Wednesday 21 August 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (६)… क्रिस एवर्ट


पहिल्या पाच भागात रूपानी सुंदर असणं थोडंफार तरी गरजेचं असतं अशा चित्रपटांशी निगडीत ललना पाहिल्या. पण मला काही खेळाडूही असे लक्षात राहिले आहेत. अग्रभागी आहे ती ख्रिस एव्हर्ट.

स्मिता आणि शबाना जशा आळीपाळीने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घ्यायच्या तीच पद्धत ख्रिस आणि मार्टिनाची होती. भांडण न करता वाटून घेतल्यासारख त्या विम्बल्डन जिंकायच्या. ब्युटी आणि बीस्ट असाच असायचा सामना तो. एका बाजूला डावखुरी ताकद आणि एकीकडे नजाकत. मात्रं दोघीही ग्रेसफुल होत्या. जिमी कॉनर्स बरोबर तिचं गुळपीठ होतं हे वाचून पण मला कॉनर्सचा हेवा वाटायचा. लेडी डायना आणि ख्रिस यांच्या चेह-यात मला कायम उगाचच काही साम्य आहे असं वाटत आलंय. सरळ नाक आणि सुंदर, प्रसन्न पण करारी झाक असलेला चेहरा. जिंकली म्हणून तिनी कधी उड्या मारल्या नाहीत, हरली म्हणून अगदी दु:ख्खी कष्टी चेहराही नाही, चिडणं नाही, लाईनमनला शिव्या नाहीत. एक सुसंस्कृत, जमिनीवर पाय असलेलं व्यक्तिमत्व खेळतंय असं वाटायचं. (तेंव्हा बायकांचं टेनिस 'टेनिस हा बघण्याचा मुख्यं भाग' या उद्देशानी बघितलं जायचं). परदेशी खेळाडूंचं मला एका बाबतीत कायम कौतुक वाटत आलंय. लोकांनी 'कधी' विचारायच्या ऐवजी 'का' विचारावं अशाच वेळी ते निवृत्ती घेतात (आपल्याकडील एकमेव उदाहरण सुनील गावसकर - हे वाक्यं पण त्यांचंच). ख्रिस निवृत्तं झाली आणि टेनिस मधली सौंदर्यपूर्ण नजाकत संपली. सौंदर्य हल्ली असतच पण नजाकत शोधावी लागते.

मार्टिना निव्वळ पुरुषी होती. तिची दुहेरीतील साथीदार पाम श्रायव्हर बरोबर तिचं 'नातं' जोडून काही काळ चविष्ट चर्चाही झाली. पण तिनी कुणाला हुंगून सुद्धा विचारलं नाही. तिनी नकार ही दिला नाही, हो ही म्हणलं नाही. कुछ तो लोग कहेंगे म्हणत ती खेळत राहिली. ती चिडकी नव्हती, चुकीच्या निर्णया विरुद्ध त्रागा न करता ती खांदे उडवून पुढच्या खेळासाठी सज्ज व्हायची. महिला टेनिस खेळाडूंच्या हक्कांसाठी, बक्षिसाच्या रकमेतल्या तफावतीसाठी, हल्ला झालेल्या मोनिका सेलेससाठी ती हिरीरीनी लढली. आजारातून परत आलेल्या पेस साठी ती त्याची मिश्रं दुहेरीत साथीदार झाली. तिचं शेवटचं विम्बल्डन मला अजून आठवतंय. फायनलला स्पेनच्या कोंचिता मार्टिनेझकडून ती हरली. हरल्याचं नाही वाईट वाटलं पण आता या हिरवळीवर ती परत दिसणार नाही यानी डोळ्यात पाणी आलं असावं.

 स्टेफी ग्राफ आली आणि सगळी गणितच बदलली. उंच, गरुडासारखं नाक आणि जर्मन जिद्द तिच्या नसानसात होती. ती शांतपणानी समोरच्याचा भुगा करायची. याना नोव्होत्नाचा हताश चेहरा मी विसरलेलो नाहीये. दुस-या सेट मधे ती ५-१ (४०-०) होती, एक गुण आणि विम्बल्डन जिंकलं इतकं सोप्पं होतं. याना उपविजेती झाली. पेशन्स, जिद्द म्हणजे  बघायचं असेल तर तो सामना बघावा. एकाच वर्षी तिनी आणि बेकरनी पहिल्यांदा विम्बल्डन जिंकलं होतं. ती सोनेरी केसांची दोन गोरीपान मुलं आनंदानी निथळत होती. सगळे मान सन्मान मिळवून ती आंद्रे अग्गास्सी बरोबर संसारी झाली.  

या तीनही सुंदर स्त्रियांचा एक गुण घेण्यासारखा आहे. तिघी स्वत:बद्दल असं नाही पण एकूणच कमी बोलायच्या. वाचाळपणा करून प्रसिद्धी मिळवायची त्यांना गरजच नव्हती. अशीच मला अर्जेन्टीनाची गब्रिएला सबातिनी आणि फ्रांसची मेरी पिअर्स पण लक्षात आहेत.

सायना नेहवाल पण मला सुंदर दिसते. माजी खेळाडू विमलकुमारनी 'सकाळ' मधे एका लेखात ऑलिम्पिकमधे पाहिलेल्या परदेशी खेळाडूंविषयी लिहिल होतं - 'मला प्रकर्षानी जाणवलं की एकाच्याही अंगावर कणभरही चरबी नाही, फक्तं स्नायू आणि मांस'. सायना तशीच आहे. मुळात सुसंस्कृत आई वडील आणि महान गुरु गोपीचंद (शीतपेयानी शरीराला अपाय होतो आणि खेळाडूंना ते घातक म्हणून बक्कळ पैसे देणा-या शीतपेयाची जाहिरात नाकारणारा वेडा माणूस) यांच्यामुळे तिचे पाय जमिनीवरून उचलले जातात ते फक्तं भन्नाट शॉट मारायला. जगात पहिला क्रमांक पटकावण हे खायचं काम नाहीये. विद्या विनयेन शोभते हे आचरणात आणणारे किती जण आहेत? सायना आणते. 

आधीच आदर्श दुर्मिळ होत चाललेत. वाढलेल्या वयामुळे जी अक्कल येते त्याने तुम्ही ठरवू शकता कसं वागायचं ते पण एवढ्या लहान वयात ही जी समज तिच्यात आहे त्याला सलाम. हवा असली की फुल हलतं मग शॉट चुकतो, जाळ्यात अडकतो हे खेळाएवढंच तिच्या वागण्यात पण तिनी लक्षात ठेवलंय.         

मुळात स्त्रियांना अनेक शारीरिक अडचणी असतात. तरीही कसोशीने इतकी वर्षं दूरचे प्रवास, दडपण, स्पर्धा या सगळ्यांना तोंड देत सतत जिंकणं, उच्च पदावर निष्कलंकित राहणं हे येरा गबाळ्याचे काम नोहे. त्यामुळे या चेह-यानी असोत नसोत मला गुणांमुळे सुंदर दिसलेल्या ललनांना सलाम.  

--जयंत विद्वांस


Tuesday 20 August 2013

विचार संपेल?


सकाळी साळगावकर गेल्याचं समजलं. पाठोपाठ दाभोळकर…

"साळगावकर" म्हटलं की "कालनिर्णय" शब्दं जसा ओघाने येतो तसं "दाभोळकर" म्हटलं की ओघाने पुढचा शब्दं "अंधश्रद्धा निर्मूलन" हाच  येतो, समाजाकरिता, त्यांच्या सुधारणेसाठी हा वेडा माणूस आयुष्यभर लढला.  बरं, कार्य तर असं की तिथे पाठीराखे कमी आणि विरोधक जास्तं.  चेष्टा, टोमणे हे तर कायमचंच पण हा माणूस प्रत्येक ठिकाणी जाऊन वाद घालायचा म्हणजे संवादातून मुद्दा पटवून द्यायचा. 

अनेक लोकांची पितळं त्याने उघडी पाडली. पण आपण फार ढोंगी आहोत. "कुणीतरी"- म्हणजे स्वतः सोडून हे काम इतर कुणीतरी करायला हवं असं आपल्याला कायम वाटतं. दाभोळकर 'कुणीतरी' पैकी होते. वेड घेतलेली माणसं अशीच असतात. त्यांना स्वतःचा मुद्दा पटवायचा नव्हता तर समजावून सांगायचा होता. अज्ञान दूर करायचा वसा घेतलेला माणूस. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक अजून काही पिढ्या गेल्या तरीही कळणार नाही इतके आपण रूढीवादी आहोत. आपल्यात ती ताकद नाही, धैर्य नाही.
 
काही ठिकाणी वाचलं की आपला बिहार झाला. तुलना खालच्या माणसाशी करून प्रगती होते का? म्हणजे इतके दिवस आपल्या इथे बिहार सारखी परिस्थिती नाही हे सुखावत होतं का आपल्याला? आता दु:खं कशाचं आहे नेमकं? बिहार पातळीला आलो याचं की  आपल्याला आपल्या पूर्वसुरींच्या कर्तुत्वावर फार काळ काढता येणार नाही याचं? शिखंडी समाजात वैचारिक वंध्यमैथुन आठवडाभर होईल, एकाच दिवशी दोघेजण गेले म्हणून वाहिन्यांवरचे तज्ञ रुसले असतील. पोकळी, पुरोगामी महाराष्ट्र, काळिमा, निषेध या शब्दांचा अर्थ विसरायला होईल इतक्या वेळा आज ऐकायला मिळतील.      
 

मुद्दे संपले की गुद्दे सुरु होतात असं म्हणतात. दाभोळकरांना निरुत्तर करायला मुद्दे कुठून आणणार? बरं, वैचारिक वाद घालावा तर तेवढी बौद्धिक ऐपत विरोध करणा-यांची नाहीये.  मग फक्तं एकच मार्ग उरतो - विचार संपवा  किंवा विचार करणारा संपवा. आणि माणूस नेहमी सोप्पा मार्ग स्वीकारतो. आजही तेच झालं.  लोकमान्य टिळक गेल्यावर राम गणेश गडकरी म्हणाले होते - "आता कुणाला बघितल्यावर विडी फेकावी असं पुण्यात कुणी उरलं नाही". जगात चांगली माणसं आधीच कमी झाली आहेत. आज अजून दोन कमी झाली, एक व्यक्ती कमी झाली, एक कमी केली गेली एवढाच काय तो फरक.
 
-- जयंत विद्वांस  






का''ळ''निर्णय झाला. . .

साळगांवकर गेले. महाराष्ट्रात एकदा एखाद्या माणसाला आपला म्हटला की लोक शेवटपर्यंत ते पाळतात. चितळे-बाकरवडी, कामत-ऑर्किड, साळगांवकर-कालनिर्णय अश्या जोड्या आम्ही लावलेल्या आहेत. त्या रहाणारच.  "भिंतीवरी कालनिर्णय असावे" कितीतरी वर्षं ही ओळ ऐकत आलोय. रहस्यपटाला रिपीट प्रेक्षक नसतो हा तोटाच तसच दिनदर्शिकेला अल्पकाळ मागणी हा तोटाच. त्यातही विविध संस्था, बँका दिनदर्शिका फुकट पण देतात तरीपण 'कालनिर्णय' विकत घेणारी माणसं आहेत. पु.लं, वसंत बापट, व.पु. असे दिग्गज लोक त्यांनी मागच्या पानावर आणले. ती कल्पना भन्नाटच होती. विविध उपयोगी माहितीनी नटलेली दिनदर्शिका एवढंच नव्हतं ते, वार्षिक कुळाचार पाळतात तसा 'कालनिर्णय' घेणे हा ही त्यातलाच एक भाग आहे एवढं लोकांनी प्रेम केलं त्यांच्यावर. विविध भाषात, आकारात निघणारं कालनिर्णय खूप लोकांना वर्षभर रोजगार पुरवीत आहे हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.   
 
 
 
साळगांवकरांनी मुहूर्त सांगितला की तो दुसरीकडे कन्फर्म करायची गरज कधी कुणाला भासली नाही. झी वर गणेशोत्सवात ते गणपतीची महती सांगायचे. ऐकत राहावं असं बोलायचे ते. न थांबता, घाई वाटेल इतपत सलग बोलायचे ते. ज्योतिर्भास्कर पेक्षा 'कालनिर्णय' ही ओळख मोठ्ठी होती. मला ज्योतिष या विषयाची मोठी गम्मत वाटत आलेली आहे.  ज्योतिर्भास्कर साळगांवकरांनी दैनिक काढलं होतं.  'कालनिर्णय'च्या खपाचे जितके महिने तेवढेही महिने ते चाललं नाही. त्यांनी या अपत्याचं भविष्य पाहिलं नसेल का?  
 
जोपर्यंत जगात मराठी माणूस आहे तो पर्यंत  "भिंतीवरी कालनिर्णय.. " रहाणारच. 
 
--जयंत विद्वांस

Friday 16 August 2013

अखेरचा निरोप….



Original : -

Soldiers poem:
 
If I die in war zone,
Box me up and send me home
.

Put my medals on my chest,
Tell my mum I did my best

Tell my dad not to bow, 
He won't get tension from me now

Tell my brother to study perfectly,
Keys of my bike will be his permanently.

Tell my sister not to be upset,
Her bro will not raise after the sunset

And tell my love not to cry,
Cause I'm a soldier, born to die
--Tim O'Brien

Wednesday 7 August 2013

बचपन की कहानी...


बचपन में मैने कहानी सुनी थी
एक था राजा, एक थी रानी
राजा बडा दयालू था
और सुंदर थी वो रानी...

उनका एक लडका था
उनको बडा वो प्यारा था
नन्हा था मैं, मुझे क्या पता
कहानी होती है कहानी...

भूख और गरीबी है क्या
नफरत और लाचारी क्या
मासूम था मैं, मुझे क्या पता
कहानी होती है कहानी...

अपनोंसे धोखा, अपनों पे वार
बेगुनाहों को मौते हजार
बेखबर था मैं, मुझे क्या पता
कहानी होती है कहानी...

--जयंत विद्वांस

Monday 5 August 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (५)…सुलोचना दीदी आणि जयश्री गडकर…

सुलोचना दीदी आणि जयश्री गडकर… 
प्रत्येक चित्रपटसृष्टीचा एकेक अंगभूत गुणविशेष असतो. नायिकांच्या बाबतीत तर ते प्रकर्षानं जाणवतं. दक्षिणेकडे अशक्तं नायिका दिसणार नाही, हिंदीत सतत उकाड्यात वावरल्यासारखे कमी कपडे किंवा कपड्यांचा फारसं भान नसलेल्या नायिका आणि मराठी चित्रपटात सोज्वळ चेहरे असतातच आणि मादकपणा एकूणच कमी अशा नायिका (आत्तापर्यंत तरी ही ओळख थोडीफार टिकून आहे).

मला मराठी चित्रपटात सगळ्यात सुंदर वाटलेल्या दोन नायिका, पहिल्या सुलोचनाबाई आणि दुस-या जयश्री गडकर. एक सोज्वळ सौंदर्य आणि एक मर्यादशील पण मादक देखणेपण. सुलोचना बाईंचा चेहरा अजूनही तसाच आहे, सात्विक, समाधानी, सोज्वळ पण सुंदर, परत परत बघावा असा. आपल्याकडे एकदा शिक्का बसला की तो पुसला जात नाही. दीदींना एका चाहत्यानी  'भाऊबीज' मधल्या 'चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात' वर नाच केल्याबद्दल प्रेमापोटी रागे भरलं होतं - "तुम्ही असली गाणी करत जाऊ नका".  पाहायला गेलं तर गाण्यात काही वाईट नाहीये त्या पण ते दुसरं कुणीतरी करावं, यांनी नाही, हे प्रेम आहे.


मोठी वहिनी, प्रेमळ आई, बहिण या भूमिका करण्यासाठी त्यांना कधी कष्ट पडलेच नसावेत. नायिका, चरित्र नायिका सगळीकडे त्या ठसा उमटवून गेल्या (त्या अंधा कानून मधे हेमा मालिनी आणि रजनीकांतची आई  होत्या. तो वडिलांवर गेला असावा अशी समजूत करून घ्यावीच लागते). 'सांगत्ये ऐका' जेवढा हंसा वाडकर, जयश्री गडकरचा होता तेवढाच त्यांचा पण होता. त्यात अतिप्रसंगाच्या वेळी त्यांचा भेदरलेला चेहरा पहाच एकदा. विश्वासघात, असहाय्यता आणि पुढे वाढून ठेवलेलं अभद्र देणं सगळ नुसतं चेह-यातून पोचतं. (भगवान के लिये मुझे छोड दो या सारखं भंपक वाक्य ऐकलं नसेल, भगवानला मानत असता तर केला असता का बलात्कार त्यानी?) .

मोलकरीण, एकटी, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, वहिनीच्या बांगड्या असे किती तरी चित्रपट समोर उभे रहातात. वहिनीच्या बांगड्या एवढा आठवत नाही पण एका दृश्यात त्या आणि माधव वझे रस्त्यातून अनवाणी जात असतात, ते दृश्य अजूनही लक्षात आहे. अजाण वयातला बडबड करणारा उत्साहानी फसफसणारा माधव वझे आणि त्याचा हात धरून शांतपणे चाललेली, डोक्यात इतर विचार असलेली, पण त्याला न थांबवता त्याचा हिरमोड न करणारी वहिनी. शेवटचा एक प्रसंग लक्षात आहे विवेक हमसून हमसून रडतो तो (चु.भू.दे.घे.). अगदी लहान वयात पण तो सीन बघताना डोळ्यातून घळाघळा पांणी आलं होतं एवढं मात्रं आठवतं.

जयश्री गडकरांचे एक गाव बारा भानगडी, मानिनी, साधी माणसं, सांगत्ये ऐका, मल्हारी मार्तंड, मोहित्यांची मंजुळा आणि नाव आठवत नसलेले कितीतरी चित्रपट मी पाहिलेत. उत्तमोत्तम लावण्या, सुंदर कथा, चांगले दिग्दर्शक, सहकलाकार हे सगळं जरी असलं तरी त्यात चमकायला स्वतच्या अंगात पण काही गुण असावे लागतात, ते जयश्री गडकरांकडे होते म्हणूनच त्या यशस्वी झाल्या. नुसते गोड चेहेरे, अफाट नृत्यं कौशल्यं असलेल्या काय कमी होत्या का? पण एखादाच खणखणीत गुण असण्यापेक्षा त्या सगळ्या गुणांमधला भरपूर हिस्सा त्या बाळगून होत्या. सुडौल पण भारदस्त शरीरयष्टी, मोहक चेहरा आणि नृत्यकौशल्यं एवढ्या गुणांवर पण त्या तरल्या असत्या. पण असावं आपलं अजून काहीतरी वेगळं म्हणून त्या अभिनय पण करायच्या. 'सांगत्ये ऐका' मधला त्यांचा अल्लडपणा, पहिल्या प्रेमाची नव्हाळी मस्तच होती. 'एक गाव बारा भानगडी' मध्ये त्यांच्यावर चित्रित झालेलं 'कशी गौळण राधा बावरली' हे गाणं जेवढं श्रवणीय आहे तेवढंच प्रेक्षणीयही आहे. अत्यंत तन्मयतेने त्या ते गाणं म्हणत आहेत हे जाणवत.


एका चित्रपटात त्या न्हाऊन केस सुकवत बाहेर येतात, शप्पथ सांगतो, मला तर त्या शिकेकाईचा पण वास आला इतक्या त्या टवटवीत दिसत होत्या. चंद्रकांत, सुर्यकांत, अरुण सरनाईक, राजा गोसावी यांच्या बरोबर त्या शोभायच्या. तमासगीर, शहरी आणि ग्रामीण असे फरक नुसत्या वेशभूषा बदलून नाही तर त्याप्रमाणे त्यांची भाषेची ढब ही त्या बदलायच्या. 
पूर्वी चांगल्या चित्रपटांचे (राजकपूर, प्रभातचे सिनेमे, राजा परांजपे यांचे आठवतात) सप्ताह लागायचे. मल्टीप्लेक्सच्या जमान्यात कोण येणार म्हणा बघायला. डीव्हीडी वर येतात बघता पण थेटरातली मजा घरात नाही. कारण माहित नाही पण थेटरातल्या अंधारात परवानगी न मागता जो हुंदका फुटतो तसा घरात फुटत नाही. 'भाऊबीज', 'वहिनीच्या बांगड्या', 'एक गाव बारा भानगडी', 'मानिनी', 'साधी माणसं' थेटरात बघायचा योग येणं अवघड आहे. 
--जयंत विद्वांस