Monday, 8 August 2016

चमक...

त्याचं खरं नाव श्रीनिवास दत्तात्रय मोघे पण आमचं गावं त्याला मयत्या बामण किंवा मयत्या भट म्हणतं. एवढं सुंदर नाव पण गावानी पार त्याची रया घालवली. दहावा, तेरावा, श्राध्द एकदा त्याच्या मागे लागलं ते लागलंच. शेजारच्या एखाद्या गावात नाईलाज म्हणून, अगदीच कुणी मिळत नाही म्हणून, क्वचित त्याला सत्यनारायण वगैरे मिळायचा. बाकी पैसा मिळवून देणारी वास्तुशांत, लघूरूद्र, शांती, बारशी, लग्नं ही भिक्षुकी त्याच्या नशिबात नव्हती, मिळालं एखादं काम तरी दुर्मिळ योग तो. एखाद्या कलाकारावर जसा एक शिक्का बसतो आणि दुस-या भूमिकेत त्याला प्रेक्षक स्विकारत नाहीत तसं काहीसं झालं होतं त्याचं. पण पितृपंधरवड्यात त्याला उसंत नसायची, बाकी कुणी गेलं तरंच काम त्याला. शेजारपाजारच्या चारपाच गावात पण तोच जायचा. मामलेदारासाठी लोक थांबतात तसे लोक त्याच्या येण्याकडे डोळे लावून असायचे अगदी. श्री अगदी मिटल्या तोंडाचा होता. मंत्र म्हणताना जे काय तोंड उघडेल तेवढंच. 

सव्वापाच फुटाच्या आसपास उंची, लख्ख गोरा रंग, कायम दाढी व्यवस्थित केलेली, शाईने भरल्यासारखे काळेभोर डोळे, पट्टीनी आखल्यासारखं सरळ नाक, भटजी असून पोट अजिबात न सुटलेला, सडपातळ शरीरयष्टी, कायम झिरो मशिन मारलेलं डोकं आणि मागे इंचभर शेंडी. श्री देखणाच होता. माझ्याच वयाचा तो. आम्ही दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो. नंदादीप जसा कायम तेवता असतो तशी त्यांच्याकडे जगण्यासाठीची ओढाताण कायम तेवती असायची. त्याचे वडील तालुक्याच्या गावाला प्राथमिक शिक्षक होते. चिमूटभर पैशात अजून एक थेंब पडावा म्हणून ते भिक्षुकीही करायचे. आमची दहावीची परीक्षा झाली त्याच वर्षी कांडर चावून त्याचे वडील गेले. नंतर मी मुंबईला शिकायला गेलो, श्री तिथेच राहिला. पंचवीसेक पोती तांदूळ निघेल एवढा शेताचा तुकडा, बारापंधरा आंबा, काजू, फणसाची झाडं, नारळ आणि स्वतःचं चि-यात बांधलेलं अनेक पिढ्या चालत आलेलं घर, एवढीच काय ती त्याची इस्टेट. त्याची आई सुशीला, ती बारमाही आजारी असायची. सतत खोकायची आणि हिरवं, पिवळं थुंकायची. जीव जात नाही म्हणून कंटाळलेली असायची ती कायम. खोकून कंटाळा आला की ती नशिबाला आणि देवाला शिव्या द्यायची.

श्री अभ्यासात तसा बरा होता. बारावी करून मग बी.ए.,बी.एड.करून शिक्षक व्हायचं होतं त्याला. आम्ही ब-याच वेळा या विषयवार नदीवर पाण्यात दगड मारत बोलत बसायचो. खूप त्रोटक बोलायचा तो पण नेमकं बोलायचा. 'सात वर्ष लागतील, पण मी बारावी झालो की करेन काही नोकरी, जमेल मला?'. 'जमेल रे, हा हा म्हणता दिवस जातील'. 'दहावीच्या सुट्टीत बघतो, तालुक्याला स्टेशनरीच्या दुकानात पार्ट टाईम'. 'अरे होईल सगळं नीट'. एखाद्या झाडाचं जसं बोन्साय होतं ना तसं याचं उलटं झालं होतं. लहान रोप असतानाच तो झाड झाला होता. डोळ्यात आणि डोक्यात सतत काळजी. तसाही त्यामुळे तो अबोलच असायचा पण वडील गेल्यावर तर श्री अजूनच मुका झाला. प्राथमिक शिक्षकाकडे किती पुंजी असणार. अकाली प्रौढत्व आलेला पंधराएक वर्षाचा श्री स्टेशनरीच्या दुकानात लागला खरा पण तिथे असा कितीसा पैसा मिळणार. मधेच शेतीची कामं, आईचं आजारपण, कायम पैशाची ओढाताण यातंच त्याची उमेद आणि वय दोन्ही नासून गेलं. त्याच्या वडिलांबरोबर जे भटजी होते त्यातल्या एकानी त्याला भिक्षुकी शिकवली म्हणून थोडं फार बरं झालं. वडील गेल्यावर दिवसाआड मिळणारं जेवण रोज मिळू लागलं. 

तो एकदा मयताचा विधी करायला गेला, मग कायम जातंच राहिला. त्यामुळे लोकांनी परस्पर तो शुभकार्याचा भटजी नाही हे ठरवून टाकलं आणि त्याचा उत्कर्ष थांबला. कुणाकडेही तो पैसे एवढेच द्या असं मागायचा नाही, गरीब लोकं दोन दिवस उशिरा का होईना पण आणून द्यायचे, प्रतिष्ठित, ऐपत असलेली माणसं एवढ्यात कोण मरणार आहे परत नाहीतरी असा धूर्त विचार करून निम्मेच पैसे त्याला द्यायचे, ते ही गड्याकरवी पाठवून. श्री कुणालाच काही बोलायचा नाही. माझ्या लग्नाला तेवढा तो मुंबईला आला होता. नाहीतर आईमुळे त्याला कुठेच जाता यायचं नाही. त्याला मुंबई दाखवायची असं मी गावाला गेलो की कायम बोलण व्हायचं. पण लग्नाच्या गडबडीत काही जमणं शक्यं नव्हतं. ते राहिलं ते राहिलंच. नंतर माझंही गावाला जाणं येणं कमी होत गेलं. एखादी वस्तू अचानक हरवावी पण अमुक एक ठिकाणी ठेवल्याचं आठवावं ना तसा श्री माझ्या आयुष्यातून कुठे आहे हे माहित असलं तरी हरवल्यासारखा झाला. गावाहून कुणी आलं तर उडत उडत त्याच्याबद्दल कळायचं. होळी, गणपतीला जाणंही कमी होत गेलं आणि मग पेन्सिलनी लिहिलेलं पुसट व्हावं तसा श्री ही पुसट झाला. 

परवा गावी गेलो होतो आठ दिवसांकरता. जमिनीचं काम होतं म्हणून. रोज संध्याकाळी श्री कडे जायचो गप्पा मारायला. आता मी पंचेचाळीशी पार केली म्हणजे श्री ही अर्थात तेवढ्याच वयाचा. काळवंडलेला वाटला जरा. डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसत होती. माझं पोट सुटलंय, तो मात्रं आहे तसा सडपातळ आहे अजून. काळभोर डोळे कधीकाळी चमकदार होते त्याचे खरंतर पण आता अगदी निस्तेज काजव्यासारखे झाले होते. 'ये रे, किती वर्षांनी आलास, बरं वाटलं, किती दिवस आहेस'. 'अरे, आत तर येऊ दे, जमिनीच्या कामासाठी आलोय, आहे आठ दिवस'. 'मग ये की रोज गप्पा मारायला, जेवायलाच येत जा इथे रात्रीचा, सकाळी जा आपल्या कामाला'. 'चालेल, पण तुला कशाला त्रास, दोन माणसांचा स्वयंपाक उगाच'. ' असू दे रे, आई गेल्यापासून मी एकटाच जेवतोय वर्षभर भुतासारखा, आणि भातामटी करायला काय कष्टं मोठे? येत जा, वाट बघतो', मग मी मुंबईला परतेपर्यंत जात राहिलो त्याच्याकडे. बोळा निघावा आणि तुंबलेलं पाणी मोकळं व्हावं तसा श्री बोलत होता आठ दिवस. 

'मला वर्षभर भात, भाकरीसाठी लागेल एवढा तांदूळ ठेवतो आणि उरलेला विकतो. आंब्या, फणसाचे, काजू, नारळाचे येतात थोडेफार पैसे आणि सटरफटर भिक्षुकी. चाललंय. तुला गंमत सांगतो, आईकडे चाळीसेक तोळे दागिने होते, तिला तिच्या आईने, सासूने दिलेले. मरायच्या आधी पंधरा दिवस मला कडीकोयंड्याचा कुलूपबंद पितळी डबा दिला आणि हे मोड म्हणाली. आयुष्यंभर पैसा नाही म्हणून औषधं कमी घेत राहिली, मेलीही नाही आणि जगलीही नाही नीट. मला मरू दे पण तिच्या औषधाला गेले असते सगळे तरी मला चाललं असतं. मी फक्तं हसत राहिलो बघ त्या दिवशी. मला खूप कीव आली तिची. कसला मोह पडतो रे एवढा सोन्याचा? सुनेकरता ठेवले म्हणावेत तर ते ही नाही. मी शिक्षक झालो असतो तेंव्हा मोडले असते तर. परत तेवढेच केले असते मी उमेदीने. या वयात कुठे विचारू तिला, का ठेवलेस दडवून म्हणून. कदाचित तिच्या उशिरा चूक लक्षात आली असावी. उपभोग घेणं सुद्धा नशिबात लागतं रे. दोनेक आठवड्यात गेलीच ती त्यानंतर'.  

'पण एवढ्या वर्षात कधी तिनेही माझ्या लग्नाचा विषय काढला नाही, मी ही नाही. आमच्या दोघांच्या तोंडातच दोनवेळा पडेल की नाही याची भ्रांत तिथे अजून एक तोंड आणि मग निसर्गनियमाने अजून नंतरची तोंडं कुठे  वाढवणार? आणि एकदा कुठलीही भूक मेली ना की ती कायमची मरते बघ. निदान चार नातेवाईक असतील तर विषय निघतो, कुणीतरी पुढाकार घेतो, इथे कुणीच नव्हतं. कोण विषय काढणार? आणि विचारून 'नाही' ऐकण्यापेक्षा काहीवेळा नसलेलं बरं असतं बघ. होते सवय. असो! कुणालाच सांगितलं नाहीये मी हे. सोनं मोडून बँकेत ठेवलेत पैसे. व्याज चांगलं येतं. भरपूर पुस्तकं आणलीयेत, ती वाचतो दिवसरात्रं. लोकांचा समज आहे माझं अवघड आहे एकूण, मी ही तो समज दूर करत नाही. अरे इतक्या वर्षांची सवय लागलीये, मन मारून, पोट मारून जगायची, पैसा उडवता येतंच नाही बघ'. मला फक्तं आवंढा आला. इथे रोजचे जगण्याचे क्षुल्लक अडथळे आम्हांला किती भयंकर वाटतात आणि इथे कुणाच्यातरी चिकटपणामुळे, विक्षिप्तपणामुळे आयुष्यं नासून जातं तरी चेह-यावर विषादाची सुरकुतीसुद्धा नाही.

शेवटच्या दिवशी तो म्हणाला, 'एवढा खीर वड्याचा सिझन मारला की येतो मुंबईस, सुट्टी काढ, चांगले टॅक्सीने फिरू सगळीकडे, खर्च सगळा माझा हं पण. वर्षातून एकदा तरी तुझ्याकडे येणार, सगळी मुंबई झाली पालथी घालून की मग दुसरं शहर बघू'.  'तू ये तर, आधी कळव फक्तं म्हणजे तशी सुट्टी टाकायला मला' असं सांगून मी निघालो. इतक्या वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच मला त्याच्या काळ्याभोर डोळ्यात विलक्षण चमक दिसली, वर्षातून चार दिवस सुट्टी घेऊन ती कायम ठेवणं माझ्या हातात निश्चित होतं, ते मी करणार हे नक्की. 

जयंत विद्वांस

खेळ न झालेल्या रविवारचा वृत्तांत...

(आमच्या खास वार्ताहराकडून...)

सतत पडत असलेल्या पावसामुळे आज एमसीजीवर खेळ होऊ शकला नाही. आमच्या प्रतिनिधीनी उपग्रहामार्फत केलेल्या हेरगिरीमुळे घराघरात नेमकं काय घडलं याचा वृत्तांत देत आहोत. या वयात पाय घसरणं चांगलं नाहीये अर्थातच त्यामुळे निसरड्या मैदानावर खेळ झाला नाही हे बरेच झाले. ज्यांना यायचंच नव्हतं त्यांनी समूह संचालक श्री.अजय मराठे यांना 'पाऊस असल्यामुळे येत नाही' असे मेसेजेस टाकले.

दत्ता मोरे घरातल्याघरात दोनच्या जागी तीन पळण्याचा सराव करताना आढळले. खालून थोडे पाय कमी करून घेता आले तर फरक पडेल असा विचार त्यांनी बोलूनही दाखवला. गेल्या दोनेक रविवारची नेत्रदीपक फलंदाजी आणि वृत्तांतातील कौतुक यामुळे आपण मोठ्या चेंडूऐवजी लहान चेंडू हातात धरून करिअर करायला हवं होतं याची चुटपुट त्यांना लागून राहिली. पण साईझ डज मॅटर. मोठे चेंडू सगळ्यांनाच आवडतात. प्रशांत शिरोडकर हे चारपाच गाद्या कडेला लावून झेलंदाजीचा सराव करताना आढळले. दहापैकी तीनवेळा गादीवर न पडता ते झेल घेण्यात यशस्वी झाले. केतन तेरेदेसाई हे एक प्रतिज्ञा पाठ करताना आढळले. 'क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. मैदानावरील सर्व खेळाडू माझे बांधव आहेत. मैदानावरच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या चिडखोरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी ज्या टीममध्ये आहे त्यातील खेळाडू आउट नाही असे सांगून त्यांचा मान ठेवीन आणि तरीही प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. मी ग्राउंडवर कमरेतून वाकण्याची आणि जलद पळण्याची प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे'. 

'गली'तले सुप्रसिद्ध क्षेत्ररक्षक मनोज गोडबोले हे घरात पॅसेजमध्ये झेलांचा सराव करताना आढळले. नंतर आरशासमोर उभे राहून उत्तम फेक करूनसुद्धा धावचीत असूनही न दिल्यास राग, नैराश्य काबूत ठेवण्यासाठी त्यांनी योगसाधना केली. अविनाश रहाळकर एक ते शंभर आकडे न चुकता हाताच्या आणि पायाच्या बोटांवर मोजण्याचा सराव करत होते. उदा.साधारण अंकगणितात तीन रन्स काढल्यावर छत्तीस नंतर एकोणचाळीस होतात पण त्यांच्या हिशोबात ते चाळीस किंवा एक्केचाळीस होत होते. त्यांनी अजय मराठे यांना फोन लावल्यावर त्यांनी 'तू मगाचचे दोन धरले नाहीत, त्रेचाळीस होतात' असं सवयीने सांगून टाकलं. आपली अफरातफर खूपच कमी आहे याचा अंदाज आल्याने रहाळकर आनंदी झाले. मिहीर भागवत, समीर व्होरा, आकाश मेहता यांनी खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं आणि 'पाऊस पडतोय, खेळ काही होणार नाही, चला पैसे तरी छापून येऊ' असं म्हणून ते तिघेही आपापल्या घरातून घराबाहेर पडले. 

नितीन करमरकर यांच्या घरी मात्रं अत्यंत वेगळं चित्रं होतं. आजूबाजूची सगळी लहान मुलं त्यांच्याभोवती गोलाकार बसली होती.  स्वतः:चे प्रत्येकी तीन ते चार धावचीत, यष्टिचीत, झेल आणि सामना जिंकून देणा-या खेळ्या यावर ते स्वतः भाष्यं करत होते. दर वीस मिनिटांनी घरातला २०१४ साली आणलेला व्हॉलीनीचा स्प्रे जेमतेम फवारणी केल्यासारखा ते खांद्यावर मारत होते. एका मुलानी 'काका, गेले चार महिने आम्ही हेच ऐकतोय, खरे किस्से सांगा ना काही' म्हटल्यावर त्याला त्वरित घराबाहेर काढण्यात आले आणि याला परत बोलावू नका रे परत असं म्हटल्यावर इतर मुलं पण लगेच 'काका आम्हांला पण काढा ना घराबाहेर' असं म्हणत पळून गेली. मयुरेश बुधकर इंग्लंडसारखं वातावरण असल्यामुळे सतत ग्लास, बर्फ, स्कॉचची बाटली शोधत होते. बायकोनी फक्तं 'बघितल्यावर' त्यांनी 'अडुळसा कुठे ठेवलंय गं' असं विचारत बाजू सावरून घेतली. 

रोहित दणाणे आणि प्रविण देवधर घरात टोलेजंग षटकार मारायचा सराव करताना आढळले. साधारण चारसहा कपबश्या, दोन डबे आणि एक एलईडी बल्ब जमिनीवर आल्यामुळे रोहित दणाणे नंतर दरवाज्याच्या बाहेर उकिडवे बसल्याचे दिसले. सुशांत पाटील यांनी जुने दिवस आठवून त्याला स्वतः:चा डबा जिन्यात खायला दिला. चारनंतर घरात घेणार आहे असं तो म्हणाल्याचं पाटील यांनी सांगितलं. देवधर यांना झालेल्या मारहाणीच्या जागा ते गरम पाण्याची पिशवी घेऊन शेकत बसले होते. पुढचा आठवडा त्यांना कंपनी कँटीनमध्ये जेवायला लागणार असल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधीला स्काईपवर सांगितलं. नितीन अंमलदार आणि त्यांचे चिरंजीव यांचं लुटुपुटुचं भांडण चालू होतं. 'रनाउट' ही एकांकिका त्यांनी सादर केली. मुलानी शेवटी हात टेकले आणि 'बाबा, नेहमीप्रमाणे तू जिंकलास' असं म्हटल्यावर नाटक संपलं. जेवताना आणि जेवण झाल्यावर फॉर अ चेंज म्हणून ऑफिस ऐवजी घरी वामकुक्षी घेताना पण ते बॅट घट्ट धरून झोपले होते. 

श्री.अजय मराठे खेळ न झाल्यामुळे खट्टू होऊन साश्रू डोळ्यांनी खिडकीत उभे होते. डॉ.मनोज गद्रे यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून ते करुण दृष्यं पाहून त्वरित छत्री घेऊन अजय मराठे यांच्या घरी प्रयाण केले. एवढया लांबून भरलेले डोळे दिसत असतील तर चार फुटांवरून त्यांना रनाउट दिसला नसेल का? पण त्यांच्या गरीब स्वभावाचा फायदा घेऊन काही लोकांनी त्यांना मैदानावर बोलू दिलं नाही हा ताजा प्रसंग निंदनीय आहे. गद्रे यांनी फोन लावून हिंदीतून दोन पोहे आणि दोन कॉफी याची ऑर्डर दिली आणि 'मैदानावरील वाढती असहिष्णूता आणि त्यावरचे उपाय' यावर त्यांनी चर्चा केली. अजय मराठे यांनी एटीकेट्स न पाळता सलग चार जांभया दिल्यामुळे गद्रे पोह्यांचा शेवटचा घास घेऊन घरी गेले.  

नंतर उपग्रह श्रीश्रीश्री रवी उटगीकर यांच्या घरावर स्थिर करण्यात आला. पेपर वाचून झाल्यावर सारसबागेतल्या स्त्रीभक्तं बघायच्या राहिल्याचा खेद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. त्यांनी फक्तं आजची सुट्टी कशी घालवायची याची स्ट्रॅटेजी ठरवूयात म्हटल्यावर घरात एकदम गडबड उडाली. मुलानी अभ्यासाची पुस्तकं काढली, मित्राला फोन लावला आणि कॉल लागलेला नसतानाही 'मी येतोय तुझ्याकडे' म्हणून तो घाईघाईने घराबाहेर पडला. बायको किचन मध्ये गेली आणि डॉगीनी पळत येऊन भिंतीवर तीनचार वेळा डोकं आपटून घेऊन तो निपचित पडला. त्वरेने उटगीकर त्याला घेऊन (डॉगीचे) फॅमिली डॉक्टर श्री. विनायक लिमये यांच्याकडे गेले. उटगीकर यांनां बाहेर थांबायला सांगून लिमये यांनी डॉगीच्या कानात 'अरे दुस-याचं दु:खं बघावं, प्राजमधला स्टाफ प्रत्येक रविवार स्वातंत्र्यदिन असल्यासारखा एन्जॉय करतो, त्यांना सहा दिवस मानसिक त्रास असतो, तुला तर एकंच दिवस' असा डोस दिला. डॉगी बराच वेळ त्यांच्या खांद्यावर अश्रू ढाळून शेवटी उठला. प्रिस्क्रिप्शनमध्ये 'स्ट्रॅटेजी' हा शब्दं पुढचे चार आठवडे घरात उच्चारू नये, एवढंच पथ्य पाळण्याचं त्यांनी लिहून दिल्याचं कळतं. 

मंदगती गोलंदाज नंदू बापट घरात आपण ज्या टीममध्ये आहोत त्यांना जिंकायला समजा तीन धावा हव्यात तर झेल कसा नैसर्गिकरित्या सोडावा, चेंडू पायातून मागे कसा जाईल आणि संघ विजयी होईपर्यंत चेंडू कसा थ्रो करू नये याचा सराव करताना दिसले. चेहरा अत्यंत निरागस, निष्पाप वगैरे दिसण्यासाठी त्यांना अतोनात कष्ट पडले असावेत कारण चेह-याचे स्नायू दुखावल्यामुळे त्यांनी गालाला शेवटी आयोडेक्स लावलं. दुसरे अतिमंदगती गोलंदाज जयंत विद्वांस यांनी त्यांना फोन करून चेंडू अजून कसा वळवता येईल (तुझा शेवटचा कधी वळला होता? इति नंदू बापट), मिहीरच्या वेगाला आपण किती साली गाठू शकू, चंदू खिरीड यांचा आवाज नेमका कुठून येतो, त्यानी खरंच वेग वाढतो का वगैरे विषयांवर चर्चा केली. सर्वात शेवटी नंदू बापट यांनी गोलंदाजीचं मर्म सांगितलं, 'एमसीजीवर बॉल मागे गेला पाहिजे बॅट लागायच्या आधी, बाकी चेंडू वळणे, फ्लाईट देणे, (बॉल) कट करणे, चेंज ऑफ पेस या सगळ्या अंधश्रद्धा आहेत'. 

(सदर वृत्तांत हा आमच्या खास प्रतिनिधीकडून आलेला आहे. त्यामुळे काही वाद निर्माण झाल्यास संपादक त्याला उत्तर देण्यास बांधील नाहीत. प्रतिनिधीचे नाव गोपनीय आहे तरी चौकश्या करू नयेत)

जयंत विद्वांस

जास्तीत जास्ती काय होईल...

जे आपलं क्षेत्रं नाही तिथे उडी टाकायला हवी, मराठी माणूस इथे मागे पडतो धंद्यात, वगैरे ऐकायला ठीक आहे, आचरणात आणताना फाटते. बाबांच्या बरीच वर्ष सहवासात असलेला एक अण्णा होता. मणी त्याचं नाव. अतिशय गोड बोलणार. त्यानी बाबांना भरीला घातलं, आपण हॉटेल चालवायला घेऊ म्हणून. आम्ही व्यवहारी अपूर्णांक. लेबर, मेहनत त्याची, पैसे आम्ही लावायचे, पन्नास टक्के भागीदारी, असला भारी करार. वारज्याचा आताचा फ्लायओव्हर ओलांडला की शिवण्याला जाताना डाव्या हाताला एक हॉटेल होत. ब-याच जणांनी ते चालवायला घेतलं आणि तीनचार महिन्यात बंद केलं होतं. त्यामुळे मालक एकदम सेंटी झालेला कारण त्याच्या आईचं नाव होतं हॉटेलला. आम्ही मालकाकडे गेलो ऍग्रीमेंटसाठी, त्याच्याकडे अनंतवेळा केल्यामुळे मजकूर छापून तयार होता. वीस हजार डिपॉझिट आणि महिना तीन हजार भाडं (१९९५), तीन वर्षाचा करार. ऍग्रीमेंटच्या शेवटी एक पॉईंट होता. हॉटेल मधेच बंद केल्यास तीन वर्षाचं भाडं भरावं लागेल. 

ओपनिंग झालं, स्वप्नं बघून झाली. साताठ वेटर्स, दोन आचारी. कटलरी, डोश्याकरता पाच एम.एम.चं एम.एस.शीट सहाफूट बाय दोन फूट लोखंडी स्टॅन्डवर वेल्ड करून आणलं, पुढे ते बरीच वर्ष सिंगल बेड म्हणून वापरलं. फ्रिज होताच. बाकी भांडीकुंडी आणली. किटल्या आणल्या. लगेच आजूबाजूच्या वर्कशॉप्समधून चहाचा रतीबही मिळाला दोनवेळचा. फुलय्या म्हणून मेन आचारी, मणीचा माणूस. संध्याकाळी पुढे कढई लावून वडापाव. सुरवात एकदम झकास होती. पण जेम्स हॅडली चेसच्या स्टो-यात कशी माशी शिंकते तसं झालं. मणीची बायको इमर्जन्सीमधे बाळंत झाली. ती गावाला जाणार असं ठरलेलं पण जुलाब लागलेला माणूस आणि पोटुशी बाई सारखीच, एकदा कळ आली की विषय संपला. मलाही कामधंदा नव्हताच. तो म्हणाला, दोनेक महिने सांभाळशील का, घरी कुणी नाहीये माझ्या. तो आणि बायकोच फक्तं. गल्ल्यावर बसायला माझी कशाला ना असेल, तर मी जायला सुरवात केली हौसेने. सकाळी सातला हजर, सुटायला रात्री दहा. 

मजा वाटायची. बेल मारून किती रे म्हणायला. संध्याकाळी दीडेकशे वडापाव जायचे. पहिल्या दिवसापासून मी दोन रुपयाच्या कोथिंबिरीपासून हिशोब ठेवायला सुरवात केली तिथे माशी शिंकली. रोज संध्याकाळी मला अंदाजे प्रॉफिट कळायचा. दोनेक महिने बरे गेले. मग मणी कारणं सांगून आलाच नाही कधी. आचारी त्याचेच. वेटर्स आणि मालक मी, महाराष्ट्रीयन. सकाळी नाश्ता, दोनवेळचं जेवण, चहा फुकट असायचा. किती खावं माणसानी? एक कॅरॅक्टर सकाळीच दोन पाव पॅटिस, दोन वडा सांबार, एक उत्तप्पा इतका ऐवज हाणायचा. त्यांचा नाश्ता बघूनच मला आपण गाळात जाणार हे दिसायचं. तरीपण मी शांत. अण्णा लोकांचं प्लानिंग सुरेख. मला जमणार नाही बसायला म्हणून मणीनी अंग काढून घेतलं. एक दिवशी पगार घेऊन सहा वेटर्स, एक असिस्टंट आचारी गायब झाले. उरलो मी, फुलय्या, एक पोरगा आणि एक म्हातारा वेटर. तो एकदा चहा घेऊन गेला की तासभर तिकडेच. बारा पंधरा तास एकटा फुलय्या तरी काय काय करणार? तो वेटर बाहेर गेला की मी वेटर कम फडकंवाला पो-या कम कॅशिअर. तरी असे दोनेक आठवडे निघाले. 

तो पो-या पण भारी होता. एक माणूस टेबलावर बसलाय. 'चहा दे रे', 'किती', 'एक'. असे डायलॉग रोज व्हायचे. मला सांगा एक माणूस दोन चहा मागवेल का? मी त्याला सांगितलं तरी त्याच्यात काही बदल झाला नाही. एक दिवशी फुलय्यानी सांगून टाकलं, नाही जमणार म्हणून. आता आचारी कुठून आणायचा? मणीचं काहीच अडकलेलं नव्हतं. मग एका शनिवारी मी आणि फुलय्यानी शेवटचे वडापाव विकले आणि तो आठला गेला. पाव देणारा साडेनऊ दहाला यायचा पैसे घ्यायला. मी सगळं बंद करून थांबलो. त्याला खूप वाईट वाटलं. फक्तं त्याचे पैसे देण्यासाठी मी दोन तास थांबलो त्यामुळे त्याला खूप भरून आलं. 'कोई कोई जगा ऐसाच रह्यता साब, चलताच नही, मिलेंगे कभी फिर, पैचानोगे ना?' असं म्हणून तो गेला. दुस-या दिवशी मी टेंपोतून सगळं सामान घेऊन आलो. आता प्रश्नं मालकाला जाऊन सांगायचं. तो बिल्डर होता. त्याच्याकडे मी आणि बाबा लुनावर गेलो. त्याच्या घराकडे वळायच्या आधी थांबून काय काय बोलायचं ते ठरलं. बाबांना पैशाचं टेंशन आलेलं. बीपी वाढलं असावं. म्हटलं जाऊ तर, एवढं काय घाबरायचं, जास्तीत जास्ती काय होईल ३३ महिने x तीन हजार वजा डिपॉझिट वीस हजार द्यावे लागतील. 

त्यानी खूप थयथयाट केला. एग्रीमेंटप्रमाणे मी वागणार वगैरे चालू झाला. ट्रूथ इज अ शॉर्टकट. आम्हांला कसा अरबी हॉर्स लागलाय ते त्याला सांगितलं. मग जरा निवळला तो. पाच त्यानी दिलेच नाहीत, पंधरा पाच पाच करून दिले त्यानी दोन वर्षात. केवळ त्या माणसाचा चांगुलपणा आणि आमचा खरेपणा यामुळे फटका बसला नाही. सामान आणलं होतं ते पैसे द्यायचेच होते. एक नविन अनुभव पंचवीसेक हजारात गाठीशी आला. तेंव्हापासून दोन गोष्टी शिकलो. खरं बोललं की समोरच्याला अपील होतं आणि जास्तीत जास्ती काय होईल याच्या शक्यता कळल्या की तोटा किती ते कळतं मग तो भरून कसा काढायचा याचं प्लॅनिंग करता येतं. तसा मी दीर्घद्वेषी आहे. माझे पैसे ब-याच जणांनी बुडवलेत पण नाही म्हणता येत नाही त्याला काय करणार. त्यापैकी एकानी त्याच्या प्रॉब्लेम्समुळे जीवनयात्रा संपवली, मरणान्ती वैराणी. बाकी दोन आणि मणी कधी चुकून तावडीत आले तर मी सोडणार नाही एवढं निश्चित. बहोत मजा आयेगा खेलका. 

जास्तीत जास्तं काय होईल, लोक मला खुनशी म्हणतील, म्हणू देत. व्हल्चर इज अ पेशंट बर्ड अँड आय लाईक टू वेट. ;) :) 

जयंत विद्वांस 

शिवरंजनी...

'थोडा है थोडेकी जरुरत है' हे गाणं' मला फार आवडतं. कितीही मिळालं तरी माणसाची ओढ संपत नाही. 'अजून' या शब्दाला मरण नाही. जगणं, खाणं, पैसा, संपत्ती, इंद्रियसुख, सत्ता 'अजून' हवी असते. व्हिडिओकॉनचे धूत म्हणाले होते, 'कितीही मोठं घर असलं तरी एक खोली कमी पडते आणि पगार कितीही असला तरी नेहमी हजार रुपयांनी कमी पडतो'. कोंड्याचा मांडा करून जगणारी पिढी आता दुर्मिळ प्रजातीत मोडेल. कर्ज उपलब्ध आहे म्हणून घेणं वाढलं आणि नंतर पर्यायाने देणं वाढलं, गरजेसाठी घेणारे कमी झाले. आहे त्यात सुखी राहणं याकरता कसब लागतं. आहे म्हणून उधळण केली तर छानच दिसते की, पण असलं तरी मोजकं निवडून पण काही सुंदर करता येतं. माझी आजी एक वाटी चक्का होईल एवढ्याच दह्याला फाशी द्यायची आणि फडक्याला बोटं पुसावीत तेवढं जेवताना वाढायची सगळ्यांना, आता चार किलो आणून आंबे, सुकामेवा घातलात तरी तशी चव येणार नाही. सात शुद्ध स्वर, चार कोमल आणि एक तीव्र असा डझनभर ऐवज आहे म्हणून उधळण न करता निगुतीने कसं करायचं हे भूप आणि शिवरंजनीत बघायला मिळेल. 

भूप, शिवरंजनी आणि सामान्य माणसाचा खिसा यात साम्यं काय तर तिघातही 'म' 'नी' नाही, भूपात शुद्ध गंधार आणि शिवरंजनीत कोमल एवढाच, काय तो फरक. जुन्या लॉईड, रिचर्ड्सच्या विंडीज टीममध्ये एकटाच गोरा असलेला लॅरी गोम्स उठून दिसायचा तसा इथे सगळ्या शुद्ध स्वरातला कोमल गंधार लॅरी गोम्स सारखा आहे. शिवरंजनी हा अतिशय करूणरस ओतणारा राग आहे. रागात, दु:खात माणूस जसा तिरमिरत निघतो तसं इथे आहे. काही वगळल्याची भावना या 'रागा'ला पण होत असावी का? दुवा तोडावा तसं सारेग नंतर म कडे दु:खी नजरेने बघत पुढे जायचं आणि नंतर नी ला टाटा करून जावं लागत असल्यामुळे खंतावलेला राग असावा का हा? मोजक्या स्वरात असल्यामुळे याच्या सुरावटी कदाचित लवकर ओळखता येत असाव्यात किंवा त्यातल्या चाली सारख्या वाटत असाव्यात.

वाटव्यांची दोन गाणी सापडली शोधता शोधता या रागात, नावडीकरांनी म्हटलेलं 'रानात सांग कानात' आणि वाटव्यांनी म्हटलेलं 'वारा फोफावला', अजूनही असतील. वर्तुळाकार चेह-याचे नावडीकर आम्हांला मराठी शिकवायला होते सहावीला पण ते भावगीत गायक आहेत हे कुठे तेंव्हा कळायला. ते भावगीत गायन मागेच पडलं आता. एखाद्या अल्बमच्या जोरावर आणि दोनचार तुरळक हिट गाण्यांवर जगणारे गायक आले. सगळी बत्तीशी दाखवून, खूप त्रास होत असल्यासारखी तोंडं करून, बद्धकोष्ठ झाल्यासारखे हावभाव करून, शब्दं थुंकल्यासारखे बाहेर फेकणारे गायक आता जोरात आहेत. तिस-या आघाडीचं सरकार जितके दिवस टिकायचं तेवढे दिवस त्यांची गाणी कानावर पडतात म्हणजे तशी व्यवस्था असते. पेटीच्या मागे बसलेले तोळामासा वजनाचे वाटवे कुठलाही आव न आणता भाव असलेलं गीत गायचे. माणिक वर्मांचं 'सावळाच रंग तुझा' त्यातलंच. एक धागा सुखाचा' वर मी मागे लिहिलं आहे त्यामुळे परत इथे लांबी वाढवत नाही. त्या हातमागाच्या ठेक्यावर गाणारे हताश राजा परांजपे, गदिमांच्या शब्दातलं जीवनसार आणि बाबूजींचा आवाज असा सगळा तो सुरेल योग आहे. जोगांनी संगीत दिलेलं 'बाजार फुलांचा भरला', निसर्गराजा ऐक सांगतो' हे संवादगाणं, भीमसेनजींचं 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा', राम कदमांचं 'दिसला ग बाई दिसला' आणि अतिशय सुंदर ठेका असलेलं हृदयनाथ मंगेशकरांचं आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे सगळी शिवरंजनी मधली गाणी आहेत.


'बाबुल मोरा' लिहिणा-या बहादूरशहा जफरचं 'लाल किला' मधलं रफीचं 'न किसकी आँख का नूर हू' या रागातलं सुंदर गाणं आहे. वैषम्यं, विफलता, हताशपणा शब्दात तर आहेच पण चालीत पण आहे. रफीची यातली अनेक गाणी  मला सापडली. 'गझल' मधलं 'रंग और नूरकी बारात किसे पेश करू', 'सूरज'मधलं 'बहारो फूल बरसाओ', 'ब्रह्मचारी'मधलं 'दिलके झरोकोमें तुझको बिठाकर', लता बरोबरची तीन 'प्रोफेसर' मधलं 'आवाज दे के हमे तुम बुलाओ', 'जनम जनम के फेरे मधलं 'जरा सामने तो आओ छलिये' आणि अंजाना'मधलं 'रिमझिमके गीत सावन गाये', लताची पण अनेक लोकप्रिय गाणी आहेत यात - 'जंजीर'मधलं 'बनाके क्यू बिगाडा रे', घुंघट'मधलं   'लागे ना मोरा जिया', 'तुम्हारे लिए' मधलं जयदेवचं 'तुम्हे देखती हूँ, तो लगता है ऐसे', 'एक दुजे के लिए'चं 'तेरे मेरे बीचमें', 'मेहबूब की मेहंदी मधलं 'जाने क्यू लोग मोहब्बत करते है', 'आँखें' मधलं 'मिलती है जिंदगीमे, मोहब्बत कभी कभी', लता मुकेशचं 'संगम'मधलं 'ओ मेरे सनम'. लताचं आणि किशोरचं एक टँडम आहे 'मेहबूबा'चं 'मेरे नैना सावनभादो, फिर भी मेरा मन प्यासा', करूणरस तर यात दिसतोच पण हॉन्टेड मटेरिअल पण यात आहे. जुन्या 'बीस साल बाद'चं लताचं 'कही दीप जले, कही दिल' पण यातलंच आहे. 'जिस देशमें गंगा बहती है'मधलं अप्रतिम 'ओ बसंती पवन पागल' यातलंच आहे. डोंगर कुठला आहे माहीत नाही तो पण तो डोंगर आणि पद्मिनी छान दिसते या गाण्यात.


बाकी मग 'साथी'मधलं मुकेश, सुमन कल्याणपूरचं 'मेरा प्यार भी तू है' आहे. शम्मीकपूरची नक्कल केलेल्या राजीव कपूरच्या पदार्पण चित्रपट 'एक जान है हम'चं टायटल सोंग 'याद तेरी आयेगी' आहे, अन्वर, शब्बीरकुमार, मोहम्मद अझीझ भाग्यवान माणसं, हिमेश रेशमियाच्या तुलनेत खूप बरी म्हणा, नाकात म्हणूनही, केवळ रफीची नक्कल म्हणून ही माणसं चालली. 'मर्द'मधली गाणी(?) ऐकून अझीज आणि शब्बीरकुमारनी कान मेण ओतून बंद केले असते. प्यार झुकता नही'चं शब्बीर लताचं 'तुमसे मिलकर ना जाने क्यू' याच रागात आहे. एरवी नाक मुरडणा-या गायिकेला हे गेंगाणे आवाज का खटकले नाहीत याचं आश्चर्य वाटतं. 'कर्मा'चं किशोर कविता कृष्णमूर्तीचं 'ना जैय्यो परदेस' यातंच आहे. 'प्रेमरोग'चं 'मेरी किस्मतमें तू नही शायद' यातलंच आहे. वाडकर लागले की मी गाणं म्यूट करतो. कुठलंही गाणं त्यांच्यावर चित्रित झालंय असंच गातात ते, हिरो ओळखता येणार नाही तुम्हांला. एक अपवाद, 'सत्या'चं 'सपनेमें मिलती है' पहिल्या फटक्यात आवडलं होतं मला. माधुरीला हिट एन हॉट करणारं 'बेटा'मधलं 'धक धक करने लगा' पण यातलंच आहे.


वेळ झाला की कधीतरी बैजवार 'मुकद्दर का सिकंदर'वर लिहीन. त्यातली सगळी गाणी सुंदर होती. त्यातलं 'ओ साथी रे' शिवरंजनीत आहे. सात विभागात निवड झाल्यामुळे असेल एकही फिल्मफेअर नव्हतं याला. अतिशय सुंदर व्यक्तिरेखा त्यात छोट्या छोट्या तपशिलांनी उभ्या केल्या आहेत. राखीला मनोमन चाहणारा, मालकीण म्हणून तिच्याबद्दल आदर वाटणारा अमिताभ. त्यानी तिकिटं घेतलेली राखीला आवडलेलं नाहीये, त्याच्या रस्त्यावर गाण्याबद्दल ती कुचकं बोलून माईक त्याच्याकडे देते. मितभाषी सिकंदर नंतर जे बोलतो ते त्या गाण्यासाठी परफेक्ट इंट्रो आहे.डबडबलेल्या डोळ्यांनी गाणारा अमिताभ, काहीही माहीत नसलेला विनोद खन्ना आणि कोड्यात पडलेली 'मेमसाब' राखी. जोहराजानचा रोल भावखाऊ होताच पण राखीचा रोल ही छान होता त्यात. विविध भावना तिनी काय सुंदर दाखवल्यात. परिस्थिती पालटल्यावरची गंभीर, विनोद खन्नाचं आहे असं समजून मिळालेल्या पत्रानंतर झालेला आनंद, शेवटी मेमसाबला झालेला उलगडा. बाई एखाद्याचा तिरस्कार कसा करते हे बघायचं असेल तर तिची मेमसाब बघावी यातली. 


आणि आता मला या रागात आवडलेलं शेवटचं गाणं. 'मेरा नाम जोकर' यशस्वी न होण्याचं एक कारण जसं अपप्रचार होतं तसंच थकलेला आर.के.हे पण होतं. आधीच तो सहा वर्ष चालू होता, लेंग्दी होता, त्याचं वय जाणवतं. पहिले दोन प्रेमभंग फार वरवरचे वाटतात त्यात मला तरी. सगळ्याजणी एकेक करून आयुष्यातून निघून गेल्यावर आलेलं एकाकीपण पद्मिनी गेल्यावर जास्ती जाणवतं. सिमी ग्रेवालच्या सोडून जाण्यात दु:खं फार नव्हतं, ते होणारच होतं, मुळात ते एकतर्फी प्रेम होतं. रशियन सुंदरी मरीना परत जाण्यात ती परदेशी आहे हे मनाला समजवायला कारण होतं पण प्रसिद्धीसाठी स्टेपिंग स्टोन करून पुढे गेलेली पद्मिनी जरा जास्तीच जिव्हारी लागते. अंधारात डोळयांवर गॉगल लावून बसलेला आर.के., त्याच्याजवळ राहिलेला 'तो'च, मागे ती रंगीत जळमटं आणि त्याच्या हातातला तो छोटा जोकर तो खाली सोडतो, तो चालतो हे तेंव्हाच कळतं. या गाण्याची चाल आर.के.चीच होती. एकटेपण फार भीषण असतं. हात विस्फारून सगळीकडे धावणारा आर.के. डोळे ओलसर करतो. सोडून गेलेली माणसं त्याला बोलावतायेत असा निव्वळ भास आणि त्या रंगीत जळमटलेल्या एकांतातून तो आरश्याच्या तुकड्यात दिसणा-या पद्मिनीपाशी येऊन थबकतो. 'जाने कहां गये वो दिन'....


आयुष्यं जगावं लागतंच. सगळी सप्तकं, साती सूर लाभतीलच असं नाही. भूप, शिवरंजनी सारखं काही वगळून तुटपुंज्या स्वरांचं काही नशिबात आलं तरी त्यातून स्वर्ग निर्माण करता यायला हवा. आनंद महागडा गोल्फ खेळून पण मिळतो आणि पत्त्यांचा बंगला करून पण मिळतो. शेवटी तात्पर्य काय, प्रत्येकाच्या पेटीचे सूर निराळे. काहींच्या काही स्वरपट्ट्या रिकाम्या असल्या म्हणजे रुसायचं नसतं. आपल्या आवडीची सुरावट त्यावर वाजत नसेल तर ते दु:खं जोपासण्यापेक्षा जी वाजतीये ती ही वाईट नाही हे समजून घेण्यात जास्ती आनंद आहे. :)


जयंत विद्वांस

Wednesday, 3 August 2016

त्रास...

संक्रांत, अक्षय्यतृतीया, गुढीपाडवा, नवरात्र, दसरा, दिवाळी या काळातल्या पेपरच्या गुळगुळीत कागदावरच्या पुरवण्या मी बघत नाही. त्रास होतो. एकाचढ एक देखण्या बायका सुळसुळीत साड्यातून अंगावर सोन्याचा पत्रा मारल्यासारखे सोन्याचे, हि-यामोत्याचे दागिने घालून चमकत असतात. डोळ्यातून, नाकातून, अंगातून व्हायरल फिव्हर झाल्यासारख्या गरम वाफा काढतात. आवाक्याबाहेरची इलेक्ट्रॉनिक उत्पादनं डिस्काउंटेड किंमतीलाही महाग वाटतात, एकूणच त्रास आहे सगळा. आजवर चुक्कूनसुद्धा मी बायकोला ही साडी किंवा हा दागिना तुला चांगला दिसेल असं म्हटलेलं नाही. वेळ काय सांगून येते का मला सांगा, आपण नेहमी सावध असावं.

सकाळी जरा कुठे म्हटलं फेबु बघावं तर साड्यांचा सेल लागल्यासारखे फोटो दिसायला लागले. I am an Indian lady n I love to wear a saree अशा ओळीनी सुरवात असलेला पॅराग्राफ आणि खाली पावडर बिवडर लावून काढलेले देखणे फोटो. तो पॅराग्राफ कुणी वाचला असेल असं वाटत नाही. खाली असलेला फोटो बघायचा की वरचं इंग्रजी वाचणार माणूस. एरवी डिपीत ब-या वाटणा-या बायका एकदम सुरेख वगैरे दिसायला लागल्या. बरं त्यात एकमेकींच्या माना टयागल्यामुळे फोटोला कमतरता नाही. जीनी आधी टाकलाय त्यापेक्षा सरस साडी निवडायची वगैरे चुरस असणार. गॉर्जसचं स्पेलिंग मी आपलं गुगलवरून कॉपीपेस्ट करून ठेवलं पण म्हटलं सगळ्यांना गॉर्जस कसं टाकणार. एकीला टाकावं तर दुसरीला वाटणार, 'कॉमन कॉमेंट आहे, मग मरू दे, मला वाटला मलाच आहे' म्हणजे जरा कुठे प्रयत्नं करावेत इनबॉक्सात तर तिथे पत्ता कट होणार. 

अप्रतिम, सुंदर, गॉर्जस, क्या बात है, मस्तं यापुढे माझी गाडी जाईना. बरं एकीला अप्रतिम लिहिलं आणि एकीला गॉर्जस लिहीलं की रुसवे फुगवे होण्याची शक्यता म्हणजे परत लाईक्स, कॉमेंट्सची वानवा. कसं करावं माणसानी. सेव्ह करावेत म्हटलं फोटो तर मेमरी शिल्लक नाही. घरी चुकून एवढ्या देखण्या बायका एकदम दिसल्या फोनात तर अन्न तुटणार. 'माझा कधी फोटो सेव्ह करून निदान वॉलपेपर तरी ठेवलाय का?' 'त्यातल्याच एकीला सांग डबा द्यायला, चार दिवस तरी टिकेल का बघ, फोटो सेव्हतोय मोठा'. त्यात तिनी वाचावं कुठे सुंदर, अप्रतिम लिहिलेलं म्हणजे संपलं. 'मला गजरा तरी आणलास का मधे एवढी पैठणी नेसले तेंव्हा'. 'अगं लक्षात नाही राहिलं'. 'कसं राहील? फोटो बघण्यात वेळ जातोय ना एफबीवर'. 'पण आठवण केली असतीस तर काय बिघडलं असतं?' 'आठवण केल्यावर काय कुणीही आणेल, मला पाय आहेत की आणि, मी नाही का जाऊन आणू शकत पण कौतुक लागतं'. म्हटलं ना त्रास आहे नुसता. 

पण खरं सांगू का बाई साडीतच सुंदर दिसते. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, वहिदा रेहमान, नूतन, रेखा, स्मिता पाटील, विद्या बालन किती सुंदर दिसतात साडीत. सुंदरता बघणा-याच्या नजरेत असते म्हणतात. पण फेबुवर कसं कळणार म्हणून कॉमेंट टाकतात. पण खरी कॉमेंट किंवा पावती एकंच. बाई समोर साडी नेसून उभी आहे. ती अपेक्षेने आपल्या माणसाकडे बघते तेंव्हा त्याच्या डोळ्यात तिला ते अपेक्षित असतं. तिथे शब्दांची गरज नसते. ती नजर एकदा मिळाली की ती मनातल्या मनात गिरकी घेते आणि मग तिला सुखावलेली होईन वावरताना बघावं. :) त्या आनंदाला मोजता येत नाही. 

झुक्या पुरुषवर्गाचा एवढा विचार करेल असं वाटलं नव्हतं. जरा चारपाच देखणे फोटो निवडून गप्पा सुरू करायला हव्यात. नोकरी काय छोकरी काय, शोधताना अनेक ठिकाणी अर्ज केलेले बरे, कुठे काम होईल हे सांगता येणार नाही. :P ;)

जयंत विद्वांस 

 

 

काळ आला होता पण....

जुलै महिना म्हटला अंगावर काटा येतो माझ्या. ती घटना आठवली की तसं काही घडलं होतं यावर माझा स्वतः:चाच विश्वास बसत नाही. पाण्यात जायची मला भीती तेंव्हापासून वाटत आलीये. घडून गेलेल्या घटनेचा छाप आपल्या मेंदूवर पडत असावा. दातात अन्नाचा कण रुतावा तसे प्रसंग अडकून पडतात मेंदूत. कांजिण्या झालेल्या माणसालाच नागीण होते असं म्हणतात कारण तो विषाणू अनेक वर्ष शरीरात सुप्तावस्थेत पडून असतो आणि अतिउष्णतेने तो जिवंत होऊन प्रवासाला सुरवात करतो म्हणून एखादी नस तुरीच्या शेंगेसारखी फोड आल्यासारखी दिसतेआणि त्रास होतो. तसा त्या घटनेचा विषाणू माझ्या डोक्यात अडकून पडला असावा. पाण्याशी किंवा आगीशी खेळू नये असं म्हणतात हे अनुभव आल्याशिवाय कळत नाही माणसाला. 

तरी चौतीस वर्ष झाली आता जवळपास त्या घटनेला. मी नववीला असेन. असाच धो धो पाऊस होता सलग दहाएक दिवस. नदी मोठी होती, गटार नव्हती झाली. तेंव्हा सायकली काढून पाणी बघायला जाण्यात पण आनंद होता. लकडीपूलावर उभं रहायचं आणि खाली बघायचं. तांबडं पाणी पायाखालून न भिजवता जातंय ते भारी वाटायचं. दोनेक मिनीटांनी पूल पुढे चालला आहे असं वाटायचं आणि डोळे गरगरायचे. कमानीला टेकलेलं पाणी वर उडायचं आणि दव पडल्यावर कापड जसं ओलसर होतं तसे कपडे दमट व्हायचे. तेंव्हा काही रेनकोट, जर्किन्स वगैरे ऐष नव्हती. हुडहुडी भरली की परत सायकली हाणत परत निघायचं. सगळी थंडी पेडल मारून गायब व्हायची. मग दुस-या दिवशी शाळेत पाण्याच्या हाईटच्या अफवा पसरायच्या. प्रत्येकानी बघितलेली पातळी हीच उच्च असायची पण एकाच्याही पातळीत पाणी पुलावरून गेलं असं नसायचं. अंग ऐकीव गप्पांचं पेव फुटायचं. सांगणा-यानीही न पाहिलेली माणसं कृष्णा, कोयना, गोदावरी, मुळा, मुठेच्या पुरात कशी उड्या मारायची याची माहिती चघळली जायची. 

कुठेतरी असलं धाडस आपल्याला येत नाही याची खंत वाटल्यामुळे माणूस ती गोष्टं अजून तिखट मीठ लावून त्यात स्वतः ते बघितलं असल्याची लोणकढी ठोकून सांगतो. तर काही मुलं आणि मी आमचं असं ठरलं की आपण भांबुर्ड्यातून नदीवर जाऊयात. शनिवारी शाळा तशीही दुपारीच सुटायची. दप्तरं मामाकडे भिकारदासला ठेवली आणि आम्ही चारपाच जण निघालो. नव्या पुलावरून खाली आलो आणि तिथे रोडलाच सायकली लावल्या. आत्ताच्या सावरकरभवनच्या अलीकडे शनिवारात जायला एक दगडी कॉजवे आहे खूप जुना. एरवी तो दिसायचा पण पाणी सोडलं की तो गायब व्हायचा. त्याच्याकडे जायला दगडी पाय-या आहेत भक्कम. त्या कॉजवेवरून चालत किंवा सायकल घेऊन पलीकडे जायचं पाण्यातून हा एक डफ्फड खेळ तेंव्हा खेळायला मजा यायची. पाणी लोटायचं, मग कडेनी जाणारा कुणी मोठा माणूस हात द्यायचा. 

तर आम्ही सगळे गेलो कॉजवेवर. घोट्यापर्यंत पाणी असेल. त्यात पाय ठेऊन उभं राहिल्यावर पुढं ढकलल्यासारखं व्हायचं पण मजा येत होती. हळूहळू पाणी वाढायला लागलं. गुडघ्याच्याखाली वीतभर आलं तरी आम्ही तसेच उभे. एकतर कॉजवेच्यामध्ये त्यात पावसालाही सुरवात झाली बारीक बारीक. आमच्यातल्या एकाची फाटली दीड हात, त्यानी सांगितलं, आम्ही सांगितलं नाही एवढंच. माझे पाय लटपटायला लागले. बुडताना माणूस वाचवणा-याला पण मिठी मारून बुडवतो असं वाचलेलं. आमच्या दोस्ताचा तोल गेला, कॉजवेचा काठ कुठे ते कळेना. पडणार या भीतीनेच तो लटपटला आणि पडला. माझा हात धरल्यामुळे मी ही पडलो आणि पुढे काय होणार या भितीनी ओरडायला सुरवात केली. कॉजवेवरून आम्ही खाली काही सेकंदात गेलो असू. त्यानी हात सोडवून घेतला. मी आपला पुढेच चाललोय. तो कडेनी लावलेल्या दगडाला अडकला आणि त्यानी ओरडायला सुरवात केली. पाणी माझ्या उंचीचं असावं. पण मला पोहता येत नाही. त्यात कपडे भिजलेले, वरुन पाऊस, पुढे काय होणार ही भीती. नाकातोंडात पाणी जायला लागलं. दोन माणसं पळत येताना दिसली एवढाच काय तो दिलासा पण मी हळूहळू पुढेच जात होतो. 

तोंडात शेवाळं, अंगाला घाण चिकटत होती. पाणी अगदी गळ्यापर्यंत आलं. मी धीर सोडलेला होता पूर्ण. कॉजवेपासून साधारण पन्नास फूट पुढे आलो असेन, म्हटलं सकाळी बहुतेक संगम पुलावर फुगलेला मिळणार मी. तेवढ्यात एक माणसानी उडी मारलेली मी पाहिली. स्पीडला येत होता तो पाण्यात. जवळ येऊन त्यानी माझं बखोट धरलं आणि प्रवाहाच्या विरुद्ध चालत मला खेचत आणला. कॉजवेवर आल्यावर दगडी पाय-यांवर बसलो. भितीनी अंग थरथर कापत होतं नुसतं. सगळ्या बाजूंनी माणसं बोलत होती. दोस्त लोक चिडीचूप एकदम. मला रडूच फुटलं. पावसात कपडे स्वच्छ झाले. पाऊस थांबल्यावर सायकली काढल्या, दप्तरं घेतली आणि सरळ सगळे आपापल्या घरी आलो, कुठेही काही बोलायचं नाही या बोलीवर. घरी सायकलची चेन पडल्यामुळे पडलो असं सांगितलं. कपडे खराब झालेले, फाटलेले, अंगाला शेवाळाचा वास. गरम पाण्यानी अंघोळ करुन पण भीतीची हुडहुडी जात नव्हती. तेंव्हापासून मी धरणातून पाणी सोडलेला फोटोसुद्धा लांबून बघतो. 

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, देव तारी त्याला कोण मारी वगैरे म्हणींचा अर्थ तेंव्हा कळला. आयुष्याची दोरी बळकट म्हणून वाचलो. मरताना म्हणे शेवटच्या क्षणी आयुष्य डोळ्यासमोर स्क्रोल होतं. मला भीतीनी असेल पण तसं काही झालं नाही म्हणजे मी मरणार नव्हतो एवढं नक्की. तसं काही झालं असतं तर कॉजवेला तुझं नाव दिलं असतं असं दुस-या दिवशी मित्रं म्हणाला होता. पण मी क्रेडिट घेणारा माणूस नाही म्हणून 'मी ढकलतो तुला, तुझं नाव लागू दे' म्हटल्यावर परत एकदा आम्ही एकमेकांचे कपडे फाडले तो भाग वेगळा. :)

जयंत विद्वांस 

-------

(सदर पोस्ट ही पूर्णपणे काल्पनिक असून ती कुठल्याही प्रकारे माझ्या आयुष्याशी कणभरही संबंधित नाही याची कृपया नोंद घ्यावी. पुढेमागे आत्मचरित्रं लिहीन म्हणतोय. ओ हेन्री शॉर्ट स्टोरीज करता प्रसिद्ध होता तद्वत माझं आत्मचरित्रं कदाचित शॉर्टोबायोग्राफी म्हणून साहित्यात नविन पायंडा पाडेल इतका मजकूर अल्पं असेल. थोरामोठयांच्या बालपणात काही ना काही क्रांतिकारक, धाडसाची घटना घडलेली असतेच. टिळकांची शेंगांची टरफलं, गावसकर पाळण्यात बदली झाला तसं माझ्या बालपणात मी जन्माला आल्यावर सतत आठ दिवस रडत होतो, ही घटना सोडल्यास दुसरी मोठी घटना नाही. माझा आवाज बंद करायला किती हात शिवशिवले असतील देव जाणे. पण मग पाने भरणार कशी आणि लोक मला थोर समजतील का या दुहेरी चिंतेने मला सतत ग्रासलेले आहे म्हणून हा खटाटोप. खरंतर पानशेतच्या पुरात सापडलो असंच लिहिणार होतो पण खोटं तरी किती बोलणार ना. 

कुणाला असे स्वतः:च्या आयुष्यातले घडलेले, न घडलेले धाडसी प्रसंग लिहून हवे असल्यास इनबॉक्सात संपर्क साधावा. दर खालीलप्रमाणे :

बालपणातले प्रसंग (इयत्ता तिसरी ते दहावी) : एक पानी प्रसंग - रु.तीनशे फक्तं 
मध्यमवर्गीय लो बजेट साहस : दोन पानी प्रसंग - रु.पाचशे फक्तं
दाक्षिणात्य सिनेमांच्या पठडीतले साहस : तीन पानी प्रसंग + त्या प्रसंगात मी सोबत असल्याचा उल्लेख करणे कायद्याने बंधनकारक - रु.हजार फक्तं

पान साईझ ए फोर, फॉण्ट साईझ अकरा. प्रेमभंगावरच्या गहिवर आणणा-या कविता पाठपोट कागदावर किलोच्या भावात मिळतील. 

अत्यंत महत्वाची सूचना : पैसे मिळाल्यावर'च' लेख मेल केला जाईल. 'च' हे अक्षर ठळक टायपातले आणि बुडाला व्दिरेखांकित केलेले आहे असे समजून वाचावे)

जयंत विद्वांस 

इगो हर्ट नही करनेका...

पुलं म्हणतात तसं माझ्याबतीत हा अनुभव मला अनेकवेळा आला आहे. कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर वेटर पहिल्या फटक्यात मला अटेंड करत नाही. हा काय टिप देणारे असा विचार माझ्या तोंडाकडे बघून निश्चितच त्याचा मनात येत असणार. आता एखाद्याचा चेहरा तसा असेल तर त्याला कोण काय करणार. हातात आयफोन, डोळ्याला अरमानीचा गॉगल, रेमंडचा सूट घालून शोफर ड्रिव्हन बीएमडब्ल्यू मधून जरी मी उतरलो उद्या मॅरियट किंवा मेरिडियनला तरी तिथला माणूस धावत येऊन माझं स्वागत वगैरे करणार नाही याची मला खात्री आहे. हल्ली काय कुठलीही माणसं बीएमडब्ल्यूतून फिरतात या विचारानी तो ड्रायव्हरकडे अतीव करुणेने बघेल. नुसतं हॉटेल असं नाही, पीएनजी, रेमंडचं शोरूम, टीव्ही, मोबाईलची शोरूम, हॉटेल आराम, अमुकतमुक अँड सन्स किंवा नविन स्टाईलचं वामा, सावनी असं त्रोटक नाव धारण करणारं कुठलंही कपड्याचं दुकान, बँक, सलून यापैकी कुठल्याही ठिकाणी मला कुणी ढुंकूनही विचारत नाही. नक्षत्रंगुण दुसरं काय. 

मागे एक बँकेत गेलो होतो तर मी काहीही न विचारता एका क्लार्कनी मला 'लोन फॉर्म पलीकडे मिळतील' सांगितलं होतं, एवढा कर्जबाजारी चेहरा आहे माझा हे मला पहिल्यांदाच कळलं त्यादिवशी. एकदाच एक मिनिटासाठी फक्तं भरून आल्यासारखा अनुभव आला होता मला. लक्ष्मीरोडवरच्या एका शोरुममध्ये त्या युनिफॉर्ममधल्या दरवानानी प्रचंड चपळाईने माझा हात हँडलला जायच्या आत तो काचेचा दरवाजा उघडला होता. म्हटलं जाताना याच्याबरोबर सेल्फी काढावा, दुर्मिळ गोष्टीचं अप्रूप असतंय बघा माणसाला. पण माझा तो आनंद एक जानेवारीच्या संकल्पांइतकाच अल्पकाळ टिकला. मला निदान लांब तरी जाऊ द्यायचं होतं. तो दुस-या कलीग दरवानाला म्हणाला, 'पुल आणि पुश कळत नाही लोकांना, दरवाजा तुटण्यापेक्षा आपणंच उघडलेला बरा'. आत्तापर्यंत कर्जबाजारी, ऐपत नसलेला चेहरा होता, आता तर माझ्या साक्षरतेवरपण लोकांना शंका येऊ लागलीये ह्याची जाणीव झाली. 

तर एकदा 'जयहिंद'ला गेलो होतो. गेल्या वीसेक वर्षात मी शर्टपॅंट शिवून घेतलेला नाही. आपण कितीही चांगलं कापड आणा, टेलर एकतर सातवीतल्या मापाचा नाहीतर वाढत्या अंगाचा शिवतो म्हणून मी तो प्रकार कधीच बंद केला आहे. बदलापूरच्या एका टेलरनी आमच्या काकांना चक्कर आणायची बाकी ठेवली होती मागे. लंगोट शिवलेले. नाडीचे तीन राऊंड होतील कमरेला, ते एक ठीक आहे नाडी कापता येईल पण किती मोठा शिवावा? दुपटं म्हणून चाललं असतं. काका चिडून त्याच्याकडे गेले. त्यानी शांतपणाने सांगितलं, 'जरा वाढत्या अंगाचेच शिवलेत'. तर मी आणि मित्रं 'जयहिंद'ला गेलो, जातानाच माझं ठरलेलं असतं काय घ्यायचं ते. उगाच ढीग काढायला मला फार गिल्टी वाटतं. पँट मळखाऊ रंगाची, शक्यतो निळी आणि चेक्सचा शर्ट इतका सिंपल चॉईस असल्यावर वेळ कशाला लागतोय. तेंव्हा ब्लॅक किंवा नेव्ही ब्ल्यू पँटवर व्हाईट शर्टचं वेड होतं मला. आम्ही गेलो होतो जीन घ्यायला. सेक्शन कळेपर्यंत समोर जे तागे लावलेले असतात ते बघत होतो. 

वरच्या अंगाला एक मस्तं व्हाईट कापड होतं. त्याच्यावर नक्षी होती एम्बॉस केल्यासारखी. म्हटलं यावेळा कापड घेऊन शिवावे शर्ट. खालचे एकदोन चेक्स बघितले. अतिशय नाखुषीने तो दाखवत होता. म्हटलं, 'वरचा व्हाईट दाखवा हो तो'. मयसभेत दुर्योधनाला अपमान एवढा जिव्हारी का लागला याची जाणीव मला झाली. लक्ष्मीरॊड, पुणे, या पत्त्याला जागून तो म्हणाला, 'तो महाग आहे'. आजूबाजूला कुणी नव्हतं, त्यामुळे इन्सल्ट मर्यादित राहिला होता. 'तुम्ही दाखवा तर'. त्यानी नाईलाजाने ती गुंडाळी काढली. सगळा अपमान गिळून मी विचारलं, 'फुलशर्टला किती लागेल'. 'अडीच'. फॅमिली कोर्टात एकमेकांचं तोंड बघायची इच्छा संपलेली जोडपी बोलतात तसा तुटक संवाद सगळा. मी उगाच आपल्याला काही कमी नाही असा आव आणत मला एक, भावाला एक असे अडीच मीटरचे दोन पीस कट करून घेतले. आता तरी तो माझ्याकडे आदराने बघेल असं वाटलं मला. पण उपयोग शून्यं. मग मी आम्ही पेशव्यांचे वंशज आहोत अशा धर्तीवर रेमंडचा एक काळा आणि एक निळा असे दोन महागडे पॅंटपीस कापून घेतले. 

'पैसे कुठे द्यायचे'. 'काऊंटरला थांबा, तिथे येतील पीसेस'. द्रौपदीनीसुद्धा एवढ्या तुच्छतेने कर्णाकडे किंवा कौरव ब्रदर्सकडे पाहिलं नसेल एवढ्या तुच्छतेने तो माझ्याकडे बघत होता. काउंटरला चिक्कार गर्दी होती. मित्राला सांगितलं, गप माझ्यामागे यायचं, येड**सारखं तिथे बोलायचं नाही, अरे आपले कपडे घ्यायचेत म्हणून. हात हलवत परत चाललेल्या खाली हाथ कस्टमरकडे जेवढ्या आपुलकीने बघता येईल तेवढ्या प्रेमळ नजरेने बघत दरवानानी दरवाजा उघडला. एक सिनेमात तो अरनॉल्ड टायमर लावून बॉम्ब लावतो आणि जसा हसत पुढे जातो तसे आम्ही बाहेर पडलो. शोधू दे त्याला; ऐपत नसलेला दाढीवाला कुठे गेला ते. 

जयकांत शिक्रे २०११ च्या 'सिंघम'मध्ये म्हणाला 'कुछ भी करनेका लेकिन जयकांत शिक्रेका इगो हर्ट नही करनेका' पण जयंत शिक्रे मागेच हे म्हणालाय, ''कुछ भी करनेका लेकिन जयंत शिक्रेका इगो हर्ट नही करनेका'. 

जयंत विद्वांस 

अरबी घोडा...

ऐंशी साली आला होता कुर्बानी. मी सातवीत होतो. वयात आल्याची जाणीव करून देण्याचं श्रेय कुणाला जात असेल तर ते झीनत अमान आणि परवीन बाबीला आहे. ७८ च्या 'सत्यम शिवम' पुढे हा काहीच नव्हता. पाचवीत कुठे कळायचं एवढं, काय बघायचं ते. अख्खा डावा लेगपीस उघडा टाकून बसलेली ओलेती झीनत पोस्टरवर होती. त्यात सगळी गाणी हिट्ट झालेली आधीच. अमजदचा वेगळा रोल, नाझिया हसनचं 'आप जैसा कोई मेरे जिंदगीमें आये' आणि 'लैला मैं लैला' गाजत होतं. 'टूबुक टूबुक' म्हणणारा अमजद पब्लिकला आवडला होता. 

फिरोजखान, मनमोहन देसाई, दादा कोंडके यांच्याकडे सिनेमा हिट करायचा स्वतःचा एक फॉर्म्युला होता. फिरोजखान म्हटलं की कायम उकाड्याचा त्रास होत असलेल्या कमी कापडातल्या (कपड्यातला नाही, आपण घालतो ते कपडे, त्या सेन्सॉरसाठी नाईलाजाने गुंडाळतात ते कापड) हिरोईनी, कार्स, बाहेरची लोकेशन्स, फिरोजचं नाव राजेश, कल्याणजी आनंदजीची हिट गाणी आणि ढिशूम ढिशूम असा ऐवज असायचा. 'गॉडफादर' वरून 'धर्मात्मा' तसा कर्क डग्लसच्या 'द मास्टर टच' (१९७२) वरून 'कुर्बानी आला. अर्थात त्यानी कधी ओरिजिनल वगैरेचा आव आणला नाही. यातलं 'क्या देखते हो' (बिकिनीतली झीनत विचारते) आणि हा म्हणतो 'सुरत तुम्हारी' हे सगळ्यात विनोदी गाणं होतं. आम्ही पण फिरोजदादासारखा झीनतचा चेहराच बघितला म्हणा गाणं संपेपर्यंत.

नटराजला लागला होता कुर्बानी. काचा फुटल्या आगाऊ तिकीटविक्रीला, प्रचंड गर्दी, पोलीस बंदोबस्त वगैरे होता. नुसती हवा 'कुर्बानी'ची. नटराज बंद झाल्याचं मला अतीव दु:खं आहे. 'शोले' मी तिथे पाहिला होता आयुष्यात पहिल्यांदा सत्तर एमएमवर. इमानदारीत एसी चालू ठेवणारं थेटर. तिकीट दर तरी काय २.२०, ३.३० आणि ४.४० (लोअर स्टोल, अप्पर स्टोल आणि बाल्कनी). तेंव्हाही ते महागच वाटायचे अशी परिस्थिती असायची. माझी काय ऐपत नव्हती तेंव्हा तिथे जायची. फार हळहळ वाटायची. तीन चार रुपयात ओलेता लेग पीस काही महाग नव्हता. प्रचंड ब्लॅक चालू होतं. नुसत्या अफवा अप्परचं तिकीट दहा रुपये वगैरे. इथे ३.३० ची मारामार, दहा कुठून आणायचे. फार वाईट दिवस हो. 

आमच्या शाळेत मंडईतली बरीच पोरं होती. दहावीत वाटतील अशी मुलं सातवीला होती बिचारी. तर त्यातला एक टग्या ग्रुप गेलाच, ब्लॅकनी घेईन पण कुर्बानी बघेनच असा पण करून. ठेवणीतल्या फुलपॅंटी घालून गेले अगदी सेकंड शो ला. पिक्चर फुल. एकानी चोवीस इंचीची छप्पन इंच केली छाती फुगवून आणि गेला एका ब्लॅकवाल्याकडे. एकदम हेरॉईन मागायच्या धर्तीवर पुटपुटणं वगैरे. बाजारात सात रुपये रेट असताना मुलं म्हणून चक्क पाच रुपये रेट ठरला. साताठ जणांचे खिसे रिकामे झाले आणि चाळीसेक रुपये देऊन जगज्जेत्याच्या थाटात काफिला तिकिटं नाचवत गर्दीत घुसला. काय सांगावं लेगपीस टायटलला असला तर? तेंव्हा लाल पिवळी तिकिट असायची, बाल्कनीतल्या रांगेतले तुच्छतेने बघायचे लोअर, अप्परकडे. तिकीट फाडणा-या माणसानी यांना बाजूला केले. यांच्या पोटात गोळा, सिनेमा ऍडल्ट आहे की काय? सगळे आत गेले तरी हे तिथेच. 

डोअरकीपरनी जो टाकलाय ना शॉट, लै हसलो तेंव्हा पण आणि आत्ता पण. 'च्युत्या बनवलंय तुम्हांला, फर्स्टशोची आहेत ही'. आपल्याला कुणीतरी अरबी घोडा लावलाय हे कळायलाच पाच मिनिटं गेली. प्रत्येकजण डोळे फाडून शो टायमिंग बघत होता. ब्लॅकवाला शोधून झाला. त्याला मानलाच पाहिजे, डेअरिंग लागते बॉस, लक्षात आलं असतं तर फटके पडले असते. पण चाळीस घेऊन काय खुश झाला असेल गडी. मग 'भ'च्या सगळ्या शिव्या, आया, बहिणी झाल्या, कुठे कुठे पाय घालून झाले पण अरण्यरुदनच ते. हे साताठ जण उभे फक्तं तिथे. वधस्तंभाकडे निघालेल्या चारुदत्तासारखे खाली मान घालून सगळे परत आले. चोवीस इंचीवाल्याला शो कितीचा बघता येत नाही का यावरून शिव्या देणे एवढाच काय तो विरंगुळा. 

गंमत म्हणजे मी 'कुर्बानी' अजूनही पाहिलेला नाही पण ही चाळीस रुपयांची कुर्बानी माझ्या अजून लक्षात आहे. एकदम अरबी घोडा :P ;) 

जयंत विद्वांस 

उद्योग (२)…

प्रत्येक माणसाच्या अंगात नाना कळा असतातच, फक्तं काहीजण वय वाढत चाललं की उगाच आपण आता मॅच्युअर झालो असा समज करून घेतात आणि गंभीर होतात. काड्या घालणं स्वभावात लागतं अर्थात. बदलापूरला होतो तेंव्हा व्हिसीपी/व्हिसीआर प्रकार नविन आला होता. आमच्याकडे बुशचा टिव्ही आणि व्हिसीआर घेतला होता. मी आणि धना तो घेऊन फिरायचो. अमिताभचे सिनेमे अनंत वेळा बघायला ते एक कारण होतं. चौकातल्या हॉटेल्सची पोरं सॅटर्डेनाईट फिक्स गि-हाईकं आमची. 'कोनसाभी लाव, लेकिन तीनमेंसे दो बच्चनका लानेका' इतकी सिंपल ऑर्डर असायची. नंतर नंतर इतका नॉशिआ आला की आम्ही कॅसेटी चालू करून निवांत झोपायचो.   

आमच्या एका मित्रानी पहिल्यांदाच 'बॉबी' बघितलेला तेंव्हा. डिंपलसाठी पागल झाला होता हे आमच्या कानावर आलं होतं. कॅसेट बहुतेक झिजली असावी इतक्यावेळा पाहिला त्यानी 'बॉबी'. आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. गडी खुश होऊन आला होता. डिंपलची मापंसुद्धा सांगितली त्यानी, शक्यं तेवढी वर्णनं करून झाली. तिची तोकडी पॅन्ट, बिकिनी, 'झूठ बोले'ची काचोळी सगळं सगळं काढून झालं (बोलण्यात). ती समोर असती तर त्यानी कदाचित तिला धरली पण असती इतका चेकाळला होता. मला काय गप्पं बसवेना. 'सम्या, तू कुणाचा बॉबी पाहिलास?' 'डिंपल, ऋषीकपूरचा'. 'मूर्ख आहेस, आरकेचा पाहिलायेस का?' 'अरे, आरकेनीच काढलाय.' 'अरे येड**, हा रिमेक आहे, ओरिजिनल ब्लॅक एन व्हाईट आहे राजकपूर, नर्गिसचा. तो बघ आणि सांग, हा विसरशील'. मग माझ्या जिभेवर जी काही वर्णनसरस्वती अवतरली की त्याच्या तोंडातून लाळ पडायची बाकी होती. नर्गिसची वर्णनं मला कंटाळा आल्यावर थांबली. राज-नर्गिसचं 'हम तुम एक कमरेमे बंद हो' तर पार थ्री एक्स पातळीवर गेलं होतं. घरी जाताना अंधारात याला सापडली कुणी तर ह्यानी गैरकृत्य केल्याचं कानावर येणार अशी भीती वाटायला लागली आम्हांला इतका तो बेचैन झाला होता. 

पुढचे आठ दहा दिवस बदलापूरातली सोडा, अंबरनाथ, कल्याण पर्यंतची दुकानं पालथी घालून आला हा ब्लॅक एन व्हाईट 'बॉबी' साठी. सगळं दृश्यं आम्ही कट्ट्यावर बसून बघायचो. ''बॉबी'ची कॅसेट आहे?' दुकानदार डिंपलच्या बॉबीची देणार. 'हा नाही, राजकपूर नर्गिसचा'. 'बॉबी, एवढा एकंच आहे'. 'हा नको, हा आहे माझ्याकडे.' दुकानदार ती कॅसेट जागेवर लावून याच्याकडे दयाळू नजरेनी बघत असणार. हॉट नर्गिस बघणं लांबणीवर पडतंय याचं दु:खं जास्ती. शेवटी त्याच्याच घरातल्या कुणी सांगितलं 'अरे, बॉबी एकंच आहे, तुला कुणी सांगितलं दोन आहेत म्हणून'. मग जेंव्हा आमची गाठभेट झाली तेंव्हा फक्तं तो बोलत होता, आम्ही ऐकत होतो. पेट्रोल संपल्यावर गाडी थांबते तसं शिव्या आठवेनाश्या झाल्यावर तो थांबला. समस्तं स्त्री नातेवाईकांचे अवयव काढून झाले, कुठे कुठे पाय घालून झाले, पैलवानसुद्धा थकेल इतक्यावेळा संभोगक्रिया झाली. 

'निळ्या फिल्मा' बघायच्या म्हणजे काय झिगझिग असायची तेंव्हा. मोकळं घर, व्हिसीआर, तसल्या कॅसेटी मिळवणं इतके व्याप असायचे त्यामुळे हा दुर्लभ योग असायचा. त्यात एकानी सांगितलं की पोलीस आले की आधी फ्यूज काढतात म्हणजे कॅसेट इजेक्ट करता येत नाही, मग व्हिसीआर चौकीला नेऊन तिथे प्ले करतात. बच्चेकी जान पुढच्या घटनांच्या विचारांनीच निम्मी व्हायची. तयार लोकं नुसत्या खुणेवर गट्ठे आणायचे कॅसेट्सचे. हेवा या शब्दाचा अर्थ कळायचा तेंव्हा. तर आमच्या या बॉबी सम्याला तसली कॅसेट हवी होती. आमच्याकडे व्हिसीआर म्हणजे आम्ही पितळी डबे लावावेत तश्या कॅसेट मांडणीवर लावूनच असणार असा त्याचा समज किंवा आम्ही ती मिळवून देऊ असं त्याला वाटायचं. 'नाहीये आमच्याकडे', 'दे की राव एकतरी'. गडी काही पिच्छा सोडेना. 'कशी मागायची ते तरी सांग'. मी एकदम कोकचा फॉर्म्युला सांगितल्यासारखा त्याला बाजूला घेतला सांगायला. 'कुठल्याही दुकानात गेलास ना, अजिबात घाबरायचं नाही. 'पत्थर के पेड'ची कॅसेट द्या म्हणायचं. कोडवर्ड आहे तो, अंबरनाथ, कल्याण कुठेही जा, हीच कॅसेट मागायची.'      

पुढचे आठ दहा दिवस बदलापूर ते डोंबिवलीपर्यंतची दुकानं पालथी घालून आला हा. 'पत्थर के पेड' द्या एक/दोन कॅसेट'. 'पत्थर के पेड? असा नाहीये कुठला सिनेमा'. याची पंचाईत व्हायची, निळी फिल्लीम ओरडून मागणार तरी कशी. त्यात हा पाच फूट, जेमतेम मिशी फुटलेला, सतरा वर्षाचा, गोंडस निष्पाप चेह-याचा. माणूस डिप्रेशनमध्ये जाईल नाहीतर काय होईल, मला सांगा. जगदुनिया तो पासवर्ड टाकून आनंद चिडीचूप आणतंय, बघतंय आणि मला न मिळायला मीच काय अशा पापाच्या राशी केल्यात. वैफल्य येणारच की. दूरदर्शनला अतिशय जुन्या कार्यक्रमांच्या चित्रंफिती 'सह्याद्रीच्या पाऊलखुणा' नावाखाली दाखवतात तसं मग त्यानी विस्मरणात गेलेल्या नर्गिसच्या 'बॉबी'ला जे घडलं ते परत सगळं रिप्ले केलं. 

आता काय इंटरनेटच्या जमान्यात त्याचं अप्रूप राहिलं नाही पब्लिकला. जागेची गरज नाही, मोबाईलमध्ये दिसतंय सगळं. डिंपलची मजा आता बॉबी काढला नव्याने तरी येणार नाही कारण तेंव्हा ते सगळं धाडस होतं. बरंचसं झाकलेलं असायचं त्यामुळे काही उघडं दिसलं की डोळे मोठे व्हायचे. आता झाकपाक इतकी कमी असते की ती जास्ती दिसली तर डोळे मोठे होतात, बाई परग्रहावरून आली की काय असं वाटेल. बाय  द वे, धाडस म्हटलं म्हणून हसतील काही जण पण ते 'धाडस'च होतं डिंपलचं त्या काळात. तसं नसतं तर डिंपल 'बॉबी' नसती झाली, अनुराधा पौडवाल झाली असती. तिच्या वडिलांनी नकार दिला होता त्यात बिकिनी घालायची आहे म्हणून. :) :D   

जयंत विद्वांस  

शब्दं...

मूल जन्माला आलं की त्यानी पहिला शब्दं कुठला उच्चारला ह्याची आई आणि बाबा नोंद करत असतात. जीवाचे कान करून ऐकतात तो शब्दं, ती हाक आपलीच असावी अशी दोघांची इच्छा असते पण ते पोर वात्रट असतं, त्याला सतत खेळवणा-या शेजारच्या दादाला ते दाद्दा किंवा द्दा अशी पहिली हाक मारतं आणि त्यांचा हिरमोड करतं. तो कडेचा दादा हरखून जातो. पहिलेपणाचा आनंद अफाट असतो. 'मला', मला हाक मारली त्याने पहिली, या प्रेमापोटी तो त्या बाळावर अजून माया करतो. एक शब्दं कारणीभूत ठरतो प्रेम वाढायला. शब्दांना त्यांचे स्वतःचे उपजत अर्थ असतात, लय असते. काही आपण चिकटवलेले, काढलेले, अभिप्रेत असलेले लाक्षणिक अर्थ असतात. मलमली, दुडूदुडू, गुळगुळीत, सुळसुळीत, गुबगुबीत, गरगरीत, दणकट, जबरदस्त, थरथराट, आघात या शब्दातली अक्षरं त्या शब्दांच्या अर्थाला अर्थ आणतात असं मला कायम वाटत आलंय. कुठून आले असतील हे शब्दं, कुणी तयार केले असतील, का करावेसे वाटले असतील, काय शास्त्र असेल त्यामागे. हजारो भाषेत लाखो शब्दं वेगवेगळे आकार, ध्वनी, अर्थ घेऊन वावरतायेत. प्रत्येकाला आपली भाषा उच्च वाटते. 

शब्दानी शब्द वाढला असं आपण म्हणतो. म्हणजे काय तर वाद वाढला. संवाद वाढतोच की शब्दांनी पण दोघांना तो हवा असेल तर. 'तुटे वाद, संवाद तो हितकारी', रामदास म्हणाले. पहिल्यांदा चित्रातून लोकांनी भावना व्यक्तं केल्या. प्रत्येकजण चित्रं काढू शकत नाही मग स्पर्श, खुणा वापरल्या गेल्या असतील त्याच्याबरोबर. तरीसुद्धा काही अपूर्ण राहिलं असणार मग शब्दं आले असतील. त्यांचे अर्थ त्या त्या काळानुसार असतील, कालौघात किती बदल झाले अर्थात त्याचा हिशोब कोण ठेवणार. एखादा भाषातज्ज्ञ त्याचा उगम, मूळ अर्थ, आत्ताचा अर्थ असा गहन अभ्यास करेलही पण सामान्य माणसाला प्रचलित अर्थानी शब्दं वापरायची सवय असते आणि ती त्याला सोपी असते म्हणून आवडतेही. पण किती प्रकार आले ना. शब्दांचे ग्रंथ झाले, ज्ञान देता आलं, मिळवता आलं, गाणी झाली, श्लोक झाले, धर्मग्रंथ झाले, शिव्या झाल्या. ज्याची जशी बुद्धी तशी त्याने ती वापरली. प्रत्येकाला समोरच्याला काहीतरी सांगायचंय. सांगणा-याच्या ताकदीवर, ज्ञानावर, आवेशावर, घटनेच्या परिणामावर शब्दांची ताकद ठरते. शब्दं सुद्धा वापरता आले पाहिजेत. 

प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे, ठाकरे काका पुतण्या, अटलबिहारी, शंकर अभ्यंकर, बाबामहाराज सातारकर यांच्यात शब्दं वापरण्याची हातोटी आहे. आवाज चांगला असला म्हणजे शब्दंफेक जमेल फारतर पण नेमका शब्दं योजून त्याचा पुरेपूर परिणाम साधायचं कसब अंगी लागतं. शब्दं कसा भूसुरुंगासारखा हवा. पाय ठेवल्यावर अर्थ फुटणारा. वाचणा-याच्या डोळ्यांचे पाय मजबूत असतील तर तो त्यावर बिनदिक्कत पाय ठेवेल आणि स्फोट करेल. जो नाजूक पावलांनी त्यावरून जाईल त्याला हिरवळ असेल ती. खुनाच्या खटल्यात वकील विचारतो, घटना घडली तेंव्हा तुम्ही कुठे उभे होतात? किती अंतरावर होतात? म्हणजे अंतर बदललं, दृष्टिदोष असेल तर वेगळं दिसू शकतं यावर केसचा निकाल बदलू शकतो. शब्दांचं तसंच आहे. तुम्ही त्यातून कुठले अर्थ काढताय त्यावर अनुभूती अवलंबून असेल. लिहिणा-याच्या, बोलणा-याच्या मनात असलेला अर्थ वाचला, ऐकला जाईल असं नाही. ब-याचदा आपल्याला सोयीस्कर, हवे असलेले अर्थ काढलेले असतात. 

शब्दं बबलगम सारखा असतो. चावलात की त्याचा किती मोठा फुगा करायचा ते तुमच्यावर अवलंबून आहे. शब्दं कडधान्यासारखा असतो. एवढुस्सा असतो पण भिजत घातलात, मोड आला की कसा फुगीर, दळदार दिसतो. शब्दं वाचता आला पाहिजे, त्यातला दळ काढता आला पाहिजे. सांगितलेला, अभिप्रेत असलेला अर्थ कळला पाहिजे. एखाद्याची चूक जेवढ्या प्रयत्नपूर्वक आपण शोधतो तसा लपलेला एखादा अर्थ शोधता आला पाहिजे. एखादा चेहरा दुस-या कोनातून बघितला तर वेगळा किंवा जास्ती सुंदर दिसतो तसा शब्दं बघता यायला हवा वेगळ्या मितीतून. शब्दात ताकद असते, प्रेम असतं, लय असते, गाणं असतं, ऊर्जा असते. चेहरा असतो, रूप असतं, तिरस्कार असतो, माया असते, तळतळाट असतात. शब्दाला भावना चिकटून आली की त्याचं शस्त्रं होतं किंवा मोरपीस होतं. 'स्वामी'मध्ये सतत संयत बोलणारे माधवराव, राघोबादादांची बिनपाण्याने करतात असा एक पानभर अंगार आहे. शब्दाची ताकद म्हणजे काय ते कळेल त्यात. समोरच्याच्या तोंडातून शब्दं फुटणार नाहीत अशी ताकद त्यात आहे. 'श्यामची आई'मध्ये 'आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी' ऐकताना डोळ्याला झारीसारखे अनेक डोळे फुटतात, याला शब्दांची ताकद म्हणतात.    

म्हटलं ना, भावना चिकटून आली की शब्दांचे अणकुचीदार भाले होतात, मंत्र होतात, गाणी होतात. बेलवलकरांची स्वगतं बार्बेक्यूवर सळई ठेवावी तशी आपल्याला होरपळवतात, बालगंधर्वांच्या, लताच्या, आनंद भाटेंच्या मुखातून शब्दं आला की शब्दाचा स्वरार्थ होतो, नानाच्या तोंडातून आले तर कधी बारिशकर होतो तर कधी क्रांतिवीरचा प्रताप होतो, अमिताभच्या तोंडातून आले तर खर्जातलं 'नीला आसमां' होतात, बोरकरांचे शब्दं पुलंच्या तोंडातून आले की त्यांना नाद येतो आणि ते 'तुझी गो पायजणे' होतात, कुणाच्याही आवाजात 'जन गण मन' ऐकलं तरी रोमांच उभे रहातात कारण ते शब्दंच तसे आहेत. म्हणणा-या कितीजणांना त्याचा अर्थ माहित असेल? तरीही त्याला चिकटलेल्या भावनेमुळे ते आपलेसे आहेत. आजी पहाटेच्या अंधारात मानसपूजा म्हणायची, अस्पष्ट ऐकू येणारे शब्दं अंगावर पांघरूण घातल्यासारखे पसरायचे, पाया पडल्यावर पुटपुटलेल्या आशीर्वादाचे शब्दं कसे झोळीत दान पडावं तसे कानात पडतात, कुणी टाहो फोडून नाहीतर मायेनी मारलेली हाक असेल त्या शब्दाला मायेचा पदर असतो. शब्दं तिळासारखा असतो त्याचा फुलवून हलवा करता यायला हवा. 

शब्दं.... एवढं सगळं असून सुद्धा काही गोष्टी उरतातच सांगण्यासाठी, ज्या शब्दात मावत नाहीत, नविन शब्दं सापडत नाहीत, बुद्धी कमी पडते, आकलन कमी पडतं. धबधबा मग नायगारा असो नाहीतर कोकणातला त्याचं रौद्र रूप शब्दात कसं पकडणार, मधुबाला सुंदर दिसते म्हणजे नेमकं काय हे शब्दात सांगता नाही येणार, प्रचंड तहान लागल्यावर सावलीला उभं राहून पोटात गेलेला थंडगार पाण्याचा घोट कसा होता हे नाही सांगता येणार शब्दात, बॅटीच्या मधे लागून गेलेल्या चौकाराचा तो आवाज, तिनी पहिल्यांदा आपल्याला चोरून बघावं आणि ती सापडल्यावर कुलूपबंद झालेल्या नजरांचा तो क्षण, बाळानी मुठीत बोट पकडावं आणि तेंव्हा आत कुठेतरी हलतं ते शब्दात कसं येणार? म्हणून आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद किंवा दु:खाचा क्षण नि:शब्दं असतो. काहीही बोलून अंगुळभर शिल्लक राहील अशी अवस्था ती. म्हणून न बोलणे उत्तम. मौन, अबोला, एकांत किती बोलका असतो, फक्तं तिथे शब्दं नसतात, अव्यक्तं भावनांचे, शरीर धारण न केलेले, आत्मे वावरतात तिथे.    

शब्दं... म्हणजे पसारा. नेमकं न सांगणारा. शब्दं फार मौल्यवान असतात. जपून वापरावेत, नेमके वापरावेत, कधी कधी एखादा शब्दं वगळून जो परिणाम होतो तो वापरून होत नाही, उन्हाळ्यात पावसासाठी जसं गवत राखून ठेवतात तसा एखादा शब्दं हातचा म्हणून राखलेला असावा, शब्दात मंत्राची ताकद हवी, सायीची माया हवी. शब्दं कोडं घालणारा हवा, शब्दं उकल करणारा हवा. मेंदूच्या हुकूमावर ओठाच्या उंबरठ्याशी लगाम खेचल्यासारखा थांबणारा शब्दं ताब्यात हवा. शब्दं नि:शब्दं करणारा पण हवा. काय गंमत आहे बघा. प्रत्येक शब्दं काहीतरी सांगत असतोच. 'शब्दं' हा शब्दं घ्या. ना काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, अनुस्वार, विसर्ग, किती सरळमार्गी आहे पण 'द'च्या पोटावर बसलेल्या त्या अर्ध्या 'ब' मधे काय आहे हे बघायची उत्सुकता लागली की शब्दांची ओढ सुरु झालीच. जे दिसतंय त्याची माणसाला आवड कमीच असते, दडलंय काय हे वाकून बघायची उत्सुकता जास्ती.  

एका शब्दावर इतके शब्दं झाले, अपशब्दं ऐकायच्या आत नि:शब्दं झालेलं बरं. ;) :P   

जयंत विद्वांस 

  
 

Wednesday, 27 July 2016

बाई आणि सर...

ते गुरुपौर्णिमा वगैरे ठीक आहे. फुलवाल्यांचा धंदा होतो. पण माझ्या बालपणी जी किंमत होती शिक्षकांना तेवढी तीव्रता आता नाही राहिली. गुरु म्हटल्यावर एक प्रचंड आदरार्थी भावना असायची, वचक असायचा. त्यांच्या चारित्र्याचा, राहणीमानाचा, ज्ञानाचा, आपलेपणाचा, रागाचा, माराचा एक जाचक वाटणारा पण हवाहवासा वचक असायचा. जुन्या आठवणी काढून अश्रू येण्याचे, हुरहूर लागण्याचे दिवस हळू हळू नाहीसे होतील. आताचे शिक्षक हे गाईड, वर्कबुक, शिकवण्या यातच गुंतले आहेत. कित्त्येकजण शिक्षक आहेत हे सांगावं लागतं. काळानुसार वेष बदलतो हे मान्यं आहे पण प्रत्येक पेशाला एक ग्रेस असते, जी त्याच्या कपड्यातून दिसते. युनिफॉर्मचा खरा उपयोग त्यासाठी होतो. उद्या एखाद्या हॉस्पीटलमध्ये बर्म्युडा, स्लिव्हलेस जाळीचं लाल बनियान, डोक्याला हैड्रोजन लावून केलेले कलरफुल मातेरं असा न्यूरो किंवा दुसरा कुठला सर्जन दिसला तर पेशंट आहे ती हाडं आणि तब्येत गोळा करून ऑपरेशनच्या आधी दुस-या हॉस्पिटलात जाईल. त्या पांढ-या कोटाला, स्टेथोला एक रिस्पेक्ट असतो. माणूस त्या पदाला गेला इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्यामुळे ते पद शोभेल इतकं ज्ञान, वागणूक हवी.

कीर्तनकार भा.रा.घैसास आमचे मुख्याध्यापक होते. मराठी शिकवायचे दहावीला. डोक्यावर टोपी, क्वचित धोतर घालून पण यायचे. काय टाप होती त्यांनी हाक मारल्यावर पोरगा पुढे जाण्याची असा त्यांचा दरारा होता. कायम दोन जाडजूड पुस्तकं हातात, मितभाषी, ज्ञानी माणूस, ते जवळून गेले तरी आवाज बंद व्हायचे. द.मु.आंबेकर आम्हांला इतिहास शिकवायचे. धडा कधीच शिकवला नाही, इतिहास सांगायचे. काय वाणी होती त्यांची ओघवती, ऐकत रहावं नुसतं, एकपात्री प्रयोगच तो. मला इतिहासात मार्क नाही पडले फार कधी पण शिवाजी डोळ्यसमोर उभा रहायचा. अत्यंत हसतमुख माणूस. विनोद करणारे, समजणारे, जाता जाता टोपी उडवणारे. संस्कृतला आम्हांला गुर्जर बाई होत्या. नुकत्याच गेल्या त्या. जोकरला नाकाला, गालाला जसे ते लाल गोळे लावतात तसे त्यांचे गाल होते. अतिशय प्रेमळ, स्पष्टवक्त्या आणि ज्ञानी. आमचा एक दोस्त आणि त्या एकाच वाड्यात रहायच्या पण म्हणून फेव्हर नाही.

तिसरीला खोचे बाई होत्या आम्हांला. नऊवारी घालून येणा-या, मागे चिक्कूच्या आकाराचा अंबाडा घालणा-या, सगळे दात पडलेल्या. कुणी मुलगा रडला की त्याला मांडीवर घेऊन बसायच्या. इंदिरा कुलकर्णी (बहुतेक) म्हणून एक होत्या, गडद वेस्टइंडीज काळ्या अगदी पण त्यांचा रंग तेंव्हा कुणाच्या नजरेवर आघात वगैरे करायचा नाही. अनेक शिक्षक लाभले, तेंव्हा कुठे काय कळायचं त्यांचं महत्वं (याचा अर्थ आता कळतं असा होतो, पण तसं काहीही नाहीये). संस्कार आणि ज्ञान ते लोक आव न आणता देत होते. आमची बुद्धी भांड्याएवढी, त्यांनी घागरीच्या घागरी ओतल्या, आमचं भांडं जेमतेम भरलं एवढंच. त्यांच्या फटक्यात जादू होती. ज्याची त्याची कुवत त्याप्रमाणे कुणाची बुद्धी ठोक्याच्या भांड्यासारखी झाली, कुणाला पोचा आला. आज जाणवतं, कुठला संस्कार डोकावला, सद्सद्विवेकबुद्धी टोचणी द्यायला लागली की, हे त्यांचं देणं आहे. तेंव्हा रुजलं पण लक्षात नव्हतं आलं.

चिंचेच्या तालमीजवळची अडीच वर्ष मॉन्टेसरीं , मग मारुतीच्या देवळातली बदलापूरची पहिली, दुसरीला आपटे प्रशाला, तिसरी ते दहावी सरस्वती मंदिर, अकरावी विमलाबाई गरवारे हायस्कुल,  काही दिवस स्वाध्याय महाविद्यालय मग आदर्श विद्या मंदिर, बदलापूर, मग एम.जी.कॉलेज, अंबरनाथ अशा साताठ शाळातून फिरून आलो. मला कुणी लक्षात ठेवलं असेल असं माझं कर्तृत्व नाही पण या सगळ्यातले गुरुजन कडू गोड आठवणींसकट माझ्या लक्षात आहेत. आता आपल्याला खूप समजतं असं वाटायला लागलं आणि विद्यार्थीदशा संपली. बाकी दुस-याला अक्कल शिकवायला नाहीतरी कुठे अक्कल लागते हल्ली. आता सगळेच शिक्षक, कुणी विद्यार्थी नाही अशी परिस्थिती.

आता मिस आणि सर रग्गड झाले पण आम्ही मिस करतो ते आमच्या 'बाई' आणि सरांना. टाका एक आवाज त्या कोप-यातून, बघा थांबतो की नाही ते.

जयंत विद्वांस

मालस...

काल 'डोळ्यात डिग्री चुकलेली पारेखांची आशा मला कधीच आवडली नाही' असं म्हटल्यावर लोकांचा ती त्या कारणाकरता मला आवडत नाही असा समज झाला. पण मला ती त्याकरता नावडती नाहीये. ती अतिलाडिक आणि चिरक्या आवाजात बोलायची. सतत लाडात बोलणा-या नट्या माझ्या डोक्यात जातात (उदा : निशिगंधा वाड, किशोरी शहाणे) तशी मला सरळ डोळ्यांची तनुजा पण कधी फारशी आवडली नाही. प्रत्येक गोष्टीला कारण नसतं. नाही आवडली तर नाही आवडली. बात खतम पण तिच्या काणेपणाबद्दल बोलण्याचा, नावडण्याचा हेतू नव्हता म्हणून हे लिहिणं आलं. त्यांचं माझ्यावाचून काही अडलं नाही आणि माझंही नाही. :D

शारीरिक वैगुण्यं असणं आपल्या हातात नाही. पण ज्याच्या नशिबी असतं त्याला न्यूनगंड असतो अशी आपल्याकडे परिस्थिती आहे. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत असं वाटणं वेगळं आणि आपल्यात काही कमतरता आहे हे वाटणं वेगळं. तिरळेपणा हे सगळ्यात मोठं चेष्टा होणारं वैगुण्यं आहे. तिर्री, तिकडम, हेकण्या, कर्जत कसारा, लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो (LLTT ) असे अनेक कुचेष्टेचे शब्दंप्रयोग मी लहानपणापासून ऐकत आलोय, बोलतही आलोय कारण तेंव्हा तेवढी अक्कल नव्हती. तिरळा हा फार अपमानास्पद शब्दं आहे. आपल्याकडे निखळ विनोदनिर्मिती फार कमी असते. कुणाच्या तरी वैगुण्यावर आधारित विनोदाला लोक खूप हसतात हे त्यामुळेच असावं. इंग्रजांची तरल, सूक्ष्म विनोद बुद्धी आपल्यात नाही, आपल्याला स्वतःवर हसता येत नाही, दुस-याच्या कुठल्याही गोष्टीवर मात्रं विनोद झाला नाही तरी आपल्याला मनमुराद हसता येतं. इथे मला पुलं त्याकरता वंदनीय वाटतात. त्यांनी व्यंग लिहिलं पण कधीही व्यंगाचा विनोद केला नाही.

बुटकेपणा हा त्यातलाच एक विनोदाचा भाग. अतिउंची हे मात्रं लोकांना व्यंग वाटत नाही. जमैकाची शेली फ्रेझर पाच फूट होती फक्तं पण तिची उंची तिच्या आड आली नाही ऑलिम्पिकमधे १०० मीटरच्या गोल्ड मेडलला. एका दिव्यं माणसाचं अफाट मत मी ऐकलंय, 'हे निग्रो लोक उंच असतात त्यामुळे त्यांचा ढांगा लांब पडतात म्हणून ते इतरांपेक्षा फास्ट पळू शकतात'. आपण लक्ष नाही द्यायचं, गेल डेव्हर्स (५'३") शेली फ्रेझर कोण वगैरे त्याला माहितीच नसणार. ब्रॅडमन, गावसकर, तेंडुलकर, विश्वनाथ - चौघेही साडेपाचफुटांच्या आसपास. पण तेंडुलकर जे पळायचा बावीस यार्डात त्याचा ढांगेशी संबंध नाही हे त्याला कोण सांगणार. बाउन्सर डोक्यावरून जायचे न वाकता म्हणून गावसकर विंडीजविरुद्ध विनाहेल्मेट खेळू शकला असं मत ऐकून तर मी गार पडलो होतो. बुद्धीनी बुटकीच, सॉरी बोन्साय राहिलेली माणसं अशीच बोलणार म्हणा.

पाकिस्तानचा गोलंदाज अझीम हफीजच्या उजव्या हाताला दोन बोटं मिसप्लेस होती पण तो डाव्या हातानी सुसाट टाकायचा. वैगुण्याचा सगळ्यात सुंदर फायदा कुणी करून घेतला असेल तर आपल्या भागवत चंद्रशेखरनी. त्याचा पोलिओ झालेला हात मनगटातून कसा वळेल हे त्यालाही सांगता यायचं नाही. फलंदाज काय डोंबल हात बघून ठरवणार की गुगली आहे की लेगब्रेक. सैन्यात असताना चाचणीत बॉंम्ब कडेलाच फुटल्यामुळे दृष्टी अधू झालेला आफ्रिकेचा फॅनी डिव्हिलीअर्स लवकर निवृत्त झाला नाहीतर तेंडुलकरला १०० x १०० साठी अजून थोडं खेळावं लागलं असतं. वैगुण्यावर मात करायला जिद्द लागते. लाकडी पायाची सुधाचंद्रन जिद्दीमुळे लाडकी झाली. आता खुनी असेल तो पण वयाच्या अकराव्या महिन्यात गुडघ्याखाली दोन्ही पाय कापलेला ऑस्कर प्रिस्टोरीअस ब्लेड रनर झाला. वैगुण्यं असतं पण त्याच्यावर मात करायला जिगर लागते.

तर मूळ मुद्दा होता किंचित तिरळेपणा. काहीवेळेला थोडे डिफेक्ट असलेल्या वस्तू कमी किंमतीत मिळतात. मागे मी एक शर्ट आणला होता, बाराशेचा तीनशेला. मनात आलं, मूळ किंमत दीडशे असेल पण शर्ट झकास होता. उत्सुकता म्हणून मी विचारलं की पाव किंमतीला का विकताय हा. सेल्समन पण हौशी होता, त्यानी सांगितलेला डिफेक्ट मला बापजन्मात समजला नसता. पहील्या बटणाचं अंतर कॉलरपासून ठरलेलं असतं आणि मग पुढच्या बटणांचंही अर्थात. तर ते एकदीड सेंटीमीटरनी वर झालं होतं म्हणून डिफेक्टेड पीस. तसं कुणाला काय डिफेक्ट वरून येताना असेल ते सांगता येत नाही. ठार तिरळा माणूस बघितलं की हसू येतंच. केश्तो मुखर्जी बघा, तो काहीही बोलण्याची गरज नसते, त्यानी ते डोळे फिरवून ' आईये ना' म्हटलं की हसू येतंच. आमच्या वर्गात अकरावीला एक आंगणे म्हणून मुलगा होता. स्लाइट काणा होता तो, त्याला मुलं मुद्दाम कांगणे म्ह्णून हाक मारायची. पण तो स्मार्ट दिसायचा उलट त्यामुळे. अमिताभ, आशा पारेख, व्ही.शांताराम, गौतम राजाध्यक्ष ही सगळी काणी मंडळी. पण त्यांचं कुठंही अडलं नाही.

मधे कुणीतरी एफबीवरच मला त्या 'काणे'पणाला अजून एक शब्दं सांगितला, 'मालस'. सालसशी साधर्म्य असल्यामुळे असेल पण मला तो जाम आवडला. निळ्या, हिरव्या डोळ्यांचं आपल्याकडे कौतुक का? कारण ते क्वचित आढळतात. तसेच हे मालस लोक. एखादा राग गाताना तयारीचा गायक मुद्दाम वर्ज्य स्वर लावून जशी गंमत करतो तशी ही देवानी केलेली गंमत आहे. सगळं परफेक्ट नसावंच, छोटीशी उणीव सौंदर्यस्थळ होऊन जाते. मुकेशचा नाकातला, मीनाकुमारी, तलत, ऋजुता देशमुखचा कापरा आवाज ऐकताना किती गोड लागतो. जॉनीवॉकरचा चिरका आवाज, मुमताजचं अपरं नाक, हृतिक रोशनचं सहावं बोट, मीनाकुमारीच्या डाव्या की उजव्या हाताला नसलेली करंगळी, ए.के.हंगलचं टक्कल, ललिता पवारांचा अर्धोन्मीलित डोळा, मुक्रीची उंची, मधू आपटेंचं तोतरं बोलणं, जेफ्री बॉयकॉट, सिल्व्हेस्टर स्टॅलनचं - डिलिव्हरीच्या वेळेस फोरसेप लागून त्याच्या चेह-याचा डाव्या बाजूचा खालचा भाग पॅरलाईझ झाला होता - ओठ जीभ आणि हनुवटी - त्यामुळे तोंडातल्या तोंडात बोलणं त्यांच्या प्रसिद्ध होण्याला कुठे आड आलं नाही.

वैगुण्यं असतंच प्रत्येकात. माणूस ते दुस-याचा कमीपणा दाखवण्यासाठी शोधून लक्षात ठेवतो, हातचा असावा म्हणून. मन्सूर अलीखान पतौडीचा एक डोळा बक-याचा होता पण काय देखणा दिसायचा तो. महाराज रणजितसिंहांना एक डोळा नव्हता. त्यांचं पोर्ट्रेट करायला एक चित्रकार यायचा. चित्रं काढल्यावर महाराज खुश झाले. शिकार करताना काढलं होतं चित्रं. त्यामुळे बंदुकीचा नेम धरताना एक डोळा आपोआप बंद दाखवता आला. डोळे सगळ्यांनाच असतात, 'नजर' 'दृष्टी'  असेलंच असं नाही. 'नाही'ची यादी संपत नाही आपली, आहे त्यात समाधान कधीच नसतं. शारीरिक वैगुण्यं शोधण्यापेक्षा ज्यादिवशी आपल्यात एखादा चांगला गुण नसणं हे स्वतः:चं वैगुण्यं वाटेल त्यादिवशी कदाचित आपण माणूस म्हणून जगायला सुरवात करू.   

एवढं सगळं मान्यं केलं तरीपण पारेखांची आशा नाही आवडत म्हणजे नाही आवडत. :P  ;)

जयंत विद्वांस


बढती का नाम...

दाढी हा खरडण्याचा विषय आहे? एकार्थाने आहे, एकार्थाने नाही. वयात आलेली मुलगी जशी सारखी आरशात बघते, तशी मुलं दिवाळीत किल्ल्यावर अळीव टाकून येते तशी ती आलेली नाजूक लव कुरवाळत वेगवेगळ्या कोनातून बघत असतात. एकदम त्याला आपण आता पुरुष, मोठा माणूस वगैरे झाल्यासारखं, रुबाबदार दिसायला लागलोय असं वाटायला लागतं. काही जणांना उपेंद्र लिमयेसारखी हिटलर जेवढी ठेवायचा त्या जागी मिशी येतंच नाही आणि अंबुजा सिमेंटची दिवार मधे असल्यासारखी त्यांच्या मिशीची फाळणी होते. कित्त्येक जणांना टी.व्ही.वर हवामानाच्या अंदाजात चार कोप-यात चार ढग दाखवावेत तशी मधली शहरं वगळून दाढी फुटते. बोकडासारखी हनुवटीवर, कानाच्या बाजूला कल्ला लांबल्यासारखी येते बाकी मधला भाग वाळवंट असतो. मग एखाद्या त्याच्याच वयाच्या मुलाच्या गालावर पीक काढल्यासारखी संपूर्ण दाढी दिसली की त्याला असूया वाटते. मग नापीक जमिनीवर शेतकरी लावतो त्यापेक्षा जास्ती आशेवर आज ना उद्या दाढी उगवेल म्हणून पहिल्यांदा झिरो मशिन किंवा कात्री मग वस्तरा चालवून मशागत केली जाते. सगळ्यांनाच तिथे खुंट फुटतात असं नाही. अशा लोकांबद्दल मला सहानुभूती आहे. बिचा-यांना सतत दाढी करावी लागते, पूर्ण दाढी वाढवून ती कोरायचा वगैरे आनंद घेता येत नाही.

प्रत्येक गोष्टीतलं नवखेपण गंमतीशीर असतं. पोरगा नेहमी वडील कशी दाढी करतात ते बघून शिकतो. मग कुणी नसताना तो ट्राय करतो. आता जेल आली, फोम आलं, मशिन्स आली, एकशे ऐंशी डिग्रीत झोपवणा-या आणि मग रेट बघून तिथेच बेशुद्ध पाडणा-या खुर्च्या, स्वप्नात बघाव्यात अशा अप्राप्यं बायका आफ्टर शेव्ह लावल्यावर चिकटतात असं स्वप्नं दाखवणारी आफ्टरशेव्ह, अनंत फळांच्या वासाचे फेसवॉश, फेसपॅक, मसाज आले. पण मी केली ती पहिली दाढी वेगळीच होती (अर्थात माझीच). बाबा करायचे तशी. गोदरेजचा तो पांढ-या झाकणाचा निळा गोल डबा, त्यात मधे पोट खपाटीला गेलेली ती पांढरी साबणाची रिंग, एक प्लास्टिकचा मग, एक स्टीलचा रेझर, गुबगुबीत केसाळ ब्रश, टोपाझचं ब्लेड, फोल्डिंगची कात्री आणि तुरटी हा सरंजाम ठेवायला एक पत्र्याचा डबा (शक्यतो वनदेवी बांधानी हिंगाचा) असायचा. स्टुलावर आरसा ठेवून बसायचं, गालफडं बसली असतील तर गालात जिभा घालून टेंगळं आणायची आणि तिथे साफसफाई चालू करायची.

आम्ही कटिंगला जायचो लहान असताना बजरंग न्हाव्याकडे. त्याच्याकडे तो चामडी पट्टा अडकवलेला असायचा वस्त-याला धार लावायला. त्याची ती अल्युमिनियमची पाण्याची वाटी, एकमेव लाकडी खुर्ची, धुरकट आरसा, गुन्हयांवर पांघरुण घालावं तसं ते त्याचं काळं कापड वर्षानुवर्षे तसंच होतं. एक तर त्याला सोडा वॉटर चष्मा होता. वाढलेले केस कापणे हे एकंच काम त्याच्याकडे व्हायचं. 'काय करू?' 'नेहमीसारखी, बारीक'. यापुढे कुठलाही संवाद तिथे झाला नाही. नंबर असेल तर दाढीचं जि-हाईक बघावं त्याचं. गुगल मॅप दोन बोटांनी जसा मोठा करून बघतात तसा तो गालाचा साधारण एक स्क्वेअर इंच एरिया ताणून धरायचा आणि कुठे तीळ बीळ आहे का शोधल्यासारखा अगदी डोळे चिकटवून दाढी करायचा. कानाचे केस, नाकपुड्या तिरक्या आणि वर करून तिथले केस कापणे वगैरे फुकट काम. गालफडं बसलेल्या वृद्धांची दाढी मात्रं हे लोक काय छान करतात, स्किल हवं त्याला. बजरंग दाढी झाल्यावर पाण्याचा फवारा असा मारायचा की कुणाला वाटेल, माणूस बेशुद्ध पडलाय आणि उठवण्यासाठी हा तोंडावर पाणी मारतोय. माणूस घाबरेल असा हल्ला, मग तुरटीची ती रिनच्या आकाराची वडी फिरवायची, खसाखसा तोंड पूसून मागचा लिव्हर हलवला की उठायचं गप.   

तोंडाला फेस आणण्याचे म्हणजे लावण्याचे पण अनंत प्रकार असतात. एकारांती आडनाव असेल तर तोंडाला दिसतोय तो साबणाचा फेस असावा असा संशय येईल इतपतच. ती गोदरेज डबी एका पिढीला एक अशी पुरेल इतका कमी. रोज दाढी करणा-यांचं तर मला फार कौतुक आहे. ते सटासट आल्यापासून जास्ती सोपं झालं असावं. माझ्या माहितीत एकजण दात घासून झाले की तोंडावर पाण्याचा हात फिरवतो की लगेच दाढी उरकून घेतो. एक अजून वस्त-यानी घरी दाढी करतो. एकाला लक्स लागतो फेस करायला. एक रेझरला त्या ब्लेडची खालची पट्टी लावतंच नाही, काय तर म्हणे एकदा हरवली म्हणून तशीच दाढी केली तर जमली, कशाला उगाच नवा आणायचा रेझर. एक सांताक्लॉझसारखा फेसाची दाढी काढतो. मग अगदी लोण्यात बुडवल्यासारखा रेझर गायब होतो. घरी दोन्ही कल्ले, मिशीची दोन्ही टोकं मापात कापणारे लोक महान आहेत. मला ते कधीच जमलं नाही. एकदाच मिशीला दोन्ही साईडला काट मारत मारत त्या मांजराच्या गोष्टीत खवा जसा दोन्हीकडून संपतो तशी ती चार्ली चॅप्लिनच्या वळणावर गेली तेंव्हा काढून टाकायची वेळ माझ्यावर आली होती आणि घोटाळ्यात सापडलेला माणूस कॅमेरामन अमुक अमुक सकट तमुक तमुक पुढे जसा चेहरा लपवतो तसा मी दोन दिवस फिरत होतो.

मी दाढी न करण्याची अनेक कारणं आहेत. आळस, आधी अगदी स्केलेटन तब्येतीमुळे होणारा रक्तपात, दाढी वाढल्यामुळे जरा मुरूम टाकून भर घातलेल्या खड्डयासारखे दिसणारे गाल, आज केली तर फार तर दुस-या दिवशीची सकाळ एवढाच वेळ ती केल्यासारखी वाटेल अशी लगेच येणारी सरला येवेलकर सारखी उफाड्याची दाढी या सगळ्याचा परिणाम दाढी ठेवणे हा आहे. सगळ्यात पहिला आवडलेला दाढीवाला म्हणजे 'अब्दुल्ला' मधला संजय खान. मग असे अनेक दाढीवाले दिसले. प्रत्येकाची स्टाईल वेगळी. टागोर, अनंत भावे, प्रणब रॉय, अनुपम गुलाटी, बाबासाहेब पुरंदरे, अच्युत गोडबोले, मंगेश तेंडुलकर, प्रकाश झा, मॅकमोहन 'सांभा', शेखर कपूर, कबीर बेदी, शॉन कॉनरी, प्रकाश जावडेकर, कलमाडी, प्रफुल्लकुमार महंत, रामदेवबाबा, वागळे, ब्रिजेश पटेल, संदीप पाटील, बॉर्डर, हशिम अमला, इम्रान ताहीर, नदीम(श्रवण), फ्रेंच 'कटा'तले बाळासाहेब, अमिताभ, विजय तेंडुलकर, आय.के.गुजराल आणि मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रत्येकाचा करिष्मा वेगळा, गाजण्याची कारणं वेगळी. 

पण या सगळ्या दाढीवाल्यांपेक्षा एक दाढीवाला खूप वेगळा होता. त्या खप्पड चेह-याच्या माणसाला एका अकरा वर्षाच्या अनोळखी मुलीनी - ग्रेस बेडेलनी - दाढी वाढवायचा सल्ला दिला होता. तो त्यानी मरेपर्यंत पाळला. एवढ्यातेवढ्या अपयशानी खचून जाणा-या माणसांनी त्याचा जीवनप्रवास बघावा. एकतर देवीचे व्रण असलेला खप्पड चेहरा, कृश शरीरयष्टी पण मनानी पोलाद असलेल्या या माणसाची १८३२ ला नोकरी गेली, सिनेटच्या निवडणुकीतही तो हरला. पुढच्या वर्षी तो धंद्यातही बुडाला. १८३५ मधे त्याच्या प्रेयसीचं निधन झालं. पुढच्या वर्षी त्याला नैराश्याचा झटका बसला. १८३८ मधे तो स्पीकरची निवडणूकही हरला. १८४३ मधे तो काँग्रेसच्या नॉमिनेशनसाठी उभा राहिला आणि पुलंच्या अण्णू गोगटयासारखा पडलाही. परत १८४८ ला रीनॉमिनेशनसाठीही पदरी निराशाच आली. १८४९ ला लँड ऑफिसर या पदासाठी पण त्याला नाकारण्यात आलं. १८५४ ला तो सिनेटची निवडणूक पण हरला. १८५६ ला उपाध्यक्षाच्या नॉमिनेशनसाठी पण हरला. १८५८ ला तो सिनेटची निवडणूक यशाचा बट्टा लागू नये म्हणून परत एकदा हरला. एवढ्या वेळा अपयश पदरी पडूनही तो लढत राहिला.

१८६१ ला मात्रं तो अमेरिकेचा अध्यक्ष झाला. त्याला ज्यांनी आधी हरवलं ती माणसं काळाच्या ओघात विस्मृतीत गेली पण आयुष्याची शेवटची निवडणूक जिंकलेला आणि हत्या झाल्यामुळे फक्तं चार वर्ष अध्यक्ष झालेला दाढीवाला अब्राहम लिंकन टिकून आहे आणि राहील. दाढी काय आम्हांला निसर्ग नियमाने आली, अशी जिद्द आणि कर्तृत्वं निसर्ग नियमाने मात्रं आलं नाही त्याचं काय करायचं? :)

जयंत विद्वांस

लेखन, लेखनशैली आणि लिहावं काहीतरी हा कंड......

मला स्वत:ला एफबीचा या करता खूप फायदा झाला. पोस्ट टाकायची म्हणजे नेमकं काय करायचं इतकं लो लेव्हलचं अज्ञान होतं. हळू हळू शिकत गेलो. पण मिळणा-या प्रतिसादामुळे ते जास्तं आवडत गेलं हे ही सत्यं आहे ('एकमेक प्रशंसा संघा'चा सभासद नसतानाही). एफबीच्या आधी जे कुणी लिहित असेल ते डायरी, पत्रं किंवा ज्याच्याकरिता लिहिलंय तेवढ्यापुरताच मर्यादित वाचक होता. बाकी आम पब्लिकला काय वाटतंय हे कळण्याचा मार्ग नव्हता. 

प्रतिसादांनी लोकांना काय आवडतं, काय आवडत नाही, आपल्याला अपेक्षा पूर्ण करणं किती जमतं, दुसरा आपल्यापेक्षा वेगळं काय लिहितो, ते वाचण्यासारखं असतं का?, दुस-याचं वाचताना जसा आपल्याला कंटाळा येतो तसंच आपलं वाचताना दुस-याला पण येत असेल का?, आपण लिहिलेलं परत वाचताना आपल्याला कंटाळा येतो का?, असेल तर, सुधारणा काय कराव्या लागतील?, मजकूर हा अनुभव असला तरी आपण तो चटपटीत करण्याच्या नादात भरकटवतोय का? असे अनेक प्रश्नं विचारले स्वत:ला. मग जी काय शैली असेल ती आपोआप होत गेली. कणेकरांचे वडील त्यांना म्हणाले होते - 'तुझं वाचताना कंटाळा येत नाही'. एवढी साधी गोष्टं लिहिताना पाळली तरी लिखाण वाचनीय होऊ शकतं. लिहिणं हे एक चांगलं व्यसन आहे. फक्तं त्याचा रतीब झाला की गुणवत्ता उतरते. सतत वाचनीय लिहिणं ही देणगी असू शकते किंवा तेवढा व्यासंग असू शकतो, जे प्रत्येकाला जमेलंच असं नाही. आपण व्यक्तं होण्याकरतो लिहितोय की बाजू मांडण्यासाठी, उगाच विरोधाकरता विरोध म्हणून लिहितोय हे मात्रं ठरवलं पाहिजे.

एकदा लिहित गेलं की तो कंड पाठ सोडत नाही. पण प्रतिसादाकरता लिहू नये मग निराशा येते नाही कुणाला आवडलं तर. आधी स्वत:ला आवडलाय का याची खात्री असावी. मिळणारे सगळेच प्रतिसाद खरे किंवा मनापासून असतात असं नाही त्यामुळे त्यांनी खूष किंवा नाराज होऊ नये. एकदा आपली रेंज कळली की त्रास होत नाही. उगाच बांबू मोठा आहे म्हणून पोल व्हाल्टच्या भानगडीत पडू नये त्याकरता आपण तेवढ्या उंचीवर जाऊ शकतो हे पाहणं गरजेचं आहे.

आणि माणसानी ना साधं लिहावं. साधं जास्ती परिणामकारक असतं, उगाच सतत अवघड शब्दांचे ड्रायफ्रुट्स टाकायचा हव्यास नको, दिसतं छान, भरजरी पण पेललं पाहिजे ना वाचणा-याला आणि आधी स्वत:लाही. स्वच्छ धुतलेल्या चेह-याची हसरी बाई, मेकपची पुटं चढवून लिपस्टिक बिघडू नये अशा बेतानी नकली हसणा-या बाईपेक्षा देखणी असते एवढं लक्षात ठेवलं की झालं.

-- जयंत विद्वांस

कॉफीपे चर्चा...

नवलकोल, दुध्या, शेपू, कारलं, फरसबी असे अनेक माझे शत्रू आहेत. चांगले संस्कार करण्याच्या नादात यावरून बोलताना माझ्या बालपणात कुणीही थकलेलं नाही, आता बोलून काही उपयोग नाही. बायको जेवणाच्या बाबतीत आई वडिलांनी एक चांगली सवय म्हणून लावली नाही हे म्हणून थकल्याला सुद्धा काळ लोटला. मी ही To ignore is the best revenge या वाक्याप्रमाणे वागून कुठलीही सुधारणा करू शकलेलो नाही. एखादी चव नाही आवडत जिभेला त्याला आपण काय करू शकतो सांगा मला. चव लादता येते का? डेव्हलप होते वगैरे मला पटत नाही.

इथे मग तोंडी लावणं उपयोगाला येतं. आजी अर्ध्या पळी तेलात चार ठेचलेल्या लसणी, मोहरी घालून चुर्र आवाज काढून पोळीबरोबर द्यायची त्याबरोबर मी जेवण करू शकायचो, इतकी सुंदर चव त्याला असायची. गूळ थोडा चिरडायचा त्यावर दोनचार थेंब लिंबू पिळायचं, अप्रतिम लागतं पोळीबरोबर. दोन कप पाण्यात चिमूटभर जिरे टाकून उकळवा आणि त्यात कधी पाव बुडवून खा आणि सांगा मला. अतिशय गोड लागतो. तेंव्हापासून मला अशा गोष्टी एकत्र करायची सवय लागलीये.

मला कुठलीही पाककृती येत नाही, कॉफी सोडून. त्यामुळे मला शोध लावणं गरजेचं होतं भाजी आवडीची नसली की. मस्तं पिकलेल्या चिक्कूची साल काढायची, पोळीबरोबर चांगला लागतो. दहीभात आणि तिखट फरसाण झकास लागतं. केळं सोलायचं त्यावर मध घालायचं, जरा कुस्करायचं, मस्तं लागतं नुसतंही आणि तोंडी लावणं म्हणूनपण. ताजा फोडणीचा भात सुद्धा वेगळा लागतो. सायभात आणि लसूण चटणी कालवली की त्यासारखं सुख नाही. पोह्याच्या चिवड्यामध्ये चुरलेला मोतीचूर किंवा बेसनाचा लाडू (एका लाडवाचे साधारण आठ दहा तुकडे) हे मिश्रण मी तिन्हीत्रिकाळ खाऊ शकतो.

या सगळ्यांपेक्षा मला मी केलेली कॉफी आवडते. एक चमचा मध, कुणी बघत नाहीये हे बघून घेतलेली दोनतीन चमचे साय, एक चमचा साखर आणि एक चमचा ब्रू असं मस्तं फेटायचं, त्यात गरम दूध घातलं की लागणारी चव अद्वितीय असते. बरोबर खारे काजू, महिनाखेर असेल तर बुधानीचे वेफर्स हवेत, त्यात अचूक मीठ असतं. लपाछपी खेळल्यासारखी कॉफी त्या सायीच्या आत कुठेतरी कणभर चिकटून येते आणि वर्ज्य स्वर लागल्यावर जशी मजा येते तशी चव बदलते. त्या मधाची चव पुढे तासभर तरी जिभेवर प्रेमात पडल्यासारखी रेंगाळत असते.

तात्पर्य काय तर खारट, कडू, गोड, मधाळ, सायीची मायाळू अशी मिश्र चव मला आवडते. आयुष्य तरी वेगळं काय असतं. एकंच चव सतत असेल तर बेचव होईल ते. असो! आलात कधी तर खारे काजू वगैरे घेऊन या, कॉफी मी देईन, होऊ दे खर्च. रंगेल जरा कॉफीपे चर्चा. ;)

जयंत विद्वांस

Wednesday, 20 July 2016

नमूने (५)…

साधारण तेंव्हा सत्तरीचे असतील ते. मी ९६ ला पहिल्या नोकरीत होतो तिथे फक्तं पगाराचं काम करायला ते यायचे. एकूण काम महिना संपल्यावर असायचं खरंतर पण ते वेळ घालवायला दिवसाआड तरी येऊन बसायचे. कार्ड अपडेट कर, हातानी ते मस्टर लिहून काढ अशी रोजगार हमीची दुष्काळी कामं ते करत बसायचे. अतिशय सुरेख अक्षर (मराठी, इंग्लिश दोन्ही), कामात एकही चूक नसायची, कधीही उशीर झाला नाही पगार काढायला, रजेचा हिशोब सुद्धा वर्ष संपलं की आठवड्याच्या आत सुवाच्य अक्षरात - 'श्री.***साहेब यांना सविनय सादर, सन १९९६-९७ या वर्षाकरिता अर्जित रजेचा तपशील' - या हेडींगखाली पुढे निबंध लिहिलेला नाटकी प्रकार ते द्यायचे. बोनसचा हिशोब पण कायम तयार असायचा. आडवी, उभी बेरीज करा, चुकणार नाही. वाढलेला डी.ए.पुढच्या महिन्यात देताना कधीही घोळ नाही. असे सगळे कामातले गुण त्यांच्याकडे निश्चित होते. पण अतिशय नाटकी माणूस. आता ते हयात नाहीत.

ते एस.टी.त होते. तिथून रिटायर्ड झाल्यावर ते इकडे यायचे. त्यांचा एक डोळा काचेचा होता. एकाच डोळ्यानी बघायचे त्यामुळे तिरके बसून चालवायचे ते. स्कुटर अशी मारायचे की मागचा जीव मुठीत धरून बसेल. एका पायात रॉड होता त्यांच्या, त्यामुळे लंगडल्यासारखे चालायचे. सगळे पांढरे केस मागे फिरवलेले, तोंडात कवळी पण एकशेवीस तीनशे पान कायम, शर्टची दोन बटणं उघडी टाकून बसायचे. दाढी कायम गुळगुळीत आणि चेह-यावर फाउंडेशनचे थर. खारेदाण्यासारखा चेहरा दिसायचा. काचेचा डोळा लक्षात येऊ नये म्हणून तपकिरी गॉगल घालायचे. अत्तराचा घमघमाट असायचा. कानात कायम फाया. डबा चार पुड्याचा आणायचे. अगदी साग्रसंगीत काम जेवण म्हणजे. तोंडावर इतकं गोड बोलतील की तुम्ही दत्तक जाऊ का विचार कराल. मूलबाळ काही नव्हतं त्यांना. बायको यांच्या वरताण होती. पासष्ठीची असेल म्हातारी पण कायम लो कट स्लिव्हलेस, बॉबकट, चामडी लोंबणारे हात, सुरकुतलेलं उघडं पोट आणि तोंडावर फाउंडेशनचे थर, फार ओंगळ प्रकार होता तो.

त्यांचे तिथेच व्याजानी पैसे होते. तारखेच्या आधी दोन दिवस प्रचंड गोड बोलायचे. व्याज दिलं की मी कोण तुम्ही कोण. मुका घ्यायची फार सवय त्यांना. कुणाचाही घ्यायचे. मी आधीच सांगितलं, तसलं काही केलं तर मी शिव्या देईन. त्यामुळे त्यांचा माझ्यावर प्रचंड राग. एकतर मला नाटकी माणसांचा प्रचंड तिटकारा आहे आणि त्यात उगाच कुणी अंगाशी आलं तर मग मी शिव्या देतो. त्यांचं वय बघता त्यांच्याकडून वारसदार पत्रं घ्यायचं होतं म्हणून त्यांना फोन करून बायकोचं नाव विचारलं होतं. यांचं इनिशियल एम.एस.टी.आणि बायकोचं पी.एम.टी., जाम हसलो होतो. मला म्हणाले, 'तुझं टाक, तू मला मुलासारखाच आहेस' वगैरे. दुस-या दिवशी घाईनी आले ते. म्हाता-यानी खाली जाऊन ते पत्रं स्वतः चार वेळा, दुस-याकडून दोन वेळा वाचून मग सही करून वर आणलं. मी मग सोडतो काय? म्हटलं, 'आलो असतो दत्तक पण ** आडनावापेक्षा विद्वांस लई भारी आहे म्हणून माझं नाव टाकलं नाही'.

मी एक्सेलला पगारपत्रक तयार केलं होतं तर ते साहेबाच्या घरी सकाळी आठला हजर. परत गावभर बोंब, माझ्यामुळे त्यांची नोकरी जाणार वगैरे. मी जस्ट ट्रायल करून बघितलेली. त्यामुळे ते माझ्या जास्तीच डोक्यात गेले. आमच्या इथे खाली देशपांडे म्ह्णून अर्क होते. ते त्यांच्यासारखंच गोड बोलून त्यांची ठासायचे. एकदा बोलताबोलता त्यांनी काल स्वीटहोमला लोण्याची भजी खाल्ली सांगितलं, मी री ओढायला. वर्णन तर असं की तोंडाला पाणी सुटेल. म्हातारा सगळं ऐकत होता. संध्याकाळी बायकोसकट हजर तिथे. ऑर्डर दिली. वेटरचा चेहरा मख्ख, त्याला वाटलं आपण चुकीचं ऐकलं. समजल्यावर तो हसायला लागला. इकडे म्हातारा अजूनच पेटला मग. काल आमचे देशपांडे खाऊन गेलेत म्हणाला. मालकापर्यंत गेला पार. मग घरी जाताना आमच्या नावानी बोटं मोडत आणि शिव्या देत घरी गेले असणार. दुस-या दिवसापासून आमच्याशी कट्टी आठवडाभर. त्यानंतर वर्षभरानी असेल, देसाई बंधूंकडे सीडलेस हापूस आलाय, काल घेतला असं देशपांडे म्हणाले. मी री ओढली. 'फक्तं मऊ करायचा, देठाच्या जागी स्ट्रॉ घालायची आणि डायरेक्ट आमरस प्यायचा'. म्हातारा म्हातारी नटून थटून हजर देसायांकडे संध्याकाळी. तिथे ही वादावादी. काय पब्लिक हसलं असेल यावरून आम्ही लोळत होतो. जाम शिव्या दिल्या असणार आम्हांला आईबहिणीवरून.

श्रावणात सत्यनारायण असायचा कंपनीत. एकमेव डोळा मालकाकडे ठेऊन सगळ्यांना ऐकू जाईल अशी प्रार्थना करायचे नमस्कार करताना, 'देवा, साहेबांची भरभराट होऊ दे, त्यांना काहीही कमी पडू देऊ नकोस'. मी आणि बापट, 'म्हणजे मला व्याज मिळेल' म्हणायचो. आमचे बापट (* व्ही.व्ही.बी.पोस्ट) म्हणजे आधीच बोलण्यात आचरट, अश्लील माणूस. 'अरे मेकअप बघ त्याचा, तुला वाटतं ह्याने काही केलं असेल बायकोला? पोर कसं होईल मग?' बाकी वैयक्तिक कधी मी कुणावर टीका कधीच केली नाही पण विनाकारण ते माझ्या मागे कायम मला नावं ठेवायचे. त्यांचं त्यांच्यापाशी, मी मात्रं वयाचा मान ठेऊन कधीच त्यांना उलट किंवा अपमानास्पद बोललो नाही.

काय सांगावं पुढेमागे शोध लागेल पण सीडलेस आंब्यांचा, कुणी संजीव कपूर लोण्याची भजी पण करेल. दोन्हीतलं एकेक ओंकारेश्वरावर ठेऊन येईन हयात असलो तर. एका डोळ्याचा कावळा नाचत खायला पुढे आला की माझा पुनर्जन्मावर पण विश्वास बसेल. 

जयंत विद्वांस


Monday, 4 July 2016

सत्तर एमएम चे आप्त (१४)… मदनमोहन कोहली...

बॉडी बिल्डिंगची हौस असलेला, बॉक्सिंग करणारा, उत्कृष्ट बिलियर्ड खेळणारा, उत्तम  पाककला येणारा, पोहण्याची आवड असणारा, रणजीसाठी राज्याकडून थोडक्यात निवड हुकलेला, बॉल रूम डान्समध्ये रुची ठेवणारा, चांगलं गाता येणारा, गाणी लिहू शकणारा तो, एक ऍथलिट पण होता. त्यानी तलतसारखा हिरो व्हायचा पण प्रयत्न केला. तो सैन्यात सेकंड लेफ्टनंट होता दोन वर्ष. दुस-या महायुध्दानंतर तो रिटायर्ड झाला. संगीताचं कुठलंही औपचारिक शिक्षण न घेतलेला, दिसायला अत्यंत देखणा असा हा गुणी संगीतकार. बगदादमधला जन्मं, लाहोरला शिक्षण आणि मुंबईला कर्मभूमी. देशभक्तं मदनलाल धिंग्रांच्या पुतणीशी - शीला धिंग्रांशी - त्याचं लग्नं झालं होतं. पंचवीस वर्षांच्या सांगितीक कारकिर्दीत त्यानी ९५ प्रदर्शित चित्रपटात ६४८ गाणी, बारा डबाबंद चित्रपटात २८ आणि एका डॉक्युमेंटरीसाठी एक एवढी गाणी दिली. 

हरलेल्या किंवा अनिर्णित सामन्यात काढलेलं शतक, पाच विकेट्स कुणाच्या लक्षात रहात नाहीत. एरवी फार कर्तृत्व न दाखवलेला हृषीकेश कानिटकर शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकून दिला म्हणून लक्षात रहातो आणि सतत उपयोगी खेळ्या केलेला यशपाल शर्मा आणि त्याच्यासारखे इतर अनेक मात्रं लोक पटकन विसरतात. त्याचं तसंच झालं. अनेक हिट गाणी देऊनही त्याचे चित्रपट फार चालले नाहीत. त्यामुळे तो बी ग्रेड किंवा न चालणा-या चित्रपटांचा संगीतकार असं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. तेंव्हाच्या खप असलेल्या संगीतकारांनी रेकॉर्डिंग स्टुडिओ महिनोंमहिने बुक करून ठेवले. त्यामुळे लायकी असलेल्या पण खप नसलेल्या संगीतकारांना त्यांच्या मिनतवा-या कराव्या लागायच्या. या मानी माणसाला कसं जमणार ते. लता, तलत, रफी असं जबरदस्त त्रिकुट त्याच्याकडे गायचं. आता त्यांची गाणी ऐकून लगेच लोक गहिवर काढतील, रुमाल डोळ्यांना जातील पण त्याला स्टुडिओ मिळू दिला जात नाहीये याबद्दल कुणीही बोललं नसणार.

एक डाव्या हाताला हार्मोनियम घ्यायची, शाल टाकायची, फर्माईशी मागवायच्या आणि आपल्याला म्हणायचंय तेच म्हणायचं, आवाज जरा मुलायम काढायचा, शब्दांच्या जागी नि सा ग, रेगम असं काहीतरी फास्ट गाऊन दाखवायचं (नव्याण्णव टक्के लोकांना त्यातलं काहीही कळत नाही असं माझं शंभर टक्के मत आहे), टाळ्या आल्या की मोक्ष मिळतो मग परत शब्दांवर यायचं, आपले प्रशंसासंघ पोसायचे, कॉर्पोरेट मैफिली करायच्या, कॅसेट खपवायच्या, व्हिडीओ काढलात तर अर्थाशी सुसंगत नसेना का एचडी क्वालिटी व्हिडीओ आणि देखण्या बायका घ्यायच्या की झालात तुम्ही प्रथितयश गझलगायक. डझनभर गझल वाजल्या असतील तुमच्या बाजारात तर तुम्ही थोर आहात. या लोकांच्या कार्यक्रमाचा एक फॉरमॅट आहे. काहीही न कळता हातवारे करणारे, मांड्यांवर चुकीचे ताल धरणारे, पाठ गझला त्याच्या बरोबरीने म्हणणारे, 'प्रश्नच नाही, काय तोडतो तो, त्याचं हे ऐकलंय?, खल्लास, तरी आज वरचा स्वर कमी लागतोय' अशा 'अभ्यासू' कॉमेंट करणारं पब्लिक असतं. पहिला शब्दं आला भरघोस खपलेल्या गझलेचा की गगनभेदी टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. बेडकांच्या विहिरीत भरणा-या मैफिली या.

याच्या गझल ऐका किंवा कुठलंही गाणं ऐका. ऐकताना माणूस हरवून जातो. मूळव्याध होईल अशा चाली आहेत म्हणायला गेलो तर. काय एकेक शब्दं आहेत. राजघराण्याचे दागिने घडवणारे सोनार वेगळे असतात. तसा तो स्पेशल नमुन्याचे दागिने घडवायचा गझलेचे. त्याची कित्येक गाणी अशी आहेत की ऐकल्यावर 'अरे, याचं आहे हे? माहित नव्हतं' असं होतं. का असं होत असावं? चांगल्या लोकांना का विसरतो आपण त्यांच्या हयातीत? माणूस मेल्यावर भारत रत्नं, जीवन गौरव, फाळके पुरस्कार दिला काय, न दिला काय, काय फरक पडणार आहे. तो नैराश्यात, आर्थिक विवंचनेत दिवस काढतो तेंव्हा कुणीही फिरकत नाही आणि मरायला टेकला की सत्कार करून थैल्या द्यायच्या, मानपत्रं द्यायची. एक लाचार, हताश माणूस गौरवायचा आणि पाठ थोपटून घ्यायची. गेलाच तर गुणवर्णन करताना थकत नाहीत माणसं. पण जिवंत आहे तोवर तो कुणाच्या खिजगणतीतही नसतो. शमशाद बेगम गेल्या तेंव्हा एकजण मला म्हणाला होता, 'होत्या अजून? मला वाटलं कधीच गेल्या त्या'. यशस्वी न झालेल्या,  झालेल्या चांगल्या लोकांचं विस्मरण आपल्याला लवकर होतं.

त्याच्या गाण्यांची यादी द्यायची गरज नाही तरीही काही काही गाण्यांचा उल्लेख करावाच लागेल. एकाचढ एक रत्नं आहेत. जाना था हमसे दूर, यूं हसरतोंके दाग, उनको ये शिकायत है, वो भुली दास्तां, भुली हुई यादों, 'अनपढ'मधली - आप की नजरोने समझा, है इसीमें प्यारकी आबरू, जिया ले गयो जी मोरा सावरीयां, 'आपकी परछाईयां'मधलं - अगर मुझसे मोहब्बत है, 'गझल'मधलं - रंग और नूरकी बारात किसे पेश करू,  'हकीकत'मधली - जरासी आहट होती है, होके मजबूर उसने, अब तुम्हारे हवाले वतन साथीयों, 'जहांआरा' मधलं तलतचं 'फिर वो ही शाम, वो  ही गम', 'वह कौन थी'मधली लग जा गले, नैना बरसे रिमझिम रिमझिम, जो हमने दास्तां अपनी सुनाई, 'मेरा साया'मधली झुमका गिरा रे, आपके पहलूमें आकर रो दिए, नैनोमें बदरा छाये, तू जहां जहां चलेगा, 'दस्तक'मधली बैयां ना धरो,माईरी मैं कासे कहू, हम है मताए कुचें, 'हीर रांझा'मधली मिलो न तुम तो, ये दुनिया ये महफिल, 'हसते जख्म'मधलं तुम जो मिल गये हो, 'लैला मजनू'मधली हुस्न हाजीर है, तेरे दरपे आया हूं, इस रेशमी पाजेब की झनकार के सदके, 'मौसम'मधली रुके रुकेसे कदम, दिल धुंडता है, छडी रे छडी, 'भाई भाई'मधलं ऐ दिल मुझे बता दे, 'बावर्ची'मधली भोर आई गया अंधियारा, काहे करत बरजोरी, तुम बिन जीवन. मला माहीत नसलेली, मी न ऐकलेली यादी याच्यापेक्षा मोठीही असेल पण ही गाणी मला अत्यंत प्रिय आहेत.

हिरो हिरोईनचं चुंबन दाखवलं म्हणून (इम्रान हाशमी तू लैच लकी आहेस बाबा) भारतातलं पहिलं U/A प्रमाणपत्रं मिळालेल्या '१९४२ - अ लव्ह स्टोरी'ची गाणी केल्यावर आरडी म्हणाला होता, 'ह्याच्यानंतर माझा जमाना परत येईल'. तो जानेवारी ९४ ला गेला आणि सिनेमा आला एप्रिल ९४ ला. नंतर बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून फिल्मफेअर पण मिळालं. काय करायचं त्याचं? मी आता यशस्वी नाही ही खंत घेऊन तो गेला सुद्धा. गीता दत्त वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी, सैगल बेचाळीसाव्या वर्षी, शैलेंद्र पंचेचाळीसाव्या वर्षी, शॉर्ट स्टोरीजचा बादशहा ओ हेन्री सत्तेचाळीसाव्या वर्षी, शब्दभ्रमकार असलेला, गिटार वाजवता येणारा लक्ष्मीकांत बेर्डे पन्नासाव्या वर्षी, आरडी चोपन्नाव्या वर्षी गेला. त्यांची कारणं त्यांना माहीत. त्यांच्या व्यसनांवर बोलायला आपण लायक नाही कारण त्यांच्यातला कलेचा अंशही आपल्यात नाही. पण कुठेतरी वाटतं, यांना कुणीतरी तोडीच्या, जोडीच्या माणसांनी सावरायला हवं होतं. अजून काहीतरी चांगलं करून ठेवलं असतं त्यांनी.

तो अजरामर राहील पण त्याला स्वतःला त्याचा काय उपयोग नाही. देणगीचा आकडा लिहावा तसं फक्तं एक्कावन्न वर्षाचं आयुष्यं जगलेला देखणा मदनमोहन चुनीलाल कोहली शेवटी लिव्हर सिरॉसिसनी गेला हे खरं. 

जयंत विद्वांस