Tuesday, 7 June 2016

संडे सिनीअर लीग…

मिहिर भागवत, मयुरेश बुधकर, केतन तेरेदेसाई, मनोज गद्रे, मनोज गोडबोले, विनायक लिमये, नरेंद्र बापट, अविनाश रहाळकर, नितीन करमरकर, नितीन अंमलदार, चंद्रकांत खिरीड, रविंद्र उटगीकर, प्रशांत शिरोडकर, रोहित दणाणे, सुशांत पाटील, अक्षय चिपरीकर, समीर व्होरा, केदार जोगळेकर, मिलिंद धाडगे, सचिन साबणे, प्रविण देवधर, अजय मराठे, जयंत विद्वांस - आयपीएल किंवा दौ-याआधी सराव संघ निवडावा तशी ही यादी आहे. यादीतल्या नावांवरून फार सभ्य लोकं क्रिकेट खेळतात असा समज होण्याची दाट शक्यता आहे पण मैदानावर उपस्थित असणारे लोक असा समज करून घेणा-या माणसाला भिंतीशी मान दाबून मारहाण करतील अशी परिस्थिती आहे. संघ निवडताना तो समतोल असावा वगैरे प्रकार इथे दोन तीन मुद्द्यांवर संपतो. एक भांडखोर, नविन नियम जुनेच आहेत असं सांगून लादणारा, एक प्लान आखणारा, एक पिंच हिटर आणि एक खांदा निखळला तरी चालेल पण आरोप झटकून टाकावा तसा, चेंडू फलंदाजाला दिसेल की काय अशा भीतीनी जोरात टाकणारा चेंडूफेक्या हवा, संपली टीमची निवड.  
मनोज गोडबोले, डॉ.विनायक लिमये, प्रशांत शिरोडकर - यांची निवड कुठल्याही संघात केली तरी बिचा-यांची तक्रार नसते. सुंदरतेला दृष्टं लागू नये म्हणून तीट लावावी तसा प्रशांत एकदा आल्या आल्या पडून घेतो. चरणसिंघ, चंद्रशेखर यांचं सरकार जसं कधीही कोसळू शकेल असं वाटायचं तसा प्रशांत कधीही पडू शकतो. शनिवार घातवार असल्यामुळे असं होत असावं. पुण्यात काश्मीरपेक्षा जास्ती बर्फ शनिवारी रात्री ग्लासात पडतो म्हणे आणि बर्फावरून पाय घसरतोच. मनोज गोडबोले हे 'गली'तले (गल्लीतले कोण म्हणालं रे) नामवंत क्षेत्ररक्षक आहेत. उंची, जागचा हलायला लागणारा वेळ यामुळे त्यांना हातात आलेला चेंडू झेल म्हणून पकडणं क्रमप्राप्त होतं, उगाच सुटला तर आपल्यालाच पळावं लागेल किंवा नंतर आपल्यालाच फलंदाजी करायची आहे असे सुप्तं हेतूही त्यामागे असू शकतात. विनायक लिमये धुमकेतू आहेत. कधी सलग तर कधी आफ्रिदीसारखी  निवृत्ती मागे घेऊन पुनरागमन केल्यासारखे येतात. केक आणलेल्या दिवशीची त्यांची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अजून लोक विसरलेले नाहीत. त्यांनी परत फॉर्ममध्ये येण्यासाठी हा खर्चिक उपाय करून पहायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर बाद केल्यास, गोलंदाजी दिल्यास ते दोन रविवार येत नाहीत असा अभ्यासपूर्ण निष्कर्ष आहे.    

रोहित दणाणे, सुशांत पाटील, अक्षय चिपरीकर - ही सगळी यंग ब्रिगेड आहे. गगनचुंबी षटकार, घणाघाती चौकार, फसवी गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि बिन ब्रेकच्या गाडीसारखा सुसाट थ्रो हे एवढं सगळं एकटा रोहित करतो. प्रविण आणि त्याची ताटातूट केल्याशिवाय सामना तुल्यबळ होत नाही. सुशांत आणि अक्षयला रोहित दम देत असावा, 'याद राखा माझ्यापेक्षा चांगलं खेळाल तर'. ते दोघे बिचारे दबलेले दिसतात त्याच्यापुढे. अलीकडे गोलंदाजांनी त्याला स्वस्तात काढलाय असं कानावर आलंय याचा अर्थ गोलंदाजीत सुधारणा झालीये की त्याचा फॉर्म गेलाय हा चर्चेचा विषय होऊ शकतो. त्यानी घेतलेल्या झेलांमुळे त्याला दोन झेल प्रतिदिन असं बंधन घालण्याची मागणी वारंवार पुढे येत आहे. तो आउट झाल्यावर प्रतिपक्षात अमेठीची सीट जिंकल्यासारखा आनंद होतो याचा अर्थ तो सरस खेळतो असा आहे
प्रविण देवधर, मिलिंद धाडगे - इमारती पडल्यात पण कधीकाळी भरभराट होती अशी जाणीव अधूनमधून होते. मिलिंद धाडगे आता इतिहासाचं पुस्तक झालंय. त्याला पाय दिसत नाहीत असा घेर वाढलाय. एकेकाळी दमदार फलंदाजी करायचा, अचूक गोलंदाजी टाकायचा या सांगण्याच्या गोष्टी झाल्या आता. पण तरीही तो हौसेने येतो. येताना ब्रेकफास्ट आणतो. मैदानावर जाण्यात पण खेळल्याचा फील आहे बहुतेक. त्यानी लवकरात लवकर फीट होऊन घणाघात चालू केल्यास अजून सामने रंगतदार होतील. प्रविण यायचाय अजून खेळायला हा विश्वास असतो. तो बोलला की त्याची पुढची बाजू कुठली हे कळतं. -या अर्थानी तो ऑलराउंड आहे पण षटकार मारताना यातलं काही आड येत नाही. रन्स पळून काढून कशाला दमा त्यामुळे तो शॉर्टकट वापरतो. फसवे, हळुवार ऑफस्पिन पण तो टाकतो. उंच, अशक्यं झेल घेतो पण पंचवीस यार्ड पळत जाऊन झेल वगैरे स्वप्नं पण पडू शकत नाही त्याला. चेष्टेचा भाग सोडून देऊ पण दोघेही नैसर्गिक तडाखेबंद फलंदाज आहेत हे नक्की. त्यांनी फिट होऊन अजून रंगत आणावी अशी इच्छा आहे
कुणाच्या अध्यात मध्यात अशी एक जमात असते त्यात केदार जोगळेकर, आनंद कुलकर्णी, मयुरेश बुधकर, समीर व्होरा, सचिन साबणे, अविनाश रहाळकर हे लोक मोडतात. कुठलेही वाद नाहीत, चिडचिड नाही. निमूटपणे खेळतात. अविनाशचं गणित चांगलं आहे हा मुद्दा नाही, बाकीच्यांचं पण चांगलं आहे पण तो सभ्य असल्यामुळे स्कोअर, चेंडू, ओव्हर्स बरोबर मोजले जातात. त्यानी सांगितलं की बात खतम. अजय मराठे यांची बोटं मोजताना चुकतात, तो मुद्दाम करत नाही, होतं तसं. पहिलीपासून त्याचा हा प्रॉब्लेम आहे असं ऐकिवात आहे. केजरीवालसारखा तो दोनच्या फरकानी फक्तं सम विषम धावसंख्या मोजत असावा. केदार सगळ्यात जास्ती टीकास्त्र अंगावर घेणारा माणूस आहे. मोडेन पण वाकणार नाही हा त्याचा बाणा शारीरिक नाईलाजानी आहे. अधून मधून तो नेहरू स्टेडीअमवर कोचिंग क्लासमध्ये लहानपणी मारलेला कव्हर ड्राईव्ह आठवल्यासारखा मारतो. आकाश, दत्ता मोरे हे पाहुणे कलाकार आहेत. हयातीचा दाखला द्यायला ते अधून मधून येतात

मिहिर भागवत, नितीन करमरकर सभ्य आहेत? हा प्रश्नं केवळ होकारार्थी उत्तर यावं अशा हेतूनीच विचारलेला आहे. मिहिर आहे पण तो एकटा पडला तर. स्वत:च्या जीवावर निवडून आलेले आमदार, खासदार जसे उपद्रव मूल्य बाळगून असतात तसा तो आहे. त्याला युती लागते. सहसा अंमलदार आणि रवि असला तर त्याला बहर येतो. लहानपणी राज्यं आल्यावर घरात गेलं की यायचंच नाही हा त्याचा स्वभाव बदलला आहे असं कानावर आलंय पण घरात गेलेले चेंडू सापडत नाही म्हणायचं आणि सापडल्यावर परत द्यायचेच नाहीत हे अजून चालूच आहे म्हणे. नितीन करमरकर फ्रीलान्स क्रिकेटर आहेत. ते मनात आलं की अंपायर, स्लीप फिल्डर, गोलंदाज, लगेच आउट होण्याची खात्री असलेला फलंदाज अशी कुठलीही भूमिका स्विकारतात. शक्यतो ते सगळ्यांना मान्य आहे असं त्यांचं ते गृहीत धरतात. अतिशय निष्पाप चेह-यानी ते उपहासात्मक बोलतात. किमान शब्दात कमाल अपमान करू शकतात. चुकून झालेला रनआउट, एखादा हातात बसलेला झेल वगैरे घेतला की चेहरा बघावा, साधारण दोन रविवार तरी ते ऐकावं लागतं, बाकी माणूस चांगला आहे. वापरला नाही तर आंबेल अशा भीतीनी त्यानी स्प्रे संपवला. एका ओव्हर नंतर फवारणी परवडत नाही संघाला पण त्याला तरी कोण खेळायला घेणार या वयात म्हणून कुणी बोलत नाही.     

केतन तेरेदेसाई, डॉ.मनोज गद्रे मैदानावर असल्यामुळे त्यांना ते क्रिकेट खेळतात असं म्हणायला हरकत नाही. राहूल द्रविड ही भारतीय क्रिकेटची ' वॉल' असेल तर केतन इज ' वॉल' फॉर अस. कुठेच फिल्डिंग चांगली करत नाही म्हणून तो विकेटकीपर रहातो. कुठलाही चेंडू अडवायची, झेल घ्यायची पद्धत त्याच्याकडे नाही, त्याला चेंडू लागला की अडतोच. त्याच्या पुढ्यात पडलेल्या चेंडूवर सिंगल चोरावी लागत नाही, चालत चालत होते. रागापोटी त्याला लांब ठेवलात तर तिथे चार जातात म्हणून त्याची प्राणप्रतिष्ठा परत पहिल्या जागी करावी लागते. तयार रहाणे, थ्रो/बॉल कलेक्ट करणे, फलंदाज क्रीजच्या आत यायच्या आधी स्टंप उडवणे वगैरे क्रिया सलग करायला त्याला आवडत नाहीत. त्यानी स्टंपिंग केलं तर तो क्रीडादिन म्हणून साजरा करावा लागेल. डॉ.मनोज गद्रे वडीलधा-या माणसासारखे पोरं उपाशीपोटी खेळत नाहीत नाही याची काळजी घेतात. त्यांच्या हिंदी डायलॉग शिवाय ब्रेकफास्ट येऊ शकत नाही. अंपायर म्हणून करिअरला सुरवात करायचं त्यांच्या मनात होतं पण आक्रमक खेळाडूंच्या दडपणाला ते बळी पडल्यामुळे तो विचार सध्या त्यांनी लांबणीवर टाकलेला आहे
नितीन अंमलदार, चंद्रकांत खिरीड - ही जोडगोळी आता वयोमानामुळे खेळण्यापेक्षा बोलणं जास्ती करते. तिरंदाज खिरीड म्हणून ते ओळखले जातात. साठी गाठलेला हा तरुण माणूस लगोरी खेळतो. त्याचे दात ओठ खाल्लेला चेहरा बघून फलंदाज मागे सरकतो. गोट्या आणि गोलंदाजी यात काहीही फरक नाही. पण त्याची कुणीही केलेली चेष्टा तो हसतमुखाने स्विकारतो हा त्याचा मोठेपणा आहे. बेनिफिट सामन्यात टाकतात तशी एखादी ओव्हर तो टाकतोही. नितीन अंमलदार वेळेत उपस्थित रहातात, काळजीनी येतात, अनुपस्थिती नसतेच जवळपास इतक्या ओढीनी ते येतात. त्यांनी ठोकलेले स्टंप हे सरळ रेषेतच असतात बाकी सगळे तिरळे आहेत, सगळ्यांना आवर्जून रविवारी यायची आठवण करतात, चेंडू कुठला आणायचा वगैरे प्लानिंगचा पार्ट त्यांच्याकडे असतो. स्वत:ला सोयीस्कर नियम बनविणे, मागे आपण अशाच प्रसंगात काय बोललो होतो त्याचं त्यांना विस्मरण होतं, आत्ता ते कुठल्या पार्टीत आहेत त्यावर ते अवलंबून असतं. खांदा आणि गुडघा अशा त्यांच्या दोन्ही ठिकाणच्या हिंजेस कुरकुर करत आहेत पण ते येतात. घरी सराव करतात आणि लवकर आउट होतात अशी बातमी
नरेंद्र बापट, रविंद्र उटगीकर - दोघंही शक्यतो विरुद्ध पार्टीत असण्याची काळजी घेतात नाहीतर रविवार सुना सुना बेचव जातो. म्याच रिपोर्ट नंतर निम्मं शाब्दिक युद्धं यांचच असतं. मराठीत ज्याला कुजकं पण साहित्यिक भाषेत ज्याला उपहासात्मक असं म्हटलं जातं त्या भाषेचे शब्दंकोष दोघं मिळून लीलया लिहू शकतात. नंदूकडे पेट्रोल पंप आहे. ठिबक सिंचन पद्धतीवर त्याचा शेतक-यापेक्षा जास्ती विश्वास आहे. मुळापाशी थेंब थेंब पेट्रोल टाकण्याचा उद्योग तो थकता करतो. तो फिल्डिंगला कुठेही असला तरी कुणाला बॉलिंग, ब्याटिंग मिळाली नाही याची नोंद घेतो आणि शेकोटी पेटती रहावी याची काळजी घेत एकेक काडी पुढे सरकवतो. मनातला हेतू वेगळा असला तरी अत्यंत निरागस चेह-यानी, काळजी असल्यासारखा चेहरा करून हे तो करू शकतो. तो लॉंगऑन, मिडविकेट, स्क्वेअरलेग, डिप कव्हर कुठूनही नो, वाईड, रनाउट देऊ शकतो किंवा नाकारू शकतो. पुलंचे हरितात्या जसे इतिहास सांगताना त्यात 'हे असे आम्ही उभे आणि महाराज बघतायेत' असं म्हणून स्वत:ला गोवायचे तसं नंदू करतो. 'आम्ही (पक्षी : आयसीसी) तसा नियम केलाय' हे वाक्यं ऐकून नियमावली तयार करणारा हा थोर माणूस आपल्याला सहवासाचा लाभ देतो या कल्पनेने मी सद्गदित झालो होतो. योग्यं वेळी झेल, चेंडू सोडणे, प्रयत्नं करूनही तो कसा सुटला वगैरे अभिनय त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे. त्याचा चेंडू उडतो, वेगात येतो तो त्याची उंची आणि पिचमुळे, याच्यात लपलेली 'जोरात टाकला तर कसा येईल' ही धमकी लक्षात घ्या.      
आपलं म्हणणं थकता एखाद्याच्या गळी उतरवणे, सतत तेच सांगून हळूहळू तेच सत्यं आहे असं वाटायला लावणे, धूर्तपणानी लोकं आपल्यामागे गोळा करणे आणि मी त्यांचं मत मांडतोय, माझं काही नाही त्यात असं दाखवणे, बोलून खच्ची करणे, विनोदाच्या नावाखाली टार्गेट करणे, प्लानिंग करण्याच्या नावाखाली फिल्डर हलविणे, रनाउट झाल्यास (स्वत: किंवा समोरचा) समोरच्याला फक्तं आणि फक्तं त्याचीच चूक कशी हे पटवून देणे, उगाच वेळ काढून मानसिक खच्चीकरण करणे, कुठेही उभं केलंत तरी बॉल काही माझ्याच्याने अडणार नाही कारण त्यात माझी काही चूक नाही हे दाखवणे, कमकुवत फलंदाजाचे झेल सोडणे, कधीही वेळेत येणे या सगळ्या प्याकेजला रविंद्र उटगीकर असं म्हणतात. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर त्याला फोन करतात अशी अफवा होती. तो एक चांगला मध्यस्थ, निगोशिएटर मात्रं आहे. बोलण्यातल्या चतुराईनी तो मुद्दा गळी उतरवण्यात तरबेज आहे. आपल्या संघाचा कुठे दौरा असेल तर याला आधी पाठवावं. द्रुतगती गोलंदाजांची 'वेगाचे दुष्परिणाम' यावर एक दोन सेशन्स त्यानी घेतली तर आपण जिंकू शकतो. ते गोलंदाज विटकरीनी बोटं ठेचून घेतील आणि 'अहिंसो परमो धर्म:' म्हणत रविचे फोटो गळ्यात अडकवून रस्त्यानी फिरताना दिसतील.   

जयंत विद्वांस - याला कुणी बोलावलं पहिल्यांदा याचा शोध चालू आहे. अतिशय चांगला उत्तम फलंदाज, नऊ आउट झाल्यावर अकरावा नाईलाजानी खेळायला येतो तसा हा येतो. स्वत:ची चेंडूफेक स्वत:ला खेळायला लागत नसल्यामुळे तो सुखी आहे. मुळात ती फास्ट नाही, मी राउंड विकेट टाकत नाही त्यामुळे अंगाला लागायचा प्रश्नं येत नाही, लागलाय का आत्तापर्यंत कुणाला वगैरे मतं त्याची एकट्याची आहेत, कुणाचाही याला दुजोरा नाही याची त्याला खंत आहे. केतन पायानी बॉल अडवून पोचे काढायला ग्यारेजला गेला होता असं ऐकलंय. बाकी विशेष सांगण्यासारखं काही नाही. रवि नंदूच्या तालमीत मौखिक प्रशिक्षण चालू आहे एवढंच.

अजय मराठे - संघटक, उत्कृष्ठ समालोचक, खजिनदार. मुळात हा सगळा आनंदोस्तव चालू होण्यामागे अजयचा हात आहे. कुठलाही फायदा नसलेला हा उद्योग तो मनापासून करतो. चांगलं करण्याची नुसती ओढ असून भागत नाही. त्याकरिता कष्ट घेण्याची तयारी लागते. ती त्याच्याकडे आहे. तो कुणाकुणाला, जुन्या माणसांना फोन करून बोलावतो. त्यावरून चार शब्द ऐकून पण घेतो. उद्या रोहन गावसकर रस्त्यात दिसला तरी तो म्हणेल, 'रविवारी येत जा रे मोकळा असशील तर'. खेळ झाला पाहिजे एवढाच त्याचा शुद्ध हेतू त्यात आहे. पैसे गोळा करणे, चोख हिशोब ठेवणे, त्याच दिवशी पीसीवर काम करून फोटो काढून टाकणे, उसने मागत असल्यासारखे लोकांकडे लाजत पैसे मागणे, अचूक, मार्मिक, मोजकं, सर्वसमावेशक, वाचनीय, कुणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घेत, स्वत:बद्दल एकही ओळ लिहिता कसं लिहावं याचा उत्तम नमुना असलेला वृत्तांत लिहिणे वगैरे प्रकार तो हौसेने करतो. त्याचा स्वभाव त्याच्या खेळात दिसतो. उगाच हाणामारी, स्पीड असं काही नसतं. सहसा तो चिडत नाही. कुणी पैसे दिले नाहीत तर तो त्याच्याशी कधीच भांडणार नाही पण एक रन कमी करा, तो उज्वल निकमसारखा तावातावानी भांडेल. निरलसपणे अजय हे सगळं करतोय याबद्दल आम्ही सगळे त्याचे आभारी आहोत.   

एकावेळी अकरापेक्षा जास्ती खेळाडू फिल्डिंगला असतात तरी रन्स होतातच. इथल्या फिल्डिंग पोझिशन्स कदाचित क्रिकेटच्या पुस्तकात सापडणार नाहीत. वाढलेल्या वयात ते हरवलेलं लहानपण, ती भांडण, ते वाद डोक्यात तरळत असतात. त्याची पुनरावृत्ती केल्यामुळे तो काळ जगता येतो. चित्रपटात विग घालून जसा वयस्क माणसाचा तरुण काळ दाखवतात तसाच प्रकार आहे हा. पण मजा येते. कुठलीही कटुता बाळगता आपणा सगळं विसरून खेळतो. भेटणं होतं, गप्पा होतात. खेळताना, भांडताना हुद्दा, वय, आर्थिक परिस्थिती आड येत नाही. हे क्षण जेंव्हा आपण खेळू शकणार नाही तेंव्हा आठवतील. रमायला चांगल्या आठवणी तर हव्यात माणसाकडे, आपण त्या एकेक करून साठवतोय

रविवारी घरी आल्यानंतर स्पेअर्स चेकावे लागतात. दिवसभर काय पुढच्या रविवार पर्यंत पुरतं. गरम पाण्याची पिशवी, आईसपॅक बारा पर्यंत तयार ठेवायला निघतानाच सांगायचं, वेळ कमी लागतो म्हणजे. व्हॉलिनी अर्ध्या किलोच्या डब्यात यायला हवं. पंचवीस एमेम ब्रश घेऊन बसायला बरं पडेल म्हणजे. एकदा चंदनासारखा त्याचा लेप लावला की झालं. दुपारी गप पडायचं. एक ग्लेनग्रांट नाहीतर शिवास तीस एमेल पाण्यातून पेनकिलर म्हणून चालते. सुखाची झोप लागते. स्वप्नात दीपिका, अनुष्का वगैरे कुणी त्रास देत नाही. डोळ्यापुढे सकाळी पडलेला लेगकटर, बुंध्यात पडल्यावर आलेला काठीचा आवाज, उडालेल्या बेल्स, चेंडू अडवताना लाल झालेला हात, बधिर अंगठा, तिसरी पळताना गळयाजवळ पोचलेली फुफ्फुसं. काय नी काय तरळत असतं. पुढच्या रविवारचे प्लान्स तयार होत असतात. थोडा टप्पा अजून मागे हवा, राउंड विकेट आलो तर बाहेर जातो पण कटरची मजा जाते, मिडल लेगला पडून ऑफ जातो त्यासारखं दुसरं प्रेक्षणीय काही नाही. स्वप्नं बघायला काय हरकत आहे निदान

देवाकडे तसंही मी कधी काही मागत नाही पण मरेपर्यंत कुठला नं कुठला खेळ खेळण्याची ताकद रहायला पाहिजे एवढं सिंपल मागणं आहे. बाकी काय लिहू, असाच लोभ असावा, धन्यवाद.
 
जयंत विद्वांस
(यातील चेष्टेने कुणाची मन दुखावली असतील तर दुखू देत, खिल्ली उडवण्याच्या हेतूनेच ते लिहिलंय)

लल्याची पत्रं (२९)…. 'तू प्यार का सागर है…'

लल्यास,

मागे आपण बलराज सहानीबद्दल बोललो होतो. तो काही नटीच्या मागे फिरत, उड्या मारत, लोचटपणा करत गाणी म्हणणारा माणूस नव्हता पण काही अजरामर गाणी त्याला मिळाली, त्याच्यावर किंवा त्याच्या चित्रपटातील. 'दो बिघा जमीन'मधली सगळी, 'वक्तं' मधलं 'ऐ, मेरी जोहराजबी', 'काबुलीवाला'मधलं 'ऐ मेरे प्यारे वतन', 'भाभी' मधलं 'चल उड जा रे पंछी', 'हकीकत' मधलं 'होके मजबूर उसने मुझे बुलाया होगा', 'कठपुतली' मधलं सुबीरसेनच्या आवाजात पियानोवर बसून म्हटलेलं 'मंझील वोही है प्यार की' आणि 'सीमा' मधलं खुर्चीत बसून 'तू प्यार का सागर है' म्हणणारा बलराज सहानी. काही माणसं रुबाबदार असतात, काही आब राखून असतात, काहींचं व्यक्तिमत्व असं असतं की त्यांच्याशी, त्यांच्याविषयी आपण सैल जिभेने बोलत नाही. जुन्या काळातला रेहमान आणि बलराज सहानी तसे होते बघ. कुठलीही भूमिका असो, रेहमानचा भांग तसाच असायचा, सगळे केस चापून चोपून बसवलेले. पायलट होता तो. (एकाच वर्षात तीनवेळा हृदयविकाराचे झटके आणि मग घशाचा कर्करोग होऊन गेला बिचारा). स्वत:चा एक आब राखून राहिलेली माणसं ही.

'सीमा' पाहिला आहेस? नसशील तर पहा. पात्रं उभी करणं एकवेळ सोप्पं आहे पण वातावरण उभं करणं अवघड काम आहे. ते अनाथालय, ती रागावलेली, बंडखोर 'गौरी' नूतन, तो संयमित 'अशोकबाबू' सहानी पहाण्यासारखं आहे. पंचावन्न साली म्हणजे एकसष्ठ वर्ष झाली तरी हे गाणं आणि सिनेमा लक्षात आहे अजून लोकांच्या यात त्याचं मोठेपण आलंच. कृष्णधवल सिनेमे जास्ती जवळचे का वाटत असावेत? चार्ली चाप्लिन, लॉरेल हार्डी आणि आपल्याकडचे मराठी, हिंदी जुने चित्रपट बघ खोटं वाटत असेल तर, जवळचे वाटतात. रंगीत किती चांगलं दिसतं खरंतर पण सुख-दु:खं, आशा-निराशा, आसक्ती-विरक्ती, प्रेम-द्वेष, हिंसा-अहिंसा या जोड्या आहेत तशीच जोडी कृष्णं-धवल. माणसं आपलीच प्रतिमा बघतात त्यात, एक उजळ, एक काळी बाजू, लख्खपणे डोळ्यापुढे येत असावी. तांत्रिक चकचकाट डोळे दिपवून टाकतो, सुखावेलच असं नाही. एन.चंद्राचा 'अंकुश' आता बघताना हसू येतं, पस्तीस एमेम आहे. तो सिनेमास्कोप नव्हता म्हणून अडलं काहीच नाही कारण विषय भन्नाट होता. तसं मला वाटतं एखाद्या दिग्दर्शकानी आवाहन स्वीकारावं आणि अप्रतिम 'कृष्णधवल' चित्रपट या काळात काढावा. बघूयात तरी चांगल्या सशक्त पटकथेला, संगीताला, अभिनयाला आणि दिग्दर्शकीय कौशल्याला रंगाची गरज भासते का?

शैलेंद्र विषयी काय बोलू. म्हातारी अनुभवी माणसं जशी साध्या बोलण्यातून आयुष्याचं सार सांगून जातात तसं शैलेंद्र लिहितो. मला तो, खेबुडकर आणि गदिमांच्यात एक कायम साम्य वाटत आलंय, साधे शब्द हात जोडून पुढे उभे असल्यासारखे असायचे यांच्या. चपखल बसतील असे बोजड शब्दं कुणालाही सापडतील पण आपलंसं करणारे साधे शब्दं लिहिणं अवघड आहे. खुर्चीच्या कडेला बसलेल्या लहान मुलीच्या डोक्यावर हात फिरवत प्रार्थना म्हणणारा अशोक बाबू आणि इकडे घुसमटलेली बंडखोर गौरी. पहिल्या कडव्यात नूतनबद्दल वाटणारी काळजी किती सुंदर मांडलीये त्यानी. अभी बच्ची है, नादान है वो, हे वेगळं सांगावं लागत नाही. पंख है कोमल, आंख है धुंदली आणि जायचय हा भवसागर पार करून. मधेच गळाठली तर? ही काळजी आहे त्याला. बाप होणं सोपं असतं, पालक होणं अवघड आहे. चांगल्या वाईटाची पारख नसलेलं, विरुद्ध जाण्याची इर्षा असणारं, बंडखोर वय असतं, एक मुरलेलं लोणचं, एक उमलू पहात असलेली कळी. एक संयम, एक उत्साह, उतावीळपणा. जो तो स्वत:च्या मते योग्यं. बाप रागावतो, पालक समजावतो. त्यानी जास्ती पावसाळे काढलेले असतात, त्याला लांबचं वादळ दिसत असतं त्यामुळे त्याचा जीव तुटत असतो. मी सांगून झालं, आता तू सांग म्हणतोय तो परमेश्वराला, 'अब तू ही इसे समझा, राह भुले थे कहांसे हम'.

तारुण्यात जगण्याचा वेग जास्ती असतो, ब्रेक नसलेली, वंगण घातलेली, न कुरकुरणारी गाडी असते. सगळ्यांचेच अपघात होतील असं नाही पण रस्ता चुकण्याची, क्वचित संपण्याचीही शक्यता असते. दुर्लक्ष केलं तर मृत्यू कदाचित येणार नाही या भ्रमात जगत असतो आपण. 'इधर झूमके गाए जिंदगी, उधर है मौत खडी' या ओळीनी डोळे खाडकन उघडतात. जिंदगी पे मौत का हक है, जब मर्जी बुला लेगी. कुठपर्यंत? याचं उत्तर माहित नाही म्हणून जगण्यात मजा आहे. प्रत्येकाला मरणवर्ष माहित असतं तर शेवटची वर्ष भीतीच्या सावटाखाली जगले असते सगळे, इन्शुरन्स प्रकार अस्तित्वात आला नसता, इस्टेटीकरता खून करायची गरज पडली नसती. कुठून आलो माहित नाही, कुठे जाणार माहित नाही. सगळाच कल्पनाविलास. आयुष्यं म्हणजे सहल असते पण आपण तंबू ठोकतो, जमवाजमव करतो, माणसं जोडतो. ठसा नाही उमटवता आला प्रत्येकाला तरी छाप सोडून जायला हवी काहीतरी. परत एकदा शैलेंद्र किती सुंदर म्हणून गेलाय बघ 'दो बिघा जमीन' मधे, 'अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा, कौन कहे इस और तू फिर आये ना आए'. शहर काय आयुष्यं काय, सोडताना नाव सोडून जाता येईल असं काहीतरी करायला हवं.

किशोरचा आवाज जसा काही गाण्यांना वेगळा लागतो तसा मन्नाडेचा पण लागत असावा. हे, लागा चुनरीमे दाग, ए भाय..च्या शेवटच्या ओळी, यारी है इमान मेरा, ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरी जोहराजबी, 'प्रहार'मधलं 'हमारी ही मुठ्ठीमे आकाश सारा' ही आणि अशी अनेक गाणी आहेत. प्रार्थनेचा दर्जा दिला जावा अशी गाणी म्हणजे 'ऐ मालिक तेरे बंदे हम' (पाकिस्तानात हे प्रार्थना म्हणून म्हटलं जातं) आणि 'तू प्यार का सागर है'. तत्वज्ञान रुक्ष असतं पण गाण्यातून आलं की सोपं वाटतं. शैलेंद्र काय या गाण्यातले सगळेच 'जाना है उसपार' म्हणायच्या पलीकडे गेले. उसपार काय आहे ते माहित नाही, जे गेलेत ते सांगत नाहीत. म्हटलं ना सगळा कल्पनाविलास, तोपर्यंत इसपार आहे ते बघून घेऊ, तिकडचं तिकडे गेल्यावर.  
  
जयंत विद्वांस


तू प्यार का सागर है, तेरी एक बूंदके प्यासे हम
लौटा जो दिया तूने, चले जायेंगे जहांसे हम    

घायल मनका पागल पंछी, उडनेको बेकरार
पंख है कोमल, आंख है धुंदली, जाना है सागर पार
अब तू ही इसे समझा, राह भूले थे कहांसे हम

इधर झूमके गाए जिंदगी, उधर है मौत खडी
कोई क्या जाने कहा है सीमा, उलझन आन पडी
कानोमे जरा कह दे के आए कौन दिशासे हम

(सीमा, १९५५, शैलेंद्र, शंकर जयकिशन, मन्ना डे)

चरा…

'आबा, फेकून द्या तो शर्ट आता'. 'अगं याला काय झालंय, उसवला नाहीये, फाटला नाहीये कुठे, अजून चार वर्ष सहज काढेल, उगाच काय टाकून द्यायचा आणि, घरात घालायला बराय अजून. पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत तेंव्हा असे कपडे असावेत चार राखणीतले'. 'आबा, डिसेंबर आहे हा चालू, सहा महिने आहेत किमान अजून कपडे न वाळायला'. 'शब्दश:अर्थ काढू नकोस ग कार्टे, सांगण्याचा अर्थ लक्षात घे'. 'आबा, एक काम करूयात का, तुमच्या सगळ्या शर्ट प्यांटना आतून खरेदी वर्ष लिहून ठेऊ धोब्याच्या शाईनी, ते पुसलं जाईल पण कपडा सापडेल जसाच्या तसा कपाटात, शेवटचा शर्ट प्यांट जोड ख्रिस्तपूर्व काळात घेतला असेल तुमचा, ते काही नाही, मी हे सगळे कपडे काढून टाकणारे जुने आणि नवीन घेणारे'. 'अगं पण कशाकरता? फाटल्याशिवाय, विटल्याशिवाय उगीच कपडा टाकू नये, मस्ती आल्यासारखा. द्यावा नाहीतर कुणा गरजूला'. 'आबा, हल्ली कुणी गरजू बिरजू नसतं बरं का, कमीपणा वाटतो लोकांना, लोक घेतात आणि विकतात बाहेर'. 'हे बघ, उगाच मला भरीला पाडू नकोस, मी टाकून देणार नाही कुठलाही कपडा कारण नसताना, फार तर कुणाला तरी देऊ मगच नविन आणूयात, चालेल?' 'बरं, पण काढून ठेवा सगळे, रविवारी तुमचं नव्यानी पासिंग करून घेऊ'. 

मी सतीश वाघ, आडनाव वाघ असलं तरी आता म्हातारा झालोय. आत्ता बोलत होती ती माझी नात. मोठी गोड आहे. कथा कादंब-यात असतात तशी म्हातारपणाची दु:खं मला अजिबात नाही, सगळं कसं छान आहे. तसा मी काही चिकट नाहीये पण कपड्यांवरून मला हे सगळे सतत बोलत असतात. पण यांचं फ्रांसच्या राणीसारखं झालंय, अनुभवलं नाहीये त्यामुळे एखाद्या गोष्टीची तीव्रता यांना कळत नाही, अडचण पोचत नाही. आपल्याला सोसावं लागलं, मिळालं नाही ते पुढच्या पिढीला मिळावं यासाठी मधली पिढी धडपड करतीये पण त्यांना सगळं कष्टाविना देऊन आपण घाबरट प्रजा तयार करतोय असं माझं मत आहे. म्हणून कुठलीही अडचण आली की हे लगेच सैरभैर होतात. असो? म्हातारपणी कुणाला मागितल्याशिवाय सल्ला देऊ नये, किंमत रहात नाही, लोक टाळतात मग आपल्याला. पथ्य पाळलं की आजार जवळ येत नाही हे इथेही लागू आहे.

लहान असताना मोठ्या असलेल्या चुलत, मामे भावंडांचे त्यांना लहान झालेले पण चांगले असलेले कपडे घालताना कधीही कमीपणा वाटला नाही कारण वडिलांनी तशी सवय लावली होती. त्यामुळे आम्ही हक्कानी घ्यायचो, द्यायचो. वह्या, पुस्तकं इकडून तिकडे जायची पण त्यात दान, भीक अशी भावना नव्हती कधीच. हे सगळं आठवायचं कारण मात्रं वेगळंच आहे. एखादी घटना घडून जाते पण तिचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की ती कायम लक्षात रहाते. मी बहुराष्ट्रीय कंपनीत होतो तेंव्हा. कंपनी आणि कामगार मिळून काही निधी गोळा व्हायचा चांगल्या उद्दिष्टांसाठी, आमचीच एक अंतर्गत संस्था होती. आदिवासी, गरजू लोकांना मदत करणारी. एकदा एका आदिवासी पाड्यावर आम्ही गेलो होतो. त्यांना त्यांच्या वस्तीकडे जाण्यासाठी मुरुमाचा रस्ता श्रमदान करून बांधायचा होता. मशिनरी आणि आम्ही तीसेक लोक होतो पण मशिनपेक्षा जास्ती काम त्याच लोकांनी केलं खरंतर. काय कृतकृत्य भावना असते त्या लोकांची चेह-यावर. कुठलाही नाटकीपणा, खोटेपणा नाही. आपल्यासाठी कुणीतरी चांगलं करतंय हे त्यांच्या चेह-यावर दिसतं. त्यांना शब्द सापडत नाहीत, पण आशीर्वाद त्यांच्या चेह-यावरून, बोलण्यातून निथळत असतात.

त्यांचा एक म्होरक्या होता. त्याला मान होता. सगळे कसे लंगोटी लावलेले, शिसवीच्या लाकडासारखे काळे कुळकुळीत पण तुकतुकीत, अंगावर चरबीचा कण नाही, काटक सगळे, चपळ आणि झटून काम करणारे. तेल लावलेला कडप्पा चमकावा तसे सगळे ग्लॉसी ब्ल्याक दिसायचे. काम संपलं, बाकी सगळे परत आले. मी हौसेने थांबलो रात्री तिथे. ज्यानी आम्हाला हे काम सुचवलं तो कार्यकर्ता पण थांबणार होता म्हणून. काय मस्तं संध्याकाळ असते माळरानावरची, आपल्याला सवय नसते शुद्ध हवेची. कुठलीही इस्टेट नसलेली ती माणसं काय आनंदी दिसतात, हेवा वाटतो. आम्ही त्या म्होरक्याच्या घरी गेलो. अंधार झाला म्हणजे रात्रंच त्यांच्यासाठी. त्याचं घर जरा मोठं होतं म्हणजे मधे कुडाचं पार्टिशन एवढाच फरक इतर घरांपेक्षा. तो, बायको आणि त्याचा भाऊ. मोठा रॉकेलचा टेंभा त्यानी मधे आणून ठेवला. शहरातला माणूस घरी आल्याचा आनंद आणि न्यूनगंड पण होता त्याच्या हालचालीत. त्याची बायको काही कामावर आली नव्हती. लाल गावठी तांदुळाचा भात, मुगाची आमटी आणि चुलीत भाजलेली कसली तरी कंदमूळं. आम्ही दोघे जेवायला बसलो. काही लागलं की तों आत जायचा आणि मग बायको बाहेर यायची. ती आत गेली की तो किंवा त्याचा भाऊ बाहेर यायचा. 

जेवणं झाली आम्ही गप्पा मारत बसलो बाहेर. त्याची भाऊ आणि बायको दाराचा आडोसा करून बसले होते. भावाला हाक मारली की तो आत जायचा मग भाऊ बाहेर यायचा. मला काहीतरी खटकल्यासारखं झालं. सकाळी आम्ही निघालो लवकरच. म्होरक्या आला होता सोडायला मेन रोड पर्यंत. 'चक्रावलात ना काल? नविन माणसाला असंच वाटतं की हे एकावेळी एकंच का बाहेर येतात म्हणून. तुम्ही शहरातून आलात त्यामुळे आधीच त्यांची फार कुचंबणा झालेली असते. ते असे एकेक का येत होते समोर असंच विचारणार आहात ना?' होय'. 'तुमच्या लक्षात आलं नाही, तुमच्यापुढे येताना सगळे जे कापड गुंडाळत होते तेवढं एकच आहे त्यांच्याकडे. अतिशय जपून वापरतात ते, ते फाटलं तर? हा त्यांच्या दृष्टीने मोठा प्रश्नं आहे. त्यामुळे एकजण आत गेला की दुसरा तेच गुंडाळून बाहेर येतो. एरवी ते लंगोटीवर असतात पण घरी आलेल्या शहरी पाहुण्यासमोर ते वाईट दिसतं म्हणून ते त्यांचं हे ठेवणीतलं कापड वापरतात समोर येण्यासाठी. आपल्याला आपले प्रॉब्लेम किती मोठे वाटतात ना? आत्ता जेवताना डोक्यात संध्याकाळी? हा प्रश्नं ज्याला आहे त्याला भेटा एकदा, माणूस अन्न टाकणार नाही. खूप दरी आहे या दोन जगात. मधे पूल बांधायला कुणाला वेळ नाहीये. फोटो काढून वार्षिक दान करणारे खूप आहेत, कायमस्वरूपी उपाय करणारे कमी आहेत'.    
        
एक प्रचंड मोठ्ठा चरा उमटलाय तेंव्हापासून. कपडा टाकवत नाही त्याला काय करू.  

जयंत विद्वांस 

(कुणाच्या आठवत नाही पण एका मोठ्या माणसाच्या लेखात वारली आदिवासी आणि एक कपडा उल्लेख वाचलेला खूप वर्षामागे, तो डोक्यात खिळा मारल्यासारखा रुतलाय)

धमकी...

आत्मज्ञान पोस्टीत मी कविता करणं बंद केलंय हे मागेच सांगितलंय. ते लोकांनी कौतूक करावं, 'तुम्ही छान करता (कविता), का बंद केलंत, लिहा न परत आता,' 'आं, जा बाबा, एवढं पण नाही ऐकणार माझं' हे ऐकण्यासाठी नव्हतं. तर तेंव्हाही लोकांनी धमक्या दिल्या होत्या म्हणून आणि कित्येक लोकांनी पटवून दिलं होतं की 'कशाला उगाच उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेतोयेस, तुझंही तोंड खराब आणि आमच्याही डोक्याला त्रास'. जनहितार्थ मी तो लेखनप्रकार बंद केला. पण काल त्याच रिपीट पोस्टीवर एक दोघांनी गुलाबपाणी शिंपडून स्वागत केलं आणि हुरळलो झालं.

कविकिरण मंडळाकडून मेसेजेस आले. कुणाचे कुठे हात पोचले असतील सांगता येत नाही हल्ली. स्टोन चाळीतून एक, दुबैतून एक असे दोन फोन आले. अनुक्रमे मराठीतून आणि हिंदीतून.

स्टोन चाळ - 'दात आले काय रे'. 'काय झालं साहेब'. 'कविता करतो का परत'. 'नाही हो, हल्ली होतंच नाहीत, कुंथाव लागतं'. 'परत जर का दिसली कवितेची पोस्ट तर याद राख, मधीमधी बोलू नको, मला आवडत नाय, एकदा सांगितलं ना, नको की नको'. 'अहो पण...' 'आपल्या लोकांच्या पोस्टीला एक तर तू लाईक, कामेंट करत नाय, लै दिवस बघतोय, शाना समजतो का स्वतःला, बांबूनी बोटं ठेचेन उचलून आणून'. डायरेक फोन कट, काय बोलायची संधी नाय काय नाय. मी घाबरून वॉलवरच्या, मेल, ब्लॉग जिथे असतील त्या डिलीटायला घेतल्या. मेंदूत एक तरळत होती ती पण नाकात कागदाची सुरनळी घालून आकछी करून टाकून दिली.

जरा कुठे धैर्य गोळा करतोय तर बाहेरदेशाचा नंबर डिस्प्ले झाला, माझी तिकडे कुणाकडेच उधारी नाही म्हणून घेतला तर डायरेक राष्ट्रभाषेतून खर्जातला आवाज. 'कायको पंगा लेनेका रे, भाय बोला ना हमारा लोकल ब्रँचका, तो सूननेका, टपका डालेगा ना कोई येडा पोएट, बालबच्चेवाला आदमी है इस वास्ते बोल रहेला है, हमलोगाको इतनाच काम नही है रे, एक बार बताया, सूननेका, दुसरी बार फोन बिन कुछ नही आयेगा, सिद्धा पेपरमें ब्रेकिंग न्यूज, चल रख अभी, सुधर जा'.

सकाळी चौकीला गेलो तर मलाच वेड्यात काढलं. अंगठा दाखवून विचारलं 'सकाळीच का आज की रात्रीचीच बोलतीये अजून?' कंप्लेंट नोंदवायची सुद्धा लायकी नाही आपली. तीव्र दुःखानी परत आलो. परत कविता करणार नाही असं अफिडेव्हीट केलंय, फोटो काढून दुबै एचो आणि स्टोन ब्रँचला ऍप्सवर पाठवतो, म्हणजे सुटलो.

त्यामानाने कविकिरण मंडळाचे मेसेज वरणभात होते. 'तू टाक तर, दीड पायाचाच करतो'. 'आपण फार सुंदर कविता करता, तिस-या ओळीला जांभई आणि पाचव्या ओळीत गाढ झोप लागते, लिहित रहा, झोपेच्या गोळ्या घ्यायला नकोत म्हणजे मला', 'तुझं तुला कळतं का रे काय लिहितो ते, काय स्वाभिमान असला शिल्लक तर दगडानी बोटं ठेचून घे'. अत्यंत विमनस्क अवस्थेत आहे मी. आरशात बघितलं मगाशी, एक शबनम अडकवायची, मोठ्या फ्रेमचा चष्मा, चेह-यावर उपजत नैराश्य आहेच, कविसारखाच दिसायला लागलोय.
पोस्टू काय एक शेवटची?

जयंत विद्वांस

सुवास…

चित्रंविचित्रं गोष्टींचं आकर्षण माणसाला असतंच, मलाही आहे. काही विशिष्ठ वास आणि सुवास मला आवडतात - आयोडेक्स, पेट्रोल, चिरूट, थिनर, जळलेली काडी, फ्रेंच पॉलीश, विडी, टायर जाळल्याचा, दृष्टं काढल्यावर येणारा जळका वास, हे सुवास नव्हेत पण काहीतरी आहे त्यात जे ओढून घेतं, वेगळेपण नाकाला जाणवतं. उग्र वासानी माझं, बायकोचं, मुलीचं डोकं दुखतं - चाफा, डिओ, कुठलाही स्प्रे, अत्तर, आफ्टरशेव्ह (शेवटचं किती साली लावलं, आठवत नाही), त्यामुळे असल्या महाग आणि ऐपतीच्या बाहेर असलेल्या गोष्टींपासून आपोआप सुटका झालेली आहे. वास आणि सुवास यात फरक आहे. वास म्हटलं की त्यात शक्यता आली, अहाहा, काय वास येतोय आणि वास मारतोय म्हटलं की भिन्नं अर्थ येतात. सुवास म्हटलं की एकंच शक्यता. नाकपुडी पंपून आत तो वा-यावर सांडलेला भाग पदरात पाडून घ्यायचा. निसर्ग किती फुकट सुख वाटत असतो आणि आपण खर्च करून नकली सुवास विकत घेत असतो. 

लहानपणी चाळीत तो फकीर यायचा रात्री, हातातल्या धुपाटण्यावर ती उद आणि धुपाची पावडर फिसकारली त्यानी की जो पांढरा धूर आणि वास येतो तो अजून विसरलेलो नाही. ती धुपाची कांडी ज्यानी काढली त्याला मारला पाहिजे, उदबत्तीच्या पिठात रोल करून काहीतरी देतात. लालबुंद कोळशावर ते उद, धूप टाकल्यावर स्वप्नं विरावं तसे ते चटचट वितळतात आणि काय गंधाळून टाकतात. त्याची तुलना बाळंतिणीच्या खोलीतील सकाळी शेक शेगडी देऊन झाल्यावर रेंगाळलेल्या वासाशी होऊ शकते फक्तं. वासाला देह नाही असं कुणी म्हणेल तर चूक आहे ते. तेलानी मालिश करून, शेक झाल्यावर, डाळीचं पीठ, साय लावून अंघोळ घातलेल्या लहान बाळाला कधी नाक लावून पहा. लाल तेलाचा, धुपाचा, धुरीचा, जॉन्सनच्या पावडरीचा, डाळीच्या पिठाचा, आणि दुपट्यात घट्ट बांधल्याने मानेच्या वळ्यात आलेल्या हलक्याश्या घामाचा जो काही एकत्रित वास येतो ना त्याला तोड नाही. बाळाच्या कपाळाला, वळलेल्या मुठीच्या आत, शहाळ्यासारखा लागणा -या डोक्याला स्पर्श करा आणि नाकानी ओढून घ्या. काहीतरी हरवलेलं सापडल्यासारखं होतं. असल्या आनंदाला नाव नसतं. फोटोत ते वय, तो क्षण, ती भावना धरता येते, सुवास, गंध, परिमल धरता येत नाही, हे दु:खं आहे.

ते पहिल्या पावसाच्या मातीचा वगैरे सगळ्यांनाच येतो. त्यावर एवढ्या कविता होतात की घाबरून पाऊस गायब होतो. पण कधी पुदिन्यावर पाणी मारल्यावर वास घेतलाय? त्याचा एक अफाट वास येतो, पाच रुपयात आणलेल्या पुदिन्यावर नाही म्हणत, आमच्याकडे मागे बागेत एक पुदिन्याचा चौकोन होता लावलेला, त्यावर पाणी मारलं की येतो जो एक परिमल सुटायचा त्याला तोड नाही. त्या सुवासाला गारवा आहे, छातीत भरून घ्यायचा नुसता, फेश वाटतं एकदम. गावठी गुलाबाला जो वास येतो तो ही असाच फ्रेश करतो. आधी रातराणीचा मग सकाळी पडलेल्या प्राजक्ताच्या सड्याचा वासाइतकाच शेणाचा वासही मला आवडतो. अंगण सारवणे हा प्रकार अस्तिवात नाही आता शहरातून. पण ताज्या शेणानी सारवलेल्या अंगणाचा वास काय सुंदर असतो ते तो फुफ्फुसापर्यंत ओढून घेतल्याशिवाय कळणार नाही. स्वच्छ न्हायलेली परकर पोलक्यातली पोर छोटंसं कुंकवाचं बोट लावलं की जेवढी सुंदर दिसते तेवढंच नुकतंच सारवलेलं, रांगोळीनी श्रीराम लिहून त्यावर इवलीशी पिंजर टाकलेलं अंगण देखणं आणि सुवासिक असतं.

अन्नाचा सुवास हा वेगळाच भाग आहे. नुसत्या वासानी भूक खवळेल, खावंसं वाटेल तो वास खरा. मसाल्यासाठी परतत असलेल्या कांद्याचा, चुर्र आवाज करून उठवळ बाईसारखा उंडारत आलेल्या फोडणीचा, इडलीच्या आंबलेल्या पिठाचा, लाडवासाठी भाजलेल्या बेसनाचा, कुकरच्या शिट्टीमधून येणारा फ्लॉवरचा, खमंग पोळीचा, रटरट शिजणा-या रश्श्याचा, उग्र बिरड्या, पावटयाचा, अमसुलाचा, पुरणाचा, वरणाचा, आंबेमोहोराचा, फेसलेल्या मोहरीचा नाकात जाणारा हे आणि असे अनेक अनंत वास कारणीभूत असतात जेवावसं वाटायला. कधी अंधा-या जागेत अढी घातलेल्या आंब्यावरचं गवत बाजूला करून बघा, काय दरवळ सुटतो ते. अनारसे जमत नाहीत म्हणून दिवंगत झाले. आई घरी करायची विक्रीसाठी पीठ. वाळत घातलेल्या तांदुळाचा तो घरभर पसरणारा आंबूस वास आणि गुळ घातल्यावर त्या पिठाला आलेली वासाची चव किंवा चवीचा वास फार मादक असायचा. नावं देणं आणि नावं ठेवणं हे आपलं आवडीचं काम पण यातल्या कुठल्याही सुवासाला आपण नावं देऊ शकलेलो नाही, ते एक बरंय. सुख निनावी असावं. याचा आनंद सांगता येत नाही, ज्याच्या त्याला भोगता मात्रं तेवढाच येतो. 

प्रत्येक गोष्टीच्या व्याख्या माणसानुसार बदलतात. एखाद्याला सुवास वाटेल तो दुस-याला वास असेल. मोहाच्या दारूचा वास असाच आहे, उग्र, नुसत्या वासानीही झिंग येईल असा. आता कल्हई फक्तं डोक्याला होते, आधी भांड्यांना व्हायची. नवसागर लागल्यावर येणारा तो पांढरा धूर असाच उठवळ वासाचा असायचा. कधी गुळ खायला गेलात गु-हाळावर तर तो वास आधी भरून घ्या नाकात, त्यावर येणारी ती गुळाची पिवळसर खवाबर्फीला मागे सारेल अशी चव आणि तो गुळमट वास भन्नाट असतो. स्कॉचचा बाटली उघडल्यावर येणारा तो उग्र आणि बर्फात तिचं अद्वैत होत जाताना येणारा तो मंद पण मादक सुगंध दरवेळी मला वेगळा भासत आलाय. नविन कपड्याचा, पुस्तकांचा वास एक अगदी कोराकरकरीत आणि कुमार असतो. अशिक्षित माणसाला तो वारंवार दिला तर कदाचित आत काय लिहिलंय ते वाचता यायला हवं असं त्याला वाटायला लावेल इतका तो सुंदर आहे.     

फुलाला येणारा गंध हा अंगचा गुण असतो त्याच्या. प्रत्येकाला आवडणारं फुल वेगळं, गंध वेगळा, त्याच्याशी निगडीत व्यक्ती, ठिकाण, प्रसंग, घटना यामुळे लक्षात राहिलेला गंध वेगळा. पण काही सुवास शब्दांच्या पलीकडे असतात. परमेश्वरानी नुसता स्पर्श दिला असता तर तारुण्य निरस ठरलं असतं, जोडीला वास आहे म्हणून मजा आहे. चौथ्या दिवसाचं नहाणं झाल्यावर त्य शिकेकाईरिठ्याचा वास अंगाला येतो तो दुर्मिळ झालाय आता. अंग कसं करकरीत लागतं स्पर्शाला. बाई अत्तराचा बुधला असते तेंव्हा. रंध्रारंध्रातून मंद मंद सुवास आतली प्रत्येक पेशी सुगंधून हळुवारपणे बाहेर पडत असतो. त्या वासाला एक धुंदी आहे मोहाच्या फुलासारखी. ती तिकडे वा-यावर मन तिरकी करून केस झटकत असेल आणि तुम्हांला वास येत नसेल तर, शरीरात काही हालचाल होत नसेल तर रविवारी अप्पा बळवंतला जाऊन पोथ्या आणणे एवढा एकंच मार्ग शिल्लक आहे असं खुशाल समजा. देवानी अवयव दिला तरी त्याचा उपयोग व्हायला हवा हे ज्याला समजलं नाही त्याचं जीवन व्यर्थ.

काही वास मात्रं आता दुर्मिळ झाले. माणसे नाहीशी झाली तसे ते स्पर्शही गेले आणि वासही गेले. आता बायका ओच्याला हात पुसत नाहीत. आजीच्या, आईच्या साडीला या सगळ्याचा एक संमिश्र सुवास असायचा. जाताजाता आपण हात, तोंड पुसायचो, तो वास हरवला. फेसवॉशनी जेवढं वाटत नाही तेवढं फ्रेश पदराला पुसलेल्या तोंडाला वाटायचं. आजी पेज करायची. भांड्यावर ते अर्ध ठेवलेलं झाकण आणि ती रटरटणारी पेज, त्याला एक सुवास असायचा. मिठाचा दाणा घालून दिलेलं ते अमृत आता कुणी पीत नाही. तिनी मायेनी हातावर, तेल्या मारुती दिसेल असं, लावायला घेतलेल्या खोबरेल तेलाचा वास, दिवाळीतला तो माक्याच्या तेलाचा, उटण्याचा वास, पहाटे येणारा तो फटाक्यांच्या दारूचा वास अजून डोक्यात आहे. तो तिथून निघत नाही त्यामुळे नविन वास तिथे रहायला घुसमटतो.

निसर्ग मोठा सुंदर आहे. देवानी पंचेंद्रिये दिली, त्यांना प्रिय होईल असं निसर्गात काय काय पेरून ठेवलंय त्यानी. आपण पैसे निर्माण केले आणि आपल्याला वाटायला लागलं आपण सुख तयार करू शकतो. कधी तर याचा तिटकारा येईल, उबग येईल आणि मग त्याचा 'वास' मारायला लागेल तेंव्हा नाकाला खरे सुवास सापडायला सुरवात होईल, एवढं खरं.

जयंत विद्वांस


 

आठवतं? (३)...

आभाळ दाटून आलेलं. पाच वाजताच सातचा अंधार. नेहमीप्रमाणे किलोमीटरभर चालत एक चक्कर मग पूनमला कॉफी पित सातला अच्छा करायचं, सगळं नेहमीप्रमाणेच. हातात हात, बोटात बोटं, झाडाचा आडोसा, नकळत झाल्यासारखे वाटणारे मुद्दाम स्पर्श असल्या गोष्टींची गरज नव्हतीच कधी. हलक्या आकाशी रंगाची फुलं असलेला चिकनचा ड्रेस आणि गडद निळी ओढणी. जातीच्या सुंदराला काहीही शोभूनच दिसतं. शुभकार्यात आंब्याच्या डहाळीनी पाणी शिंपडतात तसे मधूनच पडणारे पावसाचे टपोरे थेंब.

'छत्री नाही का आणायचीस, दुपारपासूनच भरून आलेलं, भिजशील उगाच'. 'हं, भिजू दे, मोड नाही येत एवढ्या पावसानी'. पाऊस मोठा नाहीच आला. थोडेसे वाळायला शिल्लक असलेले कपडे दमट असतात तेवढे ओले झालेले कपडे फक्तं. चपलांनी पोटरीवर काढलेली तांबूस चिखलाची हलकीशी खडी, केसांवर मोत्यासारखे तरंगणारे पाण्याचे फुगे, नेमक्या जागी भिजून चिकटलेला ड्रेस आणि चिमटीत धरून त्याला पुढे ओढायची धडपड. चालताना कधी नव्हे तो कोपरापाशी धरलेला हात, चालताना होणारा तो लोण्यासारखा मऊ स्पर्श.

कॉफी पित ओल्या कपड्यांनी खुर्च्यात ते अस्वस्थ बसणं आणि बाहेर कोसळणा-या पावसाकडे दुर्लक्ष करत एकमेकांकडे एकांत मिटावा असं बघणं. 'भिजूयात?' 'नको, तुझ्या नाकाचा वॉशर लगेच जातो'. 'पावसात काय कळणारे काय गळतय ते ;) ?' :) . 'सात वाजले रे, अंधार खूप वाटतोय, निघूयात?' 'हो, कशी जाणारेस, बस? भिजशील स्टॉपपासून घरापर्यंत. प्राण्यांना आधी कळतं, तुला कसं नाही समजलं पाऊस येईल, छत्री न्यावी ते?'  'आला मोठा शहाणा, नीट जा, गाडी हळू चालव, हिरोगिरी नको, मला सोड की आज, काही नाही होत, पावसामुळे उशीर झाला सांग'. 'बरं, चल कमी झालाय'.

भुरभुरत्या पावसात लूनावर मागून ते घट्ट धरून बसणं, पाठीला कळणारे ते ह्रदयाचे ठोके आणि मानेला जाणवणारे ते ओले गरम श्वास. पटकन संपला असं वाटणारा तो लांबलेला प्रवास. घराच्या कोप-यावर उतरताना मानेवर उमटलेली ती मधाळ खूण. कुणाला असं सोडून एकटं परत येताना जीव होत नाही खरंतर.

'नीट जा, बाय'. एवढं म्हणून ती खट्याळ हसली आणि पर्समधून फोल्डिंग छत्री काढून खट्टकन बटन दाबून तिनी खांद्यावर छत्री धरली आणि म्हणाली, 'मठ्ठ, म्हणे छत्री नाही का आणायचीस?

आठवतं? 

जयंत विद्वांस

हक्कं…

आत्तापर्यंतच्या आयुष्यात कुणाला 'आय लव्ह यू' म्हणायला जीभ रेटली नाही यापुढेही म्हणलं जाणार नाही (जसं काय कुणी अगदी आसुसलंय ऐकायला, मार खायची लक्षणं, दुसरं काय). कधी धीर झाला नाही, कधी भिडस्तपणा आडवा आला, कधी न्यूनगंड वाटला, कधी नकाराची भीती वाटली. पण काहीवेळा दोन्हीकडूनही हे न बोलताही बरंच काय काय घडलं. म्हणायलाच लागतं असं काही नाही हे उशिरा समजलं. न बोलता कळतं सगळं. मोठं मस्तं फीलिंग असतं खरंतर ते. ह्या गोष्टी मला उशिरा कळतात एकतर. मी भोळा वगैरे नाहीये पण कुणी मोकळेपणानी बोललं म्हणून मी उगाचच गैरसमज करून घेत नाही. माझं एकूण वकूब मला माहित आहे या बाबतीतला. तुसडेपणा, कुचकेपणा, विक्षिप्तपणा माझ्या बोलण्यात उपजत आहे त्यामुळे फार काळ माझ्याशी कुणाचं पटत नाही. असो!

तर मूळ मुद्दा हक्कं. तीच ती मसाला डोसा, वेंधळा, सवाई वाली. साल एक्क्याण्णव. एस.वाय.झालेलो फक्तं. अकौंटसला रग्गड दत्तू लोक होते मी धरून. वंदना, वर्षा, मी, मणियार, त्रिवेदी आणी ती. एकाच्या ठोक्याला मी आजतागायत जेवायला बसत आलेलो आहे ते तेंव्हापासून. आमचं एल टाईप ऑफिस होतं. आतल्या बाजूला एक लांबसडक टेबल होतं. तिथे आम्ही जेवायला बसायचो. चेअरपर्सन असल्यासारखा मी कडेला आणि बाकी सगळे काटकोनात बसायचे. आमचा क्रम ठरलेला असायचा. मी, ती, वर्षा, वंदना, मणियार, त्रिवेदी. सगळ्यांची खेचत, दात काढत जेवणं चालायची. खूप गमती केल्या आम्ही तिथे. एकदा मी म्हणालो, आज कुणीतरी फ्लॉवरची भाजी आणलीये, वास येतोय उग्रं. प्रत्येकजण म्हणाला, येतोय, पण मी आणलेली नाहीये. शेरलॉक होम्ससारखे सगळे पर्याय शोधून झाले.नाद सोडून दिला सगळ्यांनी. जेवताना मी माझी फ्लॉवरची भाजी दाखवली सगळ्यांना. मग प्रत्येक घासाला पब्लिक मला हाणत होतं. मी विचारलंय म्हणजे माझ्याकडे नाही हे तुम्ही गृहीत धरलं ही चूक माझी नाही हे बोलल्याने अजून हाणला मला.

तर एकदा ती समोर गेली होती, आम्ही जेवायला बसलो. वंदना माझ्याशेजारी बसली चुकून. कुठलाही हेतू नव्हता तिचा, मलाही त्यात काही गैर वाटलं नाही. 'ती'चा चेहरा लाल झाला तो समोरून उन्हातून जाऊन आल्यामुळे असेल असा माझा समज. दुपारी कॉफीला तिनी रिमांड घेतला. 'तुला सांगता येत नाही? माझ्याशेजारी बसू नको म्हणून?' 'अरे, असं कसं सांगणार, इंसल्टिंग आहे ते, आपल्याला असं कुणी म्हणालं तर चालेल का?' 'पण इथे *** बसते हे तुला सांगता येत नव्हतं का?' 'एखादा दिवस ती बसली तर काय बिघडलं पण? मी तरी असं कुणाला म्हणू शकत नाही कारण त्यात फार मोठं काही घडलेलं नाहीये'. 'तुलाच आवडतंय म्हणजे ती बसलेली'. 'उगाच काहीतरी, ती डबा घेऊन आली आणि जागा दिसली म्हणून बसली त्यात काय एवढं?' 'कुणीच नव्हतं तर शेवटी का बसली नाही?' 'विचारतो तिला'. 'काही गरज नाहीये, परत बसली ती तिथे तर बघच'. 'मी तिला बस असं सांगितलेलं नाहीये आणि मी एवढ्या क्षुल्लक कारणावरून उगाचच कुणाचा अपमान करणार नाही'. 'बरं, संगनमतानीच चाललंय म्हणजे सगळं'. 'माझे आई तसं काहीही नाहीये पण तुला तसं वाटत असेल तर मी काही करू शकत नाही त्याबाबत'. 'परत बसू दे, मी बघतेच तिच्याकडे'. सगळं पटत असताना समोरचीनी भांडायचंच ठरवलं की लॉजिकल स्टेटमेंट काहीही उपयोगाची नसतात हे मला तेंव्हापासून समजलंय.    

दुस-या दिवशी वंदना परत शेजारी बसली, नेमकी तिनी वरणफळ आणली होती. ते आमटीत लडबडलेले पोळ्यांचे तुकडे खाताना बघितलं तरी मला कसंतरी होतं. ती मागेच उभी होती. मला वाटलं नजरेनीच वंदना काळी पडणार बहुतेक. मी म्हटलं तिला, 'मला अज्जिबात आवडत नाही ते, तिकडे बस'. उठली बिचारी. ती आली आणि कुचक्यासारखं वरणफळ हा कसा चविष्ट प्रकार आहे हे मला जेवण होईपर्यंत समजावून सांगितलं. सुडाचाच प्रकार हा. तिस-या दिवशी ती परत समोर गेली होती,शप्पथ सांगतो माझ्या डोक्यात काहीही नव्हतं. वंदना शेजारी बसली आणि ती आली. तिचं डोकं फिरलंच होतं. माझी फूस आहे या समजानी जास्ती. तिनी वंदनाला हाताला धरून उठवलं. 'इथे मी बसते, जयंतच्या शेजारी कुणीही बसायचं नाही'. कमी शब्दात नेहमी जास्ती अपमान होतो. मला खूप ऑकवर्ड झालं. मी संध्याकाळी तिला सेपरेट सॉरी म्हटलं. तिच्या मनात काय होतं माहित नाही पण ती म्हणाली, 'अपमान मी पण करू शकले असते पण तुझ्याकडे बघून गप्पं बसले'. या वाक्याचा अर्थ आजतागायत मला उमगलेला नाही.

'ती'ला मी नंतर रीतसर हाणली. तिचं कसं चुकलं, असा अपमान तुझा कुणी केला तर? हे पटवून दिलं. तिनी मान्यंही केलं. पण काही ठिकाणी लॉजिक कामाला येत नाही. ती ओलसर डोळ्यांनी मला म्हणाली, 'बाकी मला काही माहित नाही, उद्या मी सॉरी म्हणेन तिला. पण तुझ्याशेजारी कुणीही बसलं तर मी हेच सांगेन आणि सॉरी म्हणेन. आता फार बोलू नकोस मला यावरून'. हक्कं. कुणीतरी टोकाचा दाखवला की त्रास होतो कधी, पण एवढा जीव टाकणारं कुणी तरी आहे ही भावना त्या त्रासापेक्षा जास्ती सुखद आहे. पंचवीस वर्ष झाली. उतारावरच्या गाडीसारखा काळ वेगात सरला. त्यातलं कुणीही भेटलं नाहीनंतर कधी रस्त्यातसुद्धा. वंदना विसरली पण असेल. 'ती' विसरली नसेल अशी समजूत आहे.

अर्थात मी तेंव्हापासून कामावर जेवायला एकटाच बसतो त्याच्याशी याचा काहीही संबंध नाहीये बरं का. 

जयंत विद्वांस

Tuesday, 17 May 2016

उद्योग (१)…

आडनावाच्या अपभ्रंशाला साजेसे उद्योग मी लहानपणापासून करत आलो आहे. त्याकरता अनंतवेळा मारहाण होऊनही अजून काहीही फरक पडलेला नाही. वय वाढल्यामुळे आता ते चुकून झालं असं म्हणता येतं एवढाच फायदा, बाकी नुकसान करण्याचं कार्य इमानेइतबारे चालू आहे. हात मोडून झालाय (माझाच), दुसरीत असताना स्टोव्हवरून नुकत्याच उतरवलेल्या पिठल्याच्या कढईत बसून झालंय. चार दिवस वाडियाला अर्धदिगंबरावस्थेत पालथं झोपावं लागलं होतं. मलम ब्रशनी लावावं लागलं होतं. तुझी का ** जळते असं कुणी म्हणू शकत नाही मला, आधीच बेक्ड आहे. बोलताना अवस्था अशी होती की 'बोलतोय बघ कसा तोंड वर करून' ही वस्तुस्थिती होती. ती सवय मला तेंव्हा पासून लागली असावी नाहीतर मी तसा मुखदुर्बळ माणूस आहे. तर असे अनंत विध्वंसक उद्योग करून मी आता सोबर झालो आहे. 

आईनी एकदा मोठ्या मेहनतीनी मोठ्ठ्या बरणीभर तूप साठवलं होतं. पुरणपोळी केलेली आणि ती घरात नव्हती. म्हटलं तूप थोडं पातळ करून घेउयात पोळीसाठी. ग्यास लावला, झाकण काढलं, वरती मानेपाशी बरणी धरली आणि होळीत ते ढुमकं जसं फिरवतात तसं बर्नरवर झोका दिल्यासारखं पातळ करत होतो तूप. काचेची क्वालीटी भंगार असणार. एका मिनिटात वरची थ्रेडची काचेची रिंग माझ्या हातात आणि मनसेच्या खळखट्याकसारखं टोलनाका फोडल्यासारखा आवाज करत सगळ्या ओट्यावर काचा, बर्नरवर तुपाचा अभिषेक, ग्यास गेला. त्या लहान वयात पण मी कामसू होतो. सगळं पुसून घेतलं, खुनाचा पुरावा गायब करतात तशी परिस्थिती अगदी. आई आली. मी चिडीचूप. ग्यास लावायला गेली कशाकरता तरी. बर्नरचं सर्दी झाल्यासारखं नाक चोंदलेलं, तो कशाला पेटतोय. बरं दुसरा पेटतोय त्यामुळे सिलेंडर हयात आहे. कुठल्याही गोष्टीत परकीय शक्तींना जसं जबाबदार धरतात त्याप्रमाणे संशयाची सुई आधी होकायंत्रासारखी कायम माझ्याकडे वळते. अत्यंत निष्पाप चेह-यानी मी फार अंगाशी येणार नाही इतपत सगळं सांगितलं पण अभिनय कमी पडला असावा. नाके फोडणा-यांना आत घेतल्यावर जशी चूक कळते तसंच झालं माझं. शब्दश: अंगाशी आलं. 

तेंव्हा दरवर्षी डिस्टेंपर द्यायचो आम्ही. बाबा जायचे त्या दुकानात नाना बहिरट म्हणून अत्यंत गरीब व्यक्तिमत्व होतं एक. बाबांच्या भाषेत तोंडात बोट घातलं तरी चावणार नाही, इतका गरीब. ते यायचे मदतीला. शनिवार सकाळची शाळा. लवकर सुटायची. 'नाना. मुलांना घेऊन येता का सायकलवरून?' 'हो. आणतो की'. नानांना बघून आम्हांला चालत जायला लागणार नाही याचा प्रचंड आनंद झाला. आनंद झाला की माणसाला सुचत नाही काय करायचं ते. मी पुढे, भाऊ मागे. तेंव्हा एवढी गर्दी नसायची रोडला. नाना बुलेट ट्रेनच्या स्पीडनी चालवायचे सायकल. मधे उतरा, कुणाशी बोला, जॉगिंग करत परत सायकल पकडा. प्रवास निरस वाटायला लागला मला. मोजून सहा सात चौकावर घर. पुढे बसलेलो मडगार्डवर पाय ठेऊन. चुकून स्यांडल लागला टायरला. मस्तं आवाज आला खर्रखर्र असा. दहाबारा वेळा ट्रायल घेतली. भारी वाटत होतं. वडिलांच्या गाडीला मागे आर्मिचर होता दिव्यासाठी तो असाच वाजायचा पण आवाज जरा कमी. म्हटलं जरा एकसारखा पाय धरला तर सलग आवाज येईल. अंदाज घेऊन मी टायरला पाय लावला. अर्धा मिनिट सलग तान झाली असेल. पुढे घात झाला, शनिवार जन्मवार असून घातवार बघा. 

सारसबागेच्या आधी पाय सटकला आणि चाकात गेला. अर्ध्यात स्वप्नं तुटावं तसं झालं सायकलचं. मी नाही जाणार पुढे, रागावलीये मी, असं म्हणत ती जागीच थांबली. नाना समरसॉल्ट मारून सायकलच्या पुढे, भाऊ मागे पडला, मी ऋणानुबंध असल्यासारखा साथ न सोडता स्पोक तुटलेल्या चाकात पाय घालून सायकलला कवटाळून पडलेलो. तुरळक पब्लिक धावलं. नानांना उपदेशपर डोस पाजून झाले. मूडदूस झाल्यावर पोट मोठं होतं फक्तं तसा उजव्या घोट्याजवळ फुगा आलेला. एकानी स्पोक पिळून दुस-यात गुंतवले. परत लफडं नको म्हणून आम्हांला दोघांना बसवून त्यांनी चालत घरी आणलं. त्यांची काहीही चूक नसताना त्यांनी माफक ऐकून घेतलं. रक्तचंदन, आंबेहळद यांचा फेसप्याक लावून झाला घोट्याला. कुठलाही काम करावं लागलं नाही रंगाचं. तसंही सांडलवंड जास्ती असल्यामुळे कमी नुकसान होईल अशीच कामं मला दिली जायची आधीपासून. 'मैं चूप रहूंगी'च्या मीनाकुमारी सारखं मी मौन धारण केलं आणि 'काय माहित कसं झालं पण पाय आत गेल्यावरच मला समजलं' या एका वाक्यावर मी ठाम राहिलो. मला डबलसीट घेऊन चाललेत हे स्वप्नं पडून नाना अर्धवट झोपेत दचकून उठायचे म्हणे. 

हुशारी जशी उपजत असते तसा वेंधळेपणाही उपजत असतो. सांडणं, फुटणं, तुटणं हे नक्षत्रगुण आहेत त्याला मी काय करू. काप-या आवाजाच्या तलतचं कौतुक होतं, तो हृदयाचे तुकडे करतो तर त्याचं कौतुक. इथे कप-या हातांनी वस्तू पडतात इतकाच फरक. कौतुकसुद्धा नशिबात लागतं. :P 

जयंत विद्वांस          

Monday, 9 May 2016

फणस…

फणस…
 
आता पासष्ठीचे झालेत बाबा. पद्मनाभ दिक्षित हे त्यांचं खरं नाव. श्री.दुर्वास फणसे आम्ही ठेवलेलं. आता जरा निवळलेत. नाहीतर जमदग्नी, दुर्वास हे शांतीदूत माझे चुलत वगैरे काका म्हणून खपतील इतके ते भडक डोक्याचे होते. अजून आहेत असं आईचं म्हणणं. बाबा मोठे शिस्तप्रिय होते, आहेत. काय करतील ते वेळेत, काटेकोर, शिस्तीत. बेशिस्त दिसली की त्यांचं डोकं फिरलंच म्हणून समजायचं. सख्खी मुलगी असो नाहीतर अजून कुणी सगळ्यांना नियम एकंच. आईला एकदा मी म्हटलं होतं, 'कसे दिवस काढलेस ते तुझं तुला माहित'. आई म्हणाली होती, 'शिस्तीचा, नियमांचा, पथ्थ्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. मलाही झाला सुरवातीला. पण कसं आहे माहितीये का एकदा कळलं नं आपल्याला, या या गोष्टींचा राग येतो समोरच्या माणसाला, त्या करायच्याच कशाला आपण? बरं, ते सांगतात ते वाईट नाही, फायदाच आहे त्याचा. अर्थात जगाला शहाणं केलं नाहीतर जग बुडणार लवकरच हा स्वभावाचा भाग आहे त्यांच्या. त्याचा त्रास आपण करून कशाला घ्यायचा? आपण शक्यतोवर वाद होणार नाहीत ते बघावं'. मला काही तिचं बोटचेपे धोरण पटलं नाही पण मी वादही घातला नाही.

मी एकुलती एक मुलगी त्यांची. बाबा शिक्षक होते (शाळेतून मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाले म्हणून 'होते' म्हणायचं फक्तं). घरची परिस्थिती तालेवार होती, अजूनही आहे पण यांनी पत्रिकेत वरून येतानाच लिहून आणलं असेल ते शिक्षक होतील असं. प्रॉमिसरी नोट पण लिहून दिली असेल 'शिक्षक' म्हणूनच काम करेन अशी. 'अभ्यास करून माणूस मेला असं आलंय का पेपरात कधी? तुम्ही गेलात तर तुम्ही बाकी कशात नाही तरी यात तरी पहिले म्हणून नाव होईल, रेकॉर्ड होईल, जगलात तर हुशार व्हाल. दोन्हीकडून तुमचाच फायदा आहे, त्यामुळे मला कारणं सांगू नका' अशा शब्दात ते वासलात लावायचे कारणांची. बाबांची बोलणी खाल्लेली सगळी मुलं कायम वरच्या नंबरात पास झाली पण कुठेतरी कटुता शिल्लक राहिलंच असंच बाबा बोलायचे. दहावी झाल्यावर सुटलो एकदाचे असं प्रत्येकाचं मत होतं. मला वाटायचं हे सुटले पण माझं काय? अर्थात तो सगळा त्या वयातला खुळेपणा होता हे नंतर कळलं.

अर्थात मी काही सारखी नाही बोलणी खायचे पण महिन्यात एकदा तरी पूजा व्हायचीच माझीही. बाबांची काही वाक्यं ठरलेली होती. ती ऐकण्यापेक्षा अभ्यास केलेला बरा. 'दारोदार करवंट्या घेऊन भिका मागायच्या असतील तर देवाला पास कर म्हणून जो नारळ फोडताय तो नीट निम्म्यात फोडा, तो ऐकणार नाहीये दहा रुपयाच्या नारळात, पॉलीश पेपरचे पैसे मी देतो, एकदम गुळगुळीत करा करवंट्या आणि मागा भिका, तोंडाकडे बघून नाहीतर निदान देखण्या करवंटीकडे बघून तरी कुणी टाकेल काहीतरी'. 'हागस्तोवर खाता तसा अभ्यास का करत नाही ओ येईस्तोवर, अभ्यास केलात तर मेंदू फुटेल अशी भीती आहे का?' 'पाच आंब्यातले कुठलेही तीन खा म्हटलं तर ऐकता का, भिका-यासारखे पाचही खाल ना? मग तसेच पेपरात सगळे प्रश्नं सोडवा. 'कुठलेही तीन' हा तुमचा अपमान समजा परीक्षकांनी केलेला'. गाईड बघीतलं कुणाच्या हातात की त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जायची अगदी. 'मुलींकडे चोरून कसं बघायचं ते कसं स्वत:चं स्वत: शोधता, उत्तरं पण शोधता आली पाहिजेत तशी, परत गाईड दिसलं किंवा त्यातलं छापील उत्तर लिहिलं तर त्याची सुरनळी करेन आणि ***त घालेन'.   

पोराच्या समर्थनार्थ बोलणा-या आईबापाला पण ऐकावं लागायचं, 'मी शिकवण्या घेतो ते माझ्या संसाराला हातभार म्हणून नाही, त्यांची पोटं भरायला माझा पगार आणि इस्टेट पुरेशी आहे, तुमचे शंभर रुपडे आत्ता अंगावर फेकू शकतो, मस्ती म्हणून नाही, ऐपत आहे म्हणून, घरात कुणी गेलं असेल, पोर आजारी असेल तर यायचं नाही फक्तं शिकवणीला, दुसरी फालतू कारणं असतील तर आपला राजकुमार/कुमारी घरात मखरात ठेवा'. बाबांनी खूप जणांना फुकट शिकवलं पण कधीही त्याची वाच्यता केली नाही. ते एकदा एका उर्मट, पैशाचा माज असलेल्या पालकाला म्हणाले होते. 'मी पैसे घेतो ते नाममात्रं, फुकट दिलं की किंमत नसते म्हणून. इतकी वर्षे शिकवणीचे सगळे पैसे मी कर्व्यांच्या 'अनाथ हिंदू महिलाश्रमाला' देतोय. तुमच्या बायकोनी आत्तापर्यंत पेपरच्या जाहिरातीत जेवढं सोनं पाहिलं असेल तेवढं माझ्या तिजोरीत अस्ताव्यस्त पडलंय त्यामुळे पैशाचा रुबाब मला दाखवू नका, निघा.'

ताकद असूनही बाबांनी कुणावरच कधीही, कितीही राग आला तरी हात मात्रं उचलला नाही. लोकाची मुलं, त्यांना कशाला मारेन मी, माझ्या मुलीला कुणी फटकावलं तर मी त्याची मान मोडेन राग येउन असं त्यांचं त्याबाबतचं तर्कशास्त्रं होतं. त्यांच्या बोलण्याचाच मार जास्ती परिणामकारक होता. मी दहावी झाले. मला म्हणाले, 'तू म्हणशील त्या दिशेचा खर्च मी करू शकतो. तुला काय आवडतं ते तू ठरव. प्रत्येक मूल पहिलं येऊ शकत नाही, येऊही नये, किंमत रहाणार नाही. पण जे काय शिकशील ते साठ टक्के तुला येत असेल तर त्या साठ टक्क्यातलं शंभर टक्के ज्ञान तुला हवं, एवढं लक्षात ठेव. पैसे कमावण्यासाठी शिकायचं असेल तर माहिती मिळेल, ज्ञान नाही. स्वत:ला नविन काही कळावं, त्यात अजून काही भर घालता येईल का असं वाटलं पाहिजे शिकताना'. मी इंग्लिश मधून एम.ए.केलं. जर्मन शिकले. मी दुभाषी म्हणून काम करते. लहान वयात जगभर फिरले पण बाबांनी कधी तोंडावर कौतुक म्हणून केलं नाही. आईजवळ म्हणतात, 'कायच्या काय शिकली गं पोरगी, मला मागे टाकलंन तिनी'.

माझ्या लग्नात सुद्धा ते ढसाढसा वगैरे रडले नाहीत. थोडेसे पाणावलेत की काय अशी शंका येईल इतपत डोळे ओलसर होते. आम्ही दोघंही दुभाष्याचंच काम करतो. प्रेमविवाह माझा. मला म्हणाले होते, 'आम्ही जुळवला असता म्हणजेच तुझं भलं झालं असतं असं अजिबात नाही. आईबाप आयुष्याला पुरे पडत नाहीत. तुझा जोडीदार तू निवडलास यात राग नाही, फक्तं विचार करून निर्णय घे म्हणजे झालं. निर्णय चुकला असं वाटलं तर तो चुकीचा कसा आहे हे पटवून द्यावं लागेल, ही भातुकली नव्हे, मग मी तुझ्या पाठीशी आहे याची खात्री बाळग आणि निर्धास्तपणे लग्नं कर'. माझ्याकडे दिल्लीला ते फार येत नाहीत. आत्तापर्यंत दोनवेळा आलेत फक्तं चार वर्षात. मलाही फार जमत नाही सुट्ट्यांमुळे जायला वरचेवर. आता ते दोघंही थकलेत. आईशी बोलणं होतं दिवसाआड तरी, बाबांशी फार नाही. 'कशी आहेस, बाकी बरंय ना, जावई काय म्हणतात' यापुढे आमची गाडी सरकत नाही. 

आज सकाळची गोष्टं. परवा एक लग्नं आहे त्यासाठी मी काल रात्री आले उशिरा, दीड वाजला असेल. बाबांमुळे पाचच्या ठोक्याला उठायची सवय इतकी वर्ष अंगवळणी पडलीये, गजर होण्याची गरज लागत नाही. बाबाच आले होते मला घ्यायला एअरपोर्टला. दोन विमानं बदलून दमल्यामुळे हॉल मधेच झोपले आल्या आल्या सोफ्यावर. जाग आली म्हणून मोबाईल बघितला. उठणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला मग तशीच झोपले मुद्दाम डोळे मिटून. उगाच म्हटलं लवकर उठ्ण्यावरून लेक्चर नको. पण भलतंच घडलं. डोळ्यावर ऊन येऊ नये म्हणून बाबांनी पडदे सरकवले, आईला बघून तोंडावर बोट ठेवलं आणि दोघं किचनमध्ये गेले. मुद्दाम दरवाज्यापाशी जाऊन आड उभी राहिले. बोलूच देत म्हटलं उठण्यावरून, भांडतेच आज मुद्दाम. दोघं चहा पिता पिता बोलत होते. 

'अहो आठ वाजले, आत झोपायला सांगू का तिला?' 'झोपू दे गं, घरी उठतच असेल पाचाला, मी प्रत्येकाला शिस्त लावायचा प्रयत्नं केला तो त्याच्या आयुष्याला अर्थ यावा म्हणून, माझा अट्टाहास तुम्हांला जाचक वाटला असेलही पण नाईलाजाने असेल किंवा पटलं म्हणून असेल तुम्ही तसं वागलात. तुम्ही तसं वागला नसतात तर मला राग नसता आला, दु:खं वाटलं असतं. बाहेरचा कुणी म्हणू शकला असता, ' आधी घरातल्यांना लावा शिस्तं मग बाहेरची धुणी धुवा'. पण तशी वेळच आली नाही कधी तुमच्यामुळे. किती फरक आहे आपल्या दोघांच्या स्वभावात. तू स्पंजसारखी, सगळं टिपून घेणारी आणि मी नदीतल्या दगडासारखा, कितीही पाणी गेलं तरी कोरडा ठाक अगदी.  पण आज मलाही रडू आलं'. 'का ते?' 'आम्ही आलो तेंव्हा तू झोपली होतीस, सगळं सामान आत आणलं तिनीच आणि तिथेच झोपली सोफ्यावर लगेच. मी नेहमीप्रमाणे उठवणार होतो आणि सांगणार होतो, आत झोप म्हणून'. 


'पण तिचा तो माहेरी आल्याचा आनंदी चेहरा बघून मला भरून आलं. मी आतून शाल आणली आणि घातली तिला. थोपटलं जरा डोक्यावर तर झोपेत म्हणाली, 'बाबासारखं थोपटतोयेस तू' आणि माझा हात घट्ट धरला. आतापर्यंत कधी कुठल्या मायेच्या पाशात मी फार गुंतलो नाही पण काल हात सोडवून घेताना खूप कष्ट पडले बघ मला. समोरासमोर बोलणार नाही ती काही, पण किती लहानपणचं लक्षात आहे बघ तिच्या. दातात कण अडकावा तसं कुठे काय मेंदूत अडकून राहतं बघ. आज इतक्या वर्षांनतर तो स्पर्श तिच्या डोक्यात आहे.' आई हसत रडत होती आणि बाबा रडत हसत होते आणि मी दाराशी मुग्ध होऊन पहात होते. 

फणस. पिकल्यावर थोडा उकललाय, गळायच्या आत सगळे गरे काढून घ्यायला हवेत.      
   
जयंत विद्वांस


Wednesday, 4 May 2016

रद्दी…


टीव्हीच्या बातम्या बघणं मी कधीच सोडलंय, पेपर वाचायची सवय अंगवळणी पडल्यामुळे तो वाचला जातोच पण हल्ली पेपर मी अतिशय विनोद बुद्धीनी वाचतो. वास्तविक पहाता वांझोटी चीड आणणा-या, हताश करणा-या, त्रास होणा-या बातम्याच जास्ती असतात पण तेच तेच वाचून सगळं बोथट झाल्यामुळे तशा बातम्या नसल्या तर चुकल्याचुकल्यासारखं होतं. जुनाच पेपर आजची तारीख टाकून छापला तरी चालेल अशी परिस्थिती आहे. अधूनमधून चांगल्या बातम्या मधल्या पानात, कोप-यात येतात कुठेतरी, वाचताना धक्का बसू नये म्हणून त्या तिथे छापत असावेत. भारताची स्वत:ची जीपीएस प्रणाली, अनेक देशांचे उपग्रह एकावेळी सोडले वगैरे क्षुल्लक बातम्या पण छापतात. माणसाला काय बोलू नये आणि कुठे बोलू नये एवढं कळलं पाहिजे असं म्हणतात. त्याच चालीवर निदान काय छापू नये आणि कितव्या पानावर छापू नये एवढं कळायला हवं. 'दाउद मधुमेहानी त्रस्तं' ही बातमी फ्रंट पेजवर कशी काय येऊ शकते? काय अपेक्षित आहे? औषधं पाठवावीत की डॉक्टर्स पाठवावेत की मेणबत्त्या लावून प्रार्थना करावी की घंटा बडवून (देवळातल्या) आवाहन करावं?


मला बातमी वाचली की कंसातलं स्वगत दिसतं. मल्ल्याचा खासदारकीचा राजीनामा त्याची सही नाही म्हणून फेटाळला (ती सही त्याची नसेल तर मग बँकेत केलेली कुठलीच सही त्याची नाही, त्याच्या नावावर कर्ज दाखवणे हे षड्यंत्र आहे - जेठमलानी, प्लीज नोट), ऑगस्टा हेलीकॉप्टर वरून काँग्रेस अडचणीत (हेरॉल्ड बोर्डावर यायला अवधी आहे, हे कधी येणार?), अमक्याला पुढच्या महिन्यात नक्की अटक होणार (इतकी वर्ष या यंत्रणा कुठे गायब होत्या? पुरावे अचानक सापडले का? समजा पाच वर्षानंतर सत्ताबदल झाला तर  हे चालू राहील का?), पुणे सुपरजायंट्सची वाट खडतर (शेतक-याच्या आयुष्याबद्दल कुठेही, कुणालाही चिंता नाहीये), १५ जुलै पर्यंत पाणी पुरणार नाही (गाळ काढला तर पाणीसाठा वाढू शकतो ही बातमी नेमेची येतो पावसाळा या धर्तीवर मी बालपणापासून ऐकत आलो आहे, तो कधी काढणार?), ट्रंपला उमेदवारी मिळून अध्यक्ष झाल्यास भारताला अवघड जाणार (आधी काय मोठा अमेरीकेनी आपल्याला मांडीवर बसवून घास भरवलाय), बलुचिस्तान स्वतंत्र करण्याची भारताला गळ (ही मागणी अशी बोंब मारून का होते? चिडीचूप काम दाखवता येत नाही का, इस्राइलसारखं), तीन वर्षाच्या मुलीवर अमानुष बलात्कार (सौदीतले कायदे कधी लागू होणार?), कीटकनाशक पिऊन शेतक-याची आत्महत्या (कोकणातला शेतकरी आत्महत्या का करत नाही? कर्जमाफी एवढा एकंच उपाय आहे का? तीच रक्कम वापरून धरण बांधता येत नाही का?), बिपाशाचं आणि तिच्या नव-याचंही तिसरं लग्नं (लिझ टेलर आणि इंद्राणीला मागे टाकणार ही), या आणि अशा अनंत बातम्या.

यात नेत्यांची, शंकराचार्यांची बेताल वक्तव्यं, धर्मावरून, जातीवरून होणा-या चर्चा, परस्परविरोधी बातम्या, फसवणुकीच्या फक्तं रक्कम आणि स्कीम बदललेल्या बातम्या, न्यूनगंड वाटेल असे घोटाळ्यांचे आकडे, आपण सोडून बाकीच्या देशात घडणा-या चांगल्या गोष्टी, महिनाभर चालू असलेली जंगलाला लागलेली आग, कुपनलिकेत पडून मेलेलं मूल, सीमेवरचा गोळीबार आणि त्यात किडामुंगीसारखे मरणारे आपले जवान, अशा अनेक त्रासदायक गोष्टींची भर असते. मग का वाचतो आपण पेपर? कारण आपल्याला पण ते व्यसन आहे, अंगवळणी पडलंय, फक्तं चांगल्या बातम्या आल्या तर आपल्याला अळणी वाटेल. उथळपणा आला, सवयीनी तो हवाहवासा वाटू लागला हा आपलाही दोष आहे. अग्रलेख वादग्रस्त असेल तर वाचला जातो किंवा त्यावर बोललं जातं. माधव गडकरी, तळवलकर यांसारखे लोक अस्तंगत झाले. अभ्यासपूर्ण, तटस्थ अग्रलेख दुर्मिळ झाले. एकूणच सगळं सवंग होत चाललंय.

आपल्या आयुष्यात पेपरच्या बातमीत नाव येणं शक्यं नाही. आता फक्तं प्रिपेड गृह्यसंस्कार सुरु झालंय का विचारणं तेवढं बाकी आहे. ती बातमी आपली आपण दिली तरी स्वत:ला वाचता येणार नाही म्हणून निदान आकर्षक ड्राफ्ट तरी देऊन ठेवावा असं वाटतंय, तारीख टाकतील ते लोक. त्याच त्याच बातम्या वाचून कंटाळलेल्या कुणाला तरी मधली पानं वाचावीशी वाटली आणि वाचून मनात स्वगत उमटलं तर ठीक नाहीतर दुस-या दिवशी रद्दी आहेच.

जयंत विद्वांस

Saturday, 30 April 2016

दिसतं असावं...

दिसतं असावं... 

परवा दोन मुंजीना गेलो होतो मुंबईला. दगदग, धावपळ करून माणसं येतात, जमतात, लगेच गायब होतात. पहिल्यासारखं आधी चारपाच दिवस तयारी मग बोडण किंवा पूजेला थांबण्याचे दिवस इतिहासजमा झाले. वेळ नाही, जागाही कमी आणि उत्साह पण कमी झालाय एकूणच. प्रथा चालत आल्यात म्हणून पार पाडल्या जातात. संध्या कोण करतंय तसंही आता? मुंज झालेल्या मुलानी विचारलंच चुकून तर आधी वडिलांना यायला हवी ना. त्यामुळे तिची सुरवातच होत नाही. ती केली म्हणजे काय होतं, नाही केली म्हणून काय होतं याचा उहापोह नको. मी ही ती एकदाही केलेली नाही. पण संस्कार असतात, ते करायचे एवढं खरं. मुलगा आता शिकायला आश्रमात जाणार नाही, ब्रम्हचर्य पाळणं शक्यं नाही लग्नं होईस्तोवर, बरं , त्या काळासारखे बालविवाह झाले असते तर थांबायची गरजही नव्हती. पण एकूणच इतर बाबी, हेतू, कारणं बदलली तरी संस्कार चालू आहे अजून तरी तो.

धार्मिक गोष्टं बाजूला राहू दे, मी जातो कारण की तिथे सगळे भेटतात. आपल्या मुंजीत ज्यांनी लगबग केली त्या आत्या, काकू. मामा, माम्या आता थकलेल्या असतात. त्यांना भेटता येतं, म्हणून जायचं. हे सगळे म्हातारे लोक उठून दिसतात, वेगळे दिसतात त्या सगळ्या झगमगाटात. गळ्याशी कातडी लोंबत असते. हातात काठी, ती नसली तरी, आहे पण आणलेली नाहीये, हे कळतं. फार वेळ उभं रहावत नाही, बसूनही रहावत नाही. उकाड्याचा त्रास होत असतो. त्यांची बायकोही त्याच वयाची असते. म्हातारी नटून थटून आलेली असते. दिवस खराब म्हणून सोन्याचा दागिना घरात असतो. पण मोत्याचे चारपाच घालतीलच. कधीकाळी कमरेपर्यंत असलेल्या शेपटाची मानेवर टोचेल एवढी लांब बोन्साय वेणी असते किंवा मग अंबाडा घालून त्यावर गजरा गोल फिरवलेला असतो. ब्लाउजच्या हाताला घड्या असतात. म्हातारी बाहेर ब-याच दिवसात गेलेली नाहीये हे कळतं. हाताशी छोटीशी पर्स असते. कुणी आलंच बाळाला घेऊन भेटायला तर? म्हणून आत पन्नासाच्या नोटा असतात. 

त्यांच्या वयाचे एकत्रं छान कोंडाळं करून बसतात. गप्पा असतात त्या म्हणजे फक्तं चौकश्या - तब्येतीच्या, अनुपस्थित माणसांच्या, कुणाचं तरी कळलं का - अशाच. कुणीकडे सुनेनी, मुलीनी मिरवताना अडचण नको म्हणून आणून दिलेलं वाह्यात पोर असतं. ते काही केल्या एका जागी बसत नाही आणि म्हातारीचा प्राण कंठाशी येतो. तरीपण ती त्याला सांभाळत असते आणि गप्पात भाग घेत असते. त्याच गावात असेल घर तर जास्ती वेळ बसता येतं. पण जेवणं  झाल्यावर लोकल, रिक्षा पकडून एसटी/रेल्वे पकडायची असेल तर तारांबळ उडते त्यांची. जाऊ ना वेळेत? या धास्तीपोटी लक्ष लागत नाही आणि मग 'चला लवकर'चा धोशा एक कुणीतरी लावतो. कुणाचं अर्धांग घरीच असतं त्यामुळे लवकर जाणं गरजेचं असतं. धावपळ होते. निघावं लागतं. ब-याच वर्षांनंतर कुणाची तरी भेट होते. आठवणी निघतात. दाटून येतं. तो/ती पाया पडतात. म्हाता-यांना भरून येतं.

आता लोकांना आशीर्वाद तरी कुठे देता येत आहेत. 'आयुष्यमान भव' हे कानावर पडायला तर हवं ना. कुणीतरी अजून आशीर्वाद देतंय वाकल्यावर ह्यात पण अजून आपण म्हातारे नाही झालो असा छुपा आनंद आहे खरंतर. दरवेळेला कुठे जाणं झालं की सगळी माणसं बघून बरं वाटतं. दरवर्षी कार्य निघेलच असं नाही, एवढी संख्याही आता घराघरात नाही. त्यामुळे भेटी होणं अवघड होत जाणार यापुढे. म्हणून मी आपला वर्षातून एकदा फुलपुडी टाकल्यासारखा का होईना पण जाउन येतो. गदिमांची आई पुलंना म्हणाली होती, 'माणसानी दिसतं असावं रे'. खरंय, माणसानी दिसतं असावं, कोण कधी 'नसतं' होईल काय सांगावं?    


जयंत विद्वांस 


Monday, 25 April 2016

सावल्या…

सावल्या… 

तुम्ही तरुण असता त्यावेळेस तुम्हांला वेळ कायम कमी पडतो. स्पर्धेत रहाण्यासाठी, उद्दिष्टं, ध्येय गाठण्यासाठी, थोडा है थोडेकी जरुरत है वाली जरुरत पूर्ण करण्यासाठी, भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी म्हणून अजून उजळण्यासाठी, स्टेटससाठी, सुखं विकत घेण्यासाठी, पोटासाठी, म्हातारपणाच्या तरतुदीसाठी, कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि बहुतांशी वेळा जगण्यासाठी आपली धावपळ चाललेली असते. त्यात गैर काहीही नाही. हौशी लोक त्यातही वेळ काढून छंद जोपासतात, वाचतात, ऐकतात, गातात आणि जगतात ही. आपण खूप बिझी आहोत हे दाखवण्याचा जो आनंद आहे त्याला तोड नाही. वपु म्हणतात तसं माणूस रिटायर्ड झाला की तो फक्तं रिटायर्ड असतो. कुठलीही पोस्ट, मानमरातब, श्रीमंती त्याला चिकटलेली नसते. तारुण्यात वेळ नसल्यामुळे कित्त्येक गोष्टी माणूस उतारवयात करायचं ठरवतो. पण सगळयांना ते शक्यं होतंच असं नाही. 

आधी न पुरणारा वेळ नंतर पुरून खूप उरणारा वेळ असतो. शरीर थकतं, पंचेंद्रियं रुसायला सुरवात झालेली असते, दरवाजा वाजत नाही एवढी हाडं करकर वाजतात, उठताना त्रास होतो म्हणून हळूहळू उठणं बंद होतं आणि माणूस इंजिन नसलेल्या बोगीसारखा एकाजागी ठुप्पं बसायला सुरवात होते, जाणं येणं कमी होतं, बोलणं तुटतं, तुम्ही सोडून बाकी सगळ्यांना कामं असतात. गाणी ऐकावीत तर कमी ऐकू येत असतं, वाचायला गेलं की डोळ्यातून पाणी येतं, फक्तं जगण्याकरता सगळी धावपळ केलेल्या माणसाला कसले छंद नसतात, वाचन नसतं, कुठे जावं म्हटलं तर सोबत लागते त्यामुळे ते हळूहळू बंद होतं. पिढ्या बदलतात, विषय पूर्ण वेगळे होतात, तंत्रज्ञान पटकन अंगवळणी पडत नाही. काहीवेळा तर तुमच्या वयाचे मित्रं, नातेवाईक हयात नसतात, असले तरी त्यांचीही परिस्थिती तुमच्यासारखीच असते. मग करायचं काय?

बाई म्हातारी झाली तरी तिचं फार अडत नाही. तिच्यासाठी भरपूर कामं असतात. एक नातवंड वेळ कमी आहे असं वाटायला लावतं. सून गेल्यावर आवराआवर, पेपर वाचन, जेवण, वामकुक्षी, दुपारचा चहा, संध्याकाळच्या कामाची किरकोळ तयारी, अधूनमधून भिशी, वेळ कसा जातो कळत नाही त्यांना. पुरूषाचं मात्रं अवघड असतं. एक तर झोप कमी झालेली असते. मग चालू होतो टि.व्ही. मी ही सिरिअल्स, होम मिनिस्टर अशा अनेक प्रोग्राम्सची खिल्ली उडवत आलेलो आहे पण हे सगळं त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं, हे मला जाणवलं. कित्त्येक वयस्क मला माहितीयेत जे फक्तं डोळ्यासमोर काही रंगीत हलतंय एवढ्यासाठी टिव्ही लावतात. समोर काय चाललंय याच्याशी काही सोयरसुतक नसतं. वेळ… अतिशय भयानक प्रकार आहे. घालवायचा असला की शिक्षा परवडली पण ते नको. बरं आज गेला, घालवला, ढकलला, उद्या? मला आत्तापासूनच याचं दडपण आहे. (समाजपयोगी कामं करता येतील, छंद जोपासता येईल, शिकवता येईल गरिबांना, पेन्शनर ग्रुप जॉईन करता येईल, फिरायला जायचं वगैरे सल्ले नकोत. कुठे जाऊ न शकणा-या, जगण्यातला रस संपलेल्या माणसांबद्दल बोलतोय मी हे). 

वीसेक वर्ष झाली. माझ्या ओळखीत एक आजोबा होते. बायको गेलेली. घरातली सगळी माणसं कामाला जायची. रस्ता चुकल्यासारखे ते घरात एकटेच असायचे मग दिवसभर. त्यांच्याकडे एक पूर्वी शाळेला दप्तर म्हणून असायची तशी अल्युमिनिअमची पेटी होती. त्यात साताठशे रुपयाची चिल्लर होती. पाच पैसे ते रुपये अशी नाणी होती. सकाळी सगळी माणसं कामावर गेली की ते ती पेटी काढायचे. चादर ताणून घ्यायची आणि पेटी ओतायची त्याच्यावर. मग पुढचे दोनेक तास मस्तं जायचे त्यांचे. वीस x पाच पैसे = एक रुपया यापासून सुरवात, सगळ्यात शेवटी दोन रुपये पाच वेळा. त्यात पण सगळे सिंह एकाच बाजूला डोकं करून. षटकोनी वीस पैसे, अल्युमिनिअमचे वेगळे, पितळी वेगळे. दहा पैसे छोटे वेगळे, मोठे वेगळे, नवीन पन्नास पैसे वेगळे. त्यावर छापलेल्या वर्षानुसार ते लावायचे नाहीत एवढाच प्रकार काय तो शिल्लक होता. मग त्यांची रांग करायची आणि पैसे मोजायचे. कमी भरायचे नाहीतच पण जर भरलेच तर परत सगळे गठ्ठे मोजायचे. हॉरिबल. 

एकदा त्यांना म्हणालो कंटाळून, 'कोण घेणार आहे त्यातले पैसे, रोज मोजताय ते'. 'घेतंय कोण कशाला रे, घेतले तर उलट मला शोध लावायला बरं पडेल, त्यात निघतील चारेक दिवस. वेळ जात नाही रे, तुला नाही कळणार. घड्याळाचे काटे पायाला मुंग्या आल्यासारखे हळू चालतायेत असं वाटतं. तासाभरानी घड्याळ बघितलं तरी वीसेक मिनिट झालेली असतात म्हणून मी घड्याळ बघणं पण सोडलंय. पण इतकी वर्ष जगलोय, उन्हावरनं कळतंच किती वाजले असतील ते. संध्याकाळी सावल्या लांब पडतात नुसत्या, गायब व्हायची वाट बघतोय'.

मला नाही कळणार म्हणे. माझ्याही संध्याकाळच्या सावल्या काही वर्षात लांब पडू लागतील. गायब व्हायची वाट बघायला लागायला नको, एवढंच मागणं.

जयंत विद्वांस 

Saturday, 23 April 2016

लल्याची पत्रं (२८)…. 'चलते चलते मेरे ये गीत…'

 
लल्याची पत्रं (२८)…. 'चलते चलते मेरे ये गीत…'

लल्यास,

बरेच दिवसांनी पत्रं. चौथ्या पत्रात (मंझिले अपनी जगह…वरचं) तुला 'चलते चलते मेरे ये गीत'च्या तिस-या कडव्याबद्दल सांगितलं होतं, तू दिलंस मला ते लगेच पण त्यावर लिहायचं राहूनच गेलं होतं. तर चलते चलते. अत्यंत टुकार सिनेमातून अतिशय चांगली गाणी वाया गेलेली आहेत. खरंतर अशी गाणी परत नविन चांगल्या सिनेमातून प्रसंगानुसार वापरायला हवीत. उदा : सचिन, बिंदिया गोस्वामीच्या 'कॉलेज गर्ल' मधलं 'प्यार मांगा है तुम्हीसे' (परत एकदा बप्पी, टुकार सिनेमात चांगली गाणी द्यायची सवय असावी त्याला). मागे तुला म्हणालो तसं किशोर काही गाण्यांना वेगळा, अप्रतिम सुंदर आवाज लावतो. भाचा बप्पी लाहिरी त्याचा लाडका असावा. त्याच्याकडे म्हटलेलं 'इन्तेहा हो गई इंतजार की' हे सुंदर गाणं पण आहे आणि प्रेमापोटी म्हटलेलं टुकार 'झझझ झोपडीमें चचच चारपाई पण आहे.

'चलते चलते' सिनेमा पाहिलाय म्हणणारे सज्जन माणसांसारखे दुर्मिळ लोक असतील पण हे गाणं मात्रं सगळ्यांना पाठ असेल. लग्नं कुणाचं हे विसरायला झालं आणि जेवण लक्षात असा प्रकार एकूण. आपणच निर्माता असलं की एक बरं असतं बघ. आवडीची हिरोईन घ्यायची, हवे ते प्रसंग लिहून घ्यायचे, होऊ दे खर्च, इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. मागे त्या श्रीराम गोजमगुंडे नावाच्या निर्मात्यानी ८२ ला स्वत: आणि सरला येवलेकरला घेऊन 'झटपट करू दे खटपट' नावाचा शिणेमा काढला होता. त्याकाळात त्याला 'ए' सर्टिफिकेट होतं त्यामुळे मला तो पहाता आला नाही (खंत वाटणे म्हणजे नेमकं काय ते कळलं मला यावरून). विजयला लागलेलं ते पोस्टर माझ्या अजून लक्षात आहे, नववीत होतो पण वय वाढल्याची जाणीव करून दिलेली सरला येवलेकरनी. 'ए' असल्यामुळे तो पहायचा राहून गेला (आता बालचित्रपट ठरेल म्हणा तो इतकं 'ए' 'ए प्लस' झालंय). या चित्रपटाचा निर्माता भीष्म कोहली म्हणजे पडद्यावर विशाल आनंद. 


तुपकट चेह-याचा आणि किरणकुमारचा जत्रेत हरवलेला भाऊ दिसतो तो. इस्त्री केल्यासारखा चेहरा. सुरकुती म्हणून दिसणार नाही. अशा लोकांसाठी किशोर गायला हे त्यांचं भाग्यं ('प्यार का मौसम' मधलं भारत भूषण वरचं 'तुम बिन जाऊ कहा' बघ. कुठलाही प्रयत्नं न करता अत्यंत निर्विकार चेह-यानी ते म्हटलंय त्यानी). सिमी ग्रेवाल ही सरला येवलेकरच्या तोडीचीच अर्थात. येवलेकर दिसायला मात्रं तिच्यापेक्षा सरस. सरला नाव किती सरळ, बाईला वळणं किती (नावात काय नसतंय बघ). तर मुद्दा 'चलते चलते'. गाणं चालता चालताच आहे शब्दश: ते. ग्रेवाल आणि क्यातरीना कैफ दोघींचे ओठ मात्रं सुंदर, गाभूळलेले दिसतात, मोहक आहेत. सूचक हालचाली केल्यासारखी ती बोलते मुळात (पहा : मेरा नाम जोकर). त्या काळातली ती सगळ्यात उंच नटी असावी त्यामुळे तिची कुणाशीच जोडी जमली नसावी. ठोकळा चेह-याचा विशाल आनंद सिमी ग्रेवालला हात लावायला मिळाल्याच्या आनंदात दिसतो संपूर्ण गाणं संपेस्तोवर. 

याचं मराठी केलेलं मी. मजा यायची म्हणताना. याचं तिसरं कडवं आहे हे मला माहितीच नव्हतं. रेडीओ, क्यासेट, टीव्हीवर पहिली दोनच कडवी लागतात. तिसरं स्याड व्हर्जन असल्यामुळे सलग नसावं ते सिनेमात. किशोर या प्रकारात दादा आहे. 'ये दोस्ती' चं शेवटचं कडवं ऐक - 'साथी तू बदल गया, मैं अकेला रह गया' म्हणताना तो वेगळाच ऐकू येतो. त्याचं 'गाडी बुला रही है' मधे म्हटलेल्या त्या दोन ओळी ऐक, 'आते है लोग, जाते ही लोग, पानीके जैसे रेले, जानेके के बाद, आते है याद, गुजरे हुए वो मेले'. ' रेडिओवर एकदा कुठल्यातरी रसिक माणसानी ते लावलं आणि कानी पडलं. 'बुनियाद' 'देख भाई देख'चं टायटलसॉंग, मधुबन खुशबू देता है, एक लडकी मेरा हाथ पकडकर, सुनिये, कहिये, कहिये, सुनिये (बातो बातोमे), जब छाये मेरा जादू आणि देवानंदच्या शिनेमात गाणी लिहिणा-या अमित खन्नानी लिहिलंय हे गाणं. त्याचं फार नाव नव्हतं कधी पण हे गाणं मस्तंच आहे त्याचं. 

'चलते चलते' म्हटलं की पाकीझातलं आठवतं लगेच खरंतर, तो ठेका आणि शेवटी वाजणारी ती आगगाडीची शिट्टी. या 'चलते चलते'ला ते भाग्यं नाही अजून काही वर्षांनी चित्रपट कुठला वगैरे पुसलं जाईल, गाणं राहील. चल पुढच्या पत्रापर्यंत बाय.

जयंत विद्वांस

चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना
रोते हँसते बस यूँ ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना

प्यार करते करते हम तुम कहीं खो जायेंगे
इन ही बहारों के आँचल में थक के सो जायेंगे
सपनों को फिर भी तुम यूँ ही सजाते रहना

बीच राह में दिलबर बिछड़ जायें कहीं हम अगर
और सूनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर
हम लौट आयेंगे तुम यूँ ही बुलाते रहना

अलविदा तो अंत हैं और अंत किसने देखा
ये जुदाई ही मिलन हैं जो हमने देखा
यादों में आकर तुम यूँही गाते रहना

(चलते चलते (१९७६), बप्पी लाहिरी, अमित खन्ना, किशोर कुमार)

Monday, 18 April 2016

'आखरी रास्ता'…

'आखरी रास्ता'… 
 
उन्मळून पडणे, उध्वस्त होणे, विश्वासघाताचा धक्का, जिगर, बदले की आग, खर्जातले संवाद, चेह-याच्या हलणा-या नसा वगैरे गोष्टी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बघण्यापेक्षा के.भाग्यराजनी लिहिलेला तमिळ 'कमल हसन अभिनित - Oru Kaidhiyin Diary' चा हिंदी अवतार 'आखरी रास्ता' बघावा. मी अनंतवेळा तो पाहिलाय, अजूनही पाहीन. 'तूने मेरा दुध पिया है' ह्या भंकस गाण्याला फक्तं मी रिमोट घेतो हातात (मोहम्मद अझीझ, शब्बीरकुमार ही खूप नशीबवान लोकं, यांना हिमेश रेशमियासारखे स्वत:साठी पिक्चर काढावे लागले नाहीत. 'मर्द' हा आधीच टुकार होता त्यात ह्या दोघांची गाणी म्हणजे सुधीरच्या तावडीतून सुटलो तर शक्तीकपूरच्या ताब्यात गेल्यासारखं), त्यामुळे एकूणच या आणि इतर काही सिनेमात गाणी नसती (उदा : अर्जुन, घायल, 'चायना गेट'ला नाईलाजानी 'छम्मा छम्मा' घेतलं असणार संतोषी बाबानी) तरी चालली असती. सिनेमाची लय हरवते, कथानकाची पकड सैलावते. असो! के.भाग्यराजला जास्ती कळतं. या सिनेमासाठी मी बोहारणीसारखे अमिताभचे 'गिरफ्तार', 'मृत्युदाता', 'मर्द', 'गंगा जमुना सरस्वती' वगैरे महान सिनेमे बदल्यात द्यायला तयार आहे. 

चित्रपटाची कथा मी इथे सांगायची गरज नाही. बच्चा बच्चा जानता है! डेव्हिड डिकास्टाचा विग, ती दाढी, तो गांधी चष्मा, शाल हा गेटप ज्यानी केला असेल तो महान माणूस आहे. त्याचे कपडे पण चोबीस साल पुराने फ्याशनचे आहेत सिनेमात. डिटेलिंग बॉस, मजा येते बघायला. संपूर्ण चित्रपटात इन्स्पेक्टर विजय हा अमिताभच्या चित्रपटात शशी, ऋषी कपूर जसे दबलेले असतात तसा आहे. अर्थात ही किमया 'बिग बी'ची आणि पटकथेची. कुठेही 'विजय' वरचढ वगैरे वाटत नाही. जेलात जायच्या आधीचा खेळकर डेव्हिड आणि बाहेर आल्यावर गंभीर झालेला बुढ्ढा डेव्हिड, दोन वेगळी पात्रं, वेगळ्या देहबोली आहेत. अमिताभनी या चित्रपटात सरसर बदलणारे चेहरे काय अप्रतिम दाखवलेत. नेमक्या वाक्याला, शब्दाला त्याचा चेहरा जो काही बदलतो ना त्याला तोड नाही (तो ज्या भोळेपणानी रडतो, दलीप ताहिलला विश्वासानी सांगतो, ते बघाच). पात्राच्या वयोमानानुसार बदललेला आवाज ऐकणीय आहे त्याचा. डेव्हिडचा आधीचा गमत्या आवाज, विजयचा कठोर माणसाचा आवाज, म्हाता-या डेव्हिडचा खर्जातला, राग दाबलेला आवाज. त्या आवाजाला पार्श्वसंगीत आहे संताप, चीड, धुमसण्याचं. राही मासूम रझा. त्यांचे संवाद सांग बघू गाजलेले असं कुणी म्हटलं तर मी पळ काढेन पण या चित्रपटातले संवाद मात्रं तुफान होते.

'विजय'चा बाप आपण नसून अनुपमनी स्वत:चं नाव लावलंय त्याच्या नावापुढे हे समजल्यावर त्यानी जे तळतळून विचारलंय ना ते ऐका. व्होकलकॉर्ड आतड्याला जोडली गेलीये त्याची त्या संवादाला. कुणीतरी खोडरबरनी मजकूर पुसावा तसं बापमुलाचं नातं पुसलं गेल्यामुळे आलेली विषण्णता आहे त्यात. त्याला हाताशी धरून बदला घ्यायचे चोवीस वर्ष डोक्यात जपलेले प्लान्स क्षणात धुळीत. परत या वयात नव्यानी सुरवात आता. 'मैने अपनी जिंदगीका अंधेरा दूर करनेके लिये तुम्हे दिया जलानेको कहा था, तुमने तो मुझकोही जलाकर अपने जिंदगीमे उजाला कर दिया' (चु.भू.दे.घे.). खाऊन टाकलंय त्यानी. लगेच घाईने निघताना तो अबरप्टली विचारतो, 'पिस्तोल कहा है'! खतरा थंडपणा आहे पुढच्या संवादाला. त्याचा कन्फेशन देतानाचा, 'विजय' चेकिंग करत असतो तेंव्हा 'तीन स्पेशालिस्ट मेरे दिमाग में है', 'सहाय'ला स्टोरी सांगताना, 'तुम्हे इतनी जल्दी डि.आय.जी.बना दिया, इन्स्पेक्टर विजय' चा खवचट, स्मशानातलं ते एकेक शब्दं उच्चारून बोललेलं परफेक्ट इंग्लिश, 'समंदर के बीच जाकर जो मछलीया पकडता है' किंवा त्या आधीचा हातावर 6 आणि 9 चा संवाद, श्रीदेवीला 'And that is a fact' म्हणतानाचा आवाज. 'फर्ज करो, तुम घर जा रही हो' कुठलाही आक्रस्ताळेपण न करता तो त्याची बाजू श्रीदेवीला सांगतो, तो आवाज. किती सांगणार. 

चेहेरे बघायचेत? कोर्टात 'चतुर्वेदी' बरळत असतो तेंव्हा तो फक्तं कठडा दाबतो आणि शांत होतो, जज्जनी विचारल्यावर तो फक्तं शांतपणे भिंतीकडे बघतो, श्रीदेवीमुळे त्याला बोलणी खावी लागतात तेंव्हा, भरत कपूरला भेटणार एवढ्यात विजय येतो तेंव्हा, त्याला उडवणार तेंव्हा नेमका परत 'विजय'मधे येतो तेंव्हा, 'विजय'साठी दोरी फेकताना त्याची होणारी घालमेल, अनुपमला दाढी लावून फसवल्यावर त्याचा झालेला अर्जुन, ओम शिवपुरीनी झापल्यावर झालेला चेहरा, विजयच्या हातातून पिस्तोल उडवल्यावर झालेला करारी चेहरा, श्रीदेवीच्या लॉकेटमधे विजय दिसल्यावर झालेला हळवा चेहरा, बापलेक दोघं कबरीसमोर बसतात तेंव्हा विजयचा चेहरा, ग्रेव्हयार्डमधे 'सॉरी माय सन' म्हणतानाचे पाणावलेले डोळे, चतुर्वेदीच्या गाडीला बाँब लावयाची धडपड, चरफड आणि शेवटी कपाळात गोळी घातल्यावरचा तो विजयी चेहरा आणि लाल बर्फाळ नजर. अमिताभवर बोलणं म्हणजे कापूसकोंड्याची गोष्टं, न संपणारी.   

बाकी सिनेमा अमिताभ सोडून बोलण्यासारखं फार काही नाही त्यात. एकदा कमल हसनचा बघायला हवा. लहान मुलीसारखं लाडात बोलणं म्हणजे अल्लडपणा असं समजणारी श्रीदेवी यात फार वाव नसल्यामुळे सुसह्य वाटली ('ती कशी ग्रेट आहे' याच्या कॉमेंट्सवर उत्तरं दिली जाणार नाहीत, क्षमस्व). जयाप्रदा गोड दिसते, अनुपम खेर पण फार लाउड नाहीये. तीनही व्हिलनमधे अमरापूरकरना जास्ती फुटेज आहे आणि ते भाव खाऊन गेलेत पण. बाकी ते सेट आणि सोनी म्याक्सचे आभार मानायलाच हवेत (बच्चनचेच च्यानल नाहीत ना मालकीचे). अर्थात कुछ पानेके लिए कुछ खोना पडता है म्हणून 'सुर्यवंशम'ही बघावा लागतो, हा भाग वेगळा.

जयंत विद्वांस
 

  

Friday, 15 April 2016

ओळख…

ओळख… 
 
मुळात मला देवादिकांचा ओढा कमीच आहे. रांगेत, गर्दीत दर्शन घ्यायची मला हौस नाही. चेंगराचेंगरीत हाताला लागलेला दगडी भाग म्हणजे परमेश्वराचे पाय आहेत याचा आनंद घ्यायची मला अज्जिबात हौस नाही. पण माझं सुट्टीतलं बालपण मात्रं अनेक देवळांच्या परिसरात गेलंय. आज्जी भिकारदास मारुतीच्या वर रहायची. परवाच बघितलं, तिथे आता ती रहायची ती लोड बेअरिंगची एकमजली इमारत कधीच नामशेष झालीये. कॉन्क्रीटची सुबक इमारत तिथे उभी आहे. खालचा मारुती नावानी भिकारदास असला तरी बाजूनी रहाणारी लोकं सुखवस्तू आहेत. मारुतीच्या समोर सदावर्ते राम मंदिर, बाजूला नारद मंदिर आहे. आता राम आणि मारुती मंदिर बोन्साय झालेत. पहिल्यांदा प्रशस्त जागा होती आता अतिक्रमण केल्यासारखे दोघे उभे आहेत. संगमरवरातली ती अडीच एक फुटांची राम, लक्ष्मण, सीतेची आणि समोर बसलेला रामदास हनुमान यांची मूर्ती मात्रं सुबक आहे. शंकर, विष्णू, राम हे सगळे देव, कुठलीही देवी बघा, कशा एकदम देखण्या, नाजूक जिवणी, सरळ नाक, सौष्ठव असलेल्या असतात फोटो आणि मूर्त्यांमध्ये. हनुमानाला ते भाग्यं नाही. शेकडो वर्ष जिम केलेली बॉडी (काहीवेळा केसाळ ही), फुगलेले गाल, खांद्यावर गदा, चेह-यावर शोलेतल्या 'रामलाल' सत्येन कप्पूसारखे इमानी सेवकाचे भाव. 

तर रामनवमी. मोठा उत्सव असायचा (आता असावाही, माहित नाही). कुंटे कुटुंब देखरेख करायचं. अक्का कुंटे. त्यांच्यावर आम्हां सगळ्या मुलांचा राग. दुपारी पुढच्या कट्ट्यावर त्या खेळू द्यायच्या नाहीत म्हणून आणि लाकडी व्यासपीठावर बसलो की ओरडायच्या म्हणून. पण आम्ही त्यांना अजिबात धूप न घालता कोकलायचो तो भाग वेगळा (त्यांची नातवंडपण घरची भेदी असल्यासारखी आम्हांला सामील असायची). एका वेगळ्याचा सांस्कृतिक वातावरणाची रेलचेल असायची. आठवड्यातून दोन दिवस दुपारी पुणतांबेकरांचं भजन असायचं, रोज संध्याकाळी नारद मंदिरात किर्तन असायचं. सज्जनगडावरून रामदासी लोक यायचे. मोठं अभ्यासपूर्ण, गंभीर बोलायचे ते लोक. पण ऐकत रहावं असं वाटायचं. एक फक्तं रामाला समर्पित छोटीशी पुस्तिका होती. त्यात मनाचे श्लोक होते, करुणाष्टके होती आणि पहिल्याच पानावर १०८ रामाची नावं होती. बरंच काही हरवलं त्यात ते ही हरवलं. अर्थ कळो न कळो ती सगळ्या मुलांना क्रमानी पाठ होती. अगदी तालात ती म्हटली जायची.

रामनवमीला लोणीसाखर हा प्रसाद असायचा. जन्माच्या वेळेला बायका लोटायच्या अगदी एकमेकींवर. आम्हांला इंटरेस्ट प्रसादात. अक्का अत्तर लावल्यासारखं लोणीसाखर तळहातावर द्यायच्या. साखरेनी सुटलेलं पाणीच जास्ती असायचं त्यात. लाज सोडून आम्ही अजून द्या म्हणायचो, दोन शब्दं ऐकून अजून एक बोट तळहातावर मिळवायचा आनंद आता अगदी पावकिलो लोण्यात साखर कालवून खाण्यातही नाही. तिथे साखळी लावलेलं तीर्थपात्रं असायचं. खेळता खेळता आम्ही सगळे ते सुद्धा प्यायचो लहर आली की. तुळशीचं पान आलं की मस्तं चव लागायची, किती थेंब? मोजून चमचाभर फार तर, पण मस्तं लागायचं, गंमत म्हणून प्यायचो तरी डोळ्याला हात लावून हात डोक्यावरून जायचाच. कार्य पार पडल्यावर जशी एक शांतता असते तसा माहोल असायचा नंतर. आमचा खेळ थांबल्यामुळे ते सगळं कधी एकदा संपतंय असं व्हायचं. किर्तन असायचं. पूर्वरंग, उत्तररंग कुठे कळायचं तेंव्हा (आता कळतंय असा अर्थ निघतोय ना, आताही कळत नाही). पण सगळे किर्तनकार उत्तम स्टोरीटेलर, अभिनय, थोडीफार गायकी येणारे असायचे. ऐकत राहायची सगळी चुळबुळ न करता. सिन्नरकर, आफळे, कोपरकर, जावडेकर, अनेक रामदासी बुवा, रविंद्र मुळे ऐकले तिथे.    

आठवड्याभरानी हनुमानजयंती असायची. आधी श्रीमंताघरचं कार्य झाल्यावर त्याच्याच नात्यातल्या गरीबाचं कार्य असतं ना तसं वाटतं मला ते. हनुमान जयंतीला जास्ती पब्लिक लोटायचं, खणखणीत प्रसाद. रास होईल एवढे नारळ फुटायचे. जाताजाता वाटी घ्यायची आणि दगडानी फोडून खायची, कुण्णीसुद्धा ओरडायचं नाही. प्रदक्षिणेचे, जपाचे अनंत प्रकार दिसायचे. पिशवीत माळ ओढणारे, पुटपुटणारे, जोरात ओरडून आल्याची वर्दी देणारे, रमतगमत प्रदक्षिणा घालणारे, स्पीडपोस्टवाले, मारुतीच्या, रामाच्या समोर (समोर म्हणजे अगदी समोर, साईड आर्टीस्ट नाहीच चालणार) उभे राहून डोळ्यात डोळे घालून बघणारे, आव्हान देणारे, आवाहन करणारे, 'आहे ना लक्षात माझ्या कामाचं' अशी मूक विचारणा करणारे, अत्यंत भाबड्या भक्तिभावाने फुल, प्रसादाचा हार घेऊन जाणारे, कपडे मळण्याची काळजी न करता साष्टांग घालणारे (हा प्रकार तर दुर्मिळ झाला आता, हवी त्याची लाज वाटत नाही पण याची वाटते लोकांना), प्रदक्षिणा झाल्यावर खांबाला टेकून शांत बसणारे, वाती वळण-या आज्ज्या. माझ्या स्मृतीपटलावर तिथलं हे शेवटचं चित्रं कोरलं गेलंय. 

आता अक्का कुंटे, हनुमानाची पूजा करणारे नारायणभाऊ दवे, गोविंदस्वामी आफळे आणि माझी आज्जी यापैकी कुणीही नाही. मी एक उरलोय इकडे आणि तिकडे जागा आक्रसलेले राम, लक्ष्मण, सीता आणि तो शेंदरी हनुमान. माझं लहानपणीचं हे विश्वं तिथेच उदबत्तीच्या धुरासारखं हरवलंय, वातावरणात असेलही पण दिसणार नाही, जाणवेल. नेता असो की देव, त्यांच्या वाढदिवसाला गर्दी व्हायचीच. तेंव्हा एकदा गर्दी नसताना जाईन, बघू काही जुनी ओळख एकमेकांना  पटतीये का ते.
 
जयंत विद्वांस   


Wednesday, 6 April 2016

'फक्तं तुझी, तुझी आणि तुझीच'…

'फक्तं तुझी, तुझी आणि तुझीच'… 

'उद्या भेटशील का संध्याकाळी 'पूनम'ला?'
'आहेस कुठे? इतक्या दिवसात फोन नाही, काही नाही. झाली का तयारी? पंधरा दिवस राहिले ना? आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय की काय?'
'मी बोलू? आमंत्रण आपल्या माणसाला काय द्यायचं आणि समजा नाही दिलं तरी तू येणार आहेस हा माझा विश्वास आहे. बरं ऐक, उद्या जरा मला वेळ आहे. सहापर्यंत येशील का 'पूनम'ला? फार वेळ नाही घेणार तुझा. अर्धा तास फारफार तर'.
'बरं, मग रस्त्यात भेटू की, पूनमला कशाला हवंय भेटायला? काय काम आहे एवढं अर्जंट?'
'सॉरी, चिडू नकोस रे. तोंडातून गेलं. तासंतास बसायचो ना रे आपण पूनमला. तुझ्याकडे आपली पत्रं आहेत?'
'मुर्ख, मी लिहिलेली माझ्याकडे कशी असतील, तुझी आहेत. का?'
'ती आणशील?'
'आणतो, जाहीर वाचन करायचं आहे का? मिसिंग? की स्मरणयात्रा? ऑफिस फाईल असेल माझी तुझ्याकडे. एकावेळी कमीत कमी बारा फुलस्केप असायचे माझे. तुझी पण मोठी असायची पत्रं, तारखेनीशी आहेत माझ्याकडे. आणतो. ये उद्या, वोईच टेबल, वोईच टाईम, वोईच लोग, बाय, सी यू'
'बाय, पत्रं आण रे सगळी, मस्तं वाटेल परत सगळी वाचताना'.


-------------
'नेहमीप्रमाणे तू आधी असशील असं वाटलेलं. पण आज पहिल्यांदाच मी लवकर आलोय. म्हणजे वेळेत, सव्वा सहा झाले. बरं, बस, कॉफी झाली माझी एकदा, तू आलीस की दोन आण सांगितलंय त्याला, येईल'.
'अरे निघता निघता उशीर झाला. पन्नास कामं'.
'कितीला निघायचंय तुला?'
'लगेच, म्हणजे वीस मिनिटात. सातला सासरी जायचंय, तिथून एके ठिकाणी जायचंय'.
'मग पत्रं किती आहेत एवढंच मोजून होईल फारतर'.
'ऐकशील का? तुझी पत्रं मी माझ्याकडेच ठेवणार आहे, माझी तुझ्याकडे आहेत ती दे, तारखेनीशी एक तुझं एक माझं लावणार मी निवांत.'
'घे ही सगळी, पण मला वाचायची झाली तर काय करू? की बाईंडिंग करून पुस्तक करणार आहेस? :P
'कॉफी घे, दहा मिनिट राहिलेत तुला निघायला, एक तर याचा कप म्हणजे बादलीएवढा असतो'.

….….

'निघू? उशीर होतोय? नको रे असं बघूस. आय नो. नंतर भेटणं होणार नाही, तुझी पत्रं आणि आठवणी यावर मी राहीन.  सविस्तर लिहीन एकदा पाच सहा महिन्यांनी निवांत झाले की. निघू?'
'हो, आठवण येईल? कुठे ठेवशील आणि पत्रं नीट?'
'ठेवेन, तू नको काळजी करूस, चल येते'.
'बाय'
'बाय, सी यू, विल मिस यू लॉट'
'बास, सासरी जायचंय हसरा चेहरा करून, रडवू नकोस, आता मागे न बघता मी निघणार आहे, बाय'.

….….
थोडं पुढे गेल्यावर तिनी गाडी नदीच्या अलीकडे थांबवली. लागूनच असलेल्या सिमेंटच्या बाकड्यावर ती बसली. सगळी पत्रं बाहेर काढली. त्याचे हात दुखेपर्यंत तिनी अतिशय बारीक तुकडे केले. आणलेल्या प्लास्टिक पिशवीत सगळा कचरा भरला आणि पिशवी नदीपात्रात भिरकवून दिली. 'चांगला आहे तो, पण काय सांगावं, कुणाची मती कधी फिरेल'. घड्याळाकडे बघत तिने किक मारली आणि ती निघाली.

….….
ती गेल्यावर त्यानी अजून एक कोफी मागवली. त्याचं विचारचक्र चालू झालं. 'तिचा माझ्यावर विश्वास नाहीये. मी पत्रांचा गैरवापर करेन असं तिला का वाटलं पण? इतका मी खालच्या पातळीचा आहे? मीच मूर्ख असं वाटायचं मला पण काहीवेळेस ना भाबडेपणा पण फायद्याचा असतो. तिची आठवण म्हणून मी सगळ्या पत्रांच्या झेरॉक्स काढल्या होत्या. मी करणार तसं काहीच नाहीये ही काळ्या दगडावरची रेघ आहे पण असाव्यात वेळ पडली तर. फार मजा येईल तिला सांगितल्यावर मला तिचा चेहरा बघताना. नको, नाही सांगणार मी तिला, मला गंडवल्याचा तिचा आनंद राहू दे तसाच. फक्तं सगळ्या पत्राखालचं 'फक्तं तुझी, तुझी आणि तुझीच' याला हायलाईट करून ठेवलं की झालं

जयंत विद्वांस

 





Friday, 1 April 2016

पण…

पण… 

मागे एकदा नात्यातल्या एका आजींच्या मयतीला गेलो होतो. कुणाच्यातरी मयतीला जायचा योग(?) आपण वयानी मोट्ठे झाल्यावर येतो. मी आयुष्यात पहिल्यांदा मयतीसाठी गेलो ते ८९ साली. अजूनही माझ्यापुढे, तिथे स्मशानात किंवा त्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर काय बोलायचं, हा यक्ष प्रश्नं असतो. अशावेळी मी फक्तं परत निघताना भेटतो, बाकी जास्ती काही बोलत नाही कारण मला बोलता येत नाही. अनेक लोकांनी ब-यापैकी औपचारिक बोलून झालेलं असतं. एक टिपिकल वातावरण असतं, तेच डायलॉग, वर्षानुवर्ष ऐकत आलो आहे. अतिशय दु:खद प्रसंग असतो खरंतर, एक अवकाळी शांतता, कुजबुज असते. थोडं मोठ्यानी बोललं तरी माईकवर बोलल्यासारखं वाटतं, इतकं वातावरण शांत असतं. 


'कधी नेणारेत?' 'साता-याचा हा आला का?' 'कुणाला फोन करायचेत का?' 'ठाण्याहून कधी निघालीये ती?' 'शिवनेरी?' 'स्वारगेट आहे का पुणे स्टेशन?' 'मोघे गुरूजींना कळवलंय का?' 'सामान आणायला कोण गेलंय?' 'पास आणलाय?' 'बरं झालं गेल्या, उगाच अंथरुणात पडण्यात काय मजा नाही, सगळ्यांचेच हाल' 'परवाच तर भेटून गेलो, बोलल्या माझ्याशी, बरी झाले की गोंदवल्याला जाउ म्हणालेल्या' 'आज संकष्ट चतुर्थी, उपास असायचा त्यांचा, त्याचंच पुण्यं म्हणून गेल्या आज' 'ऐकायची नाही ओ अज्जिबात, हेकेखोर पहिल्यापासून' 'जप रे, तूच मोठा आहेस, सावर, तूच धीर सोडलास तर कसं होणार?' 'काय म्हणाली रे शेवटचं?, शुद्धीत होती? किती वाजता गेली?' 'कळवायचं नाही का रे आधी, आलो असतो उभ्या उभ्या तरी, ती असताना' हे आणि असे अनेक कुणीही न लिहिलेले संवाद वर्षानुवर्षे पाठ केल्यासारखे चालू आहेत. 


तिरडी बांधणा -यात एक तरी टक्कल पडलेला, फाटक्या तोंडाचा, बिडी/सिग्रेट ओढणारा किंवा तंबाखूचा बार भरणारा, इतरांपेक्षा जास्ती अक्कल असलेला माणूस असतोच. तिरडी बांधायचं आयटीआय सर्टिफिकेट असल्यासारखा तो सगळ्यांना ज्ञान वाटत असतो. मडकं ठेवायच्या तिकटीच्या बांधकामापासून बडबड सुरु होते. बांबूच्या क्वालिटीवरून त्या दुकानदाराच्या विशिष्ठ भागात तो बांबू रोवल्याचा संवाद हवाच. मग सुतळी ओली करणे, त्यासाठी ओरडून पाण्याचा तांब्या मागणे, ब्लेड शोधणे, दोन बांबूतील आणि दोन कामट्यातील अंतर ठरवणे, पांढरं कापड त्या कामटीत घुसवताना शक्यतो कापड फाडल्याचा कमाल आवाज करणे, मणी, वाटी, गुलाल, बुक्का, हळदी कुंकवाच्या पुड्या जोरदार हाक मारून कुणाच्यातरी ताब्यात देणे वगैरे फ्लोचार्ट प्रमाणे काम चालू होतं. 'अनेकांना पोचवून आलोय आजवर, दोन जण नेलीत एकावेळी तरी सुटणार नाही याची ग्यारंटी आहे' वगैरे म्हणजे काम पूर्ण झाल्याची आरोळी असते. लोक बिनआवाजाचं हसतात. 'कोण रे हा?' 'माहित नाही, वाड्यातलाच असेल, चेकिंगसाठी दुसरा म्हणून यालाच न्या'. साउंड कमी केल्यासारखा दबका हशा पिकतो, परत सगळे दु:खाचा स्क्रीन सेव्हर ओढून उभे रहातात.  

तोंडाला पदर लावून कोरडे डोळे पुसणा-या शेजारपाजारच्या बायका, गंभीर चेहरे करून उभे राहिलेले कलिग, एकमेकाला न ओळखणारी किंवा ओळखून असणारी माणसं चिडीचूप उभी असतात. सगळ्यात कळीचा मुद्दा असतो 'कधी नेणार'? घड्याळं बघितली जातात, मोबाईलवर मेसेजेस पाठवले जातात किंवा आलेले वाचले जातात, तेवढ्यात कुणाचातरी 'पप्पी दे, पप्पी दे पारूला' किंवा तत्सम फडकत्या चालीच्या रिंगटोनचा फोन वाजतो, ज्याचा आहे तो पहिल्यांदा काय करत असेल तर फोन घेऊन लाजल्यासारखा रस्त्याकडे निघतो आणि येताना सायलेंटवर टाकूनच परत येतो, वातावरण सैलावतं. खूप गरजेचं असतं ते. कुणाला भुका लागलेल्या असतात, कुणी येतानाच उशीर होणार हे गृहीत धरून खाऊन आलेलं असतं, काहींचे आधी निघून वैकुंठाच्या अलीकडे मिसळ तरी चेपावी मग लागू देत कितीही तास असे प्लान तयार असतात. 

इथे रडण्याचे अनंत प्रकार पहायला मिळतात. काहीजण शोएब अख्तरसारखं वाड्याच्या दरवाज्यापासून किंवा जिन्याच्या खालच्या पायरीपासून स्टार्ट घेऊन फुंदत येतात आणि १४५ केएमपीएचचा यॉर्कर बोटावर बसल्यावर फलंदाज जसा ओरडेल तशी भसकन रडण्याची डिलिव्हरी करतात. काहीजणी पदर, रुमाल तोंडात धरून रडण्याला बोळा घातल्यासारखं करतात. काहीजण नळाखाली भांड्यात टुबुक टुबुक थेंब पडत असतो तेंव्हा ते पाणी कसं पडायला काठावर जमा झालेलं असतं तसं त्यांचं रडू पापणीच्या वळचणीला थांबलेलं असतं. काहीजण उगाच नाकाचे शेंडे पुसतात. काहीजण कोण समोर आल्यावर रडायचं ते ठरवून रडतात. मयताच्या अंगी नसलेले गुण सांगितले जातात, आठवणी निघतात. काहींचा नुसताच आवाज असतो, काहींची ढगफुटी असते, काहींना शब्दं सापडत नाहीत, काहींना आता पुढे काय याची चिंता तर काहीना सुटका झाल्याची भावना. एकाच ठिकाणी अनंत भावना, चेहरे, मुखवटे तरंगत असतात. 

या सगळ्या गलबल्यात माझ्या लक्षात राहिलेत ते म्हणजे फक्तं बायकोकडे एकटक बघत रहाणारा तो सत्तर पंचाहत्तरीचा पाण्यात बुबुळं ठेवावीत तसा डोळे भरलेला, थरथरणा-या ओठांचा, अंगाला कंप सुटलेला, शब्दं संपलेला म्हातारा, भांबावलेली, कुणी खांद्यावर हात ठेउन थोपटलं तर कधीही सांडतील अशी पोरं, लाल नाकाच्या पोरी, सुना, नेमकं काय घडलय ते न कळलेली, मोठे सगळे गप्पं आहेत म्हणून शेजारी चिडीचूप बसलेली नातवंड आणि शेवटचं उचलल्यावर पोटातून आलेले, कळवळयाचे, फुटलेले बांध. खरंतर तिथून निघाल्यावर मागे उरते ती स्मशानशांतता असते. हुंदके आटतात, वास्तवाचं भान येतं, स्मशानात न गेलेली माणसं थोडं थांबून दहाव्या तेराव्याची चौकशी करून निघतात आणि मागे उरते ती फक्तं बोलकी शांतता. 


वैकुंठातून घरी पोचेपर्यंत स्मशानवैराग्यं टिकतं, घरी येउन आंघोळ केली की रिमोट घ्यायचा त्याशिवाय आपली पण हीच गत हा विचार डोक्यातून जात नाही. एवढे तरी जमतील? कुणी रडेल असं उर फुटल्यासारखं आपल्यासाठी? एका बोटाचं एक दशक धरलं तर आपली अंदाजे दोन बोटंच उरतात हे लक्षात आल्यावर पाची बोटं उघडली जातात. आपल्याच अशा एखाद्या गेलेल्या माणसाची आठवण येते आणि अस्वस्थ व्हायला होतं. मी तरी अंमलात न येणारा पण केलाय, पुढच्या वेळेपासून आपण गेलो तरंच जायचं, नाहीतर जायचंच नाही मुळी स्मशानात. 

जयंत विद्वांस