Thursday 26 February 2015

गांधीहत्या….

त्यांना नावं ठेवणे किंवा त्यांची बाजू घेणे एवढं ज्ञान मला नाही कारण एक तर तो कालावधी आपण अनुभवलेला नाही. जी काय माहिती आहे ती वाचून किंवा ऐकून मिळालेली आहे. त्याची सत्यासत्यता हा नेहमीच वादाचा विषय आहे, राहील. त्यामुळे माझी मतं त्यावर आधारित असतील.

मुळात हिंदू, भारतीय किंवा गेली तीनेकशे वर्ष इथे रहाणारे लोक सहिष्णू आहेत. एकमेकात भांडण करणं वेगळं आणि कुरापत काढून किंवा आक्रमण करून लढणं वेगळं. ते आपल्या रक्तात नाही. आपल्याकडे घराची वाटणी करताना सुद्धा भांडणं टाळण्याकडे कल त्यामुळेच असावा. वादविवाद न करता मार्ग तर काढायचा पण जाताजाता ठपका ठेवायला मिळालं तर माणूस शोधायचा हा एक गुण आपल्यात आहे. तर नमनाला किलो दोन किलो महागडं सफोला घालवून विषयावर येतो.

पाकिस्तानच्या फाळणीला एकटे गांधी जबाबदार नव्हते. गांधीच्या दोन बहुमुल्यं सुचना नेहेमी दुर्लक्षित राहिल्या, त्यातली दुसरी सहज शक्यं होती पण अंमलात आणायचं धाडस नव्हतं :-

१) इकडचे मुस्लिम तिकडे आणि तिकडचे हिंदू इकडे - हे शक्यं नव्हतं,  आपलं जन्मस्थान सोडताना सगळं उचलून दुसरीकडे कोण जाईल? त्यांना इथे सामावून घेतलं जाईल का? त्याची काही योजना होती का? इथून तिकडे गेलेले मुसलमान उपरे किंवा मुहाजिर समजले जातात तीच गत हिंदूंची झाली असती का?
२) स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस बरखास्त करावी. स्वातंत्र्य मिळवून दिल्याचं श्रेयं दवडणं नेहरूंना झेपलं नसतं हा एक भाग आणि गांधींची हतबलता.
कुठलीही गोष्टं अचानक घडत नाही, बरंच काही साठून येतं आणि मग उद्रेक होतो. गांधींची हत्या ही अचानक झालेली गोष्टं नाही. टिळक अकाली गेले, सुभाषबाबू गूढ कायम आहे आणि सावरकर आक्रमक होते पण भारतभर पाठीराखे नव्हते. आपण आक्रमक असतो तर कदाचित स्वातंत्र्य आधीच मिळालं असतं आणि गांधींचा फार झालाही नसता. इंग्रजांना गांधी परवडणारे होते कारण ते हिंसा, आक्रमण याला अनुकूल नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी किंवा त्यांच्याशीच बोलणं त्यांच्या फायद्याचं होतं. त्यामुळे तारणहार, मध्यस्थ किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योग्यं व्यक्ती म्हणजे गांधी हे लोकांच्या मनावर ठसलं. त्यामुळे त्यांना देवत्वं प्राप्तं होणं साहजिक होतं. गांधीनी उपास केला की प्रेमापोटी लोक घरी उपास करायचे. 

अशा गांधींनी फाळणीला परवानगी द्यावी हा लोकांना धक्का होता. (दिवार आठवतो मला कायम, आत जातानाचा लीडर सत्येन कप्पू आणि  बाहेर आल्यानंतरचा हताश बाप). असं काय कारण होतं हो म्हणायला हे लोकांना समजावलं गेलं नसावं किंवा पटलं नसावं. गांधींचं मुसलमान धार्जिणेपण अनेकवेळा लोकांनी पाहिलं. 'पहिल्या महायुद्धात मदत घ्या त्याबदल्यात स्वातंत्र्य द्या' या प्रस्तावाला त्यांनी केलेल्या विरोधामुळे स्वातंत्र्य तीसेक वर्ष पुढे गेलं (मिळालं असतं तर तेंव्हा तर काय मोठे दिवे लावणार हा भाग वेगळा) याचा राग होता. अडचणीत असताना अशी मागणी करणं योग्यं नाही ते त्यांचं म्हणणं होतं. असा पराकोटीचा लोकधार्जिणेपणा चीड आणणाराच होता. पाकिस्तानला पन्नास/पंचावन्न कोटी देणे हा दुसरा रागाचा मुद्दा होता आणि नौखालीत हिदुंच्या कत्तलीनंतर त्यांनी अवाक्षरही काढलं नाही हा तिसरा मुद्दा होता.
या सगळ्या घटनांचा उद्रेक कधीतरी होणं स्वाभाविक होतं. तो झाला. तो समर्थनीय आहे, नाही हे व्यक्तिपरत्वे मत बदलत रहाणार. गोपाळ गोडसेंचा नातू अजिंक्य गोडसे ८४ला माझ्या वर्गात होता अकरावीला. त्याच्या घरी त्यानी मला नेउन त्यांचा अविसर्जीत अस्थीकलश दाखवलाय. आता त्या हत्येचं समर्थन किंवा निंदा करणं हे माझ्या मते आफ्टर थौट आहेत. हत्येनंतर ब्राम्हणांना जे भोगायला लागलं ती चीड पिढ्यांपिढ्या हस्तांतरित झाली. त्यांनी खतपाणी घालून ती विषवल्ली वाढवली कारण सूड तर घ्यायचाय पण कुणावर घेणार याची फळं आहेत ती. 

--------------------------

अवांतर :

मला एक प्रश्नं पडतो नेहमी. मधुबाला जगली असती सत्तरी पर्यंत तर तिचं सौंदर्य बघणीय राहिलं असतं का? लैला-मजनू, हीर-रांझा या आणि अशा इतर जोड्यांचं लग्नं झालं असतं तर ते सुखाने नांदले असते का? गांधी जगले असते तर राष्ट्रपिता झाले असते का? त्यांना मरून मिळालेली किंमत जगून मिळाली असती का?       

आपण फार भावनिक (मुर्ख खरंतर) आहोत. ब-याच गोष्टींची आपण सरमिसळ करतो. स्वच्छ चारित्र्यं आणि सत्ता राबवता येणं या दोन भिन्नं गोष्टी आहेत. स्वातंत्र्यं मिळवायचच या भावनेनी एकत्रं आलेल्या लोकांचा समुदाय आणि त्यांचे प्रांतिक नेते हीच अवस्था होती. यात दूरदृष्टी किंवा पुढे काय करायचं नेमकं असा क्लिअर प्लान कुणाच्या डोक्यात असेल असं वाटत नाही मला तरी.


-- जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment