८३ च्या वर्ल्डकपला नाकाशी सूत धरण्याची वेळ आली होती झिम्बाब्वेविरुद्ध त्यावेळी नवव्या विकेटकरीता कपिल देव बरोबर नाबाद एकशेसव्वीसच्या भागीदारीचं गाठोडं बांधायला हाच उभा होता. ८३ च्या वर्ल्ड कपला त्याला बेस्ट कीपरचं अवार्ड मिळालं होतं. रामानी सेतू बांधताना ज्या खारीच्या पाठीवर हात फिरवून डिझाईन काढलं त्यांच्या वंशातली अनेक लोकं आजूबाजूला दिसतात, ते बिचारे आपली कामं करत असतात, कुणी कौतुक करो न करो, श्रेय मिळो न मिळो, रामाचा एकदा हात फिरलाय पाठीवरून यांना हाच आनंद मोठा, याची उत्तम उदाहरणं म्हणजे आपला किरमाणी, यशपाल शर्मा आणि न्यूझीलंडचे गेविन लार्सन आणि ख्रिस हरीस. तीस चाळीस रन हमखास करतील, एक बाजू लावून धरतील, ओव्हर्स खेळून काढतील, पार्टनरशिप करतील, ओव्हर्स टाकतील, फिल्डिंग करतील, व्यवस्थित क्याचेस घेतील बट नथिंग मि-याक्युलस. हेच त्यांचं दुर्दैव. एकदा तुम्ही स्वामी समर्थ झालात की आयुष्यं भर लोकांना सांगायचं 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे'. हे कायम मागेच उभे त्यामुळे.
मिशी ठेवलेल्या गावस्करच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्ड सिरीज खेळलो होतो आणि जिंकलोही होतो. त्यात बॉर्डरचा भन्नाट झेल घेताना त्याचा पाय वाईट्ट दुखावला गेला आणि त्याला राहिलेल्या सामन्यात बाहेर बसावं लागलं आणि मग कायमचंच घरी बसावं लागलं. सदानंद विश्वनाथ तरुण होता, तो जास्तं फीट होता. संदीप पाटीलच्या 'कभी अजनबी थे' मधे त्यानी छोटासा रोल केला होता. पण सज्जन माणूस, उगाच वादविवाद नाहीत, स्लेजिंग नाही, आपलं काम भलं नी आपण भलं.
हिलीच्या देशात जन्माला आला असता किंवा आपल्याकडे बॉलरची रेलचेल असती तर किरमाणी त्याच्यासारखे किंवा इतर यशस्वी कीपरसारखे आकडे बाळगून असता. काही म्हणा, योग्यं ठिकाणी आणि योग्यं वेळी जन्माला येणं याला सुद्धा नशिब लागतं आणि असलं समजा नशिबात तरी फायदा घेता येतोच असंही नाही म्हणा (भेटा अथवा लिहा - विनोद कांबळी).
--जयंत विद्वांस
No comments:
Post a Comment