Wednesday 24 August 2016

गुडबाय एफबी...

मित्रं आणि मैत्रिणींनो, इथून आपली रजा घेतोय. कंटाळा आला किंवा तोचतोच पणा जाणवायला लागला म्हणून असेल पण अकाउंट बंद करतोय. परत कधी येईन की न येईन माहित नाही. असाच लोभ असू द्या, कधी काही चुकीचं वागलो असेन तर मोठ्या मनानी माफ कराल. माझ्या पोस्ट्सवर तुम्ही सगळ्यांनी अतोनात प्रेम केलंत, त्यामुळेच थोडंफार, बरंवाईट लिहीत राहिलो. तुम्ही मला मिस कराल त्यापेक्षा जास्ती मी तुम्हांला मिस करेन. जाण्यापूर्वी थोडं मनातलं सांगेन म्हणतोय. 

पाचेक वर्ष झाली इथे येऊन. ० ते ३८६० फ्रेंड्स(?) लिस्टीत आले, त्यातल्या सत्तरेक लोकांना फार तर भेटलो असेन, त्यांच्याशी बोललो असेन. बाकी माणूसघाणेपणा कंटिन्यू ठेवला. वाईट अनुभव कमी आले, विनोदी जास्ती आले. कुणाच्या इनबॉक्सात लाळ सांडली नाही, भिकार फोटोवर गॉर्जस, अप्रतिम असं खोटं बोललो नाही. उगाच वाद घातले नाहीत, अर्धवट माहितीवर राजकीय पोस्ट्स टाकल्या नाहीत, ज्यातलं आपल्याला समजत नाही त्यावर पोस्टायची व्याधी लावून घेतली नाही. सुविचार, शेरोशायरी, व्हिडीओजच्या लिंका पेस्टायला नेट खर्च केलं नाही, फार कुणाच्या पोस्टीवर कॉमेंटलो नाही, कुणाच्या वाढदिवसाच्या नोटिफिकेशनवर पहिली शुभेच्छा देण्यासाठी धापा टाकत गेलो नाही, स्वतःची तारीख दिली नाही त्यामुळे मी केलेलं तुला विश पण तू विसरलास हा आरोप झाला नाही. त्यामुळे शिष्ठ, स्वतः:ला समजतो कोण वगैरे अप्रसिद्धी फुकट मिळाली. 

आपल्याला कशावर लिहिता आलं ते अजमावता आलं. लाईक्स, कॉमेंट्सच्या संख्येने हुरळून जायला झालं, खट्टूही झालो पण ती पण एक फेज असते, ती अनुभवली. तर निरोप फार लांबवायचा नसतो, मजा जाते. थोडक्यात मजा, सो, गुडबाय फ्रेंड्स. 

जयंत विद्वांस  

-----

कुणाला वैयक्तिक वाटू नये म्हणून स्वतःवरच पोस्ट लिहावी म्हटलं. नवनीत गाईडनुसार अपेक्षित कॉमेंट्स खालीलप्रमाणे... 

काsssss?......., काय झालं?, बोललं का काही कुणी?, ;( 
नको जाऊस रे, पाहिजे तर गॅप घे पण परत ये, 
मिस यू, का असं?, 
......! 
जयंतराव, हे वागणं बरं नव्हं
 
न टाकलेल्या कॉमेंट्स.... 

गेला का? बरं झालं, नाहीतरी शिष्ठच होता. 
हा एकटाच लेखक, कद्धी म्हणून माझ्या चारोळी, कवितेला लाईक नाही करायचा नाहीतरी, घाण गेली. 
स्वतः:च्या पोस्टीवरच्या लाईक, कॉमेंट बघायला यायचा नाहीतरी फक्तं, करायचीयेत काय असली इथे, खोगीरभरती नुसती
कुठे राहवणार आहे, नाटकं उगाच, येईल परत 
अटेंशन सिकींग सिंड्रोम, दुसरं काय. 
हल्ली पोस्टीला कुणी विचारत नाही बहुतेक म्हणून घाऊक सहानुभूती गोळा करणं चाललेलं दिसतंय. 

..... 

यावर माझा मित्रं मन्या मराठे म्हणाला ते मला पटलं.... 

'माकडा, तू असलास काय किंवा नसलास काय, काही फरक पडणार नाही. फार्फार तर लोक चार दिवस मिस करतील. कुणासह जगता येतं तसच कुणाशिवाय जगण्याची सवय लवकर होते कारण आता ते माणूस नाही हे पक्कं माहित असतं. भा.रा.म्हणून गेलेत, 'जन पळभर म्हणतील हाय हाय', गोखले म्हणाले, 'रे तुझ्यावाचून येथले काही अडणार नाही'. तुझा प्रॉब्लेम काय आहे नेमका? एफबी काय, आयुष्यं काय, मी जातोय, मी जातोय असं बोंबलून सांगण्यात हशील नाही. कुणी तरी थांब म्हणावं, रडण्यासाठी खांदे गोळा करायला ठीक आहे पण त्यानी फार तर चार दिवस बरं वाटेल, इगो सुखावेल, कॉमेंट्स, लाईक्सच्या संख्येने कृतकृत्यं वाटेल पण निष्पन्नं काय? वपु म्हणाले होते, 'नाविन्यासारखी चटकन शिळी होणारी दुसरी गोष्टं नाही'. माणसाचा आफ्रिदी होता कामा नये. असंख्य पुनरागमनं हा चेष्टेचा विषय होतो. पुनरागमन कसं हवं? सगळी टीम पॅकरकडे गेल्यावर दहा वर्षाच्या गॅपनंतर एक्केचाळिसाव्या वर्षी परत ऑस्ट्रेलियाचा कप्तान झालेल्या बॉबी सिंप्सनसारखं. 

मुरली खैरनारसारखा माणूस इथून अचानक एक्झिट घेतो. ते काही आपल्या हातात नाही पण तरीही चुटपुट लागतेच की. अशी चुटपुट लागेल कुणाला असं कर काहीतरी करून जा इथे. पराकोटीचं दु:खं अबोल असतं. शब्दात व्यक्तं होत नाही ते. जग काय, एफबी काय इथे कुणीही तुम्हांला आमंत्रण दिलेलं नाही. तुम्ही आलात या, रमलात तर रमा, काही चांगल लिहिता आलं तर लिहा, चार लोकांना आनंद द्या. एक्झिट आहेच ठरलेली त्याचा गवगवा कशाला? 

..... 

तात्पर्य : मी गेलो काय, राहिलो काय, कुणाला फरक पडावा ही अपेक्षा नाही. इथे येताना संगम ब्रास बँड लावून वाजतगाजत आलो नाही मग जाताना उगाच फ्लेक्स लावायचा खर्च कशाला तो. (कितीजण अनफ्रेंड करतील तो आकडा कळवळा जाईल). ;) ;P 

जयंत विद्वांस 


  

No comments:

Post a Comment