Thursday 15 September 2016

चित्र'कळा'...

देव कुणाच्या हातात काय कला देईल सांगता येत नाही. कला मुळात उपजत असावी लागते. समज आली की तिला फाईन करायचं काम करता येतं फक्तं. मारून मुटकून झालेला कलाकार कळतो. काही गोष्टी आपल्याला चांगल्या येतात आणि काही अजिबात येत नाहीत. मला भौतिकशास्त्रं, चित्रकला ही कामं कायम डोक्यावरून गेली आहेत. शाळेत मोजक्या मुलांच्या वह्या काय सुरेख असायच्या. सुंदर अक्षर असायचं. साच्यातून काढलेले काजू मोदक जसे रांगेत मांडल्यावर देखणे दिसतात तशा त्यांच्या ओळी दिसायच्या. जीवशास्त्राच्या वह्यातली चित्रं अगदी प्रिंट केल्यासारखी दिसायची. चित्रं काढल्यावर त्यातल्या भागांना रेषा काढून नावं देण्याची कल्पना माझ्यासारख्या दिव्य चित्रकारांमुळे जन्माला आली असावी. मी काढलेलं जास्वंदाचं अर्ध कापलेलं फूल खाली 'जास्वंद' असं लिहिल्यामुळे ओळखू यायचं. अमिबा ही जगातली सगळ्यात सोपी आकृती आहे काढायला कारण त्याला ठराविक आकार नसतो, तुम्ही जो काढाल किंवा काढल्यावर जो दिसेल तो अमिबा.

आम्हांला धाडणेकर नावाचे थोर चित्रकार ड्रॉईंगला होते. मागच्या जन्मीचं पाप असणार त्यांचं काहीतरी, कुठे कुणाला ते फेडावं लागेल कळणार नाही. फळ्यावर मोठ्ठा चौकोन काढून त्यात प्रत्येकाला मनाला वाटेल तशी रेषा काढायला ते सांगायचे आणि सगळ्या वर्गानी त्यात घाण करून झाली की डस्टरनी नेमक्या रेषा पुसून ते त्यातून गणपती, देवी वगैरे काढायचे, खडू न वापरता. एवढा थोर माणूस आम्हांला शिकवायला होता. ग्लायकोडीनच्या एका जुन्या जाहिरातीत लता मंगेशकर म्हणायची, 'जो खरा है वो कभी नही बदलता'. मी तेच केलं. माझ्या चित्रकलेत कुठलीही वाढ, घट झाली नाही. काय एकेक ताप असायचे. ते वॉटरकलरनी वॉश द्यायचा असतो पेपरला. आम्हांला एकदा स्काय ब्ल्यू कलरचा वॉश द्यायला सांगितलेला, माझा कागद नीळ घातल्यासारखा झाला होता. बरं तो पांढरा वाढवून पातळ करायला गेलो तर आकाशाला कोड आल्यासारखं दिसायला लागलं. शेवटी दुस-या पानावर आकाश रंगवेपर्यंत तास संपला. सर म्हणाले मोराच्या अंगावर कागद घासून आणला असतास तरी एवढा निळा झाला नसता.

ती वर्तुळं काढून त्यात त्या वर्तुळपाकळ्या काढायच्या आणि कुणाच्या संकरातून कुठला रंग तयार होतो ते त्या पाकळीत काढायचं असायचं. कडेला त्यांचे आई बाप रंग असायचे. माझ्या तिन्ही पाकळ्यात एकाच बापाची मुलं असल्यासारखा एकंच रंग दिसायचा. ब्रश धुवावा लागतो वगैरे धुवट कल्पना मला तेंव्हा माहीतच नव्हत्या. फ्रीहँड जरा सोपं वाटायचं. पेपरला मधे फोल्ड करायचं, एका बाजूचं हवं तसं चित्रं काढायचं मग ट्रेस करून तेच दुस-या बाजूला. बादली, जग, प्लास्टिकचा मग आणि ती फळं यांनी मला कायम वात आणला होता, एक तर ती बादली चार माणसांची अंघोळ होईल इतकी असायची किंवा अगदी टमरेलाइतकी लहान. बादलीची कडी स्टीलची असली तरी माझ्या चित्रात ती पायजम्याच्या नाडीसारखी मऊ पडलेली असायची. हा सगळा ऐवज ज्या स्टुलावर ठेवून त्यावरचं जे कापड काढतात ते इतर मुलांच्या चित्रात मखमली दिसायचं. माझं सगळ्या वस्तू पायपुसण्यावर ठेवल्यासारख्या.

त्यात ती परडीत आणि विखुरलेली फळं काढायची असायची. माझा आंबा नारळासारखा यायचा आणि नारळ पपईसारखा, द्राक्षाचा घड मधाच्या पोळ्यासारखा भरभक्कम. फणस सोपा पडायचा पण ते काटे काढताना ठिपके काढायला कंटाळा यायचा आणि तो गरम पाणी पडून फोड आल्यासारखा दिसायचा. स्ट्राबेरी, सीताफळ वगैरे मी विचार पण करायचो नाही. केळी किती काढणार? त्याची चांगली फणी काढली होती चार ठिकाणी दुकान लावल्यासारखी तर मला धुतलेला त्यांनी. प्रत्येक फळ एकदाच हे कळत नाही का म्हणाले. बरं हे सगळं परत रंगवायचं. माझा आंबा केशरी पिवळसर वगैरे माझ्या मनात असायचा पण कागदावर तो नासल्यासारखा दिसायचा. नारळ चॉकलेटमधून बुडवून काढल्यासारखा यायचा, एकाच घडातली द्राक्षं विविध रंगात यायची, केळी सल्फरनी अकाली पिकवल्यासारखी दिसायची. अभ्यास करून अवघड विषय समजेल कारण ती विद्या आहे, कला कशी येईल.

एकदा 'आठवड्याचा बाजार' असं चित्रं काढायला सांगितलेलं. भाजी विक्रेता, घेणारी बाई आणि लहान मूल, देऊळ, रस्ता, बस, सायकलवाला, हातगाडीवाला वगैरे माणसं फळ्यावर त्यांनी पाच मिनिटात काढली. भाजीविक्रेता माझ्या कागदावर निघेपर्यंत तास संपला पण पुढचे अनेक तास तेच चित्रं बोर्डावर रहाणार होतं. निवांत कंप्लिट करायचं होतं. बाई आणि मुलाचे हात गजानन महाराजांसारखे अजानुबाहू, मुलाच्या हातातली पिशवी एवढी मोठी की त्याची चड्डी काढावीच, आय मिन दाखवावीच लागली नाही. माझी भाजीची गाडी तिरकी झालेली, तिला चाकं दाखवताना मागची दिसत नाहीत म्हणून दोनच काढली होती. भाजीवाला फक्तं कमरेच्या वर दिसत होता, खालचा भाग अदृष्यं आणि गाडीवर मी म्हणतोय म्हणून भाज्या. 'काय रे कुठल्या भाज्या आहेत या अशा लांबसडक'. 'सर, पालेभाज्या आहेत '. त्या दिवसापासून त्यांनी मला ड्रॉईंगच्या पिरीअडला ऑप्शनला टाकला.

माझ्यासारखे विद्यार्थी असण्याचे फायदेही आहेत. कुणाकडे लक्षं द्यायचं ते त्यांना कसं कळेल नाहीतर? नुसते फराटे मारून काहीजण क्षणार्धात माणूस उभा करतात, काहीजण फोटो काढल्यासारखी चित्रं, रांगोळी काढतात. काहीजण वाद्यं वाजवतात, मुर्त्या तयार करतात, कोरतात. प्रत्येकाला ती येणार नाहीच, आली तर मग एकमेकांना त्याची किंमत रहाणार नाही. कधीकधी वैषम्यं वाटतं, आपल्याला यातलं काहीच येत नाही पण मग लक्षात येतं देवानी हात दिलेत ते टाळ्या वाजवण्यासाठी पण उपयोगी येतात. आपल्यासाठी वाजली नाही एखादी तरी चालेल पण काही चांगलं दिसलं तर आपण जरूर वाजवावी, त्यांचे हात हातात घ्यावेत. ऑप्शनला टाकण्यापेक्षा हे ऑप्शन बरे आहेत. :)

जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment