Sunday 26 October 2014

अंगुष्टीक / अबिस (Abyss) - श्रीनिवास नार्वेकर

अंगुष्टीक / अबिस (Abyss) - श्रीनिवास नार्वेकर 
 
सर्वसाधारण वाचकाला (मी ही त्यातच आलो) गूढ, कोडं न उलगडणारं, बुचकळ्यात पाडणारं. अंगावर काटा आणणारं रहस्यं वाचायला आवडतंच. त्यात बौद्धिक फार काही मिळत नाही असा समज आहे. त्यामुळे आपल्याकडे असं लिहिणारे थोडेसे वाळीत असतात, कमी दर्जाचे समजले जातात. रह्स्यकथांना वाचक मोठ्या प्रमाणावर आहे पण गूढ कथांचा वाचक सिमित आहे.

घाबरवण्याचे अनेक प्रकार असतात. चित्रपटात ती संधी जास्तं असते. पार्श्वसंगीत, अभिनय, मेकप, क्यामेराची कमाल, अंधाराचा खेळ, आधी घडलेल्या घटना, त्यावरून आपण बांधलेले आडाखे त्यामुळे जास्ती बसणारे धक्के इतक्या गोष्टी मदतीला असतात. रामसे बंधूंचे विनोदी भयपट हा मात्रं अभ्यासाचा विषय आहे. (रामगोपाल वर्माचा, रेवतीचा "रात" सरस होता). वाचताना मात्रं हे सगळं नसतं. तिथे लेखक कळतो, त्याची ताकद कळते. इंग्रजी शब्दसंग्रह अल्प असल्याने त्या भाषेतलं असं काही वाचलेलं नाही. मराठीत मतकरी, जी.ए. वाचताना त्यांची या विषयावरची हुकुमत जाणवते. त्यांच्या काही गोष्टी अजिबात कळलेल्या नाहीत. जी.ए. तर मी सलगही वाचत नाही. काही वेळानंतर अशुभ काहीतरी घडणार आता असं वाटू लागतं. 

तेल महाग झालंय त्यामुळे नमनाला उपलब्ध असलेलं चमचाभर तेल संपत आलंय. तर विषयावर येतो. परवा नार्वेकरांची दोन पुस्तकं वाचली - अंगुष्टीक ही दीर्घकथा आणि अबिस हा सहा कथांचा कथासंग्रह. अबिस पेक्षा मला अंगुष्टीक सरस वाटलं. अबिस मधे त्यांच्या सुरवातीच्या लेखन काळातील कथा आहेत (त्यांच्याशी बोलताना तेच म्हणालेत, उगाच माझा फार अभ्यास आहे असं वाटायला नको) त्यामुळे वाचताना शेवटाचा अंदाज येतो पण त्या टाकाऊ, सपक, साधारण नाहीत. आधी त्या वाचा मग अंगुष्टीक वाचा.

अंगुष्टीक वाचून झालं की दचकायला होत नाही, अशुभाचा फील येतो. असं आपल्या बाबतीत काही घडलं तर? असा विचार करायचा. आपण टेडी बेअरला कवटाळून घरात एकटेच झोपलोय. झोपेत आपण त्याला कवटाळलं इथपर्यंत ठीक आहे, त्यानी रिस्पोन्स दिल्यासारखं कवटाळलं तर? "उसवते" (सुई कामाची नाही, दाभणंच लागेल). समोर, मागे, आजूबाजूला माणसं असलेली परवडतात पण कुणीतरी आहे आसपास हा भास खत्तरनाक. माणूस अदृश्य, अमानवी व्यक्तीशी नाही लढू शकत. इथेच तो पहिला मानसिकरीत्या खच्ची होतो. अमानवी शक्ती कमकुवत मनावर जास्ती परिणाम करतात ते यामुळेच.

कोकणात, अंधारात, निर्मनुष्य ठिकाणी फिरायला पण जायचं नाही मग अंगुष्टीक विसरेपर्यंत. नार्वेकरांनी शब्दांत बाजी मारली आहे. नारळाच्या हलणा-या झावळ्या, अमावस्येचा अंधार, त्यातून निर्माण होणारे चित्रं विचित्रं आकार, घुबड, टिटवी, मांजराचा आवाज असलं काही नाही. शहरी वातावरणात घडतं सगळं पण इफेक्ट तोच. साध्या शब्दांची ताकद अफाट असते. संमोहित केल्यासारखे त्यांचे शब्दं गोष्टीतल्या अभद्राकडे आपल्याला खेचून नेतात. 


माणूस चित्रपटाशी निगडीत असल्यामुळे असेल त्यात फ्लाश्ब्याकही आहे. दोन समांतर पातळीवर चालणा-या पण एकमेकांशी निगडीत असलेल्या कथा गुंगवून टाकतात. अंगुष्टीक कदाचित दोनदा वाचावं लागेल तुम्हांला त्यासाठी. फिल्म मधे शॉट कट होतो तो इफेक्ट नार्वेकर  वाचताना देतात. अंगुष्टीक / अबिस च्या कथा  सांगण्यात काही हशील नाही. मस्त ब्लान्केट गुंडाळून अंधार करून वाचा, थंडी असो नसो, काटा यायची ग्यारंटी आहे.

पुस्तकाच्या शेवटी हेवा वाटावा असा त्यांचा परिचय आहे पण खेळाडू, पर्फोरमर, गायक किंवा लेखक यांना त्याचा फारसा उपयोग होत नाही कारण त्यांना प्रत्येक पुढच्या वेळेस तेवढीच मेहनत घ्यावी लागते. लेखकाची कामगिरी तर फारच कष्टप्रद. तिथे तुमचं नाव लक्ष वेधण्यापुरतंच उपयोगी असतं. बाकी स्वत:चा स्तर टिकवायचे, वाढवायचे कष्ट असतातच. नार्वेकरांनी या विषयात अजून बरंच लिहावं अशी अपेक्षा.

चांगला लेखक कोण? ज्याच्यासारखं चांगलं आपल्याला लिहिता आलं पाहिजे असं आपल्याला वाटणं (त्याच्या शैलीतलं नव्हे) मग नार्वेकर या व्याख्येने चांगले लेखक आहेत. :)


जयंत विद्वांस


       

No comments:

Post a Comment