Wednesday, 24 August 2016

सत्तर एमएमचे आप्त (१६)… परवीन बाबी…

शेरखानजी पश्तुनी वंशाचा पठाण होता. शहाजहानच्या काळात ते भारतात आले. त्यानी भारतात १६५४ ते १६९० 'बाबी'राज्यं चालवलं, मग नंतर उरलेले इथेच राहिले. चितोडच्या राणा विरुद्ध केलेल्या कामगिरीबद्दल हुमायूंनी त्याला 'बाबी' किताब दिला होता. मराठ्यांनी सगळा गुजरात ताब्यात घेतला तरी जुनागढ आणि इतर तीन सुभे 'बाबी'कडे राहिले. त्या वंशातला जुनागढचा शेवटचा नवाब फाळणी  झाल्यावर पाकिस्तानात निघून गेला. परवीन त्याच वंशातली होती. आत्ता जिवंत असती तर ती ६७ वर्षाची असती. तिचे वडील ती दहा वर्षाची असतानाच गेले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये उच्चंशिक्षित लोक कमी असायचे किंवा कमी यायचे तेंव्हा. अमिताभ बी.एस.सी.आहे, गोगा कपूर एम.ए.(पॉलिटिक्स), बलराज सहानी एम.ए.(हिंदी) आणि परवीनसुद्धा एम.ए.(इंग्लिश लिटरेचर) होती. 

ब-याच जणांना सेहवाग नविन आला होता तेंव्हा तेंडुलकर खेळतोय का सेहवाग आहे हे पटकन कळायचं नाही तसंच काहीही कारण नसताना परवीन आणि झीनतमधे घोळ व्हायचा. पण परवीन होती मात्रं खानदानी सुंदर अगदी, वयात आल्याची जाणीव तिनी आणि झीनतने करून दिली होती. तिच्याकडून लोकांनी, समीक्षकांनी अभिनयाची अपेक्षा कधीच ठेवली नव्हती. त्यामुळे ते आरोप तिच्यावर झालेच नाहीत फार. पण ती बाहुलीही नव्हती, तिचा प्रेझेंस रॉयल असायचा, तीला मातीत घोळून काढली असती तरी ती गावकी गोरी कधीच वाटली नसती. श्रीमंत घरातली, थोडी आगाऊ, शिक्षित, बिनधास्त मुलगी वाटायची ती. शशीकपूर बरोबर 'सुहाग'मधे ती म्हणते ना 'घरमें हो मुश्किल, तो दफ्तर ले चलो', तशीच वागली ती आयुष्यंभर, निर्बंध नसलेलं, मन मानेल तसं. महेश भट, कबीर बेदी, डॅनी बरोबर तिचे अल्पकालीन सहवास होते. अमिताभबरोबर तिचं सूत होतं अशीही बातमी होती. इतर नावंही तिला जोडली होती. एकदा तुमचा स्टँप प्रसिद्ध झाला की लोक परस्पर कुठल्या पाकिटाला चिकटवतील सांगता येत नाही.     

महेश भटनी त्यांच्यावर आधारित 'अर्थ' काढला. ती गेल्यावर २००६ ला 'वो लम्हे' काढला, मुलीला घेऊन तिच्यावर 'फिर तेरी कहानी याद आयी' काढला पण हे सगळं त्यानी सांगितलेलं किंवा त्याची बाजू, कितपत खरी त्यालाच माहित, तसाही तो विश्वासार्ह माणूस नाहीये म्हणा. अमिताभ मला मारायचा प्रयत्नं करतोय असे आरोप तिने  वेडेपणात केले त्यामुळे फार गाजावाजा झाला नाही. रूतलेलं कधी वर तरंगेल सांगता येत नाही. 'टाईम'च्या मुखपृष्ठावर झळकलेली ती पहिली बॉलीवूड अभिनेत्री होती. ७३ ला क्रिकेटियर सलीम दुराणी बरोबरचा 'चरित्रं' फ्लॉप गेला पण परवीनची नोंद झाली आणि मग ७४ ला तिचा पहिला सुपरहिट आला 'मजबूर'. नंतर तिचे बच्चनबरोबरचे 'अमर अकबर', 'कालिया', 'शान', 'खुद्दार', 'दिवार', 'महान', 'देशप्रेमी', 'दो और दो पांच', 'सुहाग', 'नमकहलाल', 'काला पत्थर' (शेवटचे चार शशीची हिरोईन) सगळे चित्रपट हिट किंवा सुपरहिट झाले. 

'खुद्दार'मधल्या 'मच गया शोर'मधे नथ घालून नाक मुरडणारी, नऊवारी घातलेली परवीन काय अप्रतिम देखणी दिसलीये, 'दिवार' मधली अनिता. त्यात तिनी अभिनय केला होता खरंच. मूल होणार, लग्नं होणार म्हणून आनंदलेली अनिता तिनी छान दाखवली होती. यश चोप्रा डायरेक्टर म्हणून चांगला असेल पण तो पार्शल होता. श्रीदेवीसाठी 'चांदनी' मधला जुहीचा रोल कापला (त्या बदल्यात तिला 'डर' दिला), 'डर'मधे त्यानी शाहरुखसाठी सनीचा रोल कापला. 'सिलसिला'चं ओरिजिनल कास्टींग परवीन आणि स्मिता पाटील असं होतं. मग ते सगळं बारगळलं, कुणी सांगावं स्मिताच्या प्रेझेंसनी वेगळी परवीन दिसलीही असती कदाचित. फार अभिनयक्षमता नसताना तिला यश मात्रं अफाट मिळालं. सगळं भरघोस मिळाल्यावर काय करायचं आता नेमकं हे उमजलं नाही की नैराश्य येत असावं. विनोदखन्ना असाच बायको, मुलं सोडून रजनीशकडे गेला (गेला नसता तर बच्चनला टफ होता तो) तशी परवीन ८३ ला शांतीच्या शोधात देशोदेशी फिरायला लागली. 

८९ ला ती भारतात आली ते फक्तं तिचं नाव घेऊन, हवा भरलेल्या फुग्यासारखी ती जाड झाली होती. तिला पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया झालाय असं लोकांचं म्हणणं होतं आणि तसं काही नाहीये असं तिचं. त्यामुळे तिनी नातेवाईकांसकट सगळ्यांशी संबंध कमी केले आणि ती अजूनच एकटी पडली. बिल क्लिंटन, रॉबर्ट रेडफोर्ड, प्रिन्स चार्ल्स, मोसाद, केजीबी, सीआयए, सीबीआय, काही गव्हर्नमेन्टस मला मारायला टपलीयेत. अमिताभ इंटरनॅशनल गँगस्टर आहे, त्याच्या गुंडानी मला एका बेटावर नेऊन माझ्या कानाच्या जवळ सर्जरी करून एक चीप घातलीये असे आरोप तिनी केल्यावर ती शहाणी राहिली नव्हती हे नक्कीच होतं, ते कळायला डॉक्टर कशाला हवा होता. बच्चनचे सिनेमे केबलवर दिसले तरी ती व्हायोलंट व्हायची म्हणे. मुस्लिम परवीन नंतर ख्रिश्चन झाली पण धर्म बदलला म्हणून मन:शांती मिळत नाही. निदान चार पैसे राखून असल्यामुळे ती रस्त्यावर आली नाही एवढं मात्रं झालं.   

दैव माणसाला कुठल्या मार्गानी नेईल सांगता येत नाही. मधुमेहामुळे तिच्या डाव्या पायाला गँगरीन झालं होतं, त्यामुळे ती व्हीलचेअर वापरायची. तीन दिवस दरवाज्याबाहेरचं दूध, पेपर उचललं न गेल्यामुळे कुणीतरी पोलीस बोलावले आणि त्यांना तीन दिवसापूर्वी मेलेली, पायाला बँडेज असलेली, वस्तू अस्ताव्यस्त पडलेली, पोटात अन्नाचा कण नसलेली श्रीमंत परवीन सापडली. ती मेल्यावर संपत्तीवर हक्क सांगायला मरताना एकटी असलेल्या परवीनच्या नातेवाईकांची झुंबड उडाली. तिच्या मृत्युपत्राप्रमाणे सत्तर टक्के संपत्ती गरीब 'बाबी' लोकांच्या मदतीसाठी ट्रस्टला, वीस टक्के तिचा मित्रं मुरादखान बाबीला आणि उरलेले दहा टक्के ख्रिश्चन मिशनरीला दान गेले. सगळं वाटून ती २३ जानेवारी २००५ ला तिच्या आईच्या शेजारी मातीत विसावली. पुढे पाच वर्षांनी जागा संपल्यावर नविन येणा-यांसाठी जागा करायला सांताक्रूझची दफनभूमी खोदली गेली त्यात ती, मधुबाला, रफी, तलत, साहिर आणि नौशादचे अवशेष दुसरीकडे हलवले गेले. 

एरवी कधी भेटले नसतील सगळे एकत्रं पण निदान या कारणानी एकमेकांत मिसळले असतील. दोन सौंदर्यवती, दोन गायक, एक शायर आणि एक संगीतकार. मातीत गेलं एकदा की काही नाही यातलं, गरीब श्रीमंत, सुंदर, कुरूप सगळेच सारखे. परवीन काय आपण काय, मातीत जायच्या आत नाव राहील असं चांगलं काहीतरी करून जाता यायला हवं एवढं खरं. 

जयंत विद्वांस  

तिची आणि त्याची गोष्टं...

चोवीस वर्षांपूर्वी मुली, काय मुलं काय एवढी डेरिंगबाज नव्हती. ती अपघाताने दोन दिवस त्याच्या घरी आली त्याच्या बहिणीबरोबर. तो चोवीस, ती सतरा. दोन वेण्या, काळभोर डोळे, नावाप्रमाणे हसमुख चेहरा. प्रपोझ वगैरे करायची गरजच पडली नाही. काय झालंय ते दोन्हीकडे समजलं होतं मग उगाच शब्दं कशाला खर्चायचे. तिनी एकटक बघावं आणि या बावळटानी चुकून तिच्याकडे बघितलं तर तिनी पटकन लाजून दुसरीकडे बघावं इतकं सगळं अलवार आणि नवखं. बाकी पब्लिकला कळलं होतं पण दोघांनाही ते टॉप सिक्रेट वाटत होतं. एकदम 'पुष्पक' सिनेमा, सायलंट मुव्ही. तो तिला स्टेशनला सोडायला गेला जाताना. एरवी अखंड बडबड करणारा तो एकही शब्दं बोलला नाही आणि ती पण मागे टीचभर गाडीवर वितभर अंतरात अर्ध्या फुटाचं अंतर कसोशीने पाळत गप्पं बसलेली. 

साधनं जेवढी मदत करतात तेवढीच गंमत पण घालवतात. आता मोबाईल आले. लोकं सतत बोलतात एकमेकांशी, पटकन जवळ येतात तेवढ्याच वेगानी लांब जातात. तेंव्हा दोघांच्या घरी लँडलाईनपण नव्हता. कित्त्येक महिन्यात बोलणं शक्यं व्हायचं नाही. पत्रं हाच उपाय, ते पण कुणाच्या तरी पत्त्यावर पाठवायचं. ते वहीत ठेवून किंवा कुणाच्या घरी बसून वाचायचं. तो वीसेक पानं लिहायचा, ती दोन तीन. दोनेक  महिन्यातून कधी तरी ते भेटायचे. दोस्ताच्या घरी किंवा कुठे सेटिंग लावून. मधे दोन हात अंतर ठेवून बसायची ती. साहजिकच होतं ते, बंद घरात काहीही होऊ शकलं असतं, म्हणून. ती एकटक सगळं ऐकायची. एकदा ती म्हणाली, 'तुझे डोळे खूप छान आहेत'. तो म्हणाला. 'आत्तापर्यंत कुणी सांगितलंच नाही मला असं'. 'म्हणून तर सांगितलं, तू एक गोड बावळट आहेस'. 'तू तरी कुठे मोठी शहाणी आहेस?' 'तुला हो म्हटलं तिथे झालंच की सिद्ध मी मूर्ख आहे ते'. निघताना तिचा चेहरा निर्माल्यं व्हायचा, त्यालाही परत येताना जीवावर यायचं. 

मग एक दिवशी तिनी आईला गुपित सांगितलं. तिनी वेळकाळ बघून नव-याला सांगितलं. मग शहाण्या बापासारखा तो त्याच्या घरी गेला. 'लग्नं इथे का आमच्या इथे? अपेक्षा काय आहेत?' वगैरे विचारपूस झाली. ती एकुलती एक आणि एक लहान भाऊ. तिच्या आईला तो आवडला होता पण नवरा आग्यावेताळ. ''घरी बोलून फोन करतो', म्हणाले. घरी गेल्यावर त्यानी दोन महिन्यांनी सांगितलं, 'नको, त्याचा पार्टनरशिपमधे धंदा आहे, नोकरी असती तर हो म्हटलं असतं'. ती फुरंगटली. कसं सांगायचं हे तिला कोडं. तिनी धीर करून त्याला सांगितलं. मग तो म्हणाला, 'अशीच येशील? लग्नं करू, मी सांगितलंय घरी'. ती म्हणाली, 'बाबांना दोनवेळा अँटॅक येऊन  गेलाय, मी तसं केलं आणि काही बरं वाईट झालं तर आयुष्यभर खात राहील, मागे लहान भाऊ आहे म्हणून नको'. मग परत ते भेटले एकदा. 'थांबशील माझ्यासाठी?' 'थांबेन, पण अजून काही वर्षांनी तुझं हेच कारण असेल तर कसं करायचं?' तिच्याकडे उत्तर नव्हतं. फक्तं प्रश्नं उरले मग दोघंही गप्पं झाले. ती रडत म्हणाली, 'तुझी पत्रं ठेवणं शक्यं नव्हतं खरंच मला, म्हणून नाईलाजाने फाडून टाकली सगळी'. तिनी आधी सांगितल्यामुळे तिची पत्रं त्यानी बरोबर नेली होती, ती तिला परत दिली. पत्राच्या शेवटी असायचे ते 'तुझी, तुझी आणि फक्तं तुझीच' हे अर्थ संपलेले शब्दं तिचे तिनी परत घेतले. 

मग दोघंही अनोळखी झाले. सातेक महिन्यांनी तिनी एकदा झोपेच्या गोळ्या घेतल्याचं कळलं त्याला. मग तो तिला भेटून आला पण घटना घडून महिने लोटल्यामुळे तेवढा असर शिल्लक नव्हता. 'का केलंस असं? आणि कळवता पण नाही आलं साधं?' 'काय कळवणार होते नाहीतरी? वाचले हे? आठ दिवस होते दवाखान्यात, परत नाही करणार असं काही'. एकेकाच्या पश्चातापाच्या कल्पना असतात. आपण याला नाही म्हटलंय या गंडापोटी अर्धा फूट लांब बसणा-या तिची समर्पणाची तयारी होती. तो मोठा होता वयानी, ती अजाण होती. त्यामुळे घडलं काहीच नाही. सगळं बोलून झाल्यावर निघताना तिचा चेहरा खट्टू झाला, त्यालाही कदाचित हे शेवटचं भेटणं या विचारानी परत येताना जीवावर आलं. निरोप पटकन संपवावा. मागे वळून बघितलंत की काँक्रीट स्लॅबपण ढासळतो. तिचं मग वीस वर्षांपूर्वी लग्नं झालं, त्याचं नोकरी लागल्यावर सतरा वर्षांपूर्वी. एकोणीस वर्षांपूर्वी ती दिवाळीत त्याला रस्त्यात भेटली. 'कसा आहेस?' 'मस्तं, तू कशी आहेस?' 'ठीक, लग्नं केलंस?' 'नाही अजून पण करणार तर आहेच :) ', 'किती अचानक भेटलास'. 'बाकी बरी आहेस ना?' 'हो'. 'चल निघू? आईकडे चाललीये'. 'बाय'. अजून एक वर्षानी 'बीस साल पहले की बात है' म्हणता येईल. 'त्या'ची बायको गंमतीने म्हणते, 'ती' सुखी झाली, सुटली आणि मी अडकले. तो फक्तं हसतो. तिनी सुखीच असावं अशी त्याची कायमच इच्छा आहे. 

चोवीस वर्ष झाली. आता त्याला कुणी म्हटलं 'तुमचे डोळे खूप छान आहेत' तर तो म्हणतो 'थँक्स' आणि मनात म्हणतो, 'तिनी चोवीस वर्षांपूर्वीच सांगितलं होतं हे मला पण कुणी म्हटलं की बरं वाटतं, त्या निमित्ताने का होईना ती आठवते'. तिची आणि त्याची गोष्टं अशीच आहे, अर्धी राहिलेली. जग खूप छोटं आहे, त्याला वाटतं, कधी तरी ती त्याला भेटेल रस्त्यात. तेंव्हा कदाचित त्याला चष्मा असेल, तो मुद्दाम काढेल आणि ती हसून म्हणेल, 'अजूनही तुझे डोळे खूप छान आहेत बर का '.  

तिची आणि त्याची गोष्टं... 

जयंत विद्वांस 

सत्तर एमएम चे आप्तं (१५)…. राखी मजुमदार…

काल राखी एकोणसत्तर वर्षाची झाली. भारताच्या स्वातंत्र्याला जितकी वर्ष पूर्ण होतील तितकीच वर्ष राखीलाही होत रहातील कारण ती १५ ऑगस्ट १९४७ ला बंगाल मधे जन्माला आली. तिच्या वडिलांचा बुटाचा धंदा होता तो सोडून त्यांना बांगलादेश मधून बंगालला यावं लागलं. ती ही हेलनसारखीच विस्थापित होती. सोळाव्या वर्षी तिचं लग्नं पत्रकार अजय विश्वासशी झालं जेंव्हा तिला लग्नाचा अर्थही माहित नव्हता आणि अठराव्या वर्षी ते मोडलं. तिचं दुसरं लग्नं मात्रं ब्रेकिंग न्यूज होती. संपूर्णसिंह कालरा उर्फ गुलझारशी तिचं लग्नं झालं. स्वप्नं कितीही सुंदर असलं तरी फार काळ टिकत नाही तसं काहीसं झालं. मीनाकुमारीमध्ये अडकलेल्या गुलझार आणि एक वर्षाच्या मेघनाला मागे सोडून ती एक दिवस घर सोडून गेली. 'माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी लघुकथा' असं म्हणायचा गुलझार तिच्या बाबतीत. ती निघून गेल्यावर तो म्हणाला होता, 'शहर की बिजली गई, बंद कमरेमें बहोत देर तक कुछभी दिखाई न दिया, तुम गई थी जिस दिन, उस रोज ऐसाही हुआ था'. बडे लोग, बडी बाते. 

शशी कपूर (१०) आणि अमिताभ (८) बरोबर तिनी जास्ती काम केलं. 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'मुकद्दरका सिकंदर', 'कभी कभी', 'कस्मे वादे' ('शान' मधे वहिनी होती आणि 'लावारीस' धरला नाही कारण पडद्यावर समोरासमोर नाहीत पण ती त्याची आई होती त्यात) हिट झाले पण 'बेमिसाल', 'जुर्माना', 'बरसात की एक रात' फ्लॉप झाले. राखीचं एक कौतुक मला कायम वाटत आलंय. सिनेमा हिट असो फ्लॉप असो, तिच्या करिअरवर काही फार परिणाम झाला नाही त्याचा. 'जीवनमृत्यू', 'शर्मिली', 'ब्लॅकमेल' 'लाल पत्थर' मधली राखी अवखळ, लोभस, गोंडस होती नंतर ती फार मॅच्युअर्ड वाटायला लागली पडद्यावर. ग्रेसफुल होतीच ती. अतिशय गंभीर चेह-याची खरतर ती, आब राखून असलेली, गप्पं असणारी माणसं एक वचक निर्माण करतात. कधीही स्फोट होईल या भितीनी लोक चार हात लांब असतात. राखी तशी होती. ती एकूण १६ वेळा नॉमिनेट झाली फिल्मफेअरसाठी (बेस्ट ८, सपोर्टींग ८) आणि माधुरी (६/१४) पण म्हणून तिची काही माधुरीसारखी क्रेझ नव्हती. 

राखीचे पटकन दहा भन्नाट रोल, अजरामर डायलॉग, गाणी सांगा म्हटलं तर अवघड आहे पण मला राखी आवडायची. तिचे काही रोल्स माझ्या लक्षात आहेत. 'दुसरा आदमी', 'परोमा' 'तृष्णा', 'श्रद्धांजली' मी पाहिलेले नाहीत त्यामुळे त्यावर उगाच पिंक टाकणार नाही. अशोककुमार जेवढ्या सहजतेने नायकाचा चरित्रं अभिनेता झाला तेवढ्याच सहजपणे राखी आई झाली. निरुपा रॉय, रत्नमाला, रिमा यांचं कौतुक झालं तेवढं राखीचं नाही झालं. विधवा, अन्याय झालेली आणि मुलं मोठी झाल्यावर सूड घेतात अशा भूमिका तिच्या वाट्याला जास्ती आल्या. 'करण अर्जुन', 'खलनायक'. 'रामलखन', 'सोल्जर', 'बाजीगर' यात ती तशी होती. 'बाजीगर' मध्ये ती वेडी होती त्यामुळे सूड घेतल्याचा आनंद तिला मिळत नाही एवढाच फरक. मद्यसेवनानी बोजड झालेल्या जिभेनी 'मेरे करण अर्जुन आयेंगे' म्हणते तेंव्हा मला थोडं वाईट वाटतं. घा-या डोळ्यांची, गोब-या गालांची, रॉयल लूक असलेली राखी 'गीत गाता हू मैं 'गाण्यात 'लाल पत्थर'मध्ये हेमा मालिनीपेक्षा सरस दिसते. 

'गदर-एक प्रेमकथा' काढणारा पण एक्याऐंशी साली पैसे नसलेला तेवीस वर्षाचा डायरेक्टर अनिल शर्मा तिच्याकडे गेला होता 'श्रद्धांजली' साठी. राखीने केला तो सिनेमा तरीही आणि तो हिट ही झाला. राखीचे काही अभिनयकण माझ्या लक्षात आहेत. 'शक्ती' मध्ये बापलेकात घुसमटलेली आई तिनी काय मस्तं उभी केलीये. 'बसेरा' मध्ये शशीकपूरच्या संसारात रमलेली रेखा बघून ती वेडी असल्याचं नाटक करून परत दवाखान्यात जायला निघते तेंव्हा ते नाटक ओळखलेल्या पूनम धिल्लनकडे ती जे बघते, बास, फिल्मफेअर किती मिळाले वगैरे काही संबंध नाही अशी बघते ती. तिचे तीन तळतळाट माझ्या लक्षात आहेत. असं वाटतं की वास्तवात ती जर कुणाला असं म्हणाली तर लागतील तिचे शाप. एक 'करन अर्जुन' मधला, एक 'रामलखन' मधला आणि एक 'बाजीगर' मधे दलीप ताहिलला ती बोलते तो. तिचा स्वभाव जसा शांत आहे तशा भूमिकेत ती त्यामुळे अजून जमून जाते. 'त्रिशूल' आणि 'काला पत्थर' मध्ये ती कुठेही कमी पडलेली नाही अमिताभसमोर. 

पण मला तिचा सगळ्यात आवडलेला चित्रपट 'साहेब'. मी तो खूपवेळा बघितलाय. ती बडी बहू आणि सासरा उत्पलदत्त. प्रेमळ, घर सावरून घेणारी, मानानी मोठी आणि मनानेही मोठी असलेली, धाकटा दिर अनिलकपूरवर पुत्रवत प्रेम करणारी तिची भाभी बघाच. माणूस बोलतो समोरच्याला एक राग आल्यावर तावातावाने, चिडून आणि एक सात्विक संतापानेही बोलतो. राखीच्या त्या सात्विक रागाच्या उद्रेकी संवादाला मला हमखास रडू येतं. दवाखान्यात ती बघायला जाते त्याला, तेंव्हा काचेतून बघणारी राखी. संपूर्ण चित्रपटात कदाचित लेखक सचिन भौमिकनी लिहिलेल्यापेक्षा काकंणभर सरस बडी बहू तिनी पडद्यावर दाखवलीय. मतलबी दीरजावेकडे ती फक्तं बघते त्यात, उत्पलदत्तला सासरा म्हणून तिनी दिलेला रिस्पेक्ट बघाच एकदा. असल्या परफॉर्मन्सना बक्षिस नसेल मिळत पण मला आवडला तो. तसं तर काय 'शोले'ला पण एकंच फिल्मफेअर होतं म्हणून तो काय पाहिला नाही का कुणी?  

राजेश खन्ना हा अमिताभपेक्षा व्हर्सेटाइल अभिनेता होता असं तिचं मत आहे. काही काही गोष्टी मोठ्या गंमतीशीर असतात, पटकन लक्षात येत नाहीत. राखीच्या नशिबात तीन गोष्टी कधीच पडद्यावर नव्हत्या - कॉमिक रोल, गुलझारच्या दिग्दर्शनाखाली काम आणि नृत्यं. तिच्यावर एकही डान्स नाही. ती आली तेंव्हापासून ते आत्तापर्यंत गोबरे गाल आणि तब्येत राखून आहे. एकतर ती स्वतः किंवा इतरांविषयी खूप कमी बोललीये. मीनाकुमारीच्या 'मै चूप रहूंगी'सारखी ती गप्पं आहे. आधी ती अमिताभच्या शेजारी रहायची. त्याच्या लग्नात 'भादुरी आणि मंडळी' तिच्याच घरी उतरली होती. नंतर तिनी पुलंचा 'मुक्तांगण' बंगला विकत घेतला. २०१५ नंतर ती आता पनवेलच्या फार्महाउसवर राहतीये. आता थकलीये, फारशी दिसतही नाही कुठे. 

काय करत असेल फार्महाऊसवर एकटी? असले दळिद्री प्रश्नं मला पडतात आणि विषण्ण व्हायला होतं. सूर्यास्त तरुणपणात कॅमेरात टिपायची मोठी हौस असते पण आता फक्तं सनसेट अशी वेळ आली की काय टिपणार? अवघड आहे सगळं. 'पल पल दिलके पास' ऐकतो आता , नको ते अभद्र विचार उगाच. 

जयंत विद्वांस

जेम्स हॅडली चेस...

मृत व्हायच्या आत काही मृत व्यक्तींना भेटायचा अशक्यंयोग जर शक्यं झाला तर माझ्या लिस्टीत चेस वरती असेल. रेनेलॉज ब्राबझान रेमंड हे त्याचं खरं नाव आणि जेम्स हॅडली चेस, जेम्स डॉचर्टी, आर. रेमंड, रेमंड मार्शल आणि अँब्रोस ग्रांट ही टोपणनावं. १९०६ ते १९८५ तो भौतिक आयुष्यं जगला आणि त्याच्या थ्रिलर्समधून आता तो जिवंत आहे. नव्वद पुस्तकं लिहिली त्यानी, त्यातल्या पन्नासवर चित्रपट निघाले. न सांगता काढलेले वेगळे (आर या पार - द सकर पंच). नुकताच येऊन गेलेला 'जॉनी गद्दार' त्याच्या स्टोरीवर नाही पण धाटणी तीच. डायरेक्टर श्रीराम राघवननी विजय आनंद आणि चेसला अर्पित केलीये ती फिल्म. नील मुकेशच्या हातात चेसचं पुस्तक आणि हॉटेलमध्ये टीव्हीवर 'जॉनी मेरा नाम' चालू असतो अशी श्रद्धांजली त्यानी वाहिलीये त्यात. 

तो एवढी वेगवेगळी पात्रं जिवंत कशी उभी करू शकला याचं मला कोडं पडायचं. अठराव्या वर्षी घरातून तो निघून गेला. तो पुस्तकं विकायचा, तो उत्तम फोटोग्राफर होता (Cade - वाचा त्याची त्यासाठी), तो वाचायचा खूप, क्लासिकल संगीत ऐकायचा, मेकॅनो खेळायचा. नकाशांच्या सहाय्याने त्यानी अमेरिकन गँग्ज वरती 'नो ऑरकिड्स फॉर मिस ब्लाँडीश' लिहिली आणि मग तो सुटलाच तिथून. त्याच्यावर मग नाटक आणि मग सिनेमाही निघाला. आयुष्यात फक्तं दोनदा अमेरिकेला धावत्या भेटी देणा-या या माणसाने नकाशे आणि माहितीवर आधारीत अमेरिकेचं अंडरवर्ल्ड खरं वाटेल असं उभं केलं. त्याच्या पुस्तकांना दंड झाले, केसेस झाल्या. मग त्यानी टोपणनावं घेतली. प्रसिद्ध होण्यासाठी अशा गोष्टी खूप मदत करतात. 

८३-८४ च्या आसपास भानू शिरधनकर अनुवादित 'गिधाडांची जातच चिवट' (Vulture is a patient Bird) आणि 'कुणीतरी आहे तिथे' (Knock, Knock! Who's There?) वाचलं होतं. नंतर स्टोरी लक्षात अजिबात नव्हती पण चेस वाचावा असं याच पुस्तकामुळे डोक्यात फिट्ट बसलं होतं. 'शेवटपर्यंत चेस खिळवून ठेवतो' या वाक्यात नाविन्यं काहीही नाही. चेस कडून काय शिकलो असेन तर माणूस डोळ्यासमोर उभा करणे आणि सगळं समोर घडतंय असं वाटायला लावणे. मानवी स्वभावांचे नमुने पेश करण्यात चेसचा हातखंडा आहे. अति तिथे माती, हव्यास वाईट असतो, जे मिळालंय त्यात समाधान मानावं, हातचं सोडून पळत्या पाठी जाऊ नये या सगळ्या उपदेशांचा अर्थ चेसची पुस्तकं वाचली की कळतो. माणसांचे विविध नमुने तो पेश करतो. एकाच माणसात वाईटाबरोबरच कुठेतरी तीट लावावी एवढा चांगुलपणा असतोच हे तो सांगतो. सस्पेन्स आणि थ्रिलर्स यात फरक आहे. उगाच ओळखा पाहू खुनी कोण असला त्रास चेस देत नाही. 

त्यामुळे अंदाज चुकला म्हणून वाचक खट्टू वगैरे होत नाही. अतिशय बांधेसूद वाटणारे प्लॅन्स कसे मातीत जातात हे चेस दाखवतो. मग कधी माणसं चुकतात, कधी अशक्यं घटना घडतात, कधी कुणीतरी हिशोबात न धरलेलं अचानक टपकतं आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. सहसा त्यातल्या बायका टंच, घातक, लोभी, कृतघ्न, दगाबाज असतात आणि क्वचित चांगल्याही असतात पण त्यांचंही वाईट होतं (A Lotus for Miss Quon). But a short time to Live वाचताना तर प्राक्तनात असेल तर कुसंगतीनी चांगल्या माणसाच्या नशिबी कसे भोग येतात ते वाचून विषण्णता येते. खानोलकरांना कुणीतरी विचारलं, 'अरे त्या ह्याला पांगळा का केलास कथेत?' ते म्हणाले, 'मी केला नाही, तो झाला'. लेखकाच्या हातात काही नसतं. त्याची पात्रं आपापलं नशीब आणि भोग घेऊनच येतात तर. चेसच्या पुस्तकातून अशी अनेक माणसं आढळतील जी हतबल आहेत, मनाविरुद्ध विनाशाकडे वाटचाल करतायेत.

चांगलं पुस्तक कुठलं? डोळ्यांवर झापड येत असतानाही जे बाजूला ठेवावंसं वाटत नाही ते. अर्थात हे अवलंबून आहे. दासबोध, ज्ञानेश्वरी मी वाचायला घेतली तर मला झोप येईल कारण माझी आवड ती नाही, बौद्धिक कुवतही नाही तेवढी. थ्रिलर्स मात्रं मला मोह घालतात याला कारणीभूत चेस. पाठलाग, कुणीतरी पुढे पळतंय आणि कुणीतरी मागावर आहे, पुढच्याची सुटण्याची धडपड आणि मागच्याची त्याला पकडण्याची धावपळ हा उंदीरमांजराचा खेळ 'पैचान कोन'पेक्षा मला जास्ती आवडतो. इथे कानशिलं गरम करणं वगैरे प्रकार नाही तो शेल्डन आणि रॉबिन्सकडे. इथे जरासा कुठे उल्लेख येतो पण तो डिटेल्ड का नाहीये असं वाटतंच नाही इतके तुम्ही त्या Chase मध्ये इन्व्हॉल्व्ह्ड असता. अशक्यं योगायोगही आहेत त्याच्या कथेत पण ते फार मनावर घेण्यासारखं नाही. मार्क गरलँड, स्टिव्ह हर्मास, इन्स्पेक्टर लेपस्की, बिगलर, फ्रॅंक टेरेल, डॉन मिक्लेम अशी पात्रं वारंवार वेगवेगळ्या पुस्तकातून भेटतात. 

मला चेस आवडला म्हणजे दुस-याला आवडेल असं नाही पण एकदा वाचून बघा, सगळं लक्षात असलं तरी परत परत वाचाल. अतिशय सोप्प्या इंग्रजीत लिहिलंय (मला कळलं म्हटल्यावर हे खरंतर वेगळं सांगायला नकोय). त्याच्या पुस्तकाला फेरारीचा वेग आहे. मी सूक्ष्मरूपाने इंग्लंड, तिथली खेडी, अमेरिका बघून आलोय त्यातून. ती सगळी पात्रं मी माझ्या बाजूला अनुभवली आहेत. त्याचे पुस्तकातून असलेले तोंडाला पाणी आणणारे मेन्यू आणि अमुक इयर्स ओल्ड वाईन, बर्बन, स्कॉच त्या ठिकाणी जाऊन अनुभवाव्यात अशी दुर्दम्य इच्छा आहे. माझी वीसेक वाचायची राहिलीयेत अजून त्याची, एकदा डेक्कनला यादी घेऊन जाईन आता. पुण्यात असाल तर डेक्कनला मिळतील नाहीतर वासन पब्लिकेशन्स, चेन्नई, एअर मेलनी घरपोच पाठवतात. पीडीएफपण मिळतील नेटवर पण पुस्तक हातात धरून लोळत वाचण्यात जी मजा आहे ती त्यात किंवा किंडलला नाही. 

कोल्हापूरहून निघालेले लेटेस्ट अनुवाद त्यानी पाहिले असते तर रंकाळ्यात उडी घेतली असती इतके भिकार आहेत. मला कुणी दत्तक घेतलं आणि उदरनिर्वाहाची ददात मिटली तर मी चेस मराठीत आणेन कारण मुळामुठेत जीव दिला त्यानी तरी जीव जाईल एवढं पाणी नसतं, दगड लागून काय खरचटेल तेवढंच, त्याला वर काढता येईल. कादंबरीची झेप अजून माझ्या आवाक्याबाहेर आहे, शॉर्ट स्टोरीज आत्ता कुठे जमू लागल्यात असा भ्रम आहे पण कधी लिहिलंच मोठं काहीतरी तर चेससारखं थ्रिलरच लिहीन आणि त्यालाच अर्पण करेन. त्याचा इंग्रजी अनुवाद कुणाला करायचा असेल तर आत्ताच सांगून ठेवा. ;) :)  

जयंत विद्वांस 

गुडबाय एफबी...

मित्रं आणि मैत्रिणींनो, इथून आपली रजा घेतोय. कंटाळा आला किंवा तोचतोच पणा जाणवायला लागला म्हणून असेल पण अकाउंट बंद करतोय. परत कधी येईन की न येईन माहित नाही. असाच लोभ असू द्या, कधी काही चुकीचं वागलो असेन तर मोठ्या मनानी माफ कराल. माझ्या पोस्ट्सवर तुम्ही सगळ्यांनी अतोनात प्रेम केलंत, त्यामुळेच थोडंफार, बरंवाईट लिहीत राहिलो. तुम्ही मला मिस कराल त्यापेक्षा जास्ती मी तुम्हांला मिस करेन. जाण्यापूर्वी थोडं मनातलं सांगेन म्हणतोय. 

पाचेक वर्ष झाली इथे येऊन. ० ते ३८६० फ्रेंड्स(?) लिस्टीत आले, त्यातल्या सत्तरेक लोकांना फार तर भेटलो असेन, त्यांच्याशी बोललो असेन. बाकी माणूसघाणेपणा कंटिन्यू ठेवला. वाईट अनुभव कमी आले, विनोदी जास्ती आले. कुणाच्या इनबॉक्सात लाळ सांडली नाही, भिकार फोटोवर गॉर्जस, अप्रतिम असं खोटं बोललो नाही. उगाच वाद घातले नाहीत, अर्धवट माहितीवर राजकीय पोस्ट्स टाकल्या नाहीत, ज्यातलं आपल्याला समजत नाही त्यावर पोस्टायची व्याधी लावून घेतली नाही. सुविचार, शेरोशायरी, व्हिडीओजच्या लिंका पेस्टायला नेट खर्च केलं नाही, फार कुणाच्या पोस्टीवर कॉमेंटलो नाही, कुणाच्या वाढदिवसाच्या नोटिफिकेशनवर पहिली शुभेच्छा देण्यासाठी धापा टाकत गेलो नाही, स्वतःची तारीख दिली नाही त्यामुळे मी केलेलं तुला विश पण तू विसरलास हा आरोप झाला नाही. त्यामुळे शिष्ठ, स्वतः:ला समजतो कोण वगैरे अप्रसिद्धी फुकट मिळाली. 

आपल्याला कशावर लिहिता आलं ते अजमावता आलं. लाईक्स, कॉमेंट्सच्या संख्येने हुरळून जायला झालं, खट्टूही झालो पण ती पण एक फेज असते, ती अनुभवली. तर निरोप फार लांबवायचा नसतो, मजा जाते. थोडक्यात मजा, सो, गुडबाय फ्रेंड्स. 

जयंत विद्वांस  

-----

कुणाला वैयक्तिक वाटू नये म्हणून स्वतःवरच पोस्ट लिहावी म्हटलं. नवनीत गाईडनुसार अपेक्षित कॉमेंट्स खालीलप्रमाणे... 

काsssss?......., काय झालं?, बोललं का काही कुणी?, ;( 
नको जाऊस रे, पाहिजे तर गॅप घे पण परत ये, 
मिस यू, का असं?, 
......! 
जयंतराव, हे वागणं बरं नव्हं
 
न टाकलेल्या कॉमेंट्स.... 

गेला का? बरं झालं, नाहीतरी शिष्ठच होता. 
हा एकटाच लेखक, कद्धी म्हणून माझ्या चारोळी, कवितेला लाईक नाही करायचा नाहीतरी, घाण गेली. 
स्वतः:च्या पोस्टीवरच्या लाईक, कॉमेंट बघायला यायचा नाहीतरी फक्तं, करायचीयेत काय असली इथे, खोगीरभरती नुसती
कुठे राहवणार आहे, नाटकं उगाच, येईल परत 
अटेंशन सिकींग सिंड्रोम, दुसरं काय. 
हल्ली पोस्टीला कुणी विचारत नाही बहुतेक म्हणून घाऊक सहानुभूती गोळा करणं चाललेलं दिसतंय. 

..... 

यावर माझा मित्रं मन्या मराठे म्हणाला ते मला पटलं.... 

'माकडा, तू असलास काय किंवा नसलास काय, काही फरक पडणार नाही. फार्फार तर लोक चार दिवस मिस करतील. कुणासह जगता येतं तसच कुणाशिवाय जगण्याची सवय लवकर होते कारण आता ते माणूस नाही हे पक्कं माहित असतं. भा.रा.म्हणून गेलेत, 'जन पळभर म्हणतील हाय हाय', गोखले म्हणाले, 'रे तुझ्यावाचून येथले काही अडणार नाही'. तुझा प्रॉब्लेम काय आहे नेमका? एफबी काय, आयुष्यं काय, मी जातोय, मी जातोय असं बोंबलून सांगण्यात हशील नाही. कुणी तरी थांब म्हणावं, रडण्यासाठी खांदे गोळा करायला ठीक आहे पण त्यानी फार तर चार दिवस बरं वाटेल, इगो सुखावेल, कॉमेंट्स, लाईक्सच्या संख्येने कृतकृत्यं वाटेल पण निष्पन्नं काय? वपु म्हणाले होते, 'नाविन्यासारखी चटकन शिळी होणारी दुसरी गोष्टं नाही'. माणसाचा आफ्रिदी होता कामा नये. असंख्य पुनरागमनं हा चेष्टेचा विषय होतो. पुनरागमन कसं हवं? सगळी टीम पॅकरकडे गेल्यावर दहा वर्षाच्या गॅपनंतर एक्केचाळिसाव्या वर्षी परत ऑस्ट्रेलियाचा कप्तान झालेल्या बॉबी सिंप्सनसारखं. 

मुरली खैरनारसारखा माणूस इथून अचानक एक्झिट घेतो. ते काही आपल्या हातात नाही पण तरीही चुटपुट लागतेच की. अशी चुटपुट लागेल कुणाला असं कर काहीतरी करून जा इथे. पराकोटीचं दु:खं अबोल असतं. शब्दात व्यक्तं होत नाही ते. जग काय, एफबी काय इथे कुणीही तुम्हांला आमंत्रण दिलेलं नाही. तुम्ही आलात या, रमलात तर रमा, काही चांगल लिहिता आलं तर लिहा, चार लोकांना आनंद द्या. एक्झिट आहेच ठरलेली त्याचा गवगवा कशाला? 

..... 

तात्पर्य : मी गेलो काय, राहिलो काय, कुणाला फरक पडावा ही अपेक्षा नाही. इथे येताना संगम ब्रास बँड लावून वाजतगाजत आलो नाही मग जाताना उगाच फ्लेक्स लावायचा खर्च कशाला तो. (कितीजण अनफ्रेंड करतील तो आकडा कळवळा जाईल). ;) ;P 

जयंत विद्वांस 


  

Monday, 8 August 2016

चमक...

त्याचं खरं नाव श्रीनिवास दत्तात्रय मोघे पण आमचं गावं त्याला मयत्या बामण किंवा मयत्या भट म्हणतं. एवढं सुंदर नाव पण गावानी पार त्याची रया घालवली. दहावा, तेरावा, श्राध्द एकदा त्याच्या मागे लागलं ते लागलंच. शेजारच्या एखाद्या गावात नाईलाज म्हणून, अगदीच कुणी मिळत नाही म्हणून, क्वचित त्याला सत्यनारायण वगैरे मिळायचा. बाकी पैसा मिळवून देणारी वास्तुशांत, लघूरूद्र, शांती, बारशी, लग्नं ही भिक्षुकी त्याच्या नशिबात नव्हती, मिळालं एखादं काम तरी दुर्मिळ योग तो. एखाद्या कलाकारावर जसा एक शिक्का बसतो आणि दुस-या भूमिकेत त्याला प्रेक्षक स्विकारत नाहीत तसं काहीसं झालं होतं त्याचं. पण पितृपंधरवड्यात त्याला उसंत नसायची, बाकी कुणी गेलं तरंच काम त्याला. शेजारपाजारच्या चारपाच गावात पण तोच जायचा. मामलेदारासाठी लोक थांबतात तसे लोक त्याच्या येण्याकडे डोळे लावून असायचे अगदी. श्री अगदी मिटल्या तोंडाचा होता. मंत्र म्हणताना जे काय तोंड उघडेल तेवढंच. 

सव्वापाच फुटाच्या आसपास उंची, लख्ख गोरा रंग, कायम दाढी व्यवस्थित केलेली, शाईने भरल्यासारखे काळेभोर डोळे, पट्टीनी आखल्यासारखं सरळ नाक, भटजी असून पोट अजिबात न सुटलेला, सडपातळ शरीरयष्टी, कायम झिरो मशिन मारलेलं डोकं आणि मागे इंचभर शेंडी. श्री देखणाच होता. माझ्याच वयाचा तो. आम्ही दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो. नंदादीप जसा कायम तेवता असतो तशी त्यांच्याकडे जगण्यासाठीची ओढाताण कायम तेवती असायची. त्याचे वडील तालुक्याच्या गावाला प्राथमिक शिक्षक होते. चिमूटभर पैशात अजून एक थेंब पडावा म्हणून ते भिक्षुकीही करायचे. आमची दहावीची परीक्षा झाली त्याच वर्षी कांडर चावून त्याचे वडील गेले. नंतर मी मुंबईला शिकायला गेलो, श्री तिथेच राहिला. पंचवीसेक पोती तांदूळ निघेल एवढा शेताचा तुकडा, बारापंधरा आंबा, काजू, फणसाची झाडं, नारळ आणि स्वतःचं चि-यात बांधलेलं अनेक पिढ्या चालत आलेलं घर, एवढीच काय ती त्याची इस्टेट. त्याची आई सुशीला, ती बारमाही आजारी असायची. सतत खोकायची आणि हिरवं, पिवळं थुंकायची. जीव जात नाही म्हणून कंटाळलेली असायची ती कायम. खोकून कंटाळा आला की ती नशिबाला आणि देवाला शिव्या द्यायची.

श्री अभ्यासात तसा बरा होता. बारावी करून मग बी.ए.,बी.एड.करून शिक्षक व्हायचं होतं त्याला. आम्ही ब-याच वेळा या विषयवार नदीवर पाण्यात दगड मारत बोलत बसायचो. खूप त्रोटक बोलायचा तो पण नेमकं बोलायचा. 'सात वर्ष लागतील, पण मी बारावी झालो की करेन काही नोकरी, जमेल मला?'. 'जमेल रे, हा हा म्हणता दिवस जातील'. 'दहावीच्या सुट्टीत बघतो, तालुक्याला स्टेशनरीच्या दुकानात पार्ट टाईम'. 'अरे होईल सगळं नीट'. एखाद्या झाडाचं जसं बोन्साय होतं ना तसं याचं उलटं झालं होतं. लहान रोप असतानाच तो झाड झाला होता. डोळ्यात आणि डोक्यात सतत काळजी. तसाही त्यामुळे तो अबोलच असायचा पण वडील गेल्यावर तर श्री अजूनच मुका झाला. प्राथमिक शिक्षकाकडे किती पुंजी असणार. अकाली प्रौढत्व आलेला पंधराएक वर्षाचा श्री स्टेशनरीच्या दुकानात लागला खरा पण तिथे असा कितीसा पैसा मिळणार. मधेच शेतीची कामं, आईचं आजारपण, कायम पैशाची ओढाताण यातंच त्याची उमेद आणि वय दोन्ही नासून गेलं. त्याच्या वडिलांबरोबर जे भटजी होते त्यातल्या एकानी त्याला भिक्षुकी शिकवली म्हणून थोडं फार बरं झालं. वडील गेल्यावर दिवसाआड मिळणारं जेवण रोज मिळू लागलं. 

तो एकदा मयताचा विधी करायला गेला, मग कायम जातंच राहिला. त्यामुळे लोकांनी परस्पर तो शुभकार्याचा भटजी नाही हे ठरवून टाकलं आणि त्याचा उत्कर्ष थांबला. कुणाकडेही तो पैसे एवढेच द्या असं मागायचा नाही, गरीब लोकं दोन दिवस उशिरा का होईना पण आणून द्यायचे, प्रतिष्ठित, ऐपत असलेली माणसं एवढ्यात कोण मरणार आहे परत नाहीतरी असा धूर्त विचार करून निम्मेच पैसे त्याला द्यायचे, ते ही गड्याकरवी पाठवून. श्री कुणालाच काही बोलायचा नाही. माझ्या लग्नाला तेवढा तो मुंबईला आला होता. नाहीतर आईमुळे त्याला कुठेच जाता यायचं नाही. त्याला मुंबई दाखवायची असं मी गावाला गेलो की कायम बोलण व्हायचं. पण लग्नाच्या गडबडीत काही जमणं शक्यं नव्हतं. ते राहिलं ते राहिलंच. नंतर माझंही गावाला जाणं येणं कमी होत गेलं. एखादी वस्तू अचानक हरवावी पण अमुक एक ठिकाणी ठेवल्याचं आठवावं ना तसा श्री माझ्या आयुष्यातून कुठे आहे हे माहित असलं तरी हरवल्यासारखा झाला. गावाहून कुणी आलं तर उडत उडत त्याच्याबद्दल कळायचं. होळी, गणपतीला जाणंही कमी होत गेलं आणि मग पेन्सिलनी लिहिलेलं पुसट व्हावं तसा श्री ही पुसट झाला. 

परवा गावी गेलो होतो आठ दिवसांकरता. जमिनीचं काम होतं म्हणून. रोज संध्याकाळी श्री कडे जायचो गप्पा मारायला. आता मी पंचेचाळीशी पार केली म्हणजे श्री ही अर्थात तेवढ्याच वयाचा. काळवंडलेला वाटला जरा. डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसत होती. माझं पोट सुटलंय, तो मात्रं आहे तसा सडपातळ आहे अजून. काळभोर डोळे कधीकाळी चमकदार होते त्याचे खरंतर पण आता अगदी निस्तेज काजव्यासारखे झाले होते. 'ये रे, किती वर्षांनी आलास, बरं वाटलं, किती दिवस आहेस'. 'अरे, आत तर येऊ दे, जमिनीच्या कामासाठी आलोय, आहे आठ दिवस'. 'मग ये की रोज गप्पा मारायला, जेवायलाच येत जा इथे रात्रीचा, सकाळी जा आपल्या कामाला'. 'चालेल, पण तुला कशाला त्रास, दोन माणसांचा स्वयंपाक उगाच'. ' असू दे रे, आई गेल्यापासून मी एकटाच जेवतोय वर्षभर भुतासारखा, आणि भातामटी करायला काय कष्टं मोठे? येत जा, वाट बघतो', मग मी मुंबईला परतेपर्यंत जात राहिलो त्याच्याकडे. बोळा निघावा आणि तुंबलेलं पाणी मोकळं व्हावं तसा श्री बोलत होता आठ दिवस. 

'मला वर्षभर भात, भाकरीसाठी लागेल एवढा तांदूळ ठेवतो आणि उरलेला विकतो. आंब्या, फणसाचे, काजू, नारळाचे येतात थोडेफार पैसे आणि सटरफटर भिक्षुकी. चाललंय. तुला गंमत सांगतो, आईकडे चाळीसेक तोळे दागिने होते, तिला तिच्या आईने, सासूने दिलेले. मरायच्या आधी पंधरा दिवस मला कडीकोयंड्याचा कुलूपबंद पितळी डबा दिला आणि हे मोड म्हणाली. आयुष्यंभर पैसा नाही म्हणून औषधं कमी घेत राहिली, मेलीही नाही आणि जगलीही नाही नीट. मला मरू दे पण तिच्या औषधाला गेले असते सगळे तरी मला चाललं असतं. मी फक्तं हसत राहिलो बघ त्या दिवशी. मला खूप कीव आली तिची. कसला मोह पडतो रे एवढा सोन्याचा? सुनेकरता ठेवले म्हणावेत तर ते ही नाही. मी शिक्षक झालो असतो तेंव्हा मोडले असते तर. परत तेवढेच केले असते मी उमेदीने. या वयात कुठे विचारू तिला, का ठेवलेस दडवून म्हणून. कदाचित तिच्या उशिरा चूक लक्षात आली असावी. उपभोग घेणं सुद्धा नशिबात लागतं रे. दोनेक आठवड्यात गेलीच ती त्यानंतर'.  

'पण एवढ्या वर्षात कधी तिनेही माझ्या लग्नाचा विषय काढला नाही, मी ही नाही. आमच्या दोघांच्या तोंडातच दोनवेळा पडेल की नाही याची भ्रांत तिथे अजून एक तोंड आणि मग निसर्गनियमाने अजून नंतरची तोंडं कुठे  वाढवणार? आणि एकदा कुठलीही भूक मेली ना की ती कायमची मरते बघ. निदान चार नातेवाईक असतील तर विषय निघतो, कुणीतरी पुढाकार घेतो, इथे कुणीच नव्हतं. कोण विषय काढणार? आणि विचारून 'नाही' ऐकण्यापेक्षा काहीवेळा नसलेलं बरं असतं बघ. होते सवय. असो! कुणालाच सांगितलं नाहीये मी हे. सोनं मोडून बँकेत ठेवलेत पैसे. व्याज चांगलं येतं. भरपूर पुस्तकं आणलीयेत, ती वाचतो दिवसरात्रं. लोकांचा समज आहे माझं अवघड आहे एकूण, मी ही तो समज दूर करत नाही. अरे इतक्या वर्षांची सवय लागलीये, मन मारून, पोट मारून जगायची, पैसा उडवता येतंच नाही बघ'. मला फक्तं आवंढा आला. इथे रोजचे जगण्याचे क्षुल्लक अडथळे आम्हांला किती भयंकर वाटतात आणि इथे कुणाच्यातरी चिकटपणामुळे, विक्षिप्तपणामुळे आयुष्यं नासून जातं तरी चेह-यावर विषादाची सुरकुतीसुद्धा नाही.

शेवटच्या दिवशी तो म्हणाला, 'एवढा खीर वड्याचा सिझन मारला की येतो मुंबईस, सुट्टी काढ, चांगले टॅक्सीने फिरू सगळीकडे, खर्च सगळा माझा हं पण. वर्षातून एकदा तरी तुझ्याकडे येणार, सगळी मुंबई झाली पालथी घालून की मग दुसरं शहर बघू'.  'तू ये तर, आधी कळव फक्तं म्हणजे तशी सुट्टी टाकायला मला' असं सांगून मी निघालो. इतक्या वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच मला त्याच्या काळ्याभोर डोळ्यात विलक्षण चमक दिसली, वर्षातून चार दिवस सुट्टी घेऊन ती कायम ठेवणं माझ्या हातात निश्चित होतं, ते मी करणार हे नक्की. 

जयंत विद्वांस

खेळ न झालेल्या रविवारचा वृत्तांत...

(आमच्या खास वार्ताहराकडून...)

सतत पडत असलेल्या पावसामुळे आज एमसीजीवर खेळ होऊ शकला नाही. आमच्या प्रतिनिधीनी उपग्रहामार्फत केलेल्या हेरगिरीमुळे घराघरात नेमकं काय घडलं याचा वृत्तांत देत आहोत. या वयात पाय घसरणं चांगलं नाहीये अर्थातच त्यामुळे निसरड्या मैदानावर खेळ झाला नाही हे बरेच झाले. ज्यांना यायचंच नव्हतं त्यांनी समूह संचालक श्री.अजय मराठे यांना 'पाऊस असल्यामुळे येत नाही' असे मेसेजेस टाकले.

दत्ता मोरे घरातल्याघरात दोनच्या जागी तीन पळण्याचा सराव करताना आढळले. खालून थोडे पाय कमी करून घेता आले तर फरक पडेल असा विचार त्यांनी बोलूनही दाखवला. गेल्या दोनेक रविवारची नेत्रदीपक फलंदाजी आणि वृत्तांतातील कौतुक यामुळे आपण मोठ्या चेंडूऐवजी लहान चेंडू हातात धरून करिअर करायला हवं होतं याची चुटपुट त्यांना लागून राहिली. पण साईझ डज मॅटर. मोठे चेंडू सगळ्यांनाच आवडतात. प्रशांत शिरोडकर हे चारपाच गाद्या कडेला लावून झेलंदाजीचा सराव करताना आढळले. दहापैकी तीनवेळा गादीवर न पडता ते झेल घेण्यात यशस्वी झाले. केतन तेरेदेसाई हे एक प्रतिज्ञा पाठ करताना आढळले. 'क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. मैदानावरील सर्व खेळाडू माझे बांधव आहेत. मैदानावरच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या चिडखोरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी ज्या टीममध्ये आहे त्यातील खेळाडू आउट नाही असे सांगून त्यांचा मान ठेवीन आणि तरीही प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. मी ग्राउंडवर कमरेतून वाकण्याची आणि जलद पळण्याची प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे'. 

'गली'तले सुप्रसिद्ध क्षेत्ररक्षक मनोज गोडबोले हे घरात पॅसेजमध्ये झेलांचा सराव करताना आढळले. नंतर आरशासमोर उभे राहून उत्तम फेक करूनसुद्धा धावचीत असूनही न दिल्यास राग, नैराश्य काबूत ठेवण्यासाठी त्यांनी योगसाधना केली. अविनाश रहाळकर एक ते शंभर आकडे न चुकता हाताच्या आणि पायाच्या बोटांवर मोजण्याचा सराव करत होते. उदा.साधारण अंकगणितात तीन रन्स काढल्यावर छत्तीस नंतर एकोणचाळीस होतात पण त्यांच्या हिशोबात ते चाळीस किंवा एक्केचाळीस होत होते. त्यांनी अजय मराठे यांना फोन लावल्यावर त्यांनी 'तू मगाचचे दोन धरले नाहीत, त्रेचाळीस होतात' असं सवयीने सांगून टाकलं. आपली अफरातफर खूपच कमी आहे याचा अंदाज आल्याने रहाळकर आनंदी झाले. मिहीर भागवत, समीर व्होरा, आकाश मेहता यांनी खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं आणि 'पाऊस पडतोय, खेळ काही होणार नाही, चला पैसे तरी छापून येऊ' असं म्हणून ते तिघेही आपापल्या घरातून घराबाहेर पडले. 

नितीन करमरकर यांच्या घरी मात्रं अत्यंत वेगळं चित्रं होतं. आजूबाजूची सगळी लहान मुलं त्यांच्याभोवती गोलाकार बसली होती.  स्वतः:चे प्रत्येकी तीन ते चार धावचीत, यष्टिचीत, झेल आणि सामना जिंकून देणा-या खेळ्या यावर ते स्वतः भाष्यं करत होते. दर वीस मिनिटांनी घरातला २०१४ साली आणलेला व्हॉलीनीचा स्प्रे जेमतेम फवारणी केल्यासारखा ते खांद्यावर मारत होते. एका मुलानी 'काका, गेले चार महिने आम्ही हेच ऐकतोय, खरे किस्से सांगा ना काही' म्हटल्यावर त्याला त्वरित घराबाहेर काढण्यात आले आणि याला परत बोलावू नका रे परत असं म्हटल्यावर इतर मुलं पण लगेच 'काका आम्हांला पण काढा ना घराबाहेर' असं म्हणत पळून गेली. मयुरेश बुधकर इंग्लंडसारखं वातावरण असल्यामुळे सतत ग्लास, बर्फ, स्कॉचची बाटली शोधत होते. बायकोनी फक्तं 'बघितल्यावर' त्यांनी 'अडुळसा कुठे ठेवलंय गं' असं विचारत बाजू सावरून घेतली. 

रोहित दणाणे आणि प्रविण देवधर घरात टोलेजंग षटकार मारायचा सराव करताना आढळले. साधारण चारसहा कपबश्या, दोन डबे आणि एक एलईडी बल्ब जमिनीवर आल्यामुळे रोहित दणाणे नंतर दरवाज्याच्या बाहेर उकिडवे बसल्याचे दिसले. सुशांत पाटील यांनी जुने दिवस आठवून त्याला स्वतः:चा डबा जिन्यात खायला दिला. चारनंतर घरात घेणार आहे असं तो म्हणाल्याचं पाटील यांनी सांगितलं. देवधर यांना झालेल्या मारहाणीच्या जागा ते गरम पाण्याची पिशवी घेऊन शेकत बसले होते. पुढचा आठवडा त्यांना कंपनी कँटीनमध्ये जेवायला लागणार असल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधीला स्काईपवर सांगितलं. नितीन अंमलदार आणि त्यांचे चिरंजीव यांचं लुटुपुटुचं भांडण चालू होतं. 'रनाउट' ही एकांकिका त्यांनी सादर केली. मुलानी शेवटी हात टेकले आणि 'बाबा, नेहमीप्रमाणे तू जिंकलास' असं म्हटल्यावर नाटक संपलं. जेवताना आणि जेवण झाल्यावर फॉर अ चेंज म्हणून ऑफिस ऐवजी घरी वामकुक्षी घेताना पण ते बॅट घट्ट धरून झोपले होते. 

श्री.अजय मराठे खेळ न झाल्यामुळे खट्टू होऊन साश्रू डोळ्यांनी खिडकीत उभे होते. डॉ.मनोज गद्रे यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून ते करुण दृष्यं पाहून त्वरित छत्री घेऊन अजय मराठे यांच्या घरी प्रयाण केले. एवढया लांबून भरलेले डोळे दिसत असतील तर चार फुटांवरून त्यांना रनाउट दिसला नसेल का? पण त्यांच्या गरीब स्वभावाचा फायदा घेऊन काही लोकांनी त्यांना मैदानावर बोलू दिलं नाही हा ताजा प्रसंग निंदनीय आहे. गद्रे यांनी फोन लावून हिंदीतून दोन पोहे आणि दोन कॉफी याची ऑर्डर दिली आणि 'मैदानावरील वाढती असहिष्णूता आणि त्यावरचे उपाय' यावर त्यांनी चर्चा केली. अजय मराठे यांनी एटीकेट्स न पाळता सलग चार जांभया दिल्यामुळे गद्रे पोह्यांचा शेवटचा घास घेऊन घरी गेले.  

नंतर उपग्रह श्रीश्रीश्री रवी उटगीकर यांच्या घरावर स्थिर करण्यात आला. पेपर वाचून झाल्यावर सारसबागेतल्या स्त्रीभक्तं बघायच्या राहिल्याचा खेद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. त्यांनी फक्तं आजची सुट्टी कशी घालवायची याची स्ट्रॅटेजी ठरवूयात म्हटल्यावर घरात एकदम गडबड उडाली. मुलानी अभ्यासाची पुस्तकं काढली, मित्राला फोन लावला आणि कॉल लागलेला नसतानाही 'मी येतोय तुझ्याकडे' म्हणून तो घाईघाईने घराबाहेर पडला. बायको किचन मध्ये गेली आणि डॉगीनी पळत येऊन भिंतीवर तीनचार वेळा डोकं आपटून घेऊन तो निपचित पडला. त्वरेने उटगीकर त्याला घेऊन (डॉगीचे) फॅमिली डॉक्टर श्री. विनायक लिमये यांच्याकडे गेले. उटगीकर यांनां बाहेर थांबायला सांगून लिमये यांनी डॉगीच्या कानात 'अरे दुस-याचं दु:खं बघावं, प्राजमधला स्टाफ प्रत्येक रविवार स्वातंत्र्यदिन असल्यासारखा एन्जॉय करतो, त्यांना सहा दिवस मानसिक त्रास असतो, तुला तर एकंच दिवस' असा डोस दिला. डॉगी बराच वेळ त्यांच्या खांद्यावर अश्रू ढाळून शेवटी उठला. प्रिस्क्रिप्शनमध्ये 'स्ट्रॅटेजी' हा शब्दं पुढचे चार आठवडे घरात उच्चारू नये, एवढंच पथ्य पाळण्याचं त्यांनी लिहून दिल्याचं कळतं. 

मंदगती गोलंदाज नंदू बापट घरात आपण ज्या टीममध्ये आहोत त्यांना जिंकायला समजा तीन धावा हव्यात तर झेल कसा नैसर्गिकरित्या सोडावा, चेंडू पायातून मागे कसा जाईल आणि संघ विजयी होईपर्यंत चेंडू कसा थ्रो करू नये याचा सराव करताना दिसले. चेहरा अत्यंत निरागस, निष्पाप वगैरे दिसण्यासाठी त्यांना अतोनात कष्ट पडले असावेत कारण चेह-याचे स्नायू दुखावल्यामुळे त्यांनी गालाला शेवटी आयोडेक्स लावलं. दुसरे अतिमंदगती गोलंदाज जयंत विद्वांस यांनी त्यांना फोन करून चेंडू अजून कसा वळवता येईल (तुझा शेवटचा कधी वळला होता? इति नंदू बापट), मिहीरच्या वेगाला आपण किती साली गाठू शकू, चंदू खिरीड यांचा आवाज नेमका कुठून येतो, त्यानी खरंच वेग वाढतो का वगैरे विषयांवर चर्चा केली. सर्वात शेवटी नंदू बापट यांनी गोलंदाजीचं मर्म सांगितलं, 'एमसीजीवर बॉल मागे गेला पाहिजे बॅट लागायच्या आधी, बाकी चेंडू वळणे, फ्लाईट देणे, (बॉल) कट करणे, चेंज ऑफ पेस या सगळ्या अंधश्रद्धा आहेत'. 

(सदर वृत्तांत हा आमच्या खास प्रतिनिधीकडून आलेला आहे. त्यामुळे काही वाद निर्माण झाल्यास संपादक त्याला उत्तर देण्यास बांधील नाहीत. प्रतिनिधीचे नाव गोपनीय आहे तरी चौकश्या करू नयेत)

जयंत विद्वांस

जास्तीत जास्ती काय होईल...

जे आपलं क्षेत्रं नाही तिथे उडी टाकायला हवी, मराठी माणूस इथे मागे पडतो धंद्यात, वगैरे ऐकायला ठीक आहे, आचरणात आणताना फाटते. बाबांच्या बरीच वर्ष सहवासात असलेला एक अण्णा होता. मणी त्याचं नाव. अतिशय गोड बोलणार. त्यानी बाबांना भरीला घातलं, आपण हॉटेल चालवायला घेऊ म्हणून. आम्ही व्यवहारी अपूर्णांक. लेबर, मेहनत त्याची, पैसे आम्ही लावायचे, पन्नास टक्के भागीदारी, असला भारी करार. वारज्याचा आताचा फ्लायओव्हर ओलांडला की शिवण्याला जाताना डाव्या हाताला एक हॉटेल होत. ब-याच जणांनी ते चालवायला घेतलं आणि तीनचार महिन्यात बंद केलं होतं. त्यामुळे मालक एकदम सेंटी झालेला कारण त्याच्या आईचं नाव होतं हॉटेलला. आम्ही मालकाकडे गेलो ऍग्रीमेंटसाठी, त्याच्याकडे अनंतवेळा केल्यामुळे मजकूर छापून तयार होता. वीस हजार डिपॉझिट आणि महिना तीन हजार भाडं (१९९५), तीन वर्षाचा करार. ऍग्रीमेंटच्या शेवटी एक पॉईंट होता. हॉटेल मधेच बंद केल्यास तीन वर्षाचं भाडं भरावं लागेल. 

ओपनिंग झालं, स्वप्नं बघून झाली. साताठ वेटर्स, दोन आचारी. कटलरी, डोश्याकरता पाच एम.एम.चं एम.एस.शीट सहाफूट बाय दोन फूट लोखंडी स्टॅन्डवर वेल्ड करून आणलं, पुढे ते बरीच वर्ष सिंगल बेड म्हणून वापरलं. फ्रिज होताच. बाकी भांडीकुंडी आणली. किटल्या आणल्या. लगेच आजूबाजूच्या वर्कशॉप्समधून चहाचा रतीबही मिळाला दोनवेळचा. फुलय्या म्हणून मेन आचारी, मणीचा माणूस. संध्याकाळी पुढे कढई लावून वडापाव. सुरवात एकदम झकास होती. पण जेम्स हॅडली चेसच्या स्टो-यात कशी माशी शिंकते तसं झालं. मणीची बायको इमर्जन्सीमधे बाळंत झाली. ती गावाला जाणार असं ठरलेलं पण जुलाब लागलेला माणूस आणि पोटुशी बाई सारखीच, एकदा कळ आली की विषय संपला. मलाही कामधंदा नव्हताच. तो म्हणाला, दोनेक महिने सांभाळशील का, घरी कुणी नाहीये माझ्या. तो आणि बायकोच फक्तं. गल्ल्यावर बसायला माझी कशाला ना असेल, तर मी जायला सुरवात केली हौसेने. सकाळी सातला हजर, सुटायला रात्री दहा. 

मजा वाटायची. बेल मारून किती रे म्हणायला. संध्याकाळी दीडेकशे वडापाव जायचे. पहिल्या दिवसापासून मी दोन रुपयाच्या कोथिंबिरीपासून हिशोब ठेवायला सुरवात केली तिथे माशी शिंकली. रोज संध्याकाळी मला अंदाजे प्रॉफिट कळायचा. दोनेक महिने बरे गेले. मग मणी कारणं सांगून आलाच नाही कधी. आचारी त्याचेच. वेटर्स आणि मालक मी, महाराष्ट्रीयन. सकाळी नाश्ता, दोनवेळचं जेवण, चहा फुकट असायचा. किती खावं माणसानी? एक कॅरॅक्टर सकाळीच दोन पाव पॅटिस, दोन वडा सांबार, एक उत्तप्पा इतका ऐवज हाणायचा. त्यांचा नाश्ता बघूनच मला आपण गाळात जाणार हे दिसायचं. तरीपण मी शांत. अण्णा लोकांचं प्लानिंग सुरेख. मला जमणार नाही बसायला म्हणून मणीनी अंग काढून घेतलं. एक दिवशी पगार घेऊन सहा वेटर्स, एक असिस्टंट आचारी गायब झाले. उरलो मी, फुलय्या, एक पोरगा आणि एक म्हातारा वेटर. तो एकदा चहा घेऊन गेला की तासभर तिकडेच. बारा पंधरा तास एकटा फुलय्या तरी काय काय करणार? तो वेटर बाहेर गेला की मी वेटर कम फडकंवाला पो-या कम कॅशिअर. तरी असे दोनेक आठवडे निघाले. 

तो पो-या पण भारी होता. एक माणूस टेबलावर बसलाय. 'चहा दे रे', 'किती', 'एक'. असे डायलॉग रोज व्हायचे. मला सांगा एक माणूस दोन चहा मागवेल का? मी त्याला सांगितलं तरी त्याच्यात काही बदल झाला नाही. एक दिवशी फुलय्यानी सांगून टाकलं, नाही जमणार म्हणून. आता आचारी कुठून आणायचा? मणीचं काहीच अडकलेलं नव्हतं. मग एका शनिवारी मी आणि फुलय्यानी शेवटचे वडापाव विकले आणि तो आठला गेला. पाव देणारा साडेनऊ दहाला यायचा पैसे घ्यायला. मी सगळं बंद करून थांबलो. त्याला खूप वाईट वाटलं. फक्तं त्याचे पैसे देण्यासाठी मी दोन तास थांबलो त्यामुळे त्याला खूप भरून आलं. 'कोई कोई जगा ऐसाच रह्यता साब, चलताच नही, मिलेंगे कभी फिर, पैचानोगे ना?' असं म्हणून तो गेला. दुस-या दिवशी मी टेंपोतून सगळं सामान घेऊन आलो. आता प्रश्नं मालकाला जाऊन सांगायचं. तो बिल्डर होता. त्याच्याकडे मी आणि बाबा लुनावर गेलो. त्याच्या घराकडे वळायच्या आधी थांबून काय काय बोलायचं ते ठरलं. बाबांना पैशाचं टेंशन आलेलं. बीपी वाढलं असावं. म्हटलं जाऊ तर, एवढं काय घाबरायचं, जास्तीत जास्ती काय होईल ३३ महिने x तीन हजार वजा डिपॉझिट वीस हजार द्यावे लागतील. 

त्यानी खूप थयथयाट केला. एग्रीमेंटप्रमाणे मी वागणार वगैरे चालू झाला. ट्रूथ इज अ शॉर्टकट. आम्हांला कसा अरबी हॉर्स लागलाय ते त्याला सांगितलं. मग जरा निवळला तो. पाच त्यानी दिलेच नाहीत, पंधरा पाच पाच करून दिले त्यानी दोन वर्षात. केवळ त्या माणसाचा चांगुलपणा आणि आमचा खरेपणा यामुळे फटका बसला नाही. सामान आणलं होतं ते पैसे द्यायचेच होते. एक नविन अनुभव पंचवीसेक हजारात गाठीशी आला. तेंव्हापासून दोन गोष्टी शिकलो. खरं बोललं की समोरच्याला अपील होतं आणि जास्तीत जास्ती काय होईल याच्या शक्यता कळल्या की तोटा किती ते कळतं मग तो भरून कसा काढायचा याचं प्लॅनिंग करता येतं. तसा मी दीर्घद्वेषी आहे. माझे पैसे ब-याच जणांनी बुडवलेत पण नाही म्हणता येत नाही त्याला काय करणार. त्यापैकी एकानी त्याच्या प्रॉब्लेम्समुळे जीवनयात्रा संपवली, मरणान्ती वैराणी. बाकी दोन आणि मणी कधी चुकून तावडीत आले तर मी सोडणार नाही एवढं निश्चित. बहोत मजा आयेगा खेलका. 

जास्तीत जास्तं काय होईल, लोक मला खुनशी म्हणतील, म्हणू देत. व्हल्चर इज अ पेशंट बर्ड अँड आय लाईक टू वेट. ;) :) 

जयंत विद्वांस 

शिवरंजनी...

'थोडा है थोडेकी जरुरत है' हे गाणं' मला फार आवडतं. कितीही मिळालं तरी माणसाची ओढ संपत नाही. 'अजून' या शब्दाला मरण नाही. जगणं, खाणं, पैसा, संपत्ती, इंद्रियसुख, सत्ता 'अजून' हवी असते. व्हिडिओकॉनचे धूत म्हणाले होते, 'कितीही मोठं घर असलं तरी एक खोली कमी पडते आणि पगार कितीही असला तरी नेहमी हजार रुपयांनी कमी पडतो'. कोंड्याचा मांडा करून जगणारी पिढी आता दुर्मिळ प्रजातीत मोडेल. कर्ज उपलब्ध आहे म्हणून घेणं वाढलं आणि नंतर पर्यायाने देणं वाढलं, गरजेसाठी घेणारे कमी झाले. आहे त्यात सुखी राहणं याकरता कसब लागतं. आहे म्हणून उधळण केली तर छानच दिसते की, पण असलं तरी मोजकं निवडून पण काही सुंदर करता येतं. माझी आजी एक वाटी चक्का होईल एवढ्याच दह्याला फाशी द्यायची आणि फडक्याला बोटं पुसावीत तेवढं जेवताना वाढायची सगळ्यांना, आता चार किलो आणून आंबे, सुकामेवा घातलात तरी तशी चव येणार नाही. सात शुद्ध स्वर, चार कोमल आणि एक तीव्र असा डझनभर ऐवज आहे म्हणून उधळण न करता निगुतीने कसं करायचं हे भूप आणि शिवरंजनीत बघायला मिळेल. 

भूप, शिवरंजनी आणि सामान्य माणसाचा खिसा यात साम्यं काय तर तिघातही 'म' 'नी' नाही, भूपात शुद्ध गंधार आणि शिवरंजनीत कोमल एवढाच, काय तो फरक. जुन्या लॉईड, रिचर्ड्सच्या विंडीज टीममध्ये एकटाच गोरा असलेला लॅरी गोम्स उठून दिसायचा तसा इथे सगळ्या शुद्ध स्वरातला कोमल गंधार लॅरी गोम्स सारखा आहे. शिवरंजनी हा अतिशय करूणरस ओतणारा राग आहे. रागात, दु:खात माणूस जसा तिरमिरत निघतो तसं इथे आहे. काही वगळल्याची भावना या 'रागा'ला पण होत असावी का? दुवा तोडावा तसं सारेग नंतर म कडे दु:खी नजरेने बघत पुढे जायचं आणि नंतर नी ला टाटा करून जावं लागत असल्यामुळे खंतावलेला राग असावा का हा? मोजक्या स्वरात असल्यामुळे याच्या सुरावटी कदाचित लवकर ओळखता येत असाव्यात किंवा त्यातल्या चाली सारख्या वाटत असाव्यात.

वाटव्यांची दोन गाणी सापडली शोधता शोधता या रागात, नावडीकरांनी म्हटलेलं 'रानात सांग कानात' आणि वाटव्यांनी म्हटलेलं 'वारा फोफावला', अजूनही असतील. वर्तुळाकार चेह-याचे नावडीकर आम्हांला मराठी शिकवायला होते सहावीला पण ते भावगीत गायक आहेत हे कुठे तेंव्हा कळायला. ते भावगीत गायन मागेच पडलं आता. एखाद्या अल्बमच्या जोरावर आणि दोनचार तुरळक हिट गाण्यांवर जगणारे गायक आले. सगळी बत्तीशी दाखवून, खूप त्रास होत असल्यासारखी तोंडं करून, बद्धकोष्ठ झाल्यासारखे हावभाव करून, शब्दं थुंकल्यासारखे बाहेर फेकणारे गायक आता जोरात आहेत. तिस-या आघाडीचं सरकार जितके दिवस टिकायचं तेवढे दिवस त्यांची गाणी कानावर पडतात म्हणजे तशी व्यवस्था असते. पेटीच्या मागे बसलेले तोळामासा वजनाचे वाटवे कुठलाही आव न आणता भाव असलेलं गीत गायचे. माणिक वर्मांचं 'सावळाच रंग तुझा' त्यातलंच. एक धागा सुखाचा' वर मी मागे लिहिलं आहे त्यामुळे परत इथे लांबी वाढवत नाही. त्या हातमागाच्या ठेक्यावर गाणारे हताश राजा परांजपे, गदिमांच्या शब्दातलं जीवनसार आणि बाबूजींचा आवाज असा सगळा तो सुरेल योग आहे. जोगांनी संगीत दिलेलं 'बाजार फुलांचा भरला', निसर्गराजा ऐक सांगतो' हे संवादगाणं, भीमसेनजींचं 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा', राम कदमांचं 'दिसला ग बाई दिसला' आणि अतिशय सुंदर ठेका असलेलं हृदयनाथ मंगेशकरांचं आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे सगळी शिवरंजनी मधली गाणी आहेत.


'बाबुल मोरा' लिहिणा-या बहादूरशहा जफरचं 'लाल किला' मधलं रफीचं 'न किसकी आँख का नूर हू' या रागातलं सुंदर गाणं आहे. वैषम्यं, विफलता, हताशपणा शब्दात तर आहेच पण चालीत पण आहे. रफीची यातली अनेक गाणी  मला सापडली. 'गझल' मधलं 'रंग और नूरकी बारात किसे पेश करू', 'सूरज'मधलं 'बहारो फूल बरसाओ', 'ब्रह्मचारी'मधलं 'दिलके झरोकोमें तुझको बिठाकर', लता बरोबरची तीन 'प्रोफेसर' मधलं 'आवाज दे के हमे तुम बुलाओ', 'जनम जनम के फेरे मधलं 'जरा सामने तो आओ छलिये' आणि अंजाना'मधलं 'रिमझिमके गीत सावन गाये', लताची पण अनेक लोकप्रिय गाणी आहेत यात - 'जंजीर'मधलं 'बनाके क्यू बिगाडा रे', घुंघट'मधलं   'लागे ना मोरा जिया', 'तुम्हारे लिए' मधलं जयदेवचं 'तुम्हे देखती हूँ, तो लगता है ऐसे', 'एक दुजे के लिए'चं 'तेरे मेरे बीचमें', 'मेहबूब की मेहंदी मधलं 'जाने क्यू लोग मोहब्बत करते है', 'आँखें' मधलं 'मिलती है जिंदगीमे, मोहब्बत कभी कभी', लता मुकेशचं 'संगम'मधलं 'ओ मेरे सनम'. लताचं आणि किशोरचं एक टँडम आहे 'मेहबूबा'चं 'मेरे नैना सावनभादो, फिर भी मेरा मन प्यासा', करूणरस तर यात दिसतोच पण हॉन्टेड मटेरिअल पण यात आहे. जुन्या 'बीस साल बाद'चं लताचं 'कही दीप जले, कही दिल' पण यातलंच आहे. 'जिस देशमें गंगा बहती है'मधलं अप्रतिम 'ओ बसंती पवन पागल' यातलंच आहे. डोंगर कुठला आहे माहीत नाही तो पण तो डोंगर आणि पद्मिनी छान दिसते या गाण्यात.


बाकी मग 'साथी'मधलं मुकेश, सुमन कल्याणपूरचं 'मेरा प्यार भी तू है' आहे. शम्मीकपूरची नक्कल केलेल्या राजीव कपूरच्या पदार्पण चित्रपट 'एक जान है हम'चं टायटल सोंग 'याद तेरी आयेगी' आहे, अन्वर, शब्बीरकुमार, मोहम्मद अझीझ भाग्यवान माणसं, हिमेश रेशमियाच्या तुलनेत खूप बरी म्हणा, नाकात म्हणूनही, केवळ रफीची नक्कल म्हणून ही माणसं चालली. 'मर्द'मधली गाणी(?) ऐकून अझीज आणि शब्बीरकुमारनी कान मेण ओतून बंद केले असते. प्यार झुकता नही'चं शब्बीर लताचं 'तुमसे मिलकर ना जाने क्यू' याच रागात आहे. एरवी नाक मुरडणा-या गायिकेला हे गेंगाणे आवाज का खटकले नाहीत याचं आश्चर्य वाटतं. 'कर्मा'चं किशोर कविता कृष्णमूर्तीचं 'ना जैय्यो परदेस' यातंच आहे. 'प्रेमरोग'चं 'मेरी किस्मतमें तू नही शायद' यातलंच आहे. वाडकर लागले की मी गाणं म्यूट करतो. कुठलंही गाणं त्यांच्यावर चित्रित झालंय असंच गातात ते, हिरो ओळखता येणार नाही तुम्हांला. एक अपवाद, 'सत्या'चं 'सपनेमें मिलती है' पहिल्या फटक्यात आवडलं होतं मला. माधुरीला हिट एन हॉट करणारं 'बेटा'मधलं 'धक धक करने लगा' पण यातलंच आहे.


वेळ झाला की कधीतरी बैजवार 'मुकद्दर का सिकंदर'वर लिहीन. त्यातली सगळी गाणी सुंदर होती. त्यातलं 'ओ साथी रे' शिवरंजनीत आहे. सात विभागात निवड झाल्यामुळे असेल एकही फिल्मफेअर नव्हतं याला. अतिशय सुंदर व्यक्तिरेखा त्यात छोट्या छोट्या तपशिलांनी उभ्या केल्या आहेत. राखीला मनोमन चाहणारा, मालकीण म्हणून तिच्याबद्दल आदर वाटणारा अमिताभ. त्यानी तिकिटं घेतलेली राखीला आवडलेलं नाहीये, त्याच्या रस्त्यावर गाण्याबद्दल ती कुचकं बोलून माईक त्याच्याकडे देते. मितभाषी सिकंदर नंतर जे बोलतो ते त्या गाण्यासाठी परफेक्ट इंट्रो आहे.डबडबलेल्या डोळ्यांनी गाणारा अमिताभ, काहीही माहीत नसलेला विनोद खन्ना आणि कोड्यात पडलेली 'मेमसाब' राखी. जोहराजानचा रोल भावखाऊ होताच पण राखीचा रोल ही छान होता त्यात. विविध भावना तिनी काय सुंदर दाखवल्यात. परिस्थिती पालटल्यावरची गंभीर, विनोद खन्नाचं आहे असं समजून मिळालेल्या पत्रानंतर झालेला आनंद, शेवटी मेमसाबला झालेला उलगडा. बाई एखाद्याचा तिरस्कार कसा करते हे बघायचं असेल तर तिची मेमसाब बघावी यातली. 


आणि आता मला या रागात आवडलेलं शेवटचं गाणं. 'मेरा नाम जोकर' यशस्वी न होण्याचं एक कारण जसं अपप्रचार होतं तसंच थकलेला आर.के.हे पण होतं. आधीच तो सहा वर्ष चालू होता, लेंग्दी होता, त्याचं वय जाणवतं. पहिले दोन प्रेमभंग फार वरवरचे वाटतात त्यात मला तरी. सगळ्याजणी एकेक करून आयुष्यातून निघून गेल्यावर आलेलं एकाकीपण पद्मिनी गेल्यावर जास्ती जाणवतं. सिमी ग्रेवालच्या सोडून जाण्यात दु:खं फार नव्हतं, ते होणारच होतं, मुळात ते एकतर्फी प्रेम होतं. रशियन सुंदरी मरीना परत जाण्यात ती परदेशी आहे हे मनाला समजवायला कारण होतं पण प्रसिद्धीसाठी स्टेपिंग स्टोन करून पुढे गेलेली पद्मिनी जरा जास्तीच जिव्हारी लागते. अंधारात डोळयांवर गॉगल लावून बसलेला आर.के., त्याच्याजवळ राहिलेला 'तो'च, मागे ती रंगीत जळमटं आणि त्याच्या हातातला तो छोटा जोकर तो खाली सोडतो, तो चालतो हे तेंव्हाच कळतं. या गाण्याची चाल आर.के.चीच होती. एकटेपण फार भीषण असतं. हात विस्फारून सगळीकडे धावणारा आर.के. डोळे ओलसर करतो. सोडून गेलेली माणसं त्याला बोलावतायेत असा निव्वळ भास आणि त्या रंगीत जळमटलेल्या एकांतातून तो आरश्याच्या तुकड्यात दिसणा-या पद्मिनीपाशी येऊन थबकतो. 'जाने कहां गये वो दिन'....


आयुष्यं जगावं लागतंच. सगळी सप्तकं, साती सूर लाभतीलच असं नाही. भूप, शिवरंजनी सारखं काही वगळून तुटपुंज्या स्वरांचं काही नशिबात आलं तरी त्यातून स्वर्ग निर्माण करता यायला हवा. आनंद महागडा गोल्फ खेळून पण मिळतो आणि पत्त्यांचा बंगला करून पण मिळतो. शेवटी तात्पर्य काय, प्रत्येकाच्या पेटीचे सूर निराळे. काहींच्या काही स्वरपट्ट्या रिकाम्या असल्या म्हणजे रुसायचं नसतं. आपल्या आवडीची सुरावट त्यावर वाजत नसेल तर ते दु:खं जोपासण्यापेक्षा जी वाजतीये ती ही वाईट नाही हे समजून घेण्यात जास्ती आनंद आहे. :)


जयंत विद्वांस

Wednesday, 3 August 2016

त्रास...

संक्रांत, अक्षय्यतृतीया, गुढीपाडवा, नवरात्र, दसरा, दिवाळी या काळातल्या पेपरच्या गुळगुळीत कागदावरच्या पुरवण्या मी बघत नाही. त्रास होतो. एकाचढ एक देखण्या बायका सुळसुळीत साड्यातून अंगावर सोन्याचा पत्रा मारल्यासारखे सोन्याचे, हि-यामोत्याचे दागिने घालून चमकत असतात. डोळ्यातून, नाकातून, अंगातून व्हायरल फिव्हर झाल्यासारख्या गरम वाफा काढतात. आवाक्याबाहेरची इलेक्ट्रॉनिक उत्पादनं डिस्काउंटेड किंमतीलाही महाग वाटतात, एकूणच त्रास आहे सगळा. आजवर चुक्कूनसुद्धा मी बायकोला ही साडी किंवा हा दागिना तुला चांगला दिसेल असं म्हटलेलं नाही. वेळ काय सांगून येते का मला सांगा, आपण नेहमी सावध असावं.

सकाळी जरा कुठे म्हटलं फेबु बघावं तर साड्यांचा सेल लागल्यासारखे फोटो दिसायला लागले. I am an Indian lady n I love to wear a saree अशा ओळीनी सुरवात असलेला पॅराग्राफ आणि खाली पावडर बिवडर लावून काढलेले देखणे फोटो. तो पॅराग्राफ कुणी वाचला असेल असं वाटत नाही. खाली असलेला फोटो बघायचा की वरचं इंग्रजी वाचणार माणूस. एरवी डिपीत ब-या वाटणा-या बायका एकदम सुरेख वगैरे दिसायला लागल्या. बरं त्यात एकमेकींच्या माना टयागल्यामुळे फोटोला कमतरता नाही. जीनी आधी टाकलाय त्यापेक्षा सरस साडी निवडायची वगैरे चुरस असणार. गॉर्जसचं स्पेलिंग मी आपलं गुगलवरून कॉपीपेस्ट करून ठेवलं पण म्हटलं सगळ्यांना गॉर्जस कसं टाकणार. एकीला टाकावं तर दुसरीला वाटणार, 'कॉमन कॉमेंट आहे, मग मरू दे, मला वाटला मलाच आहे' म्हणजे जरा कुठे प्रयत्नं करावेत इनबॉक्सात तर तिथे पत्ता कट होणार. 

अप्रतिम, सुंदर, गॉर्जस, क्या बात है, मस्तं यापुढे माझी गाडी जाईना. बरं एकीला अप्रतिम लिहिलं आणि एकीला गॉर्जस लिहीलं की रुसवे फुगवे होण्याची शक्यता म्हणजे परत लाईक्स, कॉमेंट्सची वानवा. कसं करावं माणसानी. सेव्ह करावेत म्हटलं फोटो तर मेमरी शिल्लक नाही. घरी चुकून एवढ्या देखण्या बायका एकदम दिसल्या फोनात तर अन्न तुटणार. 'माझा कधी फोटो सेव्ह करून निदान वॉलपेपर तरी ठेवलाय का?' 'त्यातल्याच एकीला सांग डबा द्यायला, चार दिवस तरी टिकेल का बघ, फोटो सेव्हतोय मोठा'. त्यात तिनी वाचावं कुठे सुंदर, अप्रतिम लिहिलेलं म्हणजे संपलं. 'मला गजरा तरी आणलास का मधे एवढी पैठणी नेसले तेंव्हा'. 'अगं लक्षात नाही राहिलं'. 'कसं राहील? फोटो बघण्यात वेळ जातोय ना एफबीवर'. 'पण आठवण केली असतीस तर काय बिघडलं असतं?' 'आठवण केल्यावर काय कुणीही आणेल, मला पाय आहेत की आणि, मी नाही का जाऊन आणू शकत पण कौतुक लागतं'. म्हटलं ना त्रास आहे नुसता. 

पण खरं सांगू का बाई साडीतच सुंदर दिसते. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, वहिदा रेहमान, नूतन, रेखा, स्मिता पाटील, विद्या बालन किती सुंदर दिसतात साडीत. सुंदरता बघणा-याच्या नजरेत असते म्हणतात. पण फेबुवर कसं कळणार म्हणून कॉमेंट टाकतात. पण खरी कॉमेंट किंवा पावती एकंच. बाई समोर साडी नेसून उभी आहे. ती अपेक्षेने आपल्या माणसाकडे बघते तेंव्हा त्याच्या डोळ्यात तिला ते अपेक्षित असतं. तिथे शब्दांची गरज नसते. ती नजर एकदा मिळाली की ती मनातल्या मनात गिरकी घेते आणि मग तिला सुखावलेली होईन वावरताना बघावं. :) त्या आनंदाला मोजता येत नाही. 

झुक्या पुरुषवर्गाचा एवढा विचार करेल असं वाटलं नव्हतं. जरा चारपाच देखणे फोटो निवडून गप्पा सुरू करायला हव्यात. नोकरी काय छोकरी काय, शोधताना अनेक ठिकाणी अर्ज केलेले बरे, कुठे काम होईल हे सांगता येणार नाही. :P ;)

जयंत विद्वांस 

 

 

काळ आला होता पण....

जुलै महिना म्हटला अंगावर काटा येतो माझ्या. ती घटना आठवली की तसं काही घडलं होतं यावर माझा स्वतः:चाच विश्वास बसत नाही. पाण्यात जायची मला भीती तेंव्हापासून वाटत आलीये. घडून गेलेल्या घटनेचा छाप आपल्या मेंदूवर पडत असावा. दातात अन्नाचा कण रुतावा तसे प्रसंग अडकून पडतात मेंदूत. कांजिण्या झालेल्या माणसालाच नागीण होते असं म्हणतात कारण तो विषाणू अनेक वर्ष शरीरात सुप्तावस्थेत पडून असतो आणि अतिउष्णतेने तो जिवंत होऊन प्रवासाला सुरवात करतो म्हणून एखादी नस तुरीच्या शेंगेसारखी फोड आल्यासारखी दिसतेआणि त्रास होतो. तसा त्या घटनेचा विषाणू माझ्या डोक्यात अडकून पडला असावा. पाण्याशी किंवा आगीशी खेळू नये असं म्हणतात हे अनुभव आल्याशिवाय कळत नाही माणसाला. 

तरी चौतीस वर्ष झाली आता जवळपास त्या घटनेला. मी नववीला असेन. असाच धो धो पाऊस होता सलग दहाएक दिवस. नदी मोठी होती, गटार नव्हती झाली. तेंव्हा सायकली काढून पाणी बघायला जाण्यात पण आनंद होता. लकडीपूलावर उभं रहायचं आणि खाली बघायचं. तांबडं पाणी पायाखालून न भिजवता जातंय ते भारी वाटायचं. दोनेक मिनीटांनी पूल पुढे चालला आहे असं वाटायचं आणि डोळे गरगरायचे. कमानीला टेकलेलं पाणी वर उडायचं आणि दव पडल्यावर कापड जसं ओलसर होतं तसे कपडे दमट व्हायचे. तेंव्हा काही रेनकोट, जर्किन्स वगैरे ऐष नव्हती. हुडहुडी भरली की परत सायकली हाणत परत निघायचं. सगळी थंडी पेडल मारून गायब व्हायची. मग दुस-या दिवशी शाळेत पाण्याच्या हाईटच्या अफवा पसरायच्या. प्रत्येकानी बघितलेली पातळी हीच उच्च असायची पण एकाच्याही पातळीत पाणी पुलावरून गेलं असं नसायचं. अंग ऐकीव गप्पांचं पेव फुटायचं. सांगणा-यानीही न पाहिलेली माणसं कृष्णा, कोयना, गोदावरी, मुळा, मुठेच्या पुरात कशी उड्या मारायची याची माहिती चघळली जायची. 

कुठेतरी असलं धाडस आपल्याला येत नाही याची खंत वाटल्यामुळे माणूस ती गोष्टं अजून तिखट मीठ लावून त्यात स्वतः ते बघितलं असल्याची लोणकढी ठोकून सांगतो. तर काही मुलं आणि मी आमचं असं ठरलं की आपण भांबुर्ड्यातून नदीवर जाऊयात. शनिवारी शाळा तशीही दुपारीच सुटायची. दप्तरं मामाकडे भिकारदासला ठेवली आणि आम्ही चारपाच जण निघालो. नव्या पुलावरून खाली आलो आणि तिथे रोडलाच सायकली लावल्या. आत्ताच्या सावरकरभवनच्या अलीकडे शनिवारात जायला एक दगडी कॉजवे आहे खूप जुना. एरवी तो दिसायचा पण पाणी सोडलं की तो गायब व्हायचा. त्याच्याकडे जायला दगडी पाय-या आहेत भक्कम. त्या कॉजवेवरून चालत किंवा सायकल घेऊन पलीकडे जायचं पाण्यातून हा एक डफ्फड खेळ तेंव्हा खेळायला मजा यायची. पाणी लोटायचं, मग कडेनी जाणारा कुणी मोठा माणूस हात द्यायचा. 

तर आम्ही सगळे गेलो कॉजवेवर. घोट्यापर्यंत पाणी असेल. त्यात पाय ठेऊन उभं राहिल्यावर पुढं ढकलल्यासारखं व्हायचं पण मजा येत होती. हळूहळू पाणी वाढायला लागलं. गुडघ्याच्याखाली वीतभर आलं तरी आम्ही तसेच उभे. एकतर कॉजवेच्यामध्ये त्यात पावसालाही सुरवात झाली बारीक बारीक. आमच्यातल्या एकाची फाटली दीड हात, त्यानी सांगितलं, आम्ही सांगितलं नाही एवढंच. माझे पाय लटपटायला लागले. बुडताना माणूस वाचवणा-याला पण मिठी मारून बुडवतो असं वाचलेलं. आमच्या दोस्ताचा तोल गेला, कॉजवेचा काठ कुठे ते कळेना. पडणार या भीतीनेच तो लटपटला आणि पडला. माझा हात धरल्यामुळे मी ही पडलो आणि पुढे काय होणार या भितीनी ओरडायला सुरवात केली. कॉजवेवरून आम्ही खाली काही सेकंदात गेलो असू. त्यानी हात सोडवून घेतला. मी आपला पुढेच चाललोय. तो कडेनी लावलेल्या दगडाला अडकला आणि त्यानी ओरडायला सुरवात केली. पाणी माझ्या उंचीचं असावं. पण मला पोहता येत नाही. त्यात कपडे भिजलेले, वरुन पाऊस, पुढे काय होणार ही भीती. नाकातोंडात पाणी जायला लागलं. दोन माणसं पळत येताना दिसली एवढाच काय तो दिलासा पण मी हळूहळू पुढेच जात होतो. 

तोंडात शेवाळं, अंगाला घाण चिकटत होती. पाणी अगदी गळ्यापर्यंत आलं. मी धीर सोडलेला होता पूर्ण. कॉजवेपासून साधारण पन्नास फूट पुढे आलो असेन, म्हटलं सकाळी बहुतेक संगम पुलावर फुगलेला मिळणार मी. तेवढ्यात एक माणसानी उडी मारलेली मी पाहिली. स्पीडला येत होता तो पाण्यात. जवळ येऊन त्यानी माझं बखोट धरलं आणि प्रवाहाच्या विरुद्ध चालत मला खेचत आणला. कॉजवेवर आल्यावर दगडी पाय-यांवर बसलो. भितीनी अंग थरथर कापत होतं नुसतं. सगळ्या बाजूंनी माणसं बोलत होती. दोस्त लोक चिडीचूप एकदम. मला रडूच फुटलं. पावसात कपडे स्वच्छ झाले. पाऊस थांबल्यावर सायकली काढल्या, दप्तरं घेतली आणि सरळ सगळे आपापल्या घरी आलो, कुठेही काही बोलायचं नाही या बोलीवर. घरी सायकलची चेन पडल्यामुळे पडलो असं सांगितलं. कपडे खराब झालेले, फाटलेले, अंगाला शेवाळाचा वास. गरम पाण्यानी अंघोळ करुन पण भीतीची हुडहुडी जात नव्हती. तेंव्हापासून मी धरणातून पाणी सोडलेला फोटोसुद्धा लांबून बघतो. 

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, देव तारी त्याला कोण मारी वगैरे म्हणींचा अर्थ तेंव्हा कळला. आयुष्याची दोरी बळकट म्हणून वाचलो. मरताना म्हणे शेवटच्या क्षणी आयुष्य डोळ्यासमोर स्क्रोल होतं. मला भीतीनी असेल पण तसं काही झालं नाही म्हणजे मी मरणार नव्हतो एवढं नक्की. तसं काही झालं असतं तर कॉजवेला तुझं नाव दिलं असतं असं दुस-या दिवशी मित्रं म्हणाला होता. पण मी क्रेडिट घेणारा माणूस नाही म्हणून 'मी ढकलतो तुला, तुझं नाव लागू दे' म्हटल्यावर परत एकदा आम्ही एकमेकांचे कपडे फाडले तो भाग वेगळा. :)

जयंत विद्वांस 

-------

(सदर पोस्ट ही पूर्णपणे काल्पनिक असून ती कुठल्याही प्रकारे माझ्या आयुष्याशी कणभरही संबंधित नाही याची कृपया नोंद घ्यावी. पुढेमागे आत्मचरित्रं लिहीन म्हणतोय. ओ हेन्री शॉर्ट स्टोरीज करता प्रसिद्ध होता तद्वत माझं आत्मचरित्रं कदाचित शॉर्टोबायोग्राफी म्हणून साहित्यात नविन पायंडा पाडेल इतका मजकूर अल्पं असेल. थोरामोठयांच्या बालपणात काही ना काही क्रांतिकारक, धाडसाची घटना घडलेली असतेच. टिळकांची शेंगांची टरफलं, गावसकर पाळण्यात बदली झाला तसं माझ्या बालपणात मी जन्माला आल्यावर सतत आठ दिवस रडत होतो, ही घटना सोडल्यास दुसरी मोठी घटना नाही. माझा आवाज बंद करायला किती हात शिवशिवले असतील देव जाणे. पण मग पाने भरणार कशी आणि लोक मला थोर समजतील का या दुहेरी चिंतेने मला सतत ग्रासलेले आहे म्हणून हा खटाटोप. खरंतर पानशेतच्या पुरात सापडलो असंच लिहिणार होतो पण खोटं तरी किती बोलणार ना. 

कुणाला असे स्वतः:च्या आयुष्यातले घडलेले, न घडलेले धाडसी प्रसंग लिहून हवे असल्यास इनबॉक्सात संपर्क साधावा. दर खालीलप्रमाणे :

बालपणातले प्रसंग (इयत्ता तिसरी ते दहावी) : एक पानी प्रसंग - रु.तीनशे फक्तं 
मध्यमवर्गीय लो बजेट साहस : दोन पानी प्रसंग - रु.पाचशे फक्तं
दाक्षिणात्य सिनेमांच्या पठडीतले साहस : तीन पानी प्रसंग + त्या प्रसंगात मी सोबत असल्याचा उल्लेख करणे कायद्याने बंधनकारक - रु.हजार फक्तं

पान साईझ ए फोर, फॉण्ट साईझ अकरा. प्रेमभंगावरच्या गहिवर आणणा-या कविता पाठपोट कागदावर किलोच्या भावात मिळतील. 

अत्यंत महत्वाची सूचना : पैसे मिळाल्यावर'च' लेख मेल केला जाईल. 'च' हे अक्षर ठळक टायपातले आणि बुडाला व्दिरेखांकित केलेले आहे असे समजून वाचावे)

जयंत विद्वांस 

इगो हर्ट नही करनेका...

पुलं म्हणतात तसं माझ्याबतीत हा अनुभव मला अनेकवेळा आला आहे. कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर वेटर पहिल्या फटक्यात मला अटेंड करत नाही. हा काय टिप देणारे असा विचार माझ्या तोंडाकडे बघून निश्चितच त्याचा मनात येत असणार. आता एखाद्याचा चेहरा तसा असेल तर त्याला कोण काय करणार. हातात आयफोन, डोळ्याला अरमानीचा गॉगल, रेमंडचा सूट घालून शोफर ड्रिव्हन बीएमडब्ल्यू मधून जरी मी उतरलो उद्या मॅरियट किंवा मेरिडियनला तरी तिथला माणूस धावत येऊन माझं स्वागत वगैरे करणार नाही याची मला खात्री आहे. हल्ली काय कुठलीही माणसं बीएमडब्ल्यूतून फिरतात या विचारानी तो ड्रायव्हरकडे अतीव करुणेने बघेल. नुसतं हॉटेल असं नाही, पीएनजी, रेमंडचं शोरूम, टीव्ही, मोबाईलची शोरूम, हॉटेल आराम, अमुकतमुक अँड सन्स किंवा नविन स्टाईलचं वामा, सावनी असं त्रोटक नाव धारण करणारं कुठलंही कपड्याचं दुकान, बँक, सलून यापैकी कुठल्याही ठिकाणी मला कुणी ढुंकूनही विचारत नाही. नक्षत्रंगुण दुसरं काय. 

मागे एक बँकेत गेलो होतो तर मी काहीही न विचारता एका क्लार्कनी मला 'लोन फॉर्म पलीकडे मिळतील' सांगितलं होतं, एवढा कर्जबाजारी चेहरा आहे माझा हे मला पहिल्यांदाच कळलं त्यादिवशी. एकदाच एक मिनिटासाठी फक्तं भरून आल्यासारखा अनुभव आला होता मला. लक्ष्मीरोडवरच्या एका शोरुममध्ये त्या युनिफॉर्ममधल्या दरवानानी प्रचंड चपळाईने माझा हात हँडलला जायच्या आत तो काचेचा दरवाजा उघडला होता. म्हटलं जाताना याच्याबरोबर सेल्फी काढावा, दुर्मिळ गोष्टीचं अप्रूप असतंय बघा माणसाला. पण माझा तो आनंद एक जानेवारीच्या संकल्पांइतकाच अल्पकाळ टिकला. मला निदान लांब तरी जाऊ द्यायचं होतं. तो दुस-या कलीग दरवानाला म्हणाला, 'पुल आणि पुश कळत नाही लोकांना, दरवाजा तुटण्यापेक्षा आपणंच उघडलेला बरा'. आत्तापर्यंत कर्जबाजारी, ऐपत नसलेला चेहरा होता, आता तर माझ्या साक्षरतेवरपण लोकांना शंका येऊ लागलीये ह्याची जाणीव झाली. 

तर एकदा 'जयहिंद'ला गेलो होतो. गेल्या वीसेक वर्षात मी शर्टपॅंट शिवून घेतलेला नाही. आपण कितीही चांगलं कापड आणा, टेलर एकतर सातवीतल्या मापाचा नाहीतर वाढत्या अंगाचा शिवतो म्हणून मी तो प्रकार कधीच बंद केला आहे. बदलापूरच्या एका टेलरनी आमच्या काकांना चक्कर आणायची बाकी ठेवली होती मागे. लंगोट शिवलेले. नाडीचे तीन राऊंड होतील कमरेला, ते एक ठीक आहे नाडी कापता येईल पण किती मोठा शिवावा? दुपटं म्हणून चाललं असतं. काका चिडून त्याच्याकडे गेले. त्यानी शांतपणाने सांगितलं, 'जरा वाढत्या अंगाचेच शिवलेत'. तर मी आणि मित्रं 'जयहिंद'ला गेलो, जातानाच माझं ठरलेलं असतं काय घ्यायचं ते. उगाच ढीग काढायला मला फार गिल्टी वाटतं. पँट मळखाऊ रंगाची, शक्यतो निळी आणि चेक्सचा शर्ट इतका सिंपल चॉईस असल्यावर वेळ कशाला लागतोय. तेंव्हा ब्लॅक किंवा नेव्ही ब्ल्यू पँटवर व्हाईट शर्टचं वेड होतं मला. आम्ही गेलो होतो जीन घ्यायला. सेक्शन कळेपर्यंत समोर जे तागे लावलेले असतात ते बघत होतो. 

वरच्या अंगाला एक मस्तं व्हाईट कापड होतं. त्याच्यावर नक्षी होती एम्बॉस केल्यासारखी. म्हटलं यावेळा कापड घेऊन शिवावे शर्ट. खालचे एकदोन चेक्स बघितले. अतिशय नाखुषीने तो दाखवत होता. म्हटलं, 'वरचा व्हाईट दाखवा हो तो'. मयसभेत दुर्योधनाला अपमान एवढा जिव्हारी का लागला याची जाणीव मला झाली. लक्ष्मीरॊड, पुणे, या पत्त्याला जागून तो म्हणाला, 'तो महाग आहे'. आजूबाजूला कुणी नव्हतं, त्यामुळे इन्सल्ट मर्यादित राहिला होता. 'तुम्ही दाखवा तर'. त्यानी नाईलाजाने ती गुंडाळी काढली. सगळा अपमान गिळून मी विचारलं, 'फुलशर्टला किती लागेल'. 'अडीच'. फॅमिली कोर्टात एकमेकांचं तोंड बघायची इच्छा संपलेली जोडपी बोलतात तसा तुटक संवाद सगळा. मी उगाच आपल्याला काही कमी नाही असा आव आणत मला एक, भावाला एक असे अडीच मीटरचे दोन पीस कट करून घेतले. आता तरी तो माझ्याकडे आदराने बघेल असं वाटलं मला. पण उपयोग शून्यं. मग मी आम्ही पेशव्यांचे वंशज आहोत अशा धर्तीवर रेमंडचा एक काळा आणि एक निळा असे दोन महागडे पॅंटपीस कापून घेतले. 

'पैसे कुठे द्यायचे'. 'काऊंटरला थांबा, तिथे येतील पीसेस'. द्रौपदीनीसुद्धा एवढ्या तुच्छतेने कर्णाकडे किंवा कौरव ब्रदर्सकडे पाहिलं नसेल एवढ्या तुच्छतेने तो माझ्याकडे बघत होता. काउंटरला चिक्कार गर्दी होती. मित्राला सांगितलं, गप माझ्यामागे यायचं, येड**सारखं तिथे बोलायचं नाही, अरे आपले कपडे घ्यायचेत म्हणून. हात हलवत परत चाललेल्या खाली हाथ कस्टमरकडे जेवढ्या आपुलकीने बघता येईल तेवढ्या प्रेमळ नजरेने बघत दरवानानी दरवाजा उघडला. एक सिनेमात तो अरनॉल्ड टायमर लावून बॉम्ब लावतो आणि जसा हसत पुढे जातो तसे आम्ही बाहेर पडलो. शोधू दे त्याला; ऐपत नसलेला दाढीवाला कुठे गेला ते. 

जयकांत शिक्रे २०११ च्या 'सिंघम'मध्ये म्हणाला 'कुछ भी करनेका लेकिन जयकांत शिक्रेका इगो हर्ट नही करनेका' पण जयंत शिक्रे मागेच हे म्हणालाय, ''कुछ भी करनेका लेकिन जयंत शिक्रेका इगो हर्ट नही करनेका'. 

जयंत विद्वांस 

अरबी घोडा...

ऐंशी साली आला होता कुर्बानी. मी सातवीत होतो. वयात आल्याची जाणीव करून देण्याचं श्रेय कुणाला जात असेल तर ते झीनत अमान आणि परवीन बाबीला आहे. ७८ च्या 'सत्यम शिवम' पुढे हा काहीच नव्हता. पाचवीत कुठे कळायचं एवढं, काय बघायचं ते. अख्खा डावा लेगपीस उघडा टाकून बसलेली ओलेती झीनत पोस्टरवर होती. त्यात सगळी गाणी हिट्ट झालेली आधीच. अमजदचा वेगळा रोल, नाझिया हसनचं 'आप जैसा कोई मेरे जिंदगीमें आये' आणि 'लैला मैं लैला' गाजत होतं. 'टूबुक टूबुक' म्हणणारा अमजद पब्लिकला आवडला होता. 

फिरोजखान, मनमोहन देसाई, दादा कोंडके यांच्याकडे सिनेमा हिट करायचा स्वतःचा एक फॉर्म्युला होता. फिरोजखान म्हटलं की कायम उकाड्याचा त्रास होत असलेल्या कमी कापडातल्या (कपड्यातला नाही, आपण घालतो ते कपडे, त्या सेन्सॉरसाठी नाईलाजाने गुंडाळतात ते कापड) हिरोईनी, कार्स, बाहेरची लोकेशन्स, फिरोजचं नाव राजेश, कल्याणजी आनंदजीची हिट गाणी आणि ढिशूम ढिशूम असा ऐवज असायचा. 'गॉडफादर' वरून 'धर्मात्मा' तसा कर्क डग्लसच्या 'द मास्टर टच' (१९७२) वरून 'कुर्बानी आला. अर्थात त्यानी कधी ओरिजिनल वगैरेचा आव आणला नाही. यातलं 'क्या देखते हो' (बिकिनीतली झीनत विचारते) आणि हा म्हणतो 'सुरत तुम्हारी' हे सगळ्यात विनोदी गाणं होतं. आम्ही पण फिरोजदादासारखा झीनतचा चेहराच बघितला म्हणा गाणं संपेपर्यंत.

नटराजला लागला होता कुर्बानी. काचा फुटल्या आगाऊ तिकीटविक्रीला, प्रचंड गर्दी, पोलीस बंदोबस्त वगैरे होता. नुसती हवा 'कुर्बानी'ची. नटराज बंद झाल्याचं मला अतीव दु:खं आहे. 'शोले' मी तिथे पाहिला होता आयुष्यात पहिल्यांदा सत्तर एमएमवर. इमानदारीत एसी चालू ठेवणारं थेटर. तिकीट दर तरी काय २.२०, ३.३० आणि ४.४० (लोअर स्टोल, अप्पर स्टोल आणि बाल्कनी). तेंव्हाही ते महागच वाटायचे अशी परिस्थिती असायची. माझी काय ऐपत नव्हती तेंव्हा तिथे जायची. फार हळहळ वाटायची. तीन चार रुपयात ओलेता लेग पीस काही महाग नव्हता. प्रचंड ब्लॅक चालू होतं. नुसत्या अफवा अप्परचं तिकीट दहा रुपये वगैरे. इथे ३.३० ची मारामार, दहा कुठून आणायचे. फार वाईट दिवस हो. 

आमच्या शाळेत मंडईतली बरीच पोरं होती. दहावीत वाटतील अशी मुलं सातवीला होती बिचारी. तर त्यातला एक टग्या ग्रुप गेलाच, ब्लॅकनी घेईन पण कुर्बानी बघेनच असा पण करून. ठेवणीतल्या फुलपॅंटी घालून गेले अगदी सेकंड शो ला. पिक्चर फुल. एकानी चोवीस इंचीची छप्पन इंच केली छाती फुगवून आणि गेला एका ब्लॅकवाल्याकडे. एकदम हेरॉईन मागायच्या धर्तीवर पुटपुटणं वगैरे. बाजारात सात रुपये रेट असताना मुलं म्हणून चक्क पाच रुपये रेट ठरला. साताठ जणांचे खिसे रिकामे झाले आणि चाळीसेक रुपये देऊन जगज्जेत्याच्या थाटात काफिला तिकिटं नाचवत गर्दीत घुसला. काय सांगावं लेगपीस टायटलला असला तर? तेंव्हा लाल पिवळी तिकिट असायची, बाल्कनीतल्या रांगेतले तुच्छतेने बघायचे लोअर, अप्परकडे. तिकीट फाडणा-या माणसानी यांना बाजूला केले. यांच्या पोटात गोळा, सिनेमा ऍडल्ट आहे की काय? सगळे आत गेले तरी हे तिथेच. 

डोअरकीपरनी जो टाकलाय ना शॉट, लै हसलो तेंव्हा पण आणि आत्ता पण. 'च्युत्या बनवलंय तुम्हांला, फर्स्टशोची आहेत ही'. आपल्याला कुणीतरी अरबी घोडा लावलाय हे कळायलाच पाच मिनिटं गेली. प्रत्येकजण डोळे फाडून शो टायमिंग बघत होता. ब्लॅकवाला शोधून झाला. त्याला मानलाच पाहिजे, डेअरिंग लागते बॉस, लक्षात आलं असतं तर फटके पडले असते. पण चाळीस घेऊन काय खुश झाला असेल गडी. मग 'भ'च्या सगळ्या शिव्या, आया, बहिणी झाल्या, कुठे कुठे पाय घालून झाले पण अरण्यरुदनच ते. हे साताठ जण उभे फक्तं तिथे. वधस्तंभाकडे निघालेल्या चारुदत्तासारखे खाली मान घालून सगळे परत आले. चोवीस इंचीवाल्याला शो कितीचा बघता येत नाही का यावरून शिव्या देणे एवढाच काय तो विरंगुळा. 

गंमत म्हणजे मी 'कुर्बानी' अजूनही पाहिलेला नाही पण ही चाळीस रुपयांची कुर्बानी माझ्या अजून लक्षात आहे. एकदम अरबी घोडा :P ;) 

जयंत विद्वांस 

उद्योग (२)…

प्रत्येक माणसाच्या अंगात नाना कळा असतातच, फक्तं काहीजण वय वाढत चाललं की उगाच आपण आता मॅच्युअर झालो असा समज करून घेतात आणि गंभीर होतात. काड्या घालणं स्वभावात लागतं अर्थात. बदलापूरला होतो तेंव्हा व्हिसीपी/व्हिसीआर प्रकार नविन आला होता. आमच्याकडे बुशचा टिव्ही आणि व्हिसीआर घेतला होता. मी आणि धना तो घेऊन फिरायचो. अमिताभचे सिनेमे अनंत वेळा बघायला ते एक कारण होतं. चौकातल्या हॉटेल्सची पोरं सॅटर्डेनाईट फिक्स गि-हाईकं आमची. 'कोनसाभी लाव, लेकिन तीनमेंसे दो बच्चनका लानेका' इतकी सिंपल ऑर्डर असायची. नंतर नंतर इतका नॉशिआ आला की आम्ही कॅसेटी चालू करून निवांत झोपायचो.   

आमच्या एका मित्रानी पहिल्यांदाच 'बॉबी' बघितलेला तेंव्हा. डिंपलसाठी पागल झाला होता हे आमच्या कानावर आलं होतं. कॅसेट बहुतेक झिजली असावी इतक्यावेळा पाहिला त्यानी 'बॉबी'. आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. गडी खुश होऊन आला होता. डिंपलची मापंसुद्धा सांगितली त्यानी, शक्यं तेवढी वर्णनं करून झाली. तिची तोकडी पॅन्ट, बिकिनी, 'झूठ बोले'ची काचोळी सगळं सगळं काढून झालं (बोलण्यात). ती समोर असती तर त्यानी कदाचित तिला धरली पण असती इतका चेकाळला होता. मला काय गप्पं बसवेना. 'सम्या, तू कुणाचा बॉबी पाहिलास?' 'डिंपल, ऋषीकपूरचा'. 'मूर्ख आहेस, आरकेचा पाहिलायेस का?' 'अरे, आरकेनीच काढलाय.' 'अरे येड**, हा रिमेक आहे, ओरिजिनल ब्लॅक एन व्हाईट आहे राजकपूर, नर्गिसचा. तो बघ आणि सांग, हा विसरशील'. मग माझ्या जिभेवर जी काही वर्णनसरस्वती अवतरली की त्याच्या तोंडातून लाळ पडायची बाकी होती. नर्गिसची वर्णनं मला कंटाळा आल्यावर थांबली. राज-नर्गिसचं 'हम तुम एक कमरेमे बंद हो' तर पार थ्री एक्स पातळीवर गेलं होतं. घरी जाताना अंधारात याला सापडली कुणी तर ह्यानी गैरकृत्य केल्याचं कानावर येणार अशी भीती वाटायला लागली आम्हांला इतका तो बेचैन झाला होता. 

पुढचे आठ दहा दिवस बदलापूरातली सोडा, अंबरनाथ, कल्याण पर्यंतची दुकानं पालथी घालून आला हा ब्लॅक एन व्हाईट 'बॉबी' साठी. सगळं दृश्यं आम्ही कट्ट्यावर बसून बघायचो. ''बॉबी'ची कॅसेट आहे?' दुकानदार डिंपलच्या बॉबीची देणार. 'हा नाही, राजकपूर नर्गिसचा'. 'बॉबी, एवढा एकंच आहे'. 'हा नको, हा आहे माझ्याकडे.' दुकानदार ती कॅसेट जागेवर लावून याच्याकडे दयाळू नजरेनी बघत असणार. हॉट नर्गिस बघणं लांबणीवर पडतंय याचं दु:खं जास्ती. शेवटी त्याच्याच घरातल्या कुणी सांगितलं 'अरे, बॉबी एकंच आहे, तुला कुणी सांगितलं दोन आहेत म्हणून'. मग जेंव्हा आमची गाठभेट झाली तेंव्हा फक्तं तो बोलत होता, आम्ही ऐकत होतो. पेट्रोल संपल्यावर गाडी थांबते तसं शिव्या आठवेनाश्या झाल्यावर तो थांबला. समस्तं स्त्री नातेवाईकांचे अवयव काढून झाले, कुठे कुठे पाय घालून झाले, पैलवानसुद्धा थकेल इतक्यावेळा संभोगक्रिया झाली. 

'निळ्या फिल्मा' बघायच्या म्हणजे काय झिगझिग असायची तेंव्हा. मोकळं घर, व्हिसीआर, तसल्या कॅसेटी मिळवणं इतके व्याप असायचे त्यामुळे हा दुर्लभ योग असायचा. त्यात एकानी सांगितलं की पोलीस आले की आधी फ्यूज काढतात म्हणजे कॅसेट इजेक्ट करता येत नाही, मग व्हिसीआर चौकीला नेऊन तिथे प्ले करतात. बच्चेकी जान पुढच्या घटनांच्या विचारांनीच निम्मी व्हायची. तयार लोकं नुसत्या खुणेवर गट्ठे आणायचे कॅसेट्सचे. हेवा या शब्दाचा अर्थ कळायचा तेंव्हा. तर आमच्या या बॉबी सम्याला तसली कॅसेट हवी होती. आमच्याकडे व्हिसीआर म्हणजे आम्ही पितळी डबे लावावेत तश्या कॅसेट मांडणीवर लावूनच असणार असा त्याचा समज किंवा आम्ही ती मिळवून देऊ असं त्याला वाटायचं. 'नाहीये आमच्याकडे', 'दे की राव एकतरी'. गडी काही पिच्छा सोडेना. 'कशी मागायची ते तरी सांग'. मी एकदम कोकचा फॉर्म्युला सांगितल्यासारखा त्याला बाजूला घेतला सांगायला. 'कुठल्याही दुकानात गेलास ना, अजिबात घाबरायचं नाही. 'पत्थर के पेड'ची कॅसेट द्या म्हणायचं. कोडवर्ड आहे तो, अंबरनाथ, कल्याण कुठेही जा, हीच कॅसेट मागायची.'      

पुढचे आठ दहा दिवस बदलापूर ते डोंबिवलीपर्यंतची दुकानं पालथी घालून आला हा. 'पत्थर के पेड' द्या एक/दोन कॅसेट'. 'पत्थर के पेड? असा नाहीये कुठला सिनेमा'. याची पंचाईत व्हायची, निळी फिल्लीम ओरडून मागणार तरी कशी. त्यात हा पाच फूट, जेमतेम मिशी फुटलेला, सतरा वर्षाचा, गोंडस निष्पाप चेह-याचा. माणूस डिप्रेशनमध्ये जाईल नाहीतर काय होईल, मला सांगा. जगदुनिया तो पासवर्ड टाकून आनंद चिडीचूप आणतंय, बघतंय आणि मला न मिळायला मीच काय अशा पापाच्या राशी केल्यात. वैफल्य येणारच की. दूरदर्शनला अतिशय जुन्या कार्यक्रमांच्या चित्रंफिती 'सह्याद्रीच्या पाऊलखुणा' नावाखाली दाखवतात तसं मग त्यानी विस्मरणात गेलेल्या नर्गिसच्या 'बॉबी'ला जे घडलं ते परत सगळं रिप्ले केलं. 

आता काय इंटरनेटच्या जमान्यात त्याचं अप्रूप राहिलं नाही पब्लिकला. जागेची गरज नाही, मोबाईलमध्ये दिसतंय सगळं. डिंपलची मजा आता बॉबी काढला नव्याने तरी येणार नाही कारण तेंव्हा ते सगळं धाडस होतं. बरंचसं झाकलेलं असायचं त्यामुळे काही उघडं दिसलं की डोळे मोठे व्हायचे. आता झाकपाक इतकी कमी असते की ती जास्ती दिसली तर डोळे मोठे होतात, बाई परग्रहावरून आली की काय असं वाटेल. बाय  द वे, धाडस म्हटलं म्हणून हसतील काही जण पण ते 'धाडस'च होतं डिंपलचं त्या काळात. तसं नसतं तर डिंपल 'बॉबी' नसती झाली, अनुराधा पौडवाल झाली असती. तिच्या वडिलांनी नकार दिला होता त्यात बिकिनी घालायची आहे म्हणून. :) :D   

जयंत विद्वांस  

शब्दं...

मूल जन्माला आलं की त्यानी पहिला शब्दं कुठला उच्चारला ह्याची आई आणि बाबा नोंद करत असतात. जीवाचे कान करून ऐकतात तो शब्दं, ती हाक आपलीच असावी अशी दोघांची इच्छा असते पण ते पोर वात्रट असतं, त्याला सतत खेळवणा-या शेजारच्या दादाला ते दाद्दा किंवा द्दा अशी पहिली हाक मारतं आणि त्यांचा हिरमोड करतं. तो कडेचा दादा हरखून जातो. पहिलेपणाचा आनंद अफाट असतो. 'मला', मला हाक मारली त्याने पहिली, या प्रेमापोटी तो त्या बाळावर अजून माया करतो. एक शब्दं कारणीभूत ठरतो प्रेम वाढायला. शब्दांना त्यांचे स्वतःचे उपजत अर्थ असतात, लय असते. काही आपण चिकटवलेले, काढलेले, अभिप्रेत असलेले लाक्षणिक अर्थ असतात. मलमली, दुडूदुडू, गुळगुळीत, सुळसुळीत, गुबगुबीत, गरगरीत, दणकट, जबरदस्त, थरथराट, आघात या शब्दातली अक्षरं त्या शब्दांच्या अर्थाला अर्थ आणतात असं मला कायम वाटत आलंय. कुठून आले असतील हे शब्दं, कुणी तयार केले असतील, का करावेसे वाटले असतील, काय शास्त्र असेल त्यामागे. हजारो भाषेत लाखो शब्दं वेगवेगळे आकार, ध्वनी, अर्थ घेऊन वावरतायेत. प्रत्येकाला आपली भाषा उच्च वाटते. 

शब्दानी शब्द वाढला असं आपण म्हणतो. म्हणजे काय तर वाद वाढला. संवाद वाढतोच की शब्दांनी पण दोघांना तो हवा असेल तर. 'तुटे वाद, संवाद तो हितकारी', रामदास म्हणाले. पहिल्यांदा चित्रातून लोकांनी भावना व्यक्तं केल्या. प्रत्येकजण चित्रं काढू शकत नाही मग स्पर्श, खुणा वापरल्या गेल्या असतील त्याच्याबरोबर. तरीसुद्धा काही अपूर्ण राहिलं असणार मग शब्दं आले असतील. त्यांचे अर्थ त्या त्या काळानुसार असतील, कालौघात किती बदल झाले अर्थात त्याचा हिशोब कोण ठेवणार. एखादा भाषातज्ज्ञ त्याचा उगम, मूळ अर्थ, आत्ताचा अर्थ असा गहन अभ्यास करेलही पण सामान्य माणसाला प्रचलित अर्थानी शब्दं वापरायची सवय असते आणि ती त्याला सोपी असते म्हणून आवडतेही. पण किती प्रकार आले ना. शब्दांचे ग्रंथ झाले, ज्ञान देता आलं, मिळवता आलं, गाणी झाली, श्लोक झाले, धर्मग्रंथ झाले, शिव्या झाल्या. ज्याची जशी बुद्धी तशी त्याने ती वापरली. प्रत्येकाला समोरच्याला काहीतरी सांगायचंय. सांगणा-याच्या ताकदीवर, ज्ञानावर, आवेशावर, घटनेच्या परिणामावर शब्दांची ताकद ठरते. शब्दं सुद्धा वापरता आले पाहिजेत. 

प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे, ठाकरे काका पुतण्या, अटलबिहारी, शंकर अभ्यंकर, बाबामहाराज सातारकर यांच्यात शब्दं वापरण्याची हातोटी आहे. आवाज चांगला असला म्हणजे शब्दंफेक जमेल फारतर पण नेमका शब्दं योजून त्याचा पुरेपूर परिणाम साधायचं कसब अंगी लागतं. शब्दं कसा भूसुरुंगासारखा हवा. पाय ठेवल्यावर अर्थ फुटणारा. वाचणा-याच्या डोळ्यांचे पाय मजबूत असतील तर तो त्यावर बिनदिक्कत पाय ठेवेल आणि स्फोट करेल. जो नाजूक पावलांनी त्यावरून जाईल त्याला हिरवळ असेल ती. खुनाच्या खटल्यात वकील विचारतो, घटना घडली तेंव्हा तुम्ही कुठे उभे होतात? किती अंतरावर होतात? म्हणजे अंतर बदललं, दृष्टिदोष असेल तर वेगळं दिसू शकतं यावर केसचा निकाल बदलू शकतो. शब्दांचं तसंच आहे. तुम्ही त्यातून कुठले अर्थ काढताय त्यावर अनुभूती अवलंबून असेल. लिहिणा-याच्या, बोलणा-याच्या मनात असलेला अर्थ वाचला, ऐकला जाईल असं नाही. ब-याचदा आपल्याला सोयीस्कर, हवे असलेले अर्थ काढलेले असतात. 

शब्दं बबलगम सारखा असतो. चावलात की त्याचा किती मोठा फुगा करायचा ते तुमच्यावर अवलंबून आहे. शब्दं कडधान्यासारखा असतो. एवढुस्सा असतो पण भिजत घातलात, मोड आला की कसा फुगीर, दळदार दिसतो. शब्दं वाचता आला पाहिजे, त्यातला दळ काढता आला पाहिजे. सांगितलेला, अभिप्रेत असलेला अर्थ कळला पाहिजे. एखाद्याची चूक जेवढ्या प्रयत्नपूर्वक आपण शोधतो तसा लपलेला एखादा अर्थ शोधता आला पाहिजे. एखादा चेहरा दुस-या कोनातून बघितला तर वेगळा किंवा जास्ती सुंदर दिसतो तसा शब्दं बघता यायला हवा वेगळ्या मितीतून. शब्दात ताकद असते, प्रेम असतं, लय असते, गाणं असतं, ऊर्जा असते. चेहरा असतो, रूप असतं, तिरस्कार असतो, माया असते, तळतळाट असतात. शब्दाला भावना चिकटून आली की त्याचं शस्त्रं होतं किंवा मोरपीस होतं. 'स्वामी'मध्ये सतत संयत बोलणारे माधवराव, राघोबादादांची बिनपाण्याने करतात असा एक पानभर अंगार आहे. शब्दाची ताकद म्हणजे काय ते कळेल त्यात. समोरच्याच्या तोंडातून शब्दं फुटणार नाहीत अशी ताकद त्यात आहे. 'श्यामची आई'मध्ये 'आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी' ऐकताना डोळ्याला झारीसारखे अनेक डोळे फुटतात, याला शब्दांची ताकद म्हणतात.    

म्हटलं ना, भावना चिकटून आली की शब्दांचे अणकुचीदार भाले होतात, मंत्र होतात, गाणी होतात. बेलवलकरांची स्वगतं बार्बेक्यूवर सळई ठेवावी तशी आपल्याला होरपळवतात, बालगंधर्वांच्या, लताच्या, आनंद भाटेंच्या मुखातून शब्दं आला की शब्दाचा स्वरार्थ होतो, नानाच्या तोंडातून आले तर कधी बारिशकर होतो तर कधी क्रांतिवीरचा प्रताप होतो, अमिताभच्या तोंडातून आले तर खर्जातलं 'नीला आसमां' होतात, बोरकरांचे शब्दं पुलंच्या तोंडातून आले की त्यांना नाद येतो आणि ते 'तुझी गो पायजणे' होतात, कुणाच्याही आवाजात 'जन गण मन' ऐकलं तरी रोमांच उभे रहातात कारण ते शब्दंच तसे आहेत. म्हणणा-या कितीजणांना त्याचा अर्थ माहित असेल? तरीही त्याला चिकटलेल्या भावनेमुळे ते आपलेसे आहेत. आजी पहाटेच्या अंधारात मानसपूजा म्हणायची, अस्पष्ट ऐकू येणारे शब्दं अंगावर पांघरूण घातल्यासारखे पसरायचे, पाया पडल्यावर पुटपुटलेल्या आशीर्वादाचे शब्दं कसे झोळीत दान पडावं तसे कानात पडतात, कुणी टाहो फोडून नाहीतर मायेनी मारलेली हाक असेल त्या शब्दाला मायेचा पदर असतो. शब्दं तिळासारखा असतो त्याचा फुलवून हलवा करता यायला हवा. 

शब्दं.... एवढं सगळं असून सुद्धा काही गोष्टी उरतातच सांगण्यासाठी, ज्या शब्दात मावत नाहीत, नविन शब्दं सापडत नाहीत, बुद्धी कमी पडते, आकलन कमी पडतं. धबधबा मग नायगारा असो नाहीतर कोकणातला त्याचं रौद्र रूप शब्दात कसं पकडणार, मधुबाला सुंदर दिसते म्हणजे नेमकं काय हे शब्दात सांगता नाही येणार, प्रचंड तहान लागल्यावर सावलीला उभं राहून पोटात गेलेला थंडगार पाण्याचा घोट कसा होता हे नाही सांगता येणार शब्दात, बॅटीच्या मधे लागून गेलेल्या चौकाराचा तो आवाज, तिनी पहिल्यांदा आपल्याला चोरून बघावं आणि ती सापडल्यावर कुलूपबंद झालेल्या नजरांचा तो क्षण, बाळानी मुठीत बोट पकडावं आणि तेंव्हा आत कुठेतरी हलतं ते शब्दात कसं येणार? म्हणून आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद किंवा दु:खाचा क्षण नि:शब्दं असतो. काहीही बोलून अंगुळभर शिल्लक राहील अशी अवस्था ती. म्हणून न बोलणे उत्तम. मौन, अबोला, एकांत किती बोलका असतो, फक्तं तिथे शब्दं नसतात, अव्यक्तं भावनांचे, शरीर धारण न केलेले, आत्मे वावरतात तिथे.    

शब्दं... म्हणजे पसारा. नेमकं न सांगणारा. शब्दं फार मौल्यवान असतात. जपून वापरावेत, नेमके वापरावेत, कधी कधी एखादा शब्दं वगळून जो परिणाम होतो तो वापरून होत नाही, उन्हाळ्यात पावसासाठी जसं गवत राखून ठेवतात तसा एखादा शब्दं हातचा म्हणून राखलेला असावा, शब्दात मंत्राची ताकद हवी, सायीची माया हवी. शब्दं कोडं घालणारा हवा, शब्दं उकल करणारा हवा. मेंदूच्या हुकूमावर ओठाच्या उंबरठ्याशी लगाम खेचल्यासारखा थांबणारा शब्दं ताब्यात हवा. शब्दं नि:शब्दं करणारा पण हवा. काय गंमत आहे बघा. प्रत्येक शब्दं काहीतरी सांगत असतोच. 'शब्दं' हा शब्दं घ्या. ना काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, अनुस्वार, विसर्ग, किती सरळमार्गी आहे पण 'द'च्या पोटावर बसलेल्या त्या अर्ध्या 'ब' मधे काय आहे हे बघायची उत्सुकता लागली की शब्दांची ओढ सुरु झालीच. जे दिसतंय त्याची माणसाला आवड कमीच असते, दडलंय काय हे वाकून बघायची उत्सुकता जास्ती.  

एका शब्दावर इतके शब्दं झाले, अपशब्दं ऐकायच्या आत नि:शब्दं झालेलं बरं. ;) :P   

जयंत विद्वांस