संगीतकार रामलाल. मोजक्याच सिनेमांना संगीत दिलंय त्यांनी, त्यातले दोन व्ही.शांताराम यांचे - 'सेहरा आणि गीत गाया पत्थरोने'. गीत गाया…' मधलं 'तेरे खयालोंमे हम' आणि 'सेहरा' मधलं 'पंख होती तो उड आती रे…'. या दोन गाण्यांपुरताच मला रामलाल माहितीये. तो मागे पडला की पाडला वगैरे इतिहास माहित नाही. 'सेहरा' मी पाहिलेलाही नाही पण 'पंख होती तो…' च्या सुरवातीचं ते टीटीटीव पहिल्यांदा गाणं ऐकलं असेन तेंव्हापासून आजतागायत लक्षात आहे. संधी मिळाली नाही की काय घुसमट होत असेल चांगल्या कलाकाराची हे त्याचं तोच जाणे. सगळी रत्नं पिशवीत आहेत आणि दुकान लावायलाच कुणी जागा देईना अशी विचित्रं परिस्थिती होत असावी.
सुरिंदर खन्ना. दोन अर्धशतकांच्या जोरावर आपण शारजाहला जिंकलेल्या एशिया कप मधे हा 'म्यान ऑफ द सिरीज' होता. त्यानंतर तो एखादी म्याच खेळला असेल. मी त्याला डायरेक्ट कॉमेंटटेटर म्हणूनच पाहिला. म्याचेस लो स्कोरिंग होत्या त्यामुळे त्याच्या अर्धशतकाची किंमत मोठी होती. फास्ट खेळायचा तो. त्याचा त्यावेळचा इंटरव्ह्यू पण मला आठवतोय, फार फार आशावादी होता पण तो फेल व्हायच्या आधीच त्याला काढला. पुढे अस्तित्वं राहणं त्याच्या नशिबात नव्हतं. आपल्याकडे रबरनी नाव खोडतात एखाद्याचं, अगदी नामोनिशाण गायब करतात. त्याच्यापेक्षा डफ्फड लोक वर्षानुवर्ष खेळले (उदा.दोन ऑफ स्पिनर - आशिष कपूर आणि निखिल चोप्रा [ज्या विकेट पडल्या असतील त्यांना, त्यात चेंडू न वळल्याचा किंवा इतर कुणाचा सहभाग निश्चित समजा}, हडकुळा चश्मिष विजय भारद्वाज आणि असे अनेक), त्याचं नशिब नव्हतं हेच खरं.
भेटू परत, असंच एखादं काहीतरी घेऊन.
--जयंत विद्वांस
No comments:
Post a Comment