Wednesday 3 June 2015

लल्याची पत्रं (२१) …'ये क्या हुआ …'

लल्यास…… 

सेट म्याक्सच्या कृपेने वरचेवर जुने सिनेमे बघण्याचे योग येतात. परवाच 'अमर प्रेम' परत बघितला. खरंतर मला तो सिनेमा जीव टाकावा एवढा आवडत नाही कारण लहान नंदू ते मोठा नंदू यातला काळ मिसिंग आहे म्हणून असेल आणि शर्मिला टागोर फार काळ सहन होत नाही हा एक भाग. खन्नाचं पात्रं वरवरचं वाटतं मला तरी. त्याचा घरातला प्रॉब्लेम फार झटपट मांडलाय. तरीपण मी तो बघतो कारण आरडी, किशोर, आनंद बक्षीसाठी. एकाचढ एक गाणी आहेत. एसडीच्या आवाजातलं एक डोलीमे बिठायके, लताची दोन रैना बीती जाये आणि बडा नटखट है रे, किशोरची तीन चिंगारी कोई भडके, कुछ तो लोग कहेंगे आणि ये क्या हुआ. किशोरची तीनही गाणी अजरामर आहेत. आनंद बक्षीच्या वहीत पडलेली कविता ' चिंगारी कोई भडके' आरडीनी हट्टानी घेतली आणि तिला फिल्मफेअर मिळालं. 

चिंगारी आणि कुछ तो लोग कहेंगे वर नंतर कधी तरी लिहीन पण आज 'ये क्या हुआ …' वर. धोतर घालून झिंगणारा ओम प्रकाश आणि राजेश खन्ना. शर्मिलानी एन्ट्री नाकारल्यावर निराश झालेला राजेश खन्ना. घटना घडून जाते तेंव्हा आपण त्या धक्क्यात असतो. काळ गेला की किंवा सावरल्यावर आपण त्याची कारणं शोधतो. कुणावर तरी खापर फोडायला मिळालं तर उत्तमच नाहीतर कुणी मिळालं तर नशीब हाताशी असतंच. बरं तुम्ही त्याला नावं ठेवा, दोष द्या, त्या बिचा-याची काहीही तक्रार नाही. ज्याच्या बाबतीत घटना घडते किंवा धक्का बसतो त्यालाच अनेक प्रश्न पडलेले असतात, काय झालं, कसं झालं, केंव्हा झालं, का झालं असे प्रश्न विचारून बाकीच्यांनी त्याला हैराण करू नये खरंतर. आपण जे विचारतो तेच आनंद बक्षीनी लिहिलंय. पण संवादाला चाल लावावी आरडीनीच. 
 
 

मन जेवढं हळवं असतं ना त्याच्या उलट ते नेहमी लिहितं बघ. ते धक्क्याचं विश्लेषण करतं आपल्यापुरतं आणि मग बाहेर वेगळंच दाखवते की आपल्याला काहीही फरक पडलेला नाही किंवा स्वसमाधानासाठी ते कारणमीमांसा देतं. तरीही अर्थात घाव किती खोलवर पोचलाय ते कळतंच म्हणा. जब हुआ, तब हुआ छोडो, ये ना सोचो ही बेफिकिरी सांगायला फक्तं. एकांतात जाऊन खपल्या काढायच्या आणि कुरतडत बसायचं, फक्तं ते दाखवायचं नसतं. प्रत्येक कडव्यात मनाचं समाधान करून घेतलंय बघ. काचेचं खेळणं, तुटणारच की, त्याची कशाला तक्रार हवीये, हे फक्तं म्हणायला झालं. पण मग ते तुकडे मात्रं टाकायचे नाहीत, जपून ठेवायचे मखमली आवरणात कितीही टोचले तरी.   

स्वप्नंच ते, तुटणारच की. तीन मिनिटाच्या वर कुठलंही स्वप्नं नसतं असं मी वाचलंय. त्यामुळे त्याला क्षणभंगुरत्वाचा शाप आहेच. जे घडत नाही ते पण घडावंसं वाटतं त्याचं स्वप्नं होतं. पाहिलेली स्वप्नं वेगळी, त्याकरता माणूस जिद्दीही होतो पण स्वप्नवत म्हणजे सगळं सुखकारक चाललेलं असताना मधेच भंगलं की मग प्रश्नं पडतो, जे अनुभवलं ते सत्यं की स्वप्नं? मग परत एकदा समाधान, स्वप्नंच ते, चिरकाल कसं असणार, तुटणारच की ते कधी ना कधी, आंब्याची शेवटची रसाळ फोड खाताना, तुला गाडीत बसवून निघताना मला जे सुख संपल्याचं दुखं होतं तेच इथेही आहे. घटना अटळ होती हे ही समाधानच एक प्रकारचं. बदनामी होणार होतीच, झाली. आता कशाला त्याची खंत, जो हुआ सो हुआ, छोडो यार, ये ना सोचो. माणूस एकदा बदनाम झाला की त्यासारखं सुख नाही बघ. उगाच कुणाला घाबरायला लागत नाही, बंधनं नाहीत. कोण काय म्हणेल ही चिंता नाही. पण या सगळ्याची किंमत मोठी असते फ़ार. 

धृवपदातल्या प्रत्येक 'हुआ' नंतर जी बासरी वाजते त्याला तोड नाही बघ. कडव्यातल्या शेवटच्या 'हुआ'ला किशोरचा 'ह' ऐकण्यासारखा, करुण हसतो तो. असाच 'ह' ऐकायचा असेल तर 'फंटूश' मधल्या 'दुखी मन मेरे' मधलं 'पत्थर के दिल मोम न होंगे' मधला ऐक. त्याचं 'गाडी  रही है' मधल्या 'जानेके बाद आते है याद, "बिछडे" हुए वो मेले' मधील "बिछडे" ऐक. गो-यापान कपाळावर छोटासा लाल कुंकवाचा ठिपका कसा चेहरा सुंदर करून जातो तसं किशोर करतो बघ. एखाद्या अक्षराला, शब्दाला असं काही अत्तर लावून जातो की जीव जावा आपला. 

चल, आता पुढच्या पत्रापर्यंत ऐका हे गाणं. 

--जयंत विद्वांस 
   
  
ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ
क्यों हुआ, जब हुआ, तब हुआ
छोडो, ये ना सोचो

हम क्यों शिकवा करे झूठा
क्या हुआ जो दिल टूटा
शीशे का खिलौना था
कुछ ना कुछ तो होना था, हुआ

हमने जो देखा था, सुना था
क्या बताये वो क्या था
सपना सलोना था
ख़तम तो होना था, हुआ

ऐ दिल, चल पीकर झूमे
इन्ही गलियों में घूमे
यहाँ तुझे खोना था
बदनाम होना था, हुआ
 
(आनंद बक्षी, आरडी, किशोर, अमर प्रेम)
 
 
 https://www.youtube.com/watch?v=saApSghVCOU
 

No comments:

Post a Comment