Wednesday 9 March 2016

सहृदयी लोकांस आवाहन....

सहृदयी लोकांस आवाहन....

थोर सद्गृहस्थ श्री.विजय मल्ल्या सध्या खूप अडचणीत आहेत. त्यांच्याविरुद्ध पासपोर्ट जप्ती, बँकेतून पैसे काढण्यास अटकाव, अटक करणे वगैरे अत्यंत निर्दयी उपाय करण्याच्या मनस्थितीत सरकार आहे अशी अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी वाचली.

या सद्गृहस्थाने पैशेवाल्या लोकांसाठी हवेत उडण्याची सोय केली आणि जोडीने कमी खर्चात गरीबांसाठीही हवेत तरंगण्याची व्यवस्था केली याची सरकारला जाण नसली तरी सामान्य माणसाला हवी. इतकी वर्ष व्याज भरूनसुद्धा क्षुल्लक मुद्दलासाठी बँकेने सरकार, न्यायालयाकरवी मागे लागणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे.

अशा उपायांनी अनेक भावी उद्योगपती उद्योगवाढीसाठी कर्ज घेण्यास कचरतील. कर्ज काय कुणी बुडवण्यासाठी घेतो का? धंदा बुडू शकतो. त्यामुळे परतफेड शक्य नसते, इतका साधा विचार सरकार का करत नाहीये याचा अचंबा वाटल्याशिवाय रहात नाही. ज्या मालमत्तेच्या तारणावर कर्ज दिले ती मालमत्ता बँकेने ताब्यात घ्यावी. किंगफिशर या नावाच्या गुडविलवर काही शे कोटी दिले यात विजयभाऊंची काय चूक? हवं तर खुशाल बँकेने ते नाव जप्त करावं पण त्यांच्या उतारवयात त्यांना या मानहानीकारक यातना देऊ नयेत.

सहाराचा सुब्रतो एकटा पडलाय आत हे कारण सयुक्तिक वाटत नाही यासाठी. संजूला शिक्षा झाली म्हणून सल्लूला का नाही असं विचारण्यासारखं आहे हे. आधीच शेतकरी आत्महत्या करत आहेत आता उद्योगपतींना करायला लावू नका अशी सरकारला विनंती आहे. 

दिवस काय कुणाचे रहात नाहीत. आपण सर्व सामान्य माणसांनी विजयकाकांच्या उत्पादनाची जोरदार खरेदी करूयात, जेणेकरून त्यांची कंपनी नफ्यात जाईल आणि त्यांना कर्जफेड शक्यं होईल. बँकेत स्पेशल काउंटर उघडून तिथे किंगफिशर आणि त्यांची इतर उत्पादनं कर्जफेड सेस लावून विक्रीसाठी ठेवण्यात यावीत. हाहा म्हणता कर्ज संपेल. मग परत एकदा The Thief will be King of good times.

जयंत विद्वांस 



1 comment: