प्रतिसादांनी
लोकांना काय आवडतं, काय आवडत नाही, आपल्याला अपेक्षा पूर्ण करणं किती
जमतं, दुसरा आपल्यापेक्षा वेगळं काय लिहितो, ते वाचण्यासारखं असतं का?,
दुस-याचं वाचताना जसा आपल्याला कंटाळा येतो तसंच आपलं वाचताना दुस-याला पण
येत असेल का?, आपण लिहिलेलं परत वाचताना आपल्याला कंटाळा येतो का?, असेल
तर, सुधारणा काय कराव्या लागतील?, मजकूर हा अनुभव असला तरी आपण तो चटपटीत
करण्याच्या नादात भरकटवतोय का? असे अनेक प्रश्नं विचारले स्वत:ला. मग जी
काय शैली असेल ती आपोआप होत गेली. कणेकरांचे वडील त्यांना म्हणाले होते -
'तुझं वाचताना कंटाळा येत नाही'. एवढी साधी गोष्टं लिहिताना पाळली तरी
लिखाण वाचनीय होऊ शकतं. लिहिणं हे एक चांगलं व्यसन आहे. फक्तं त्याचा रतीब
झाला की गुणवत्ता उतरते. सतत वाचनीय लिहिणं ही देणगी असू शकते किंवा तेवढा
व्यासंग असू शकतो, जे प्रत्येकाला जमेलंच असं नाही. आपण व्यक्तं
होण्याकरतो लिहितोय की बाजू मांडण्यासाठी, उगाच विरोधाकरता विरोध म्हणून
लिहितोय हे मात्रं ठरवलं पाहिजे.
एकदा लिहित गेलं की तो
कंड पाठ सोडत नाही. पण प्रतिसादाकरता लिहू नये मग निराशा येते नाही कुणाला
आवडलं तर. आधी स्वत:ला आवडलाय का याची खात्री असावी. मिळणारे सगळेच
प्रतिसाद खरे किंवा मनापासून असतात असं नाही त्यामुळे त्यांनी खूष किंवा
नाराज होऊ नये. एकदा आपली रेंज कळली की त्रास होत नाही. उगाच बांबू मोठा
आहे म्हणून पोल व्हाल्टच्या भानगडीत पडू नये त्याकरता आपण तेवढ्या उंचीवर
जाऊ शकतो हे पाहणं गरजेचं आहे.
आणि माणसानी ना साधं
लिहावं. साधं जास्ती परिणामकारक असतं, उगाच सतत अवघड शब्दांचे ड्रायफ्रुट्स
टाकायचा हव्यास नको, दिसतं छान, भरजरी पण पेललं पाहिजे ना वाचणा-याला आणि
आधी स्वत:लाही. स्वच्छ धुतलेल्या चेह-याची हसरी बाई, मेकपची पुटं चढवून
लिपस्टिक बिघडू नये अशा बेतानी नकली हसणा-या बाईपेक्षा देखणी असते एवढं
लक्षात ठेवलं की झालं.
-- जयंत विद्वांस
No comments:
Post a Comment