Tuesday, 23 February 2016

लल्याची पत्रं (२७)…. 'अनहोनी को होनी…'

लल्याची पत्रं (२७)…. 'अनहोनी को होनी…'

लल्यास,

भारतीय चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा घटक, सेन, रॉय, अदूर, बेनेगल, निहलानी, के.असिफ, गुरुदत्त, खोसला, आरके, घई, मणीरत्नम ही आणि अशी इतर अनेक नावं लोकांना चटचट आठवतील पण मनमोहन देसाईचं नाव थोडं मागेच राहील. असंभवनीय योगायोग असलेली कथानकं, अनंत हास्यास्पद गोष्टी पण श्रवणीय गाणी, अमिताभ, रंजक असे अनेक विरोधाभास एकाच ठिकाणी असलेले चित्रपट त्यानी काढले. 'देशप्रेमी', 'मर्द'पासून सुरु झालेला -हास 'गंगा जमना सरस्वती', 'तुफान' (केतन देसाई) मधे पूर्णत्वाला गेला. पण त्याची गाणी श्रवणीय असायची. छलिया, ब्लफ़मास्टर, किस्मत, सच्चा झूठा, रामपूर का लक्ष्मण, आ गले लग जा, रोटी. धरमवीर असे अमिताभ नसलेले त्याचे हिट सिनिमेही आहेत. ७७ सालात परवरीश, धरमवीर, चाचा भतीजा आणि अमर अकबर असे चार चित्रपट त्यानी दिले, तिथून ८९ पर्यंत तो आणि अमिताभ अशीच जोडी राहिली. 

अमर अकबर….  मी आयुष्यात पाहिलेला पहिला लास्ट शो. तिसरीत असेन. फार भारी वाटलेलं तेंव्हा, आईवडिलांशिवाय रात्री साडेबाराला घरी यायचं म्हटल्यावर. त्या पिक्चरचा ठसा जो उमटला तो आजतागायत आहे. त्या वयात सिनेमा बघताना जो भाबडेपणा होता तो आता नाही. व्हिलनला मारलं की टाळ्या वाजायच्या थेटरात, आता हसतील. मुळात आता व्हिलन सेपरेट हवाच असं नाही, हिरोसुद्धा व्हिलन असतो आता. तर मूळ मुद्दा गाणं. आनंद बक्षी यमक जुळवणे (स्टेशनसे गाडी जब छूट जाती है तो एक दो तीन हो जाती है) , बोलगाणी लिहिणे (अच्छा तो हम चलते है), चित्रपटातला प्रसंग गाण्यातून लिहिणे (एक हसीना थी - कर्ज) यात मास्टर होता. त्याची आणि एलपीची जोडी होती. अनेक तात्कालिक हिट, कायमस्वरूपी हिट, गुणगुणायला सोप्पी अशी गाणी त्यांनी सतत दिली. अमर अकबरची सगळी गाणी हिट होती. पण टायटल सॉंग मला जाम आवडत आलं आहे त्याचं. 

म्हटलं ना, एमडी म्हणजे निष्पाप विरोधाभास, इकडे ओळख पटू नये म्हणून तिघं वेषांतर करून आलेत आणि स्वत:ची नावं बोंबलून सांगतायेत. ते गाणं सुरु व्हायच्या आधी जीवन 'रॉबर्ट' फोन करत असतो तेंव्हा त्याला ऋषीकपूर जे पिडतो ना त्याला तोड नाही. आर्या आणि मी अजूनही लोटपोट हसतो त्या शॉटला. माणूस चिडावा आणि त्यानी दोन वाजवाव्यात इतका त्यात छळवाद आहे. आधीच 'किशनलाल' प्राणचा धोका आहे, स्मगलर असला तरी मुलगी अशी चीज आहे की माणूस हळवा होतो. तिचं धर्माप्रमाणे रीतसर लग्नं लावावं ही बापाची इच्छा आहे. फोन झाल्या झाल्या पाद्री आणि मेनी इन वन वाद्यवृंद हजर आहे. गाण्याची ओळख करून देण्यासाठी आधी जीवन आणि 'झेबिस्को' युसुफखान अडचणींचा पाढा वाचतात. मग हिरो लोक आश्वासित करतात, इट्स पॉसिबल. मग तो म्हणतो,' ये तो अनहोनी है'. मग अकॉर्डीयन सुरु होतो. हे एक वाद्यं मला जाम आवडतं ('आजा सनम' मधे ती एक जी घसरगुंडी वाजवलीये ना, ती वाजवायला बोटाला क्राम्प येत असणार. 'गुलाबी आंखे जो तेरी देखी' (आनंद बक्षी - असे डोळे सापडल्यास कळव) मधे 'दिल में मेरे' च्या नंतर, 'ख़्वाब तेरे'च्या नंतर आणि 'तस्वीरें जैसे हों दीवार पे' यानंतर वाजलेलं अकॉर्डीयन ऐकंच, जसच्या तसं परत ऐकायचं असेल तर 'दिलवाले दुल्हनिया' मधलं गाणं ऐक). अतिशय सुरेल आणि वाजवायला तेवढंच अवघड वाद्यं.

यमक असलं की गाणं ऐकायला एक वेगळीच मजा येते बघ. यावेळेस होनी, रोनी आणि सलोनी, बरात, रात, मेहमानोको आणि दिवानोंको इतका सोप्पा प्रकार होता. माझ्या अल्पंज्ञानाप्रमाणे हे गाणं भैरवीत असावं म्हणून चाल एवढी गोड असेल. नसलं समजा तरी माझ्या आवडण्यात काही अडचण नाहीये म्हणा. दोन्ही कडव्यांची पहिली ओळ सेम आहे, हा एकमेव प्रकार असावा. 'कैसे बात मतलब की समझाऊ दीवानो को' यावेळी किशोरनी आणि बच्चननी धमाल केली आहे. अमिताभचं ते दाढी काढून चिकटवणं, परवीनचा ओळख पटल्यावर झालेला चेहरा, शबाना, नितुसिंघचे फुललेले चेहरेआणि बाहेर येताना एकदम फॅमिली पिक्चर, तीन जोडपी आणि सपन सलोने ले के आई है ये रात सलोनी. त्या वयात खूप आनंद झाला होता दुष्टं लोकांपासून यांची आता सुटका होणार म्हणून. नंतरच्या मारामारीला पण हीच ट्यून वाजते. अमर अकबर कधीही बघण्याचं हे गाणं हे ही एक कारण पुरतं मला.

'अनहोनी को होनी, कर दे होनी को अनहोनी' या ओळीचा 'होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं' हा अर्थ आपल्याला आयुष्यात वारंवार अनुभवायला मिळतो. कुठेच आशेचा किरण नसताना कुणीतरी मागे उभं रहावं, यातून बाहेर काढावं असं प्रत्येकाला वाटतं. खड्ड्यात पडल्यावर हात देऊन बाहेर काढणारा असा कुणी मिळणं हा नशिबाचा भाग, नाहीतर मग ज्याला पाहीलं नाही अशा देवानी ते काम पार पाडावं अशी आशा आपण धरतो. अशक्यं, अकल्पित ते घडणं आणि हातात आलेलं, खात्री असलेलं निसटून जाणं, इसीका नाम तो जिंदगी है. चल पुढच्या गाण्यापर्यंत अनहोनी काही होणार नाही अशी आशा करूयात. :)         


जयंत विद्वांस     

अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी..
एक जगह जब जमा हो तीनो अमर अकबर अन्थोनी
अनहोनी को होनी ...

एक एक से भले दो, दो से भले तीन
दूल्हा दुल्हन साथ नही बाजा है बरात नही
अरे कुछ डरने की बात नही
ये मिलन की रैना है कोई गम की रात नही
यारो हसो बना रखी है क्यो ये सूरत रोनी..
एक जगह जब जमा ...

एक एक से भले दो, दो से भले तीन
शम्मा के परवानो को इस घर के मेहमानो को..
पहचानो अनजानो को
कैसे बात मतलब की समझाऊ दीवानो को
सपन सलोने ले के आई है ये रात सलोनी..
एक जगह जब जमा ...


(१९७७ - अमर अकबर अंथोनी, आनंद बक्षी, एलपी, किशोर, महेंद्र कपूर, शैलेंद्रसिंह)

Wednesday, 17 February 2016

काय ले...

काय ले...

काही काही माणसांचा सेन्स ऑफ ह्यूमर अफाट असतो. असं काहीतरी पटकन बोलतात की हसू येतंच आपोआप. हजरजबाबीपणा स्वभावात उपजत असतो, फार फार तर चौफेर वाचन, निरीक्षणशक्ती, सामान्यज्ञान याच्या जोरावर तो पॉलिश्ड होऊ शकतो. पुण्यात जन्मखूण असावी ना तसा कुचकेपणा, उपरोध, उपहास, हजरजबाबीपणा यातला एखादा 'गुण' जन्माला घालताना देव शरीरात टोचूनच पाठवत असावा. प्रत्येक बाबतीत मत यासाठी वेगळी सुई असावी अर्थात, पुण्यात पाठवायचा असेल तर देवाला पोलिओसारखी ती प्रत्येकाला टोचावीच लागते.  

प्रत्येक शहराची काही घाऊक स्थित्यंतरं असतात. शहर पुणे, कधी काळी टांग्याचं मग सायकलींच, मग टू व्हिलर्सचं असं बदलत गेलं. मुंबईची ट्राम, लोकलची गर्दी, समुद्र हे पुण्याच्या भाग्यात नाही. इथे रहदारीचे नियम पाळले तर अपघात होईल अशी परिस्थिती आहे. इंडिकेटर एक तर दाखवण्यासाठी नसतोच मुळी, बरं समजा चुकून दाखवला तर त्या बाजूला वळायलाच पाहिजे अशी बोत आमच्यात नसते. स्मार्ट सिटीचं खूळ आलंय खरं पण जी कुठली संस्था ती राबवेल ना त्यांचे कन्सेप्ट बदलून जातील असं पब्लिक आहे इथे. असो!

तर कोणे एके काळी पुण्यात सायकली इतर कुठल्याही वाहनांपेक्षा जास्ती होत्या तेंव्हाची गोष्टं. तेंव्हा उदय रानडे नामक अनेक पैकी एक महान व्यक्तिमत्व भांडारकर रोडला राहायचं आणि आबासाहेब गरवारे कॉलेजात जायचं. एक्स्प्रेसवे, फ्री वे प्रकार पुण्यात पहिल्यापासून आहेत. कुठल्याही रस्त्यावरून (त्यात नो एंट्री पण आली) 'फ्री'ली जायचं, 'एक्स्प्रेस'वेगानी जायचं असा त्याचा अर्थ आहे. भांडारकर रोड ते गरवारे कॉलेज, चालत जाऊ शकेल एवढं अंतर आहे प्रभात रोडच्या गल्ल्यातून अगदी रमतगमत गेलं तर. पुण्यात तेंव्हा सायकल आता टू व्हीलरचा उल्लेख करताना गाडी लावून येतो, तुझी गाडी कुठे आहे असा फोर व्हिलर सारखा करण्याची प्रथा आहे. तर उदय सायकल घेऊन जायचा कॉलेजला. एका पायावर गिरकी घेऊन टर्न मारणे, कॅरिअरवर बसून चालविणे, एकावेळी चार जण बसवणे, हात सोडून चालवणे, थांबल्यावर पायानीच स्ट्याण्डवर लावून उतरणे, तिरकी करून सीटवर डायरेक्ट बसणे वगैरे प्रथमा, द्वितीया त्यानी कधीच उत्तीर्ण केल्या होत्या. 

दीड दोनची वेळ असेल दुपारची. बाळासाहेब कॉलेजातून दमून निघाले. तेंव्हा दुपारीही आत्ता पहाटे असते तेवढीच वाहतूक असायची. भूमितीत रेषाखंडावर लंब टाकतात तसा उदय तीरासारखा मेन गेट मधून सुसाट बाहेर आला. त्याला रेषाखंड समजून लकडीपुलाकडून आलेली बस त्याला छेदायला गेली. दोघंही स्पीडात पण ज्याचं वाहन मोठं त्या बिचा-याला थांबावच लागतं. तर अचानक आलेला उदय क्रॉस करून गेला अर्थात बसड्रायव्हरनी अतोनात प्रयत्नं करून अपघात टाळल्यामुळे. 

रस्त्यावरचं तुरळक पब्लिक, कॉलेजची मुलं श्वास रोखून बघतायेत. उदयच्या कपाळात, छाती लोहाराच्या भात्यासारखी, अशुभाच्या कल्पनेनी अंगाला थरकाप. बसड्रायव्हर मान बाहेर काढून चार उपदेशाचे शब्दं सांगायची संधी घ्यायचा विचार करतोय. कुमार उदय आधीच तोतरा होता. त्यानी सायकलची मान वळवून घेतली पळायच्या किंवा घराच्या दिशेने म्हणूयात आणि रानडे बोलते झाले. ऐकून पब्लिक सोडा, बसड्रायव्हर, अख्खी बस हसायला लागली. आणि रानडे सायकल मारत, दात काढत आपल्या घरी रवाना झाले. 

'काय ले, मलायचंय का सायकलखाली सापलून' 

म्हटलं ना, वरून येतानाच ते इंजेक्ट होऊन येतं म्हणून. 

जयंत विद्वांस



Monday, 15 February 2016

लल्याची पत्रं (२६)…. 'मार्गारिटा - एल्व्हिस प्रिसले…'

लल्याची पत्रं (२६)…. 'मार्गारिटा - एल्व्हिस प्रिसले…'

ब-याच दिवसांनी पत्रं. इंग्लिश गाणी ऐकायचा फार योग येत नाही त्यापेक्षा त्यात चांगलं काय वगैरे घोर अज्ञान आहे कारण भाषा, उच्चारण, अर्थ पटकन समजत नाही. इंग्रजी चित्रपट बघताना सबटायटल्स असतात त्यामुळे माझ्यासारख्याला बराच फायदा होतो. भाषेच्या आडकाठीमुळे खूप चांगल्या गोष्टी कळायच्या राहून जातात याची मला कायम खंत आहे. इंग्लिश असं नाही, एकूणच इतर भाषातलं ही भाषेच्या अडचणीमुळे वाचलं, ऐकलं जात नाही. अनुवाद असतात पण माझ्या मते त्यात अनुवाद करणा-याची भाषा, शैली उतरते. मूळ लिहिलेलं वाचण्यात मजा असते. जेम्स ह्याड्ली चेसच्या पुस्तकांचं भाषांतर वाच कधी, कोल्हापूरचं प्रकाशन आहे (भानू शिरधनकर यांनी केलेलं वेगळं, त्यांनी Vulture is a patient Bird चं केलेलं 'गिधाडांची जातंच चिवट' वाचूनच तर मी चेसचा भक्तं झालो), चेसनी अनुवादकर्त्याकडून स्वत:ची बोट ठेचून घेतली असती आणि रंकाळ्यात जाऊन उडी मारली असती असलं भीषण भाषांतर आहे. 

आपल्या संगीतकारांनी मात्रं खरंच खूप उपकार केले आहेत. माझ्यासारख्या सामान्य किंवा अगदी शिक्षणाचा गंध नसलेल्या किंवा ओरिजिनल इंग्लिश किंवा इतर परदेशी भाषातलं गाणं ऐकायचा योग येण्याची सुतराम शक्यता नाही त्याच्यासाठी ते बाहेरच्या चांगल्या चालीत आपले शब्दं बसवतात आणि सादर करतात. कधी चुकून ओरिजिनल ऐकायचा योग आला तर मजा येते. एकंच शंका किंवा प्रश्नं आहे - 'आपल्या संगीतकारांची चाल कुणी परदेशी माणसानी चोरून हिट केली असेल का?' असं माझ्या तरी ऐकिवात नाही. आपल्याकडे चोरण्यासारख्या सुंदर चाली आहेत की. का ते लोक आपलं ऐकतच नाहीत? खूपवेळा आपण वाचलेल्या माहितीवर बोलतो. 'बाजे पायल छमछम' मरे गुडविनची आहे, 'नजरे मिली दिल धडका' 'कम सप्टेंबर' आहे. 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' आणि 'नीले नीले जिंदे शामियाने के तले' मोझार्ट आहे, 'मैने प्यार किया' I Just Want to say, I love you आहे, 'सोचना क्या, जो भी होगा देखा जायेगा' Egyptian Walk आहे, 'हरी ओम हरी' One Way Ticket  आहे. पण यातल्या आपण सगळ्याच ओरिजिनल ऐकलेल्या असतात असं नाही.       

आपल्याला कळणा-या भाषेतली गाणी ऐकताना आनंद व्हायची, आवडायची अनेक कारणं असतात. चाल, आवाज, एखादं आवडीचं वाद्य, त्यावेळचा पडद्यावरचा प्रसंग, आवडता नट/नटी, गायक/गायिका, शब्दं, अर्थ आणि भाषेची गंमत, यमक अशी अनेक कारणं असू शकतात. E.A.Robinson ची 'Richard Cory' वाचताना, Alfred Lord Tennyson ची 'Home they brought her warrior dead' किंवा Mary Gilmore ची 'Never Admit the Pain' वाचताना मला सगळ्यात पहिल्यांदा काय जाणवलेलं असेल तर की त्यातलं यमक किती सुंदर आहे, वाचताना त्यामुळे आपोआप लय येते (मी या सगळ्यांचं मराठी करताना एकदाही मला त्यातलं यमक जुळवता आलं नाही, हा  भाग वेगळा, सूडच एकप्रकारचा, मी स्वैरानुवाद या नावाखाली पळ काढला). तर एवढं सांगायचं कारण काय तर एल्व्हिस प्रिसलेचं मार्गारिटा. माझा मित्रं रव्या उटगीकरनी 'काय अप्पा'वर परवा मला त्याचा व्हिडिओ दिला. मी प्रिस्ले हे नाव फक्तं ऐकून होतो.

पुढेमागे त्याची अजून गाणी मी ऐकेन, वाचेन त्याच्यावर पण आत्ता तरी मला त्याच्या या गाण्यानी मोहून टाकलंय. त्याचे लिरिक्स खाली दिलेत, ते वाचता वाचता गाणं ऐकलं की अजून मजा येते. Rapture, Intoxicates सारखे शब्दं किती सुरेल म्हणतोय तो, Moth in the flame च्या वेळचा त्याचा आवाज एकदम खतरा आलाय. तुला खाली लिंक दिलीये व्हिडिओची. त्यात ती डाव्या कोप-यात जी पोरगी बसलीये ना हातात चिपळ्या घेऊन, तिचे हात बघ, किती -हिदमिक हलतात ते. ६३ सालचं गाणं आहे हे. ती पोरगी पण साठीची असेल आता. प्रिस्लेला किंग म्हणायचे. जिवंत असेतोवर ती सांगेल मी प्रिस्लेच्या एका गाण्यात आहे म्हणून. मला शम्मी आठवला अनेक गाण्यातला, प्रिस्लेपेक्षा तो बोद्ल्या होता एवढंच बाकी ते बघणं वगैरे सेम आहे. 

एवढं सगळं नमनाला तेल खर्ची घालून नेमकं सांगायचं तेच राहून जाईल. शंकर जयकिशनचा 'झुक गया आसमां' ६८ सालचा. जीपमध्ये बसून राजेंद्रकुमार रफीच्या आवाजात म्हणतो ते 'कोन है जो सपनोमे आया' ऐकताना मला आता 'मार्गारिटा' आठवत रहाणार. पहिल्या तीन ओळीत 'Who Makes' आहे म्हणून 'कौन है' आलं आपल्या दोन ओळीत, तिस-यात चित्रपटाचं नाव घेतलं असावं मुद्दाम टायटल सॉंग साठी. 'ओ प्रिया' 'मार्गारिटा'च्या जागी. अर्थात त्यानी फरक काही पडत नाही. शंकर जयकिशनच्या नावावर अनेक सुरेल आणि ओरिजिनल चाली आहेत त्यामुळे उगाच कशी चोरी सापडली वगैरे म्हणायला तो काही अन्नू, बप्पी नाही. तर श्रवणीय आणि प्रेक्षणीय गाणं असा योग आहे हा. तर मार्गारिटा, वाच, बघ, ऐक आणि सांग. चल पुढच्या पत्रा पर्यंत बाय. 

जयंत विद्वांस

"Marguerita"


Who makes my heart beat like thunder?
Who makes my temperature rise?
Who makes me tremble with wonderful rapture
With one burning glance, from her eyes

Marguerita...

Once I was free as a gypsy
A creature too wild to tame
Then suddenly I saw, Marguerita
And I was caught, like a moth in the flame

Marguerita...is her name

Marguerita...

Her lips have made me her prisoner
A slave to her every command
She captivates me, and intoxicates me
With one little touch of her hand

Marguerita....

Sweet...Marguerita...sweet, sweet Marguerita....

https://www.youtube.com/watch?v=ApjA9OfAUk4






Saturday, 30 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१२)… केश्तो मुखर्जी…

सत्तर एमएम चे आप्तं (१२)… केश्तो मुखर्जी…
 
सुंदर निखळ विनोद करणं मोठं अवघड काम असतं, तो जमला नाही तर हसू येत नाही, हसं होतं. अनेक विनोदवीर होऊन गेले. कुणी शब्दं खेळ करून हसवलं, कुणी आचरटपणा करून हसवलं (राजेंद्रनाथला तोड नाही यात), कुणी अंगविक्षेप न करता हसवलं (उत्पल दत्त, देवेन वर्मा, सुधीर जोशी), कुणी टायमिंगवर हसवलं (अशोक सराफ नं १ ते १०, परेश रावल, अर्शद वारसी), कुणी आवाजाच्या लकबीवर हसवलं (जॉनीवॉकर, ओमप्रकाश) आणि ज्यांना पाहिलं की मला हसू येतं असे म्हणजे राजपाल यादव, जगदीप, केश्तो मुखर्जी. जुही चावला, फरीदा जलाल, आगा हे मला त्यांच्या भन्नाट सेंस ऑफ ह्यूमर साठी आवडत आलेत. यांच्या चेह-यावर आगामी विनोदाची जी हालचाल होते ना ती मोठी बघणीय असते. दिग्दर्शक चांगला असेल तर काहीजण उत्तम विनोद करू शकतात (सुनील आणि अक्षय - हेरा फेरी आणि फिर हेराफेरी).  अशी यादी देत बसलो तर संपणार नाही.

तर काही काही रोलवर काही काही माणसांचे ठसे असतात, नाच्या म्हटलं की गणपत पाटील तसं दारुडा म्हटलं की दारूचा एकही थेंब आयुष्यात न पिता अट्टल दारुड्याचं काम करणारा केश्तो मुखर्जी. केश्तोचे फार सिनेमे मी पाहिलेले नाहीत किंवा पाहिले असतीलही पण लक्षात नाहीत. 'शोले'तला हरिराम नाई, 'बॉम्बे टू गोवा' मधला झोपलेला दारुडा, 'पडोसन' मधला किशोरचा दोस्त, 'इन्कार'मधला साब, पानीमें आग, आगमें पानी' म्हणणारा दारुडा आणि 'जंजीर'मधे अमिताभला लटकावणारा गंगू - हे मात्रं मी विसरू शकत नाही. काटकोळी शरीरयष्टी, कायम नशा न उतरलेला चेहरा, चाप्लीनसारखी मिशी आणि लेट करंट असल्यासारखं त्याचं ते मंद माणसासारखं बघणं, ते डोळे फिरवणं, खालचा ओठ दाबत ते मान तिरकी करून लाचार बघणं याची कॉपी नाही झाली कधी कारण ते सगळं ओरिजिनल होतं. त्याला हशा निर्मितीसाठी बोलायची गरज नव्हती. त्यानी डोळे उघडले तरी लोक हसायचे. 


रवीना टंडनचा मामा म्याकमोहन उर्फ सांभा नाराज होता सिप्पीवर, रोल कट केला म्हणून. सिप्पीनी त्याला सांगितलं होतं, रिलीज होऊ दे मग सांग. त्यातला अंग्रेजोके जमानेका जेलर असरानी आणि खब-या हरिराम नाई केश्तो पाच दहा मिनिटच असतील एकूण पडद्यावर पण त्यांनी धमाल केलीये. बच्चन धर्मेंद्रला प्लान सांगतो पिलरच्या आड, तेंव्हा चोरून ऐकताना केश्तोच्या चेह-यावर जे उमटलंय ते बघाच, त्याची ती बिरबलची अर्धवट दाढी ठेवून जेलरकडे जाण्याची टिपिकल चुगलखोर माणसाची असते तशी घाई, तिथे खबर देताना चेह-यावर असलेली मतलबी लाचारी, असरानी राउंड घेतो तेंव्हा आता कसे पकडले जाणार याचा आनंद त्याच्या चेह-यावर बघावा, तो केश्तोपाशी थांबतो तेंव्हा डोळ्याने कडेच्या माणसाकडे खुणावणं, आपलं बिंग उघडं पडेल याची भीती. अनंत वेळा शोले बघताना काय घडणार हे माहित असूनही मला कायम हसू फुटलेलं आहे.

'बॉम्बे टू गोवा' मधला झोपलेला दारुडा म्हणजे विनोदाचा 'मूक'प्रकार होता. बसला धक्का मारताना तो हवेत हात टेकवून ढकलत असतो. बसमध्ये काय काय घडत असतं पण हा पठ्ठा सदानकदा झोपलेला. सतत बेअरिंग सांभाळणं मोठं अवघड काम आहे. 'परिचय'मधला ज्याला मुलं पळवून लावतात तो मास्तर होता तो. 'इन्कार'मधे मासे पकडायला बसलेला असतो तो. विडी पेटवून पाण्यात टाकलेल्या काडीनी आग लागल्यावर केश्तोच्या चेह-यावर कपाळात गेल्याचा भाव आहे. तो पळत जातो आणि चौकीत जे असंबंद्ध बडबडतो ते हसू फुटणारंच आहे. 'पडोसन'मधल्या 'मेरे सामनेवाले खिडकी'ला खराट्यावर कंगवा फिरवणारा केश्तो, किशोरचा मित्रं होता. त्याचं ते ओठ दाबून बघणं, ती डोक्यावर उभी असलेली बट, हसू आणते.  


'जंजीर'मधला गंगू त्या मानानी मोठा होता. त्याचं ते अमिताभला 'आईये ना' म्हणणं अगदी गळ्यात पडणारं होतं, गरीबाच्या घरी कुणी मोठा माणूस येत असला की त्याची एक वेगळीच लगबग असते. आपलं दारिद्र्य त्याला दिसू नये म्हणून मोठा पाहुणचार करतात मग ते, तशी त्याची लगबग बघावी त्यात. त्याला पकडून दिल्यावर त्याची ती शरमेने खाली गेलेली मान शॉटमधे जे कदाचित लिहिलेलं नसावं आणि असलं तर ते त्यानी ते शंभर टक्के पोचवलंय. प्राण बरोबर ट्रेनमधून जाताना त्याच्या चेह-यावरची भीती बघा. असल्या अभिनयाला बक्षीस नाही मिळत हे दुर्दैवं. क्रिकेटमधे फोर सिक्स मारणारे जास्ती फेमस असतात पण इमाने इतबारे धावा करणारे यशपाल शर्मा, ख्रिस हरीस, गेव्हीन लार्सन, रहाणे मागे पडतात तसंच असतं या लोकांचं. कमीतकमी वेळात चमकीतला हिरा चमकावा तसे चमकून जातात पण त्यांचं अस्तित्व मोठा उजेड पडला की काजव्यासारखं पटकन संपतं.  

त्याचा मुलगा बबलू मुखर्जी काही मालिका आणि चित्रपटातून चमकला पण तो देखणा, गोलमटोल होता. केश्तोला कायम आर्थिक चणचण असायची असं वाचलं होतं. फुटकळ भूमिकातून किती पैसे मिळणार म्हणा. दिग्गज बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटकच्या मर्जीतला होता तो, त्यामुळे त्याच्या चित्रपटात छोटा पण महत्वाचा रोल त्याला मिळायचाच. ८१ ला मरायच्या एक वर्ष आधी त्याला बेस्ट कॉमेडीयनचं फिल्मफेअर पण मिळालं, एवढंच काय ते बक्षीस.  

दारू पिणारे बिचारे आपण शुद्धीत आहोत हे दाखवण्यासाठी किती खटाटोप करतात आणि तरीही पितळ उघडं पडायचं ते पडतंच, इकडे हा आणि 'जॉनीवॉकर' बद्रुद्दिन काझी मात्रं थेंबाला स्पर्श न करता अट्टल दारुडा उभा करतात. अभिनय म्हणजे वेगळं काय असतं, जे आपण वास्तवात नाही ते पात्रातून उभं करणं. केश्तो, जबतक शोले और जंजीर देखुंगा तबतक तेरा हरिराम नाई और गंगू भूलुंगा नही! हसता हसता कृतज्ञेतेने डोळ्यात पाणी येईल एवढं निश्चित. 
 
जयंत विद्वांस 
 

Friday, 29 January 2016

वर्तुळ...

वर्तुळ... 

नव्यानीच हौशी नाटक, सिनेमात काम करणा-या किंवा त्यासंबंधित क्षेत्रात काम करणा-या, गायक, वादक, नट लोकांची एक वेगळीच भाषा असते, त्यात नुसती मौखिक भाषा नाही तर देहबोली पण आली. त्याचं नाव झालेलं नसतं, त्यांना त्यांचा ग्रूप सोडून फार कुणी ओळखत नसतं आणि प्रसिद्धीची हौस तर तुंबलेली असते. आपल्याच क्षेत्रातला दुसरा माणूस हजर नसेल तर उपस्थित माणसांसमोर ते जास्ती खुलतात. त्यांना श्रोते हवे असतात. ते पण अचंबित होणारे, 'फार बाबा ओळख तुझी' अशा अर्थाचं कौतुकाने बघणारे, उगाच टाचणी लावून स्वप्नं फुगा फोडणारे श्रोते पुढच्यावेळी टाळले जातात. आपण काय करतो आणि मनात 'काय करता आलं असतं अजून' याची सरमिसळ झालेली असते त्याला वाचा फुटते अशा वेळी. सगळ्यांमध्ये एक साम्यं काय तर 'आपण इतरांपेक्षा किंवा अमुकतमुकपेक्षा कसे वेगळे आहोत' हे ठसवणं.

नाटकाच्या इंटरव्हलला या गप्पा ऐकाव्यात. एखाद्या प्रामाणिक माणसानी त्याला जे वाटतंय ते समजा प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा, नाटक छान आहे, की त्याचा पार भुगा करतात हे लोक. 'यापेक्षा आम्ही सरस करतो', 'किती घाईत उरकलंय', 'तिची एंट्री तर धावत आल्यासारखी झाली, तिला सांगा रे कुणीतरी बालनाट्यात काम कर म्हणाव आधी', 'छ्या, त्यापेक्षा त्या ह्याला गेलो असतो तर बरं झालं असतं'. बरं, हे लोक अर्ध्यात निघून जात नाहीत, उरलेला भाग संपूर्ण बघतात. मनातून जे चाललंय ते आवडलेलं असतं पण पहिल्या भूमिकेशी ठाम राहायचं हे ठरलेलं असतं. मी एकदा विचारलेलं एकाला, 'का रे भंगार होतं तर थांबलास कशाला?' त्या बेडकानी मला चीतपट करणारं उत्तर दिलं होतं, 'नाटक कसं करायचं नाही याचा पण अभ्यास असतो रे, तुला नाही कळणार'. 

फलाणा नट, नटी, दिग्दर्शक किती जवळचा आहे हे सांगण्याची पण एक स्टाईल असते. मी एका बरोबर गप्पा मारत होतो एकदा, असेल साल ९४-९५. माणूस हौशी नाटकात काम करायचा म्हणजे असं त्यानीच सांगितलेलं. 'काय रे दिसला नाही बरेच दिवस?' 'अरे, xxxx करतोय सध्या त्यामुळे वेळ नाही, आत्ता पण लकीली भेट झाली. सवितानी सांगितलंय, 'भरत'ला येच, ब-याच दिवसात भेटलो नाहीये आपण, नऊला ये डॉट, तिकडेच निघालोय'. मी घरी आलो नी पेपर बघितला, 'भरत'ला 'चार दिवस प्रेमाचे होतं सहा वाजता. मला खात्री होती की सविता प्रभुणेनी याला अजिबात बोलावलं नसणार. एखाद्या नाटकाच्या वेळेस दोनचार शब्दं बोलली असेल एवढंच. छान काम करतोस एवढं म्हणाली असेल फार फार तर. पण मला दिपवून टाकण्यासाठी ते बोलणं त्याच्या दृष्टीने गरजेचं असावं. खरंतर नंतर 'काय म्हणाली सविता' किंवा त्याच वेळी 'मी पण येऊ का, सही घ्यायचीये फक्तं' असं बोलायचं असतं मला पण जीभ रेटत नाही माझी. मला खरं वाटावं हा त्याचा हेतू असफल झाला असता, कुणाचं स्वप्नं तोडायचं पाप नको उगाच. 

एकजण 'पंतां'च्या संस्थेत होता. कधीही बघा, माणूस 'लखोबा लोखंडे' तोच करत असल्यासारखा सगळा भाव असायचा. आतल्या स्टो-या, किस्से ऐकून आम्ही गपगार व्हायचो. हा गेला नाही तर प्रयोग होणार नाही असं आम्हांला वाटायचं. एवढं असून पण कधी पेपरातल्या जाहिरातीत नाव का येत नाही असा भाबडा आणि सहानुभूती वाटणारा प्रश्नं पडायचा. अनेक वर्ष मी बघत होतो. त्यांची अनेक नविन नाटकं आली सगळ्या नाटकात पण याचं नाव कधी जाहिरातीत नाही आलं. नंतर समजलं की पोस्टमन, नटीचा भाऊ, दीर, निरोप्या, नुसता बसणारा, एखाद दोन वाक्यं बोलणारा जज्ज अशीच कामं असायची. पण त्याचा जीव रमायचा एवढं खरं. खरंतर माझ्यासारख्या माणसाला त्या तालमीच्या प्रोसेसचं फार आकर्षण आहे. स्टेजवरच्या नाटकापेक्षा ते उमलत जाणारं नाटक बघण्यात जास्ती मजा आहे. ती प्रोसेस त्याला पण आवडायची म्हणूनच तो जायचा पण आपण काय असायला हवे होतो हे तो आम्हांला तो ते आहे असं सांगायचा. त्याचा जीव रमायचा हेच खरं.  

खरा अभ्यास करणारा माणूस विरळ असतो. अफाट वाचन वगैरे लांबच्या गोष्टी. ऐकीव माहितीवर आधारित स्वत:ची चार वाक्यं घालून हे लोक बोलतात मात्रं स्टायलिश. त्यांच्यापेक्षा बुद्धिमान माणूस आला तर हे म्यूट होतात. तो माणूस एकदा गेला की मग त्याची निंदा करण्यात वेळ घालवतात. 'नशीब आहे रे त्याचं', 'लाळघोटेपणा करत नाही ना आम्ही म्हणून मागे आहोत', 'एकदा स्टेजवर आला पाहिजे समोर, परत काम नाही करणार, मी असलो की', वगैरे हेडलाईन्स स्क्रोल होतात. त्यातला फोलपणा बोलणारा आणि ऐकणारा दोघांना जाणवत असतो. यांच्या नशिबात त्यांना कुणीतरी आदर्श मानेल असाही ही एक स्तर असतो. तुमची लिडरशीप, विधानं करण्याची पात्रता, दाखवायचा बिनधास्तपणा, आपल्याला काही फरक पडत नाही यावर भक्तगणसंख्या अवलंबून असते. हळूहळू डबकं तयार होतं, मग तोच समुद्र वाटायला लागतो हे वाईट आहे.

बिचारे जागरणं करतात, फुकट राबतात, दाढ्या वाढवतात, त्यांचा कुठला तरी आदर्श ओढतो ती आणि तशी सिग्रेट ओढतात, तंबाखूचे बार भरतात, दारवा पितात. खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवतात, डोळे उघडे ठेऊन बुर्ज खलिफा एवढ्या उंचीची  स्वप्नं बघतात. हळूहळू वास्तव कळायला लागतं. कुणी पॅराशुट लावून अलगद जमिनीवर येतात, कुणी दाणकन आदळतात. काहीजण स्विकारतात, काहीजण स्वप्नातच रमतात. प्रत्येक नव्या प्रयोगाला अंकुर फुटतो, नविन पिढी मागे रेटत असते. वयामुळे कुणी फटकन बोलत नाही तरी हे अक्कल शिकवायला जातात, अपमानित होतात पण मागे हटत नाहीत. तिथलाच त्यांच्याइतकाच नवखा, स्वप्नाळू जमाव शोधतात आणि त्यांना 'पुरुषोत्तम'ला काय काय केलंय, कुणी कुणी कौतुक केलं होतं, नंतर आपल्याला संधी कशी मिळाली नाही, आपल्यावर अन्याय कसा झाला अशा स्टो-या सांगायला सुरवात करतात. ते भाबडे लोक ऐकतात, हळहळतात. याला तेवढंच बरं वाटतं. त्याला त्यानी जिथून सुरवात केली तो दिवस आठवतो आणि एक वर्तुळ पूर्ण होतं.  

जयंत विद्वांस

Friday, 22 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (११)… सी.रामचंद्र…

सत्तर एमएम चे आप्तं (११)… सी.रामचंद्र…


प्रत्येक चित्रपटसृष्टीचा एक विशेष असतो. हॉलीवूडला गाण्यांचा दुष्काळ तर आपल्याकडे गरज नसली तर कोंबतील. आपल्याकडेही परत अनंत प्रकार आहेत. साउथकडे पैलवान हिरोईनी, अतर्क्य फाईट सीन्स, भन्नाट डान्स स्टेप्स, लाउड अभिनय (यांचे रिमेक जास्ती चांगले वाटतात), मराठीत दोन टोकं, काहीवेळेस बांधेसूद पटकथा, उत्तम अभिनय तर कधी अश्रुधूराचा बाँब फोडतात नाहीतर मग हसू न येणारे विनोदी चित्रपट. पण हा झाला आत्ताचा काळ. साठ ते नव्वदच्या दरम्यान संगीत हा प्राण होता चित्रपटाचा, मराठी असो की हिंदी. हिरो पंजाबी गोरा, देखणा, हिरोईन साउथकडची चांगली डान्सर, चरित्र भूमिकेला मराठी लोक, गायला लता, आशा, संगीत बंगाली मॉब जास्ती (एसडी, हेमंतकुमार, सलील चौधरी, अनिल विश्वास) की झाला चांगला हिंदी चित्रपट. या सगळ्यात एक मराठी माणूस वेगळेपण  टिकवून राहिला - सी.रामचंद्र.

पुणतांब्याला १२ जानेवारी १९१८ ला जन्माला आलेला आणि ५ जानेवारी १९८२ ला स्वत:च्याच नावातला राम म्हटलेला हा रामचंद्र नरहर चितळकर नावाचा बेफाट, हुन्नरी आणि देखणा माणूस जगला असता तर आत्ता अठ्ठ्याणव वर्षांचा असता. मोठी गंमत असते. आपण ठरवतो ते आयुष्यात होतंच असं नाही किंबहुना न ठरवलेलं जास्ती होतं. आधी त्यांनी चित्रपटात केलं, मग तमिळ चित्रपटात संगीतकार झाले, अण्णासाहेब, राम चितळकर, शामू आणि सी.रामचंद्र अशी चार नावं लावून संगीत दिलं, मराठी चित्रपटात आर.एन.चितळकर असं नाव लावून कामं केली, गाणी म्हटली, चित्रपट काढले, 'माझ्या जीवनाची सरगम' नावाचं आत्मचरित्रं लिहिलं आणि या सगळ्याला बाजूला सारून लक्षात रहातील अशा अजरामर चाली दिल्या.

'अपलम चपलम, चपलाई रे' हे मी त्यांचं सगळ्यात पहिलं ऐकलेलं गाणं. संगीतकार, गीतकार, गायक कोण वगैरे काहीही कळायचं वय नव्हतं तेंव्हा ऐकलेलं. पुढे कळलं की या माणसाचं नाव सी.रामचंद्र. न कळत्या वयात मी त्यांचं आत्मचरित्र वाचलं होतं. भिकारदास मारुतीपाशी गोवित्रीकरांची लायब्ररी होती. त्यांच्याकडून घेऊन मामानी दिलं होतं. खूप वर्ष मी ते शोधतोय, मिळत नाहीये. 'आम्ही चौपाटीच्या वाळूवर रत झालो' असं काहीतरी वाक्यं त्यात होतं. 'रत' शब्दाचा अर्थ विचारल्यावर मामा म्हणाला होता, मोठा झालास की कळेल आपोआप. वयानी मोठा झालो आणि आणि जगण्यातले तोटे लक्षात येऊ लागले, तो तोट्यातला धंदा अजूनही चालूच आहे, अर्थ समजले, अज्ञानातली मजा गेली. माणूस मोठा कलाकार, हुन्नरबाज, असामान्य असला की वादग्रस्त असतो की वादग्रस्त माणसात हुनर असतो, हा मला कायमस्वरूपी पडलेला प्रश्नं आहे. आपण चांगलं ते बघावं, उचलावं, अनुकरण करावं. उगाच गुडघ्यावर शाल टाकून गायला बसलं म्हणजे कुणी भीमसेन होत नाही. आपण सोप्पं ते उचलतो. आज्जी म्हणायची, 'अरे, शेणसुद्धा रस्त्यावर पडलं तर उठताना माती घेऊन उठतं, आपण जिथे जातो तिथल्या माणसात चांगला गुण असेल तर चिकटवून घ्यावा'.

लोकांना त्यांची चांगली गाणी आठवणार नाहीत पण 'ए मेरे वतन के लोगो'ची स्टोरी पदरची चार वाक्यं घालून बोलतील. सत्यं हे मोहरी शोधण्यासारखं असतं, कोण कष्ट घेणार. मी वाचलंय एका ठिकाणी - नेहरू रडले वगैरे सगळं सपशेल खोटं आहे. ते रडले हे गाणं चांगलं असण्याचं सर्टिफिकेट आहे का? समजा ते रडले नसते तर आपल्याला आवडलं नसतं का? पण आपल्याला कुणा मोठ्या माणसाच्या नावाचा टेकू लागतोच. मुळात अचानक सादर करायला सांगितलेलं हे गाणं होतं म्हणे. प्रदीपनी या गाण्याची शंभर कडवी लिहीली होती म्हणे. अर्धवट माहितीवर छातीठोकपणे बोलण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागत नाही. त्यामुळे शहाण्या माणसांनी ऐकावं सगळं पण ते पुढे पोचवताना तारतम्य ठेवावं ही पोच आपल्याला कधी येणार काय माहित. माणूस गेला की तो आरोपांना उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे नंतर केलेले आरोप मूर्खपणाचे असतात. मोठ्ठी माणसं अशावेळी मौन धारण करतात आणि तेलपाणी घालतात, ज्यांना सत्यं माहित असतं ते घाबरून गप्पं बसतात. 'ये जिंदगी उसीकी है' 'मूर्तिमंत भीती उभी' वरून बेतलय हे स्वत: चितळकरांनी सांगितलं होतं, मग कशाला चिखलफेक हवी होती. पण शेवटी मातीचेच पाय असतात सगळ्यांचे. कसलातरी राग कुठेतरी काढत असावेत. त्यावर आधारित आहे म्हणून त्याची गोडी कमी होत नाही आणि मुळात त्यांनी ते लपवलेलंही नाही. अनेक चीजांपासून स्वत: गाणी बनवली की ती क्रिएटीव्हिटी आणि दुस-यांनी बनवली की ती चोरी असते. आरोप प्रथितयश माणसांनी केला की साला त्याला सुद्धा वजन असतं कारण लोक बोलतात पण दबक्या आवाजात, तिथे फावतं. असो!

अर्थहीन पण उच्चाराला -हिदम लटकलेले शब्दं चालीत बसवणं हे काम सी.रामचंद्रनी सुरु केलं असावं. 'आशा' मधलं 'इना मीना डिका' त्याची सुरवात होती. 'शिनाशिनाकी बुबला बू' अशा नावाचा चित्रपट पण त्यांनी केला होता. त्यांची सगळी गाणी मी काही ऐकलेली नाहीत. पण जी ऐकली आहेत ती अफाट आहेत. त्यांचा आझाद, नवरंग, अलबेला, अनारकली पुरेसे आहेत मला. राधा ना बोले ना बोले, तलत न आल्यामुळे म्हटलेलं 'कितना हसीं ही मौसम', जा री जा री ओ कारी बदरिया, अपलम चपलम - आझाद (आधी नौशाद कडे गेला होता 'आझाद' पण तीस दिवसात दहा गाणी पाहिजे म्हटल्यावर त्यांनी 'हे काय वाण्याचं दुकान आहे का' म्हणून निर्माता नायडूला हाकललं होतं), जा रे हट नटखट, आधा है चंद्रमा, कारी कारी अंधियारी, श्यामल श्यामल वरन, तू छूपी है कहा  - नवरंग, धीरेसे आ जारी अखियनमें , शोला जो भडके, शाम ढले खिडकी तले, किस्मत की हवा कभी नरम आणि एव्हरग्रीन भोली सुरत दिलके खोटे - अलबेला, जागे दर्द इश्क जाग, मोहब्बत ऐसी धडकन है, आजा अब तो आ जा आणि 'मूर्तिमंत भीती उभी' या नाट्यसंगीतावरून घेतलेलं 'ये जिंदगी उसीकी है' - अनारकली, निगार सुलतान आणि गोप वर चित्रित झालेलं सी.रामचंद्रनीच म्हटलेलं 'मेरे पिया गये रंगून'.


मला काही गाण्यातलं एवढं कळत नाही पण ' जा री जा री ओ कारी बदरिया' मधे दोन्ही 'ग' आहेत असा माझा समज आहे (चुकीचा असला तर असो बापडा) पण ती चाल बदलते ना तिथे आणि कडव्याच्या शेवटी शब्द आणि सुरांना अस्तर लावल्यासारखा ठेका येतो तिथे जीव टाकावा असा प्रकार आहे अगदी. 'अपलम चपलम'चा ठेका ऐका, अवीट गोडीचं गाणं, कितीही वेळा ऐका. त्यात 'काहे को ये आग लगाई रे, लगाई रे, लगाई रे, 'रोए, रोए, जान गवाई रे, गवाई रे, गवाई रे' आणि 'सुदबूद सब बिसराई रे' नंतर जी धावपळ आहे ना ती आणि ती शब्दांची जी पुनरावृत्ती आहे नं ती मला अत्यंत आवडून गेलेली आहे. एके ठिकाणी मी वाचलं होतं ' गायकाला गाता ठेवेल असा हवा, वरचढ नको'. आताच्या गाण्यात ठेका ऐका फक्तं, शब्दं समजून घ्यायच्या भानगडीत पडू नका. मोजक्या वाद्यात मजा येतेच की पण आहे घरात, ठेवून खराब होईल अशा भीतीनी वाजवतात हल्ली सगळी वाद्यं. त्यांच्या 'ये जिंदगी उसी की है'ला फुफ्फुसं गळ्यापाशी येतील म्हणायला गेलो तर आणि 'मोहब्बत ऐसी धडकन है' ला मोरपीस फिरेल. सगळा 'नवरंग' घ्या, सुरेल श्रवणीय गंमत सगळी (महिपाल आणि संध्या - नाही काही बोलत). 'नवरंग'चा रिमेक व्हायला हवा. 

एका संगीतकारानी सांगितलं होतं, 'स्वर सातच आहेत पण तुम्ही कुठल्या स्वरानंतर कुठला घेताय, कितीवेळा घेताय, तिथे किती रेंगाळताय यावर चालीचं वेगळेपण ठरतं'. चाल म्हणजे सुरांची कुठल्यातरी क्रमाने मांडलेली आरास नव्हे तर तो फ्लो आहे, उतारावरून पाणी जसं लयीत खाली येतं तशी हवी चाल, न अडखळता आलेली, धाप न लागलेली, प्रवाह न तुटलेली, मधे आलेल्या खड्यांना किंवा खडड्यांना ओलांडताना ठेका समजून त्याच्याशी गुजगोष्टी करून पुढे जाणारी. आताचा गोंगाट ऐकला की जुन्याची किंमत कळते, मेलडी म्हणजे काय ते कळतं. अनेक शोध लागतील, नवनवीन वाद्य निघतील पण चाल, सुरेलता यंत्रातून येत नाही, नाहीतर चाली करायचं मशिन किंवा सॉफ्ट वेअर निघालं असतंच की.

जोपर्यंत गणशोत्सव आणि लग्नाची वरात आहे तोवर तीन गाणी अजरामर आहेत 'नाच रे मोरा', 'मुंगडा मुंगडा' आणि 'भोली सुरत दिल कॆ खोटे'. झोपडपट्टीत कुणाच्या तरी लग्नात बेंजो आणि ढोलक वर वाजलेली ट्यून त्यांच्या डोक्यात होती. त्यांनी आणि भगवानदादांनी त्याला बोलावून त्याच्याकडूनच ती वाजवून घेतली ती. ज्याला चाली चोरायच्यात तो माणूस असं कशाला करेल. शेवटी शेवटी ते रग्गड प्यायचे एवढीच गोष्टं लक्षात ठेवण्यासारखी आहे त्यांची?

चितळकर, हल्ली एका चित्रपटात दोन (खूप होतायेत ना) सुरेल, शब्दं समजतील, गुणगुणावीशी वाटतील अशी गाणी सापडणं हा दुर्मिळ योग आहे आणि तुम्ही एकाच सिनेमात सगळी गाणी हिट देण्याची करामत करत होतात. खरं खोटं एक तुम्हांला आणि एक हयात व्यक्तीला माहित, माझ्यासाठी 'आझाद', 'नवरंग', अलबेला', 'अनारकली' 'पतंगा'ही वस्तुस्थिती आहे, बाकी काय करायचंय मला.  
जयंत विद्वांस 







    

Monday, 18 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१०)…बिंदू

सत्तर एमएम चे आप्तं (१०)…बिंदू

आपल्याकडे वास्तवातील प्रतिमा चांगली असून चालत नाही, पडद्यावरची प्रतिमा पण चांगली लागते. वास्तवात चार माणसांना दारू पिऊन गाडीखाली चिरडा पण पडद्यावर निरागस, भोळा, मातृभक्तं, सगळ्यांवर 'प्रेम' करणारा अशी प्रतिमा असेल तर ती खरी धरली जाते. सौ.बिंदू झवेरी आणि अजून असे अनेक याच मानसिकतेचे बळी आहेत. बिंदू पडद्यावर दिसली की बुब्बुळं मोठी होतात, जीभ ओलसर होऊन बाहेर सटकते, हात शिवशिवतात अशी तिची प्रतिमा आहे. आता वास्तवात ही आत्ता चौसष्ठ वर्षांची आज्जीबाई समोर दिसली तर आपण तिला निदान वयाप्रमाणे नमस्कार करू? नाही, करणार. कारण तिची पडद्यावरची प्रतिमा आपल्याला जास्ती आवडते, आपण त्यावर स्वप्नं रंजन केलेलं असतं, तो ठसा पुसायला मन तयार होत नाही आणि त्या प्रतिमेच्या आपण पाया वगैरे पडत नाही, इतकंच. एखादा विनोदी नट अभ्यासपूर्ण, वैचारिक काही बोलला तर आपण किती गंभीरपणे ते ऐकतो? कारण त्यानी फक्तं विनोदी बोलायचं, करायचं, लिहायचं हे आमच्या डोक्यात ठरलेलं आहे.    

देमार चित्रपटांचा निर्माता नानूभाई देसाईची ही सर्वात मोठी मुलगी, वयाने आणि शरीराने पण. ती तीन वर्षाची असतानाच नानूभाईनी 'दि एंड'ची पाटी लावली आणि नकळत्या वयातच तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. धर्मेंद्रच्या 'अनपढ' मधे ती अकरा वर्षांची होती. मूळची सणसणीत शरीरयष्टी तिला वयापेक्षा मोठं दिसायला कामी आली. 'इत्तेफाक'मधे ती फक्तं अठरा वर्षांची होती (वाटत नाही ना). ती रूढार्थाने सुंदर नव्हती. 'गॉडझिला'च्या जाहिरातीत 'साईझ डज म्याटर' अशी ओळ होती. दारासिंह, झीनत आणि बिंदूला चेह-याची आवशक्यता नव्हती कारण काहीवेळेला 'साईझ डज म्याटर'. हसत हसत म्हटलेलं गाणं किंवा गाता गाता मधेच हसलेलं  'कटी पतंग'चं गाणं 'मेरा नाम शबनम' तिला यशाच्या हमरस्त्यावर घेऊन गेलं. पद्मा खन्ना 'हुस्नं के लाखो रंग' नी जेवढी प्रकाशझोतात आली तेवढी पुढे टिकली नाही. हेलन, बिंदू, अरुणा इराणी, काही प्रमाणात जयश्री टी असा मॉब होता तेंव्हा, व्ह्याम्प, डान्सर, बदचलन औरत, कुटील सहकारी यापुढे त्यांना काहीही जमणार नाही अशी पब्लिकला खात्री होती. त्यामुळे या सगळ्या वेगवेगळी नावं घेऊन त्याच त्याच भूमिका करत राहिल्या. 

त्यामानानी बिंदूला काही चित्रपट चांगले मिळाले. 'इत्तेफाक' मधली खन्नाची मेव्हणी, 'अभिमान' मधली बच्चनची मैत्रीण, 'अमर प्रेम'मधली विनोद मेहराची कुचकी, सावत्र आई, 'इम्तिहान'मधली विनोद खन्नावर एकतर्फी प्रेम करणारी कॉलेजकुमारी, 'लावारीस'मधली अमजदची दुसरी बायको, 'बिवी हो तो ऐसी'मधली फारूक शेखची कडक आई, 'किशनकन्हैया' मधली छळ करणारी सावत्र आई ('सीता और गीता'ची मनोरमा डोळ्यात सरस होती, काही म्हणा) आणि 'जंजीर' मधली अजितची मोना डार्लिंग. शब्बो आणि मोना म्हटलं की बिंदूच येणार डोळ्यासमोर, इतकी ती नावं तिला चिकटली. ललिता पवार आणि बिंदू अत्यंत विषारी बघायच्या. खलप्रवृत्ती दाखवण्यासाठी त्यांचं बघणंच पुरेसं होतं. त्यात बिंदू भारदस्त पण होती. मराठीत तिची तोड म्हणजे पद्मा चव्हाण. कमलाकर तोरणे दिग्दर्शित, मराठीतील प्रति शोले अशी विनोदी जाहिरात असलेल्या 'दरोडेखोर'च्या (यात वाळक्या अंगाची, गालफडं बसलेली रिमा भडभडे - लागू आहे) प्रिमिअरला मी त्यांना पाहिलं  होतं. न्यूनगंड वाटेल अशी देखणी आणि भारदस्त बाई.

तिनी बालपणापासून माहित असलेल्या, शेजारी रहाणा-या चंपकलाल झवेरीशीच लग्नं केलं. त्यानीही तिला चित्रपटात काम करायला प्रोत्साहन दिलं. स्किन कलरचं कापड लावून ती कायम वावरली. कुठल्याही फिल्मी पार्टीला ती नव-याशिवाय गेली नाही आणि शुटींग संपल्यावर स्वत:च्याच घरी गेली त्यामुळे तिच्याबाबत कुठलीही वावडी उठली नाही. पडदा आणि वास्तव यात तिनी जमीन आसमानचं अंतर ठेवलं. आपण कुणाला किती जवळ येउन द्यायचं हे एकदा ठरलं की त्रास होत नाही. ती एकदाच प्रेग्नंट राहिली पण मिसक्यारेज झालं, नंतर परत तिला मूलबाळ झालं नाही. 'हम आपके है कौन'मधे एका शॉटला अजित वाच्छानी तिला म्हणतो, 'इसलिये तुम्हारी गोद खाली है'. बिंदू आणि मी, दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. तिला ग्लिसरीन नसेलच लागलं त्या वाक्याला. 'जंजीर'मधे एक शॉट आहे. तेजा त्याचा बॉस पाटीलची तारीफ करत असतो. मोना त्याला म्हणते, पहिल्यांदाच तू कुणाचंतरी कौतुक करतोयेस. त्यावेळचा तिचा तो उत्कंठावर्धक चेहरा बघा, ती पुढे विचारते, पाटीलसाहेब कुठे असतात आता. तेजा थंडपणे त्यानीच त्याला मारल्याचं सांगतो, तेंव्हा धक्का बसलेला बिंदूचा चेहरा बघा. अभिनय काही फक्तं रेखा, शबाना, स्मिता, हेमाच नव्हत्या करत. 


फिल्मफेअरसाठी सात वेळा नामांकन मिळालं पण तिला ते कधीच मिळालं नाही. मुळात ते कुणाला मिळालंय याची कुणाला आठवण होत नाही इतका त्याचा दर्जा खालावला आहे. लक्ष्मी-प्यारे मधल्या लक्ष्मीकांत कुडाळकरची ती मेव्हणी. त्यांनी तिच्या बहिणीशी लग्नं केलं होतं. आता ती पुण्यातच कोरेगाव पार्कला रहाते. रेसकोर्सला दिसेल ती सिझनला, कुणाला बघायची हौस असेल तर. शेक्सपिअर म्हणून गेलाय, नावात काय आहे? काहीवेळेस खरंही आहे ते. शाई पडल्यावर ब्लॉटिंग पेपरनी टिपल्यावर त्या पेपरवर हा भला मोठा ठिपका पसरतो तशी होती बिंदू चंपकलाल झवेरी पण नाव मात्रं बिंदू. :D

जयंत विद्वांस 


 

   

Thursday, 14 January 2016

टेलीशॉपिंग…

टेलीशॉपिंग…
 
मी सिरिअल्स बघत नाही त्यामुळे टीव्ही बघितला तर इ.स.२००० पू.चा हिंदी सिनेमा, इंग्लिश मारधाड, जुनी गाणी किंवा म्याच असेल तरंच बघितला जातो. काहीच नसेल तर आधी बातम्या बघायचो, आता त्याही सोडल्या. त्यापेक्षा मग अर्धा एक तास टाईमपास म्हणून चोवीस तास टेलीशॉपिंगला वाहिलेले च्यानल्स बघतो. धमाल येते. ते च्यानल बघण्यात मला तर फायदे आणि मानले तर काही किरकोळ तोटे दिसत आलेत. फायदे बघा :

०१) बाजारात काही नवं असेल तर कळतं
०२) बाहेर विकत घ्यायचं असेल तर किंमतीचा साधारण अंदाज येतो
०३) भिकार वस्तूचं आकर्षक मार्केटिंग कसं करावं ते कळतं
०४) आपल्याला आपल्या जवळ असलेल्या वस्तूचा दुकानदार म्हणून किंमत सांगताना, त्या वस्तूचं कौतुक करताना न्यूनगंड वाटू शकेल अशी वस्तूसुद्धा विकणेबल आहे हे समजतं
०५) कुठलीही वस्तू विकत न घेता कल्पनेत आपण ती वापरली तर जगणं किती सुखकारक होईल या आनंदानी फील गुड की काय ते वाटू लागतं (एक दमडा खर्च न करता हे अतीव आनंदाचं, कारण जन्म पुणे)

काही काही प्रॉडक्ट मला पाठ झालीयेत कारण मी त्यांचा रेग्युलर(?) कस्टमर नसलो तरी रेग्युलर व्ह्यूअर आहे. पुलं म्हणाले होते तसं असतं यांचं सगळं, मुलगी धडधाकट आहे, घरातलं सगळं करते म्हणजे शिक्षण कमी (हे आपण ओळखून घ्यायचं असतं). तसे यांचे पोपट आणि पोपटीणी असतात. मूळ प्रॉडक्ट कसा उपयुक्त आहे असल्या क्षुल्लक गोष्टी सांगण्यात ते फार वेळ घालवत नाहीत. तुम्ही कधीही बघा, शेवटचे गिनेचूने नग राहिलेले असतात, त्वरा केली नाही तर इच्छुकांच्या पदरी किती घोर निराशा येत असेल या कल्पनेनीच मी कासावीस होतो. निकटच्या हजाराला एक रुपया कमी असलेली किंमत असते, हा शोध ज्यानी लावला तो मानसोपचार तज्ञ असणार. 'फक्तं', 'ONLY' या शब्दांचे अर्थ इथे पटकन कळतात. रुपये दहा हजार नऊशे नव्व्याण्णव फक्तं. नुसतं ऐकून पण मला खजील व्हायला होतं. मला मोठ्ठी वाटणारी रक्कम जगाला 'फक्तं' वाटतीये हे उमजून मी काळाच्या मागे आहे या बायको (माझ्या) आणि मुलीच्या मताला दुजोरा मिळतो आणि त्या दोघी आनंदी होतात.   

त्यांच्या काही प्रॉडक्टवर मात्रं माझा जीव जडलाय. एक ते रोटी मेकर. नुसती लाटी आत सारायची, झाकण दाबायचं, कंपास घेऊन मोजावी अशी गोल पोळी तयार, पलटी मारली की झाकण अलगद सोडायचं, भटू-यासारखी टम्म फुगलेली पोळी तयार. ते झाकण जे स्लो मोशनमधे वर येतं ना ते बघायला मला जाम आवडतं. दबावाविरुद्ध उफाळून येण्याचा गुणधर्म कणकीच्या गोळ्यात पण असतो हे ज्ञान मिळतं. बरं त्याच्या बरोबर पीठ मळायचं भांडं फुकट असतं. या सगळ्या जाहिरातीत सगळ्यात जास्ती जोर कशावर असेल तर तुमचे किती पैसे वाचतील, सोबत मोफत किती आणि काय काय आहे, तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडतील आणि तुम्ही कसे सुखी व्हाल यावर असतो. 


दुसरं एक ते सिक्स प्याक उर्फ पोटावर आयत बनवायचं मशिन. काय एकेक बायका असतात त्यात. त्या मशीनची गरज म्हणून पोट दाखवतात हे समजू शकतो पण अत्यंत कमी कपड्यात त्या मशिनवर व्यायाम करताना जे काही आळोखे पिळोखे देतात ना तेंव्हा त्यांच्या पोटाकडे लक्षच जात नाही आणि मग ती जाहिरात परत बघावी लागते. त्यात पण ते आधीचं भोपळा पोट आणि नंतरची पोटावरची शिल्पाकृती जेवढ्या सेकंदात दाखवतात न तेवढ्या सेकंदात जादू होणारं मशिन यायची मी वाट बघतोय. सगळे बाप्ये आणि बाया लोक हेवा वाटावा अशा कमावलेल्या शरीराचे असतात. माझ्या पोटाकडे बघून एवढं जादुकारी मशिन आपल्याकडे नाही याची खंत वाटते. समजा आणलं आणि झालो बिस्किटपोट्या तरी शेजारी जाहिरातीतल्या बाईएवढ्या कमी कपड्यात कुणीही उभं रहाणार नाहीये याची खात्री असल्यामुळे मी अजून त्याची ऑर्डर नोंदवलेली नाहीये.

याचाच एक उपप्रकार म्हणजे वजन कमी करणा-या प्रॉडक्टसच्या जाहिराती. फार मजेशीर प्रकार आहे तो सगळा. पोटाला अमूक एक तेल लावून गरम पाण्यानी शेका, संत्र्याची साल सोलावी तशी सहजरीत्या चरबी कमी होईल. अमका हर्बल टी प्या (एक्झरसाईजची गरज नाही हे वाक्यं रिपीट असतं त्यात, घेणारच की मग पब्लिक) आणि शेवग्याची शेंग व्हा. तुम्हांला पोटाशी, मांड्यांशी (चरबी जास्ती आहे तिथे, थोडक्यात) गदागदा हलवणारं एक मशिन असतं, पाच मिनिटात तुम्ही मुंबईच्या उन्हात उभे असल्यासारखे घामेजता. त्यामुळे मुंबईला एकही माणूस ओव्हरवेट नसणार असं मला वाटत आलंय. कुठलंही काम करताना ते वापरता येतं म्हणे. एका 'विशिष्ठ' क्रियेत कमरेला ते मशीन लावल्यावर त्याचं व्हायब्रेशन उपयोगी येईल का असा मला एक वात्रट प्रश्न पडलेला आहे. असो! याच्या उलट उंची, वजन वाढवायच्या भुकट्या आणि गोळ्या विक्रेते असतात. आयुष्यात वजन नाही म्हणून लग्नं ठरत नाहीत, मैत्रिणी हसतात, न्यूनगंड येतो वगैरे सगळे प्रॉब्लेम्स चार पाच हजारात सुटू शकतात. बरं ती भुकटी खाऊन नुसतं वजन नाही वाढत, मसल्स एकदम अर्नोल्ड लाजेल असे होतात. एकदा आणेन म्हणतोय ते. 

असे अनेक विनोदी प्रकार त्यावर आहेत. एक तो चायनीज की कोरियन टकला माणूस डोक्यावर पीक काढल्यासारखे केस उगवून दाखवतो (शेतक-यांनी ट्राय केलं तर मायंदाळ पीक येउन आत्महत्या तरी करणार नाहीत), रु.२४९९/- 'फक्तं' मधे दोन शूज, एक स्लीपर, एक गॉगल, एक घड्याळ, एक टी शर्ट, एक डफल ब्याग, रु.४९९९/- 'फक्तं' (कृपया हा शब्दं विसरू नये) मधे आयफोन स्वत: दगडावर जाउन स्क्रीन फोडून घेईल असे फिचर्स असलेला स्मार्टफोन असतो, घाण टाकायची आणि ती सेकंदात साफ करायचा मॉप असतो (तसं खरंच होत असेल तर मलासुद्धा साफसफाई जमेल या भीतीपोटी मी तो घेणार नाहीये), होलमधून हनुमान चालीसा वाचता येईल असा खास आपल्याकरिता तयार केलेला  मंतरलेला चांदीचा सर्वसंकटनाशक हनुमान असतो, घरात कुठेही भोक पाडू शकेल असं ड्रिल मशिन, ड्रिल, स्प्यानर, स्क्रू ड्रायव्हर सेट अत्यंत अल्पं किंमतीत असतो, ज्याच्यावरून ट्रक नेला तरी फरक पडत नाही असा हवा भरून तयार होणारा सोफा, बेड आहे, काठीला फडकं गुंडाळल्यासारख्या दिसणा-या बायका आणि जॉर्जेटच्या साड्या आहेत, डिनर सेट आहेत, भांडी कुंडी आहेत. एकूण सगळं 'अच्छे दिन आये' असं वाटायला लावणारं आहे.  

खरंतर या सगळ्यात खरोखर उपयोगी असणा-या किंवा काम हलकं करणा-या वस्तू फार कमी आहेत अस आपलं माझं मत आहे. जाहिरात ही कला आहे हे टेलीशॉपिंगचे च्यानल बघितलं की कळतं. सगळं दुष्टंचक्र आहे. न लागणा-या वस्तू विकत घ्या, पैसा असो नसो, क्रेडीट कार्ड आहे की. रक्कम फुगली की त्याचे हप्ते करून घ्या आणि तीस टक्क्यानी ते फेडा म्हणजे मूळ स्वस्तात मिळाली अशी वाटणारी वस्तू खरंच आपल्याला कितीला पडली हे कुणीच बघत नाहीये. नितांत गरज असताना बराच काल प्रतिक्षा करून वस्तू आली की ती प्राणप्रिय होते, वाटते. निर्जीव वस्तूवर पण माया जडते. आता वस्तू मुबलक झाल्या, वापरा, फेजून द्या, आवडल्या नविन किंवा अपग्रेडेड काही आलं तर तर जुन्या चांगल्या असतील तरी बाद करा, त्यात अडकून राहू नका असा मंत्र आहे आजचा. 'जुने जाऊ द्या मरणालागूनी' ते आपण चुकीच्या विचारांना, प्रथांना लागू करत नाही, चांगल्या गोष्टींना मात्रं लगेच करतो.

एक बरंय त्यावर अजून सुख, आनंद विकायला नाहीये, तो आपला आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत मिळवता येतोय, यायला हवा. त्यांची ती पोपटपंची, भलावण निर्हेतुकपणे ऐकणं, बघणं हा ही माझ्या छोट्या गोष्टीतून आनंदी होण्याच्या भागच आहे. बाकी आडिश (आमरणच्या धर्तीवर) ही करमणूक चालूच राहील.  

जयंत विद्वांस

Sunday, 3 January 2016

एकपात्री 'नटसम्राट'….


एकपात्री 'नटसम्राट'…. 
 
एकपात्री प्रयोग तसा सोप्पा नसतो. स्वत:च्या खांद्यावर सगळं पेलण्याची जबाबदारी असते, मोठी रिस्क असते, हसं होण्याचे चान्सेस असतात. पण अनेक पात्रं असतानाही एकपात्री करणं अजून अवघड असतं. नानानी एकपात्री केलाय 'नटसम्राट'. बाकीचे कलाकार कमी आहेत म्हणून तो ग्रेट वाटलाय असं आहे का? तसंही अजिबात नाहीये. सुनिल बर्वे, नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे, परब सुसह्य आहेत, कामं चांगली केलीयेत.

थोड्या खटकलेल्या गोष्टींवर आधी  बोलून घेतो. मेधा मांजरेकरही वाईट नाही, ती खटकत नाही, दोन तीन प्रसंगात ती छान बोललीये (फक्तं पहिल्या शॉटमधे तिची नऊवारी रेडीमेड तिच्या मापाची असावी का अशी एक शंका येईल एवढी ती ऑकवर्ड दिसलीये). मूळ नाटकात नसलेला विक्रम गोखले आहे म्हणून खटकत नाही, नसता तरी अडलं नसतं. पण त्यानी वडिलांसारखं स्टेजवर नटसम्राट करायला हरकत नाही. काळ जुना दाखवलाय, नंबर प्लेट एमएलयू आहे, लग्नातली गाडी पण जुन्या काळातली आहे आणि चोरीचा संशय येतो ते पैसे पाचशेच्या हल्लीच्या पिवळ्या नोटांमध्ये आहेत. मध्यंतरापर्यंत जरा ढिल्ला वाटतो. नटसम्राट दारुडे होते की काय असं वाटेल नविन पिढीला असे प्रसंग आहेत. असो!


किरण यज्ञोपवीतचे संवाद अप्रतिम. कुसुमाग्रजांना लाज आणतील असं काहीही त्यात नाही. नाटकाचा सिनेमा मात्रं सुंदर केलाय. पटकथा प्रवाही आहे. मुळात मूळ कलाकृतीचं संचित पाठीशी आहे, त्यामुळे त्याचं बोट धरून जरी चाललं तरी प्रवास सुखकर होऊ शकेल असं असतानाही कुठे ताल सुटला तर सगळं चांगलं मातीत जाईल अशी भीतीही आहे. महेश मांजरेकरनी ती कसरत दोरीवर चालणा-या डोंबारणी सारखी छान पेलली आहे यात शंका नाही. डायरेक्टर डोकावतो तेंव्हा चित्रपट काही ठिकाणी अंगावर येतो. ५४ इंचीला सुद्धा बघण्यात मजा नाही, थेटरच पाहिजे असा सुंदर केलाय त्यानी. लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, मोहनदास सुखटणकर, राजा गोसावी, लक्ष्मण देशपांडे (द्विपात्री), गिरीश देशपांडे यांना ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी हा नटसम्राट बघावा.  

आता उरला नाना. त्याच्या कौतुकासाठी किती लिहावं हा प्रश्न पडलाय. तिरंगा, यशवंत, क्रांतिवीर, अंकुश, अब तक छप्पन आणि इतर कुठलाही नाना यात डोकावत नाही एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. नटाला ते पात्रं कळलं की त्यासारखी मजा नाही. तो त्या पात्राच्या प्रेमात पडायला हवा मग ते त्याला जमलं की तो स्वत:च्या प्रेमात पडतो आणि मग चालू होतो तो नट आणि त्या पात्राचा रोमांस. मग आजूबाजूला कुणी आहे, नाही याचं भान उरत नाही आणि तो ते पात्रं जगत जातो, आतून बाहेर काढतो आणि अजरामर करतो. मूळ नाटक नानासाहेब फाटकांना डोळ्यापुढे ठेऊन लिहिलं गेलं होतं कारण तो आवाजाचा बादशहा होता. संगीत नाटकात तीन सप्तकात फिरणारा गळा हवा असतो तसा गद्य नाटकातला तो तीन सप्तकात फिरणारा बुलंद आवाज होता असं ऐकलय. त्यांचं आत्मचरित्र वाचलंय मी, यातली स्वगतं त्यांच्या अनेक नाटकात केलेल्या भूमिका डोळ्यापुढे ठेऊन लिहिली गेलीयेत. 

मूळ नाटककाराला अभिप्रेत असणारा नटसम्राट कदाचित वेगळा असेल पण फाटक गेले आणि लागूंनी तो केला, त्यांनी पहिला केल्यामुळे नंतरच्या लोकांना तुलना नशिबी आली आणि त्यात गैर काहीही नाही. नाना बघायला जाण्याआधी तुमची पाटी कोरी असो नसो, त्याचं नाव लिहिण्यात तो यशस्वी झालाय. या अजरामर शोकांतिकेतले भाव त्यानी मेहनतीनी पोचवलेत. विषण्णता, हतबलता, उद्वेग, सात्विक संताप, चीड, हळवेपणा, कातरता, वैराग्यं, द्वेष, कटुतेच्या पलीकडे गेलेलं म्हातारपण, सरकार गेल्यावर सर्वस्वं हरवणं म्हणजे काय ते त्यानी अफाट दाखवलंय. त्याचं चालणं, पडलेले खांदे, प्रत्येक प्रसंगातली वेगळी देहबोली, डोळ्यांचा अप्रतिम वापर, त्याच्या चेह-यावर उमटणा-या प्रतिक्रिया परत परत पहाव्या अशा आहेत. 

मुलीला रागानी हाक मारताना लागलेला आवाज आणि ते स्वगत अंगावर काटा आणतं. राजा त्याला विचारतो 'नाटक पाहिलंय का कधी?' तेंव्हा, कावेरी म्हणते, 'ती सुया शोधत नव्हती', तेंव्हाचा त्याचा चेहरा बघा. नाटकावर तो पोटतिडीकीनी जितेंद्र जोशीला बोलतो तेंव्हाची त्याच्या आवाजातली तळमळ ऐका, त्याचं थेटरातलं स्वगत ऐका, जळलेल्या थेटरात त्याच्या अंगात शिरणा-या पात्रावर तो स्वार होतो तेंव्हाची त्याची तडफ आणि तो आवेग ओसरल्यावर गलितगात्र झालेला नाना बघा. वयानी आलेली हतबलता आणि वय विसरून आलेला राग क्षणात दाखवलेत, ते बघाच एकदा थेटरात जाउन. परत बघितला की परत लिहीन त्याच्यावर अजून.  नाना आणि विक्रम गोखलेंनी ते स्टेजवर करावं अशी एक वेडी इच्छा आहे. काय धाय मोकलून रडायचं राहिलंय ते एकदा  रडून घेईन, ती स्वगतं ऐकून मोहरून जाईन, तोंड फाटेस्तोवर किंवा समोरचा बंद करेस्तोवर त्यावर बोलेन आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवेन एकदा, इतक्या क्षुल्लक अपेक्षा आहेत माझ्या.  

काळ बदलेल, आपणही म्हातारे होऊ, मुलं विचारत नाहीत ही शोकांतिका वाटणार नाही अजून काही वर्षांनी, इतकं ते प्रथा असल्यासारखं घडत राहील, त्यामुळे आज घळाघळा पाणी आलं तेंव्हा तसं येईल न येईल माहित नाही, तेंव्हा नटसम्राटची कथा कालबाह्य होईलही पण ती स्वगतं रहातील, शेक्सपिअर राहील तसे शिरवाडकर पण रहातील. लागू रहातील, नाना राहील, नविन कुणीतरी बेलवलकर म्हणून उभाही राहील. तेंव्हा तो त्याच्या पद्धतीने करेल हे सगळं. एखादा माणूस सांगेल त्याला 'मागे विश्वनाथ पाटेकर नावाच्या बापमाणसानी सुंदर केलं होतं, ते बघ एकदा म्हणजे तुझं तुला नवीन काही सापडायचं राहिलं असेल ते सापडेलही'.

जयंत विद्वांस 
 
   

Saturday, 2 January 2016

नेव्ही कट…

नेव्ही कट… 
 
तुझा सहवास सुटल्याला किंवा सोडल्याला आज महिना झाला. साधारण २८-२९ वर्षाचा सहवास म्हणजे काही कमी काळ नाही. अधेमधे दुरावा निर्माण झाला म्हणा काहीवेळा पण तो तात्पुरता होता. सवय सततची झाली की ती सवय रहात नाही, त्याला व्यसन म्हणतात. माणूस एकदा प्रेमात पडला की त्याला समोरच्याचे दुर्गुण दिसत नाहीत असं म्हणतात, तसंच तुझ्याबाबतीत झालं. दु:खाच्या क्षणी, ताण आल्यावर तुझी आठवण झाली वगैरे माझ्या बाबतीत कधी घडलं नाही कारण तुझ्या सहवासामुळे तो दूर होतो हे मला कधीच पटलेलं नाही. तुझा संग केल्याचे दुष्परिणाम माहित नव्हते? माहित होते, उगाच खोटं कशाला बोला पण फार परिणाम होईल एवढा आपला संग कधीच नव्हता. 

तुझं आकर्षण प्रत्येकाला असतं. कधी आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसाला, फिल्मी हिरोला आपण फॉलो करायला जातो, कधी तुला जवळ केल्याने आपण आता मोठे झालो असं वाटतं, दोन बोटात, विडीसारखी चिमटीत, मुठीत (एकापेक्षा जास्ती) धरून जवळीक साधायचे आचरट प्रयत्नं होतात. फुशारक्या चालू होतात, पाणी घालून ताक वाढवावं तसं तासात किती, दिवसात किती वगैरे रेकॉर्डसचे आकडे  फुगवले जातात. आरशासमोर आधी पेन, काडी, उदबत्ती धरून सराव परीक्षा होते. एकदम भारी वाटायला लागतं. क्लिंट इस्टवूड, रजनीकांत, विडी फेकून उठणारा कुली अमिताभ वगैरे डोळ्यापुढे तरळत असतात. अनेक उपप्रकार असतात त्यात पुढे पुढे. आधी किंमत जास्ती ती ओढतात लोक. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं दाखवायचं असतं. मग मेंथोल असलेली, तपकिरी रंगाची लांबसडक, स्टेट एक्स्प्रेस किंवा ५५५ या नावाची पडलेली भुरळ काही काळ चमकून जाते. किंग साईझ मित्रांत ओढताना खूप वेळ टिकते हे खरं कारण असतं. सगळी थेरं असतात. शेवटचा गोल्डन पफ नावाखाली मारलेला चटका बसणारा कोकणस्थी झुरका खरा. 

सगळी नाटकं होतात. तोंडाचा चंबू करून सर्कल काढायला शिकतात आधी, त्यात आपण ज्याला भेटण्याची सुतराम शक्यता नाही असा माणूस दहा बारा सलग सर्कल्समधून सरळ रेषेत धूर सोडून दाखवतो ही अठ्ठी अनेक पिढ्या अव्याहत चालू आहे, सांगणा-या माणसाचा तो सध्या दुरावलेला किंवा परगावी रहाणारा मित्रं असतो किंवा त्याला त्याच्या कुठल्यातरी मित्रानी सांगितलेलं असतं. पुढून लवंग किंवा मेंथोलचा तुकडा सारून, कधी घरी ओव्याची बनवून ओढली जाते. कुणी सांगतं थोडीशी ओलसर करायची म्हणजे कडक झुरका होतो (माझी भिजून लोळागोळा झालेली ओलसर करायला गेलो तर, कारण मी ती नळाखाली धरली होती, नाहीयेत एखाद्याला जजमेंट, हसू दे कुणी हसलं तर आपण लक्ष नाही द्यायचं). जो राख सांडेल त्यानी नवी घ्यायची असल्या गंमती असतात. रात्री संपल्यावर दुकानं बंद असतील तर जी घालमेल होते ती शब्दात सांगता येणार नाही. मग एसटी स्थानक, रेल्वेस्टेशन जवळची वाटतात. पहाटे कामाला जाताना जो पहिला उघडा ठेला दिसतो त्याचे आपण ऋणी वगैरे रहातो. 

कुणी विचारतं, "सिगार' ओढला आहेस का?" मग तो एकदा ओढून होतो. तोंडाला अत्यंत घाणेरडा वास येतो एकतर नाहीतर गाल आतून चिकटतील एवढा तो ओढावा लागतो, त्यात तो विझला तर त्याचा उग्र वास तोंडात नको होतो असा माझा अनुभव आहे. कुठलीही नशा वाईटच पण एकदा तरी अनुभवायला हवी प्रत्येक गोष्ट यापोटी मी पाईप, हुक्का, गांजा, चरस, ब्राऊन शुगर, हातभट्टी, देशी सोडून सगळे उद्योग करून बघितलेत.  तुझ्याएवढं फार कशात मन रमलं नाही. लोकांचे ब्र्यांड असतात. पिवळा हत्ती एकेकाळी फेमस होता. लोक पगार झाला की चार दिवस चारमिनार, पनामा, क्याप्स्टन, पिवळा हत्ती ओढायचे मग परत लाल धागा चालू व्हायचा. शिवाजी, संभाजीचं नाव ठेवलं म्हणून कधी कुणाला राग आल्याचं ऐकिवात नाही, ५०१ होती एक. यात पण कमी लेखणं आहेच, कार मधले टू व्हीलरवाल्यांकडे बघतात तसे गोल्ड फ्लेकवाले इतरांकडे तुच्छतेने बघायचे. बेन्सन हेजेस, रॉथमन्स ज्याच्या हातात तो माणूस अमीर आदमी, आय.टी.रिटर्न बघायची गरज नव्हती तेंव्हा.
 
'राम' अरुण गोविल म्हणे दिवसाला १०० 'स्टेट एक्स्प्रेस' ओढायचा, अजय देवगण आणि त्याची सासू तनुजा यांचं सतत अग्निहोत्र चालूच असतं म्हणे. त्यांचं त्यांच्यापाशी, यात त्यांचा हेवा वाटावा असं काही नाही. काही माणसं माझ्या लक्षात आहेत मात्रं. एक बदलापूरचा रजनदा, हाताला सहावं बोट असल्यासारखी तू त्याच्या हातात असायचीस. तो कुठेही असो, कायम हातात छोट्या फोरस्क्वेअरचं पाकीट आणि काडेपेटी. श्वास घेताना त्यात निकोटीन आढळलं नाही तर मेंदू त्याला श्वास रोखून धरायला लावायचा बहुतेक. सतत चालूच मुळी ते धुरांड, त्याचं बोलणं शब्दश:धुरकट होतं असं म्हणता येईल इतकं. आमचे बापट, विजय केतकर अगदी मन लावून गोरा चेहरा तांबूस होईल इतपत दमदार कश मारायचे. टोकाला तो ग्लो अगदी चिडल्यासारखा फिल्टरकडे धावायचा. लोक कश मारला की तो धूर आत घेतात, नाका तोंडावाटे व्हाल्व्ह गेल्यासारखा  चित्रपटात तो स्वप्नातल्या गाण्यात पांढरा दात धूर सोडतात ना तसा सोडतात आणि राख झटकून किती राहिली ते बघतात. पैसा वसूल कसा होणार बोलण्यात वेळ घालवला तर म्हणून अजून एक दमदार कश लगेच. कर्नल सोमण होते रविराजला. ते जेवण झालं की तो पांढरा पेपर काढायचे, त्यात तो क्याम्पातून आणलेला सेंटेड तंबाखू टाकून सुरनळी करायचे, मग जिभेवर ती फिरवून सीलबंद करायचे आणि सुखाचा आस्वाद घेतल्यासारखे तुला ओढायचे. त्यांच्या त्या धुरला पण एक सुगंध होता. ती संपूर्ण प्रोसेस ते अत्यंत तन्मयतेने उपभोगायचे. 

माझीही अनेक थेरं करून झाली. आधी फोरस्क्वेअर, मग काही काळ चेसरफिल्ड, बर्टन, चार्म्स, छोटी फोरस्क्वेअर वगैरे प्रकार झाले. पण मला आठवतंय ८५-८६ साल असेल, पासष्ठ पैशाला नेव्हीकट मिळायची (आता आठ रुपये, काय ही महागाई) आणि पाच पैशाला खुशबू किंवा बडीशोप पुडी. मी केवळ नेव्हीतले लोक ही ओढत असणार या अज्ञानापोटी तुझी निवड केली आणि ती चिरकाल टिकली. कावेरी विचारते ना. 'मैत्रिणी किती होत्या हो?' आणि अप्पासाहेब हसतात फक्तं. तसं काहीसं आहे, नेव्हीकट म्हणजे 'सरकार' होतं माझं.  


जयंत विद्वांस  
 

Saturday, 26 December 2015

साधना….

साधना….

दिलीपकुमार ९३, धर्मेंद्र ८०, वैजयंतीमाला, माला सिन्हा ७९, मनोजकुमार ७८, शशी कपूर, हेलन, वहिदा ७७, संजयखान ७४, आशा पारेख, जितेंद्र, अमिताभ ७३, तनुजा ७२, तबस्सुम, सायरा बानू ७१, विनोद खन्ना ६९, मुमताझ, रणधीर कपूर ६८, डयानी, हेमा मालिनी, बबिता, मौशुमी, जया भादुरी ६७. राकेश रोशन, फरीदा जलाल ६६, मिथुन, शबाना, लीना चंदावरकर ६५, झीनत ६४, ऋषी कपूर, अमितकुमार ६३, रेखा ६१. काळ काय झटझट सरला. ज्यांच्या चित्रपटावर मोठे झालो ते सगळे आता साठीच्या पुढे गेलेत किंवा गेलेत. प्रेमापोटी ते आपल्याला अजून तरुण वाटतात पण ते नाहीत आणि आपणही पन्नाशीकडे वाटचाल केल्याचं जाणवतं. सत्तरीच्या पुढचा फक्तं अमिताभ काय तो कार्यरत आहे. २००७ सालच्या जॉनी गद्दार मधे धमेंद्र दिसल्याला सुद्धा आठ वर्ष झाली. बाकी सगळे अधून मधून कुठेतरी दृष्टीस पडतात. देखणा जॉय मुखर्जी असाच विपन्नावस्थेत गेला, त्याच्या स्टेशनरीच्या दुकानात बसायचा म्हणे. त्याला शम्मी म्हणालेला, तू परत काम कर, त्यानी नकार दिला कारण त्याला त्याचं ते म्हातारं रूप दाखवायचं नव्हतं. काल साधना शिवदासानी नय्यर गेली. बबिताची चुलत बहिण, करीना करिष्माची चुलत मावशी. 

कराचीवरून फाळणी झाल्यावर सिंधी शिवदासानी कुटुंब मुंबईत स्थिरावलं. सिंधी असून पण ती सुटलेल्या अंगाची, तुपट चेह-याची नव्हती. अतिशय नितळ आणि लोभस चेहरा. कुठलंही खास वैशिष्ठ्य नसलेली ती एक सुंदर चेह-याची साधी मुलगी होती. वडिलांना नृत्यांगना साधना बोस आवडायची म्हणून तिचं नाव साधना ठेवलं होतं. साधनाला पहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. १९५५ च्या 'श्री ४२०' मधल्या 'मूड मूड के ना देख' मधे ती कोरस डान्सर होती. साठ साली आलेल्या निर्माता शशधर मुखर्जीच्या 'लव्ह इन सिमला'मधे त्याचा मुलगा जॉय हिरो होता आणि साधना होती आणि तिला कपाळ लहान दिसण्यासाठी 'ऑड्री हेपबर्न'चा कट देऊन 'साधना कट' फेमस करणारा दिग्दर्शक होता आर के नय्यर यांनी साठ सालचा हिट सिनेमा दिला. तिनी मग त्याच्याशीच लग्नं केलं, ९५ ला नय्यर जाईपर्यंत तिचं वैवाहिक जीवन होतं, तिला मुलबाळ काही नव्हतं. तिच्या केशरचनेची क्रेझ होती. अंगाला चिकटवल्यासारखा फिट्ट सलवार कमीझ घालायची आयडिया पण तिचीच होती जी पुढे पोट सुटलेल्या, शोभो न शोभो, नायिकांनी पण वापरली. 

रहस्यमय मराठी 'पाठलाग' वरून आलेला 'मेरा साया', 'वह कौन थी', 'राजकुमार', 'वक्त', 'आरजू', लतानी गायलेलं एकमेव मादक 'आ जाने जा' असलेला 'इंतकाम', लुळ्या देवानंदचा 'हम दोनो' असे मोजकेच सिनेमे मला पाहिल्याचे आठवतात तिचे. सदाबहार 'झुमका गिरा रे'च्या स्टेप्स 'एक दो तीन'वाल्या तेंव्हा नृत्यंदिग्दर्शक सोहनलालची सहाय्यक असलेल्या सरोजखानच्या आहेत. तिचा चेहरा गीताबाली, फरीदा जलाल सारखा गोबरा नव्हता पण लोभस होता. मला साधना म्हटलं की कृष्णंधवल रंगात टेरेसवर 'असली नकली' मधलं 'तेरा मेरा प्यार अमर' म्हणणारी सिल्क साडीतली, अंबाड्यावर वेणी घातलेली, प्रसन्न चेह-याची सोज्वळ, सात्विक सुंदर दिसणारी, कोपरापर्यंत बाह्यांचा ब्लाउज घातलेली साधना आठवते. संपूर्ण गाण्यात फक्तं तिच्या चेह-यावरचा गोडवा बघावा. 'राजकुमार' बघताना मला त्याचं नाव राजकुमारी हवं होतं असं अनेकदा वाटलं होतं. संपूर्ण चित्रपटात ती अफाट सुंदर दिसली होती. मेकप वगैरे असतो मान्यं आहे पण मूळ मटेरीअल देखणंच होतं, मेकपनी फारतर शार्पनेस वाढला असेल सौंदर्याचा. तिनी एकूण ३३ चित्रपटात काम केलं आणि त्यातले २७ हिट होते पण तिला फिल्मफेअर कधीच मिळालं नाही, वह कौन थी आणि वक्त साठी नामनिर्देशित होती ती फक्तं.    

एकदा तिचा फोटो बघितला आणि काळ किती भीषण सूड उगवतो ते जाणवलं. थायरॉइडमुळे तिच्या डोळ्यांवर परिणाम झाला होता. जागा सोडलेले बटाट्यासारखे डोळे, आत गेलेले गाल, खप्पड दिसत होती, हीच का ती? असा प्रश्नं पडावा अशी. आशा पारेख, वहिदा, नंदा आणि हेलन एवढंच तिचं शेवटचं मैत्र होतं. मधे नंदाही गेली. तबस्सुम सांगत होती, 'ढासळणारी तब्येत आणि मागे लागलेलं कायद्याचं झेंगट' यासाठी तिनी अनेकांची मदत मागितली आणि कुणीही पुढे आलं नाही शेवटपर्यंत. कदाचित तिचे भोग संपल्यावर ती कर्करोगाने गेली. आशा भोसलेच्या मालकीच्या बिल्डींगमधे ती भाड्याने रहात होती. तिच्या अंत्ययात्रेला तरुण म्हणावी अशी दीप्ती नवल (५८) तेवढी होती बाकी सगळे तिच्या मागचे पुढचे. 

प्रसिद्धीची सवय झाल्यावर वयानी आलेली हतबलता किती त्रास देत असेल याची कल्पना करायची पण मला इच्छा होत नाही. काय करत असतील हे लोक? प्रचंड रिकामा वेळ, सोडून गेलेलं सौंदर्य, तारूण्य, बरेचवेळा ओढवून घेतलेली विपन्नावस्था, एकाकीपण, आपल्या वयाचं, आपलं ऐकणारं माणूस आसपास नाही, विचार केला तरी अंगावर काटा येतो. काय वाटत असेल आरशात बघताना की आपलेच जुने फोटो बघत असतील, यशाच्या बातम्या वाचत असतील, आठवत असतील?

तिचं 'तेरा मेरा प्यार अमर' मला कायमचं आवडून गेलेलं गाणं आहे कारण त्यात तो साधना कट नाही, फिट्ट ड्रेस नाही, आहे ते एक सोज्वळ, सुंदर, सालस सौंदर्य, ठसलेलं (अशीच 'सुवासिनी' मधली अंबाडा घातलेली सीमा देव). त्या गाण्यात शेवटच्या कडव्यात ती म्हणते न तशी ती काल 'चलती हू मैं तारों पर, फिर क्यो मुझ को लगता ही डर' म्हणत जिथे कसलीही भीती नाही अशा ठिकाणी तारोंपे चलते हुए निघून गेली एवढं खरं.  

जयंत विद्वांस 

 

Saturday, 12 December 2015

अज्ञानात सुख असतं.....

अज्ञानात सुख असतं..... 

'अज्ञानात सुख असतं' या वाक्यात खूप काही दडलंय. अफाट आनंद आहे, बालसुलभ औत्सुक्य आहे, अचानक काहीतरी नवीन गवसल्याचा भारावून टाकणारा हर्ष आहे, ज्ञानानी होणा-या दु:खापासून, क्लेशापासून वंचित ठेवणारं अमृत आहे, आपल्याला जे ज्ञात आहे तेच अंतिम, चांगलं अशी वरवर कुपमंडूक वाटणारी पण सुखी ठेवणारी वृत्ती आहे, एक निरागस बाल्यं जपता येईल असं काहीतरी त्यात आहे. तुम्ही जेंव्हा नवीन असता तेंव्हा रहस्यकथा असो नाहीतर एखादं कोडं किंवा अगदी सुडोकू असो, ते सुटेपर्यंत जी बौद्धिक मजा येते त्यात अज्ञानाचा मोठा वाटा असतो. एकदा तुम्ही सराईत झालात की ती मजा जाते. अर्थात एखादी गोष्टं अनुभवाने, अनेकवेळा केल्याने अंगवळणी पडते आणि अज्ञान उघड्यावर ठेवलेलं पेट्रोल जसं गायब होतं तसं नकळत नाहीसं होतं. त्याचेही फायदे आहेतच पण अज्ञानात मिळणारा आनंद किंवा ते निष्पाप सुख त्यात नाही. अज्ञानातलं सुख आणि लहानपणा देगा देवा या एकाच दर्जाच्या गोष्टी आहेत. 

आम्ही एकदा नागपूरला गेलो होतो लग्नासाठी ८४ ला. सगळेजण एअरपोर्ट जवळ म्हणून तो बघायला गेलो होतो. नात्यातलीच एक बाई पहिल्यांदाच घर सोडून नागपूरला म्हणजे एवढ्या लांब गेली होती. तिनी अत्यंत आणि ख-या निरागसतेने विचारलं, 'यातून चक्कर मारायचे किती पैसे घेत असतील?' सगळेजण हसले, ती खट्टू झाली. एकानी तिला समजावून सांगितलं, ते किती खर्चिक आहे ते. खरंतर ८४ साली उपस्थितातल्या ९९ टक्के लोकांना खरंच किती पैसे घेतात हे ही सांगता आलं नसतं पण हसलो मात्रं सगळेच. तिला ज्ञान प्राप्तं झालं हे मान्यं आहे पण त्यातून निष्पन्न काय झालं? तर चक्कर मारण्याएवढे पण पैसे आपल्याकडे नाहीत हे दु:ख तिच्या पदरात आलं. काहीवेळेस न मिळालेल्या गोष्टी पण आनंद देणा-या असतात कारण अज्ञानामुळे आपण त्या प्राप्त झाल्याची स्वप्नं पहात असतो. 

त्या अजरामर 'अमर अकबर' मधे निरुपा रॉयला रक्तं देतात त्या शॉटला मी कायम ढसाढसा हसलोय. पण अजाणतेपणी पहिल्यांदा पाहिला तेंव्हा मात्रं आईचं आणि मुलांचं रक्तं एकसारखंच असतं आणि एकमेकांना कडेला झोपवून ते लगेच भरता येतं असं खरं कळेपर्यंत कितीतरी वर्ष माझा समज होता. पण त्या अज्ञानामधे विश्वास होता, एक दिलासा होता - उद्या समजा काही झालं आपल्याला तर आईचं रक्तं मिळेल किंवा तिला काही झालं तर आपलं तिला देत येईल - हा विश्वास ज्ञानामुळे मिटला. ज्ञान गरजेचं आहे हे मान्यं आहे पण त्या रक्तात पण ग्रुप असतात, अमक्याला अमुकच चालतो, वेळप्रसंगी ती बाटली मिळवण्यासाठी कसं दर दर की ठोकरे खात फिरावं लागतं, दुर्मिळ ग्रूप पण असतो म्हणे त्यात, या बाकी चिंता वाढल्या त्याचं काय? एका विशिष्ठ ठिकाणी डोक्यावर फटका बसून वर बघितलं आणि नेमक्या त्याच वेळी साईबाबांच्या डोळ्यातून निघणा-या दिव्यज्योती डोळ्यात शिरल्या की अंधा आदमी डोळस होतो, फक्तं सरपटत जाउन पायरीवर डोकं आदळायचं टायमिंग जमलं की झालं असंही वाटायचं तेंव्हा. साला मनमोहन देसाई एकदम निरागस माणूस असणार (ज्ञानप्राप्ती झाल्यामुळेच त्यानी जीव दिला असणार). 


त्या 'उत्सव'मधे एकदा तो शेखर सुमन रेखाचा एकेक दागिना काढतो (तो अजरामर हेवा आहे मला आजवर वाटलेला, मी त्या शॉटचे दहाबारा रिटेक करून विनामोबदला काम केलं असतं शिणमात), नंतर रेखा कंचुकीतली एक क्लिप काढते आणि सगळे दागिने झटक्यासरशी काढते. चारुदत्त खुळाच म्हणावा लागेल लगेच क्लिप काढणार असेल तर, काहीवेळेला मठ्ठ असल्याच्या किंवा तसं दाखवल्याचा फायदा असतो. समोरच्याला ते कळत असतं तरीपण त्यात मजा असते. सगळ्या ठिकाणी ज्ञान आहे म्हणून लगेच पाजळायचं नसतं, ना वसंतसेनेला मजा न चारुदत्ताला. वपु म्हणाले होते. 'नाविन्यासारखी चटकन शिळी होणारी दुसरी गोष्टं नाही'. त्यामुळे दरवेळेला ती क्लिप काढणे म्हणजे तो आनंद शिळा करणं आहे, घाईच्या वेळची गोष्टं अलाहिदा :P .   

आता तर काय नेटमुळे ज्ञान कमी आणि माहिती जास्ती मिळते. त्यामुळे धड अज्ञान पण नाही आणि पूर्ण ज्ञान पण नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला खेड्यातून आलेल्या माणसांच्या निरागसतेचा, भोळेपणाचा फार हेवा वाटतो. त्या बिचा-यांना ओढ वाटते शहराची, न्यूनत्व जाणवतं पण ते किती सुखी आहेत याची त्यांना कल्पना नाहीये. मधे एके ठिकाणी वाचलं होतं. कुठल्यातरी देशात एक माणूस तीस वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला. कोल्ड्रिंक्स कलर मधे मिळतात, कानाला हेडफोन लावून बोलता येतं हे बघून तो आश्चर्यचकित झाला म्हणे. ही दुनिया माझी नाही असं त्याला वाटलंही असेल कदाचित. ज्ञान मिळणं म्हणजे माघारी न येता येणारी प्रक्रिया आहे. नॉन रिटर्निंग व्हॉल्व्ह, पुढे जायचं, मागे एन्ट्री बंद. ज्ञान म्हणजे फूल होणं, एकदा ते झालं की कळीत्वं संपलं. ज्ञान म्हणजे  दुध - दही - ताक - लोणी - तूप अशी साखळी आहे. एकदा पुढे गेलात की मागच्या स्थितीतला आनंद संपला. 

म्हणून वर जरी म्हटलं ना अज्ञानात सुख असतं तरी फक्तं एकाच बाबतीत ते नसतं. 'शेवटी' आपण जातो म्हणजे नक्की कुठे जातो हे अज्ञान अजून तरी दूर झालेलं नाही याचं मात्रं प्रत्येकाला दु:खं आहे, भीती आहे. देव मोठा मजेशीर माणूस असणार. नियम सिद्ध करण्यासाठी तो त्याला अपवाद तयार करून ठेवतो. अज्ञानात सुख असतं म्हणतोयेस ना, घे, म्हण मग या बाबतीत पण. ते ज्ञान कधी प्राप्त होणार नाही हे ही निश्चित आहे त्यामुळे त्याची चिंता न करता सुखासाठी गरजेचं असलेलं अज्ञानाचं दही घुसळायची घाई करायची नाही म्हणजे झालं. 'शेवटी' ज्ञान किती मिळवलं हे कोण मोजतंय, सुख किती मिळालं याची गणती जास्ती झाली म्हणजे हस-या चेह-यानी तिकडे गेलं की झालो सुखी. 

जयंत विद्वांस 


Tuesday, 8 December 2015

सौ.शिल्पा केळकर उपाध्ये…

सौ.शिल्पा केळकर उपाध्ये… 
 
आयुष्यात माणसं येतात, काही काळ रमतात, निघून जातात. काही लक्षात रहातात. माणूस आयुष्यातून गेल्यावर आपण त्याच्याबद्दल चांगलं बोलतोच, एकूणच आपल्याकडे तो बरोबर असताना, सहवासात असताना त्याचं कौतुक करणं, त्याच्या गुणांवर बोलणं कमी असतं. कुठलाही माणूस पूर्ण सद्गुणी नसतो तसा पूर्ण अवगुणीही नसतो, तो कसा आहे हे ब-याच वेळा आपण आपल्या सोयीनुसार, मतलबानुसार ठरवतो. कुठलाही माणूस 'आंधळे आणि हत्ती' या गोष्टीतल्या हत्तीसारखा असतो. सहवासात आलेल्या किंवा ओळखणा-या प्रत्येक माणसाबद्दलचं मत हे त्याला आलेल्या अनुभवातून, त्याच्या बुद्धीनी केलेल्या पृथ्थकरणातून, त्याच्या आवडीनिवडीनुसार असतं त्यामुळे अमुक एक माणूस असाच आहे हे कुणी ठामपणाने सांगू शकत नाही, सांगूही नये. अनेक लोकांचं एखाद्या व्यक्तीबद्दल जे समान मत असेल ते प्रमाण मानावं फारतर. उदा : एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला एखाद्या व्यसनी माणसाला दुस-या समव्यसनी माणसाबद्दल असणारं प्रेम किंवा तेच मत असणार नाही, एका क्षेत्रातल्या हुशार माणसाबद्दल दुस-या हुशार माणसाला असते तशी असूया असेलच असं नाही, त्यामुळे अमुक एक माणूस मला समजला असा सर्वंकष दावा कुणी करू नये. पुलं रावसाहेब लिहिताना हेच म्हणून गेलेत. म्हणून आपल्याला जी बाजू दिसली ती मांडावी, सांगावी, दुस-याला किंवा खुद्द त्या व्यक्तीला ती पटेलच असं नाही. पटो न पटो, आपण आपल्या मतांशी प्रामाणिक असलो की झालं. तर मूळ विषय शिल्पा केळकर उपाध्ये.....  

शिल्पाचा आणि माझा मेलव्यवहार ७-८ जुलै १५ च्या दरम्यान चालू झाला. ती अमेरिकेत असल्यामुळे एक बरंय, तिच्या कामाच्या वेळेत मी झोपलेलो असतो आणि माझ्या कामाच्या वेळेत ती. आम्ही 'काय अप्पा' वर खूप बोललोय, बोलतो, फोनवर बोललोय (अर्थात तीच करते म्हणून). तिच्यात समोरच्याचं ऐकण्याचा अतिशय दुर्मिळ गुण आहे. माझ्या पाल्हाळापुढे ती लक्षणीय कमी बोलते. आपण कितीही रस्ते सोडून पळत सुटलो तरी 'पडोसन'मधे मेहमूद जसा पेटीवर 'एक चतुर नार…' गाण्यात मूळ स्वर शोधून सुनीलदत्तला मूळ चालीवर आणतो ना तशी ती मूळ मुद्द्यावर सहज येते. अवांतर फोलपट तिच्या बुद्धीच्या वा-यात ती उडवून लावते त्यामुळे तिच्याशी बोलताना जपून बोलावं लागतं, भीती म्हणून नाही तर ती एखादं वाक्यं, त्याचे संदर्भ, स्पष्टीकरण ती चार पाच दिवसांनी विचारू शकते, विचारते म्हणून. लॉजिकल थिंकिंग तिला आवडतं. एखाद्या गोष्टीची तर्काच्या कसोटीवर उकल झाली की तिला बरं वाटतं. फरक असतो, मी मत मांडतो, ती मला असं वाटतं असं म्हणते (केवढा बदल झालाय नं माझ्यात). 

तिची स्मरणशक्ती दांडगी आहे. तिला संदर्भ टपाटप आठवतात. वेगवेगळ्या वेळी केली तरी परस्परविरोधी विधानं ती झटक्यात पकडते. ती लगेच निष्कर्षावर येत नाही, प्रत्येक गोष्टीला वेळ दिला पाहिजे हे तिच्या स्वभावात आहे. राहूल द्रविड महान होता कारण फलंदाज चेंडू जेवढा उशिरा खेळेल तेवढे कुठे खेळायचं ह्याचे इतरांपेक्षा जास्ती पर्याय त्याच्याकडे असतात म्हणून तो महान असतो/होतो. तिच्याकडे पेशंस आहेत. लिखाणातल्या एखाद्या मुद्द्यावर ती मत लगेच व्यक्तं करत नाहीत, ती त्यावर चर्चा करते. माझ्यासारखा उतावळा माणूस त्यात काय चुकलं हे पहिलं सांगेल, ती आपल्याकडून वकीलासारखं काढून घेईल, आपण बदल मान्य करूच असे मुद्दे ती मांडेल याची मला खात्री आहे. लिखाणातली कुठलीही गोष्टं काल्पनिक असली तरी तिचे धागेदोरे आपल्या गतायुष्याशी, आलेल्या अनुभवाशी, बघितलेल्याशी, वाचनाशी संदर्भ सांगतात हे तिच्यामुळे मला लक्षात आलं, मी लिहायचो हे मान्यं पण हा विचार कधी माझ्या मनात आला नाही. चेह-यापाठीमागचा माणूस वाचायची मला सवय आहे तसं तिला कथेमागची प्रेरणा, मूळ शोधायची हौस आहे. आपण आपल्याबद्दल काही बोललो तर एखाद्या लिखाणात ते डोकावलं का हे तिला पटकन सापडतं.        

तिला चटपटीतपणा, नेटकेपणा, मुद्देसूदपणा आवडतो. माझ्या लिखाणावर तिचा एवढा लोभ असण्याचं कारण तेच आहे (माझ्या मते) कारण माझ्या लिहिण्यात तिच्यात असलेले गुण तिला दिसत असावेत. आठ जुलैच्या मेल मधे ती म्हणाली होती  - What I like the most about all these stories is the size and the twist. कोब्राटांचे जन्मत: काही गुण अवगुण असतात. पाल्हाळ नसतो, नेटकेपणा, काय सांगायचंय ते ठाम आणि ठरलेलं असतं, कष्ट पडले तरी चालतील तरी पण जे करतोय ते नीट, फ़्लॉलेस असावं, परफेक्शनची हौस आणि तिरकस बोलणं (इतर लोक त्याला कुचकेपणा म्हणतात, आपण लक्ष नाही द्यायचं). तिच्याकडे ती टोकदार विनोदबुद्धी निश्चितच आहे. स्मृतिचित्रे, ओव्हरड्राफ्ट, सूर्यास्ताची दिवाळी या सगळ्या वाचनात तिचा परफेक्शनचा सोस जाणवतो. हे ती कुणी चांगलं म्हणावं म्हणून करत नाही तर आपण जे करतोय ते चांगलं झालं पाहिजे या भावनेतून करते. ते स्वभावात लागतं. आनंद मिळवायचे अनेक प्रकार असतात. काही आनंद मानसिक असतात जे इतरांना कळोत न कळोत, त्या माणसाला कळतात, अवीट आनंद असतो तो. परफेक्शनचा आनंद तसाच असतो. ठरवल्याप्रमाणे ती गोष्टं झाली की तो मिळतो. ती तशी व्हायला दरवेळेला योगायोग उपयोगी पडत नाही त्याकरता ध्यास लागतो. ओव्हरड्राफ्ट वाचताना काही वाक्यं वेळेत बसण्यासाठी गाळावी लागत होती. कथेला बाधा येउन नये म्हणून तिनी मला विचारलं, कुठली वगळू? वास्तविक ती ते करू शकत होती पण ढवळाढवळ नको, लेखकाला ठरवू दे हा कोब्राट गुण आहे तिच्यात (बाकी लोक त्याला अलिप्तपणा म्हणतात, आपण लक्ष नाही द्यायचं).

Not a penny more, not a penny less अशी ती स्लिम ट्रिम आहे. आनंदानी कुठलीही गोष्टं करता यायला हवी. ती नेमाने चालायला जाते म्हणजे ती शिस्तीशी निष्ठावान आहे. किती किमी चाललो, किती वजन कमी झालं, किती दिवस खाडा न करता चालतोय असले हिशोब ती ठेवत नसावी म्हणून मग चालायला जाताना तिला सिगारवाला सापडतो. माणसं वाचायचा चाळा फार वाईट. तिचे डीपी आणि जे काय फोटू मी बघितलेत त्यात जाणवण्यासारखा एक मुद्दा आहे. सगळे कपडे प्लेन आणि मोस्टली सिंगल कलर आहेत. 'ए हास, फोटो काढतोय' असं म्हटल्यावर माणूस जसा उभा रहातो तसे तिचे फोटो आहेत, पोझ बिझ भानगड नाही. सगळ्या फोटोत ती एकसारखी हसलीये. याचा अर्थ फार शो करायची हौस तिला नाहीये. गुणांनी ओळख असावी असंही तिचं मत असावं. कसे दिसताय हे चिरकाल नसतं. पण कसे वागताय, गुण काय हे लॉंगरनमधे कळतं. मी काही तिने केलेलं खाल्लेलं नाही पण ती सुगरण असावी कारण दिवाळीला तिनी शंभर लाडू केले ते खप आहे म्हणूनच केले असणार ना? Either you are born host or guest असं म्हणतात. ती होस्ट आहे. सतत तिच्याकडे कुणी न कुणी येतं, जमतं, रहातं म्हणजे ती लोकांशी चांगली वागत असावी अशी दाट शंका घेण्यास वाव आहे. तिच्या तोंडून आज ती निवांत आहे असं मी क्वचित ऐकलंय इतके तिचे व्याप आहेत. सतत काहीतरी करत रहाण्याचं तिला व्यसन आहे.  

ती स्वत: वाचनीय लिहिते पण तिनी मला कितपत जमतंय हे बघण्यासाठी एक स्टोरी प्लॉट मला दिला आणि चक्कं मी एकांकिका लिहू शकलो. मजा आली लिहिताना कारण दृश्य लिहिण्याची मला आवड आहेच पण संवादातून ते लिहिण्याचं कसब मी कधी अजमावलं नव्हतं. नाटक, एकांकिका या विषयवार बोलण्याइतका माझा अभ्यास नाही, ज्ञान नाही पण तरीही मी लिहू शकलो (त्याची क्वालिटी काय यावर वाद होऊ शकतात पण मी लिहिलंय ते बघावं माणसानं) कारण तिची मूळ कथा छानच होती. मला फक्तं त्यात जागा भरणे एवढंच काम करायचं होतं. तिनी मला स्टोरीलाईन दिल्यामुळे अनेक शक्यता माझ्या बुद्धीच्या कुवतीनुसार मला अजमावता आल्या, मी लिहू शकेन याची तिला खात्री कशामुळे वाटली ते माहित नाही, नाही जमलं याला तर मी लिहीन असंही असावं तिच्या डोक्यात, माहित नाही. पण तिच्यामुळे एक नवीन प्रकार लिहून बघता आला. पुढेमागे ती अजून प्लॉट देईन आणि मी उच्छाद मांडेनही त्या प्रकारात.    


मी काही तिला अजून तरी भेटलेलो नाही. तिचा काय माझ्या बांधाला बांध नाही त्यामुळे वाद नाहीत. अजून पंचवीस वर्ष दोघं हयात राहू असं धरलं घटकाभर आणि ती आली दरवर्षी एकदा भारतात तरी आम्ही जास्तीत जास्ती पंचवीस वेळा भेटू शकतो. त्याच्यामुळे एकमेकांबद्दल वाईट मत होण्याचं काही कारण नाही. पुढेमागे तिची माझ्याबद्दलची आणि माझी तिच्याबद्दलची मतं बदलतीलही पण मला माझ्याच लिखाणावर प्रश्नं विचारून, त्याची उकल करून मला नविन दृष्टीकोन देणारी ती पहिली आहे, माझी साधी सोपी सरळ कथा वाचनात अभिनय केला की रिपीट व्ह्यालू असणारी होऊ शकते हे तिच्यामुळे समजलं (वाचनाचा प्रथम क्रमांक अर्थात स्वरूपाचा आहे, शिल्पाप्रमाणेच ती ही माझ्या लिहिण्यावर प्रेम करणारी आहे). माझी कथा वाचण्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी पाहिले नसले तरी ऐकून आहे, पुढेमागे अजून काही कथा तू नळी वर टाकूयात असं ती म्हणाली होती, ते होईल न होईल पण मला माझ्याच लिखाणात उमटणारा मी सापडवून देण्याकरता मी तिचा ऋणी आहे.

जयंत विद्वांस  

(यातला कुठलाही गुण तिच्यात कुणाला आढळल्यास तो योगायोग समजू नये ही विनंती. :P)


Monday, 9 November 2015

मोठेपणी कोण होणार?.....

मोठेपणी कोण होणार?.....

आपण जन्माला येतो तेंव्हा काही माहित नसतं आपण पुढे कोण होणार ते. हाक मारायला बरं म्हणून आपलं नाव ठेवतात. मग ते आपल्याला चिकटतं ते कायमचंच. ते पुढं मोठं होतं की नाही ते आपल्या बुद्धीवर, मिळणा-या संधीवर, लायकीवर, कर्तुत्वावर अवलंबून असतं. लहानपणापासून आपले कुणी न कुणी वयपरत्वे आदर्श असतात. फार काळ प्रभाव टिकेल असं कुणी नसतं खरंतर पण आपल्याला अमक्या ढमक्या सारखं वागायची, रहायची सुरसुरी येते आणि आपण कळत नकळत अनुकरण करतो. आपण काय वाचतो, बघतो त्याप्रमाणे हंगामी विचार मनात रुजतो आणि नाहीसा पण होतो. माझ्या मनात तर नेते स्टेटमेंट नाकारायला जेवढा वेळ घेतात त्यापेक्षा फास्ट बदल घडतात.

लहानपणी कुणाचं तरी चरित्रं वाचलं आणि ठरवलं, आपल्यालाही या माणसासारखं मोठं व्हायचंय. काय करता येईल? त्यांनी जे जे केलं ते आपण करायचं म्हणजे नाव होईल असा माझा समज. 'ते' दिवे नसल्यामुळे कंदिलात अभ्यास करायचे असं होतं त्यात. मी मुळात लहानपणापासून स्वयंघोषित हुशार आहे. हे मी सोडून कुणालाही आजतागायत पटलेलं नाही हा भाग वेगळा. माळ्यावरून मी कंदील काढला कुणाला समजू न देता. दिवसभर काहीही अभ्यास केला नाही, अंधार पडायची वाट बघितली. आईनी लाईट लावला आणि कुठेतरी बाहेर गेली. मी आधीच पुसून ठेवलेला कंदील काढला, त्यात रॉकेल घातलं, वात वर काढून कात्रीनी कापली, अजून थोडी वर घेण्याच्या नादात ती त्या खाचेतून बाहेर आली आणि रॉकेल सांडलं. तरीही मी तिला परत आत घालून सेट केलं. काच व्यवस्थित बसवून वात मोठी केली आणि लाईट घालवला. सवय नसल्यामुळे काहीही दिसत नव्हतं पुस्तकातलं. म्हणून वात मोठी केली तर कंदील भगभगला आणि वर काच काळी व्हायला लागली. 


लहान मूल म्हणजे किती निरागस असतं सांगा. उठलो, फडकं ओलं करून घेतलं, म्हटलं रोज अभ्यास करायचाय, मोठं व्हायचंय, काच स्वच्छ पाहिजे. पुसायला गेलो, काडकन आवाज आला, तडकली काच, सगळीकडे तुकडे, हात काळे, तोंडावर काळं, रॉकेलचा वास सगळीकडे. तेवढ्यात आई आली. तिला वाटलं दिवे गेले. काळजीने मला हाक मारली. म्हटलं, बटण दाब, आहेत लाईट. बटण दाबल्यावर दिवा लागला आणि मग मी लावलेले दिवे दिसले, त्याच्या नंतरचं फार सांगण्यासारखं नाही. काचा गोळा करून, कंदील जागेवर ठेऊन मग मला तोंडानी सांगून समजत नसल्यामुळे ठोकून काढण्यात आलं आणि महाराष्ट्र कंदीलाच्या उजेडात अभ्यास करून मोठा होऊ घातलेल्या माणसाला मुकला. कसा अभ्यास करणार सांगा ध्येयं संपल्यावर. अशी किती असेल काचेची किंमत? पण पुढे एक नररत्नं पूर्णत्वाला गेलं नाही याचा तोटा किती हे कुणी लक्षात घेत नाही याचं दु:खं (अर्थात मला एकट्यालाच) जास्ती आहे. 

पुण्यात ते टोळी युद्धं चालू होतं त्यावेळी. मला वाटायला लागलं भाई व्हावं. काय साली दहशत असते. हिंदी पिक्चरमूळे तर अजूनच भारी वाटायचं. आजूबाजूला बघायची खोटी, 'हुकुम' म्हणत माणसं धावत येतात, रिझल्ट दिला नाही, खाली हाथ वापस आया, डायरेक्ट गोळी घालायची. सगळ्या स्कॉचच्या बाटल्या भिंतीला लावलेल्या, हातात सिगार, गॉगल, एकापेक्षा एक टंच बायका अंगाला सतत चिकटून, फोन आला तर उचलून द्यायला सुद्धा माणूस, प्लायमाउथ सारख्या लांबसडक गाड्या, फिटिंगचे भारी कपडे, पॉलीश्ड शूज, बप्पी लाहिरी सारखे अंगावर दागिने, हिरोईनला पाहिजे तेंव्हा पळवता येण्याची मुभा. बरं मला सगळं असंच हवं होतं असंही नाही, मध्यमवर्गीय अपेक्षेप्रमाणे यातलं पन्नास टक्के पण चाललं असतं. मग निरीक्षणाला सुरवात केली. पहिल्यापासून माझं ते काम चोख आहे, डिटेलिंग परफेक्ट पाहिजे. मी तर यावेळी लिस्टच केली. भ आणि इतर वर्णाक्षरापासून सुरवात होणा-या शिव्या लिहून काढल्या. काही आल्टर करून नवनिर्मिती केली. आई** ऐवजी आय**, भेंचो* ऐवजी भैsssन्चो* असं आलाप, तानयुक्तं म्हटलं की वजन येतं हे लक्षात आलं. त्या कुणी ऐकायला नसेल त्यावेळेस उच्चारून पाठ केल्या.  

शरीराचे विविध अवयव गुंफून, हाताची बोटं वापरून पण शिव्या देता येतात त्याची माहिती गोळा केली. (ही कला लोप पावतीये हल्ली याचा विचार व्हायला हवा). असो! तर हिंदी प्रथमा, द्वितीया परीक्षा द्याव्यात तसा मी ज्ञानसंपन्नं होत होतो. आता थिअरी पक्की झाली होती. इतर अभ्यासात पुढील गोष्टींची टिपणं काढली  - दम कसा द्यावा, भांडण कसं उकरून काढावं, खुन्नस देण्यासाठी विशिष्ठ पद्धतीनी कसं थुंकावं, शर्टची बटणं कुठल्यावेळी एक, कुठल्यावेळी दोन उघडी ठेवावीत, कल्ला, हेअरस्टाईल कशी हवी, पारदर्शक पांढ-या शर्टात हिरवी, लाल बनियन कधी घालायची, गळ्यात काळा दोरा, मनगटाला चार पाच विविध रंगाचे दोरे कसे बांधावेत, सिग्रेट काडेपेटीनी कधी, लायटरनी कधी पेटवायची, खिशात सफरचंद कापायचा चाकू ठेवायचा की बटण दाबल्यावर फाटकन बाहेर येतो तो की खाली वाकून बुटातून करकर आवाज करत उघडल्यावर तळपतो तसा ठेवावा. एक मुद्दा म्हणून सोडला नव्हता बघा पण व्हायचं तेच झालं, ते ही स्वप्नं धुळीला मिळालं. 

आम्ही क्रिकेटची म्याच घेतली होती. मागची खुन्नस होतीच. मागच्या वेळेला त्यांनी, आमच्या ब्याटिंगची वेळ आल्यावर, तुम्ही जिंकलात असं म्हणून फुकट फिल्डिंग करून घेतलेली. यावेळेला आम्ही वचपा काढायचं ठरवलं. आधी आमची ब्याटिंग या बोलीवर ठरवली म्याच. आमची इनिंग झाल्यावर मी अप्रेंटीस भाई पुढे आलो आणि म्हणालो, 'तुम्ही जिंकलात, आम्ही चाललो घरी' आणि आम्ही निघून आलो. आता जलद चालण्याला कुणी पळणं म्हणत असेल तर बोलणंच खुंटलं. येताना फक्तं चारी बाजूंनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव चालू होता, महागुरू सचिन सारखं मी ही 'गेल्या पंधरा सोळा वर्षातले माझे दमदाटीचे किस्से' यावर सांगत माझ्याबद्दल आणि फक्तं माझ्याबद्दलच बोलून हातभार लावत होतो. घरापाशी आल्यावर मुलं कौतुकमिश्रित नजरेनी पहात आपापल्या घरी गेली. मी ही आलो घरी. पाऊल ठेवल्या ठेवल्या आईनी विचारलं, ब्याट कुठाय? जेम्स ह्याडली चेसच्या पुस्तकात शेवटच्या क्षणी अचूक आखणी केलेला, त्रुटी रहीत मास्टर प्लान सुद्धा जसा धुळीला मिळतो नं तसं झालं.

मी सर्वस्वं गमावल्यासारखा, एके हंगल पेक्षा पडलेला चेहरा घेऊन परत एकटा मैदानावर गेलो.  त्याच्या नंतरचं फार सांगण्यासारखं नाही. गेल्या गेल्या सगळ्यांनी कानफटवून झालं, शरीराच्या शक्यतो सगळ्या अवयवांचा वाक्यात उपयोग करून झाला, तीन तास उन्हातान्हात फिल्डिंग करून घेतली. थिअरी शिकलो पण कर्णासारखा आयत्यावेळी महत्वाचा मुद्दा विसरलो, "दुश्मन के अड्डे पर कभी अकेले नही जानेका". लहान मूल म्हणजे किती निरागस असतं सांगा. ब्याट मिळाली पण स्वप्नं धुळीला मिळालं, त्यामुळे आत्मविश्वास पार दो गज जमीन के नीचे गेला. मी काय म्हणतो, गेला बाजार राजनसारखं इंडोनेशियातून नसतं आणलं अगदी मला पण नेपाळ बॉर्डर, गोव्यातल्या एखाद्या बोटीवरून, काहीच नाही तर निदान तळजाईच्या टेकाडावरल्या एखाद्या झुडपातून तरी उचलून आणलाच असता की. स्वप्नं बघणं आपल्या हातात असतं पूर्ण होऊ देणं, न देणं त्याच्या हातात असतं म्हणा. 


त्यानंतर अनेक वेळा काय बनायचं ते ठरवत गेलो आणि फिसकटतही गेलं. फक्तं अंगावर माप घेणारा अशी पाटी लावून लेडीज टेलर व्हावं, तहहयात सुग्रास जेवणासाठी हॉटेलमालक व्हावं, सतत गाड्यातून फिरायला मिळावं म्हणून ड्रायव्हर व्हावं, स्वप्नात येणा-या नट्यांबरोबर लव्हसीन मनासारखे होईपर्यंत रिटेक घेणारा परफेक्शनिस्ट कलाकार व्हावं, गर्दीचा त्रास नको म्हणून मोटरमन किंवा गार्ड व्हावं, जाहिराती मिळतील म्हणून क्रिकेटर किंवा टेनिसपटू व्हावं, रग्गड पैसे खाता यावेत म्हणून पीडब्ल्यूडी मधे लागावं, कुणालाही हाणता येतं म्हणून इन्स्पेक्टर व्हावं, प्रसिद्धी, मानमरातब मिळतात म्हणून गायक, वादक व्हावं अशी भुछत्राएवढीच टिकणारी हंगामी आणि कुवतीबाहेरची स्वप्नंही पाहून झाली. मुळात ठरवल्याप्रमाणे सगळं व्हायला पण तसं नशिबात असावं लागतं. त्या त्या वेळेला सुचेल ते आपण करत जातो. मोठी माणसं आपल्यावर कळत नकळत लादत रहातात आपण काय व्हायचं ते. "तुला काय वाटतंय, काय व्हावंस तू?' असं विचारायला हवं खरंतर. मला मात्रं असं कुणी, काहीही लादलं नाही. मिळेल ते करत गेलो एवढंच, त्यामुळे अपयश काही असेल तर ते माझ्या एकट्यामुळे आहे.

आता मागे वळून बघताना वाटतं आपण हे अमूक अमूक होऊ शकलो असतो, हे जरा अजून बरं करता आलं असतं, हे जरा चुकलंच, ते जरा सुधारता आलं असतं पण फार काही खंतावण्यासारखं नाहीये हे ही आहे. प्रत्येकाची एक कुवत असते आणि ती त्याला माहित असते. त्यामुळे चारचौघात कितीही बढाया मारल्या तरी स्वत:ला माहित असतं खरं काय ते. अशावेळी मला 'यादोंकी बारात' मधे कणेकर कुंदनलाल सहगलवर लिहितात ते आठवतं. सहगल गेल्यावर त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा एक मित्रं सगळं चंबूगबाळं आवरून कायमचा कलकत्त्याला निघून गेला. सहगलबद्दल तो म्हणाला, 'कुंदन दोस्त बडा अच्छा था'. मला कायम त्या वाक्याचं कौतुक वाटत आलाय. एखादा माणूस त्याच्या गायकीबद्दल, अभिनयाबद्दल बोलला असता, त्याच्या मी किती जवळचा होतो वगैरे सांगितलं असतं पण त्याच्या दृष्टीने तो एक चांगला मित्रं, माणूस म्हणून प्रथमस्थानी होता. मानमरातब, हुद्दा, श्रीमंती, कर्तुत्व हयात असताना मोजलं जातं, नंतर तुम्ही कसे होतात, कसे वागलात याचीच चर्चा जास्ती होते. 

कदाचित मोठेपणी मी फक्तं वयानी मोठा झालो असेन पण सहगलच्या मित्राप्रमाणे चार लोकांनी हयातीत किंवा नंतर ''तसा माणूस बरा होता'' एवढं जरी म्हटलं तरी पुष्कळ आहे, बाकी काही नाही.  

जयंत विद्वांस     



 

 

     

Saturday, 31 October 2015

विन्या पानसे....

विन्या पानसे....

"कपाळ, नाक, कान, तळपाय आणि तळहात सोडले तर अळीव टाकल्यासारखे केस आहेत लेका तुझ्या अंगावर. लहानपणी कुठे शेतात सुफला १५:१५:१५ टाकल्यावर लोळला वगैरे होतास का डुकरासारखा". कुठलीही ओळख नसताना विनय पानसे या महाभागानी मला हा प्रश्नं विचारलेला. महिनाभर लेट आडमिशनमुळे अड्ड्यात मी नविनच होतो, विनय गावाला गेल्यामुळे ओळख झाली नव्हती. बाकीच्यांच्या बोलण्यात सतत त्याचं नाव यायचं. मी ही उत्सुक होतो या प्राण्याला भेटायला. त्याचे उद्धटपणाचे किस्से कानावर आलेच होते.

चेह-यानी (फक्तं) अतिशय सालस, गोरापान, दाट काळेभोर कुरळे केस, व्यायामानी अगदी पिळदार झालेला सहाफुटाचा दणकट सागवानी खांब दिसायचा तो. मधाच्या रंगाचे पिंगट डोळे, व्यवस्थित कापलेली ट्रिम मिशी आणि विनोद खन्नासारखे कानापर्यंत जाड कल्ले असा सगळा एकूणच देखणा मामला होता. तो गावाहून आला ते बॅग रूमवर टाकून थेट अड्ड्यावर म्हणजे टपरीवर आला. टपरी मालक आबा पालकरना जोरात हाक मारलीन आधी बाहेरून 'आबा, आहात ना?' आतून आबांनी पण तितक्याच जोरात उत्तर दिलं 'आहे, मायझ्या मी मरायचीच वाट बघ. गिळलं आहेस का काही? गरम वडे टाकतो थांब'. गेल्या आठ दिवसात न खाल्लेले गरम वेगळ्याच चवीचे वडे आणि आख्ख्या दुधातला चहा आला.

आठवडाभराचा वृत्तांत ऐकून झाल्यावर त्यानी सगळ्यांकडे अत्यंत कौतुकानी बघितलं आणि अचानक आठवण झाल्यासारखं मला विचारलं, 'नाव काय रे तुझं?' मी आपलं पुर्ण नाव सांगितलं. 'मयताचा दाखला काढायचाय का? पुर्ण नाव तिथे सांगायचं. आजपासून तू जया'. जसं काही मी माझं नाव ठेवायलाच आलो होतो तिथे. खिशातून विल्सचं पाकिट काढलं, सिगरेट काढली, पेटवली. 'तुला हवीये? ही घे, सेपरेट पेटव, माझी कुणाला देत नाही, कुणाच्या तोंडातली मी ओढत नाही'. मी माझी सेपरेट विकत घेउन पेटवली. 'रागावला काय रे? असशील तर ह्याच्या मारी माझ्या' म्हणून हसत सुटला. प्रथमभेटीत वाईट मत होईल असाच होता तो.

वर्गात मात्रं तो सगळ्या तासांना बसायचा मागच्या बाकावर. तल्लफ आली की बाहेर टपरीवर जाऊन धूर काढून यायचा. त्याला कुणीच काही बोलायचं नाही. आम्ही सगळे लास्ट इयरला होतो इंजिनिअरिंगच्या. बाबांची बदली झाल्यामुळे मी या आडगावात आलेलो. हळूहळू ओळख झाली विन्याशी. त्याला आई नव्हती, वडिलांचा कारखाना होता. त्याला त्यामुळे बरीच माहिती होती आधीच मेकॅनिकलची, डिग्री हवी म्हणून तो आलेला फक्तं. 'काय करतोस घरी संध्याकाळी? अभ्यास सांगू नकोस, इथेच मारेन'. 'का रे?' 'योनेक्सच्या दोन रॅकेट आहेत. येशील?'. मग आम्ही रोज बॅडमिंग्टन खेळू लागलो. मी ही पावणेसहा होतो पण पावफुटाचा फरक पडायचाच. मजा यायची. खेळ झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसायचो. हळूहळू कवचातला विन्या दिसू लागला होता.

एक दिवस अचानक म्हणाला 'कधी प्रेमात पडलाएस?' 'हो, अजून आहे, का रे?' 'नशीबवान आहेस. फक्तं कविता बिविता देउ नकोस हा'. नंतर तो माझ्या घरी येउ लागला. घरचाच एक झाला. अनंत वेळा आला. जाताना आईच्या पाया मात्रं पडायचा कायम. एकदा आईनी काहीतरी काम सांगितलं, मी उद्या आणेन म्हटलं. हा तिरसटल्यासारखा उठला आणि ते काम करून आला आणि म्हणाला, 'भडव्यो, आई आहे म्हणून किंमत नाही तुम्हा लोकांना'. तो घरी फार कमी जायचा. मी विचारलं एकदा त्याला दिवाळीला. 'काय करू जाऊन, बाप पैसा जमवतोय फक्तं माझ्यासाठी, मोठेपणासाठी. लॉज आहे माझं घर, फाईव्ह स्टार एकदम. चेक इन,  चेकाउट, नोबडी आस्क मी, हाउ आर यू, व्हाय सो लेट, इज नेसेसरी टू गो टूडे? रहा अजून दोन दिवस कुणी म्हणायला हवं ना?' गाडीला किक मारून गेला सुद्धा तो.

आबा पालकर आजारी पडले म्हणून दवाखान्यात होते. सगळे गेलो होतो तर विन्या तिथे लाल डोळ्यानी बसलेला. '##मारीच्यान्नो आत्ता येताय होय, आहेत अजून' आणि ढसाढसा रडायला लागला. ' डॉक्टर म्हणालेत चोवीस तास काढायला हवेत हे'. चोवीस तास पार पडले, आबा वाचले. मी डिस्चार्जला गेलेलो विन्याबरोबर. चार पाच हजाराचं बिल यानीच भरलं. आबांनी घरी गेल्यावर डब्यातून दोन हजार काढून विन्यासमोर धरले. 'सुरनळी करा आणि घाला माझ्यात, खायला घालताना हिशोब केला होतात का? चार पाच महिन्यात मी जाईन, त्याच्या आत जा म्हणजे घोर नाही रहाणार मला'. आबा ढग फुटल्यासारखे रडले. लहान मूल रडतं तसा विन्या रडला त्यादिवशी.

'तुझी कविता दे की रे एखादी वाचायला, मी ही केल्यात मागे, थांब देतो'. अतिशय सुवाच्यं मोत्यासारख्या अक्षरात लिहिलेली एक वही त्यानी दिली. पहिल्याच कवितेला मी गार झालो.

नक्षी.....

तिनी नक्षी काढल्यासारख
माझ्या तळहातावर
नाजूक बोटांनी कोरलं
'माझं तुझ्यावर प्रेम आहे'
आज इतकी वर्ष झाली
पुसलंही जात नाही, दिसतही नाही

माझा चेहरा ओंजळीत धरत
तिनी बाण मारल्यासारखे
माझ्या डोळ्यात डोळे घालून
टोकदार तीर सोडले
आज इतकी वर्ष झाली
निघतहि नाहीत, मारतही नाहीत

माझ्याकडे बघत हात हलवत
डोळ्यांना रुमाल लावत ती
कधीतरी परत येईन म्हणत
दूर अज्ञातात निघून गेली
आज इतकी वर्ष झाली
येतही नाही, कळवतही नाही

आणि खाली फक्तं तिरक्या अक्षरात ठोंब्या लिहिलेलं त्याखाली दोन टिंबं. मी त्याच्याकडे पाहिलं. 'ती म्हणायची मला, चल दे इकडे, वाच परत कधी, खेळायला उशीर होतोय'.

हाहा म्हणता वर्षं संपलं, परीक्षा झाल्या, रिझल्ट लागला. आईनी विन्याला जेवायला घरी बोलावलं होतं. जाताना आईला त्यानी भारीतली कांजीवरम आणली होती ती दिली आणि पाया पडला. 'परत कधी भेट होईल माहित नाही पण तुमच्या घरचं मीठ खाल्लंय त्याचे ऋण फिटणार नाहीत, फेडणारही नाही'. रात्रीची गाडी होती. तासभर आधी आबांकडे गेलो. आबांनी त्याला डबा भरून दिला होता. म्हाता-याला शब्दं फुटेना. विन्या पाया पडला, त्यांचा पत्ता लिहून घेतला आणि आम्ही निघालो. 'एकदा टपरीवर जाऊ चल' टपरीच्या बंद दरवाज्याला त्यानी खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, 'अन्नं खाल्लय रे इथे' आणि रडू लागला.

त्यानी आमच्यातलाच एका गरजूला गाडी अशीच देउन टाकली होती. माझ्या गाडीवर स्टेशनला सोडायला गेलो त्याला. 'पत्ता कशाला घेतलास आबांचा'. 'अरे कढईजवळ बसून खोकं झालंय पार, पैसे पाठवीन दर महिन्याला. कुणाला माहित नाही, मी आजारी होतो मागच्या वर्षी पंधरा दिवस. आबा चहा, नाश्ता, दोन वेळचं जेवण घेउन रुमवर यायचे. असो. फोन नंबर दिलाय तुला, कळवत रहा, चल बाय'. स्मशानातून परत यावं तसा मी परत आलो.

बाबांची बदली झाली दोन महिन्यात आणि आम्ही सगळे मुंबईला आलो. विन्याला सांगितलं. तो पुढे शिकायला यूएसला गेला तेंव्हा भेटून गेला. आबा गेले म्हणाला मागच्याच महिन्यात. पुढे संपर्क तुटला. मी ही नोकरीच्या निमित्तानी अनेक शहरं बदलली. विन्याचा काही तपास नाही. पंचविसेक वर्षं झाली. आईनी जीर्ण कांजिवरम अजून जपून ठेवलीये. येईल म्हणते शोधत बरोब्बर तो, भूत आहे ते. यायला तर पाहिजेच. अनंत गोष्टी अर्धवट सांगून गेलाय त्या विचारायच्यात आणि खूप काही. 

कॉलेजच्या रोडला टपरी दिसली की मी अजूनही थांबतो. एक वडा, एक कटिंग आणि दोन विल्स घेतो, एक सेप्रेट माझी, एक सेप्रेट विन्याची.

जयंत विद्वांस