Friday 31 July 2015

वाणी सर.....

मार्च १९८८. पुण्याहून काका बदलापूरला घेऊन गेले बारावीसाठी. ८३ ला दहावी म्हणजे पाच वर्षाची ग्याप होती. दाढीसकट वजन पन्नास किलो पण मस्ती भरपूर. मी आता आयुष्यात पुढे काय करणार हा प्रश्नं मला एकट्यालाच नव्हता, अनेकांना पडला होता. पाचशे रुपये डोनेशनवर कुठलंही कारण न देता आदर्श विद्या मंदिर, कुळगांव, बदलापूरला दाखल झालो. शाळाच ती, ड्रेस होता, निळी प्यांट, पांढरा शर्ट. अभ्यासाची सवय सुटलेली, प्रचंड न्यूनगंड होता. सगळी मुलं, मुली सोळा सतराची, मी विशीचा. पहिला महिना कॉलेजला गेलोच नाही, घरातून जायचो, धूर काढत फिरायचो, घरी यायचो वेळेत. अंबरनाथपर्यंत चालत पण जायचो, वेळ जायचा. नेमकं काय करावं कळत नव्हतं. काका शिक्षक त्यामुळे त्यांना सगळेजण ओळखायचे. घरी निरोप आला मी येत नाही म्हणून. बोलणी खाल्ली. दुस-या दिवशी गेलो नाहीतर पुण्याला तिकीट तयार असणार, गेलो. 

एक वही, पेन, संपला विषय. सगळा वर्ग माझ्याकडे कुतूहलाने बघत होता. प्रेझेंटी घेताना शेवटचं नाव आलं अल्फाबेटिकली.  नव्हतोच महिनाभर त्यामुळे त्यांनी वर बघितलंच नाही आणि पहिल्यांदाच आवाज आला प्रेझेंट सर. त्यांनी वर बघितलं आणि हसले. 'सभ्य गृहस्थ'… आलात का? सगळा वर्ग हसला. मी शाळेच्या गेटच्या अलीकडे शिग्रेट विझावायचो. खिशात तंबाखू, चुना, परिस्थिती असेल तर गुटखा असायचा. अकरावी, बारावी - आर्ट्स, कॉमर्स. चार वर्ग फक्तं. सगळ्या मास्तर लोकांना मी माहित होतो. एक उर्मट, नालायक मुलगा, कदाचित वाया गेलेला पण त्रास काही नाही त्याचा म्हणून कुणी काही बोलायचं नाही. महिन्याभरात पहिली चाचणी. इकोनोमिक्समध्ये नापास झालो. क्षीरसागर बाईंनी नाव न घेता काडेपेटी, तंबाखू उल्लेख केले आणि पुढच्या वेळेस जे नापास होतील त्यांनी माझ्या तासाला बाहेर जावे सांगितलं. 

दुस-या चाचणीत सगळ्यात पास. वाणी आमचे वर्गशिक्षक, खानदेशी होते. रागीट. समीर धुवाडच्या कानफटात मारलेली वर्गात साठ-पासष्ठ मुलात. वर्ग टरकून असायचा. (एकदाच ते दोन दिवस सुट्टीवर होते तर आम्ही वर्गात कागद पेटवून धमाल केली होती - त्याबद्दल परत कधी). मी मागच्या बेंचवर झोपायचो नाहीतर गाणी गुणगुणायचो. एकदा वाणी अचानक आले पिरीयड नसताना, मी झोपलेलो. एक फुलस्केप होता फक्तं खिशात. शेजारच्याच मराठीचं पुस्तक पुढ्यात उघडे ठेऊन झोपलेलो. म्हणाले, 'काय चाललंय तुमचं'. 'मराठी पुस्तक वाचत होतो.' 'कुठला धडा?' 'बुलाखराव बापू'. ' विचारू काहीही?' 'विचारा, मला धडा पाठ आहे'. मराठीचं पुस्तक मी कायम घेतल्या घेतल्या पूर्ण वाचायचो, त्याचा फायदा झाला. 

सहामही आली. रिझल्ट होता. वाणी सलग दोन पिरीयड रिझल्ट सांगायला. प्रत्येक विषयाचे मार्क सांगून चिरफाड चालू होती, काही मोजकी डोकी सोडली तर बाकी सगळे द्रौपदी, सगळे कपडे, लायकी निघत होती. मी शेवटचा. त्यामुळे मला जाम धास्ती, सगळी मस्ती उतरणार होती. पोरी जाम खुश होत्या. मी उठलो, डोकं फिरलंच होतं, जास्ती काही बोलले तर निघून जायचं वर्गातून - ठरवलं होतं. समोर गेलो, खांद्यावर हात टाकून म्हणाले, किती विषयात. काही अंदाज? मी गप्पच. सगळा वर्ग माझ्याकडे बघतोय आणि मी पुढच्या पंचनाम्याची वाट पहात. 'सद्गृहस्थ वर्गात पहिले आलेत'. ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. बाहेर नेलं, म्हणाले, ' मी तुला कधीच काही म्हणालो नाही, हुशार आहेस, झोपतोस, वर्गात नुसता बसतोस तरीही पहिला येतोस, माझी इच्छा पूर्ण करशील का? शाळेत मराठीत पहिला येशील? आर्ट्सचा आला तरी आनंदच आहे मला, मीच शिकवतो तिथेही पण कॉमर्सचा आला तर मला जास्ती आनंद होईल. 

खूप विचार केला. कानफटात माराव्यात अशा अनेक गोष्टी मी केल्या होत्या. त्या माणसानी माझी मन:स्थिती कदाचित ओळखली असेल. मारलं तर बिथरेल, हुशार आहे, येईल रुळावर असंही वाटलं असेल. बोर्डाच्या परीक्षेत काय होणार, धाकधूक होती. फेल झालो तर सकाळची पहिली गाडी आधीच ठरलं होतं. आदल्या दिवशी गजा मेहेंदळेच्या प्रेसमधे रिझल्ट मिळायचा एक रुपयात. माझी काही डेरिंग होईना. रुपया घालवून अवलक्षण. संदेश घाणेकर रुपया उडवून आला तीन वाजता. नाईलाजानी जेवायला बसलो होतो, डोक्यात टेंशन. पळतच आला होता तो, धापा टाकत, 'भिकारचोट पहिला आलास तू शाळेत'. परत जावून रुपया घालवावा म्हटलं, संदेश वेंधळा आहे. गजानी घेतला नाही. मिठी मारली, मग शाळेवर गेलो. बोर्डावर नाव होतं. 

पासष्ठ मुलात पहिला नंबर ही काही फार मोठी गोष्टं नाही. पण मला हुरूप द्यायचं मोठ्ठ काम त्यानी केलं. दुस-या दिवशी वाणींना भेटलो. 'सभ्य गृहस्था, तू वचन पूर्ण केलंस, शाळेत मराठीतही पहिला आहेस. ७३/१००. (पहिले चार फुलस्केप मी 'रम्यं ते बालपण' निबंध लिहिलेला, त्यानीच मला एवढे मार्क दिले, मला खात्री आहे) बाकीची मुलं मट्ठ असल्यामुळे असेल, परिक्षक दयाळू असला की घडतं असं कधी कधी,  आपण फार हुरळून नाही जायचं. न दिलेलं वचन चुकून पाळलं गेलं होतं. 

वाणी सर २६ वर्ष झाली, तुम्ही रिटायर झाला असाल निश्चित. तुम्ही माझा अपमान केला असतात, तुमच्या रागीट स्वभावानुसार हात उचलला असतात तर मी बारावी नसतो झालो कदाचित, वाहवतही गेलो असतो, माहित नाही. आता आलो की येईन शाळेत, तुमचा पत्ता घेईन आणि नमस्कार करायला येईन घरी. बाकी सगळे धंदे कधीच बंद केलेत मी शिग्रेट सोडून. तुम्ही उपहासानी म्हणायचात तसा 'सभ्य गृहस्थ' होण्यासाठी प्रयत्नं अनेक वर्ष चालू आहेत. यात मात्रं काही फार यश येईलसं वाटत नाही.  

--जयंत विद्वांस            



   

Thursday 30 July 2015

लल्याची पत्रं (२४)…. 'जब प्यार किया तो…'

लल्यास…… 

जुनी गाणी आठवली की नुसता अर्थ, चाल आठवत नाही. गायीमागे वासरू यावं तशा त्या गाण्याच्या ख-या खोट्या कथा, गाण्याशी संबंधित असलेले, नसलेले किस्से पाठोपाठ आठवतात. मुग़ल-ए-आज़म बद्दल आधीच खूप बोललं गेलंय, लिहिलं गेलंय. सलीम अनारकली फेमस करायचं काम एखाद्या पुस्तकानी केलं नसेल तेवढं ह्या चित्रपटानी आणि बीना रायच्या 'अनारकली'नी केलं असेल. नंतर हा सिनेमा रंगीत झाला तेंव्हा काही मी पाहिला नव्हता पण मूळ कृष्णंधवल सिनेमात एवढंच गाणं रंगीत असलेला पाहिला होता लहान असताना. सत्तर एमेम पडद्यावर मधुबाला आणि तो शीशमहाल बघताना अवाक झालो होतो. शब्दांचे अर्थ कळण्याचं ते वय नव्हतं पण कथा समजण्याइतपत होतं. 

मोठ्यांची दु:खं आणि स्वप्नंही मोठी, बिलोरी, खर्चिक आणि चकचकीत असतात. आपल्या कल्पनांची रेंज पण नसते एवढी भव्यं. के.असिफ राजा माणूस असणार, बडे दिलवाला. अपयशी ठरला असता तर त्याची पण स्टोरी झाली असती. लोक 'बाहुबली'च्या खर्चानी आ वासतात. त्याचा पूर्वज आहे असिफ. चित्रीकरण, संगीत, स्पेशल इफेक्ट यासाठी संगणकीय करामत नसताना त्यानी जे बघितलं आणि सत्यात आणलं त्याला तोड नाही. त्यातल्या बडे गुलाम अली खाँ यांचा किस्सा ऐक - लता, रफीला ३००-४०० मिळायचे तेंव्हा एका गाण्याला. बडे गुलाम अली पाहिजेतच हा असिफचा हट्ट. त्यांना फिल्म मधे गायचं नव्हतं म्हणून त्यांनी २५००० सांगितले, म्हणजे आपोआप प्रश्नं मिटेल. असिफनी लगेच निम्मी आगाऊ रक्कम दिली आणि त्यामुळे त्यांना गावंच लागलं. तो पादेल तेवढं बाकीच्यांना ओरडता पण येणार नाही बघ. त्यानी तीन चित्रपट काढले फक्तं - फूल, हलचल, मुगल-ए-आझम आणि अर्धवट लव्ह एन गॉड. अमाप पैसा, दहा बारा वर्ष खर्च करून काढला त्यानी मुगल. 


मूळ सुरैयाच्या जागी आलेल्या मधुबाला बद्दल काय बोलावं. सगळी कास्ट जबराच होती. कधीही फार न आवडलेला दिलीपकुमार, पृथ्वीराज कपूर, निगार, अजित आणि माझी अत्यंत लाडकी, राजस, महाराणीचं खानदानी सौंदर्य दाखवणारी मायाळू चेह-याची दुर्गा खोटे. मोठे कलाकार, सुंदर कथा, पैसा खर्च केला म्हणजे चांगली कलाकृती होते असं मात्रं नाही, दिग्दर्शक महत्वाचा ठरतो (पहा आणि वेडे व्हा - रामगोपाल वर्मा की {न लागलेली} आग). त्याच्या डोक्यात तो संपूर्ण खेळ तयार हवा. कशानंतर काय, कशासाठी, केंव्हा, का असे अनेक प्रश्नं त्यानी स्वत:ला विचारलेले असतात. एकूण परिणाम त्याला माहित असतो. त्याचा स्कायव्ह्यू असतो गरुडाचा. यातलं 'तेरी महफ़िलमे' गाणं पण तेवढ्याच तोडीचं आहे 'जब प्यार किया' च्या. गाण्याविषयी सांगता सांगता बाकीच्याच गोष्टी झाल्या बघ जास्ती पहिल्यांदा म्हणालो तसं.      

एकूण गाणी वीस होती, त्यातली बारा सिनेमात राहिली. खेबुडकरांनी व्ही. शांतारामांच्या पसंतीला पडेपर्यंत जसं 'पिंजरा'चं 'दे रे कान्हा' जन्माला येईपर्यंत जशी अनेक गाणी लिहिली तसंच शकील बदायुनीनी नौशादचा आत्मा शांत होइतोवर एकशेपाच वेळा हे गाणं लिहिलं. एक कोटी रुपयाचा किरकोळ खर्च ह्या गाण्यावर केला होता पण कॉम्प्यूटर नव्हता त्यामुळे इफेक्टसाठी नौशादनी लताला स्टुडीयोच्या बाथरूममधे गायला लावलं होतं. छतापासून सगळीकडे त्या बिलोरी आरशात दिसणारी ती शेकडोंच्या संख्येत दिसणारी स्वर्गीय छबी कशी होती ते शब्दात सांगता येणार नाही. हिमालय बघितला की त्या शुभ्र सौंदर्याचं वर्णन करता येत नाही म्हणे. अनिमिष डोळ्यांनी बघायचं फक्तं, आपल्या क्षुद्रत्वाची, सुखाच्या क्षणभंगुरतेची जाणीव निर्माण होईपर्यंत बघायचं फक्तं आणि पहाता आलं हे भाग्यं याचा अफाट शब्दातीत आनंद मानून घ्यायचा. मधुबालाचं तसंच आहे. बघायचं गप्पं, बोलायचं नाही काहीही.   



गाण्याचा अर्थ तुलाही माहितीये. लालबुंद झालेला धिप्पाड पृथ्वीराज, भयानी कंपित झालेली दुर्गा खोटे, तणावलेला दिलीपकुमार आणि हृदयाला भोक पडलेली, वास्तवात दिलीपकुमारच्या प्रेमात पडलेली, लाल सलवारीएवढेच लालचुटुक ओठ असलेली, शब्दातून, डोळ्यातून खुन्नस दाखवणारी, गातागाता करूण हसणारी, तू शहेनशाह आहेस तर मी पण अप्सरा आहे असं ठसवणारी, डोक्यावर पीस लावून नाचणारी, रत्नजडीत मधुबाला पहावी फक्तं. शेवटच्या ओळींला - परदा नहीं जब कोई खुदा से, बन्दों से परदा करना क्या - बादशहा पृथ्वीराजकपूरची मान अर्थ समजल्यानी खाली जाते, लताचा आवाज काळीज फाडून आत शिरत असतो, परिणामांची जाणीव असतानाही महाकाय सत्तेशी लढणारी ती अनारकली, समोर बसलेला तो असहाय्य सलीम अभागी वाटू लागतो. बघताना मलाही तसंच होतं, ओठ थरथरू लागतात, शेकडो प्रतिमा धुसर होतात, मधुबाला परत पहायची नाही, लता ऐकायची नाही आता, चाल ऐकायची फक्तं, अर्थ नाही असा विचार येतो आणि मग मी च्यानल बदलतो.

चल थांबतो, ओसरत नाही तो असर आहे हा सगळा.   
     
--जयंत विद्वांस 
***********************************************************

इंसान किसी से दुनिया में एक बार मोहब्बत करता है
इस दर्द को लेकर जीता है इस दर्द को लेकर मरता है

प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या
प्यार किया कोई चोरी नहीं की छुप छुप आहें भरना क्या

आज कहेंगे दिल का फ़साना, जान भी ले ले चाहे ज़माना
मौत वही जो दुनिया देखे, घुट घुट कर यूँ मरना क्या

उनकी तमन्ना दिल में रहेगी, शम्मा इसी महफ़िल में रहेगी
इश्क में जीना इश्क में मरना, और हमें अब करना क्या

छुप ना सकेगा इश्क हमारा, चारों तरफ़ हैं उनका नज़ारा
परदा नहीं जब कोई खुदा से, बन्दों से परदा करना क्या

(मुग़ल-ए-आज़म, नौशाद, शकील बदायुनी, लता मंगेशकर १९६०)
****************************************************************




Monday 27 July 2015

गझलरंग (२६/०७/१५).....

"कालच्या गझलरंगला गेलो होतो. आपल्याला ज्यातलं फार कळत नाही तिथेही मी जातो. कानावर पडून कधी काळी काही समजेल या आशेने जातो. त्यांचे चार पाच कार्यक्रम बघितलेत मी. कविता, गझल हा माझा प्रांत नाही, लिहिण्याचा सोडाच, फार समजण्याचाही नाही" असं मी मागच्या गझलरंग कार्यक्रमावर लिहिलं होतं त्यात अजूनही बदल झालेला नाही. पण तरीही मी जातो, या कार्यक्रमाचे अनेक फायदे आहेत मला वैयक्तिक. चकाट्या पिटायला मिळतात कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर, कार्यक्रम मात्रं मुकाट बघतो मी तीन तास, अण्णा फुलं जास्तीची असली की कशाला वाया घालवा खर्च म्हणून अनाउन्स करून मला देतात ते तर जामच भारी काम. 

मी अमर अकबर, शोले, मुकद्दर का सिकंदर (बाकी यादी इंबोक्सात), मधुबाला, रेखा, आरशात माझा चेहरा (कसाही असो, मी माझ्या प्रेमात आहे, सो तो मला प्रिय आहे) आणि गझलरंग वारंवार का बघतो? नेमकं नाही सांगता येणार. स्टेजवरचे नव्वद टक्के लोक तेच असतात, एखाद दुसरा नविन असतो (जो पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा येतोय स्टेजवर असं सांगितल्यावर खरं वाटत नाही, असे तयारीचे असतात). तर या गझलकारांची शैली माहितीये, साधारण आवडीचे, ताकदीचे विषय माहितीयेत, दाद मिळण्याची जागा वगैरे हळूहळू कळायला लागलंय, माहित झालंय. तरीपण जातो. पुण्यात फुकट प्रोग्राम म्हणजे पर्वणीच (तुम्ही काही म्हणा पण कार्यक्रमाला तिकीट नाही, पार्किंगलासुद्धा पैसे द्यायचे नाहीत हा जो बाहुबलीतल्या धबधब्यासारखा आनंद चेह-यावरून सांडतो ना तो क्यानननी टिपायला हवा, अण्णांना वाटतं कार्यक्रमाचा परिणाम आहे), पुणेकर गर्दी करणारंच असं काही मत्सरी लोक म्हणतात, म्हणू देत, आपण लक्ष नाही द्यायचं.

आनंदाची व्याख्या करता येत नाही, त्याचं नेमकं कारण सांगता येत नाही कधी माणसाला, येऊही नये. त्याचं कारण सापडलं तर तो क्षणिक आनंद असतो. म्हणून मला गझलरंगला का जातो याचं नेमकं कारण सांगता येणार नाही. इथे मी काल कुठल्या गझला सादर झाल्या, कुठले शेर होते ही वाण्याची यादी देणार नाही कारण ती वाचून तुम्हांला त्यातली मजा येणार नाही, तो अनुभवायचा विषय आहे, वृत्तांताचा नाही. सुरेशचंद नाडकर्णींच्या निवडक लेखांच्या संग्रहाचं प्रकाशन काल झाल्यामुळे दुस-या राउंडला एकेक गझल कमी झाली हाच काय तो दु:खाचा भाग, खोड काढायचीच झाली तर.

काल स्वप्नील शेवडे, योगिता पाटील, दास पाटील आणि शिवम पिंपळे पहिल्यांदा ऐकले. बाकी दिग्गज राहुल द्रविड-सदानंद बेंद्रे, होतकरू अजिंक्य रहाणे-सुशांत खुसराळे. डेल स्टेन-सुधीर मुळीक, भरवशाचा कोहली-सतीश दराडे, अष्टपैलू रैना-ममता ही टीम होतीच. अण्णांची बेंच स्ट्रेंग्थपण ऑस्ट्रेलियासारखी मजबूत आहे. समोर सुप्रिया, मनीषा, पूजा फाटे, वैभव देशमुख आणि वैभव जोशी हे सादर करणारे लोक पण हजर होते. मजा आली.

आयुष्यात आनंद मिळवणं फार सोप्पं आहे हो मनात आणलं तर. ब्यागपायपरच्या जाहिरातीत सांगितलंय तसं 'मिल बैठेंगे जब चार यार' असे मित्रं आजूबाजूला हवेत त्यात चाफ्याची फुलं आणणा-या रुचा पाठक, सिटींग व्यवस्था बघणारी आमची रुची, मुंबईहून आलेला विज्या उतेकर, औरंगाबादहून आलेली  अंजली दिक्षित, हसमुखराय वैशाली शिरोडकर आणि असे बरेच स्थानिक दोस्त लोक, स्टेजवर आपलेच दोस्त लोक आहेत, ते सादर करतायेत, कधी अंगावर काटा येतोय, कधी शांतता पसरेल तर कधी हसू फुटेल असे शेर ते फेकतायेत, कधी अस्वस्थ करून जातायेत असा माहोल आहे. अण्णा असे मिश्किल बोलताहेत, त्यांचा दहा जीबीचा RAM चालू आहे आणि हव्या त्या ओळी ते जिभेच्या डेस्कटोपवर आणतायेत आणि आपण त्यांच्याकडे बघत रहातोय.

कशाला हवंय विश्लेषण, समालोचन, वृत्तांत. तिथे या येत्या १३ तारखेला आणि बघा. तेंडूलकरचा कव्हर ड्राईव्ह बघावा, टोनी ग्रेगनी सांगू दे नाहीतर अजून कुणी ती दुधाची तहान ताकावर असंच शेवटी.

--जयंत विद्वांस 

लल्याची पत्रं (२२) …'कहीं दीप जले कहीं दिल…'

लल्यास,

आठवी नववीत असेन मी, तेंव्हा पाहिलेला 'बीस साल बाद' म्याटीनीला (ती मॉर्निंग, म्याटीनीची मजा संपल्याचं दु:खं मात्रं अतोनात आहे). रामसे बंधू जाम हसवतो भुताखेताचे पिक्चर काढून. हा पहाताना मात्रं उसवली होती. टायटलला तो नुसता हात फिरतो ना टायटल्स चालू असताना तेंव्हा धना डायरेक्ट घरी गेला होता तेवढं बघूनच. होन्टिंग सॉंग लिहायला मोठी अवघड असतात. त्या स्टोरीशी रिलेटेड, रहस्यं फुटणार नाही अशा बेताने ते लिहावं लागतं एकतर आणि सुरेल चाल लागते कारण ते चित्रपटात एकापेक्षा जास्ती वेळा येतं त्यामुळे ते रद्दड असेल तर पब्लिक बोअर होऊ शकतं. 'बीस साल बाद-कहीं दीप जले कहीं दिल' (मूळ कथा आर्थर कॉनन डायल), 'महल-आयेगा आनेवाला' आणि 'गुमनाम-गुमनाम है कोई' (मूळ कथा अगाथा ख्रिस्ती) हिट होण्याची कारणं नुसती कथा नव्हती तर ही गाणी पण होती.

कृष्णधवल 'बीस साल बाद' मात्रं या गाण्याने अंगावर येतो. थ्रिलरमधे सतत काहीतरी घडेल असं वाटणं मस्ट असतं. यात ते वाटायचं. रहस्यपट काढणं फार रिस्की काम बघ. एकदा पाहिल्यावर रहस्यं समजलं की रिपीट ऑडीयंस ही. त्यात काही आचरट किंवा मुर्ख माणसं दात विचकून खुनी किंवा एंड सांगतात आणि माती करतात (विधू विनोद चोप्राचा अप्रतिम थ्रिलर 'खामोश' बघायला निघालो होतो, चौकात एकाला म्हटलं तर तो म्हणाला, 'अरे, तो xxxxx खून करत असतो'. तो 'खामोश' होईपर्यंत मी त्याला अर्वाच्च शिव्या दिल्या होत्या). 'बीस साल बाद', 'गुमनाम' मात्रं परत बघितले जातात कारण त्यातली गाणी सरस होती.मनोजकुमार, विश्वजीतला परत पैसे टाकून बघायचं म्हणजे अत्याचारच की. पण गाणी सुरु झाली की डोळे आणि कान उघडायचे बाकी वेळ चालू दे पडद्यावर काय ते.   

मुळात 'बीस साल बाद'  हेमंतकुमारच्या घरचं कार्य. प्रोड्युसर, म्युझिक, गायक तोच. खर्च कमी होतो आणि शिनेमा हिट झाला तर सगळा नफा त्याचाच. त्यामुळे सगळ्या चाली सरस आहेत (बेकरार करके हमे, जरा नजरोंसे कह दो, सपने सुहाने, ये मोहब्बतमें आणि कहीं दीप जले कहीं दिल). या गाण्याला गीतकार शकील बदायुनी आणि गायिका लता दोघांना फिल्मफ़ेअर मिळालंय म्हणून ते चांगलं आहे असं नाही. अनेकवेळा हे गाणं मी ऐकलंय, सगळी कडवी सुरेख आहेत पण शेवटचं कडवं मात्रं मला जास्ती आवडतं, ते कालातीत आहे, सिनेमापुरता मर्यादित अर्थ त्याला नाही. 'दुश्मन हैं हज़ारों यहाँ जान के, ज़रा मिलना नज़र पहचान के, कई रूप में हैं कातिल'.

बघ ना, अनेक माणसं आपल्या आजूबाजूला वावरत असतात. ओळख होते, वाढते, आपल्याला तो आपला वाटू लागतो. मनुष्यं प्राण्याला सगळ्यात वाईट सवय काय असेल तर कुणाला तरी काहीतरी लगेच सांगावसं वाटणे (मी तेच करतोय म्हणा आत्ता :) ) पण एखादा माणूस ओळखीचा झाला म्हणजे लगेच रहस्यं, मनातलं सांगू नये. माणसं ओळखीची असावीत पण त्यांना 'ओळखून' असावं. हसत हसत बोलणारी माणसं कधी घात करतील सांगता येत नाही. कमी बोलणारी माणसं अंतर राखून असतात, तसं रहावं. शत्रू, घात करणारा, फसवणारा परकाच हवा असं नाही आताशा, माहितीतलाच असतो हल्ली, आपण शकील बदायुनी म्हणतोय ते लक्षात ठेवायचं 'कई रूप में हैं कातिल'. खांद्यावर विश्वासानी मान ठेवावी असे किती खांदे उरलेत, 'खांदे' द्यायलाच लोक आसुसलेले आहेत.

तात्पर्य, जपून रहा. पुढच्या पत्रापर्यंत यातलंच 'मेरा गीत मेरे दिल की पुकार है, जहाँ मैं हूँ वहीं तेरा प्यार है, मेरा दिल है तेरी महफील' ऐक.   
 
--जयंत विद्वांस 

****************************************
कहीं दीप जले कहीं दिल
ज़रा देख ले आ कर परवाने
तेरी कौनसी है मंज़िल

मेरा गीत मेरे दिल की पुकार है
जहाँ मैं हूँ वहीं तेरा प्यार है
मेरा दिल है तेरी महफील

ना मैं सपना हूँ ना कोई राज़ हूँ
एक दर्द भरी आवाज़ हूँ
पिया देर ना कर आ मिल

दुश्मन हैं हज़ारों यहाँ जान के
ज़रा मिलना नज़र पहचान के
कई रूप में हैं कातिल

(बीस साल बाद, शकील बदायुनी, हेमंत कुमार, लता मंगेशकर)
*****************************************





Friday 24 July 2015

लल्याची पत्रं (२३)…'तसवीर तेरी दिलमे…'

लल्यास,  

'माया' १९६१ चा,  मी काही पाहिलेला नाही, तू ही नसशील. यातली सगळी गाणी मात्रं मला आवडतात. कोई सोने के दिलवाला, जा रे, जा रे उड जा रे पंछी, ऐ दिल कहा तेरी मंझील (ट्यान्डम), फिर एक बार कहो, जिंदगी है क्या सून मेरी जान आणि तसवीर तेरी दिलमे. तेंव्हाचे संगीतकार एकाच चित्रपटात सगळी गाणी सुरेल द्यायचे, आता एखादं गाणं चांगलं असतं, तेवढंच वाजवतात जाहिरातीत. काळानुसार आकडे बदलतात, काल 'विश्वनाथ' बघत होतो सेट म्याक्सला त्यात माहिती दाखवली, तेंव्हा सात कोटी धंदा केला शत्रू आणि घईनी आणि आत्ताच्या भावात त्याची रक्कम होते २७९ कोटी, तेंव्हा आजच्यासारखे दर नव्हते, मिडिया पब्लिसिटी नव्हती, ढिगानी थेटर नव्हती. असं पाहिलं की अशी सतत क्वालिटी देणारे लोक फार कमी पैशात वापरले गेले असं वाटतं. तेंव्हा हिट गाण्यांच्या संख्येत क्वालिटी ठरायची आता खपाच्या फिगरवर ठरते. 

'माया'ची सगळी गाणी बघ, ऐक. आज एखाद्या सिनेमात अशी एकाचढ एक सुरेल आणि हिट होऊ शकणारी गाणी आली तर काय तुफान चालेल तो सिनेमा. सलिल चौधरी किशोरकुमार बद्दल म्हणाला होता. 'रस्त्याच्या या टोकाकडून समोरच्या माणसाला हाक मारण्याइतपत त्याचा आवाज चांगला आहे'. त्यांनी त्याच्याकडून अजरामर गाणी मात्रं गाउन घेतली. पण आज एखादा गाणी देतो म्हणून तो संगीतकार असलेला माणूस एखाद्या भिकार गायकाबद्दल (या विभागातसुद्धा हिमेश रेशमिया येत नाही) तरी असं विधान करू शकेल का? कमीत कमी वाद्यात, पैशात, अपु-या साधनांत त्या लोकांनी लखलखते हिरे बाहेर काढले. आता सगळा बेन्टेक्सचा जमाना. असो. 

कृष्णधवल चित्रपटांची जादू वेगळीच बघ. खात्यापित्या घरची टमटमीत गोड माला सिन्हा आणि ग्रेगरी पेक सारखी शर्टाची सगळी बटणं लावलेला स्वत:च्या प्रेमात पडलेला माझं डोकं फिरवणारा देवानंद. त्या 'लव्हम्यारेज'मधल्या 'कहें झूम झूम रात ये सुहानी'च्या गाण्यात तर मला खूप त्रास होतो. अवखळ आणि जबराट दिसणारी चिंच माला सिन्हा लताच्या टिपेच्या आवाजात सुंदर गाणं म्हणते आणि हे येडं वर्षानुवर्षे तेच हावभाव करतंय. एकंही हिरोईन राजकुमार सारखी फटकळ नसावी? की बाबा या पक्षाघाताबरोबर मी नाही काम करणार. ते जाऊ दे, तर मला हे गाणं जाम आवडतं. काहीवेळेस एक बरं असतं गाणं चांगलं नसेल तर माला सिन्हा बघायची, चांगलं असेल तर परत परत बघायचं, देवानंदकडे नाही बघायचं आपण.

भरकटायला होतं बघ माला सिन्हा म्हटलं की. तर हे गाणं आवडायचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मागे वाजणारा अकोर्डीयन, नैनो का कजरा आणि रुक न सकेगा ला लागणारा लताचा टिपेचा आवाज आणि कडवं संपतानाचा ठेका आणि त्यानंतर तस्वीर तेरी दिल में घेताना वाजणारं अकोर्डीयन, पाण्यावर तरंग काढावेत तसं वाजतं बघ. बाकी सगळं गाणं सुंदर आहेच पण त्यातली एक ओळ मला चकित करून जाते - नैनो का कजरा, पिया तेरा गम. कधी सुचायचं आपल्याला हे असं. दु:खं टाकता येत नाही, नाकारता येत नाही, टाळता येत नाही पण त्याच्या काळ्या रंगाचा उपयोग काजळासाठी करायला प्रतिभाच हवी. काय सुंदर विचार करतात ना हे लोक.  

नुसतं लिहिणं आणि सोप्या शब्दात असं काहीतरी चमकदार लिहून जाणं यात खूप फरक आहे. चल पुढच्या पत्रापर्यंत तसवीर तेरी दिलमें……  

--जयंत विद्वांस 

 
तस्वीर तेरी दिल में, जिस दिन से उतारी है
फिरू तुझे संग ले के, नये नये रंग ले के
सपनों की महफ़िल में

माथे की बिंदीया तू है सनम, नैनों का कजरा पिया तेरा गम
नैन किए नीचे नीचे, रहू तेरे पीछे पीछे, चलू किसी मंज़िल में

तुम से नज़र जब गयी है मिल, जहा है कदम तेरे वही मेरा दिल
झुके जहा पलकें तेरी, खुले जहा जुल्फें तेरी, रहू उसी मंज़िल में

तूफ़ांन उठायेगी दुनिया मगर, रुक ना सकेगा दिल का सफ़र
यूँही नज़र मिलती होगी, यूँही शमा जलती होगी, तेरी मेरी मंज़िल में 
  
(मजरुह सुलतानपुरी, लता-रफी, सलील चौधरी, माया (१९६१))

Tuesday 21 July 2015

मुंगेरीलाल के हसीन सपने.....

अंतर्नाद आणि सप्तर्षी - दोन्ही मिळून कथास्पर्धेत पहिला क्रमांक आला तर दिवाळीला साधारण वीस हजाराची सोय होऊ शकेल. सकाळ आणि स्वरूपाचं 'साद' मासिक धन्यवाद मधलं काम आहे, सकाळनी गुढकथा स्पर्धा ठेवलीये दिवाळी अंकासाठी आणि पहिले तीन क्रमांक ते त्यात छापणार हेच मानधन समजायचं. मार्च एंडला अकौण्टन्ट लोक बिझी असतात तसे लेखक लोक दिवाळीच्या आधी बिझी असतात असं सुप्रसिद्ध लेखक (दिवाळी अंक स्पेशालिस्ट) श्रीनिवास नार्वेकर यांच्या सांगण्यावरून समजलं. 


माझं महाराष्ट्राच्या रणजीपटूसारखं आहे, झिंबाब्वे दौ-यात निवड झाली तरी त्याला भरून येतं, आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. सगळे नातेवाईक भेटायला येतात. वेळात वेळ काढून तो कुलदैवताला, सासुरवाडीला जाऊन येतो, सकाळ, प्रभात, केसरी अशा प्रचंड खपाच्या (पुण्यात) दैनिकात त्याचा त्यातल्या त्यात बरा दिसणारा फोटो आणि प्रचंड आशावादी मुलाखत झळकते. बायको ९९ एकर्सची साईट बुकमार्क करून ठेवते कारण पाठोपाठ आयपीएल निवड डोळ्यापुढे असते. यथावकाश दौरा पार पडतो. सकाळी घेतलेला हार जसा संध्याकाळी कोमेजतो तसा चेहरा दौ-यावरून परत येताना असतो. एकाच एकदिवसीय (फलंदाजीची वेळ येत नाही किंवा आली तर आत जाताना ७/८५ किंवा १२ चा रनरेट हवाय अशी परिस्थिती असते) आणि सराव सामन्यात (पंधरा ते वीसवर आउट) संधी मिळते. सगळी स्वप्नं तुटलेल्या अवस्थेत असतात. खेळण्यापेक्षा ब्यागा उचलून जास्ती दमायला होतं. मग रणजी आणि चुकून झालीच निवड आयपीएलला तर सुटतात काही पैसे नाहीतर मग डायरेक्ट निवृत्तीनंतर प्रशिक्षकपद (संजय बांगर, विजय दहियाच्या पत्रिका मिळाल्या पाहिजेत एकदा).   


मलाही अशी स्वप्नं पडतायेत लेखक झाल्यापासून (डोक्युमेंट कशी सेल्फ सर्टीफाईड लागतात हल्ली ब्यांकेत, त्याच धर्तीवर हे). मला सतत फोन येतायेत. मंजुळ आवाजाच्या बायका फोनवरून 'लिहाल का तुम्ही आमच्यासाठी' असं विचारत आहेत. मी - 'कशावर'? ती - 'तुम्ही लिहा काहीही, चालेल आम्हांला, तुमचं नाव बोल्ड टाकलं की झालं, वाचकांच्या उड्या पडतील'. त्यानंतर मी लाईटवेट होतो आणि पिसासारखा तरंगू लागतो. मी - 'कळवतो, इतक्या अंकांसाठी लिहितोय ना, रिपीट नको व्हायला विषय, माझी पीए आली की चेक करतो आणि सांगतो, हाच नंबर ना, सेव्ह करून ठेवतो, बाsssय'. सगळ्या अंगाला नुसत्या मुंग्या. दिवाळीच्या आधी रायटर्स कॉपी म्हणून माझ्याकडे टेबलावर पाचपन्नास अंक येउन पडलेत. माझी पीए रोज ब्यांकेत किती जमा झालेत ते सांगतीये. विशेष आवृत्त्यांसाठी आलेले विनंतीचे मेल्स प्रिंटआउट काढून माझ्या टेबलवर धूळ खात पडलेत आणि मी तिला सांगतोय, 'नो, आता फक्तं विश्रांती, खूप दमलोय मी, तू ही सुट्टी घे, हा तीन हजाराचा चेक तुला (तीनदा फाडला, आधी बाराचा मग दहाचा आणि साताचा).  


पण कसचं काय नी कसचं काय. असलं काहीही घडणार नाही पण स्वप्नं बघायला काय हरकत आहे मी म्हणतो. आणि समजा लागलंच बक्षीस आणि समजलं आधी तसं तरी मी आधीच कर्ज काढून खर्च करणार नाहीये. कारण मागचे अनुभव बघता पैसे साधारण होळीच्या आसपास मिळतात अशी वहिवाट आहे. ते ही तुम्ही मागे लागलात तर नाहीतर मागे पडता तुम्ही. अर्थात मूळ हेतू पैसे मिळविणे हा नसतो म्हणा. आधी नाव व्हायला हवं मग पैसे न मागता मिळतात हे खरं. बाकी तोपर्यंत मुंगेरीलाल अजरामर…… 

--जयंत विद्वांस  




Thursday 16 July 2015

विनोदी नटसम्राट.....

पंधरा एक वर्ष झाली. माझ्या नात्यातल्या दोन माणसांनी काम केलेल्या हौशी संचाचा 'नटसम्राट'चा प्रयोग होता चिंचवडला. मी दत्ता भट, लागूंचं पाहिलंय. त्यामुळे ते डोक्यात फिट होतं. याचा अर्थ नविन बघायचं नाही, असं नाही. तुलना नकळत होतेच पण ती बाजूला ठेऊन ही बघता येतं. तर त्यांचे आधी साताठ प्रयोग झाले होते. पास मिळत असतानाही मी आणि बायको पुढचं तिकीट काढून गेलो होतो. कुणी हौसेपोटी पदरमोड करून काही करत असेल तर आपण तोशीस लावून घ्यायला हवी असं माझं मत. सगळी कलाकारांच्या ओळखीतली माणसं होती आलेली प्रेक्षक म्हणून. एखाद दुसरा बाहेरचा जाहिरात बघून आलेला. जेमतेम पन्नास माणसं असतील. पहिल्या तीन रंग कशाबशा भरतील एवढी.

एकतर नाटक अर्धा तास उशिरा चालू झालं तिथेच माझं डोकं फिरलं होतं. इतर पब्लिकही लग्नाला जमतात तसे ग्रुप करून गप्पा मारू लागलं होतं एव्हाना. नाटक सुरु झालं. सेट फार नव्हताच. माझ्या मेव्हण्यानी त्यात बेलवलकरांच्या मुलाचं आणि भाचीनी मुलीचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या एन्ट्रीला मी टाळ्याही वाजविल्या. पहिल्या पंधरावीस मिनिटात लोकांना कलाकारांची कुवत समजल्याने कुजबुज सुरु झाली. मग चुका दिसायला सुरवात झाली. मला स्वत:ला स्टेज फिअर आहे त्यामुळे कुणी मॉबसमोर काही सादर करत असेल तर मला त्या माणसाचं कौतुक वाटतं. पण काही गोष्टी प्रेक्षक म्हणून जशा मला कळतात तशा त्या कलाकार म्हणून स्टेजवरच्या माणसालाही कळायला हव्यात. 

तुम्ही उभी करत असलेली व्यक्तिरेखा आणि तिचं नाटकातलं वय, दाखवलेली शैक्षणिक पात्रता, इतर व्यक्तिरेखांशी असलेलं नातं, त्यानुसार बदलणारा टोन, त्या पात्राचा आब दिसायला हवा. सगळेच कलाकार गप्पा मारतो तसे क्याजुअल संवाद म्हणत होते त्यामुळे सगळा सिरीयसनेस संपला. मुलगा नाटकात फोन करतो, जुन्या काळातला बोट घालून फिरवायचा काळा फोन. एकतर त्यानी चारपाच वेळाच ती तबकडी फिरवली आणि ती जागेवर यायच्या आत त्यानी बोलायला सुरवात केली त्यामुळे पब्लिक नकळत हसायला लागलं. त्याकाळी फोन एवढे फास्ट लागायचे का? त्यांच्या घराचा सेट होता, वेगळा दरवाजाही दाखवला होता म्हणजे विंग ही भिंत गृहीत धरायला हवी. सगळी पात्रं विंगेतून जा ये करत होती, दरवाजा त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. 

नटसम्राटाचं काम करणारा आमचा निळूभाऊ काय तो सगळ्या जाणीवा शाबूत असलेला होता. चोख पाठांतर, ब-यापैकी अभिनय, वयाचं, भूमिकेचं बेअरिंग असलेला. बाकी सगळ्यांनी मिळून मात्रं त्याला पार झोपवला. बरेचवेळा पात्रं संवाद विसरायची आणि रसभंग व्हायचा. सरकारचं काम करणारी निर्मात्याची पत्नी होती. ती मधूनच वाकून चालायची, थरथरत्या आवाजात संवाद म्हणायची, ते लक्षात नाही राहिलं की सरकार एकदम तरुण व्हायच्या आणि अप्पासाहेबांनी म्हातारपणात दुसरा विवाह केला की काय अशी बघणा -याला शंका यायची. त्या नाटकातली स्वगतं ऐकताना अंगावर काटा येतो, नैराश्यं येतं त्यांची असहाय्य अवस्था बघून. खूप काळ इफेक्ट रहातो एवढी ती परिणामकारक आहेत. त्या सगळ्याची माती झाली. 

निळूभाऊ अतिशय तन्मयतेने सुरु झाले. दोन स्पॉटलाईट होते. वरचा माणूस नवखा असावा. काहीतरी गडबड झाली त्याची. निळूभाऊ उभे होते त्याच्या उलट्या बाजूचा स्पॉटलाईट लावला त्यानी. याला स्टेज वरून सांगता पण येईना, वरचा ठोंब्या वैरी असावा. तरी एकदा स्वगत थांबवून त्यानी वर हात केला, 'ऑन होत नाहीये, तेच करतोय' हे सगळ्या थेटरला ऐकायला गेलं. निळूभाऊ समंजसपणानी दुस-या चालू असलेल्या स्पॉटलाईटखाली गेले आणि स्वगत चालू केलं. वरच्या पठ्ठ्यानी दोन्ही चालू केले, चूक लक्षात आल्यावर जिथे नटसम्राट उभे होते, तोच बंद केला. निळूभाऊ प्रवासी स्वगत म्हणत होते. बरं हे एकदा झालं तर ठीक, सगळ्या स्वगताला 'हा खेळ सावल्यांचा'. पब्लिक लोटपोट इकडे. सगळ्यात हाईट म्हणजे निर्मात्याची मुलगी होती पाचेक वर्षांची. 'सरकार' तिची आई. त्यामुळे ती चार ते पाच वेळा एका विंगेतून आली आणि स्टेज वरून पलीकडच्या विंगेत गेली. 

यथावकाश धापा टाकत नाटक संपलं. सगळ्या कॉमेंटस आणि हशे सांगण्यात हशील नाही. मला निळूभाऊचं खूप वाईट वाटलं. नाटक संपल्यावर त्याला भेटलो आणि अभिनंदन केलं. हिरमुसल्या चेह-यानी त्यानी ते स्विकारलं. हौस असावी पण आपण त्या कलाकृतीचा, नाटककाराचा अपमान करतोय याचीही जाण असावी. 

--जयंत विद्वांस  
 
 

सु.ब.क. .....

का जगतोय अजून आपण? कधी संपणार हे सगळं? गेली पंचवीस वर्ष हा प्रश्नं सुभाषला रोज पडायचा आणि उत्तर न सापडल्याने परत पडण्यासाठी उद्यावर जायचा. सुभाष बळवंत कवठेकर. लहानपणापासून मी त्याला ओळखतोय. माझ्याच वयाचा तो. एकाच वर्गात, कॉलेजात आम्ही शिकलो. कॉलेजमध्ये त्याला त्याच्या आद्याक्षरांवरून 'सुबक' नाव पडलं. टोपणनाव सोडलं तर आयुष्यात कसलाच सुबकपणा नव्हता त्याच्या. कसलंही ओढ नसलेलं आयुष्यं जगला आणि जगतोय. त्याच्या जगण्याला 'जगतोय' म्हणणं सुद्धा क्लेशकारक आहे, ओढतोय, ढकलतोय म्हणायला हवं. 

आम्ही एकाच वाड्यात रहायचो. त्याचे वडील बँकेत शिपाई होते. नोकरीची शेवटची साताठ वर्ष शिल्लक असताना त्यांनी तेंव्हा गावाबाहेर असलेल्या बिबवेवाडीला ब्लॉक घेतला आणि आम्ही दूर झालो. पण कॉलेजात आम्ही भेटायचो रोज. सुभाष होता मात्रं हरहुन्नरी. कॉलेजात असताना त्याच्याइतके व्याप कुणालाच नसायचे. तो साहित्यं, नाटक, टेबल टेनिस या आणि अशा अनेक समित्यांचा प्रमुख असायचा. साडेपाच फुटाची उंची, किडकिडीत शरीरयष्टीमुळे अजूनच उंच वाटायची, तेंव्हाच विरळ होत चाललेले आणि त्यामुळे वारा असो न असो, भुरभुरणारे केस, हडकुळेपणा झाकण्यासाठी घातलेले ढगळ कपडे (ज्यानी तो अजूनच विचित्रं दिसायचा), खांद्याला कायम समाजवाद्यांसारखी एक शबनम आणि रोजच्यारोज केलेल्या दाढीमुळे गुळगुळीत दिसणारा चेहरा असा सगळा अवतार होता. 

मी कॉमर्सला आणि तो आर्ट्सला होता. त्यात त्यानी जर्मन घेतलेली सेकंड ल्यांग्वेज आणि मेन सब्जेक्ट इंग्लिश लिटरेचर. त्याला एमेएमेड करायचं होतं आणि नंतर प्राध्यापकी. पण तो इंग्लिश मात्रं झकास बोलायचा, आम्हांला बोलायला भाग पाडायचा, तेंव्हा आम्ही त्याची खूप टर उडवायचो पण तो सराव करत राहिला आणि मराठीत विचार करून ट्रान्सलेटेड इंग्लिश नाही बोलायचा तो, जे बोलायचा ते अस्खलित इंग्लिश, आम्ही तिथेच राहिलो त्या बाबतीत, शब्दं शोधणारे, क्रियापद चुकणारे आणि शेवटी हिंदीवर मग मराठीवर येणारे. सुभाषमधे अनेक गुण होते. तो बासरी, हार्मोनियम सुंदर वाजवायचा, ती ही कुठेही न शिकता. बासरी फुंकताना जे काय त्याचे गाल फुगीर दिसायचे तेवढेच.

आम्ही दोघंही ग्राज्यूएट झालो आणि वाटा वेगळ्या झाल्या. मी वशिल्यानी बँकेत लागलो आणि त्यानी एमएला प्रवेश घेतला. भेटीगाठी कमी झाल्या. एखाद्याच्या आयुष्यात अमुक एक गोष्टी का घडतात याला काहीही उत्तर नाही. एमएचं पहिलं वर्ष अर्ध झालं होत नी त्याचे वडील रिटायर्ड झाले. पीएफ, ग्राच्यूईटी कर्जात वळती झाली, तरी पाच पन्नास हजार कर्ज शिल्लक होतं म्हणून ज्या काय किडूकमिडूक एफड्या होत्या त्याच बँकेत त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून ते मिटवून टाकलं. याला नोकरी करणं गरजेचं होतं आता, पेन्शन अशी कितीशी येणार. तरी सुभाष सायकलवर जायचा सगळीकडे, व्यसन कुठलंच नव्हतं, त्यामुळे तो ही खर्च नाही, त्यानी मग चहा पण सोडला. पहिलं वर्ष झालं आणि त्याचे वडील गेले. आईही आता थकली होती त्याची. सुभाष एकतर उशिरा झालेलं अपत्यं होतं त्यामुळे तो एकटाच होता. हा जेमतेम एकवीस बावीस आणि आई पासष्ठीची. 

साडेसाती साडेसात वर्ष असते असा समज आहे. सुभाषला बाविसाव्व्या वर्षी लागली ती आजतागायत आहे. त्यानी एका फाईव्ह स्टार हॉटेलमधे संध्याकाळी पार्ट टाईम जायला सुरवात केली. इंग्लिशचा त्याला झालेला हा एकमेव फायदा. त्यात त्याच्या आईला प्यारालीसीस झाला आणि सुभाषच्या शिक्षणाला आणि आयुष्याला पण. हॉस्पिटलखर्च त्याच्या आवाक्याबाहेरचा होता. लोक मदत तरी किती करणार. त्याच हॉटेलने त्याला एकरकमी ते पैसे दिले, एवढाच काय तो दिलासा. आईला वरचेवर फ़िजिओथेरपीला न्यावं लागायचं त्यामुळे याने कायमची नाईट शिफ्ट घेतली. करन्सी एक्स्चेंजचं जबाबदारीचं काम याच्याकडे होतं. त्यामुळे संध्याकाळी सहाला जायचा ते सकाळी निघायला त्याला आठ व्हायचे. 

हा हा म्हणता बारा वर्ष अशीच गेली. दिवसभर आईचं करून, थोडी झोप घेऊन तो हॉटेलात निघायचा. कुणाकडे जाणं येणं नाही, हौस मौज नाही, सगळं कसं साचल्यासारखं झालं होतं. आयुष्याचं डबकं झालं पार त्याच्या. कसली हालचाल नाही, नुसतं शेवाळं. तुटपुंजा पगार, आजारी आई, सततची आर्थिक विवंचना, कर्ज, वाढतं वय, कायमची नाईट शिफ्ट या सगळ्यानी सुभाषचा 'पा' झालाय पार. तो पस्तिशीत असताना आई गेली आणि तो सुटला. सगळी उमेद संपली होती, प्राध्यापकी नाही आणि काही नाही. कसबसं त्यानी एमए पूर्ण केलं होतं एवढंच. लग्नाचा विचार करायला त्याला कधी उसंतच मिळाली नाही आणि आता विचार करायची त्याची इच्छाही नव्हती.         

परवाच त्याला भेटलो ब-याच महिन्यांनी. दोघांनाही सुट्टी होती, चारपाच तास बसलो होतो गप्पा मारत निवांत. माझ्याच वयाचा असूनही आपण एक वयस्कं माणसाशी बोलतोय असं वाटत होतं. दोघंही आता चाळीशी ओलांडून पन्नाशीकडे धावतोय. तो खूप मनापासून बोलला, मनातलं बोलला. म्हणाला, ' मी का जगतोय माझं मलाच कळत नाही. रहायला स्वत:चं घर आहे एवढाच आनंद आहे बघ आयुष्यात. मला कुठलं व्यसन नाही. ना बायको न पोरबाळ, न नातेवाईक, न फार मित्रं. मला कुणाकडे जायला वेळ नव्हताच कधी, माझ्याकडे कोण येणार मग. जागरणानी चष्मा सोडयाच्या बाटलीच्या काचेचा झालाय, त्यामुळे वाचन होत नाही. अरे कित्त्येक वर्षात मी नाटक, सिनेमा सोड साधा घरी आल्यावर टीव्ही पाहिलेला नाहीये. तो चालू आहे का बंद ते ही बघावं लागेल. वर्तमानपत्रं एवढंच वाचन शिल्लक राहिलंय.'

'तुला सांगतो, काय काय स्वप्नं होती रे माझी. मला सूट घालून फर्ड इंग्लिश बोलायचं, शिकवायचं होतं. एकदा सगळ्यांना म्हणजे कुटुंबाला घेऊन इंग्लंडला जाऊन शेक्सपिअरचं थडगं बघायचं होतं. त्याच्या नाटकांवर मला पीएचडी करायची होती. आई रडायची रे सारखी. मी जिवंत आहे म्हणून तूला जगता येत नाही म्हणायची. पण मला उलट वाटायचं नेहमी. आपल्यामुळे याचं आयुष्यं नासतंय याचं तिला वाटणारं दु:खं माझ्या दु:खापेक्षा मोठं होतं. ती सतत ती सल घेऊन जगली शेवटचा काळ. ती  गेल्यावर मी रडलो नाही कारण तिची त्या शल्यंयुक्तं जगण्यातून सुटका झाली याचा आनंद मोठा होता मला. घर कसलं रे पाठ टेकायला येतो इथे. इथे येण्याचा आनंद होत नाही मला, उलट कामावर जायचा होतो. इथे कोण वाट बघतंय, तिथे पाच मिनिट उशीर झाला तर निदान लोक विचारतात तरी, बरं वाटतं तेवढंच', डोळे मिचकावत तो म्हणाला. 

'आउटडेटेड झालो रे मी, एकंच काम करत राहिलो. नवीन काही शिकता आलं नाही. आता काळ पुढे गेला. इंग्लिश बोलणारी, फटफटा कॉम्प्युटर चालवणारी तरुण मुलं मुली ढिगानी आलीत रे आता. मी सोडली नोकरी तर त्यांचं काही अडणार नाहीये. प्रामाणिकपणा आणि सुट्टी नाही याच गुणांपोटी मी आहे अजून तिथे. काय गंमत असते बघ, मी कुठे जाणार आहे सोडून म्हणून ते निर्धास्तं आहेत आणि त्यामुळे मी ही. सुट्टी घेऊन करू काय, कुठे जाणार, सवयंच नाही रे कधी. जाग्रण, शारीरिक, मानसिक उपासमार आता डोकं वर काढतीये पण. हल्ली थकल्यासारखं होतं लगेच. अजून चार एक वर्ष करेन नोकरी. फंड, ग्राच्युईटी, सेव्हिंग सगळं धरून वीस एक लाख होतील, या ब्लॉकचे येतील पंचवीस. पन्नास धर अंदाजे चार वर्षांनी. आहे कोण रडायला मागे माझ्या. परवा एका वृद्धाश्रमाची जाहिरात वाचलीये. महिना पंधरा हजार घेतात. तेंव्हा वीस घेतील कदाचित. नऊ टक्के व्याज धर, तरी साडेचार लाख येतील वर्षाला, यांना दोनचाळीस गेले तरी दोनेक उरतील आजारपण, औषधासाठी. मेल्यावर सगळे पैसे त्यांना आणि अनेक आश्रमांना देऊन टाकेन. इंग्लंडला जाऊयात? मी काढतो तुझं तिकीट पण एकदा शेक्सपिअरच्या थडग्याजवळ बसून येउयात, सुखाने मरेन बघ'. 

मला काही अप्रूप नाही शेक्सपिअरच्या थडग्याचं पण जाउन येईन म्हणतो त्याच्या बरोबर. कधी कधी वाटतं, क्षुल्लक संकटांनी, अडचणींनी संसाराचा व्याप नकोसा होतो आपल्याला, सगळं व्यर्थ वाटतं पण सुखाच्या कणभर शिडकाव्यानी परत जगावंसं वाटतं. कुठल्यातरी सुखाच्या अपेक्षेनी जगत रहातो आपण, मुलाबाळांच्या आनंदात हरवतो, वाढलेल्या वयाच्या जाणीवेनी खंतावतो पण निदान रोज काहीतरी घडतं आयुष्यात. सुभाषचं जगणं काय जगणं नाही. त्याच्याकडे पाहिल्यावर आपलं आयुष्यं खूप सुखाचं वाटू लागतं.

पन्नाशीतच वृद्धाश्रमात जाणारा नव्हे नाईलाजानी जाणारा सुभाष. त्याचं त्यानंतरचं आयुष्यं तरी 'सुबक' जावो, अजून काय म्हणणार.   

--जयंत विद्वांस 

(मागच्या वर्षी इंटरव्ह्यूला माणूस आलेला. बीए (इंग्लिश), जर्मन, रशियन यायचं, फ्ल्यूट, हार्मोनियम वाजवायचा, चेस च्याम्पिअन होता कोलेजमधे, ट्रान्सलेटरचं काम केलेलं आणि हॉटेलला नोकरी - गेली वीस वर्ष नाईट शिफ्ट, कारणं हीच जवळपास, राहतं घर आहे, पंचेचाळीशीचा तो माणूस अजून आठवतो मला. पाठ दुखते, डोळे चुरचुरतात म्हणाला हल्ली, त्यांनी जॉब सोडा सांगितलंय नाईट नको असेल तर. मी शिकेन म्हणाला अकौन्टस. आपण खूप सुखी आहोत.)