Monday 21 September 2015

रावसाहेब

रावसाहेब म्हणजे आमच्या छोट्याश्या गावचा राजाच म्हणा नं तुम्ही. तसं त्यांचं नाव भारदस्त होतं एकदम, श्रीमंत सत्यजितराजे पटवर्धन. रावसाहेब म्हणजे आमच्या गावाची शानच म्हणा ना. वय काही तसं फार नव्हतं. साधारण तीस-एकतीसच्या आसपास असेल. पण त्यांच्याकडे बघून तेवढंही वाटायचं नाही. चांगली सहा, सव्वासहा फुटाच्या आसपास उंची, गरुडासारख धारधार नाक आणि समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे निळसर झाक असलेले डोळे, व्यायाम करून चांगली धष्टपुष्ट केलेली सुडौल अंगकाठी आणि थोडासा खर्ज असलेला दमदार आवाज. विदेशात राहिल्यामुळे नुसते गो-या साहेबासारखे दिसायचे. 

त्यांचे पूर्वज सांगलीच्या राजघराण्याशी संबधित आहेत असं म्हणतात. सगळे त्यांना रावसाहेब असच म्हणायचे. त्यांच्या वडिलांना 'रावबहादूर' पदवी मिळाली होती. यांना कुणी दिली नव्हती. पण सगळं गाव त्यांना 'रावसाहेब'च म्हणायचं. त्यांचे वडील रावबहादूर लवकर गेले त्या मानानी, एकुलते एक रावसाहेब पंधरा वर्षाचे असतील जेमतेम. एवढ्या लहान वयात पण ते डगमगले नाहीत. त्यांच्या आईसाहेब म्हणजे मोठं प्रस्थ होतं एकदम. रावसाहेबांच इंग्लंड मधलं शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकटीन सांभाळल त्यांनी सगळ. खटलं काय लहान होतं होय. पण बाईमाणूस म्हणून कुठे काही दुर्लक्ष झाल नाही. गावाच्या बाहेर एक साखर कारखाना, दाराशी बाहेरून आणलेल्या चार पाच किमती गाड्या, मोजता येणार नाही इतकी चहूकडे पसरलेली शेती, ऊस, गहू, फळबागा, कुठल्यातरी जीपची एजन्सी, पुण्याकडे मालकीची दोन थेटर आणि बरच काही. तुम्हाला सुचेल तो आणि आठवेल तो धंदा त्यांच्या मालकीचा होता म्हणाना. 

एकवीस बावीस वय असताना ते शिक्षण पूर्ण करून आले परत आणि त्यानंतर साधारण वर्षभरानी आईसाहेब गेल्या. खूप वाईट झाल हो. पण रावसाहेबांनी दोनेक वर्षात असा काही जम बसवला की सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. चोविसाव्या वर्षी त्यांचं लग्नं झालं बघा, ते इंदूर की काय तरी गावाचं नाव आहे ना तिथल्या राजघराण्यातल्या मुलीशी. वहिनीसाहेब म्हणजे नुसत्या फोटोतल्या लक्ष्मीसारख्या. आमच्या रावसाहेबांच्या तोडीस तोड एकदम, त्यांच्या खांद्यापर्यंत येणा-या, गो-यापान आणि गुडघ्यापर्यंत केस असलेल्या. त्या चुकून कधी बोलल्या तर आपल्या तोंडून तर शब्दच नाही निघायचा बघा. इतकी रूपवान, श्रीमंत बाई पण गडी माणसांशी पण अहो जाहो करत मध सांडल्यासारख बोलणार. आवाज नुसता कानात साठवावा. 

उगाच म्हटलं का आमच्या गावची शान होते म्हणून. रावसाहेबांनी गावात शाळा काढली, कांलेज पण काढलं. गरिबांना फी नाहीच. पुस्तकं पण फुकट. एवढा श्रीमंत राजा पण देवमाणूस एकदम. कधी अंगावर दागिना म्हणून दिसायचा नाही, एक बोटातली हि-याची अंगठी सोडली तर. त्यांची श्रीमंती बघावी दस-याला. एवढा मोठा चौसोपी वाडा राजवाड्याच्या तोंडात मारेल असा सजलेला असायचा. मखमली लोड तक्क्याची बैठक घातलेली असायची. दोन्ही हाताच्या चारी बोटांत वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या, गळ्यात बोराएवढ्या टपो-या मोत्यांची माळ आणि खाली लोंबणारा मुठीएवढ्या आकाराचा हिरवाकंच पाचू, सोन्यात गुंफलेली पोवळयाची माळ, डोक्यावर पगडी, कानात भिकबाळी, सिल्कचे उंची कपडे घालून रावसाहेब झोकात बसायचे. पण हे काहीच नाही. दागिने आणि श्रीमंती बघायची असेल तर आमच्या वहिनी साहेबांना बघायचं त्या दिवशी. मगाशी म्हटलं न तश्या साक्षात फोटोतल्या लक्ष्मी सारख्या. काही काही दागिन्यांना काय म्हणतात ते ही सांगता यायच नाही मला. नखशिखांत हि-या मोत्याच्या दागिन्यांनी मढलेल्या असायच्या. जरा हलल्या की कुठल्या हि-याच्या किरणानी डोळे दिपले सांगता यायच नाही. रावसाहेब येईल त्याच्याकडून वयाप्रमाणे सोन द्यायचे किंवा घ्यायचे. सगळ काम कस आदबीनं एकदम, सोन घेता देताना त्यांचा हात जरी आपल्या हाताला लागला तरी धन्य वाटायचं. अख्खा गाव जेवायचा त्या दिवशी वाड्यावर. पण ही सगळी श्रीमंती सणापुरती. एरवी वागण्या बोलण्यात हा माणूस अगदी साधा. 

रावसाहेबांचा दिनक्रम ठरलेला असायचा, एकदम शिस्तीचा माणूस. सगळी कामं कशी वेळेत. रोज संध्याकाळी रावसाहेब चालत निघायचे आणि गावात एक चक्कर मारायचे. अगदीच टेकले तर लखीचंद सराफाच्या पेढीवर नाहीतर बँकेच्या साहेबाकडे, नाहीतर कुठेही थांबायचे नाहीत. गळाबंद कोट, हातात सिंहाच तोंड असलेली चांदीच्या मुठीची काठी हातात खेळवत ते फिरायचे. काठीची काही गरज नव्हती खरतर त्यांना पण त्यांच्या एकूण रुबाबात ती भर घालायची. त्यांनाही ती आवडायची. सगळ गावच त्यांना ओळखायचं आणि ते गावाला. रस्त्यात दिसेल त्या माणसाकडे बघून ते हलकंसं, ओळखीचं हसायचे. रावसाहेबांनी आपल्याकडे बघाव, हसावं, बोलावं असा रस्त्यातल्या प्रत्येकाला वाटायच. काही चौकशी करायला रावसाहेबथांबले आणि बोलले तर तो दिवस एकदम भारी गेल्यासारखा वाटायचा. 

आयुष्यात काही बनायचं असेल, चांगला माणूस व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल तर रावसाहेबांसारख असं प्रत्येकाला वाटायचं. हे स्वप्नं खरं होवो न होवो पण प्रत्येकाला ते बघायला आवडायचं आणि ते एकमेकांजवळ कबुल करताना पण काही कमीपणा वाटायचा नाही आम्हाला. आमची गरिबी सुसह्य करायला त्यांचं आमच्या सोबतचं अस्तित्वही कारणीभूत आहे असं वाटायचं. माणूसच तसा होतो हो तो. आदर्श ठेवावा असा. निष्कलंक चारित्र्याचा, सरळ मनाचा, एवढ रुबाबदार श्रीमंत व्यक्तिमत्व पण माणुसकी शिल्लक असलेला. त्यांची असूया नाही वाटली कधी, उलट आपणही त्यांच्या सारखं व्हाव असच वाटायच. 

आठवडा होईल आता त्या गोष्टीला विपरीतच घडलं म्हणा ना एकदम. आदल्या दिवशीच तर मी बोललो न त्यांच्याशी, त्यांनी माझ्या मुलाबाळांची चौकशी पण केली. एवढा आनंद झाला होता म्हणून सांगू तुम्हाला. कशामुळे काय कळल नाही अजूनपर्यंत तरी पण त्या दिवशी रात्री पंख्याला टांगून आमच्या रावसाहेबांनी गळफास घेतला. 

जयंत विद्वांस 

(आम्हाला बारावीला E.A.Robinson यांची 'Richard Cory' कविता होती. तिचा शेवट अजूनही डोक्यातून जात नाही. का केलं असेल त्यांनी असं? याच्या अनेक शक्यता मी पडताळून पाह्यला आणि त्या रिचर्ड कोरीनी मला अस्वस्थ केलं. रावसाहेबांशी मिळतं जुळतं काही असेल तर त्यांचा शेवट. पण रावसाहेबलिहायला रिचर्ड कोरी पर्यायानी त्याचा निर्माता रोबिनसोन तेवढाच कारणीभूत आहे, त्यामुळे ते श्रेय त्यांच. मूळ कविता खालीलप्रमाणे – 

Whenever Richard Cory went down town, 
We people on the pavement looked at him: 
He was a gentleman from sole to crown, 
Clean favored, and imperially slim. 

And he was always quietly arrayed, 
And he was always human when he talked; 
But still he fluttered pulses when he said, 
"Good-morning," and he glittered when he walked. 

And he was rich – yes, richer than a king – 
And admirably schooled in every grace: 
In fine, we thought that he was everything 
To make us wish that we were in his place. 

So on we worked, and waited for the light, 
And went without the meat, and cursed the bread; 
And Richard Cory, one calm summer night, 
Went home and put a bullet through his head. 

(E.A.Robinson)

जगणार आहे मी….

तिच्या सर्वस्वाचं कलेवर त्यांनी घरी आणलं 
ती स्तब्ध सजीव पुतळा, न आक्रोश न हुंदका 
जुन्या जाणत्या बायाबापड्या कुजबुजल्या 
'डोळ्यातून येऊ दे तिच्या, नाहीतर छातीतून येईल' 
 
जाणते पुढे झाले, थोडी कुजबुज वाढली 
कुणी 'त्या'च्या आठवणी काढल्या
कुणी फुलं वाहिली, कुणी घट्ट मिठी मारली
ती स्तब्ध सजीव पुतळा, न आक्रोश न हुंदका

सगळे उपाय थकले, शब्दं पोकळ झाले
एक थरथरता देह, एक थरथरता हात
कापड उचलून चेह-या वर फिरला   
 ती स्तब्ध सजीव पुतळा, न आक्रोश न हुंदका

नव्वदीची बायजा आठवल्यासारखी उठली  
मांडीत ठेवायला पोराला घेऊन आली 
तीच्या आवाजात कंप, डोळ्यातून ढगफुटी 
'जगणार आहे मी, आता फक्तं तुझ्यासाठी' 

--जयंत विद्वांस 
(आल्फ्रेड लॉर्ड टेनीसन च्या 'होम दे ब्रॉट हर वॉरीअर डेड' या कवितेचा स्वैरानुवाद




Home they brought her warrior dead (Alfred Lord Tennyson)


Home they brought her warrior dead:
She nor swoon'd nor utter'd cry:
All her maidens, watching, said,
"She must weep or she will die."

Then they praised him, soft and low,
Call'd him worthy to be loved,
Truest friend and noblest foe;
Yet she neither spoke nor moved.

Stole a maiden from her place,
Lightly to the warrior stepped,
Took the face-cloth from the face;
Yet she neither moved nor wept.

Rose a nurse of ninety years,
Set his child upon her knee—
Like summer tempest came her tears—
"Sweet my child, I live for thee."

Saturday 19 September 2015

मोकळा…

मोकळा…

आउट ऑफ द वे जाऊन मदत करणे, एखाद्याला सहकार्य करणे ही गोष्टं वाईट नाही. पण काहीवेळा त्याचे होणारे परिणाम मात्रं फार भीषण असतात. आपण केलेली मदत ही फक्तं आपल्या आणि ज्याला केलीये त्याच्या दृष्टीतून नैतिक ठरते, बाकीच्यांना तुम्ही जेवढं जोरात ओरडून सांगाल तेवढं ते खोटं ठरतं. एखादी घटना अशी घडते की आयुष्याचा अर्थच बदलून जातो. उरलेल्या आयुष्यात एक सल, क्वचित डाग घेऊन जगणंसुद्धा नशिबी येतं. इलेक्ट्रोनिक मिडिया जसं अतिरंजित बातम्या देऊन एखाद्याला आयुष्यातून उठवतात तसं काहीवेळेस होतं. मी सांगणार आहे ते कधीच घडून गेलंय. तीसेक वर्ष निश्चित झाली. जुनं का उकरायचं खरंतर, पण गरजेचं आहे, कुणाच्या तरी बाबतीत असं घडू नये म्हणून. 

माझी मैत्रीण होती एक. एका हिलस्टेशनला तिचे बाबा म्यानेजर होते राष्ट्रीयकृत बँकेत पस्तीस वर्षापूर्वी. तेंव्हा काय गर्दी असणार बँकेत तिथे. सगळा गाव ओळखीचा होता. तीन मुली, घरात चारचाकी, पुण्यात प्लॉट. सगळं कसं छान चाललं होतं. माणूस सज्जन, कुटुंबवत्सल. पस्तीस वर्षापूर्वी बँकेत व्यवहार फार नसायचे, सेव्हिंग खातीच जास्ती. तर त्यांचा एक मित्रं होता गावात. तो ही प्रामाणिक. त्याला पैसे लागत होते अर्जंट. त्यानी लोन मागितलं. सगळी प्रोसेस व्हायला पंधरा वीस दिवस जाणार. पैसे तर लगेच हवे होते. गोल्डलोन हाच एकमेव मार्ग होता लगेच पैसे मिळण्याचा. बँकेचा सोनार असतोच, तो ही गावातलाच ओळखीचा होता. 

बरं त्या माणसाला हे पैसे महिन्याभराकरताच हवे होते. सगळंच त्रांगडं. तेंव्हा सोन्याचा भाव तो काय आणि मिळणार किती. त्यानी आणलेल्या सोन्यात मिळणारी रक्कम पुरेशी नव्हती तेंव्हा 'दोन खोटे दागिने त्यात घालूयात, मी पंधरा दिवसात सगळे पैसे भरणार आहेच नाहीतरी' असं तो म्हणाला. बरं, तो भरणार आहे ही खात्रीही होती. जीवावर उदार होऊन यांनी संमती दिली. लोन दिलं. पैसे दिले. हे सगळं शनिवारी घडलं आणि सोमवारी दुपारी पुण्याहून एच.ओ.चे लोक हजर झाले. कुणी सांगितलं, काय नेमकं घडलं शेवटपर्यंत कळलं नाही. खबर पक्की होती. त्यांनी लोनखाती चेकिंगला घेतली. यांनी स्वत:हून शनिवारची स्टोरी सांगितली. बँकेने निलंबन केलं ऑन द स्पॉट. एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. 

गावात वट होती. सगळे ओळखायचे. पसरायला वेळ लागला नाही. 'दिवार'च्या सत्त्येन कप्पू सारखं जगणं मुश्कील झालं. राजीनामा दिला. पुण्यात सगळे आले, नोकरी नाही, गाडी विकली. प्लॉट होता त्यावर जमा पुंजी, पी.एफ.यातून घर तेवढं बांधलं. तीन मुलींची शिक्षणं, लग्नं, सगळंच अवघड. सगळ्या शिकल्या, लग्नं झाली. दोन बी.कॉम, एक एम.कॉम.झाली, नोकरी करून स्वत:ची लग्नं केली त्यांनी. मला खाज फार, माणसं वाचायची. ते तेंव्हा डेक्कनला एका हॉटेलात क्याशियरचं काम करायचे. मी त्यांच्या घरीही जाऊन आलो होतो. ते फार बोलायचे नाहीत. मला इतिहास काही माहित नव्हता. त्यांच्याकडे बघितल्यावर मला वाटलं, हा माणूस 'क्याशियर' लेव्हलचा वाटत नाही. तेंव्हा ती म्हणाली, 'हे असं असं झालेलं, कुठेही जॉबला गेले की बँक का सोडली? याला उत्तर नव्हतं. खोटं सांगितलं तर अजूनच बदनामी, कुठल्या बँकेत जाणं शक्यंच नव्हतं जॉबसाठी. त्यामुळे आधीचं काहीही आम्ही सांगत नाही. अनेक जॉब झाले. इथे बरीच वर्षे आहेत आता. त्या माणसानी ते लोन लगेच फेडलं पण त्याचे हप्ते आम्ही अजून भरतोय'.   

नंतर तुम्ही आता काहीही बोला, अक्कल पाजळा, त्यांचं काय चुकलं, त्यांनी काय करायला हवं होतं, उपयोग शून्यं. घडलं ते घडलं. सदहेतूनी केलेल्या गोष्टीचं फळ त्यांना मिळालं नाही एवढंच खरं. त्यांच्या घरच्यांनी त्यांना समजून घेतलं आणि दोष दिला नाही हा नशिबाचा भाग. हल्ली हजारो कोटीच्या बँका बुडवून झाल्या की पेपरात नाव येतं हल्ली, फलाणा माणूस कसा आणि किती काळ फरार आहे, ही बातमी असते. पस्तीस वर्षापूर्वी असं काही नव्हतं यात त्यांचा काही दोष नाही. 

काय वाटत असेल त्यांना नेमकं. मला वाटतं, एकदा त्यांना कुणीतरी मुद्दाम विचारावं, कुरापत काढल्यासारखं. असे चिडतील की सगळं ओकतील, शिव्या देतील, रडतील. होऊन जाऊ दे एकदा. माणूस मोकळा होईल. अचानक गप्पं झालेला, स्वत:वर चिडलेला माणूस एकदा मोकळा झालाच पाहिजे. काय म्हणता?

जयंत विद्वांस

Friday 18 September 2015

आरत्या आणि देवे…

आरत्या आणि देवे…

काही काही गोष्टींना उपजत लय असते. सगळ्या आरत्यांच्या चाली सारख्या का? हा प्रश्नं कधी पडलाच नाही. शतकानुशतके तेच शब्दं, कदाचित तीच चाल, तेच घालीन लोटांगण आणि तेच देवे. मी धरून पंचाण्णव टक्के लोकांना त्याचा अर्थ माहित नाही. तरीही कळायला लागल्यापासून मी ते म्हणत आलोय आणि आहे तोवर म्हणेनही. मंगेशकरांनी लावलेली चाल सुंदर आहे पण ती घाईच्या वेळेत म्हणायच्या उपयोगाची नाही. ती मंडळात रेकॉर्ड लावून कारण तिथे कुणाला आरती तोंडपाठ येत नाही म्हणून. 

एखादं सुंदर गाणं ऐकताना मजा येते कारण सगळं कसं बेतशीर, तालात असतं. आरतीचा प्रकार नेमका उलट आहे. झांजा वाजवणारे कधीच तालात नसतात (मला तर कधीच येत नाही). एखादा वाजवत असेल लयीत तर तो अपक्ष असल्यासारखा नाईलाजानी बहुमतवाल्यांच्या मागे जातो. टाळ्यांचा आवाज हात दुखू लागले की हळूहळू कमी होतो. लोक कडवी उलट सुलट करतात, गाळतात. मधेच, लग्नात भटजी आणि मुलीकडची एखादी स्वरकोकिळा एकाचवेळी वेगवेगळी मंगलाष्टकं चालू करतात, त्याप्रमाणे दोघेजण दोन आरत्या चालू करतात. ज्याचा आवाज मोठा त्याची आरती तग धरते. ज्याची मागे पडली तो आरतीच्या शेवटच्या ओळीवर उकिडवा बसून सावज पकडायला तयारीत असतो आणि क्षेपणास्त्र सोडावं तशी त्याची आरती चालू करतो. ती आरती पूर्ण होईपर्यंत त्याचा जेत्याचा चेहरा बघावा.  

'सत्राणे उड्डाणे' ही ब्रम्हचा-याची असल्यामुळे असेल पण एकदम आटोपशीर आरती, चटचट संपते. मला ती हिंदी 'शेंदूर लाल चढायो' त्याच्या भाषांतरित 'नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमीपत्रे' पेक्षा जास्ती आवडते. एकतर ती ब-याच लोकांना माहित नसते किंवा पाठ नसते त्यामुळे भाव खाता येतो हा एक भाग आणि 'धन्यं तुम्हारा दर्शन मेरा मन रमता' या ओळीतला खरेपणा. सिक्स प्याक नाहीत, पोट सुटलंय, एक दात पडलाय, सोंड असे सगळे प्रकार असलेली ही मूर्ती 'मेरा मन रमता' असं का वाटतं माहित नाही. त्याचे डोळे काय सुंदर दिसतात, ते काढणा-या कलाकारांचे हात एकदा हातात घ्यावेसे वाटतात, तिरळा गणपती मी आज पावेतो पाहिलेला नाही.  

खरंतर लोक आरत्या किती चुकीच्या म्हणतात. संकष्टी पावावे(?), उद्या देव संकटात ऐवजी संकष्टीच्या उपवासाला पावला आणि पुण्यांची एन्ट्री वेगळ्या खात्यात जमा झाली तर दोष मात्रं चित्रगुप्ताला जाईल. चालीत बसायला पाहिजे म्हणून 'सुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता विघ्नाची नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची' ऐवजी 'सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची' आणि मग 'नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची' म्हणतात. नुरवी पुरवी म्हणायला मात्रं मस्तं नादमय वाटतं. 'देवे' अशुद्ध म्हणतात तरी देव काही रागावत नाही हे ही आहे. भाव महत्वाचा, उगाच रागवायला, चुका काढून वेगळे अर्थ काढायला तो काही माणूस नाही. म्हणून अशा सर्वसमावेशक, सगळ्यांना समजून घेणा-या, चुका पोटात घालून माफ करणा-या माणसाला 'देव'माणूस असं म्हणत असावेत.

हल्ली लोक चोरून गणपती आणल्यासारखा नवरा, बायको, मुलगा/मुलगी यातच आरतीचा सोपस्कार पार पाडतात.  आरती कशी छप्परतोड, गोंगाटातच हवी. दरवाजा सताड उघडा ठेवावा, डोकावणारा ओळखीचा असो नसो, त्याला घरातल्या चारपाच लोकांनी या आरतीला म्हणावं, उदबत्ती, धुप, कापुराच्या वासानी आणि धुरानी खोली भरलेली असावी, आवाज बसेपर्यंत आरत्या म्हणाव्यात, झांजा बडवाव्यात, 'एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात' आणि नंतरचे श्लोक म्हणेपर्यंत घसा शाबूत असावा, नंतर प्रसाद एकदा पुरेसा दिला असला तरी डबल मागून खावा आणि घड्याळ न बघता, मोबाईलकडे लक्ष न देता पुढच्या घरात जावं.

रस्त्यावरचा गणपती सोडा, घरातला गणपती अजून शिल्लक आहे तो जपायला हवाय. लहान असताना चाळीत प्रत्येक घरात आरतीला जावंच लागायचं कारण आरत्या आणि देवे यायचे. इतकी घरं की प्रसादानीच पोट भरायचं. चव काही असो, नमस्कार करायचा आणि तळहातावर जे आहे ते पोटात पोचवायचं, एवढंच कळायचं. म्हातारी माणसं आरत्या आणि देवे म्हटले म्हणून कौतुकानी बघायचे, आशीर्वाद पुटपुटायचे. आता लक्षात येतं, उद्याच्या जेवणाचा प्रश्नं असलेले लोक कर्ज काढून खर्च करायचे, सजावट करायचे, हौसेने आईला बोलावून पदार्थ करायचे, वाटायचे, दहा दिवस आनंदी व्हायचे. बरं मागणं काय फार नसायचं, 'सुखी ठेव' एवढंच मोजकं. गणपतराव तरी किती लोकांना पुरे पडणार. 'सुखी होण्याची वाट बघणारे संख्येत आहेत, वाट बघून जे 'सुटले' ते 'सुखी' झाले, बाकी आपण आपलं विसर्जन होईपर्यंत त्याच्या विसर्जनाच्या रांगेत आहोतच. 


जयंत विद्वांस 

Thursday 17 September 2015

चारोळी.....

चारोळी.....
 
चंगोंनी नावारूपाला आणली ती नाहीये म्हणत मी. आता अस्तंगत झाली ती खायची चारोळी म्हणतोय. खूप गोष्टी, खाद्यपदार्थ कालबाह्य झाले. आपण नव्याशी जुळवून घेता घेता खूप काही मागे सोडून आलो. 'मधली वेळ' 'काहीतरी खायला दे' हा प्रकार आता उरलाच नाही. मुलं शाळकरी असतानाच नोकरी केल्यासारखी बिझी झाली. घरातून मोठी माणसं नाहीशी झाली किंवा बाहेर काढली आणि ह्या गोष्टी संपल्या. सत्तूचं पीठ नाही, पापडाचा डांगर नाही, नुसत्या उकळलेल्या जि-याच्या पाण्यात पाव बुडवून खाऊन बघा, काय गोड लागतो ते, माझी आज्जी तेलात चार लसणी टाकून मोहरी घालायची फक्तं, अफाट चव लागायची, गुळावर लिंबू पिळून द्यायची पोळी भाकरी बरोबर खायला. टाकाऊतून टिकाऊ करावं तसं ह्या घरातल्या आज्ज्या मायेचं तूप सोडून ताटात, जातायेता हातावर सोनं ठेवायच्या. हरवलेल्या पदार्थांची यादी खूप मोठी होईल लिहित बसलं तर.

काल एकीशी बोलता बोलता मी म्हटलं 'उपमा साधी असली तरी चालेल पण ती गरिबाघरच्या सणासुदीला केलेल्या श्रीखंडातल्या चारोळीसारखी हवी, अचानक दाताखाली येणारी, चव वाढवणारी'. ती म्हणाली, 'अरेच्चा मी विसरूनच गेले होते चारोळी!  फार दिवसात नाही खाल्ली. लहानपणी परवडत नसे म्हणून आणत नसू. पण ती लक्षातहि नव्हती. अश्या कितीतरी गोष्टी सुटत जातात'. मला काय, काहीतरी खरडायला कारणंच हवं. खरंय, आपण एखादी गोष्टं विसरून गेलोय हे ही आपण विसरून जातो, इतकं वेगात जगतोय आपण. चारोळी म्हणजे खरंतर काही महागडा प्रकार नाहीये फार आत्ता तरी पण होता एकेकाळी. चिमटीत धरण्याएवढी चारोळी. आई लहान कागदाच्या पुडीत ठेवायची जपून. कधी खवट पण व्हायच्या विसरल्यानी. पण चक्का आणला की चारोळी कुठे ठेवली आहे हे तिला बरोबर लक्षात असायचं.

तेंव्हा घरी श्रीखंड यायचं नाही, चितळेकडून रांगेत कष्ट केलेला चक्का यायचा किंवा घरी लावला जायचा. पंचात लावलेल्या चक्क्यातून ठिबकणा-या पाण्यात बोट बुडवून कुणी बघत नाही ते बघून बोट तोंडात घालायचं, नाहीतर ते शब्दात सांगता येणार नाही असा मऊ बांधलेला ऐवज दाबून बघायचा. त्याचा ओशटपणा आणि ती चव शब्दात कशी सांगणार. त्या कापडाला लागून जे वाया जातंय थोडं फार त्याचंही दु:खं व्हायचं. पुरणाच्या यंत्रातून तो साखर घातलेला चक्का काढायचा. नंतर भांडं स्वच्छ असल्यासारखं वाटेपर्यंत ते चाटायचं काम मी करणार या बोलीवर ते काम करायचो. खालच्या भांड्यात पडलेला तो फुगीर चक्का साखर घालून श्रीखंड झालेला असायचा. कालची कु.आज सौ.झाली की वेगळी दिसते तसं. मग वाटीत भिजवलेल्या चारोळ्या पेरल्या जायच्या. तो पर्यंत वाटी कुठे असायची ते आईलाच माहित.

आता आम्रखंड येतं घरी अजिबात गुठळी, चारोळी नसलेलं. सपाट रस्त्यावरून केलेला निरस प्रवास तो. रस्त्यात काय आयुष्यात काय, चढ, उतार, वळणं पाहिजेत तर मजा असते. तेंव्हा क्वचित मिळायचं म्हणून अप्रूप होतं, ओढ होती, चव होती. अतिपरिचयातअवज्ञा, माणसाची काय, वस्तूची काय, पदार्थांची काय. अती केलं आणि मजा घालवून बसलोय आपण सगळी. आता काय घरी जाताजाता अर्धा किलो चारोळी विकत घ्यायचीसुद्धा ऐपत आहे पण तो पंचा आणि आज्जी कुठून आणू?

जयंत विद्वांस 





सत्तर एमएम चे आप्तं (८)…. ओमप्रकाश....

सत्तर एमएम चे आप्तं (८)…. ओमप्रकाश....

बक्षी ओमप्रकाश छिब्बर. काश्मीरमधे जन्माला आलेल्या या माणसाची जन्मतारीख मोठी मजेशीर आहे. १९/१२/१९१९, तीन वेळा एकोणीस. १९३७ साली हा माणूस महिना पंचवीस रुपये पगारावर रेडीओवर कामाला होता आणि त्यावेळच्या लाहोर पंजाबात फेमस होता. खरंतर अत्यंत रडवेल्या आवाजात बोलणारा हा माणूस ब-याच जणांना आवडत नाही. मला आवडतो. तो त्याच्या बोलण्याची शैली न बदलता हसवतोही आणि रडवतोही. त्याचे जुने सिनेमे फार पाहिलेले नाहीत मी पण पाहिलेल्या मोजक्याच सिनेमात तो आवडला ही निश्चित. सगळ्यात पहिला मला तो दिसला 'गोपी'मधे. शाळेत तेंव्हा वर्षातून एक सिनेमा दाखवायचे त्यात झालेला. त्यात तो दिलीपकुमारचा मोठा भाऊ होता आणि मग 'परवाना' मध्ये दिसला, अमिताभ ज्याचा खून करतो तो अशोक वर्मा (तोच प्लान 'जॉनी गद्दार'मधे पण होता).

काळाचा महिमा असतो, 'परवाना' आला तेंव्हा नविन निश्चलनी अल्फाबेटीकली नामावली द्यायला विरोध केला होता कारण अमिताभचं नाव पहिलं आलं असतं. 'मंगला'ला रिरन मधे पाहिला मी तेंव्हा नविन निश्चल कोप-यात निश्चल होता आणि व्हिलन अमिताभ पोस्टर व्यापून. पुण्यात श्रीकृष्ण, विजयानंद ही थेटरं काही 'विशिष्ट' चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत पण मी श्रीकृष्णला आई आणि विजूमामा बरोबर 'पडोसन' आणि शाळेतर्फे रांग करून जावून विजयानंदला 'शामची आई' बघितलाय. आता ती प्रथा बंद झाली. अर्थात थेटरात कुठला सिनेमा दाखवायला न्यायचं हा प्रश्नंच आहे म्हणा तसाही. त्यानंतर 'पडोसन' अनंत वेळा बघितला. मुद्गल फिरवणारा, लग्नाला तयार असणारा सुनिलदत्तचा रंगेल मामा. त्याची स्वत:ची अशी एक बोलण्याची ढब होती. रडके संवाद म्हणताना ती जास्ती जाणवायची. पण तो ए.के.हंगल सारखा गरीब, रडवेला चेह-याचा नव्हता.  

'चुपके चुपके' मधला तो संशयी, मिश्किल म्हातारा मस्तंच होता. शर्मिला गाणं म्हणत पडद्याआड काय करतीये नेमकं, ते बघायला तो उठतो, त्यातली सहजता, टायमिंग अफाट होतं. याच्यासारखाच डेव्हिड अब्राहम चेउलकर एक मस्तं पिकलेला, हसतमुख म्हातारा होता. अमिताभ बरोबर सिनेमात जे लोक सतत दिसायचे त्यात एक प्राण, इफ्तिखार, अमजद आणि ओमप्रकाश होता. लहानपणी शाळेत 'जंजीर' पाहिलेला तेंव्हा लक्षात राहिला होता तो बच्चनच्या स्वप्नातला घोडा आणि सतत बाटली हातात घेऊन फोन करणारा, दाढी वाढवलेला आणि रडक्या आवाजात बोलणारा डिसिल्व्हा. अमिताभ त्याला नाही म्हणतो त्यावेळेला खूप आशा धरलेली असताना झालेला अपेक्षाभंग आणि त्यामुळे त्याची बोलण्यात आलेली तळतळ अनुभवण्यासारखी आहे. त्यातला फोलपणा जाणवल्यावर तो अमिताभची माफी मागतो. तो हो म्हणाल्यावर त्याचा रडका आनंदी चेहरा बघा. बच्चनला त्यानी टफ दिलीये.

'प्यार किये जा' चा रामलाल आणि त्याचा तो अतरंगी मुलगा मेहमूद त्याला स्टोरी सांगतो तो सीन मेहमूद एवढाच ओमप्रकाशचा पण आहे. मेहमूदच्या बोलण्याप्रमाणे त्याच्या चेह-यावर झरझर बदलत जाणारे भाव तो असे दाखवतो की सगळं क्रेडीट मेहमूदला आपोआप मिळतं (त्यांच्यापुढे शरद तळवलकर आणि लक्ष्या, बात कुछ जमी नही). सुखी संसारातल्या बायकोसारखे असतात हे नट, क्रेडीट न मिळणारे. तरीपण हे लोक सीन खातात ते महत्वाचं. डेझी इराणीसारखे बालकलाकार, प्राण, ओमप्रकाशसारखे लोक पटकथेत लुडबुड न करता, स्वत:चं महत्वं न वाढवता चेह-याच्या हालचालींनी जान ओततात.

अमिताभबरोबर तो मुन्शी फुलचंद-शराबी, नमक हलाल-दद्दू आणि लावारिस-डॉ.गोएल उभा राहिला. लावारिसचा डॉक्टर फार मोठा नव्हता. पण 'शराबी'तला मुन्शीजी अप्रतिम. मुन्शीजी मरतो त्या सीनचा किस्सा वाचला होता. ओमप्रकाशला अमिताभ रडायला लागला की हसायला यायचं. दरवेळेला अमिताभ ग्लिसरीन न वापरता पाणी काढायचा. बरेच रिटेक झाल्यावर ओमप्रकाशच्या मनात प्रश्नं आला की आता खरं रडू आलं नाही त्याला तर परत रिटेक होणार. सीन संपला, कट ओरडल्यावर ओमप्रकाश ओक्साबोक्शी रडू लागला कारण अमिताभ पण खरा रडला म्हणून. शेवटी त्याचं सांत्वन करावं लागलं. त्याचा 'ज्युली' मधला लक्ष्मीचा दारुडा बापही मस्तं होता. नातवावर प्रेम करणारा दद्दू खास गावाकडचा बुजुर्ग.  

'अमर प्रेम'मधे पाणीपुरीत दारू घालून पिणारा कफल्लक रईस होता तो. त्यातल्या 'ये क्या हुआ' गाण्यात तो खन्ना बरोबर तालात धोतर घालून डुलतोही पण त्यानी गाण्यात एकदाच दु:खी एक्स्प्रेशन दिलंय ते बघाच. अतीव करुणेने तो पाठमो-या राजेश खन्नाकडे बघतो त्या करता अभिनय यायला हवा. तिथे त्याचा रडका आवाजही नव्हता, फक्तं चेहरा. नावं लक्षात नसलेल्या अनेक सिनेमातून त्याला बघितलाय. चरित्रं अभिनेता ही वेगळी फौज होती तेंव्हा. सगळीकडे संस्कार वाटणारे एकसुरी आलोकनाथ नव्हते तेंव्हा. अशोककुमार, शम्मीकपूर सारखे दिग्गज हिरो चरित्रं अभिनेते झाले. ओमप्रकाश काय हंगल काय, मोठी माणसं, केस पांढरे करून, ग्लिसरीन टाकून रडलं म्हणजे म्हातारा माणूस उभा होत नाही. 

त्यानी राजकपूरला घेऊन 'कन्हैया' काढला, निर्माता दिग्दर्शक तोच, अजूनही सिनेमे काढले त्यानी. मुंबईत नाव काढायला आलेल्या लोकांसाठी त्याचं घर धर्मशाळा होती, अनेक लोकांना त्यानी त्यांच्या स्ट्रगल पिरीयडमधे मोफत छप्पर दिलं, असं वाचलंय. बायको त्याच्या आधी गेली, त्याच्या लहान भावाबरोबर तो रहायचा. त्याला पाच मुलं होती. सगळ्यांवर तो पोटच्या पोरांसारखी माया करायचा.
स्वत:ला मूलबाळ नसलेला हा प्रेमळ माणूस पडद्यावर कायम माया करताना दिसला यात काय नवल?   

जयंत विद्वांस 



 

वृत्ती.....

वृत्ती..... 

पिळवणूक करणे, कमीत कमी पैशात राबवून घेणे, पैसे बुडवणे हा अचिव्ह्मेंटचा भाग असावा, असं माझं मत आहे. ९१/९२ च्या दोन दिवाळीला आलेले अनुभव माझ्या लक्षात आहेत. 

९१ ला ५००/महिना पगारावर कामाला होतो. शिकाऊ म्हणजे गुलामच. दिवाळी होती. टायटनचं नविन शोरूम झालेलं भांडारकर रोडला. वडिलांना घड्याळ घेऊयात असा विचार. बघून आलो, १०५०/- ला होतं आवडलेलं. महिन्याचा पगार आणि अंदाजे ३००-५०० बोनस मिळेलच अशी आशा. माझे वडील त्यांच्याकडे चाळीस वर्षे होते आणि मी तेंव्हाचे पंधरा लाख वसूल करून दिले होते, दोन टक्के ठरलेले (३००००/- तेंव्हा मिळाले असते तर?) तरीही माझी अपेक्षा फक्तं पाचशे रुपयाची होती. शरद पवार संरक्षणमंत्री झाले म्हणून एसेम डायकेमनी त्यांच्या कुरकुंभजवळच्या कारखान्यात पार्टी दिलेली त्यासाठी दिवाळीत सुट्टी पण मिळाली नव्हती. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मी पगार आणि अधिक पाचशे कारण सांगून घेतले. वडिलांना घड्याळ दिलं. दिवाळीनंतर त्यांनी विचारलं, 'अरे, तुझे ते पाचशे कसे कट करायचेत? तू डिसेंबर पर्यंतच आहेस ना?'. म्हटलं, 'बोनस नाही का काही?' 'अरे, तू पर्मनंट नाहीस ना त्यामुळे देता येत नाही'. मी लगेच त्या महिन्याच्या पगारात परत देऊन टाकले. बुडवायला कुणी शिकवलंच नाही, काय करणार. 

बी.कॉम परीक्षा देऊन आलो त्यांनी मला हक्कानी एप्रिलला परत बोलावून घेतलं (पगार ८००), वडील जा म्हणाले, गेलो. भाऊ तेंव्हा एका कंपनीत होता संगमब्रिज जवळ. तिथे फॉक्सबेसमधे स्टोअरचं डाटा फीडिंगचं काम होतं. मला म्हणाला, करशील का? पुढे मागे घेतील इथे. हो म्हटलं. सहाला डेक्कन वरून संगमब्रिज. साडेसहा ते साधारण साडेआठ. तिथून सायकल मारत घरी यायला नऊ. एकतर ऑफिसमधे सेकंड फ्लोअरला आणि खाली फ्लोरला पण कुणी नसायचं, भीती वाटायची भूतासारखं काम करायला. सोळा अठरा आकडी नंबर आणि इतर माहिती बिनचूक भरायची असायची पार्टसची. त्यांना ते खूप घाईचं होतं. मी उरापोटावरून दोनेक महिने सगळं काम बिनचूक केलं. त्यांचं दिवसात व्हायचं तेवढं मी दोन तासात करायचो. पैशाचं काही बोलायला तयार नाही माणूस. बरं त्यांची माझी भेट व्हायची नाही, फाईल्स काढून ठेवून ते पाचला जायचे. 

दिवाळी होती. शेवटी मी जमत नाहीये सांगितलं. त्यांनी निरोप दिला, रविवारी घरी ये, पैसे घेऊन जा तुझे. आमचा अंदाज ३-४००० तरी मिळावेत, खरंतर काम त्याच्या दुप्पट केलेलं असूनही. आम्ही दोघं खुशीत गेलो, चहापाणी झालं. 'तुझं आहे बरं का माझ्या लक्षात, तुझा स्पीड भन्नाट आहे आणि कामही अचूक आहे, बोलून ठेवलंय मी, मला समजलं की सांगतो तुला' असं अत्तर माझ्या मनगटावर लावून झालं, मी ही दुस-या हातावर चोळून दोन्ही नाकपुड्या भरून घेतल्या. उठताना त्यांनी पाकीट दिलं. समोर फोडायला नको, वाईट दिसतं असली शिकवण आड आली. पाकीट बारीक लागत होतं जाडीला. तेंव्हा पाचशेची नोट नवीन होती, अप्रूप होतं. गेला बाजार सहा तरी नोटा असाव्यात असं वाटलं. जीन्स, टी शर्ट, शूज तरळून गेले डोळ्यासमोर. घरी आलो. करकरीत पाच नोटा होत्या, फक्तं एक शून्यं खोडलेल्या. अडीचशे रुपये परत त्या भिका-याला देऊन येणार होतो पण सभ्यपणा आड आला. 

दिवस काही रहात नाहीत कुणाचे तसेच. पण माझ्यात एक वाईट गुण आला. मला घासाघीस करता येत नाही. कुणाच्याही कामाचे पैसे कमी करता येत नाहीत, बुडवता येत नाहीत. सणासुदीला केलेल्या कामाचे तर नाहीतच. आपल्याला आलेला अनुभव खरंतर दुस-याला द्यावा पण मी तो माझ्यापुरताच मर्यादित ठेवला, वापरला नाही. 

जयंत विद्वांस


Monday 14 September 2015

सत्तर एमएम चे आप्तं (७)…. अमजदखान....

सत्तर एमएम चे आप्तं (७)…. अमजदखान....

विजूमामानी 'मधुमती' बघताना सांगितलं होतं, 'तो वैजयंतीमालाचा बाप आहे ना जयंत, तो तुझ्या गब्बरचा खरा बाप आहे'. बालबुद्धीला जयंत आणि अमजद हे कोडं बरेच वर्ष सुटलं नव्हतं. जयंत हे त्याचं पडद्यावरचं नाव आहे हे नंतर कळलं तोपर्यंत माझं नाव दोन्हीकडे ठेवतात असंच वाटायचं. आज अमजद असता तर पंचाहत्तरी साजरी केली असती त्यानी. वयाच्या अवघ्या एक्कावन्नाव्या वर्षी अकाली गेला तो. जोपर्यंत 'शोले' दाखवला जाईल, लोक बघतील, तोपर्यंत अमजद आणि गब्बर अमर आहे. मूर्तिमंत विष भरलेला, क्रूर, थंड रक्ताचा माणूस(?) त्यानी उभा केला आणि दोघंही अजरामर झाले. आधी स्टेजवर आणि मग सिनेमात वडिलांबरोबर छोट्या छोट्या भूमिका करणारा अमजद 'हिंदूस्तान की कसम' मधून पडद्यावर आला आणि मग थेट 'शोले' मधे. 

त्या आधी तो के.असिफला दिग्दर्शनात सहाय्य करत होता. गब्बर करण्याआधी त्यानी जया भादुरीच्या वडिलांनी, तरुण कुमार भादुरींनी चंबळेच्या डाकूंवर लिहिलेलं पुस्तक वाचलं होतं. त्याचे शॉट नसताना तो आणि सचिन रमेश सिप्पीला मदत करायचे. गब्बरची भाषा शैली अमजदनीच ठरवली होती. तो तुटक बोलतो. मुळात सलीम जावेदनी ते लिहिलंच इतकं सुंदर आहे की आधी त्यानी अमजद बघितला गब्बर म्हणून आणि मग लिहिलं असं वाटावं, इतकं सुंदर. लेखक लिहिताना जी पात्रं तो उभी करतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर काही माणसं धूसर असावीत किंवा काही माणसांची मिळून सरमिसळ डोक्यात असणारच. पडद्यावर ते उभं करणारा माणूस जर बुद्धीमान असेल तर तो स्वत:चं काहीतरी अधिक करतो आणि मग गब्बर सारखा अजरामर होतो. त्याचं ते पायात पाय घातल्यासारखं चालणं, तंबाखू खायची ती विशिष्ट लकब, ते क्रूर हसणं, 'बहुत याराना लगता है' म्हणतानाचा असुरी आनंद, 'जब तक तेरे पांव चलेंगे' म्हणतानाचा क्रूर निर्धार, ठाकूरला खिजवताना बोलण्यातला कुत्सितपणा आणि शेवटी डोळ्यात दिसणारं मरण, भीती असं अमजदनी अफाट दाखवलंय सगळं.  

त्याचे बच्चन बरोबरचे चित्रपट माझ्या लक्षात आहेत कारण ते मी वारंवार पाहिलेत. परवरीश, कस्मे वादे, मि.नटवरलाल, सुहाग, राम बलराम, बरसात की एक रात, कालिया, नसीब, नास्तिक, मुकद्दर का सिकंदर, सत्ते पे सत्ता, याराना, लावारिस. सगळेच सिनेमे भन्नाट होते असं नाही. पण मुकद्दर का सिकंदरचा दिलावर, सत्ते पे सत्ता मधला रणजीत सिंह आणि याराना मधला बिशन सुंदर होते. समोर तोडीचा खलनायक असेल तर नायक अजून उठतो. समोर औरंगझेब होता म्हणून शिवाजी जास्ती ग्रेट. तसा अमजद होता. त्याचा दिलावर, सिकंदर आणि जोहरा एवढाच ताकदवान होता. जोहरावर प्रेम करणारा गुंड. त्याच्या डोळ्यातली खुन्नस बघा त्यात. शेवटी उलगडा झाल्यावर त्याच्या आवाजातला आणि चेह-यावरचा पश्चाताप बघा. गैरसमजामुळे काय करून बसलो हे या अर्थाचं तो पुटपुटतो ते बघताना मी कायम अमजदला सलाम करत आलो आहे. काय करून बसलो हे, आता ते सुधारताही येत नाही ही घालमेल मरणाच्या दारात वाटतीये त्याला. त्याचं वैर जोहराच्या आशिकशी होतं, सिकंदर नावाच्या व्यक्तीशी नाही हे तो ठसवून जातो. 

त्याचा प्रेझेंस पडद्यावर नोटेबल असायचा. 'सत्ते पे सत्ता' मधला रंजिताच्या जीवावर उठलेला तिचा काका रणजितसिंह, बच्चन बरोबरचा त्याचा तो दारू पितानाचा सुप्रसिध्द संवाद, 'कस्मे वादे' मधला तो कुबडा जुडा, 'सुहाग' मधला बाप, 'लावारिस'मधला श्रीमंत, मुलगा रणजीत पुढे हात टेकलेला सज्जन बाप, अनाथ अमिताभ विषयी ओढ वाटणारा, सत्यं समजल्यावर झालेल्या चुकीची भरपाई करू पहाणारा बाप, 'याराना' मधला दोस्तासाठी इस्टेट गहाण टाकणारा, तो गायक झाल्याचं स्वप्नं बघणारा, पूर्णत्वाला नेणारा दोस्त बिशन, 'परवरिश'चा मंगलसिंह, 'उत्सव' मधला त्याचा गमत्या वात्सायन, 'चमेली की शादी', पाताल भैरवी' मधला विनोदी अमजद, 'हमसे बढकर कौन' मधला काजल किरणचा शेंडीवाला हिरो, 'कुर्बानी'त लैला मै लैला गाण्यात टोप घालून अमितकुमारच्या आवाजात 'ओ लैला, टुबुक टुबुक' म्हणणारा इन्स्पेक्टर अमजदखान, 'शतरंज के खिलाडी'मधला गुडगुडी ओढणारा वाजीद अली शाह.  

तसा तो माझ्या लक्षात आहे 'इन्कार'मधला राजसिंह. त्याची ती डाव्या पायाच्या मागे उजव्या पायाच्या बूट चमकवण्याची स्टाईल, नेमका हाताला खोटं ड्रेसिंग करून हात गळ्यात आणि चुकीच्या खिशात पाकीट ठेवलेलं, समोरचा माणूस त्याची चूक व्हायची वाट बघतोय आणि तिकीट काढण्यासाठी त्याला खिशातून पैसे काढणं गरजेचं आहे, ती सगळी घालमेल बघणीय आहे, त्याचा चेहरा, तो आटापिटा, ते क्षण संपवण्याची घाई परत परत बघावी. तो पाण्यातला पाठलाग, कुत्र्याला जबडा फाडून मारतो ते मोठ्या पडद्यावर बघण्याचा लायकीचं आहे. हल्ली हे सिनेमे थेटरात लागत नाहीत याचं अतीव दु:खं मला होतं. घरचा टी. व्ही. अगदी ४८", ५४" असला तरी त्यात ती सत्तर एमेमची मजा नाही. एकतर खुर्चीत बसलेलो नसतो त्यामुळे हातानी खुर्चीचे हात घट्ट धरता येत नाहीत. तो अंधार फार गरजेचा असतो. आपली कधी फाटते, कधी गहिवर येतो, कधी टचकन डोळ्यात पाणी येतं, कधी पोटात गोळा येतो, कधी खदखदून हसायला येतं. हे सगळं ज्या चित्रपटात असतं तो सुंदर एवढी माझी सुंदर चित्रपटाची साधी व्याख्या आहे. 


शहाऐन्शीला त्याला अपघात झाला. मग त्याचं वजन वाढलं. अदनान सामी वाचला पण वाढलेल्या वजनामुळे नुसरत फतेह अली आणि अमजद ही दोन चांगली माणसं मात्रं गेली. त्याला हृदयविकाराचा झटका आला. काही काळ त्याचं नाव कल्पना अय्यरशी जोडलं गेलं बाकी तो सज्जन माणूस होता. त्याचा मुलगा शादाब खान 'राजाकी आयेगी बारात' मधून पडद्यावर आला खरा पण तरला नाही. त्याचा भाऊ इम्तियाझ 'धर्मात्मा' सोडल्यास फार चमकला नाही, किर्ती देसाईशी लग्नं केलं ही बहुतेक त्याच्या बाबतची मी वाचलेली शेवटची बातमी. ब्रिटानिया ग्लुकोजची 'गब्बर की असली पसंद' अशी जाहिरात करायला मिळणारा तो पहिला व्हिलन होता. अमजद, तुझा खलनायक कधीही अश्लील, कामापिपासू, आचरट, विनोदी नव्हता. जे काय होतं ती शंभर टक्के शुद्ध दहशत होती. 'शोले' आणि 'इन्कार' मधे अनुक्रमे 'मेहबूबा मेहबूबा' आणि मुंगडा मुंगडा' दोन्हीत हेलनकडे आम्हीही नव्हतोच बघत वाईट नजरेनी आणि तू ही वाईट नजरेने बघताना काही दिसला नाहीस. तुला सगळे रोल चांगलेच मिळाले असं नाही.

काळ बदलला, व्हिलन बदलले, आता तू नाहीस, प्राण, अजित नाहीत. आता विकृती जास्ती आली, निखळ शुद्ध वाईटपणा कमी झाला. तू 'शोले'मधे म्हणाला होतास 'पचास पचास कोस दूर गांव में जब बच्चा रात को रोता है, तो मां कहती है, बेटा सो जा, सो जा वरना गब्बरसिंघ आ जायेगा'. आता जागं रहावंच लागतं. पचास कोस सोड, आता फुटाफुटावर गब्बर झालेत. परत एकदा थेटरात 'इन्कार' 'शोले' बघण्याचा योग यावा. मी तुझ्या एन्ट्रीला खुर्चीत ताठ होऊन बसेन, हातात पट्टा, शिळांवर चालणारे नुसते पाय दिसतायेत, घाबरलेले तीन जण आणि अंधारात घुमणारा तुझा आवाज 'कितने आदमी थे?' मी मनातल्या मनात म्हणेन, कुणी मोजलेत? इथे जन्माला आलेल्या प्रत्येक जणानी तुला पाहिलाय, प्रेम केलंय, अमोजणीय आहे ते.  
   
 
जयंत विद्वांस





आत्मंज्ञान....

शहाण्णवपर्यंत दोन तीन प्रेमभंग झाले होते (नंतर मी हिशोब ठेवणं सोडून दिलं). दाढी मी वाढवायचोच आधीपासून, त्यात वजन पन्नास किलो, चेहरा कायम प्रेमभंगी दिसायचाच त्यामुळे फार प्रयत्नं करावे लागले नाहीत दु:खाचा मेकप करायला. पण काहीतरी मिसिंग आहे असं वाटायचंच. एके दिवशी जाणीव झाली, अरे, आपण कविता नाही लिहिलेली अजून एकही. युरेका, युरेका ओरडत मी कपड्यांसकट घरातल्या घरात पळालो.

मग एक छान रजिस्टर विकत आणलं. पहिल्या पानावर अर्पणपत्रिका वगैरे लिहीली. मग दु:खं राष्ट्रीय पातळीवर असावं म्हणून हिंदी कविता कम गाणी लिहायला सुरवात केली. काय सांगावं उद्या कुठे तारे चमकले (नशिबाचे म्हणतोय) आणि फिल्मला सिच्युएशन प्रमाणे गाणी लागली तर आपल्याकडे तयार नाहीत असं नको. वेगवेगळ्या सिच्युएशनवर झारा घेउन बुंदी पाडावी तशा कविता लिहून काढल्या. म्हटलं मराठीतून मागणी आली तर? काय एकेक व्याप न डोक्याला. मग ती ही पन्नासेक मातृभाषेतली बुंदी पाडून ठेवली.

कालांतरानी दु:खं डायल्युट झालं. मग लग्नं झालं. मग मागची दु:खं काहीच नाहीत हे लक्षात आलं. वही अडगळीत गेली. एफबी म्हणजे काय हे मला खूप उशिरा समजलं. अकाउंट काढल्यावर पहिले साताठ महिने मला पोस्ट, स्टेटस, ग्रूप्स, चॅटिंग काहीही माहित नव्हतं. स्लो लर्नर असल्यामुळे इतर अनेक गोष्टींप्रमाणे हे शिकायला खूप वेळ गेला. एकानी मराठी टायपिंग कसं करायचं ते सांगितलं. मग मी हळूहळू कविता पोस्टायला लागलो. अर्थात मुक्तंछंद जास्ती. लई भारी वाटायला लागलं कुणी कॉमेंट केली की.

वृत्त, मात्रा हा हिशोब कधी कळला नाही आणि मी ही गंभीरपणाने त्याचा कधी अभ्यास केला नाही. पण नंदुशेठ आणि त्यांच्या सहका-यांच्या गझला, शार्दुल, स्वामीजींच्या कविता वाचत होतो. आणि महाराजा काय सांगू, एके दिवशी एफबीच्या बोधीवृक्षाखाली बसलेलो असताना मला आत्मंज्ञान प्राप्तं झालं. यांच्या हापूसच्या स्टॉलशेजारी मी रायवळ आंब्याची टोपली घेउन उकिडवा बसलोय असा फील आला आणि एका सुदिनी मी कविता लिहिणं बंद केलं.

आपल्याला काय येतं यापेक्षा काय येत नाही हे कळलं की माणूस सुखी होतो म्हणजे जे थोडंफार जमतंय त्यात सुधारणा करण्यात बुद्धी खर्च होते आणि यश मिळण्याची थोडीफार खात्री असते. मी गद्य बरं लिहितो (पद्यापेक्षा - आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत) हे माझ्या लक्षात आलं. कुणी आणून देण्यापेक्षा ते बरं, नाही का?

म्हणून मी काय म्हणतो, आपल्याला चहा करता येत असेल ना तर फक्तं त्याचीच टपरी टाकावी उगाच चारपाच आयटमचं मेनूकार्ड छापण्यात अर्थ नाही, आहे तो ही धंदा बुडणार हे निश्चित.

--जयंत विद्वांस 


कालच्या पावसात....

कालच्या पावसात काय काय घडलं? खूप काही. कुणाची मनं जुळली, कुणाला ओलं लंपट काहीतरी आठवलं, कुणी पहिल्यांदाच भिजलं, कुणी कितव्यांदातरी भिजलं, कुणी खिडकीत उभं राहून आपल्या माणसाची वाट बघितली, कुणी कुणाच्या तरी आठवणींनी उशीवर पूर आणला, कुणा आडगावच्या गरीब शेतकऱ्याच्या  चेहऱ्यावर वाढलेल्या दाढीच्या खुंटांना पालवी फुटली, कुणाची तरी पांढ-या कपाळाची घरधनीण वरातीमागून आलेल्या पावसाला शिव्या देत होती.

कुणाच्या घरात पाणी शिरलं, कुणाच्या विहीरीत पहिल्यांदाच पाणी साठलं, कुणाच्या घरात गळक्या पत्रातून उलटी कारंजी गळत होती, कुणी पागोळीच्या आड पाउस थांबू नये अशी आशा करत बिलगून उभं होतं, कुणी तांबड्या पाण्यात लगेच बुडणा-या होड्या सोडल्या, कुणी कुणीही बघत नाहीयेना ते पाहून साठलेल्या पाण्यात उडी मारली, कुणी साठलेल्या पाण्यावरून सगळं सावरत उडी मारली.

एक घटना अजून घडली. झाडावरचं एक घरटं वा-यानी अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. त्यानी तिला पंखानी जवळ घेतलं. थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली. 'सकाळी बोलूयात', तो म्हणाला. 'हो', ती म्हणाली. रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले.

सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. तो उत्साहानी म्हणाला, 'निघूयात? नव्यानी काड्या आणू'. तिच्या डोळ्यात पाणी आलं. 'वेडी, "पाडणं" त्याच्या हातात आहे तर "बांधणं" आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत! चल निघूयात". आणि त्यांनी उंच आकाशत झेप घेतली.

कालच्या पावसात हे सगळ्यात सुंदर घडलं.

--जयंत विद्वांस 





Saturday 12 September 2015

नाना मराठे.....

नाना मराठे.....

हल्ली पहिल्यासारखं दिवसदिवस टी.व्ही.समोर बसून क्रिकेट फार बघितलं जात नाही तरीही शक्यतो हायलाईट बघतोच मी. जवळपास प्रत्येकानी त्याच्या शाळकरी, कॉलेज वयात ते खेळलेलं असतं, पाहिलेलं असतं. जुन्या टेस्टमॅचची रटाळ असली तरी ती मजा गेली आता. आता घरात एकट्यानी ४८" टी.व्ही.वर मॅच बघताना काहीतरी हरवलंय असं वाटतं. चाळीतल्या घरात किमान दहा बारा पोरं असायचो वनडे बघायला. हळूहळू मांड्या घालून बसलेला एकेक पसरायला सुरवात व्हायची आणि ती दहा बाय दहाची खोली फुल व्हायची. अशा अनेक वनडे, वर्ल्ड कप माझ्या लक्षात आहे. माझं कुचकं, विनोदी, उपहासात्मक समालोचन फुकट चालू असायचं. विंबल्डन, फ्रेंच, डेव्हीस कप पण हल्ली बघितल्या जात नाहीत. वयं वाढत जातात, नविन खेळाडू येतात, चमकतात, लवकर अस्तंगत होतात त्यामुळे नाळ पटकन जुळत नाही. परवा लंकेची टेस्ट बघत होतो आणि इशांत शर्माच्या मस्तीवर पटकन तोंडातून शिवी गेली आणि नाना आठवले. 

नाना मराठे, एकदम रत्नागिरीच्या मधल्या आळीला शोभेल असा ओरिजिनल खवचट माणूस, त्यांचं नाव आजतागायत मला माहित नाही. त्यांची मुलं त्यांना नाना म्हणायची म्हणून आम्हीच असं नाही सगळीच त्यांना नाना म्हणायची, अगदी मराठे काकूसुद्धा. नाना म्हणजे दिसायला अगदी गरीब माणूस, अर्थात फक्तं तोंड उघडेपर्यंत. तसे नाना बुटकेच दिसायचे, साडेपाच फुटाच्या आसपासची उंची होती खरंतर पण तसे ते गुटगुटीत असल्यामुळे बुटके वाटायचे. लख्खं गोरा रंग, दाट पण पांढरे झालेले केस तेल लावून राजा गोसावीसारखे सगळे मागे वळवलेले, भिवया सुद्धा पांढ-या शुभ्रं अगदी, त्याच्या मधे शेंदूर लावलेला टिकलीएवढा , ओठाच्या मधोमध हिटलरसारखा पांढ-या रंगात रंगवल्यासारखा जाड चौकोन आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी ओठावर ओठ संपतात तिथपर्यंत पायपीन लावल्यासारखी दोन मिलीमीटर जाडीची मिशीची रेष. तोंडात सतत अर्ध पान, त्याला अर्धबोट चुना, काताचा बारीक तुकडा आणि सुगंधी तंबाखूची चवीला मीठ टाकतात तेवढी चिमूट याची पुरचुंडी दर अर्ध्या पाऊण तासाला सरकवलेली असायची. एखाद्याचा बारीक तुकडे करून समूळ नाश करावा तशी अडकित्त्यात रोठा सुपारी बारीक करायचं काम सतत चालू असायचं. बघता बघता रममाण झाले की तोवर पान संपलेलं असायचं, मग तोंडात काही नाही लक्षात आलं की सुपारीचा ऐवज तोंडात जायचा. पान आणि सुपारी एकावेळी तोंडात हा योग क्वचित जुळायचा. रिटायर्ड नाना दाढी मात्रं रोज सकाळी करायचे. पन्नाशीतच त्यांनी मिलिटरी अकाउंट्स मधून व्हालंटरी घेतली होती. गावाकडे त्यांचे उत्पन्नही होते. एकूण माणूस सुखवस्तू होता. 

आम्ही कॉलनीत क्रिकेट खेळायला जायचो तेंव्हा. ग्राउंडसमोरच त्यांचा बंगला होता. त्यांच्या मुलगा मनोजपण आमच्यात असायचा. जाळीला धरून ते बघत उभे रहायचे किंवा मग बंगल्याच्या बाहेर खुर्ची टाकून बघत बसायचे, बोलायचे मात्रं काहीही नाहीत कधी कुणाला. पाणी प्यायला त्यांच्या बागेतल्या नळावर आम्ही जायचो किंवा खेळल्यावर गप्पा ठोकायला त्यांच्या कंपाउन्डला रेलून उभे रहायचो. एकदा असेच एका शनिवारी संध्याकाळी खेळून आम्ही गप्पा ठोकत उभे होतो. माझा त्यांचा फार परिचय नव्हता त्यामुळे मनोज आहे का? नसला तर कधी येणार आहे, इतकंच बोलणं व्हायचं. कॉलनीतली बाकीची मुलं त्यांच्या परिचयाची होती, मी कॉलनीतला नव्हतो. दुस-या दिवशी वनडे होती. मला म्हणाले, तू पण ये रे उद्या बघायला. मी हो म्हटलं आणि निघालो. रव्या म्हणाला, 'तू अण्णांकडे आला आहेस का कधी म्याच बघायला?' 'नाही, का रे?' 'येच मग उद्या, एकदा आलास की कळेल'. मी उत्सुकतेपोटी गेलो टायमात दुस-या दिवशी. 

त्यानंतर असंख्यं वन डे, टेस्टचे रविवार , विम्बल्डन, फ्रेंच मी नानांकडे बघितल्या. एकपात्री प्रयोग असायचा तो सगळा. नानांच्या शिव्या या खेळावरच्या अतीव प्रेमापोटी यायच्या, त्यात कुणालाच काही गैर, अश्लील वाटायचं नाही. नानांची त्यावेळची शारीरिक स्थिती, तो अभिनय हा शब्दात मांडणं अशक्यं आहे, तो अनुभवायलाच हवा. विंडीज आणि ऑस्ट्रेलिया या दोन टीमवर त्यांचा भारी जीव. आपल्याविरुद्ध सामना असेल तरी ते त्यांच्या बाजूनी असायचे. तेंव्हा फार राग यायचा. पण नाना उलगडून सांगायचे मग पटत गेलं. 'आपले साले ठरवून येतात, त्यांचे बघ, मजा घेतात, फालतूची शोगिरी नाही, प्रोफेशनल रे सगळे. आपल्याला खूप वर्ष लागतील ती लेव्हल यायला. देवानी काय विभागवार माणसं जन्माला घातलीत का? खेळात कसला आलाय विभाग? जो चांगला खेळतो तो आत एवढाच नियम त्यांच्याकडे. पंकज रॉय खेळला म्हणून प्रणब रॉय खेळला. भोसडीच्याला खेळता येत होतं?' नाना एकदा सुटले की सुटले. मग फक्तं ते काय बोलतात ते ऐकायचं, पोटतिडकीने बोलायचे. रवि शास्त्री, आशिष कपूर, निखिल चोप्रा, विजय भारद्वाज, सार्देंदू मुखर्जी वगैरे त्यांचे मागच्या जन्मीचे शत्रू. 

त्यांना रवि शास्त्री हे तोंडीलावणं होतं. 'नशिब लागतं रे. तो येड*वा श्रीकांत, चार फोर मारल्या की आउट होणार. मोफत विकेट. आपली अवस्था १/४५, ३/६२, ४/८७ अशी होणारच तो असला की. हा चू*मारीचा खाली येणार, निवांत पन्नास काढणार, एखाद दोन विकेट घेणार, झाला सामनावीर. च्याम्पियन ऑफ द च्याम्पियंस, ऑडी. याची लायकी तरी आहे का रे?' रनरेट वाढू लागला, चेंडू लेगच्या बाहेर टाकायला लागला, शॉर्ट पिच टाकला की त्यांना स्फुरण चढायचं. 'अरे बाळ श्रीनाथ (किंवा चेतन शर्मा/प्रसाद/जो कुणी असेल तो) , आपल्या पिचवर चेंडू उडतो का कमरेच्यावर? आपला स्पीड काय, पिच काय, कितवी ओव्हर टाकतोय आपण, सांगा रे कुणी याला. कप्तानानी फिल्डिंग काय आपली आ* घालायला लावलीय का ऑफला?' आम्ही सगळे हसायचो फक्तं. मजा असायची. सामना काट्यावर आला की नाना टी.व्ही. जवळच्या टेबलाला रेलून उभे राहायचे, उजवा पाय डाव्या गुडघ्यावर त्रिकोण करून. एखादी हुकलेली सिंगल, न पळालेली थर्ड, सुटलेला लॉली असं काही झालं की तो उजवा पाय सुटायचा आणि त्या गुन्हेगाराच्या **त जायचा लगेच. अशा मोक्याच्या वेळी टी.व्ही. समोरून कुणी गेलं की नाना त्याला भ*व्या, काय चड्डीत झालीये का? थांब की दोन मिनिट', काकूंनी जेवायला हाक मारली की, 'तुम्ही गिळून घ्या भूक लागली असेल तर' असं म्हणायचे. 

लंच टाईम झाला की आम्ही पटापट घरी जाऊन जेऊन यायचो. मग नाना झालेल्या सामन्याची चिरफाड करायचे आणि पुढे काय होईल त्याची भविष्यंवाणी. मी विश्वनाथचा न बघितलेला स्क्वेअरकट त्यांच्या बोलण्यातून पाहिलाय. दोन पोरांना उभे करून नाना दोन गली लावायचे, मग त्यांना बायसेक्ट करणारा तो अजरामर स्क्वेअरकट कसा जायचा, ते फिल्डर *त्यासारखे कसे एकमेकांकडे बघायचे याचं वर्णन. गावसकर, कपिल, विश्वनाथ, जुने आम्ही न पाहिलेले नायडू, शिवलकर, रमाकांत देसाई, मर्चंट, बोर्डे, उम्रीगर आणि अनंत लोकांची उजळणी व्हायची. विंडीज गोलंदाज म्हणजे त्यांना अतिप्रिय. 'अरे, शरीरयष्टी हे कारण आपल्या लोकांना, लिली, थोमसन, पास्को, ह्याडली, इम्रान, अक्रम टाकायचेच ना, त्यांना नाही कुठे आडवी आली शरीरयष्टी ती. आपण मुळातच सहिष्णू. मैदानात यायच्या आधीच शेपूट दोन पायात ओढून पार पुढे पोटापर्यंत घेतलेलं. फास्ट बॉलिंग ही वृत्ती असते रे, तिथे सभ्यपणा काय *डीत घालायचाय? अरे, शिव्या नको देउस पण साला नजरेने तर खुन्नस देशील की नाही?' आम्ही सगळे टी.व्ही.सोडून नानांकडे बघायचो फक्तं. प्रत्येक वेळची कहाणी वेगळी, किती सांगणार?

बेकरनी केव्हिन करनला हरवून जिंकलेलं पहिलं विंबल्डन तिथे बघितलं होतं. मी बोलण्यात पटाईत त्यामुळे नाना मला आवर्जून बोलवायचे. 'सगोत्री आपण, कपी गोत्रं आपलं, माकडचाळे जास्ती आपले, एका कुळातले सहाजणच आपण, मराठे, विद्वांस, रटाटे, घैसास, चक्रदेव आणि शारंगपाणी. मजा येते तू असलास की. वग झाला पाहिजे रे, इकडून एक बोलला की समोरून तोडीस तोड आलं पाहिजे, तर मजा. तू येत जा रे बघायला'. आपण ९३ ला फ्रांसला डेव्हीसकपमधे त्यांच्याकडे जाऊन हरवलं होतं. मी गेलो होतो. रात्री काय तरी अडीच एक वाजले असतील. रमेश कृष्णन-गिल्बर्टचा सामना अंधार पडला म्हणून पाचव्या सेटला ४-४ असताना थांबवला होता. दुस-या दिवशी त्यानी तो सहज जिंकला. नानांच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणाले 'देशासाठी खेळतात रे हे लोक. काल त्या पेसनी घुमवला बॉश्चला म्हणून या सामन्याला महत्वं रे. साला असं पाहिलं की वाटतं, सुन्या, कपिल, कृष्णन, पेस यांच्या घरी जावं आणि यांचे हात पाय चेपून द्यावेत. खेळावर, खेळाडूंवर प्रेम करणारे नाना मला चौकापर्यंत सोडायला आले होते. 

बेकर, पेस, कृष्णन, अमृतराज, बोर्ग, मेकेनरो (आणि इतर अनेक), आपले काही आणि ऑस्ट्रेलिया, विंडीजचे खेळाडू यांच्याबद्दल बोलताना नाना भान विसरून बोलायचे. नोक-या लागल्या, त्यामुळे भेटी कमी झाल्या. अधूनमधून टेनिस, क्रिकेट बघतो. पण त्यात आता ती मजा नाही. नानाही आता ऐंशीच्या घरात असतील. टी ट्वेंटी नानांबरोबर बघायला हवीये एकदा. एक तर ते बघत नसतील किंवा यथेच्छ शिव्या देतील मला आणि खेळणा-यांनापण. सगोत्री असलो काय नसलो काय ते महत्वाचं नाही, क्रिकेटची आवड हे समानगोत्रं आहे हे नक्की. ती सर येणार नाही कदाचित पण म्हातारपणी नानांसारखा दरबार भरवून क्रिकेट बघेन असं म्हणतोय. 

भेट न झाल्याची चुटपूट लागायला नको म्हणून एकदा भेटून येईन म्हणतोय. 'परवाची म्याच पाहिलीस? हिजडयासारखे केस वाढवलेत ते काप म्हणावं आधी त्या शर्माला. सांगा रे त्याला कुणीतरी, थंड डोळ्यातून दहशत पाहिजे म्हणाव होल्डिंगसारखी, तो मार खाणार बघ एक दिवस' अशा वाक्यानी ओळखीची खूण पटेल आणि मग हरवलेल्या दिवसांची साचलेली आठवण डोळ्यातून हसता हसता बाहेर येईल.  

जयंत विद्वांस   




  

Thursday 10 September 2015

सत्तर एमएम चे आप्तं (६)…. त्शेरिंग डेंझोंग्पा....

'त्शेरिंग फिंन्त्सो डेंझोंग्पा', (त्सुनामीसारखा त् सायलेंट आहे का ते माहित नाही) उच्चारताना जिभेला क्रॅम्प येउन आयोडेक्स लावायची पाळी येईल अश्या अत्यंत अवघड नावा आडनावाचा हा सदुसष्ठ वर्षाचा तरुण, फिट माणूस डॅनी नावानी मला माहित आहे. मी शाळेत असताना आम्हांला दोन 'इनामदार' सर होते. एक म्हणजे स्केलेटन, ते इंग्लिश शिकवायचे आणि चुकलं की चिमटे काढायचे पोटाला (एकदम पैसे येतील म्हणून त्यांनी घरात वर्षाची रद्दी साठवली होती, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय) आणि दुसरे पी.टी.आणि इतिहास शिकवायचे, एकदम दणकट माणूस, त्यांना त्यांच्या हेअरस्टाईलमुळे 'डॅनी' म्हणायचे (अर्थात हे सगळं पार्श्वगायन, तोंडावर कोण म्हणणार, नाहीतर 'पार्श्वभाग' गायन झालं असतं). तर मुद्दा असा की तेंव्हापासून हा डॅनी कोण आहे ते बघायची मला उत्सुकता होती.  

तेंव्हा वर्षाकाठी दोनचार सिनेमे बघायला मिळायचे, एक माझ्या, एक भावाच्या वाढदिवसाला, एक होळीला ढूमकं न आणल्याच्या बदल्यात आणि एक श्यामची आई, हाथी मेरे साथी, सती अनसूया वर्गातले. मामाकडे स्क्रीन, रसरंग आणि न्हाव्याकडे फिल्मफेअर, स्टारडस्ट यामधून काय तारे तारका दिसायचे तेवढेच. पडद्यावर बघायला खूप काळ जावा लागला. डॅनीला मी पहिल्यांदा पाहिला ते बहुतेक 'धर्मात्मा'मधे, जांकुरा, मेंढ्यांची शर्यत खेळणारा. त्याची ती हेअर स्टाईल भारी होती (तो, विनोद मेहरा आणि फारुख शेख - एकदम खतरा हेअर स्टाईल). फिरोजखानला टशन देणारा. तो आला तेंव्हा ब्रूसली सारखा वाटायचा जरा. 'धर्मात्मा'मुळे त्याचा 'शोले' गेला ते बरंच झालं. अमजदचा गब्बर सरसच होता. डॅनीभाय हमको माफ करो. पण त्यालाही चुटपूट लागलीच असणार, शोले तसाही हिट झालाच असता, डॅनी कुठल्याकुठे गेला असता.

तो 'मेरे अपने' मधला पुसटसा आठवतोय मला. 'काला सोना'मधे त्याला सफरचंद फरीदा जलाल हिरोईन होती आणि 'सून सून कसमसे' गाणं पण होतं. त्याचा 'धुंद' खतरा होता. एक तर सस्पेन्स, त्यात हा विक्षिप्त आणि पांगळा, बायकोवर संशय घेणारा. त्याचं ते एकदम व्हायोलंट होणं आणि संजयखान आल्यावर लगेच सोबर होणं, भारी होतं. रोज उठून एकसारख्या डाकूच्या भूमिका करून कंटाळल्यावर त्यानी ब्रेक घेतला आणि परत येउन राजेश खन्ना आणि त्याचं प्रेमपात्रं किमला घेऊन त्यानी 'फिर वोही रात' दिग्दर्शित केला. 'हमसे बढकर कौन'मधे तो चारात एक होता. 'बुलंदी'मधे तो 'लोबो' बाप मुलाच्या डबलरोल मधे होता. एक तरुण दिसतो, वागतो आणि दुसरा बाप वाटतो आणि तसा वागतोही पडद्यावर. मिथुनपेक्षा तो दोन वर्षांनी मोठा आहे पण तो 'बॉक्सर'मधे त्याचा बाप झाला.

प्राण आणि डॅनी मधे एक साम्यं होतं, समोर कुणी का असेना त्यांना काही फरक पडायचा नाही, ते दबून जायचे नाहीत. अमिताभ बरोबर 'हम'मधला बख्तावर आणि 'अग्निपथ' मधला कांचा चीना आणि 'खुदा गवाह' मधे खुदाबक्ष पहा. एकदम टफ फाईट. तिन्ही मुकुल आनंदचे आणि त्याच्याच 'डायल एम फॉर मर्डर'च्या हिंदी आवृत्ती 'ऐतबार' मधला तो बावळा दिसणारा चलाख इन्स्पेक्टर बरुआ. शक्ती कपूर चांगल्या भूमिकेत पण व्हिलन सारखाच दिसतो, डॅनी मात्रं जिथे जसा चेहरा गरजेचा आहे तसाच. 'अंदर बाहर' मधला शेरा बघा, सतत घामेजलेला, कपाळावर मधे तिसरा डोळा असल्यासारखी आठी आणि थंड रक्ताचा. 'अंधा कानून' मधला अकबर अली, नानाच्या 'क्रांतिवीर' मधला चतुरसिंघ, सनीच्या 'इंडियन' मधला सिंघानिया तकलादू वाटत नाहीत. '१६ डिसेंबर' मधला वीर विजयसिंघ कसा भारदस्तं होता. नुकत्याच आलेल्या 'बेबी'मधला फिरोज अली खान पण सुंदर होता त्याचा. 

राजकुमार संतोषीनी त्याला 'घातक' मधला 'कात्या' आणि 'चायना गेट' मधला 'मेजर गुरुंग' या दोन सुंदर भूमिका दिल्या. त्याचा कात्या एखादा संत जसा पूर्ण सज्जन असतो तसा पूर्ण शंभर टक्के दुर्जन होता. त्याची दहशत मानसिक आहे हे छोट्या छोट्या गोष्टीतून फार छान दाखवलंय दोघांनी मिळून. 'चायना गेट' मधला आजार लपवणारा, सगळ्यांना समजून घेणारा, मितभाषी गुरुंग चांगला उभा केला होता त्यानी. मुळात डॅनी हा पोटभरू, सवंग अभिनेता नाहीये. त्यानी लता, आशा आणि रफी बरोबर गाणं म्हटलंय, त्याची नेपाळी गाणी हिट आहेत. तो लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, स्क्लप्टर आहे. त्यानी सिक्कीमच्या राजकुमारी बरोबर लग्नं केलंय.


त्याला खरंतर आर्मीत जायचं होतं. त्याला पश्चिम बंगालमधे बेस्ट कॅडेट अवार्ड मिळालंय आणि त्यानी २६ जानेवारीच्या संचालनात भाग ही घेतलाय. पुण्यात ए.एफ.एम.सी.मधे क्वालिफाय झालेला असतानाही त्यानी एफ.टी.आय.आय.ला दाखला केला. सदुसष्ठाव्या वर्षीही तो तब्येत राखून आहे याचा अर्थ सैन्यात नसेल गेला तो पण ती शिस्तं राखून आहे. म्हणून तो मोठ्या मनाचाही आहे. बिग बी शी त्याची दोस्ती आहे. एकदा त्यानी कौतुकानी सांगितलं होतं, 'यापुढे तो असेल त्या पार्टीत मी जाणार नाही कारण तो आला की मग आमच्या भोवती कुणी उरत नाही'. 

हिंदी चित्रपटात हिरोला लागणारा चेहरा त्याच्याकडे नाही पण तो गाजला, चालला, टिकला. दुसरा असा एक ओम पुरी. वयानी म्हातारा झालेला डॅनी जास्ती सरस आणि रुबाबदार दिसतो. आता एवढं चेह-याचं कौतुक राहिलं नाही हिरोला, त्याकाळी होतं. 'शमिताभ'च्या धनुषपेक्षा डॅनी कैक पटींनी देखणा आणि अभिनयसंपन्न आहे. जन्माला यायची वेळ चुकली, बाकी काय.

जयंत विद्वांस