Friday, 13 March 2015

the vulture is a patient bird - James Hadley Chase

खूप दिवसांनी चेस वाचला. ८३-८४ च्या आसपास भानू शिरधनकर यांचं याचंच अनुवादित 'गिधाडांची जातच चिवट' वाचलं होतं. स्टोरी लक्षात अजिबात नव्हती पण चेस वाचावा असं याच पुस्तकामुळे डोक्यात फिट्ट बसलं होतं. 'शेवटपर्यंत चेस खिळवून ठेवतो' या वाक्यात नाविन्यं काहीही नाही. कृष्णा शाहच्या 'शालीमार' पिक्चरची थीम यावरून घेतली असावी असं वाटतंय. फक्तं एंड वेगळा. मानवी स्वभावाचे नमुने पेश करण्यात चेसचा हातखंडा आहे, एकाच माणसाची बदलती रूपं तो सरस दाखवतो. पुस्तकाचा एंड फास्ट उरकल्यासारखा आहे, १९६९ म्हणजे कदाचित त्याच्या सुरवातीच्या काळातलं पुस्तक असावं असा माझा समज आहे. 

पांगळा अब्जाधीश स्वतचं अंडरग्राउंड म्युझिअम राखून आहे. शे एकरात पसरलेली इस्टेट, तिचा सांभाळ करणारे झुलू, इलेक्ट्रानिक करामती असलेलं म्युझिअम  (तेंव्हा ६९ ला सी.सी.टी.व्ही.म्हणजे इंग्रज खरंच प्रगत होते) आणि त्यात ठेवलेल्या अनेक मुल्यंवान वस्तूंपैकी एक सीझर बोर्गिया अंगठी. जिच्यामध्ये विष भरता येतं आणि हस्तांदोलन करताना समोरच्याला ते टोचून जीवे मारता येतं. यानेही ही रिंग चोरलेलीच आहे. मूळ मालकाला ती परत ताब्यात हवीये. 

अर्मो शालिक कडे ते काम आलंय. तो चौघांची टिम तयार करतो. प्रत्येक पात्रं कोरून काढल्यासारखं चेस उभं करतो. ती माणसं आपल्या ओळखीची आहेत, आपण त्यांना कुठेतरी पाहिलेलं आहे (चेह-यानी नाही, गुणावगुणांनी) असं वाटू लागतं. नेहमीप्रमाणे एक कमनीय बाई आहे, दिलदार मित्रं आहेत, गुलामगिरी भिनलेले आहेत, उलट्या काळजाचे लोक आहेत जे एखाद्या क्षणी हळवे होतात आणि आपल्यालाही हळवं करतात. तर इथेही चेसच्या ब-याच पुस्तकांप्रमाणे वेलप्लान्ड उद्योग सक्सेसफुल होत नाही. पण गंमत त्यात नाहीये . 


ते चौघं चोरी करायला येणार हे त्या विक्षिप्त माणसाला आधीच माहित असतं, मग सुरु होतो उंदीर मांजराचा खेळ. तो त्यांना प्रवेश करू देतो पण जाणं त्याच्या मर्जीनुसार आहे. रिंग घेऊन जायची परवानगीही देतो आणि मग सुरु होतो पाठलाग. इन्कारमधे कसा अमजद पळतो आणि मागे विनोद खन्ना त्या धर्तीवरचा. कुणाच्या नशिबात काय लिहून ठेवलंय हे सांगता येत नाही. काहीही घडणार नाही याची खात्री असताना अनपेक्षित काहीतरी घडेल या आशेवर तर आपण जगत असतो. किती मरतात, किती जगतात? रिंग कुणाला मिळते? ज्याला मिळते त्याला लाभते? कुणाचं भाग्यं फळफळतं? 'But Reader is a IMpatient Bird' वाचकांची जातच चिवट. :)  

--जयंत विद्वांस

Monday, 9 March 2015

वन्स अपॉन अ टाईम (१३).....

शस्त्रानी दाखवली जाते ती भीती आणि नजरेने बसते ती दहशत. तो तसाच होता. त्याच्या पळण्यात, तिरक्या बॉलिंग रनपमधे दहशत होती. त्याचा बाउंसर खतरनाक होता. साडेसहा फुटाच्या वेस्टइंडियन बॉलरमधे हा पाच फूट अकरा इंच म्हणजे बुटकाच वाटायचा. माल्कम मार्शलचा राग येईल इतका तो फास्ट होता. एवढं असूनही भारतीयच नव्हे तर समस्तं क्रिकेट जग अजूनही वेस्टइंडियन क्रिकेट बद्दल ममत्वं राखून आहे कारण जिगरबाज, खुल्या दिलाची माणसं होती ही सगळी. खेळाची मजा लुटणारे फक्तं तेच एक होते, बिनधास्तं खेळायचे सगळे. 
 
१९८३च्या वर्ल्डकप पराजयानंतर विंडीज आपल्याकडे आलेली. धुमसत होते नुसते, वर्ल्डकपची हातातोंडाशी आलेली ह्याट-ट्रिक आपल्यामुळे गेली होती. आपल्या गल्लीत येउन त्यांनी आपल्याला मरेस्तोवर मारले अगदी. त्यांनी पाच टेस्टमधे ३-० (दोन अनिर्णीत) आणि वनडेमधे ५-० धुतलं आपल्याला. माणसाची महानता आकड्यांवर कधी बघू नये, समोर कोण होतं, परिस्थिती काय होती त्यावर ठरवावी. महानता समजण्यासाठी, उजेडात येण्यासाठी प्रतिस्पर्धी पण तगडा असावा लागतो, तुमची महानता उजळायला त्याची मदतच होते. गावसकर विंडीजचा त्याअर्थानी ऋणी आहे, असायला हवा. गावसकरनी दिल्लीला ब्र्याडमनला इक्वल केलं होतं त्या सिरीजला आणि मद्रासला ओव्हरटेक. इक्वलचं एकोणतिसावं शतक मी पाहिलंय. हेल्मेट नाही, मार्शल राउंड द विकेट यायचा. गावसकरनी ब-याच कालावधीनंतर हूक मारत चौकार मिळवले होते. स्वत:च्या स्टाईलला काळिमा फासत त्यानी ९४ चेंडूत शतक काढलं होतं (त्याचं सगळ्यात जलद). समोर वेन ड्यानिअल, विन्स्टन डेविस, होल्डिंग आणि मार्शल. मार्शल, होल्डिंग समोर जलद शतक काढणं म्हणजे खायचं काम नाही. गावसकरला इझीली मिळालं नाही म्हणून तो महान आणि ते इझीली मिळू दिलं नाही म्हणून तेच मार्शललाही लागू. 

त्या दौऱ्यात त्यानी ३३ विकेट्स घेतल्या. फक्तं बाउंसर टाकून विकेट नाही मिळत. तो दोन्ही स्विंग, इनस्विंगिंग यॉर्कर, लेगकटर पण टाकायचा. आधी तो तिरका रनप, मग वेग, मग स्विंग. आउट होणं किंवा धाव घेऊन समोर उभं रहाणं या दोन गोष्टीच सुखकारक होत्या. एकतर त्या टीममधे चार ते पाच आग्यावेताळ एकावेळी खेळायचे, त्यात दुस-याला पडायच्या आधी डल्ला मारल्यासारख्या विकेट पदरात पाडून घ्याव्या लागायच्या. न कुथता त्यानी ८१ टेस्ट मधे ३७६. १३६ वनडेमधे १५७ आणि फर्स्ट क्लास मधे २१७२ विकेटस काढल्यात. वाचून छाती दडपायला होते. त्याच्या डेब्यू म्याचला तो ब्याटिंग करत असताना वेंगसरकर स्लीप मधून काहीतरी लागेल असं त्याला बोलला, ती खुन्नस त्याने जाहीरपणे शेवटपर्यंत ठेवली. तो पळत यायचा तेंव्हाच जीव घेतो की काय फलंदाजाचा असं वाटायचं. माईक ग्याटिंगचं नाक मोडलं होतं त्यानी बाउंसरवर, मार्शलला त्याच्या नाकाच्या हाडाचा तुकडा चेंडूला चिकटलेला  मिळाला असं वाचलंय.


पण माणूस चांगला होता. तेंव्हा बंदी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला जाणा-या बंडखोर विंडीज टीममधे सहभागी होण्यासाठी दहा लाख युएस डॉलर्स नाकारणारा मार्शल. त्याला कर्करोग झाला. शेवटी चार नोव्हेंबर नव्याण्णवला वयाच्या अवघ्या एक्केचाळीसाव्या वर्षी तेंव्हा कसबसं पंचवीस किलो वजन भरेल असा नशिबापुढे हतबल झालेला बावीस यार्डातला टेरर माल्कम मार्शल शेवटचा आउट झाला. 
 
--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (१२).....

क्रिकेटवर प्रेम करणा-या लोकांना हेरोल्ड डेनिस बर्ड एवढ्या नावावरून अंदाज येईल कोण असेल ते पण 'डिकी' बर्ड म्हटलं की तो टोपी घातलेला सज्जन अंपायर कसा झटकन डोळ्यासमोर येतो. अम्पायरिंग हा खरं तर थ्यांकलेस जॉब. पण डिकीनी मिळवलेला रिस्पेक्ट फार कमी जणांनी मिळवला. डिकीनी आउट दिलंय म्हणजे असणारच आउट असं फलंदाजाला वाटायचं यातच सगळं आलं. त्याच्याच देशाचा १११, २२२, ३३३ धावसंख्येला नेल्सन अशुभ म्हणून विचित्र उडी मारणारा डेव्हिड शेफर्ड, सायमन टोफेल, स्वरूप किशन, अलीम दर, कुमार धर्मसेना हे जे चांगले अंपायर आहेत ना ते सगळे स्वत: क्रिकेट खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांना अपील केल्यावर त्यातला खरेखोटेपणा लवकर उमगत असावा. 

आज ८१ वर्षाचा हा तरुण बुजुर्ग आहे. क्रिकेटचा एवढ्या वर्षांचा काळ बघितलेला तो एकमेव जिवंत माणूस असावा. अकरावी नंतरच्या परीक्षेत तो फेल झाला आणि स्पोर्ट्स मधे करिअर करायचं त्यानी ठरवलं. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला फुटबॉल सोडून क्रिकेटकडे वळावं लागलं. यॉर्कशायरकडून फलंदाज म्हणून तो खेळला. अंपायर व्हायच्या आधी लीग क्रिकेट आणि कोचिंगचा उद्योगही त्यानी केला. संघाचे लोक प्रचारा करता जसे अविवाहित रहातात तसाच हा बर्ड. क्रिकेट प्रेमापोटी अविवाहित राहिला. त्याच्या श्वासात, धमन्यात क्रिकेट वहायचं फक्तं. त्याला पुढे ऑनररी डॉक्टरेट, मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर आणि ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर असे सन्मानही मिळाले. त्याचा जन्मस्थानाजवळ त्याच्या सन्मानार्थ त्याचा पुतळाही उभा केला गेलाय.        

एरवी बस मधे रोज भेटणारा कंडक्टर, पोलिस, सिक्युरिटी गार्डस आपल्याला रोज युनिफॉर्ममधे बघायची  झालेली असते. त्यांची जागा सोडून ते दुस-या पेहरावात दिसले की आपल्याला पटकन ओळखता येत नाही. पहिल्या वर्ल्डकप नंतर एकदा बसमधून जात असताना डिकीला कंडक्टरच्या डोक्यावर त्याची टोपी दिसली. त्यानी त्याला विचारलं कुठे मिळाली तुला ही टोपी? त्याचं उत्तर मोठं गंमतीशीर होतं "डिकी बर्ड नाव ऐकलंयेस कधी? मी त्याच्या डोक्यावरून काढून घेतली ती. वर्ल्डकप फायनलला आम्ही सगळे मैदानावर पळालो आणि येताना मी शर्यत जिंकलो". कुणालाही आवडेल अशी चोरी होती ती. क्रिकेटचं पावित्र्यं, सभ्यता जपणारा खराखुरा इंग्रज होता तो. सत्तेनी, ताकदीनी निर्माण झालेला दबदबा कायम रहात नाही पण कर्तुत्वानी दबदबा निर्माण झाला की तो चिरंतन असतो, डिकीचा दबदबा तसा आहे. चिरंतन टिकणारा. 

आपल्याला सगळ्यात जास्ती जी गोष्टं करायला आवडते, ती आता उद्यापासून करता येणार नाही म्हणजे एकप्रकारे मरणाची सेमिफायनलच ती. १९९६ ला भारत इंग्लंड मधल्या पहिल्या टेस्टला त्याच्या साहसष्ठाव्या टेस्ट मधे शेवटचा उभा रहाण्यासाठी तो बाहेर आला तेंव्हा दोन्ही टीमनी त्याला गार्ड ऑफ ऑनर आणि प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली त्यावेळेस या इंग्रज रामशास्त्र्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. आक्रमक अपील केल्यावर भेदरलेले अंपायर बघितले की तू आठवतोस. तू नाही म्हणाल्यावर परत ओरडायची, नाखुशी दाखवायची हिंमत व्हायची नाही गोलंदाजाची.  एकूणच तो जंटलमन गेम आता 'गेम' झालाय. आमचं भाग्यं आम्ही तुला थोडं बघितलंय, तुझ्या बदल वाचलंय ते. 

मैदानाबाहेर आयुष्याची सेन्चुरी मारशीलच तू. अर्थात 'त्या' अंपायरचं बोट वर झालं की संपलं सगळं, संघ अडचणीत असो नसो, आपली खेळी संपली की ब्याट काखेत मारायची आणि निघायचं, एवढंच आपल्या हातात.  

--जयंत विद्वांस

Wednesday, 4 March 2015

लल्याची पत्रं (२०) ..... जिया बेकरार है.....

लल्यास,

खूप दिवसात पत्रं नाही जमलं. काल असंच च्यानल बदलता बदलता अख्खी 'निम्मी' दिसली आणि ठेचाळल्यासारखा तिथेच थांबलो. 'बरसात'चं 'जिया बेकरार है' लागलं होतं. राजकपूरला त्याचा एका हातावर नर्गिस आणि एका हातात व्हायोलीन हा सिम्बॉल सापडला तोच 'बरसात'. उत्खनन केल्यावर जुनी शहरं, तिथली भांडी, शस्त्रं सापडतात तसं ही गाणी सापडतील शेकडो शतकांनी कुण्या नशीबवान माणसाला. तो काम थांबवून वेड लागल्यासारखी ती ऐकत बसेल आणि वेडा होईल. पण गंमत म्हणजे त्याचं मूल्यंमापन तेंव्हाचे पुरातत्वशास्त्रज्ञ कुठल्या निकषांवर करतील असा मला प्रश्नं आहे.

तेंव्हाची गाणी सुंदर का व्हायची माहितीये का तुला? ते लोक एरवीही एकत्रं असायचे, गप्पा मारायचे, कुणाला काहीतरी सुचून जायचं आणि अफलातून काहीतरी घडायचं. राजकपूर हा मुळात अड्डाप्रिय माणूस, तो स्वत: सुंदर गायचा, अकोर्डीयन, व्हायोलीन वाजवू शकायचा त्यामुळे त्याची गाणी इतरांपेक्षा सरस असायची, होती, रहातील (जाने कहा…. ची ट्यून त्याचीच होती). त्यानी जमवलेली सगळी रत्नं होती, सगळं चांगलं आपल्या चरवीत त्यानी हुशारीनी ओढून घेतलं. योग जुळून आले होते हेच खरं, घटकपदार्थ तेच असले तरी आचा-याचं कसब असतंच चव येण्यासाठी. राजकपूर हा संजीव कपूर होता. पहिल्या पहिल्यांदा तो चविष्ट पदार्थ बनवायचा, जोकरच्या अपयशानंतर तो आकर्षक, स्पायसी बनवायला शिकला. 

बरीचशी गाणी लोकगीतातून यायची पहिल्यांदा, तो ग्रामीण गोडवा पॉलिश झाला की अजून देखणा दिसायचा. त्यांच्या चालीही लोकगीतांवर आधारित असायच्या (हृदयनाथ, आरडी, सलील चौधरी, शंकर जयकिशन सगळेच माहीर होते यात) इन्ही लोगोने, रंग बरसे, पान खाओ सैय्या हमारो ऐक, कसा कच्च्या कैरीचा फील आणतात ते. तर रिकाम्या वेळात शंकर एक पंजाबी लोकगीत म्हणत बसला होता 'अम्बुआकी पेड है, छाई मुंदेर है, आजा मोरे बालमा, तोरा इंतजार है'. त्या लोकगीतातली चव आरकेनी नेमकी ओळखली. सिद्धहस्तं हसरत जयपुरीनी पहिली ओळ बदलली फक्तं आणि पुढे ओघवतं, सुटसुटीत, अर्थपूर्ण गाणं लिहीलं. संपूर्ण गाण्यात बदरिया, बलमवा आणि आनेवाले एवढे तीनच शब्दं चार अक्षरी आहेत, बाकी सगळे एक, दोन, तीन अक्षरी. बाकी गाण्यात न कळण्यासारखं अवघड काहीही नाहीये. सिंपल, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट, हल्ली दुर्मिळ झालेला भोळं भाबडं गाणं.
  
इथे 'तुझको नज़रे ढूँढ रही हैं, मुखड़ा तो दिखला जा, रस्ते पर हूँ आस लगाये, आनेवाले आ जा' मधे जी आग, विरह, ओढ आहे तीच आग 'मौसम है आशिकानाच्या' 'ऐ दिल कहिसे उनको ऐसेमें धूंड लाना' मधे होती बघ. 'सुहाग'मधलं 'अठरा बरस की तू होनेको आई' आठवतंय?  त्यातल्या मेरे घुंगरू सलामत, हजारो कदरदान है, एक तू ही नही दिलमें, लाखो मेहमान है' ला या गाण्याची चाल आहे. असे तुकडे ऐकताना जाम मजा येते. मागे म्हटलं होतं बघ तुला 'मुकद्दर का सिकंदरच्या' 'दिल तो है दिल' मधे कडवं संपलं की 'ये दोस्ती' एवढंच वाजतं आणि 'ये दोस्ती' संपताना तिसरी मंझीलचं 'आहा आजा' माउथऑर्गन वर वाजतं. चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय, तोपर्यंत ऐका 'जिया बेकरार है'

-- जयंत विद्वांस

--------------------------------------

जिया बेकरार है, छाई बहार है
आजा मोरे बालमा, तेरा इंतजार है

सूरज देखे, चंदा देखे, सब देखे हम तरसे
जैसे बरसे कोई बदरीया, ऐसे अखियाँ बरसे

नैनों से एक तारा टूटे, मिट्टी में मिल जाये
आँसू की बरसात बलमवा, दिल में आग लगाये 

तुझ को नज़रे ढूँढ रही हैं, मुखड़ा तो दिखला जा
रस्ते पर हूँ आस लगाये, आनेवाले आ जा
(बरसात, हसरत जयपुरी, शंकर जयकिशन, लता मंगेशकर) 



Thursday, 26 February 2015

गांधीहत्या….

त्यांना नावं ठेवणे किंवा त्यांची बाजू घेणे एवढं ज्ञान मला नाही कारण एक तर तो कालावधी आपण अनुभवलेला नाही. जी काय माहिती आहे ती वाचून किंवा ऐकून मिळालेली आहे. त्याची सत्यासत्यता हा नेहमीच वादाचा विषय आहे, राहील. त्यामुळे माझी मतं त्यावर आधारित असतील.

मुळात हिंदू, भारतीय किंवा गेली तीनेकशे वर्ष इथे रहाणारे लोक सहिष्णू आहेत. एकमेकात भांडण करणं वेगळं आणि कुरापत काढून किंवा आक्रमण करून लढणं वेगळं. ते आपल्या रक्तात नाही. आपल्याकडे घराची वाटणी करताना सुद्धा भांडणं टाळण्याकडे कल त्यामुळेच असावा. वादविवाद न करता मार्ग तर काढायचा पण जाताजाता ठपका ठेवायला मिळालं तर माणूस शोधायचा हा एक गुण आपल्यात आहे. तर नमनाला किलो दोन किलो महागडं सफोला घालवून विषयावर येतो.

पाकिस्तानच्या फाळणीला एकटे गांधी जबाबदार नव्हते. गांधीच्या दोन बहुमुल्यं सुचना नेहेमी दुर्लक्षित राहिल्या, त्यातली दुसरी सहज शक्यं होती पण अंमलात आणायचं धाडस नव्हतं :-

१) इकडचे मुस्लिम तिकडे आणि तिकडचे हिंदू इकडे - हे शक्यं नव्हतं,  आपलं जन्मस्थान सोडताना सगळं उचलून दुसरीकडे कोण जाईल? त्यांना इथे सामावून घेतलं जाईल का? त्याची काही योजना होती का? इथून तिकडे गेलेले मुसलमान उपरे किंवा मुहाजिर समजले जातात तीच गत हिंदूंची झाली असती का?
२) स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस बरखास्त करावी. स्वातंत्र्य मिळवून दिल्याचं श्रेयं दवडणं नेहरूंना झेपलं नसतं हा एक भाग आणि गांधींची हतबलता.
कुठलीही गोष्टं अचानक घडत नाही, बरंच काही साठून येतं आणि मग उद्रेक होतो. गांधींची हत्या ही अचानक झालेली गोष्टं नाही. टिळक अकाली गेले, सुभाषबाबू गूढ कायम आहे आणि सावरकर आक्रमक होते पण भारतभर पाठीराखे नव्हते. आपण आक्रमक असतो तर कदाचित स्वातंत्र्य आधीच मिळालं असतं आणि गांधींचा फार झालाही नसता. इंग्रजांना गांधी परवडणारे होते कारण ते हिंसा, आक्रमण याला अनुकूल नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी किंवा त्यांच्याशीच बोलणं त्यांच्या फायद्याचं होतं. त्यामुळे तारणहार, मध्यस्थ किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योग्यं व्यक्ती म्हणजे गांधी हे लोकांच्या मनावर ठसलं. त्यामुळे त्यांना देवत्वं प्राप्तं होणं साहजिक होतं. गांधीनी उपास केला की प्रेमापोटी लोक घरी उपास करायचे. 

अशा गांधींनी फाळणीला परवानगी द्यावी हा लोकांना धक्का होता. (दिवार आठवतो मला कायम, आत जातानाचा लीडर सत्येन कप्पू आणि  बाहेर आल्यानंतरचा हताश बाप). असं काय कारण होतं हो म्हणायला हे लोकांना समजावलं गेलं नसावं किंवा पटलं नसावं. गांधींचं मुसलमान धार्जिणेपण अनेकवेळा लोकांनी पाहिलं. 'पहिल्या महायुद्धात मदत घ्या त्याबदल्यात स्वातंत्र्य द्या' या प्रस्तावाला त्यांनी केलेल्या विरोधामुळे स्वातंत्र्य तीसेक वर्ष पुढे गेलं (मिळालं असतं तर तेंव्हा तर काय मोठे दिवे लावणार हा भाग वेगळा) याचा राग होता. अडचणीत असताना अशी मागणी करणं योग्यं नाही ते त्यांचं म्हणणं होतं. असा पराकोटीचा लोकधार्जिणेपणा चीड आणणाराच होता. पाकिस्तानला पन्नास/पंचावन्न कोटी देणे हा दुसरा रागाचा मुद्दा होता आणि नौखालीत हिदुंच्या कत्तलीनंतर त्यांनी अवाक्षरही काढलं नाही हा तिसरा मुद्दा होता.
या सगळ्या घटनांचा उद्रेक कधीतरी होणं स्वाभाविक होतं. तो झाला. तो समर्थनीय आहे, नाही हे व्यक्तिपरत्वे मत बदलत रहाणार. गोपाळ गोडसेंचा नातू अजिंक्य गोडसे ८४ला माझ्या वर्गात होता अकरावीला. त्याच्या घरी त्यानी मला नेउन त्यांचा अविसर्जीत अस्थीकलश दाखवलाय. आता त्या हत्येचं समर्थन किंवा निंदा करणं हे माझ्या मते आफ्टर थौट आहेत. हत्येनंतर ब्राम्हणांना जे भोगायला लागलं ती चीड पिढ्यांपिढ्या हस्तांतरित झाली. त्यांनी खतपाणी घालून ती विषवल्ली वाढवली कारण सूड तर घ्यायचाय पण कुणावर घेणार याची फळं आहेत ती. 

--------------------------

अवांतर :

मला एक प्रश्नं पडतो नेहमी. मधुबाला जगली असती सत्तरी पर्यंत तर तिचं सौंदर्य बघणीय राहिलं असतं का? लैला-मजनू, हीर-रांझा या आणि अशा इतर जोड्यांचं लग्नं झालं असतं तर ते सुखाने नांदले असते का? गांधी जगले असते तर राष्ट्रपिता झाले असते का? त्यांना मरून मिळालेली किंमत जगून मिळाली असती का?       

आपण फार भावनिक (मुर्ख खरंतर) आहोत. ब-याच गोष्टींची आपण सरमिसळ करतो. स्वच्छ चारित्र्यं आणि सत्ता राबवता येणं या दोन भिन्नं गोष्टी आहेत. स्वातंत्र्यं मिळवायचच या भावनेनी एकत्रं आलेल्या लोकांचा समुदाय आणि त्यांचे प्रांतिक नेते हीच अवस्था होती. यात दूरदृष्टी किंवा पुढे काय करायचं नेमकं असा क्लिअर प्लान कुणाच्या डोक्यात असेल असं वाटत नाही मला तरी.


-- जयंत विद्वांस 

Wednesday, 25 February 2015

वन्स अपॉन अ टाईम (११).....

वन्स अपॉन अ टाईम (९) वर मिलिंद जोशींनी मायकेल बेव्हनचा उल्लेख केला होता कॉमेंटमधे. मायकेल बेव्हन, आपला राहुल द्रविड, झेक इव्हान लेंडल यांच्या पत्रिका एकसारख्याच असणार. यांच्या आयुष्यात निखळ कौतूक कमी आणि अपेक्षांचं ओझं जास्ती. इमानेइतबारे जबाबदा-या पार पाडायच्या हा यांचा स्वभाव. फार प्रसिद्धी मिळो न मिळो, कौतुक होवो न होवो, आपलं काम काळजी घेत, चोख करत रहायचं पु.लंच्या नारायणासारखं. अशा लोकांची नावं पटकन विसरली जातात. लक्ष्मणनी २८१ केल्यात म्हणून तरी त्याचं नाव निघेल नाहीतर तो ही समान पत्रिकेचा. २००३ च्या वर्ल्ड कपला लक्ष्मणला डावलून दिनेश मोंगिया का खेळला याचं उत्तर मिळणार नाही, त्याच्या नशिबात नव्हतं एवढंच खरं. राग मोंगियाचा नाही आपल्या मतलबी वृत्तीचा आहे. आपण फार लवकर चांगल्या गोष्टी विसरतो आणि वाईट, विसरण्याच्या लायकीच्या मात्रं मेंदूत स्वतंत्र कप्प्यात कसोशीने जपतो.

बेव्हन हा अत्यंत मेहनती माणूस होता. कर्मकांडावर श्रद्धा असलेला, एकेक करीत कधी तिशी गाठायचा कळायचं नाही, उगाच मारहाण नाही करायचा, मारेन तर फोरच नाहीतर राहीन उपाशी असला माज नाही, मध्यमवर्गीय माणूस, कुटुंबासाठी रुपया रुपया साठवल्यासारखं सेव्ह करणारा. तो चायनामन पण टाकायचा. फिल्डिंग करताना बॉल अडवण्यासाठी फिल्डिंग करायचा. क्यामेरासाठी उगाच क्याच पूर्ण झाल्यावर कोलांट्याउड्या वगैरे नाहीत. धोनीचा फिनिशर म्हणून आज गवगवा असेल पण बेव्हन त्याचा पूर्वज आहे. शांतपणे आत्मविश्वासानी तो म्याच काढायचा. एक मासिकात मी वाचलं होतं. सराव करताना कोच रनिंग बिटवीन द विकेटसाठी टायमर लावायचा, बेव्हन सगळ्यात फास्ट होता ते सुद्धा सिंगल काढताना नाही, तीन पळताना. त्या कोचच्या म्हणण्यानुसार केवळ ह्या आणि फिनिशर या गुणासाठी तो संघात राहील.

पाचव्या सहाव्या क्रमांकावर तुम्ही फलंदाजीला येता तेंव्हा तुम्ही किती रन केलेत हे कुणी लक्षात ठेवत नाही. किती चेंडूत केले हे महत्वाचं असतं (नंतर ते ही कुणी लक्षात नाही ठेवत म्हणा). शेवटच्या चार पाच षटकात रन जमवा, लवकर आउट झालात खा शिव्या, मारल्या त्यांनी ४०-४५ तर उद्याच्या पेपरात जास्तीत जास्ती दोन तीन ओळीत उल्लेख संपतो, म्याच जिंकलात तर म्यान ऑफ द म्याच वरती ७०+ रन करणा-याला किंवा ३-४ विकेट काढणा-याला, हे पाचवे, सहावे खेळणारे म्हणजे सवतीची पोरं. आश्रितासारखे वागवतात यांना. बरं यांच्या जागेवर हक्कं सांगायला शहाजहानच्या मरणाची वाट बघणारे औरंगजेब रांगेत उभे असतात, जगावं तरी कसं या माणसांनी.

ऑस्ट्रेलियानी आत्तापर्यंत सगळ्यात जास्ती वेळा वर्ल्डकप जिंकलाय, त्यापैकी ९९ आणि २००३च्या टीमचा बेव्हन सदस्य होता. पण पोंटिंग, स्टीव्ह वा, वार्न यांच्यापुढे बिचारा बेव्हन कोण लक्षात ठेवणार. अंतिम विजेता माणसाच्या नेहमी लक्षात रहातो. २००३च्या इंग्लंड विरुद्धच्या म्याचला ऑस्ट्रेलिया ४/४८ अशा संपन्न अवस्थेत असताना तो खेळायला आला. ८/१३५ असताना बिकेल त्याच्या सोबतीला आला. जिंकायला अजून ७० हव्या होत्या. शेवटच्या ओव्हरला बेव्हननी म्याच काढून दिली त्यांना, तो ७१ आणि बिकेल ३४. सुपर सिक्सला पण न्यूझीलंड विरुद्ध हीच सशक्तं अवस्था होती. ऑस्ट्रेलिया ७/८४ परत एकदा बेव्हन ५६ आणि सोबतीला बिकेलला घेऊन त्यानी नैय्या पार लावली. फायनलला पोंटिंगनी हाणला तुफान आपल्याला आणि याला फलंदाजीला यायची वेळ आलीच नाही.

समान व्यसनेषु समान सख्यम असं म्हणतात. जगात डावलले गेलेले, गुणवत्ता असून मागे राहिलेले जास्ती असतात त्यामुळे तुझी आणि तुझ्यासारख्या इतरांची आठवण कुणी ना कुणी काढत रहाणार बघ. दहीहंडी फोडताना सगळ्यांचं लक्ष सगळ्यात वरती उभ्या असलेल्या माणसाकडे असतं, एकदा हंडी फुटली की लोक पाया, मधले स्तर विसरतात हे मात्रं चिरंतन सत्यं. बेव्हन, तू म्हणजे खालचा थर, वर उभ्या असलेल्या माणसाला भक्कम पाया देणारा, 'मी आहे मागे' असा आत्मविश्वास देणारा त्यामुळे कायम 'मागे' रहाणारा.

--जयंत विद्वांस  



Saturday, 21 February 2015

स्पर्शात्मा.....


माणूस हरवलेल्या क्षणांना शोधू लागला की तो हळवा होतो. संगीत ही नेहमी आनंददायक गोष्टं आहे. त्याचा आस्वाद घेताना वय, शिक्षण, जात, धर्म आड येत नाही. शास्त्रीय संगीत सगळ्यांनाच कळतं असं नाही पण तरीही कुठल्यातरी दैवी अनुभूतीने माना डोलतात, चित्तं प्रसन्न होतं, आनंद मिळतो, तो मनात रेंगाळतो. माणसाला सुख मिळालं की त्याला त्याच्या पुनरावृत्तीची ओढ लागते. मग ते शारीरिक, बौद्धिक वा मानसिक सुख असो. संगीत हे असं एकमेव सुख असावं की ज्यात शरीर थकल्यानी ते भोगताना अटकाव येत नाही (बहिरा असेल तर? हा न्युसंस व्हयाल्यूचा प्रश्नं धरावा). देव जसा दाखवता येत नाही पण त्याचं अस्तित्व आपण मान्य करतो तसंच संगीत. एखाद्या गायकाच्या अमुक एक गाण्यात या जागी मला २०० मिलीग्राम आनंद मिळाला असं नाही दाखवता येत. अव्यक्तं आनंद, सदिच्छा, आशीर्वाद नेहमी ताकदवान आणि अमर्याद असतात. प्रत्येक पिढीच्या आवडीनुसार संगीतातल्या थोर व्यक्ति बदलत जातात. पण भीमसेन, किशोरीताई, शोभा गुर्टू, जसराज, अभिषेकी, मन्सूर आणि असे बरेच काही चिरंतन आहेत.

मागे एका मासिकात की पुस्तकात वाचलेलं. १९७७ ला अमेरिकेनी एक यान अवकाशात परग्रहावरची जीवसृष्टी शोधण्यासाठी सोडून दिलं, जे परत येणार नाही. पृथ्वीवरचे काही सुमधुर आवाज त्यांनी रेकॉर्ड करून त्यात ठेवलेत. ज्याला कुणाला सापडेल आणि ते जर प्रगत असतील तर ते कसे ऐकायचे हे त्यांना कळेल किंवा ते शोध लावतील. भारताच्या केसरबाई केरकरांची भैरवी त्यात घेतलीये. त्यांच्या कल्पना शक्तीला सलाम आहे. मला एक सत्यात नं येणारं स्वप्नं पडतं. जर ते यान देवलोकात पोचलं तर? कुणीतरी ती रेकॉर्ड लावेल आणि ती भैरवी ऐकून अल्लादियाखां पटकन म्हणतील ए केसर, तुझं गाणं लागलंय बघ, मी तुला कायम म्हणतो ना तुझ्या कोमल रिषभात आणि गंधारात डोळ्यात पाणी आणायची ताकद आहे त्याचा हा पुरावा आहे.

संगीताला भाषेची गरज नसते हेच खरं. जो कुणी परग्रहवासी असेल तो जर ते ऐकू शकला तर त्याला काही देणंघेणं नसेल, भाषा कुठली, राग कुठला, स्केल कोणती आहे, कुठल्या देशातला किंवा कुठल्या ग्रहावरचा आहे. यातली काहीही माहिती नसताना तो जर डोलू लागला, भारावला, आतून मोहरून गेला तर काय सांगावं. कुठून आले हे स्वर? शोध घेतलाच पाहिजे म्हणून ते आपल्यापेक्षा प्रगत असतील तर निघतील पण शोधायला. राहतील इथेच, इथलं चांगलं काही घेऊन जातील, त्यांचं आणतील. आपल्याला अज्ञात असलेलं त्यांच्याकडे असू शकतं. डोळे मिटेपर्यंत हे असलं काही होणार नाही पण कल्पना करायला काय हरकत आहे. 


सकाळी सकाळी एखादं गाणं किंवा ओळ कानावर पडते आणि दिवसभर आपण  गुणगुणत रहातो. ज्योतिषशास्त्रानुसार नेपच्यून ग्रह आपल्या राशीत असेल तर तसं होतं असं वाचलंय. तो सदानकदा माझ्या राशीत असावा असंच मला वाटतं. पण खरं सांगू का नेपच्यून असो नसो, आपल्याला कधी प्रसन्न वाटलं, कुठूनशा आलेल्या सुरांनी आठवणी जाग्या झाल्या, अंगावर काटा आला, डोळ्यात ओल आली तर समजायचं कुण्या दिग्गजाचा आत्मा रियाझ करता करता आपल्याला स्पर्शून गेलाय असं.   

(व्हाटसप वर खर्डेघाशी ग्रुपवर मुकुंद भोकरकरांची पोस्ट होती आणि त्यावर शैलेश कुलकर्णींची दमदार कॉमेंट होती, त्यावरून सुचलं हे)
--जयंत विद्वांस




Thursday, 19 February 2015

वन्स अपॉन अ टाईम (१०).....

हरियाणाहून तो मुंबईला शिबिरासाठी आला होता फास्ट बोलिंगच्या. इकडच्या मुलांना झेपेल असा ब्रेकफास्ट दिलेला सगळ्यांना, एक ग्लास दुध वगैरे होतं त्यात. यानी पहिल्याच दिवशी राडा केला.  बाकीची मुलं जेवायची तेवढा हा नाश्ता करायचा. तांब्यानी दुध पिण्याची सवय असणार, ग्लासनी काय होणार त्याचं. सगळ्यांनी त्याची चेष्टा केली कारण फास्ट बॉलर हा आपल्याकडे प्रकार अस्तित्वात नव्हता खूप काळ. त्यानी सुरवात केली. दगडी खेळपट्ट्यांवर पण विकेट घेऊन दाखवल्या अनफिट न होता, समोरून दुसरा वेगवान गोलंदाज असता ना त्यावेळेस तर काय धमाल आली असती. पाकिस्तान आणि विंडीजच्या जोडीला आपण असतो. एक दौरा आठवतोय मला पाकिस्तान आलेलं आपल्याकडे, सर्फराज नवाझ, सिकंदर बख्त, इम्रान आणि कादिर. एकाचढ एक. आपल्याकडे हा फक्तं तरी पण लढला, कच न खाता. 

८३ चा वर्ल्डकप. सेमीत जाण्यासाठी झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाला हरवणं गरजेचंच होतं. हायलाईटसमधे पटापट विकेट्स दाखवतात तशा सामन्यात आपल्या विकेट पडलेल्या. यशपाल आउट झाला तेंव्हा ५/१७ असा नेत्रदिपक स्कोअर होता आपला. इंग्लिश क्रिकेट मंडळानी बहुतेक आपली निघायची तिकीट पण बुक केली असतील. पण माणूसच येडा ना हा. किरमाणी आला तेंव्हा ८/१४० होता आपला स्कोअर. या पठ्ठ्यानी १३८ चेंडूत १७५ कुटल्या. केवळ त्या भन्नाट खेळीमुळे आपण सेमीला गेलो आणि नंतर इतिहास झाला. बीबीसीच्या स्ट्राईक मुळे त्या सामन्याचं चित्रीकरण उलपब्धं नाही. त्याचा रेकॉर्ड सैद अन्वरनी रनर घेऊन का होईना पण तोडला नंतर.


साल १९९०, लॉर्डस, गुचनी आधीच ३३३ हाणलेल्या, आपल्याला फॉलोऑन वाचवायला चोवीस हव्यात, आपले नऊ आउट, समोर नरेंद्र हिरवाणी, पुढची ओव्हर अंगस फ्रेझरची. दात आणि आत्मविश्वास पुढे असलेला एक येडा माणूस समोर उभा, गोलंदाज एडी हेमिंगज्. शाळेत लहानपणी शिकलेला सोप्पा गुणाकार त्याला आठवला. साही चोक चोवीस. सलग चारवेळा लोंगऑफ किंवा लोंग ऑनवरून फिल्डर असतानाही हाय जंप, एक जरी त्यातला पकडला असता तर आयुष्यभर चेतन शर्मा सारखा डाग घेऊन हिंडला असता. फॉलोऑन वाचला. पुढच्या षटकात फ्रेझरच्या पहिल्याच चेंडूवर वयात आलेल्या मुलीचा पाय घसरायची जेवढी ग्यारंटी असते त्याप्रमाणे हिरवाणी एल.बी. डब्ल्यू.झाला. सगळ्यात महत्वाचं असं की तो सामना त्या चोवीस धावांमुळे अनिर्णित राहिला. उगाच शेवटच्या चेंडूवर मी धाव घेईन मग पुढची ओव्हर मीच खेळेन वगैरे कॅल्क्युलेशन्स करणे हे त्याला जमलंच नसतं नाहीतरी.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होता. आपली धावसंख्या नेहमीप्रमाणे हरण्याच्या लायकीचीच होती. नेमका याचा गुडघा दुखावला होता. त्यानी गुडघ्यात इंजेक्शन्स घेऊन पाच विकेट काढल्या तरीही आपण हरलो, वनडेला तीन स्लीप, गली लावून टाकत होता इतका आत्मविश्वास त्याला त्याच्या आउटस्विंगरवर. मर्यादित स्पीड पण आउट स्विंग आणि इनस्विंगिंग यॉर्कर टाकायचा तो.  झहीर अब्बासला हमखास एल.बी. करायचा. आक्रमण हाच उत्तम बचाव हे त्याचं सूत्रं होतं. अनफिट आहे म्हणून त्याचा एकही सामना हुकलेला नाही. चारशे विकेट (४३४) आणि पाच हजार धावा करणारा तो एकमेव आहे. रडतखडत त्यानी ह्याड्लीला मागे टाकलं तेंव्हा खूप वाईट वाटलं होतं. श्रीनाथ, कुंबळे त्यांना विकेट पडू नये यासाठी बाहेर चेंडू टाकत होते. सरतेशेवटी तिलकरत्नेच आउट झाला बहुतेक कंटाळून.

मोडेलिंग, कमेंट्री अशा न जमणा -या गोष्टीही त्यानी करून पाहिल्या. त्याला मुलगीही खूप उशीरा - लग्नानंतर जवळजवळ सोळा वर्षांनी - झाली पण त्यानी आपलं कुटुंब प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. टेस्ट क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा, ट्वेंटी ट्वेंटीला कमेंट्री करताना नाईलाज असल्यामुळे आडव्या ब्याटनी मारलेल्या अशास्त्रीय षटकार, चौकाराचं कवतिक करणारा, मनोज प्रभाकरच्या खोट्या आरोपांनी व्यथित झाल्यावर चारचौघात रडणारा (त्याच्यावरचा आरोप खरा आहे किंवा शंकेला वाव आहे असं कुणीही म्हणालं नाही इतका तो चोख होता) तो एक जिगरबाज सभ्यं माणूस आहे. पापे, पामोलिव्ह और तेरा सच में जवाब नही!

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (९).....

वन्स अपॉन अ टाईम (८) मधे उल्लेख केलेला दुसरा हरहुन्नरी माणूस म्हणजे लान्स क्लुजनर. काहीवेळेस आपल्याला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू डोक्यात बसतात किंवा काही आवडूनही जातात. क्लुजनर दुस-या कॅटेगरीतला.  हा देखणा अष्टपैलू मला जाम आवडायचा. माणूस रेकॉर्ड करता खेळतोय की स्वत: आनंद लुटतोय वर दुस-यालाही देतोय हे बघणा-याला कळतं. आपल्या पिढीनी बघितलेल्या दिग्गजांमध्ये रिचर्डस, लारा, गॉवर, इम्रानखान, वाल्श, अम्ब्रोज, अरविंदा डिसिल्वा, गिलख्रिस्ट आणि असे अनेक या कॅटेगरीत होते. क्लुजनर त्यापैकी एक. गोरापान, सहा फुटाच्या आसपास आणि खेळाडूची शरीरयष्टी असलेला तो एक देखणा खेळाडू होता. काही हिरोइनस आणि क्रिकेटियर यांच्यात मला नेहमी एक गंमतीशीर साम्यं आढळलंय. काही जण फिगरनी (आकड्यांनी) ओळखले जातात काहीजण प्रेझेन्सचा किती आनंद देतात यावरून.

भारतात कलकत्त्याला झालेला सामना मला आठवतोय. त्याला अझहरनी धुतला होता, सलग पाच बाऊन्ड्री मारलेल्या त्याला. एक तर माझ्या अजून लक्षात आहे. लेगवर अल्मोस्ट यॉर्कर, अझहर खेळता खेळता कोलमडला पण फाईन लेगला चौकार गेला हे कळायला फार उशीर झाला होता. त्याच्या वेगाचा अंदाज आला त्यामुळे. पण तो काही जन्मत:च पडलेल्या चेह-याचा भारतीय गोलंदाज नव्हता (श्रीनाथ, प्रसाद आठवतात? प्रदीपकुमार, भारत भूषणच हे क्रिकेटचे, कायम मख्ख) त्यामुळे सर्वस्वं लुटलं गेल्यासारखा, जवळचा जिवाभावाचा माणूस गेल्यासारखा, आता सगळं संपलं असा चेहरा वगैरे नव्हता झाला त्याचा. जेन्युईन फास्ट बोलर कोण? ज्याला मार पडल्यावर जो चेहरा टाकत नाही, शिव्याही देत नाही पण कपाळावरची नस फुगलीये, डोळ्यात खुन्नस आणि जो पुढचा चेंडू अजून त्वेषानी टाकतो, अनप्लेएबल किंवा बोटं फुटतील असा मुळाशी घाव घातल्यासारखा हुकमी यॉर्कर टाकतो तो. तुम्ही स्टेनला बघा, परफेक्ट माणूस (याच्यावर परत कधीतरी). लान्स तसा होता. जिगरबाज, दुस-या डावात ८/६४ काढणारा.     

माणसाला कितीही यश मिळालं, प्रसिद्धी मिळाली तरी एखादी गोष्टं राहून जातेच. त्याच्या यशोगाथेपेक्षा ती चुटपूट लावणारी गोष्टं त्याच्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करणा-या माणसांच्या चिरंतन लक्षात रहाते. ब्रॅडमनला शेवटच्या डावात चार धावा काढता आल्या असत्या तर? अपुर्णतेत मजा असते म्हणतात. न वाजलेल्या सुरावटी वाजणा -या सुरावटींपेक्षा जास्ती आर्त असतात.मरेपर्यंत विसरू शकणार नाही अशा गोष्टी घडून जातात ( चेतन शर्मा, गोलकीपर नेगी यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे, आपण सुजाण प्रेक्षक नसून अजूनही अडाणी प्रेक्षकच आहोत). क्लुजनरच्या बाबतीत असंच झालं.

नव्व्याण्णवच्या वर्ल्डकपला आफ्रिकेच्या नऊ पैकी जिंकलेल्या सलग चार सामन्यात तो म्यान ऑफ द म्याच होता. ऑस्ट्रेलियाशी सेमीत गाठ पडली त्यांची. आत्ताच्या क्षणाला हसू येईल इतकं कमी टार्गेट होतं. ५० ओव्हरमधे २१४. पंचेचाळीसाव्या ओव्हरला ६-१७५ असताना क्लुजनर खेळायला आला. ९-२०५ एकोणपन्नासाव्या ओव्हरला. शेवटच्या सहा चेंडूत नऊ धावा हव्यात. डेमियन फ्लेमिंगला पहिल्या दोन चेंडूंवर त्यानी सीमापार पोच केलं. चार चेंडूत फक्त एक धाव हवी होती. समोर डोनाल्ड. तिसरा चेंडू निर्धाव गेला, चौथा चेंडू मिस हिट, मिडविकेटला मार्क वा कडे गेला.क्लुजनरचा धीर सुटला, त्या क्षणावर सटवीनी दुर्दैव स्वत:च्या बोटांनी लिहिलं होतं. क्लुजनर समोर पोचला तरी मोरू डोनाल्ड चेंडूकडे बघत होता, पळाला तो शेवटी पण उसेन बोल्टचा स्पीड असता तरी तो आउटच होणार होता. सामना टाय झाला आणि साखळीत आफ्रिकेला हरवलं असल्यामुळे ऑस्ट्रेलिया विजयी झाली आणि त्यांनी कपही जिंकला.

हातातोंडाशी आलेला घास जाणं म्हणजे काय, जाणून घ्यायचंय? भेटा अथवा लिहा - लान्स क्लुजनर, मु.पो.द.आफ्रिका. मेरा नाम जोकर मधे ऋषीकपूरला बेस्ट म्यानच्या नावाखाली जसं सिम्मी ग्रेवालला चुम्बायला मिळतं तसं लान्स क्लुजनरला त्या वर्ल्डकप मधे 'प्लेअर ऑफ द सिरीज' गौरवण्यात आलं. दुधाची तहान ताकावर, कमनशिबी लेकाचा.

--जयंत विद्वांस     

वन्स अपॉन अ टाईम (८).....

वन्स अपॉन अ टाईम (७) वाचून मला दोघांनी फ्यानी डिव्हिलिअर्स आणि लान्स क्लुजनर वर लिहायला सांगितलं. सुदैवानी मला दोघंही आवडायचे, फ्यानी जास्तच जरा. आपल्या मोहिंदरसारखा फसवा गोलंदाज. सव्वासहा फुटाच्या आसपासचा फ्यानी हडकुळा वाटायचा, त्यामुळे त्याच्याकडे बघून वाटायचं नाही हा स्पीड जनरेट करेल असं. आफ्रिका परत खेळायला लागल्यावर त्यांच्या तेंव्हाच्या ज्या दोन-तीन टीम होत्या त्यात काही खेळाडू अविस्मरणीय होते पण काही लवकर नाहीसे झाले, काही टिकले. मशीन असल्यासारखा सलग गुड लेंग्थ टाकणारा क्रेग म्याथ्युज, अमर अकबर मधल्या झेबिस्को - युसफ खान - सारखा दिसणारा हसरा आणि देखणा ब्रायन म्याक्मिलन, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेकडून खेळलेला केपलर वेसल्स, खाली मान घालून विचित्र गोलंदाजी करणारा पौल अडम्स, धिप्पाड प्याट सिमकोक्स आणि हन्सी क्रोनिए पण. कधीही मोठी टूर्नामेंट ते जिंकले नाहीत पण ते मस्तं खेळायचे. 

तर विषय होता फ्यानी, फेंगडा पळणारा, वाकड्या नाकाचा फ्यानी, मला तो जाम आवडायचा आणि राग पण यायचा कारण तो तेंडुलकरला मस्तं गंडवायचा. जेमतेम अठरा टेस्ट आणि त्र्याऐंशी वनडे खेळला तो. आकड्यांमधून मोठा दिसणारा हा माणूस नव्हे. तर एक हरहुन्नरी माणूस. फलंदाजाला फसवून आउट करणारा. तो सैन्यात होता. त्या दरम्यान एकदा बॉम्बची चाचणी चालू होती. बॉम्ब याच्या जवळच फुटला. त्यामुळे त्याची दृष्टी अधू झाली, थोडासा बहिराही झाला आणि नाकाला जखम झाली. तरीपण पठ्ठा खेळला बराच. नंतर दृष्टीवर परिणाम व्हायला लागल्यानी तो रिटायर्ड झाला. परवाच एबी डिव्हीलिअर्स कसा चतुरस्त्र आहे याचा मेसेज वाचलेला. फ्यानीनी शालेय जीवनात आफ्रिकेचं भालाफेकीसाठी प्रतिनिधित्व केलेलं आहे. नवीन काहीतरी किंवा अजून काहीतरी करून बघायचं हा तिकडच्या लोकांचा गुणधर्मच आहे. झिम्बाब्वेचा कीपर डेव्ह हौटन हा त्यांच्या देशाच्या हॉकी टीमचा गोलकीपर होता आणि त्या टीम मधले ५-६ जण हॉकी टीमचा भाग होते. फ्यानी ९५ च्या मिस वर्ल्डला जज होता, त्याचा भाऊ आणि मुलगी दोघंही बहिरे होते. बही-या लोकांच्या संस्थेसाठी त्यानी केपटाऊन ते प्रिटोरिया सायकलिंग करून आफ्रिकन चलनातले ८ लाख जमवले.  

सिडनीला ऑस्ट्रेलियाला जिंकायला एकशेसतरा हव्या होत्या फक्तं. आफ्रिकेत जन्मलेला, इंग्लंडकडून खेळलेला आणि ऑस्ट्रेलियात रहाणा-या टोनी ग्रेगनी (कॉमेंट्री सुरेख करायचा, २००३ च्या वर्ल्डकपला त्यांनी फायनलला भारत का जिंकू शकत नाही याचं केलेलं विश्लेषण, भावनिक नव्हतं ते, अभ्यासपूर्ण होतं आणि शारजातल्या तेंडूलकरच्या ऐतिहासिक म्याचेसची कॉमेंट्री मला अजून लक्षात आहे) खेळाच्या आधी आफ्रिकेला विजयाची संधी १००:१ आहे असं सांगितलेलं. ऑस्ट्रेलिया पाच रननी हरली. फ्यानीनी त्या डावात ६/४३ काढल्या आणि म्याच मधे १०/१२३. म्यान ऑफ द म्याच स्विकारताना त्यानी त्याच्यापेक्षा चार इंच उंच असलेल्या टोनी ग्रेगला बाउन्सर टाकला. त्याला त्याच्या १००:१ या वाक्याची आठवण करून देत म्हणाला "You know South Africans; we never give up."

फ्यानी, तू लेका फार कमी काळ खेळलास. तुला भेटणं काही शक्यं नाही त्यामुळे इथूनच तुझ्या कर्तुत्वाला सलाम.

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (७) .....

आपल्याला एखाद्या माणसाचे कसब, एखादा इतरांपेक्षा वेगळा गुण दिसतो, त्याचं आपल्याला वारेमाप कौतुक वाटतं. क्वचित तसं म्हणजे त्याची नक्कल करायचा आपण प्रयत्नही करतो पण त्यापाठीमागे त्याचे कष्ट किती आहेत ते आपण बघत नाही, जाणून घेत नाही, कळाले तरी अंमलात आणत नाही म्हणून आपले अयशस्वी होण्याचे प्रसंग जास्ती. फिल्डिंगचं नाव निघालं की सगळ्यांना जोंटी -होड्स आठवतो. क्यामेरामुळे त्याच्या हालचालींची लय कळते, त्याची अक्युरसी कळते, त्याचा रबराचा लवचिकपणा दिसतो. हे एका रात्रीत झालेलं नाही. त्याचा सराव पण इतरांसारखा नव्हता. मैदानाच्या कुठल्याही कोप-यातून एकच स्टंप लावून तो उडवण्याचा सराव तो करायचा. त्याचे अनेक अशक्यं झेल यूट्यूबवर बघायला मिळतील पण मला त्यानी आपल्या रॉबिंनसिंगला रनाऊट केलेलं ते आठवतंय कारण ते रनाऊट नव्हतंच. त्यानी चेंडू खेळून काढला जो गलीकडे गेला, फॉलोथ्रूमधे तो क्रीजच्या बाहेर आला. गलीतून -होडसनी स्टंप काढला. बिचा-या रॉबिंनसिंगला क्षणभर आपण का आउट झालो हेच कळलं नव्हतं. 

नेम साधताना अर्जुनाला फक्तं जसा डोळा दिसला तसं त्याच्या मेंदूच्या सि.पि.यू.मधे - फलंदाज क्रीजच्या बाहेर आहे, त्याला त्याची कल्पनाही नाहीये, चेंडू माझ्या हातात आहे आणि मी इथून दिसणारा एकमेव स्टंप उडवू शकतो, एक खेळाडू स्वस्तात बाद - असा फ्लोचार्ट तयार झाला असणार. त्यापुढच्या सगळ्या क्रिया रोबोप्रमाणे प्रोग्रॅम रन झाल्यामुळे घडल्या असणार इतकं परफेक्शन होतं त्यात. एखादा गायक जशी गानसमाधी अनुभवतो तसं होत असणार -होडसचं. नुसत्या हालचालींनी आणि चेंडू कुठे जाणार याच्या अचूक अंदाजानी डावी उजवीकडे पाच पाच फूट एवढा एरिया तो एकटा कव्हर करायचा. बस, नाम ही काफी है, त्याच्याकडे चेंडू असताना एक्स्ट्रा रन असा विचार मनात आणला तरी आउट देतील अशा भीतीनी फलंदाज पळत नसणार.    

आफ्रिका परत खेळायला लागल्यावर पहिल्यांदा भारतात आलेली. ग्यारी कर्स्टनचा मोठा भाऊ पिटर कर्स्टन होता त्या टीममधे. सगळे खेळाडू तसे वयस्कंच टीम मधले. त्यात तो टकलू असल्यामुळे अजूनच म्हातारा वाटायचा. एका म्याचला दिवसाचा खेळ संपला, प्रेक्षक घरी गेले, भारतीय संघ हॉटेलला गेला. काही पत्रकार मागे राहिलेले. त्यांच्या असं लक्षात आलं की एक माणूस ग्राउंडला पळत फे-या मारतोय, बघितलं तर पिटर कर्स्टन. दिवसभर उन्हात फिल्डिंग करो नाहीतर प्याव्हेलियन मधे बसून असो, रोजची सवय म्हणून आम्ही कमीत कमी पाच राउंड मारतोच त्यात विशेष काही नाही, असं त्यानी सांगितलं. हे असतात कष्ट. मी अजून चांगलं देईन हे मनात लागतं मग त्यासाठी वय, अडचणी, कमतरता, आजूबाजूची परिस्थिती या गोष्टी आड येत नाहीत. 

कैक वेळा मिस्टर युनिव्हर्स झालेल्या अर्नोल्डचा किस्सा मी वाचला होता. हार्ले किंवा तत्सम रणगाडा घेऊन तो थोड जंगल असलेल्या भागातून येत होता. मधेच गाडी पंक्चर झाली. या पठ्ठ्यानी ती हायवेपर्यंत ढकलत आणली. त्याच्या नंतर असं लक्षात आलं की पोटरीच्या स्नायूंना या एक्झरसाईजचा चांगला उपयोग होतोय. मग ते येडं रोज जायचं, हवा काढायचं आणि गाडी ढकलत आणायचं. विक्षिप्तपणा सोडा यातला पण ध्यास महत्वाचा आहे जो कष्ट घ्यायला भाग पाडतो. शिखरावर जाणं कदाचित सोपं असेल पण तिथे बराच काळ उभं रहाणं हे मात्रं कष्टाचं काम आहे.    

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (६) .....

परवा त्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बाऊन्सर लागला आणि तो गेला. आमचा गावसकर महानच होता मग. एकसेएक फास्टर खेळले पठ्ठ्यानी पण टचवूड माणूस. थोम्सन, लिली, वेस्टइंडीजचे सगळे आग्यावेताळ यानी सहजरीत्या पचवले, रन काढले, विक्रम केले. पाकिस्तानमधे शकूर राणा आणि खिजर हयात असे दोन सद्गृहस्थ होते. दोघांनाही असलेल्या शारीरिक व्यंगामुळे समोरच्या फलंदाजाच्या पायाला चेडू लागला, लागेल असं जरी त्याच्या डोळ्याला, मेंदूला दिसला तरी त्यांचं बोट आपोआप वर जायचं आणि फलंदाज आउट व्हायचा. यात खरं तर त्यांची काही चूक नव्हती. असो! तर एका टेस्टमधे (बहुतेक पहिल्याच) या व्यंगामुळे गावसकरला आउट दिलं. त्यानी जाताना चेतन चौहानला सांगितलं, 'पायाला लागलेला हा शेवटचा चेंडू'. संपूर्ण मालिकेत गावसकरच्या पायाला चेंडू लागला नाही त्यामुळे त्याला एल.बी.देता आलं नाही. याला म्हणतात टेक्निक आणि स्वत:वरचा विश्वास.


क्रिकेट हा माईंड गेम होता एकेकाळी. फलंदाजाला गन्डवण्याचा, गंडवून आउट करण्याचा आनंद वाटायचा तेंव्हा गोलंदाजाला, आता 'आउट केला ना, संपला विषय'. इम्राननी एक किस्सा सांगितला होता. समोर अर्थात आदरणीय गावसकर. त्याच्या टेक्निकवर, संयमावर इम्रानचा विश्वास स्वत: गावसकरपेक्षा जास्ती असावा. इम्रान म्हणाला, 'तो तिशीच्या पुढे किंवा विसेक ओव्हर खेळला तर आम्हांला अवघड होतं. मी गोलंदाजी करताना सगळी खबरदारी घेतली होती. स्विंग मिळत होता. तो गाफील नसतोच कधी पण मी इनस्विंगिंग यॉर्कर राखून ठेवला होता. पहिला तासाभरात मी तो ट्रायच केला नाही. जर नसता पडला नीट तर त्याला कळलं असतं मला काय अपेक्षित आहे ते आणि मग तो दिवसभर आउट झाला नसता. शेवटी धीर करून मी टाकलाच तो आणि तो चक्क बोल्ड झाला'. एकमेकांबद्दल आदर असण्याचे दिवस खेळातून संपले आता. 

गावसकर काय कपिल काय, अनफिट आहेत म्हणून टेस्ट खेळले नाहीत असं कधीच झालं नाही. फार क्रिकेट नव्हतं त्यावेळी हे कारण मला कधीच मान्यं होत नाही. उलट ग्याप असताना फिट रहाण्यासाठी जास्ती कष्ट पडतात. माणूस आळशी होण्याची शक्यता असते. एका म्याच मधे कपिल बारावा होता, संघाला गरज असतानाही. त्याला गावसकरनी वगळलं होतं. आधीच्या इनिंगमधे बेजबाबदार फटका मारून आउट झाला म्हणून. नंतर कपिलने पण त्याला एकदा बारावा करून फिटटमफाट केली होती (त्याचं कारण मात्रं लक्षात नाही). गावसकरनी दहा हजारवर रन केले. कपिलनी टेस्ट आणि वनडे मधे अनुक्रमे ५२४८/३७८३ रन्स आणि ४३४/२५३ विकेट्स घेतल्यात. गावसकरने टेस्ट आणि वनडे मधे अनुक्रमे १०१२२/३०९२ रन्स आणि १/१ विकेट घेतलीये. गावसकर एकदा कौतुकानी म्हणाला होता, तो निम्मा गावसकर आहे रन्सच्या तुलनेत आणि मी विकेटच्या बाबतीत?


अजूनही कमेंट्री करताना ते कधी एकत्रं दिसतात तेंव्हा त्यांच्या डोळ्यात मला एकमेकांबद्दलचा आदर दिसतो. मोठ्या लोकांचा आदर, प्रेम हे ठराविक काळासाठी मर्यादित नसतं हेच खरं.
--जयंत विद्वांस   
 

वन्स अपॉन अ टाईम (५) .....

काही माणसं एखाद्या विशिष्ठ रोल किंवा परफॉरमन्स किंवा इतर काही गोष्टींसाठी आवडून जातात, लक्षात रहातात. असं का होतं माहित नाही पण असं घडतं खरं. काहीतरी  जुळून येतं किंवा त्यांच्या नशिबात त्यावेळी ग्रहांनी शुभबैठक मांडलेली असावी. अशा काही व्यक्ती माझ्या स्मरणात आहेत.

संगीतकार रामलाल. मोजक्याच सिनेमांना संगीत दिलंय त्यांनी, त्यातले दोन व्ही.शांताराम यांचे - 'सेहरा आणि गीत गाया पत्थरोने'. गीत गाया…' मधलं 'तेरे खयालोंमे हम' आणि 'सेहरा' मधलं 'पंख होती तो उड आती रे…'. या दोन गाण्यांपुरताच मला रामलाल माहितीये. तो मागे पडला की पाडला वगैरे इतिहास माहित नाही. 'सेहरा' मी पाहिलेलाही नाही पण 'पंख होती तो…' च्या सुरवातीचं ते टीटीटीव पहिल्यांदा गाणं ऐकलं असेन तेंव्हापासून आजतागायत लक्षात आहे. संधी मिळाली नाही की काय घुसमट होत असेल चांगल्या कलाकाराची हे त्याचं तोच जाणे. सगळी रत्नं पिशवीत आहेत आणि दुकान लावायलाच कुणी जागा देईना अशी विचित्रं परिस्थिती होत असावी.

सुरिंदर खन्ना. दोन अर्धशतकांच्या जोरावर आपण शारजाहला जिंकलेल्या एशिया कप मधे हा 'म्यान ऑफ द सिरीज' होता. त्यानंतर तो एखादी म्याच खेळला असेल. मी त्याला डायरेक्ट कॉमेंटटेटर म्हणूनच पाहिला.  म्याचेस लो स्कोरिंग होत्या त्यामुळे त्याच्या अर्धशतकाची किंमत मोठी होती. फास्ट खेळायचा तो. त्याचा त्यावेळचा इंटरव्ह्यू पण मला आठवतोय, फार फार आशावादी होता पण तो फेल व्हायच्या आधीच त्याला काढला. पुढे अस्तित्वं राहणं त्याच्या नशिबात नव्हतं. आपल्याकडे रबरनी नाव खोडतात एखाद्याचं, अगदी नामोनिशाण गायब करतात. त्याच्यापेक्षा डफ्फड लोक वर्षानुवर्ष खेळले (उदा.दोन ऑफ स्पिनर - आशिष कपूर आणि निखिल चोप्रा [ज्या विकेट पडल्या असतील त्यांना, त्यात चेंडू न वळल्याचा किंवा इतर कुणाचा सहभाग निश्चित समजा}, हडकुळा चश्मिष विजय भारद्वाज आणि असे अनेक), त्याचं नशिब नव्हतं हेच खरं.

आयेशा जुल्का. 'जो जीता वोही सिकंदर' मधली फक्तं. नंतर फक्तं तिचा -हास पहायला मिळाला. 'जो जीता…' मधे ती जी आवडून गेली ती बात नंतर नाही आली. शाळेचा स्कर्ट, दोन वेण्या, अल्लड, निरागस चेह-याची, अमिरवर मूक प्रेम करणारी, त्याच्या यशासाठी झटणारी, एवढं करून तो पूजा बेदीवर मरतोय हे लक्षात आल्यावर खट्टू होणारी पण गप्प रहाणारी म्यच्युअर्ड लहान मुलगी तिनी जी चेह-यानी दाखवलीये त्याचं वर्णन शब्दात नाही करता येणार. लोभस आणि म्यच्युअर्ड दोन्हीचं मिश्रण गेलं होतं. पुढे तिनी नाना बरोबर हिंदीमधे 'पुरुष' पण केलं. नाटकापेक्षा नाना बरोबर नाव जोडल्याचं वाचण्यात आलं. अकाली नाहीशी झाली ती.

ली जर्मोन, न्यूझीलंडचा विकेटकीपर कप्तान. बारा टेस्ट, सदतीस वनडे, तो अचानक धुमकेतू सारखा आला आणि गायब झाला. मला आठवतंय, त्या टीम मधे मला तरी त्यावेळेस फक्तं कप्तानाचच नाव नवीन होतं. एकोणतिसाव्या वर्षी तो रिटायर्ड झाला. असं एकदम प्रसिद्धीतून डायरेक्ट एकांतवास ज्याला पचवता येतो तो माणूस माझ्या दृष्टीनी जिगरबाज आहे. सांत्वनासाठी लोक रुमाल घेऊन तयार असतातच पण कीव करून न घेणारे फार थोडे असतात, बरेचसे माझी संधी कशी हुकली व इतर इतिहास सांगण्यातच उर्वरित आयुष्यं काढतात.
भेटू परत, असंच एखादं काहीतरी घेऊन.

--जयंत विद्वांस        

लेखन, लेखनशैली आणि लिहावं काहीतरी हा कंड......

मला स्वत:ला एफबीचा या करता खूप फायदा झाला. पोस्ट टाकायची म्हणजे नेमकं काय करायचं इतकं लो लेव्हलचं अज्ञान होतं. हळू हळू शिकत गेलो. पण मिळणा-या प्रतिसादामुळे ते जास्तं आवडत गेलं हे ही सत्यं आहे ('एकमेक प्रशंसा संघा'चा सभासद नसतानाही). एफबीच्या आधी जे कुणी लिहित असेल ते डायरी, पत्रं किंवा ज्याच्याकरिता लिहिलंय तेवढ्यापुरताच मर्यादित वाचक होता. बाकी आम पब्लिकला काय वाटतंय हे कळण्याचा मार्ग नव्हता. 

प्रतिसादांनी लोकांना काय आवडतं, काय आवडत नाही, आपल्याला अपेक्षा पूर्ण करणं किती जमतं, दुसरा आपल्यापेक्षा वेगळं काय लिहितो, ते वाचण्यासारखं असतं का?, दुस-याचं वाचताना जसा आपल्याला कंटाळा येतो तसंच आपलं वाचताना दुस-याला पण येत असेल का?, आपण लिहिलेलं परत वाचताना आपल्याला कंटाळा येतो का?, असेल तर, सुधारणा काय कराव्या लागतील?, मजकूर हा अनुभव असला तरी आपण तो चटपटीत करण्याच्या नादात भरकटवतोय का? असे अनेक प्रश्नं विचारले स्वत:ला. मग जी काय शैली असेल ती आपोआप होत गेली. कणेकरांचे वडील त्यांना म्हणाले होते - 'तुझं वाचताना कंटाळा येत नाही'. एवढी साधी गोष्टं लिहिताना पाळली तरी लिखाण वाचनीय होऊ शकतं. लिहिणं हे एक चांगलं व्यसन आहे. फक्तं त्याचा रतीब झाला की गुणवत्ता उतरते. सतत वाचनीय लिहिणं ही देणगी असू शकते किंवा तेवढा व्यासंग असू शकतो, जे प्रत्येकाला जमेलंच असं नाही. आपण व्यक्तं होण्याकरतो लिहितोय की बाजू मांडण्यासाठी, उगाच विरोधाकरता विरोध म्हणून लिहितोय हे मात्रं ठरवलं पाहिजे.
एकदा लिहित गेलं की तो कंड पाठ सोडत नाही. पण प्रतिसादाकरता लिहू नये मग निराशा येते नाही कुणाला आवडलं तर. आधी स्वत:ला आवडलाय का याची खात्री असावी. मिळणारे सगळेच प्रतिसाद खरे किंवा मनापासून असतात असं नाही त्यामुळे त्यांनी खूष किंवा नाराज होऊ नये. एकदा आपली रेंज कळली की त्रास होत नाही. उगाच बांबू मोठा आहे म्हणून पोल व्हाल्टच्या भानगडीत पडू नये त्याकरता आपण तेवढ्या उंचीवर जाऊ शकतो हे पाहणं गरजेचं आहे.
आणि माणसानी ना साधं लिहावं. साधं जास्ती परिणामकारक असतं, उगाच सतत अवघड शब्दांचे ड्रायफ्रुट्स टाकायचा हव्यास नको, दिसतं छान, भरजरी पण पेललं पाहिजे ना वाचणा-याला आणि आधी स्वत:लाही. स्वच्छ धुतलेल्या चेह-याची हसरी बाई, मेकपची पुटं चढवून लिपस्टिक बिघडू नये अशा बेतानी नकली हसणा-या बाईपेक्षा देखणी असते एवढं लक्षात ठेवलं की झालं.



-- जयंत विद्वांस

Saturday, 24 January 2015

वेंधळा…

साल एक्याण्णव. तीच ती मसाला डोसा आणि सवाई पोस्ट मधली. डेक्कनला भेटूयात म्हणाली. तेंव्हा लायसन काढलेलं नव्हतं. वडिलांची लुना होती, ती किती वजन खेचणार त्यामुळे तिला गाडीवरून फिरवायच्या भानगडीत मी पडायचो नाही. मी फेदरवेट होतो पण ती गुटगुटीत होती. अर्थात तेंव्हा सहवास मिळतोय याचाच आनंद इतका होता की गाडीवरून कुठे जात नाही याची खंत वगैरे वाटायची नाही. डेक्कन थिएटरच्या बाजूला जे रोड पार्किंग आहे तिथे गाडी लावायची आणि चालत जेएम रोडला फिरायचो आम्ही. 

तर त्यादिवशी गाडी लावली आणि ती आल्यावर निघालो, फिरून झालं मग पूनमला गेलो नेहमीप्रमाणे, तिथे तानाजी वेटर आमच्या ओळखीचा होता. कितीही तास बसलं तरी कटकट वगैरे करायचा नाही. ती बसनी यायची आणि मग जाताना मी तिला घराच्या अलीकडे सोडायचो. तर आम्ही लुना शोधायला सुरवात केली. गाडी गायब. एक तर तिथे पार्किंग कायम फुल्ल असायचं. कुणीतरी चावटपणा करून गाडी हलवली का ते पण बघून झालं. इथे माझ्या अंगाला घाम सुटायची पाळी आलेली. गाडी चोरीला गेली म्हणून पुढची कम्प्लेंटची सगळी दिव्यं करावी लागणार त्याचं टेन्शन आलेलं. एक तर घरी फोन पण नव्हता. माझ्याकडे लायसन नाही. म्हणजे आता घरी जावून बाबांना स्टोरी सांगून रिक्षेनी त्यांना कागदपत्रं, लायसन घेऊन डेक्कन पोलिस चौकीला यावं लागणार, मग कम्प्लेंट, हे राम. परत उद्यापासून ते कामावर कसे जाणार ही चिंता. 

माझे तीनेक टाके उसवल्याचा इफेक्ट चेह-यावर आला असणार, ती म्हणाली 'आपण एक राउंड मारून बघुयात का? कुणीतरी मुद्दाम दुसरीकडे लावली असेल, लुनाचं लॉक काय कुणीही काढतं'. या वाक्यानी माझा अजून एक टाका उसवला हे तिच्या गावीही नव्हतं. आता दाभण नाही चालणार, मशिनवरच फाटलेली शिवावी लागणार असं वाटू लागलं. तिच्या (?) समाधानासाठी आम्ही गरवारे ओव्हरब्रीज वरून गुडलककडे निघालो. हा राउंड निरर्थक आहे हे मला माहित होतं. तरीपण निघालो. गुडलक कॉर्नरवरून परत डेक्कन थिएटरकडे. बर तिथे मधे पार्किंग नव्हतं. मग ती म्हणाली, रोड क्रॉस करून पलीकडे चेक करू नाही मिळाली तर मग कम्प्लेंट एवढाच मार्ग. 

क्रॉस करतानाच मला भरून आलं. गाडी समोर होती. ती म्हणाली, 'ती बघ गाडी समोर आहे. "कुणी आणली असेल बरं इथे?" असं म्हणालास तर इथेच बुक्का घालीन. मला खात्री होती तू मुर्खासारखी दुसरीकडे लावली असणार.' तर झालं असं होतं की गुडलकला चौकात पोलिस उभा असल्याने मी दिसेल तिथे गाडी लावून चालत गेलेलो, ते तिच्या बरोबर गप्पांमधे रमल्यामुळे विसरलो. त्यावेळी असं हरपून जायला व्हायचं खरं, आता विसरायला होतं. वेंधळेपणात एवढाच काय तो फरक.

जयंत विद्वांस        

Saturday, 10 January 2015

लल्याची पत्रं (१९) ..... नाच रे मोरा .....

प्रिय लल्यास,

तुला 'नाच रे मोरा' ऐकलयेस का? हा प्रश्नं विचारून मी माझा मूर्खपणा सिद्ध करणार नाही. काऊ चिऊची गोष्टं, इथे इथे बस रे काऊ, आईचं पत्रं हरवलं, लपाछपी, स्ट्याचू आणि 'नाच रे मोरा' याशिवाय आपल्या  बालपणाच्या सुरस कथा पूर्ण नाही होऊ शकत. त्रेपन्न सालचं गाणं आहे. एकसष्ठी झाली त्याची. खूप लहानपणी पाहिलेला 'देवबाप्पा' मी 'अलका'ला. विवेक, चित्रा आणि मेधा गुप्ते एवढी नावं आणि हे गाणं एवढंच लक्षात आहे. माझ्या माहितीत तरी हा चित्रपट सीडी, क्यासेट स्वरुपात उपलब्ध नाही, थिएटरलाही लागत नाही. पुण्यात नागनाथ पारापाशी एकजण प्रायव्हेट शो करतो पंधराशे रुपयात अशी ऐकीव माहिती आहे. दिग्दर्शक राम गबाले, विवेक, गदिमा, पुलं सगळे काळाच्या पडद्याआड गेले. मेधा गुप्ते बद्दल माहिती नाही, ती सुद्धा आजी/पणजी असेल आता. आशाताई आणि चित्रा नवाथे अजून आहेत.

या गाण्या एवढी व्हर्जन्स मी दुसऱ्या गाण्याची ऐकलेली नाहीत. लहान मुलांच्या क्यासेट, डीव्हीडीज, अनिमेटेड, इन्स्ट्रुमेंटल आणि असंख्य नविन शिकणा-या गायिका हे गाणं म्हणण्याची हौस भागवून घेतात. पण भोसलेबाईंच्या आवाजात पहिल्या 'नाच'ला जो आर्जव आहे तो कानात एवढा रुतून बसलाय ना की दुसरं कुणी म्हणू लागलं की त्याच्या गळ्यात तो लडीवाळपणा शोधण्याची वाईट सवय लागलीये. आजवर फार  सापडला नाही हा भाग वेगळा. आता रंगीत मोर दिसतो, नाचणा-या, सुंदर रंगीत कपडे घातलेल्या प-या दिसतात पण मेधा गुप्तेचा कृष्णधवल गोडवा आठवतोच.जमून येतात काही गोष्टी हेच खरं. विसुभाऊ बापट त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमात हे गाणं उलटं म्हणतात, मजा येते ऐकायला - 'चना रे रामो, च्याम्ब्याआ तनाव, चना रे रामो, चना…… म्हणून बघ एकदा संपूर्ण गाणं तसं, धमाल येते.   

बालहट्ट पुरवणं जेवढं अवघड असतं ना तेवढंच त्यांच्यासाठी, त्यांच्या वयाला शोभेल, त्यांचं वाटेल अशा भाषेत साधं, सहजसुंदर लिहिणं फार अवघड असतं असं मला वाटतं. आजकालच्या सिरियल्समधे हा हास्यास्पद प्रकार तुला बघायला मिळेल. एकतर ती मुलं वयापेक्षा जास्त किंमतीचे सुविचार बोलतात किंवा वयाला न शोभेल असं लाडं लाडं तरी बोलतात, एक मात्रं आहे अगदी समंजस वगैरे दिसतात ही पोरं किंवा वाटतात. खरंतर त्याच्यासाठी त्या वयात, भूमिकेत शिरणारा कवी/लेखक हवा. गदिमांबद्दल मी काय बोलावं? मनात मूल जपलेला माणूस (पुलंनी त्यांच्यावर लिहिलेलं वाच). 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान…. ' त्यांचंच. मला त्यांची ही दोन्ही गाणी जाम आवडतात.   

असो! जोपर्यंत मराठी/इंग्रजी बालवाड्यातून ग्यादरिंगमधे विविध गुणदर्शन कार्यक्रम जिवंत आहे, होईल तोपर्यंत त्यात 'नाच रे मोरा' वर पार्श्वभागावर खोटी मोरपिसं लावून ती चिमुकली देखणी पोरं डान्स करणारच आणि जोपर्यंत पुण्यात गणेशोत्सव चालू आहे, नातुबागेला लायटिंग करतील तोवर 'नाच रे मोरा' तिथे वाजणारच हे निश्चित (मग इतर भाषिक जबरा ऱ्हिदमची गाणी किती का वाजेनात). चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय. 

--जयंत विद्वांस
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...
झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...
थेंब थेंब तळयात नाचती रे टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ..... 
 
 
 

Saturday, 3 January 2015

लोकमान्य - एक युगपुरुष.....

साल १९९८, स्थळ बांगलादेश, अंधार पडलेला, शेवटच्या दोन चेंडूत तीन धावा हव्या असताना सकलेनला फोर मारणारा हृषीकेश कानिटकर लक्षात राहतो पण आधी ३१४ चा पाठलाग करत तिथे पोचवणा-या सौरव गांगुलीच्या १२४ धावा विस्मरणात जातात तसंच झालं टिळकांच्या बाबतीत. १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९२० साली गेलेले टिळक आणि इतर नेते विस्मृतीत गेले. पिढी बदलल्यामुळे किंवा सोयीचं असेल म्हणून स्वातंत्र्याचा इतिहास फक्तं गांधी आणि नेहरू यांच्यावर केंद्रित झाला. 

चित्रपटाचं कठोर समीक्षण वगैरे करायच्या भानगडीत मी पडणार नाही पण थोडं न आवडलेलं पण आहे. खरंतर असे चित्रपट मी श्रद्धेनी, भाबडेपणानी बघतो. तर चित्रपट दोन समांतर पातळीवर चालतो, आजचा तरुण - चिन्मय मांडलेकर - टिळकांच्या भाषणाची ध्वनिफीत ऐकून भारावतो आणि आजच्या काळाची टिळकांच्या आयुष्याशी सांगड घालू पहातो. जी चित्रपटात फार परिणामकारक दिसत नाही. एका भाषणानी तो एवढा बदलतो, विचार करायला लागतो हे जरा खटकेबल आहे पण फार चर्चा करण्याएवढ नाही.

मुळात चित्रपटात टिळकांच्या आयुष्यातले मोजकेच प्रसंग आलेत. आगरकर टिळकांचे वाद, जहाल अग्रलेख टिळक सांगत आहेत, कोर्ट केसेस वगैरे भाग जास्ती असता तरी चाललं असतं, गणेशोत्सव, रंडचा खून, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, आगरकरांशी वाद तुकड्या  तुकड्यांनी समोर येतात, मधेच चालू काळाशी सांधा जुळवल्यामुळे आधीच्या प्रसंगाचा इफेक्ट कमी होतो. पूर्ण टिळक दाखवले असते अडीच तास तर ते जास्तं परिणामकारक झालं असतं असं माझं मत.

चित्रपटात जुना काळ मात्रं उत्तम उभा केलाय. वेशभूषा, कंदील, जुने वाडे, शनिवारवाडा, केसरी वाडा सुंदर दाखवलंय सगळं. टिळकांची दूरदृष्टी  केवढी अफाट होती याची साक्ष देणारी वाक्यं स्मितीत करतात. १८९७ ला कोकण रेल्वेचं स्वप्नं, नोकरीकरता नको तर ज्ञानाकरिता शिका, त्याचा वापर देशासाठी करा, स्वदेशी वापरा (आत्ताही तोच नारा चालू आहे अजून) असे विचार त्यांनी शंभर वर्षापूर्वी सांगितलेत, हे कळतं. 

सुबोध भावे हा मोठा नशीबवान माणूस आहे. 'अरे, हा तर बालगंधर्व' म्हणणारे टिळक आणि ज्याला म्हणाले तो 'बालगंधर्व', त्याला दोन्ही साकार करता आले. नशिबवान हा शब्दं फक्तं रोल मिळण्याच्या दृष्टीनी मी वापरलाय. सुबोध 'टिळकांचं' चालणं आणि भेदक डोळे मात्रं दृष्टं लागण्याजोगे. वयातले फरक देहबोलीतून फार सुंदर दाखवलेत त्यानी. 'सरकारचं डोकं…' आणि 'स्वराज्यं हा माझा….' ही सुप्रसिद्ध वाक्यं म्हणताना त्याचा लागलेला आवाज आणि ते पाणीदार डोळे पहात रहावेत. बेन किंग्जलेचा गांधी जितका सुरेख तितकाच आमचा सुबोध 'टिळक'  ही सरस. आयुष्याच्या संध्याकाळी मंडालेहून परत आल्यावर पुण्यात टिळक संध्याकाळच्या वेळी कंदील घेऊन उभे राहिलेल्या प्रचंड जनसमुदायाला दर्शन देतात तो शॉट गहिवर आणतो.

बाहेरच्या जगात मोडर्न असलेले प्रेक्षक थिएटरच्या अंधारात अजूनही टिळकांच्या एन्ट्रीला, रान्डच्या खुनाला, स्वराज्यं हा माझा…. या वाक्याला टाळ्या, शिट्ट्या वाजवतात आणि चित्रपट संपल्यावर उभे राहून हात जोडतात तेंव्हा जे वाटतं ते सांगता नाही येणार. न पाहिलेला, ज्यांच्याबद्दल काही मोजकेच प्रसंग माहित असलेला हा लोकमान्यं जाऊन आता चौ-याण्णव वर्ष झाली पण तरीही तो करारी, मिशाळ माणूस शेवटी काहीतरी कालवाकालव  करून गेला.


जयंत विद्वांस  


Monday, 29 December 2014

आदमी उठ जाता है.....

प्रिंट मिडीआ काय आणि च्यानल्स काय यांच्यासाठी काहीतरी आचारसंहिता, कायदा, दंडात्मक कारवाई करणं असे उपाय गरजेचे आहेत. अर्धवट माहिती बोंबलून सांगायची आणि एखाद्याला आयुष्यातून उठवायचं. बरं, वाचणारे, पाहणारे पण इतके हरामखोर असतात की त्याच बातमीवरच्या खुलाश्यांकडे त्यांचं लक्ष जात नाही. च्यानल्सवर चालणा-या एकांगी चर्चा, एखादयाला कॉर्नर करून वदवून घ्यायच्या पद्धती आणि त्यातून निर्माण होणारे वाद, एकूणच किळसवाणा प्रकार असतो. तरुण वयात चमकण्याची संधी मिळते म्हणून असं होतं, हे म्हणायलाही वाव नाही, दिग्गज लोक हक्क असल्यासारखा तोच प्रकार करत असतात. चटपटीत, निरुत्तर करता येईल असं बोलता येणं हे क्वालिफिकेशन हवं, ज्ञान कमी असलं तरी चालेल, माहिती जास्तं हवी. 

शिरीष कणेकरांनी सांगितलेला किस्सा आहे. संपादकांनी तरुण पत्रकार पोरीला काम सांगितलं, 'परवा आंबेडकर जयंती आहे त्यांच्यावर लिहा काहीतरी'. पोरगी पंधरा वीस मिनिटांनी खूप श्रम करून आली आणि म्हणाली 'But he is not in Directory'. संपादक काय करेल आता यावर. एकूणच चकमकाट जास्ती आहे सगळा. दिखावा, सूज आहे, ताकद कमी. व्यासंग कमी आणि इंस्टन्ट अभ्यास दांडगा. आपण जे बोलतोय, छापतोय याची शहानिशा करावी, त्या माणसाची बाजूही छापावी, आधी मोघम बातमी देऊन पूर्ण बातमी संपूर्ण सत्यं कळाल्यावर द्यावी वगैरे प्रकार अस्तित्वात नाहीत. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे पुढची गोष्टं (अजून एक आहे पण ती नंतर कधीतरी) -
    
मित्रमंडळ कॉलनी मधे एक दातांचे डॉक्टर आहेत. गेली पस्तीस एक वर्ष त्यांचा दवाखाना आहे. सज्जन माणूस. मी, माझ्या आईने त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे. एक तर पार्टीशन घालून केलेला दवाखाना,  चाललंय ते बाहेर दिसू शकेल असा. एका भल्या सकाळी पेपरला बातमी आली 'डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग'. 'काल पर्वती दर्शन येथे अमुकतमुक डॉक्टरांनी ढमुक महिलेचा विनयभंग केला, तिच्या नव-यानी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे'. नाव, पत्ता सगळं बिनचूक. जंगी बातमी होती. आश्चर्य वाटलं. रिकामटेकड्या लोकांनी आपापल्या परीनी मसाला घालून शरीरसंबंधाच्या जवळपास बातमी आणली असणार.

दोन दिवसांनी आतल्या पानावर छोटा खुलासा छापून आला होता. त्या बाईचा नवरा दारू पिऊन ट्रीटमेंटला गेलेला. डॉक्टरांनी त्याला सभ्यं भाषेत सांगितलं, 'शुद्धीवर असताना या'. अपमानच की हा त्या पेशंटचा. त्याची बायकोही त्याच्या लेव्हलचीच असणार. या अत्यंत मानहानिकारक अपमानाचा बदल घ्यायलाच हवा. दोघं तडक पोलीस चौकीत गेले. पोलिसांनाही काम नसणार, तक्रार करणा-याची शारीरिक अवस्था दिसली नसावी बहुतेक. त्यांनी लगेच त्याची ब्रेकिंग न्यूज केली. काय मिळालं हा प्रश्नं आहेच. हिंदी/साउथचे देमार पिक्चर तुफान चालायचं हे एक कारण आहे. डॉक्टरांनी तिथेच वाजवायला हवं होतं फिल्मी स्टाईल. चुकलंच त्याचं. कार्यतत्पर पोलिसांनी विनासायास बसल्या जागी, एका सज्जन माणसाला आयुष्यभर लक्षात राहील अशी कुप्रसिद्धी मिळवून दिली.  


छापणा-याला काय घाई होती एवढी? डॉक्टर हा खालच्या दर्जाचा माणूस आहे? त्याचं स्टेटमेंट छापायला नको? दोन  दिवसांनी सॉरी म्हणून त्याची गेलेली पत कशी परत येणार? अशीच दुसरी एक जीवघेणी स्टोरी आहे, ती परत कधी तरी. स्टोरी शब्दं चुकीचा आहे कारण ज्याच्या बाबतीत घडतं त्याला तो कडू घोट असतो. 

जयंत विद्वांस   

Thursday, 25 December 2014

साबळेमामा.....

पर्वती दर्शनला चाळीत रहायचो तेंव्हा. एका रात्री समोरच्या साळवींच्या दारालगतच्या कट्ट्यावर साबळेमामा अवतीर्ण झाले. पाच फुटाच्या आतली उंची, टिळकांसारख्या झुबेकदार पांढ-या मिशा, टोपी, नेहरू शर्ट आणि धोतर कुठल्याही जगन्मान्यं वाशिंग पावडरला हात टेकायला लावतील अशा, वर्णन करायला मराठी भाषा अपुरी आहे असं वाटायला लावणा-या, मातकट रंगाला पोचलेलं. बरोबर एक वळकटी, एक बंडी आणि एक धोतर अतिरिक्त आणि सुतारकामाच्या हत्यारांनी भरलेलं एक गोणपाट, एवढीच स्थावर जंगम मालमत्ता. सुतारकाम करायचे ते.

माणुसकी तेंव्हा घराघरात शिल्लक होती. कोण कुठले महाबळेश्वरजवळच्या एका खेड्यातले साबळे मामा, आधी कधी इथे केलेल्या कामावर, जुजबी ओळखीवर जगायला पुण्यात आले, स्थिरावले, संपले. हळूहळू शेजारच्या मारण्यांकडे जेवायची सोय झाली, त्यांना चार पैसे मिळाले, यांचीही सोय झाली. पावसाळ्यात उघड्यावर कसं झोपणार म्हणून मग झोपायचीही सोय झाली. आतल्या खोलीकडे जाणा-या बोळात कमीत कमी जागा व्यापून झोपायचे. परका, नात्यागोत्याचा नसलेला हा माणूस त्यांच्या घरातलाच होऊन गेला.

आमच्या त्या घरात जे काय सुतारकाम झालं ते त्यांनीच केलं. पैसे बाबा देतील तेवढे, ठरवणं, तक्रार वगैरे प्रकार नाही. कामाला फिनिशिंग नसायचं फार पण दणकट काम करायचे. आमची शोकेस, टी.व्ही.चं कोलाप्सिबल डोअर त्यांनी केलं हा आश्चर्याचा भाग होता. कंटाळा येउन माणूस नविन शोकेस आणेल एवढं स्लोमोशनमधे फास्ट काम असायचं. बाहेरच्या खोलीला प्लायवूडचं सिलिंग, फोल्डिंग विळीचं झाकण तुटलं म्हणून त्यांनी मोठ्ठ्या पाटावर लावून दिलेलं ते पातं, दीड माणूस बसेल एवढे मोठ्ठाले पाच सहा पाट, एक स्टूल, उकिडवं बसायला लागू नये म्हणून केलेलं पाऊण फूट उंचीचं स्टूल, मांडणी आणि तिचा तहहयात मेंटेनंस, टेबल कम कपाटाच पुनरुज्जीवन, पट्ट्या मारणे, काढणे हे सगळं त्यांनीच केलंय. पाट, स्टूल आणि विळी अजून धडधाकट आहेत, अजून तीस चाळीस वर्ष टिकतील. 
बरं हे सगळं काम टाकाऊतून टिकाऊ, अगदीच लागलं तर नविन मटेरीअल आणायचे. शनिवारी, रविवारी ते पटाशी, करवतीला धार लावायचे. खालच्या ओठाला फोड येउन तो सुजलाय की काय असं वाटेल एवढी तंबाखू ओठात ठेवून चार चार तास एका जागी बसून गाण्याचा रियाझ केल्यासारखं काम चालू असायचं. बघणारा कंटाळेल. तीच गत पॉलिश करताना, मन लावून करायचे, आपल्याला कंटाळा येईल इतकं. पण त्यांनी भरलेलं मेण आणि पॉलिश टिकायचं मात्रं भरपूर. तसे लहरी होते. कितीही कडकी असली तरी ज्या माणसाशी पटत नाही त्याचं काम ते घ्यायचे नाहीत. कुणाकडे हाताखाली कामही करायचे नाहीत. त्यामुळे आवक तुटपुंजी असायची पण कधी कुणापुढे हात पसरायचे नाहीत. माझी आई त्यांची बँक होती. अधूनमधून ओव्हरड्राफ्ट लागायचा.       

रोज उठून सुतारकाम कुणाकडे निघणार? वयही होत चाललेलं, मग ते त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पुतण्याकडे रहायला गेले. जाताना पत्ता आणि जवळचा फोन नंबर देऊन गेले. एकादशीच्या घरी शिवरात्र असा प्रकार असणार. फार महिने राहिले नाहीत. परत आले. सुतारकाम कुठलं जमायला आता. बाणेर रोडला एका प्लॉटवर खोपट्यात सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागले. तसेही ते एकटेच होते आता तर एकांतवासातच गेले. आजूबाजूला फक्तं रिकामे प्लॉटस आणि त्यांचे गार्ड. दिवसाच्या आणि आयुष्याच्या संध्याकाळी असं एकट जगणं फार क्रूर असतं. दारू कितीही वाईट असली तरी अशा लोकांना ती मोठी मदतीची असते.
एका रात्री त्यांनी त्या खोपटातच राम म्हटला. दोन दिवसांनी शेजारच्या गार्डनी डोकावलं, मग पोलिस आले. त्यांनी जागामालकाला आमचा पत्ता, फोन नंबर दिलेला त्यामुळे ससूनमधून फोन आल्यावर मी, मारण्यांचा शशा, रमेश आणि अजून एक जण ससूनला गेलो. तोपर्यंत आईनी त्यांच्या पुतण्याला आणि पुतणीला गावाला फोन लावला. दोघांच्या भाडेखर्चाची तजवीज, एसटी मिळायला पाहिजे, त्यांना उशीर झाला. प्रेत फार वेळ ठेवण्याच्या लायकीचं नव्हतं, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टर म्हणाले, फार वेळ ठेवू नका, फुटतील. त्यामुळे घरी नेण्याचा प्रश्नं नव्हता. रीतसर ताबा घेऊन वैकुंठात आलो, पुतण्याची वाट बघितली थोडा वेळ, भडाग्नी देऊन चौघं परत आलो.  

संध्याकाळी दोघे आले. साधी माणसं खूप मायेने, पोटातून रडतात. एवढ्या दु:खात सुद्धा आम्ही सगळं केल्याचं त्यांना कौतुक वाटत होतं. म्हटलं ना,  कुणाचे कोण. काही काळ सोबत राहिले, निघून गेले. जयवंता म्हणायचे ते. अहो, जयंता असं नाव आहे असं सांगितलं तर मिशाळ हसत 'माझ्या तोंडात जयवंता बसलंय' म्हणायचे. तशी हाक क्वचित कानावर पडते. गावाकडचा माणूस आला कुणी की पडते कानावर मग स्लोमोशन साबळे मामा आठवतात. 

कुठे सोय नसली, पैसे नसले की घुटमळायचे. खाताय का भात म्हटलं की ओशाळून हो म्हणायचे. वर्षातील प्रत्येक सण, सकाळ किंवा दुपारचा चहा किंवा एरवीही चांगलं चुंगलं काही केलं तरी साबळेमामांचा भाग काढलेला असायचा. घरात काही चांगलं चुंगलं केलं की मला आमचे व्ही.व्ही.बी, साबळे मामा, शेजारचे ओगले, माझी आजी आठवते आणि पापण्यांच्या पागोळीला थेंब जमा होतो.

आधी आई आणि आता बायको अन्नपूर्णा आणि सढळ हाताच्या आहेत हे माझं भाग्यं. आई, बाबांनी त्यामुळे अनेक माणसं जोडली, आपलीशी केली. त्या लोकांचे तृप्ततेचे, कृतज्ञतेचे आशिर्वाद 'यांच्या पोराबाळांचे चांगलं  होऊ देत' असेच असणार. आई वडील असतील तेवढे पैसे, इस्टेट तर ठेवतीलच मागे पण ह्या लोकांच्या तृप्तीच्या, कृतज्ञतेच्या अगणित आशिर्वादांची पुंजी त्यांनी आमच्याकरता ठेवलीये त्याची मोजदाद नाही करता येत.


--जयंत विद्वांस   
                           


Friday, 19 December 2014

वन्स अपॉन अ टाईम (४)......

जर्मन लोकांची परफेक्शनची हौस आणि लढाऊ वृत्ती मोठी घेण्यासारखी आहे. कणखर मानसिकता त्यांच्या डिएनए मधेच असावी. हिटलरचा डाग सोडला तर त्यांच्याबद्दल वाईट बोलावं असा तो देश नाही. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे १९९३ ची विम्बल्डन फायनल. रुथलेस जर्मन ग्राफ आणि मेहनती चेक नोव्होत्ना. असाच त्यांचा मेहनती पण कमनशिबी माणूस इव्हान लेंडल.

अभ्यास करून, कठोर मेहनत करून काहीजण मार्क मिळवतात तर काहीजण उपजत बुद्धीवर फार कष्ट न घेता पहिले वगैरे येतात. अशावेळेस मेहनती लोकांना काय वाटत असेल ते तेच जाणे. लेंडल असाच मेहनती, कठोर परिश्रम घेणारा माणूस होता. ऑस्ट्रेलियन दोन वेळा, युएस ओपन तीन वेळा, फ्रेंच चार वेळा त्यानी जिंकलं. पहिल्या जागी एकदा विम्बल्डन हे त्याचं स्वप्नं शेवटपर्यंत पूर्ण झालं नाही. क्रिकेटमधे लॉर्डस वरच्या शतकाची जी किंमत आहे तेवढीच टेनिस प्लेयरला विम्बल्डन जिंकल्याची. माझी सगळी पदके, कप परत घ्या हवंतर पण एक विम्बल्डन द्या असं म्हणाला होता लेंडल.  दोनदा त्याला नशिबानी हुलकावणी दिली.

साल १९८६. विम्बल्डन फायनलला जर्मन बूम बूम बेकर. एक सळसळता उत्साह, एक व्यासंगी, अभ्यासू विद्यार्थी. एक जम्पिंग ज्याक जितेंद्र, एक धीरगंभीर बलराज सहानी. सहानीच्या अभिनयाचं तुम्ही कौतुक करता पण तुम्हांला आवडतो तो जितेंद्रच. तसंच झालं, बेकरनी त्याला सरळ तीन सेट मधे घुमवला. साल १९८७.  लेंडल एक  नंबर होता. कोनर्स, विलंडर आधीच हरले होते आणि विम्बल्डन फायनलला ऑस्ट्रेलियाचा प्याट कॅश. विम्बल्डन सोडून लेंडल सगळीकडे जिंकला आणि कॅश आयुष्यात ग्रांड स्लाम मधली एकंच फायनल जिंकला, ती विम्बल्डनची. कॅशनी पण त्याला सरळ तीन सेटमधे घुमवला. नशिबात नव्हतं हेच खरं. 


साल १९९३. याना नोवोत्ना आणि स्टेफी ग्राफ. पहिला सेट नोव्होत्ना काट्यावर हरली ६-७ (टायब्रेक ६-८), दुसरा सेट तिनी ६-१ घेतला. तिस-या सेट मधे ४-१ (४०-३०) वर तिची सर्व्हिस होती. तो गेम जिंकला की ५-१ ची सणसणीत आघाडी, ग्राफनी सर्व्हिस राखली तरी स्वत:ची सर्व्हिस राखली की संपला विषय. आनंदात हातात तोंड झाकून गुडघ्यावर बसायचं आणि नेटजवळ शेकहांडसाठी थांबलेल्या स्टेफी कडे जायचं. पण तिला हाकेच्या अंतरावर खुणावणा-या यशाचं तिला टेन्शन आलं. यश पचवायला ताकद लागते तसंच आत्मविश्वासानी पाय न डगमगू देता त्याच्यापर्यंतचं अंतर पार करणं याला सुद्धा ताकद लागते. यानानी डबल फौल्ट केला आणि रुथलेस स्टेफीनी यानाची मानसिक स्थिती ओळखत तिचं खच्चीकरण केलं. स्टेफीनी सलग सहा गेम घेतल्या आणि सामना ७-६, १-६, ६-४ असा जिंकला. यानाच्या डोळ्यासमोरून तिचं हातातोंडाशी आलेलं विजेतपद, ते ही विम्बल्डनचं, आपल्याच प्रियकराने दुस-या मुलीच्या गळ्यात हात घालून आपल्यासमोरून हसत हसत निघून जावं तसं लांब गेलं. निदान नोव्होत्नानी नंतर ९८ ला जिंकलं तरी विम्बल्डन, देशबांधव लेंडल एवढी फुटक्या नशिबाची नाही निघाली ती.

पदक देण्याच्या समारंभात ती डचेस ऑफ केंटच्या खांद्यावर ढसाढसा रडली आणि माझ्या पण डोळ्यासमोरचं चित्रं जरा धुसर झालंच.

जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (३).....

वेस्टइंडीजचा सुवर्णकाळ संपला ही क्रिकेटच्या दृष्टीने फार वाईट घटना होती, आहे, राहील. एकदम दिलदार प्रतिस्पर्धी. त्यांना हरवल्यावर आपण काही तरी कमावलं अशी भावना जेत्याच्या मनात निर्माण करणारा. थोरले रावसाहेब गेल्यावर त्यांच्या समृद्धीची, दरा-याची पुसटशी आठवण त्यांच्या वारसात  अधून मधून व्हावी आणि त्यावरच आपण समाधान मानावं अशी त्यांची दुरावस्था झाली. लारा, हूपर, अम्ब्रोस, वाल्श आणि इतर यांनी त्यांच्या परीनी बुडती बोट काही काळ सावरली. पुढचा वारस तोडीचा नसेल तर मग अवघड होतं. मरेच्या जागी दुजा फिट होता त्यानंतर थोडा फार रिडली जेकब सोडला तर त्यांचा विकेटकिपर आठवावा लागेल. मुळात त्यांचे आग ओकणारे भन्नाट गोलंदाज दुष्काळ पडावा तसे गायब झाले.

अम्ब्रोस आणि वाल्श ही शेवटची भन्नाट जोडगोळी होती. वाल्श आधी लेगस्पिन टाकायचा आणि कुंबळे मध्यमगती. कोचच्या सांगण्यावरून वाल्शनी फास्ट टाकायला सुरवात केली आणि कुंबळेने लेगस्पिन. त्यामुळे वाल्शचा लेगकटर इतरांपेक्षा घातक होता तर कुंबळेचा लेगस्पिन टर्नपेक्षा वेगवान होता. मनगटात ताकद असली की, आत्मविश्वास असला की लोक मनगटाच्या पुढचा भाग ज्योतिषापुढे पसरून बसत नाहीत. 
इंग्लंडमधे इंग्लंड विरुद्ध सामना चालू होता. विंडीज हरणार हे कन्फर्म होतं. बहुतेक रिची रिचर्डसन कप्तान होता. चौथ्या दिवशीच डावानी हरायची नामुष्की समोर होती. अतीव करुणेतून उत्तम विनोद, उपहास निर्माण होत असावा. रिचर्डसननी अम्ब्रोसला विचारलं, कितीचा लिड मिळाला तर आपण इंग्लंडला हरवू शकू? ब्याट्समन बीट झाल्यावर क्वचित त्याच्याकडे बघून तो "वाचलास लेका" अशा अर्थाचं स्मित करायचा. त्याची ब्याटिंग मात्रं विनोदी असायची. अम्ब्रोसनी एकंच शब्दं सांगितला "शंभर". संपताना १०५ चा लिड देऊन विंडीज संघ बाद झाला. 

सकाळी लंचच्या आत इंग्लंड जिंकणार हे शेंबड पोर सांगू शकलं असतं. जे घडलं ते अविश्वसनियं होतं. इंग्लंड सर्वबाद ९५. अम्ब्रोस पाच वाल्श पाच. अंगावर बोलिंग न करता. भन्नाट वेग आणि इंग्लंडचा स्विंग यांनी वापरला. याला म्हणतात जिगर, स्वत:च्या कर्तुत्वावरचा आत्मविश्वास. रावडी राठोडच तो विंडीजचा. जो वो बोलता है वो करताच है.   
 
जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (२).....

स्लेजिंग हा आता खेळाचाच भाग आहे. फक्तं घाणेरडा बोलणं म्हणजे स्लेजिंग नव्हे तर तुच्छतेनं बघणं, थुंकणं, कुत्सित हसणं, कुचकट बोलणं असं प्याकेज आहे ते. एक तर तुमचं कर्तुत्वं अफाट असलं पाहिजे की लोक तुम्हांला डिवचायला घाबरले पाहिजेत किंवा वेस्टइंडीजसारखी ताकद. बिशाद होती काय त्यांच्या ब्याट्समनला डिवचायची, पाच वखवखलेले लांडगे असायचे. तुमची ब्याटिंग जर अबला देखणी नारी असेल तर समोरचे पाच शक्ती कपूर, अमरीश पुरी, प्राण, सुधीर आणि रणजित समजा म्हणजे यातना कळतील.

अफाट कर्तुत्वाची उदाहरणं म्हणजे गावसकर, सचिन तेंडूलकर. शारजात झिम्बाब्वेचा हेन्री ओलोंगा सचिनला आउट केल्यावर नाच रे मोर सारखा हाफ पिच पर्यंत नाचला, होतं असं अतीव आनंदात खरं तर. पुढच्या म्याचला स्पिनरला हाणावा तसा पुढे येऊन येऊन मारला सचिननी त्याला.चामिंडा वाझ बोलता बोलता एकदा म्हणाला, दोनचार फोर कटवर दिल्या की होतो आउट. दुस-या दिवशी बाळासाहेबांनी मिडऑफ, मिडऑन मधे खेळत श्रीलंकादहन केलं. खरंतर हे स्लेजिंग नव्हतं.


मन्सूरअलीखान पतौडी त्याच्या वन लायनर करता प्रासिद्ध होता. समोरच्याला निरुत्तर करायचा. त्याला हसून गडाबडा लोळायला लावलं ते आपल्या पद्माकर शिवलकरनी. आपल्या तुपल्यातल्या म्याचेस होत्या. पतौडी कप्तान होता. त्यांनी शिवलकरला विचारलं, यॉर्कर जमेल काय? शिवलकर हो म्हणाले. निम्म्या रनप मधून थांबून जवळ येउन त्यांनी विचारलं, कशावर टाकू, ऑफ, मिडल की लेग? 

महाराष्ट्र विरुद्ध मुंबई अशा जुन्या शत्रूंची रणजी होती. महाराष्ट्राचा लेगस्पिनर सुनिल गुदगे बोलिंगला होता. विकेट पडल्यावर संदीप पाटील आला, इकडच्या टोकाला रवि शास्त्री उभा. पाटीलनी गुद्गेला ऐकू जाईल असं शास्त्रीला विचारलं, काय टाकतो रे हा? (गुदगे नाव असलेले लेगी होते). शास्त्रीनी शक्यं तेवढा उपहास आणत सांगितलं, 'दोन लेगस्पिन टाकले की तिसरा गुगली टाकतो, बाकी घाबरण्यासारखं काही नाही. गुदगे खच्चीकरण झाल्यासारखे पायापाशी गोळा झाले. संपूर्ण सामन्यात गुगली नाही, फुल्टास आणि शोर्ट पिच, नुसती धुलाई. 

जावेद मियांदादला एकदा विचारलेलं, पाकिस्तानी खेळाडूंवर सेल्जिंगचा परिणाम होताना का दिसत नाही? मियांदाद पण भारी, आमचे सगळे अशिक्षित, इंग्लिश येतंय कुणाला, अर्थ कळाला तर राग येईल ना. तात्पर्य काहीवेळेस निरक्षर असणंही फायदेशीर असतं तर. 

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (१)…

कुठलीही गोष्टं अती वाईटच पण योग्यं प्रमाणात घेतलेलं अल्कोहोल हे भूक लागण्यासाठी चांगलं असतं असं म्हणतात (आसव म्हणजे वेगळं काय असतं? द्राक्षासव आख्खी बाटली पिऊन बघा). काही लोक मात्रं अपवाद असतात. शरीराची रचना, सवय की अजून काही कारण माहीत नाही पण नियम वगैरे ते लोक धाब्यावर बसवतात. 

खळ्या पडणारा, लंकेला वर्ल्डकप मिळवून देणारा, पहिल्या पंधरा ओव्हरमधे धुवा फक्तं असा संदेश देणारा, पोट सुटलेला अर्जुना रणतुंगा माझा आवडता माणूस या बाबत. फुग्यासारखं पुढे लोंबणारं पोट घेऊन खेळणारा रणतुंगा फसवा होता. थर्डम्यानला, कव्हरला तो चिकी सिंगल जबरा काढायचा, तो रनाउट होईल या आशेपोटी त्याला इतर प्रकारांनी बाद करायला विसरायला व्हायचं बहुतेक. तोपर्यंत हा जाडूमल पन्नाशीच्या जवळ असायचा. दमला म्हणून तो फिल्डिंगला आला नाही असं क्वचित घडलं असावं. ९३ टेस्ट आणि २६९ वनडे खेळणं हा गमतीचा भाग नाही. दोन्हीत मिळून साडेबारा हजारच्या आसपास धावा आणि पंचाण्णव विकेट घेतल्या त्यानी. खेळाडूचं म्हणून त्याचं शरीर कधीच वाटलं नाही. 

ऑस्ट्रेलियाचा मर्व्ह ह्यूज असाच वल्ली माणूस आणि नावाप्रमाणेच ह्यूज. तो ४-५ जग बिअर प्यायचा रोज म्याच झाली की. एकदा बोर्डरनी त्याला भोसडला. ह्यूज पण खमक्या, तुला काय हवं ते सांग, बिअरचं मी बघतो. बोर्डर म्हणाला, उद्या पाच विकेट हव्यात. दुस-या दिवशी ह्युजनी पाच काढल्या, आवाज बंद, बिअर झिंदाबाद. असाच ऑस्ट्रेलियाचाच लंबूटांग डावखुरा ब्रूस रीड (सहा फुट आठ इंच, जवळपास जोएल गार्नरच्या उंचीचा) होता. त्याला दमा होता. त्यामुळे तो फार खेळू शकला नाही पण जे काय टाकायचा तो वेग भन्नाट असायचा त्याचा.

वर्ल्डवाईड सर्टिफाईड कामदेव विव्ह रिचर्डस बद्दल काय बोलावं? पावणे सहाफुटावर एक इंच असलेला ऐंशी किलोचा रिचर्डस लौइड, गार्नर, होल्डिंग मुळे बुटका वाटायचा. (काय साला डौल होता त्याच्या चालण्याला. नीनाची काय चूक नाय). एकतर वेस्ट इंडीज असा देश अस्तित्वात नाही. बेटांचा समूह मिळून ते टीम बनवतात त्यामुळे ते एकमेकाला फारसे जुमानत नाहीत. इंग्लंडमधे म्याच संपली की रिचर्डस तीनचार जणी बगलेत घेऊन गायब व्हायचा, रात्रभर दारू आणि स्त्रीसंग. सकाळी मैदानात हजर. एकदा लौइडनी दिवस संपल्यावर जाळ काढला, उद्या आपली ब्याटिंग आहे आज तू जायचं नाहीस. रिचर्डस काय विभागवार निवड समितीतून आलेला नव्हता. त्यानी जाता जाता सांगितलं, ग्रिनिज, हेंस लंचपर्यंत आरामात खेळतील. झालाच चुकून लवकर आउट तर तू जा, मी लंचच्या आत येतोच. रात्रभर रासक्रीडा करून सकाळी पठ्ठा लंचच्या आधी एक तास हजर. विकेट पडल्यावर गेला खेळायला धुमसत. टी टायमाला सेन्चुरी हाणून आउट, परत हा जायला मोकळा. लौइडचा खेळ होतो, जीव इंग्लिश गोलंदाजांचा गेला.

ज्याची जशी बुद्धी तसं तो घेतो. रिचर्डसचे संध्याकाळी बाहेर जायचे गुण रवि शास्त्रीनी बरोबर घेतले. 

--जयंत विद्वांस

Thursday, 18 December 2014

न फिटणारी ऋणं.....

जर माझ्या अंगात जे काय हाताच्या बोटावर मोजण्याइतके सद्गुण असतील तर ते मी दुस-यांचे उचलले आहेत. व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा हा गुण उपजत लागतो, तो अंगी बाणवायला फार त्रास होतो. पण दुसरा जेंव्हा ते आपल्यासाठी करतो तेंव्हा माझ्यातली ती उणीव प्रकर्षानी मला जाणवत आली आहे. या गुणांचे दोन वानगीदाखल नमुने सांगतो.  

घर नसल्यामुळे आम्ही ७४ ला बदलापूरला काकांकडे रहायला होतो वर्ष दीड वर्ष. मी पहिलीला होतो, आपटे चाळीत जाधव कुटुंबिय समोर रहायचं. त्यांना दोन मुलं. आमच्यावर त्यांचा भारी लोभ. वडिलांना भाम्बुर्ड्यात खोली मिळाली मग आम्ही निघालो पुण्याला. आम्हाला भेट म्हणून जाधव काकांनी 'नवा व्यापार' आणला होता. सकाळी निघताना त्यांनी भली थोरली पिशवी हातात ठेवली. आम्हाला उत्सुकता, कधी एकदा घरी नेउन खेळतोय याची. त्या खेळात कागदी नोटा असायच्या आणि तो मरतुकडा, कधीही जरासंधासारखा दोन तुकडे होतील असा, चौकोनी कागद. घरी गेलो. दुस-या दिवशी पिशवी उघडली. त्या वयात फार नाही कळली किंमत पण कुठे तरी नोंद झाली. थोडी अक्कल आल्यावर त्यांचा व्यवस्थितपणा, प्रेम समजलं. संपूर्ण कागदाच्या मागे पुठ्ठा मापात चिकटवलेला. एवढंच नाही तर प्रत्येक नोटेच्या मागेही. कुठेही तिरकं नाही, नोटेच्या बाहेर नाही, अर्धवट चिकटलेलं नाही, कॉर्नर हाताला लागणार नाहीत याची सुद्धा काळजी घेतलेली. बरं सगळ्या पुठ्ठ्यांची जाडी एकंच. संपूर्ण रात्रभर ते कुटुंब हे काम करत होतं.

पंधरा एक वर्ष तरी तो 'व्यापार' आमच्याकडे होता. आता कुणी तो खेळ खेळताना दिसत नाही. पण आम्ही तो रग्गड खेळलाय कारण तो टिकला खूप वर्ष. काय कोण डोक्यावर न फिटणारं ऋण ठेवून जाईल सांगता येत नाही. आता जाधव काका नाहीत. हल्लीच्या 'नव्या' व्यापारात त्यांच्या तो जुना झालेला 'नवा व्यापार' डोळे ओले करून जातो एवढं मात्रं खरं.


तशी परिस्थिती ओढ्ग्रस्तीचीच होती ८३ पर्यंत. मग जरा बाळसं यायला सुरवात झाली म्हणजे खाऊनपिऊन सुखी या क्याटेगरीत आलो. भाऊ माझ्या मागे दोन वर्ष. बाबांच्या दुकानात राजा मंडलिक म्हणून सहकारी होता. त्याचा भाऊ महेश मंडलिक. आता कमिन्सला आहे तो. तो माझ्या पुढे एक वर्ष. त्याची पुस्तकं तो आम्हांला द्यायचा पाचवी ते दहावी. माझी वापरून झाली की दोन वर्ष जपून मग भाऊ वापरायचा. त्याची परीक्षा संपली की आठवड्याचा आत त्याचे काका सायकलवर व्यवस्थित खालीवर पुठ्ठा लावून, कागदात प्याक करून सुतळीनी बांधलेला गठ्ठा पोच करून जायचे. पुस्तकाच्या पहिल्या पानावर महेश मंडलिक, इयत्ता अमुकतमुक एवढंच असायचं. बायांना मिशा, सफाचटवाल्याला दाढी, कुंकू, कोपरे दुमडलेले, पान गायब/फाटलेलं, मागचं पान गायब असलं काहीही नसायचं. त्याला जमत नसलेली ती काम आम्ही पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न मनापासून करायचो.

बरं कुठंही आपण काही उपकार करतोय अशी पुसट भावना चेह-यावर नसायची. तेंव्हा नागरिक शास्त्राचं पुस्तक दोन की तीन वर्षाला एकंच असायचं. त्यानी दुकानात निरोप पाठवला होता. तेवढं प्लीज तुम्ही घ्या कारण मला ते लागणार आहे. एवढं चांगलं, माणसाप्रमाणे सगळ्यांना वागता आलं तर काय सांगायचं होतं. गलबलून येतं विचार केला की. दुस-याला पुढे अजून तीन चार वर्ष परत वापरायचीयेत म्हणून जवळपास माझ्याच वयाचा तो मुलगा ती पुस्तकं जीवापाड जपून वापरायचा. 


न फिटणारी ऋणं म्हटलं ना तेच खरं. त्यामुळे कुणालाही मी गिफ्ट, भाऊबीज देतानाही पुस्तकंच देतो, लोकांना नसेलही आवडत कदाचित पण त्याला कारण हे आहे. अरे मरायच्या आधी थोडंतरी कर्ज फेडू द्याल की नाही.

जयंत विद्वांस


Saturday, 6 December 2014

लग्नंघर.....

मी हे वधूपक्षाच्या लग्नंघराबद्दल म्हणतोय. बापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी येतात. थकवा ओसरला की निघायच्या दृष्टीने रिटायर्ड लोकांनी दोनचार दिवसानंतरची जायची रिझर्वेशंस केलेली असतात.

मागे राहिलेले दहाबारा पाहुणे, घरभर अस्ताव्यस्तं पडलेलं सामान, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली प्रेझेंटस, बाहेर लावलेल्या लाईटच्या माळांचा निस्तेज प्रकाश, प्रत्येकाच्या चेह-यावर मानसिक आणि शारीरिक थकव्याचा हलकासा पफ फिरवल्यासारखा थर, कुणालाही भूक नसते पण दुपारीच जेवण झाल्यावर परतलेली, कमी दमलेली एखादी अनुभवी वयस्कं आत्या, काकी मुगाच्या डाळीची खिचडी ग्यासवर चढवते, 'पोह्याचे पापड कुठेत गं? सांग फक्तं, मी काढते ' विचारत तिच्या दृष्टीने नुसत्याच मिरवणा-या पाहुण्या मुलीला/सुनेला 'ताक घुसळतेस पटकन?' अशी आदेशवजा विनवणी करते. सुनेला त्रास न देता सापडल्याच तर दहाबारा सांडगी मिरच्या तळून ठेवते.


उद्या सकाळी जाणारे पाहुणे आपापलं सामान गोळा करतात, सकाळी घालायचे कपडे, रिझर्वेशंस वरती काढून ठेवून टूथब्रश सकाळी सापडेल अशा नेमक्या जागी ठेवतात. आजीच्या चेह-यावर लग्नाकरता एवढ्या लांबून मुद्दाम आलेल्या माणसाबद्दलचं कौतुक ओसंडून वहात असतं. परत भेट होतीये न होतीये म्हणून ती मायेने चिवडा लाडूच्या दोन पुड्या त्यांच्या हातात कोंबते. गाड्यांचे, कुणीकुणी गेल्या दोन दिवसात खर्च केलेले पैसे आठवणीने दिले जातात. सुतकात असल्यासारखे सगळेजण ऊनऊन खिचडीचे दोन घास पोटात घालतात, लग्नं कसं झालं, फोटो, दागिने यावर हलक्या आवाजात निरुत्साही चर्चा होते. अशावेळी सगळं पटापट आवरलं जातं. बापाचा हात न वाजलेल्या फोनकडे सारखा जातो. एकदाचा उत्साहानी फसफसलेला, आनंदी फोन येतो, सगळा ताण रिलीज झाल्यासारखा बाप 'मिरची फारच तिखट आहे' म्हणत तांब्यानी वरून पाणी पित डोळ्यातलं मागे सारतो. 

नमस्कार होतात, ओट्या भरल्या जातात, दिलं घेतलं जातं. आठवणी निघतात. डोळे ओले होतात, पुसले जातात, तोंडभरून आशिर्वाद मिळतात, दिले जातात, कानशिलावर बोटं मोडली जातात, परत लवकरच भेटण्याचे वायदे होतात, नातवंडांचे, माहेरवाशीणीचे गाल आजीच्या पाप्यांनी ओलसर होतात. दोनतीन दिवसात सुगी संपल्यावर पाखरं नाहीशी होतात तसा एकेक पाहुणा परततो. मग उरतो तो फक्तं नि:शब्द एकांत. मग आजी शहाण्यासारखी कोचावर सुखानी लवंडते.

शेवटच्या पाहुण्याला स्टेशनवर सोडून आलेला बाप 'मला भूक नाहीये गं, पडतो जरा' म्हणत बेडरूममधे जातो.मुलीचं कपाट उघडतो, घरी आल्यावर लागतील म्हणून तिनी ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवतो. लागूनच असलेल्या बेडवर बसतो आणि ओंजळीत तोंड धरून आवाज न करता धबधब्यासारखा फुटतो. मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होते आणि त्या फक्तं वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरते.

 
--जयंत विद्वांस