Thursday 24 October 2013

मन्ना डे


भारतीय सिनेसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातला राहुल द्रविड म्हणजे मन्ना डे. प्रत्येक मोठ्या हिरो साठी त्यांनी आवाज दिलाय पण तरीही 'ते फक्त शास्त्रीय बेस गातात', 'विनोदी गाण्यांसाठीच ते जास्त सूट आहेत' असं लेबल लाऊन त्यांना कायम दुर्लक्षित ठेवण्यात आलं. जो आवाज महमूद ला शोभला तोच राज कपूर ला आणि तोच राजेश खन्ना ला ही. पण पडद्यावरच्या व्यक्तिरेखे प्रमाणे आपण लेबल लाऊन मोकळे होतो. लगेच लो ग्रेड होते. 

बलराज सहानी - ए मेरी जोहराजबीं, ए मेरे प्यारे वतन, तू प्यार का सागर है; प्राण - क़समें वादे प्यार वफा सब, यारी है इमान मेरा, राज कपूर - ये रात भीगी भीगी, आजा सनम, लागा चुनरी मैं दाग; ए भाय जरा देखके चलो, आगा - फुल गेंदवा ना मारो; महमूद - मै तेरे प्यार मै; एक चतुर नार करके सिंगार, राजकुमार - हर तरफ अब यहीं अफ़साने हैं; अशोक कुमार - पूछों ना कैसे मैंने रैन बिताई. काळ्याकुट्ट अशोक कुमारची विषण्णता गाण्यातून पण अंगावर येते. आणि चक्क अमिताभ साठी ये दोस्ती…एका पेक्षा एक सरस गाणी. अलीकडचच प्रहार मधलं 'हमारी ही मुट्ठी में आकाश सारा' ऐका. प्रार्थना आहे हे सांगावं लागत नाही इतका धीरगंभीर आवाज आहे. ही गाणी जेवढी त्या अभिनेत्यांची तेवढीच ती मन्नादांची म्हणून ओळखली जातात हाच कदाचित त्यांचा दोष असेल. दादासाहेब फाळके पुरस्कार जाणीवा शाबूत असताना त्यांना मिळाला हे त्यांचं भाग्यच म्हणावं लागेल. 

आजा सनम, ये रात भीगी भीगी, लागा चुनरी में आणि यारी हैं मी कितीही वेळा ऐकू शकतो. अभिनेता पण चांगला लागतो त्यासाठी. यारी हैं ला प्राण ने २००% न्याय दिलाय तेवढाच न्याय राज कपूर ने लागा चुनरी में दाग ला दिलाय. शेवटचा तराना म्हणताना आरके चे फक्त ओठ हलत नाहीत तर शब्द ही बाहेर येतात, अर्थात आरके ला सुद्धा संगीताची  अफाट जाण होतीच. मन्नादांचं नशीबच फुटकं आपल्या द्रविड सारखं. आरके ला मुकेश चा आवाज आवडला आणि सूट पण झाला. त्यामुळे मन्नादा मागे पडले. तरीही ए भाय जरा देख के चलो साठी हाच आवाज लागला कारण शेवटच्या तीन ओळी फक्त मन्नादांनीच गाव्यात. 'बिना चिड़िया का बसेरा हैं' हे थेटर च्या अंधारात ऐकताना ही काटा येतो अंगावर. तो निर्मनुष्य तंबू त्या आवाजामुळे अजूनच भयाण वाटतो. या शिवाय छम छम बाजे रे पायलिया, झनक झनक तोरी बाजे पायलिया, प्यार की आग में, ज़िंदगी कैसी हैं पहेली हाए, कौन आया मेरे दिल के द्वारे, तेरे नैना तलाश कर जिसे आणि दिल की गिरह खोल दो सारखी अनेक युगुल गीतं.                        
किशोर, मुकेश, रफी आणि मन्नादा ही सुरेल चौकडी होती. हेमंत कुमार, तलत ही मंडळी ही होतीच पण ही चौकडी महान होती. एक एक करत सगळे गेले. मन्नादा शेवटचा मालुसरा. चौकडीत प्रत्येकाची काही ना काही खासियत होती. मन्नादांची आठवण मात्र फक्त शास्त्रीय बेस किंवा विनोदी गाण्यांसाठीच व्हावी हा विरोधाभास अनाकलनीय आहे. अनेक भाषांतून हा माणूस गायलाय. यादी काढली आठवली तर कित्तीतरी सुरेल गाणी देत येतील. पण वरची गाणी मनात घट्ट रुतून आहेत. मन्नादा म्हटलं की ही गाणी डोळ्यांपुढे हजर होतात, कानात वाजू लागतात. त्यांची मराठीतली काही गाणी सुद्धा लक्षात राहण्यासारखी आहेत. अ आ आई,  गोपाला गोपाला देवकीनंदन, घन घन माला नभी, हाऊस ऑफ बॅम्बू, होम स्वीट होम अशी बरीच. या शिवाय भजनं आणि चित्रपट व्यतिरिक्त ही बराच गायलेत मन्नादा. त्यांनी हरिवंश राय बच्चन यांचं 'मधुशाला' खूप सुरेख गायलंय.     

ही सगळी मोठी माणसं. केवळ अंगातल्या कलेमुळे नाही गाजली तर विनम्र स्वभाव, एकमेकांबद्दल आदर आणि निरोगी स्पर्धा यामुळे गाजली. 

बसंत बहार मध्ये त्यांना भीमसेन जोशींबरोबर केतकी गुलाब जुही हे गाणं होतं. पडद्यावर मक्ख चेहऱ्याच्या भारत भूषणला मन्नादांचा आवाज होता आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याला पं. भिंसेन जोशींचा. चित्रपटाच्या कथेनुसार भारत भूषण जिंकतो. झालं. मन्नादा काही केल्या रेकॉर्डिंग ला यायलाच तयार होईनात. पडद्यावर का होईना पण भीमसेन जोशींना हरवायचं??? छ्या!!! 'मी येणार नाही' असं सरळ कळवून टाकलं त्यांनी. शेवटी भीमसेनजींनी समजूत काढली - अहो हे खोटं आहे. या तुम्ही. अत्यंत नम्रतेने हा माणूस त्या रेकॉर्डिंग ला गेला.      

आता मन्नादा ही नाहीत आणि भीमसेन ही नाहीत. मुळात ती विनम्रताच आता नाही. सभ्य कलाकार हा शब्दही आता दुर्मिळ आणि माणसंही.   

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment