अंगुष्टीक / अबिस (Abyss) - श्रीनिवास नार्वेकर
सर्वसाधारण
वाचकाला (मी ही त्यातच आलो) गूढ, कोडं न उलगडणारं, बुचकळ्यात पाडणारं.
अंगावर काटा आणणारं रहस्यं वाचायला आवडतंच. त्यात बौद्धिक फार काही मिळत
नाही असा समज आहे. त्यामुळे आपल्याकडे असं लिहिणारे थोडेसे वाळीत असतात,
कमी दर्जाचे समजले जातात. रह्स्यकथांना वाचक मोठ्या प्रमाणावर आहे पण
गूढ कथांचा वाचक सिमित आहे.अंगुष्टीक वाचून झालं की दचकायला होत नाही, अशुभाचा फील येतो. असं आपल्या बाबतीत काही घडलं तर? असा विचार करायचा. आपण टेडी बेअरला कवटाळून घरात एकटेच झोपलोय. झोपेत आपण त्याला कवटाळलं इथपर्यंत ठीक आहे, त्यानी रिस्पोन्स दिल्यासारखं कवटाळलं तर? "उसवते" (सुई कामाची नाही, दाभणंच लागेल). समोर, मागे, आजूबाजूला माणसं असलेली परवडतात पण कुणीतरी आहे आसपास हा भास खत्तरनाक. माणूस अदृश्य, अमानवी व्यक्तीशी नाही लढू शकत. इथेच तो पहिला मानसिकरीत्या खच्ची होतो. अमानवी शक्ती कमकुवत मनावर जास्ती परिणाम करतात ते यामुळेच.
कोकणात, अंधारात, निर्मनुष्य ठिकाणी फिरायला पण जायचं नाही मग अंगुष्टीक विसरेपर्यंत. नार्वेकरांनी शब्दांत बाजी मारली आहे. नारळाच्या हलणा-या झावळ्या, अमावस्येचा अंधार, त्यातून निर्माण होणारे चित्रं विचित्रं आकार, घुबड, टिटवी, मांजराचा आवाज असलं काही नाही. शहरी वातावरणात घडतं सगळं पण इफेक्ट तोच. साध्या शब्दांची ताकद अफाट असते. संमोहित केल्यासारखे त्यांचे शब्दं गोष्टीतल्या अभद्राकडे आपल्याला खेचून नेतात.
पुस्तकाच्या शेवटी हेवा वाटावा असा त्यांचा परिचय आहे पण खेळाडू, पर्फोरमर, गायक किंवा लेखक यांना त्याचा फारसा उपयोग होत नाही कारण त्यांना प्रत्येक पुढच्या वेळेस तेवढीच मेहनत घ्यावी लागते. लेखकाची कामगिरी तर फारच कष्टप्रद. तिथे तुमचं नाव लक्ष वेधण्यापुरतंच उपयोगी असतं. बाकी स्वत:चा स्तर टिकवायचे, वाढवायचे कष्ट असतातच. नार्वेकरांनी या विषयात अजून बरंच लिहावं अशी अपेक्षा.
चांगला लेखक कोण? ज्याच्यासारखं चांगलं आपल्याला लिहिता आलं पाहिजे असं आपल्याला वाटणं (त्याच्या शैलीतलं नव्हे) मग नार्वेकर या व्याख्येने चांगले लेखक आहेत. :)
No comments:
Post a Comment