली असतील तर गालात जिभा घालून टेंगळं आणायची आणि तिथे साफसफाई चालू करायची.

आम्ही कटिंगला जायचो लहान असताना बजरंग न्हाव्याकडे. त्याच्याकडे तो चामडी पट्टा अडकवलेला असायचा वस्त-याला धार लावायला. त्याची ती अल्युमिनियमची पाण्याची वाटी, एकमेव लाकडी खुर्ची, धुरकट आरसा, गुन्हयांवर पांघरुण घालावं तसं ते त्याचं काळं कापड वर्षानुवर्षे तसंच होतं. एक तर त्याला सोडा वॉटर चष्मा होता. वाढलेले केस कापणे हे एकंच काम त्याच्याकडे व्हायचं. 'काय करू?' 'नेहमीसारखी, बारीक'. यापुढे कुठलाही संवाद तिथे झाला नाही. नंबर असेल तर दाढीचं जि-हाईक बघावं त्याचं. गुगल मॅप दोन बोटांनी जसा मोठा करून बघतात तसा तो गालाचा साधारण एक स्क्वेअर इंच एरिया ताणून धरायचा आणि कुठे तीळ बीळ आहे का शोधल्यासारखा अगदी डोळे चिकटवून दाढी करायचा. कानाचे केस, नाकपुड्या तिरक्या आणि वर करून तिथले केस कापणे वगैरे फुकट काम. गालफडं बसलेल्या वृद्धांची दाढी मात्रं हे लोक काय छान करतात, स्किल हवं त्याला. बजरंग दाढी झाल्यावर पाण्याचा फवारा असा मारायचा की कुणाला वाटेल, माणूस बेशुद्ध पडलाय आणि उठवण्यासाठी हा तोंडावर पाणी मारतोय. माणूस घाबरेल असा हल्ला, मग तुरटीची ती रिनच्या आकाराची वडी फिरवायची, खसाखसा तोंड पूसून मागचा लिव्हर हलवला की उठायचं गप.   

तोंडाला फेस आणण्याचे म्हणजे लावण्याचे पण अनंत प्रकार असतात. एकारांती आडनाव असेल तर तोंडाला दिसतोय तो साबणाचा फेस असावा असा संशय येईल इतपतच. ती गोदरेज डबी एका पिढीला एक अशी पुरेल इतका कमी. रोज दाढी करणा-यांचं तर मला फार कौतुक आहे. ते सटासट आल्यापासून जास्ती सोपं झालं असावं. माझ्या माहितीत एकजण दात घासून झाले की तोंडावर पाण्याचा हात फिरवतो की लगेच दाढी उरकून घेतो. एक अजून वस्त-यानी घरी दाढी करतो. एकाला लक्स लागतो फेस करायला. एक रेझरला त्या ब्लेडची खालची पट्टी लावतंच नाही, काय तर म्हणे एकदा हरवली म्हणून तशीच दाढी केली तर जमली, कशाला उगाच नवा आणायचा रेझर. एक सांताक्लॉझसारखा फेसाची दाढी काढतो. मग अगदी लोण्यात बुडवल्यासारखा रेझर गायब होतो. घरी दोन्ही कल्ले, मिशीची दोन्ही टोकं मापात कापणारे लोक महान आहेत. मला ते कधीच जमलं नाही. एकदाच मिशीला दोन्ही साईडला काट मारत मारत त्या मांजराच्या गोष्टीत खवा जसा दोन्हीकडून संपतो तशी ती चार्ली चॅप्लिनच्या वळणावर गेली तेंव्हा काढून टाकायची वेळ माझ्यावर आली होती आणि घोटाळ्यात सापडलेला माणूस कॅमेरामन अमुक अमुक सकट तमुक तमुक पुढे जसा चेहरा लपवतो तसा मी दोन दिवस फिरत होतो.

मी दाढी न करण्याची अनेक कारणं आहेत. आळस, आधी अगदी स्केलेटन तब्येतीमुळे होणारा रक्तपात, दाढी वाढल्यामुळे जरा मुरूम टाकून भर घातलेल्या खड्डयासारखे दिसणारे गाल, आज केली तर फार तर दुस-या दिवशीची सकाळ एवढाच वेळ ती केल्यासारखी वाटेल अशी लगेच येणारी सरला येवेलकर सारखी उफाड्याची दाढी या सगळ्याचा परिणाम दाढी ठेवणे हा आहे. सगळ्यात पहिला आवडलेला दाढीवाला म्हणजे 'अब्दुल्ला' मधला संजय खान. मग असे अनेक दाढीवाले दिसले. प्रत्येकाची स्टाईल वेगळी. टागोर, अनंत भावे, प्रणब रॉय, अनुपम गुलाटी, बाबासाहेब पुरंदरे, अच्युत गोडबोले, मंगेश तेंडुलकर, प्रकाश झा, मॅकमोहन 'सांभा', शेखर कपूर, कबीर बेदी, शॉन कॉनरी, प्रकाश जावडेकर, कलमाडी, प्रफुल्लकुमार महंत, रामदेवबाबा, वागळे, ब्रिजेश पटेल, संदीप पाटील, बॉर्डर, हशिम अमला, इम्रान ताहीर, नदीम(श्रवण), फ्रेंच 'कटा'तले बाळासाहेब, अमिताभ, विजय तेंडुलकर, आय.के.गुजराल आणि मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रत्येकाचा करिष्मा वेगळा, गाजण्याची कारणं वेगळी. 

पण या सगळ्या दाढीवाल्यांपेक्षा एक दाढीवाला खूप वेगळा होता. त्या खप्पड चेह-याच्या माणसाला एका अकरा वर्षाच्या अनोळखी मुलीनी - ग्रेस बेडेलनी - दाढी वाढवायचा सल्ला दिला होता. तो त्यानी मरेपर्यंत पाळला. एवढ्यातेवढ्या अपयशानी खचून जाणा-या माणसांनी त्याचा जीवनप्रवास बघावा. एकतर देवीचे व्रण असलेला खप्पड चेहरा, कृश शरीरयष्टी पण मनानी पोलाद असलेल्या या माणसाची १८३२ ला नोकरी गेली, सिनेटच्या निवडणुकीतही तो हरला. पुढच्या वर्षी तो धंद्यातही बुडाला. १८३५ मधे त्याच्या प्रेयसीचं निधन झालं. पुढच्या वर्षी त्याला नैराश्याचा झटका बसला. १८३८ मधे तो स्पीकरची निवडणूकही हरला. १८४३ मधे तो काँग्रेसच्या नॉमिनेशनसाठी उभा राहिला आणि पुलंच्या अण्णू गोगटयासारखा पडलाही. परत १८४८ ला रीनॉमिनेशनसाठीही पदरी निराशाच आली. १८४९ ला लँड ऑफिसर या पदासाठी पण त्याला नाकारण्यात आलं. १८५४ ला तो सिनेटची निवडणूक पण हरला. १८५६ ला उपाध्यक्षाच्या नॉमिनेशनसाठी पण हरला. १८५८ ला तो सिनेटची निवडणूक यशाचा बट्टा लागू नये म्हणून परत एकदा हरला. एवढ्या वेळा अपयश पदरी पडूनही तो लढत राहिला.

१८६१ ला मात्रं तो अमेरिकेचा अध्यक्ष झाला. त्याला ज्यांनी आधी हरवलं ती माणसं काळाच्या ओघात विस्मृतीत गेली पण आयुष्याची शेवटची निवडणूक जिंकलेला आणि हत्या झाल्यामुळे फक्तं चार वर्ष अध्यक्ष झालेला दाढीवाला अब्राहम लिंकन टिकून आहे आणि राहील. दाढी काय आम्हांला निसर्ग नियमाने आली, अशी जिद्द आणि कर्तृत्वं निसर्ग नियमाने मात्रं आलं नाही त्याचं काय करायचं? :)

जयंत विद्वांस

लेखन, लेखनशैली आणि लिहावं काहीतरी हा कंड......

मला स्वत:ला एफबीचा या करता खूप फायदा झाला. पोस्ट टाकायची म्हणजे नेमकं काय करायचं इतकं लो लेव्हलचं अज्ञान होतं. हळू हळू शिकत गेलो. पण मिळणा-या प्रतिसादामुळे ते जास्तं आवडत गेलं हे ही सत्यं आहे ('एकमेक प्रशंसा संघा'चा सभासद नसतानाही). एफबीच्या आधी जे कुणी लिहित असेल ते डायरी, पत्रं किंवा ज्याच्याकरिता लिहिलंय तेवढ्यापुरताच मर्यादित वाचक होता. बाकी आम पब्लिकला काय वाटतंय हे कळण्याचा मार्ग नव्हता. 

प्रतिसादांनी लोकांना काय आवडतं, काय आवडत नाही, आपल्याला अपेक्षा पूर्ण करणं किती जमतं, दुसरा आपल्यापेक्षा वेगळं काय लिहितो, ते वाचण्यासारखं असतं का?, दुस-याचं वाचताना जसा आपल्याला कंटाळा येतो तसंच आपलं वाचताना दुस-याला पण येत असेल का?, आपण लिहिलेलं परत वाचताना आपल्याला कंटाळा येतो का?, असेल तर, सुधारणा काय कराव्या लागतील?, मजकूर हा अनुभव असला तरी आपण तो चटपटीत करण्याच्या नादात भरकटवतोय का? असे अनेक प्रश्नं विचारले स्वत:ला. मग जी काय शैली असेल ती आपोआप होत गेली. कणेकरांचे वडील त्यांना म्हणाले होते - 'तुझं वाचताना कंटाळा येत नाही'. एवढी साधी गोष्टं लिहिताना पाळली तरी लिखाण वाचनीय होऊ शकतं. लिहिणं हे एक चांगलं व्यसन आहे. फक्तं त्याचा रतीब झाला की गुणवत्ता उतरते. सतत वाचनीय लिहिणं ही देणगी असू शकते किंवा तेवढा व्यासंग असू शकतो, जे प्रत्येकाला जमेलंच असं नाही. आपण व्यक्तं होण्याकरतो लिहितोय की बाजू मांडण्यासाठी, उगाच विरोधाकरता विरोध म्हणून लिहितोय हे मात्रं ठरवलं पाहिजे.

एकदा लिहित गेलं की तो कंड पाठ सोडत नाही. पण प्रतिसादाकरता लिहू नये मग निराशा येते नाही कुणाला आवडलं तर. आधी स्वत:ला आवडलाय का याची खात्री असावी. मिळणारे सगळेच प्रतिसाद खरे किंवा मनापासून असतात असं नाही त्यामुळे त्यांनी खूष किंवा नाराज होऊ नये. एकदा आपली रेंज कळली की त्रास होत नाही. उगाच बांबू मोठा आहे म्हणून पोल व्हाल्टच्या भानगडीत पडू नये त्याकरता आपण तेवढ्या उंचीवर जाऊ शकतो हे पाहणं गरजेचं आहे.

आणि माणसानी ना साधं लिहावं. साधं जास्ती परिणामकारक असतं, उगाच सतत अवघड शब्दांचे ड्रायफ्रुट्स टाकायचा हव्यास नको, दिसतं छान, भरजरी पण पेललं पाहिजे ना वाचणा-याला आणि आधी स्वत:लाही. स्वच्छ धुतलेल्या चेह-याची हसरी बाई, मेकपची पुटं चढवून लिपस्टिक बिघडू नये अशा बेतानी नकली हसणा-या बाईपेक्षा देखणी असते एवढं लक्षात ठेवलं की झालं.

-- जयंत विद्वांस

कॉफीपे चर्चा...

नवलकोल, दुध्या, शेपू, कारलं, फरसबी असे अनेक माझे शत्रू आहेत. चांगले संस्कार करण्याच्या नादात यावरून बोलताना माझ्या बालपणात कुणीही थकलेलं नाही, आता बोलून काही उपयोग नाही. बायको जेवणाच्या बाबतीत आई वडिलांनी एक चांगली सवय म्हणून लावली नाही हे म्हणून थकल्याला सुद्धा काळ लोटला. मी ही To ignore is the best revenge या वाक्याप्रमाणे वागून कुठलीही सुधारणा करू शकलेलो नाही. एखादी चव नाही आवडत जिभेला त्याला आपण काय करू शकतो सांगा मला. चव लादता येते का? डेव्हलप होते वगैरे मला पटत नाही.

इथे मग तोंडी लावणं उपयोगाला येतं. आजी अर्ध्या पळी तेलात चार ठेचलेल्या लसणी, मोहरी घालून चुर्र आवाज काढून पोळीबरोबर द्यायची त्याबरोबर मी जेवण करू शकायचो, इतकी सुंदर चव त्याला असायची. गूळ थोडा चिरडायचा त्यावर दोनचार थेंब लिंबू पिळायचं, अप्रतिम लागतं पोळीबरोबर. दोन कप पाण्यात चिमूटभर जिरे टाकून उकळवा आणि त्यात कधी पाव बुडवून खा आणि सांगा मला. अतिशय गोड लागतो. तेंव्हापासून मला अशा गोष्टी एकत्र करायची सवय लागलीये.

मला कुठलीही पाककृती येत नाही, कॉफी सोडून. त्यामुळे मला शोध लावणं गरजेचं होतं भाजी आवडीची नसली की. मस्तं पिकलेल्या चिक्कूची साल काढायची, पोळीबरोबर चांगला लागतो. दहीभात आणि तिखट फरसाण झकास लागतं. केळं सोलायचं त्यावर मध घालायचं, जरा कुस्करायचं, मस्तं लागतं नुसतंही आणि तोंडी लावणं म्हणूनपण. ताजा फोडणीचा भात सुद्धा वेगळा लागतो. सायभात आणि लसूण चटणी कालवली की त्यासारखं सुख नाही. पोह्याच्या चिवड्यामध्ये चुरलेला मोतीचूर किंवा बेसनाचा लाडू (एका लाडवाचे साधारण आठ दहा तुकडे) हे मिश्रण मी तिन्हीत्रिकाळ खाऊ शकतो.

या सगळ्यांपेक्षा मला मी केलेली कॉफी आवडते. एक चमचा मध, कुणी बघत नाहीये हे बघून घेतलेली दोनतीन चमचे साय, एक चमचा साखर आणि एक चमचा ब्रू असं मस्तं फेटायचं, त्यात गरम दूध घातलं की लागणारी चव अद्वितीय असते. बरोबर खारे काजू, महिनाखेर असेल तर बुधानीचे वेफर्स हवेत, त्यात अचूक मीठ असतं. लपाछपी खेळल्यासारखी कॉफी त्या सायीच्या आत कुठेतरी कणभर चिकटून येते आणि वर्ज्य स्वर लागल्यावर जशी मजा येते तशी चव बदलते. त्या मधाची चव पुढे तासभर तरी जिभेवर प्रेमात पडल्यासारखी रेंगाळत असते.

तात्पर्य काय तर खारट, कडू, गोड, मधाळ, सायीची मायाळू अशी मिश्र चव मला आवडते. आयुष्य तरी वेगळं काय असतं. एकंच चव सतत असेल तर बेचव होईल ते. असो! आलात कधी तर खारे काजू वगैरे घेऊन या, कॉफी मी देईन, होऊ दे खर्च. रंगेल जरा कॉफीपे चर्चा. ;)

जयंत विद्वांस

Wednesday 20 July 2016

नमूने (५)…

साधारण तेंव्हा सत्तरीचे असतील ते. मी ९६ ला पहिल्या नोकरीत होतो तिथे फक्तं पगाराचं काम करायला ते यायचे. एकूण काम महिना संपल्यावर असायचं खरंतर पण ते वेळ घालवायला दिवसाआड तरी येऊन बसायचे. कार्ड अपडेट कर, हातानी ते मस्टर लिहून काढ अशी रोजगार हमीची दुष्काळी कामं ते करत बसायचे. अतिशय सुरेख अक्षर (मराठी, इंग्लिश दोन्ही), कामात एकही चूक नसायची, कधीही उशीर झाला नाही पगार काढायला, रजेचा हिशोब सुद्धा वर्ष संपलं की आठवड्याच्या आत सुवाच्य अक्षरात - 'श्री.***साहेब यांना सविनय सादर, सन १९९६-९७ या वर्षाकरिता अर्जित रजेचा तपशील' - या हेडींगखाली पुढे निबंध लिहिलेला नाटकी प्रकार ते द्यायचे. बोनसचा हिशोब पण कायम तयार असायचा. आडवी, उभी बेरीज करा, चुकणार नाही. वाढलेला डी.ए.पुढच्या महिन्यात देताना कधीही घोळ नाही. असे सगळे कामातले गुण त्यांच्याकडे निश्चित होते. पण अतिशय नाटकी माणूस. आता ते हयात नाहीत.

ते एस.टी.त होते. तिथून रिटायर्ड झाल्यावर ते इकडे यायचे. त्यांचा एक डोळा काचेचा होता. एकाच डोळ्यानी बघायचे त्यामुळे तिरके बसून चालवायचे ते. स्कुटर अशी मारायचे की मागचा जीव मुठीत धरून बसेल. एका पायात रॉड होता त्यांच्या, त्यामुळे लंगडल्यासारखे चालायचे. सगळे पांढरे केस मागे फिरवलेले, तोंडात कवळी पण एकशेवीस तीनशे पान कायम, शर्टची दोन बटणं उघडी टाकून बसायचे. दाढी कायम गुळगुळीत आणि चेह-यावर फाउंडेशनचे थर. खारेदाण्यासारखा चेहरा दिसायचा. काचेचा डोळा लक्षात येऊ नये म्हणून तपकिरी गॉगल घालायचे. अत्तराचा घमघमाट असायचा. कानात कायम फाया. डबा चार पुड्याचा आणायचे. अगदी साग्रसंगीत काम जेवण म्हणजे. तोंडावर इतकं गोड बोलतील की तुम्ही दत्तक जाऊ का विचार कराल. मूलबाळ काही नव्हतं त्यांना. बायको यांच्या वरताण होती. पासष्ठीची असेल म्हातारी पण कायम लो कट स्लिव्हलेस, बॉबकट, चामडी लोंबणारे हात, सुरकुतलेलं उघडं पोट आणि तोंडावर फाउंडेशनचे थर, फार ओंगळ प्रकार होता तो.

त्यांचे तिथेच व्याजानी पैसे होते. तारखेच्या आधी दोन दिवस प्रचंड गोड बोलायचे. व्याज दिलं की मी कोण तुम्ही कोण. मुका घ्यायची फार सवय त्यांना. कुणाचाही घ्यायचे. मी आधीच सांगितलं, तसलं काही केलं तर मी शिव्या देईन. त्यामुळे त्यांचा माझ्यावर प्रचंड राग. एकतर मला नाटकी माणसांचा प्रचंड तिटकारा आहे आणि त्यात उगाच कुणी अंगाशी आलं तर मग मी शिव्या देतो. त्यांचं वय बघता त्यांच्याकडून वारसदार पत्रं घ्यायचं होतं म्हणून त्यांना फोन करून बायकोचं नाव विचारलं होतं. यांचं इनिशियल एम.एस.टी.आणि बायकोचं पी.एम.टी., जाम हसलो होतो. मला म्हणाले, 'तुझं टाक, तू मला मुलासारखाच आहेस' वगैरे. दुस-या दिवशी घाईनी आले ते. म्हाता-यानी खाली जाऊन ते पत्रं स्वतः चार वेळा, दुस-याकडून दोन वेळा वाचून मग सही करून वर आणलं. मी मग सोडतो काय? म्हटलं, 'आलो असतो दत्तक पण ** आडनावापेक्षा विद्वांस लई भारी आहे म्हणून माझं नाव टाकलं नाही'.

मी एक्सेलला पगारपत्रक तयार केलं होतं तर ते साहेबाच्या घरी सकाळी आठला हजर. परत गावभर बोंब, माझ्यामुळे त्यांची नोकरी जाणार वगैरे. मी जस्ट ट्रायल करून बघितलेली. त्यामुळे ते माझ्या जास्तीच डोक्यात गेले. आमच्या इथे खाली देशपांडे म्ह्णून अर्क होते. ते त्यांच्यासारखंच गोड बोलून त्यांची ठासायचे. एकदा बोलताबोलता त्यांनी काल स्वीटहोमला लोण्याची भजी खाल्ली सांगितलं, मी री ओढायला. वर्णन तर असं की तोंडाला पाणी सुटेल. म्हातारा सगळं ऐकत होता. संध्याकाळी बायकोसकट हजर तिथे. ऑर्डर दिली. वेटरचा चेहरा मख्ख, त्याला वाटलं आपण चुकीचं ऐकलं. समजल्यावर तो हसायला लागला. इकडे म्हातारा अजूनच पेटला मग. काल आमचे देशपांडे खाऊन गेलेत म्हणाला. मालकापर्यंत गेला पार. मग घरी जाताना आमच्या नावानी बोटं मोडत आणि शिव्या देत घरी गेले असणार. दुस-या दिवसापासून आमच्याशी कट्टी आठवडाभर. त्यानंतर वर्षभरानी असेल, देसाई बंधूंकडे सीडलेस हापूस आलाय, काल घेतला असं देशपांडे म्हणाले. मी री ओढली. 'फक्तं मऊ करायचा, देठाच्या जागी स्ट्रॉ घालायची आणि डायरेक्ट आमरस प्यायचा'. म्हातारा म्हातारी नटून थटून हजर देसायांकडे संध्याकाळी. तिथे ही वादावादी. काय पब्लिक हसलं असेल यावरून आम्ही लोळत होतो. जाम शिव्या दिल्या असणार आम्हांला आईबहिणीवरून.

श्रावणात सत्यनारायण असायचा कंपनीत. एकमेव डोळा मालकाकडे ठेऊन सगळ्यांना ऐकू जाईल अशी प्रार्थना करायचे नमस्कार करताना, 'देवा, साहेबांची भरभराट होऊ दे, त्यांना काहीही कमी पडू देऊ नकोस'. मी आणि बापट, 'म्हणजे मला व्याज मिळेल' म्हणायचो. आमचे बापट (* व्ही.व्ही.बी.पोस्ट) म्हणजे आधीच बोलण्यात आचरट, अश्लील माणूस. 'अरे मेकअप बघ त्याचा, तुला वाटतं ह्याने काही केलं असेल बायकोला? पोर कसं होईल मग?' बाकी वैयक्तिक कधी मी कुणावर टीका कधीच केली नाही पण विनाकारण ते माझ्या मागे कायम मला नावं ठेवायचे. त्यांचं त्यांच्यापाशी, मी मात्रं वयाचा मान ठेऊन कधीच त्यांना उलट किंवा अपमानास्पद बोललो नाही.

काय सांगावं पुढेमागे शोध लागेल पण सीडलेस आंब्यांचा, कुणी संजीव कपूर लोण्याची भजी पण करेल. दोन्हीतलं एकेक ओंकारेश्वरावर ठेऊन येईन हयात असलो तर. एका डोळ्याचा कावळा नाचत खायला पुढे आला की माझा पुनर्जन्मावर पण विश्वास बसेल. 

जयंत विद्वांस


Monday 4 July 2016

सत्तर एमएम चे आप्त (१४)… मदनमोहन कोहली...

बॉडी बिल्डिंगची हौस असलेला, बॉक्सिंग करणारा, उत्कृष्ट बिलियर्ड खेळणारा, उत्तम  पाककला येणारा, पोहण्याची आवड असणारा, रणजीसाठी राज्याकडून थोडक्यात निवड हुकलेला, बॉल रूम डान्समध्ये रुची ठेवणारा, चांगलं गाता येणारा, गाणी लिहू शकणारा तो, एक ऍथलिट पण होता. त्यानी तलतसारखा हिरो व्हायचा पण प्रयत्न केला. तो सैन्यात सेकंड लेफ्टनंट होता दोन वर्ष. दुस-या महायुध्दानंतर तो रिटायर्ड झाला. संगीताचं कुठलंही औपचारिक शिक्षण न घेतलेला, दिसायला अत्यंत देखणा असा हा गुणी संगीतकार. बगदादमधला जन्मं, लाहोरला शिक्षण आणि मुंबईला कर्मभूमी. देशभक्तं मदनलाल धिंग्रांच्या पुतणीशी - शीला धिंग्रांशी - त्याचं लग्नं झालं होतं. पंचवीस वर्षांच्या सांगितीक कारकिर्दीत त्यानी ९५ प्रदर्शित चित्रपटात ६४८ गाणी, बारा डबाबंद चित्रपटात २८ आणि एका डॉक्युमेंटरीसाठी एक एवढी गाणी दिली. 

हरलेल्या किंवा अनिर्णित सामन्यात काढलेलं शतक, पाच विकेट्स कुणाच्या लक्षात रहात नाहीत. एरवी फार कर्तृत्व न दाखवलेला हृषीकेश कानिटकर शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकून दिला म्हणून लक्षात रहातो आणि सतत उपयोगी खेळ्या केलेला यशपाल शर्मा आणि त्याच्यासारखे इतर अनेक मात्रं लोक पटकन विसरतात. त्याचं तसंच झालं. अनेक हिट गाणी देऊनही त्याचे चित्रपट फार चालले नाहीत. त्यामुळे तो बी ग्रेड किंवा न चालणा-या चित्रपटांचा संगीतकार असं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. तेंव्हाच्या खप असलेल्या संगीतकारांनी रेकॉर्डिंग स्टुडिओ महिनोंमहिने बुक करून ठेवले. त्यामुळे लायकी असलेल्या पण खप नसलेल्या संगीतकारांना त्यांच्या मिनतवा-या कराव्या लागायच्या. या मानी माणसाला कसं जमणार ते. लता, तलत, रफी असं जबरदस्त त्रिकुट त्याच्याकडे गायचं. आता त्यांची गाणी ऐकून लगेच लोक गहिवर काढतील, रुमाल डोळ्यांना जातील पण त्याला स्टुडिओ मिळू दिला जात नाहीये याबद्दल कुणीही बोललं नसणार.

एक डाव्या हाताला हार्मोनियम घ्यायची, शाल टाकायची, फर्माईशी मागवायच्या आणि आपल्याला म्हणायचंय तेच म्हणायचं, आवाज जरा मुलायम काढायचा, शब्दांच्या जागी नि सा ग, रेगम असं काहीतरी फास्ट गाऊन दाखवायचं (नव्याण्णव टक्के लोकांना त्यातलं काहीही कळत नाही असं माझं शंभर टक्के मत आहे), टाळ्या आल्या की मोक्ष मिळतो मग परत शब्दांवर यायचं, आपले प्रशंसासंघ पोसायचे, कॉर्पोरेट मैफिली करायच्या, कॅसेट खपवायच्या, व्हिडीओ काढलात तर अर्थाशी सुसंगत नसेना का एचडी क्वालिटी व्हिडीओ आणि देखण्या बायका घ्यायच्या की झालात तुम्ही प्रथितयश गझलगायक. डझनभर गझल वाजल्या असतील तुमच्या बाजारात तर तुम्ही थोर आहात. या लोकांच्या कार्यक्रमाचा एक फॉरमॅट आहे. काहीही न कळता हातवारे करणारे, मांड्यांवर चुकीचे ताल धरणारे, पाठ गझला त्याच्या बरोबरीने म्हणणारे, 'प्रश्नच नाही, काय तोडतो तो, त्याचं हे ऐकलंय?, खल्लास, तरी आज वरचा स्वर कमी लागतोय' अशा 'अभ्यासू' कॉमेंट करणारं पब्लिक असतं. पहिला शब्दं आला भरघोस खपलेल्या गझलेचा की गगनभेदी टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. बेडकांच्या विहिरीत भरणा-या मैफिली या.

याच्या गझल ऐका किंवा कुठलंही गाणं ऐका. ऐकताना माणूस हरवून जातो. मूळव्याध होईल अशा चाली आहेत म्हणायला गेलो तर. काय एकेक शब्दं आहेत. राजघराण्याचे दागिने घडवणारे सोनार वेगळे असतात. तसा तो स्पेशल नमुन्याचे दागिने घडवायचा गझलेचे. त्याची कित्येक गाणी अशी आहेत की ऐकल्यावर 'अरे, याचं आहे हे? माहित नव्हतं' असं होतं. का असं होत असावं? चांगल्या लोकांना का विसरतो आपण त्यांच्या हयातीत? माणूस मेल्यावर भारत रत्नं, जीवन गौरव, फाळके पुरस्कार दिला काय, न दिला काय, काय फरक पडणार आहे. तो नैराश्यात, आर्थिक विवंचनेत दिवस काढतो तेंव्हा कुणीही फिरकत नाही आणि मरायला टेकला की सत्कार करून थैल्या द्यायच्या, मानपत्रं द्यायची. एक लाचार, हताश माणूस गौरवायचा आणि पाठ थोपटून घ्यायची. गेलाच तर गुणवर्णन करताना थकत नाहीत माणसं. पण जिवंत आहे तोवर तो कुणाच्या खिजगणतीतही नसतो. शमशाद बेगम गेल्या तेंव्हा एकजण मला म्हणाला होता, 'होत्या अजून? मला वाटलं कधीच गेल्या त्या'. यशस्वी न झालेल्या,  झालेल्या चांगल्या लोकांचं विस्मरण आपल्याला लवकर होतं.

त्याच्या गाण्यांची यादी द्यायची गरज नाही तरीही काही काही गाण्यांचा उल्लेख करावाच लागेल. एकाचढ एक रत्नं आहेत. जाना था हमसे दूर, यूं हसरतोंके दाग, उनको ये शिकायत है, वो भुली दास्तां, भुली हुई यादों, 'अनपढ'मधली - आप की नजरोने समझा, है इसीमें प्यारकी आबरू, जिया ले गयो जी मोरा सावरीयां, 'आपकी परछाईयां'मधलं - अगर मुझसे मोहब्बत है, 'गझल'मधलं - रंग और नूरकी बारात किसे पेश करू,  'हकीकत'मधली - जरासी आहट होती है, होके मजबूर उसने, अब तुम्हारे हवाले वतन साथीयों, 'जहांआरा' मधलं तलतचं 'फिर वो ही शाम, वो  ही गम', 'वह कौन थी'मधली लग जा गले, नैना बरसे रिमझिम रिमझिम, जो हमने दास्तां अपनी सुनाई, 'मेरा साया'मधली झुमका गिरा रे, आपके पहलूमें आकर रो दिए, नैनोमें बदरा छाये, तू जहां जहां चलेगा, 'दस्तक'मधली बैयां ना धरो,माईरी मैं कासे कहू, हम है मताए कुचें, 'हीर रांझा'मधली मिलो न तुम तो, ये दुनिया ये महफिल, 'हसते जख्म'मधलं तुम जो मिल गये हो, 'लैला मजनू'मधली हुस्न हाजीर है, तेरे दरपे आया हूं, इस रेशमी पाजेब की झनकार के सदके, 'मौसम'मधली रुके रुकेसे कदम, दिल धुंडता है, छडी रे छडी, 'भाई भाई'मधलं ऐ दिल मुझे बता दे, 'बावर्ची'मधली भोर आई गया अंधियारा, काहे करत बरजोरी, तुम बिन जीवन. मला माहीत नसलेली, मी न ऐकलेली यादी याच्यापेक्षा मोठीही असेल पण ही गाणी मला अत्यंत प्रिय आहेत.

हिरो हिरोईनचं चुंबन दाखवलं म्हणून (इम्रान हाशमी तू लैच लकी आहेस बाबा) भारतातलं पहिलं U/A प्रमाणपत्रं मिळालेल्या '१९४२ - अ लव्ह स्टोरी'ची गाणी केल्यावर आरडी म्हणाला होता, 'ह्याच्यानंतर माझा जमाना परत येईल'. तो जानेवारी ९४ ला गेला आणि सिनेमा आला एप्रिल ९४ ला. नंतर बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून फिल्मफेअर पण मिळालं. काय करायचं त्याचं? मी आता यशस्वी नाही ही खंत घेऊन तो गेला सुद्धा. गीता दत्त वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी, सैगल बेचाळीसाव्या वर्षी, शैलेंद्र पंचेचाळीसाव्या वर्षी, शॉर्ट स्टोरीजचा बादशहा ओ हेन्री सत्तेचाळीसाव्या वर्षी, शब्दभ्रमकार असलेला, गिटार वाजवता येणारा लक्ष्मीकांत बेर्डे पन्नासाव्या वर्षी, आरडी चोपन्नाव्या वर्षी गेला. त्यांची कारणं त्यांना माहीत. त्यांच्या व्यसनांवर बोलायला आपण लायक नाही कारण त्यांच्यातला कलेचा अंशही आपल्यात नाही. पण कुठेतरी वाटतं, यांना कुणीतरी तोडीच्या, जोडीच्या माणसांनी सावरायला हवं होतं. अजून काहीतरी चांगलं करून ठेवलं असतं त्यांनी.

तो अजरामर राहील पण त्याला स्वतःला त्याचा काय उपयोग नाही. देणगीचा आकडा लिहावा तसं फक्तं एक्कावन्न वर्षाचं आयुष्यं जगलेला देखणा मदनमोहन चुनीलाल कोहली शेवटी लिव्हर सिरॉसिसनी गेला हे खरं. 

जयंत विद्वांस