Wednesday 4 July 2018

''चारित्र्य ड्रायक्लिनर्स फिल्म्स लि.'


''चारित्र्य ड्रायक्लिनर्स फिल्म्स लि.''...   


'राज्या, लेका बोर्ड तर मस्तं जमलाय. खरंतर पांढ-या बोर्डवर काळ्या अक्षरात लिहावं असं माझं मत होतं पण तुझं नेहमीच जगावेगळं. काळ्या बोर्डवर पांढ-या अक्षरात लिहिण्यात काय लॉजिक आहे तुझं?'
'विनू, कसं आहे माहितीये का तुला, एवढ्या सगळ्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर पांढरा रंग कसा झळकतोय बघ. आपण नाहीतरी तेच केलंय ना. सगळा काळा रंग ती माणसं घेऊन येणार मग आपलं काँट्रीब्युशन काय सांग त्यात. आपण काय करायचं, पॅलेट घ्यायचं, त्यात आपल्याला हवा तेवढाच काळा रंग किंवा डाग घ्यायचा. विनोदाचा साबण, सहानुभूतीची जेल, कौटुंबिक केमिकल टाकून तो धुवायचा. कपडयावर डाग होता हे आपण दाखवलंच त्यामुळे खोटेपणाचा आरोप नाही. वरतून डाग कसा नाईलाजाने पडला हे ठसवलं की झालं'. 
'आयला, राज्या, तू लेका चेह-याने गरीब आहे फक्तं. पटकथा घट्ट लिहितोस त्यामुळे जमतं तुला सगळं नीट'. 
'अरे, तसाही निखळ विनोद लोकांना आवडतो कारण तो दुर्मिळ आहे. कितीही वाईट विचार असेल, दुर्गुण असेल त्याला विनोदाचं अस्तर लावायचं म्हणजे पब्लिक हसत राहतं, दुर्गुण कोण बघतंय आता. तू थेटरात जाऊन पाहिलास का? तीनशे प्लस म्हटल्यावर लोक काय मनापासून हसलेत. असूया रे, लोक सिनेमा का बघतात सांग? जे आपल्याला करता येणं अशक्यं आहे, अर्धवट स्वप्नं आहेत ती कुणीतरी पडद्यावर पूर्ण करतंय ते बघायला पैसे मोजतात. प्रत्येकाला वाटतं चिकणी पोरगी पटवावी, गुंडाना दे घपाघप धुवावं, विनाकष्ट भरपूर पैसे मिळवावेत पण हे सगळं करण्यासाठी लागणारं धैर्य नसतं आणि त्याकरता आऊट ऑफ द वे गेलो तर परिणामांची जाणीव पण असते, त्यापेक्षा बघायला पैसे मोजलेले परवडतं'. 
'तू एवढा विचार करतोस? वाटत नाही'. 
'अरे, मी ही आधी सर्वसाधारण माणूस होतोच की. तुला मानसिकता सांगतो पब्लिकची, सज्जन, चारित्र्यवान, आदर्श माणसांची चरित्र खपतात? समजा त्यांच्यावर फिल्म निघाली तर लोक जातात? नाही जात. कारण ज्यात काही भन्नाट घडत नाही ते लोकांना आवडत नाही. आचरणात आणणं त्यांना जमणारही नाही. हल्लीच्या काळात ऊगाच मनाला टोचणी वगैरे लागली तर? त्यापेक्षा वाईट जास्ती खपतं, बघून मजा घ्यायचीये, तसं वागायची डेअरिंग कुठे आहे? आणि एक गंमत, एखाद्या माणसाला सतत चारी बाजूने लोक बोलत राहिले की त्याला आपोआप सहानुभूती मिळते. आपण तेच एनकॅश केलंय. आपण म्हटलंय का तो इनोसंट आहे? पण तो तसा असण्याची शक्यता आहे हे इतर पात्रं सुचवतात'. 
'ए बाबा, तुझ्याकडून एवढं बौद्धिक नको आता. फोन लावून गल्ला विचार. सहावा दिवस आजचा, आयला आधीच्या सिनेमात पण एवढा गल्ला पाहिला नव्हता आपण पहिल्या दिवशी. काही पब्लिक शिव्या देतंय राव पण आपल्याला. आपल्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती वगैरे.'
'छोड यार, पैसा हवा शेवटी. नावं ठेवणा-यांपेक्षा बघणारे जास्ती आहेत. मिडिया आहे, कुणाचं पोरगं आज बाबा म्हटलं, हागलं याची पण ब्रेकिंग न्यूज असते. 'बदनामही सही नाम तो हुआ' हा आजचा फंडा आहे. हाच आठवडा आहे कमवायचा. नंतर चॅनलवर येईल ते छनछनराम वेगळे, कंटाळणार बघ मग लोक. आपल्याला दुस-या सिनेमाची तयारी करायला हवी आता'. 

'एवढ्यात? तुझ्या डोक्यात आहे का काही थीम'?
'डोक्यात? कालच फोन आलेत, एका निष्पाप, निरागस माणसावर सिनेमा करायचाय. सतत 'प्रेम' वाटणारा माणूस आहे. तीनशे प्लसचा आकडा असू शकेल त्याच्याकडेपण. अतिशय ह्यूमन माणूस आहे. अरे प्राणिमात्रसुद्धा त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्यावर होणारे सततचे आरोप ऐकून एका काळविटाने आत्महत्या करून स्वतःचा काळ ओढवून घेतला. चुकून गाडी चढली फुटपाथवर त्याला काय करेल सांग तो, बरं तो चालवत होता असा पुरावा नाही, असला तरी दाखवायचा नाही. आपल्यासारखंच रे, जेवढं सोयीस्कर आहे तेच दाखवायचं पब्लिकला. मला सांग, आपण वाईट का म्हणा कुणाला. समस्त तरुणी आणि आता काकवा वयाला पोचलेल्या त्याच्या वयाच्या बायकांनाही तो क्यूट वाटतो, त्याच्यावर भाळतात मग काय फक्तं आपण मक्ता घेतलाय का संस्कारांचा. त्या तुकाराम ओंबाळेंवर काढ फिल्म, तीन शो पण नाही चालणार'. 
'ए बाबा, तुझ्या डोक्यात आहे की काय तो सिनेमा काढायचं? सगळा गल्ला घालवशील आणि फक्तं पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारीला दाखवतील चॅनल्सवरून, बाकी काय शष्प नाही मिळणार त्यात'. 
'छे रे, पागल कुत्तेने काटा है क्या? हे फक्तं मुलाखतीत, कॅमेरासमोर बोलायचं असतं, करायचं नसतं. बाय द वे, अजून दोन फोन आलेत'. 
'माय माय माय, तू तो 'हिरा' है मेरा! कुणाचे आलेत'. 
'एक हिरे विकणारा आणि एक दारू विकणारा'. 
'मग? त्यांच्यावर काय काढणार सिनेमा'?
'बघशील, पटकथा जवळपास सेम असेल. विनोद, क्लीन चित्रपट, बरी गाणी, इमोशन हा फॉर्म्युला आपल्याला गवसलाय, आधी ते कसे डाग बाळगून आहेत ते दाखवायचं, मग कुणाचंही नाव न घेता टीका करायची, पब्लिकला कन्फ्युज केलं की झालं'. 
'अरे पण फार काळ चालणार नाही एकंच फॉर्म्युला'. 
'पागल आहेस. मलाही माहितीये, कधी थांबायचं हे कळलं की झालं, नासिर हुसेन, मनमोहन देसाई एकाच थीमवर काढायचे की नाही सिनेमे, पॅटर्न ठरलेले असायचे, महेश कोठारे घे, वर्षानुवर्षे एकंच पॅटर्न. आपण एवढे दोन सिनेमे केले की थांबूयात. तू कशी मला संधी दिलीस आणि स्वतः बंद झालास, नंतर आपण दोघं मिळून ते करूयात. नवीन माणूस धरू, बॅनर आपला. तो माणूस पण ऋणात रहातो, आपल्याला पैसे आणि मोठेपणा मिळतो. मागचं कोण लक्षात ठेवत नाही इथे, पब्लिक मेमरी इज शॉर्ट. आणि आपल्याकडे 'डाग अच्छे है' म्हणणारे आणि ते अभिमानाने मिरवणारे लोक काय दुर्मिळ आहेत का? एक धुंडो, हजार मिलेंगे! विनू, अच्छाई की हद होती है, बुराई की नहीं!.  

'अरे पण ज्यांनी या व्यक्तींमुळे भोगलंय त्यांचे पण फोन आले होते रे मला, तळतळून बोलत होते'. 
'आपण ऐकून घ्यायचं फक्तं. मत नसतं व्यक्तं करायचं आणि अजून एक आयडिया आहे. नफ्यातला काही हिस्सा दान करायचा काही वर्षांनी, पब्लिक लगेच चांगलं म्हणतंय बघ आपल्याला, प्लस लाभार्थी म्हणजे आपली भलामण करणारे लोक वाढतात ते वेगळंच. आणि झूठ असतं रे सिनेमा बघून पब्लिक बिघडतं हे, 'माफीचा साक्षीदार', 'पुरुष' बघताना लोकं नानाच्या एंट्रीला टाळ्या वाजवायचे यात दिग्दर्शकाची किंवा नानाची काय चूक आहे सांग? पब्लिकची बुद्धी आहे तसेच चित्रपट ते बघणार आणि आवडणार त्यांना. खाली काय सबटायटल टाकायचं का दारू, तंबाखूचं टाकतात तसं, 'हा व्हिलन आहे, याचा द्वेष करा' असं'. यांच्या घरी काय संस्कार झाले नसतील का? पण समाजच असा झालाय, वाईटाची ओढ जास्ती आहे प्रत्येकाला. हिरो कोण, आदर्श कोण, वाईट काय हे काय समजत नाहीये का? समजतं पण इन्स्टंट यश हवंय, वासना, अधिकार, सत्ता, पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी गोचीडासारख्या चिकटल्यात या पिढीला. आपण काय मक्ता नाही घेतलेला. छान पैसे कमावू. बाहेरचं नागरिकत्व घेऊ, मुलंबाळं तिकडेच रहातील. वय झालं की 'फाळके पुरस्कार' स्वीकारायला काठी टेकत येऊ. नाहीच मिळालं ते तर गेलाबाजार 'पद्मश्री' सेफ आहेच, कुणालाही मिळतं. पैसे देऊन दोन चार चॅनल्सवर 'लाईफ टाईम घेऊ', हाय काय नाय काय'.  
'धन्यं आहेस राजा तू. एवढा विचार मी पण नव्हता केला कधी'. 
'थांब, फोन आलाय'.  

'हॅलो, यस स्पिकिंग. फिल्म बनवायचीये? थ्री पर्सेंट इन प्रॉफिट, नॉट ऑन कलेक्शन, देऊ. माहिती मेल करा, तरी चार वर्ष लागतील, दोन सिनेमे ऑलरेडी फ्लोअरवर घेतोय लवकरच. साधारण काय कॅरॅक्टर आहे. सांगा, लाजू नका, रेकॉर्ड नाहीये करत कॉल'. 
'अरे कट काय केलास ऐकता ऐकता?'. 
'दोन खून आणि फक्तं एकशे ऐंशी कोटीचा बँक घोटाळा. पागल समझा है क्या! वी आर इन अप्पर सर्कल नाऊ! या असल्या लो बजेट थीमसाठी नवा डायरेक्टर शोधायला घे आता तू. 'बायोपिक फिल्म्स लिमिटेड', हाय काय आणि नाय काय'. 
 
जयंत विद्वांस 




No comments:

Post a Comment