Tuesday 23 February 2016

लल्याची पत्रं (२७)…. 'अनहोनी को होनी…'

लल्याची पत्रं (२७)…. 'अनहोनी को होनी…'

लल्यास,

भारतीय चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा घटक, सेन, रॉय, अदूर, बेनेगल, निहलानी, के.असिफ, गुरुदत्त, खोसला, आरके, घई, मणीरत्नम ही आणि अशी इतर अनेक नावं लोकांना चटचट आठवतील पण मनमोहन देसाईचं नाव थोडं मागेच राहील. असंभवनीय योगायोग असलेली कथानकं, अनंत हास्यास्पद गोष्टी पण श्रवणीय गाणी, अमिताभ, रंजक असे अनेक विरोधाभास एकाच ठिकाणी असलेले चित्रपट त्यानी काढले. 'देशप्रेमी', 'मर्द'पासून सुरु झालेला -हास 'गंगा जमना सरस्वती', 'तुफान' (केतन देसाई) मधे पूर्णत्वाला गेला. पण त्याची गाणी श्रवणीय असायची. छलिया, ब्लफ़मास्टर, किस्मत, सच्चा झूठा, रामपूर का लक्ष्मण, आ गले लग जा, रोटी. धरमवीर असे अमिताभ नसलेले त्याचे हिट सिनिमेही आहेत. ७७ सालात परवरीश, धरमवीर, चाचा भतीजा आणि अमर अकबर असे चार चित्रपट त्यानी दिले, तिथून ८९ पर्यंत तो आणि अमिताभ अशीच जोडी राहिली. 

अमर अकबर….  मी आयुष्यात पाहिलेला पहिला लास्ट शो. तिसरीत असेन. फार भारी वाटलेलं तेंव्हा, आईवडिलांशिवाय रात्री साडेबाराला घरी यायचं म्हटल्यावर. त्या पिक्चरचा ठसा जो उमटला तो आजतागायत आहे. त्या वयात सिनेमा बघताना जो भाबडेपणा होता तो आता नाही. व्हिलनला मारलं की टाळ्या वाजायच्या थेटरात, आता हसतील. मुळात आता व्हिलन सेपरेट हवाच असं नाही, हिरोसुद्धा व्हिलन असतो आता. तर मूळ मुद्दा गाणं. आनंद बक्षी यमक जुळवणे (स्टेशनसे गाडी जब छूट जाती है तो एक दो तीन हो जाती है) , बोलगाणी लिहिणे (अच्छा तो हम चलते है), चित्रपटातला प्रसंग गाण्यातून लिहिणे (एक हसीना थी - कर्ज) यात मास्टर होता. त्याची आणि एलपीची जोडी होती. अनेक तात्कालिक हिट, कायमस्वरूपी हिट, गुणगुणायला सोप्पी अशी गाणी त्यांनी सतत दिली. अमर अकबरची सगळी गाणी हिट होती. पण टायटल सॉंग मला जाम आवडत आलं आहे त्याचं. 

म्हटलं ना, एमडी म्हणजे निष्पाप विरोधाभास, इकडे ओळख पटू नये म्हणून तिघं वेषांतर करून आलेत आणि स्वत:ची नावं बोंबलून सांगतायेत. ते गाणं सुरु व्हायच्या आधी जीवन 'रॉबर्ट' फोन करत असतो तेंव्हा त्याला ऋषीकपूर जे पिडतो ना त्याला तोड नाही. आर्या आणि मी अजूनही लोटपोट हसतो त्या शॉटला. माणूस चिडावा आणि त्यानी दोन वाजवाव्यात इतका त्यात छळवाद आहे. आधीच 'किशनलाल' प्राणचा धोका आहे, स्मगलर असला तरी मुलगी अशी चीज आहे की माणूस हळवा होतो. तिचं धर्माप्रमाणे रीतसर लग्नं लावावं ही बापाची इच्छा आहे. फोन झाल्या झाल्या पाद्री आणि मेनी इन वन वाद्यवृंद हजर आहे. गाण्याची ओळख करून देण्यासाठी आधी जीवन आणि 'झेबिस्को' युसुफखान अडचणींचा पाढा वाचतात. मग हिरो लोक आश्वासित करतात, इट्स पॉसिबल. मग तो म्हणतो,' ये तो अनहोनी है'. मग अकॉर्डीयन सुरु होतो. हे एक वाद्यं मला जाम आवडतं ('आजा सनम' मधे ती एक जी घसरगुंडी वाजवलीये ना, ती वाजवायला बोटाला क्राम्प येत असणार. 'गुलाबी आंखे जो तेरी देखी' (आनंद बक्षी - असे डोळे सापडल्यास कळव) मधे 'दिल में मेरे' च्या नंतर, 'ख़्वाब तेरे'च्या नंतर आणि 'तस्वीरें जैसे हों दीवार पे' यानंतर वाजलेलं अकॉर्डीयन ऐकंच, जसच्या तसं परत ऐकायचं असेल तर 'दिलवाले दुल्हनिया' मधलं गाणं ऐक). अतिशय सुरेल आणि वाजवायला तेवढंच अवघड वाद्यं.

यमक असलं की गाणं ऐकायला एक वेगळीच मजा येते बघ. यावेळेस होनी, रोनी आणि सलोनी, बरात, रात, मेहमानोको आणि दिवानोंको इतका सोप्पा प्रकार होता. माझ्या अल्पंज्ञानाप्रमाणे हे गाणं भैरवीत असावं म्हणून चाल एवढी गोड असेल. नसलं समजा तरी माझ्या आवडण्यात काही अडचण नाहीये म्हणा. दोन्ही कडव्यांची पहिली ओळ सेम आहे, हा एकमेव प्रकार असावा. 'कैसे बात मतलब की समझाऊ दीवानो को' यावेळी किशोरनी आणि बच्चननी धमाल केली आहे. अमिताभचं ते दाढी काढून चिकटवणं, परवीनचा ओळख पटल्यावर झालेला चेहरा, शबाना, नितुसिंघचे फुललेले चेहरेआणि बाहेर येताना एकदम फॅमिली पिक्चर, तीन जोडपी आणि सपन सलोने ले के आई है ये रात सलोनी. त्या वयात खूप आनंद झाला होता दुष्टं लोकांपासून यांची आता सुटका होणार म्हणून. नंतरच्या मारामारीला पण हीच ट्यून वाजते. अमर अकबर कधीही बघण्याचं हे गाणं हे ही एक कारण पुरतं मला.

'अनहोनी को होनी, कर दे होनी को अनहोनी' या ओळीचा 'होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं' हा अर्थ आपल्याला आयुष्यात वारंवार अनुभवायला मिळतो. कुठेच आशेचा किरण नसताना कुणीतरी मागे उभं रहावं, यातून बाहेर काढावं असं प्रत्येकाला वाटतं. खड्ड्यात पडल्यावर हात देऊन बाहेर काढणारा असा कुणी मिळणं हा नशिबाचा भाग, नाहीतर मग ज्याला पाहीलं नाही अशा देवानी ते काम पार पाडावं अशी आशा आपण धरतो. अशक्यं, अकल्पित ते घडणं आणि हातात आलेलं, खात्री असलेलं निसटून जाणं, इसीका नाम तो जिंदगी है. चल पुढच्या गाण्यापर्यंत अनहोनी काही होणार नाही अशी आशा करूयात. :)         


जयंत विद्वांस     

अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी..
एक जगह जब जमा हो तीनो अमर अकबर अन्थोनी
अनहोनी को होनी ...

एक एक से भले दो, दो से भले तीन
दूल्हा दुल्हन साथ नही बाजा है बरात नही
अरे कुछ डरने की बात नही
ये मिलन की रैना है कोई गम की रात नही
यारो हसो बना रखी है क्यो ये सूरत रोनी..
एक जगह जब जमा ...

एक एक से भले दो, दो से भले तीन
शम्मा के परवानो को इस घर के मेहमानो को..
पहचानो अनजानो को
कैसे बात मतलब की समझाऊ दीवानो को
सपन सलोने ले के आई है ये रात सलोनी..
एक जगह जब जमा ...


(१९७७ - अमर अकबर अंथोनी, आनंद बक्षी, एलपी, किशोर, महेंद्र कपूर, शैलेंद्रसिंह)

No comments:

Post a Comment