Wednesday 6 April 2016

'फक्तं तुझी, तुझी आणि तुझीच'…

'फक्तं तुझी, तुझी आणि तुझीच'… 

'उद्या भेटशील का संध्याकाळी 'पूनम'ला?'
'आहेस कुठे? इतक्या दिवसात फोन नाही, काही नाही. झाली का तयारी? पंधरा दिवस राहिले ना? आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय की काय?'
'मी बोलू? आमंत्रण आपल्या माणसाला काय द्यायचं आणि समजा नाही दिलं तरी तू येणार आहेस हा माझा विश्वास आहे. बरं ऐक, उद्या जरा मला वेळ आहे. सहापर्यंत येशील का 'पूनम'ला? फार वेळ नाही घेणार तुझा. अर्धा तास फारफार तर'.
'बरं, मग रस्त्यात भेटू की, पूनमला कशाला हवंय भेटायला? काय काम आहे एवढं अर्जंट?'
'सॉरी, चिडू नकोस रे. तोंडातून गेलं. तासंतास बसायचो ना रे आपण पूनमला. तुझ्याकडे आपली पत्रं आहेत?'
'मुर्ख, मी लिहिलेली माझ्याकडे कशी असतील, तुझी आहेत. का?'
'ती आणशील?'
'आणतो, जाहीर वाचन करायचं आहे का? मिसिंग? की स्मरणयात्रा? ऑफिस फाईल असेल माझी तुझ्याकडे. एकावेळी कमीत कमी बारा फुलस्केप असायचे माझे. तुझी पण मोठी असायची पत्रं, तारखेनीशी आहेत माझ्याकडे. आणतो. ये उद्या, वोईच टेबल, वोईच टाईम, वोईच लोग, बाय, सी यू'
'बाय, पत्रं आण रे सगळी, मस्तं वाटेल परत सगळी वाचताना'.


-------------
'नेहमीप्रमाणे तू आधी असशील असं वाटलेलं. पण आज पहिल्यांदाच मी लवकर आलोय. म्हणजे वेळेत, सव्वा सहा झाले. बरं, बस, कॉफी झाली माझी एकदा, तू आलीस की दोन आण सांगितलंय त्याला, येईल'.
'अरे निघता निघता उशीर झाला. पन्नास कामं'.
'कितीला निघायचंय तुला?'
'लगेच, म्हणजे वीस मिनिटात. सातला सासरी जायचंय, तिथून एके ठिकाणी जायचंय'.
'मग पत्रं किती आहेत एवढंच मोजून होईल फारतर'.
'ऐकशील का? तुझी पत्रं मी माझ्याकडेच ठेवणार आहे, माझी तुझ्याकडे आहेत ती दे, तारखेनीशी एक तुझं एक माझं लावणार मी निवांत.'
'घे ही सगळी, पण मला वाचायची झाली तर काय करू? की बाईंडिंग करून पुस्तक करणार आहेस? :P
'कॉफी घे, दहा मिनिट राहिलेत तुला निघायला, एक तर याचा कप म्हणजे बादलीएवढा असतो'.

….….

'निघू? उशीर होतोय? नको रे असं बघूस. आय नो. नंतर भेटणं होणार नाही, तुझी पत्रं आणि आठवणी यावर मी राहीन.  सविस्तर लिहीन एकदा पाच सहा महिन्यांनी निवांत झाले की. निघू?'
'हो, आठवण येईल? कुठे ठेवशील आणि पत्रं नीट?'
'ठेवेन, तू नको काळजी करूस, चल येते'.
'बाय'
'बाय, सी यू, विल मिस यू लॉट'
'बास, सासरी जायचंय हसरा चेहरा करून, रडवू नकोस, आता मागे न बघता मी निघणार आहे, बाय'.

….….
थोडं पुढे गेल्यावर तिनी गाडी नदीच्या अलीकडे थांबवली. लागूनच असलेल्या सिमेंटच्या बाकड्यावर ती बसली. सगळी पत्रं बाहेर काढली. त्याचे हात दुखेपर्यंत तिनी अतिशय बारीक तुकडे केले. आणलेल्या प्लास्टिक पिशवीत सगळा कचरा भरला आणि पिशवी नदीपात्रात भिरकवून दिली. 'चांगला आहे तो, पण काय सांगावं, कुणाची मती कधी फिरेल'. घड्याळाकडे बघत तिने किक मारली आणि ती निघाली.

….….
ती गेल्यावर त्यानी अजून एक कोफी मागवली. त्याचं विचारचक्र चालू झालं. 'तिचा माझ्यावर विश्वास नाहीये. मी पत्रांचा गैरवापर करेन असं तिला का वाटलं पण? इतका मी खालच्या पातळीचा आहे? मीच मूर्ख असं वाटायचं मला पण काहीवेळेस ना भाबडेपणा पण फायद्याचा असतो. तिची आठवण म्हणून मी सगळ्या पत्रांच्या झेरॉक्स काढल्या होत्या. मी करणार तसं काहीच नाहीये ही काळ्या दगडावरची रेघ आहे पण असाव्यात वेळ पडली तर. फार मजा येईल तिला सांगितल्यावर मला तिचा चेहरा बघताना. नको, नाही सांगणार मी तिला, मला गंडवल्याचा तिचा आनंद राहू दे तसाच. फक्तं सगळ्या पत्राखालचं 'फक्तं तुझी, तुझी आणि तुझीच' याला हायलाईट करून ठेवलं की झालं

जयंत विद्वांस

 





2 comments: