Tuesday 4 November 2014

लल्याची पत्रं (१८) …. 'तेरे बिना जिंदगीसे'

लल्याची पत्रं (१८) …. 'तेरे बिना जिंदगीसे'
लल्यास,
कुणावाचून आयुष्यं थांबेल, संपेल एवढं कुणाला आयुष्यात स्थान देऊ नये बघ. हे म्हणणं फार सोपं आहे. असं ठरवून काहीही करता येत नाही. बादलीत निळीचा पहिला थेंब पडतो आणि सगळ्या पाण्याचा रंग बदलून जातो ना तशी एखादी व्यक्ती आयुष्यात येते आणि मग आपलं अस्तित्वं तिच्याशिवाय अपुरं वाटायला लागतं. अहंकार, तत्वं, अधिकाराची भावना, ध्येयं, आकांक्षा, स्वप्नं अशा अनेक गोष्टींपायी फारकत होते. प्रत्येकजण आपापल्या जागी योग्यं वाटतो पण एकटेपण, अपुरेपण पायातला काटा निघावा पण आत राहिलेला बारीक कण सलत रहावा तसं टोचण्या देत रहातं.
आयुष्याच्या संध्याकाळी चुका उमगतात, त्यावेळेस त्या मान्यं केल्या काय केल्या काय, निसटलेलं, हरवलेलं डोळ्यांपुढे तरळतं. आयुष्यं तसंही जगता आलंच असतं की, ते ही फार वाईट नव्हतं खरंतर, असं वाटून जातं. आयुष्याचा जमाखर्च मांडताना तारांबळ उडते. काही गोष्टींसाठी मनाच्या कागदावर केलेल्या तरतुदी आठवतात. राहून गेलं त्या अंमलात आणणं ही भावना विषण्णं करते. We regret more for what we miss than what we had already lost.
गुलझार हे सगळं मोजक्या जीवघेण्या शब्दात 'तेरे बिना जिंदगीसे' मधे मांडतो. मुळात 'आंधी'ची तिन्ही गाणी रत्नं आहेत. इस मोडसे जाते है, तुम गये हो आणि हे (चौथं विस्मरणात टाकण्यासारखं म्हणून तीन). ज्यावेळेला मनातलं बोलायचं असतं पण बोलता येत नाही अशावेळी माणसं वेगळंच बोलतात. गुलझारनी गाण्याच्या मधे संजीवकुमार, सुचित्रा सेनचं गद्य असंच लिहिलंय. संजीवकुमारच्या खालच्या पट्टीतल्या आवाजाला सुचित्रा सेनचा गहिवरलेला आवाज वरचढ ठरतो. "वैसे तो अमावस पन्ध्रह दिनकी होती है, लेकिन इस बार बहोत लंबी थी", नौ बरस लंबी थी ना?" त्यानंतर बोलणं खुंटलेल्या अवस्थेला सावरून घ्यायला "जी में आता है…" चालू होतं. ते संपतं आणि तिथून किशोर तेरे बिनाउचलतो. अशीच जादू त्यानी  सलामे इश्कंलाकेली होती आणि गाणं खाऊन टाकलं होतं.
मागे तुला म्हटल्याप्रमाणे काही गाण्यांना तो वेगळा, राखलेला आवाज लावतो किंवा लागत असावा. शेवटचं कडवं तसंच आहे. इतक्या दिवसांनी भेटलेली ती, खूप काही बोलायचंय, ऐकायचंय. हताशपणाचा कळस लिहिलंय गुलझारनी. तू म्हणशील तर आज चंद्रास्त होणारच नाही, कालचक्र थांबवून ही रात्र फ्रिज करू, चिरंतन करू. एका रात्रीची तर गोष्टं पण आयुष्यंच शिल्लक नाही. गालिब म्हणतो. "हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले". अशीच भावना होते गाणं ऐकून. सकाळ झाली की दोघे दुरावणार. अबोल शल्यं, सल, रुखरुख, दाटलेले, साठलेले गहिवर पाचोळ्यासारखे असेच मनात तळाशी दबून पडणार आणि त्याची फौसिल्स झाली की ती उकरून काढून गुलझार अशी गाणी लिहिणार.
गाण्याचं इंट्रो, इंटरल्यूड म्हणजे शब्दरहित कडवीच ती. "ये जो फुलोंके बेले नजर आते है ना…. इसे दिनके वक्त देखना चाहिये" हे वाक्यं दिवसाच म्हटलंय हा एक त्यातला गमतीचा भाग. रात्रीच्या शुटिंगला लागणारी फिल्म संपली असल्यामुळे ते पिक्चरायीझ करून घेतलं आणि बदलायचं राहून गेलं असं वाचलंय मी. पण ते कुणाच्या लक्षात येणार नाही इतकं गाणं श्रवणीयं आहेआर.डी., लता (आशा पण), किशोर, गुलझार, अस्वस्थ आत्मे, अशी गाणी करतात आणि त्यांचा त्रास आपल्याकडे सरकवतात, बाकी काही नाही.
चल पुढच्या गाण्यापर्यंत कोई शिकवा नहीं आणि तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं.

जयंत विद्वांस

तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं
तेरे बिना..

काश ऐसा हो, तेरे क़दमों से चुन के मंजिल चलें और कहीं, दूर कहीं
तुम गर साथ हो, मंजिलों की कमी तो नहीं
तेरे बिना..

जी
में आता है, तेरे दामन में सर छुपा के हम रोते रहें, रोते रहें
तेरी भी आँखों में आंसुओं की नमी तो नहीं
तेरे बिना...

तुम
जो कह दो तो, आज की रात चाँद डूबेगा नहीं रात को रोक लो,
रात की बात है, और ज़िन्दगी बाकी तो नहीं
तेरे बिना..

(आंधी (१९७५), आर.डी.बर्मन, गुलज़ार, किशोर कुमार, लता मंगेशकर)


1 comment: