Saturday 14 September 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (८) … आशा भोसले - भाग २

दुसऱ्यांच्या, त्यातल्या त्यात सेलेब्रिटींच्या आयुष्यात घडलेले किस्से, प्रसंग, अडचणींच्या कहाण्या आपण मोठ्ठ्या चटकदार गोष्टी असल्यासारख्या वाचतो. पण तेंव्हा त्यांची अवस्था तेच जाणोत (ती ही माणसंच आहेत हे पण का विसरतो खरं तर). त्यांच्या ऐकीव, क्वचित पसरवलेल्या, खऱ्या - खोट्या सफल असफल प्रेमकहाण्या आपण लफडी या एकाच शब्दात तोलून मोकळे होतो. आशाबाई जेंव्हा आत्मचरित्र लिहितील तेंव्हा कळेल भोसले, दादा कोंडके, .पी नय्यर आणि आर. डी. यांच्या बद्दलचं सत्य किंवा त्यांची बाजू. दुर्दैवाने आज चौघंही हयात नाहीयेत
     
विभक्त झाल्यावर त्यांनी सोसलेले हाल, उपसलेले कष्ट त्यांच्याच तोंडून ऐकायला हवेत. बोरिवलीहून त्या लोकलने जायच्या. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठंसं, अख्खी मुंबई जाते. पण अख्खी मुंबई एवढी गाणी नाही गातसंसारिक अडचणी, कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मानहानी, डावललं जातंय ही बोच हे सगळं एका कप्प्यात बंद करून माईक पुढे उभं राहिल्यावर त्यातले भाव असतील त्याच्याशी फक्त नातं जोडायचं हे खायचं काम नाहीये

काही जोड्या जुळतात, काही प्रसिद्धी मिळवतात, काही कमनशिबी असतात. त्यांची .पी. बरोबरची जोडी नशीबवान होती. 'माझ्याशिवाय तुम्हाला यश शक्यच नाही' असा प्रभाव असणाऱ्या एका प्रस्थापित आणि यशस्वी गायिकेला एकदाही घेता हा माणूस शिखरावर गेला कारण त्याच्या सोबत तेवढाच दमदार (काकणभर सरसच माझ्या मते), कुठल्याही प्रकारच्या गाण्याची सवय असलेला, मुख्य म्हणजे जो हवा तोच भाव ओतणारा (हल्ली बहुतेकवेळा स्वरांची बाराखडी असतेजर्रा इकडे तिकडे हलायचं नाहीभाव गेला तेल लावतचिरतरुण आवाज होता. या जोडीने धुमाकूळ घातला. नमुना म्हणून ही गाणी बघा ना: माँग के साथ तुम्हारा, उडें जब जब जुल्फें तेरी, आईएं मेहेरबां, ये हैं रेशमी जुल्फों का अँधेरा, जाईए आप कहाँ जाएंगे, आओ हुजुर तुमको, इशारों इशारों में, दिवाना हुआ बादल, बहोत शुक्रिया बड़ी मेहेरबानी, चैन से हमको कभी, हुज़ुरेवाला, में शायद तुम्हारे लिए अजनबी हूँ, फिर मिलोगे कभी, यहीं वो जगह हैं आणि अशी कितीतरी… 
       

अशीच एक त्यांची जोडी फडके साहेबांबरोबर जुळली. स्पष्ट शब्दोच्चार सोप्प्या वाटणाऱ्या अवघड चाली आणि कुठलाही आव आणता म्हटलेली गाणी. सहज गुणगुणता येतील इतक्या सोप्प्या वाटतात की नाही चाली?? म्हणून बघा. सोप्प्या नाहीत हे मान्य करा आणि पुन्हा त्यांना ऐका. ते जास्तं सोप्पं काम आहे. उदाहरण द्यायचं झालंच तर धुंदी कळ्यांना, स्वप्नात रंगले मी, धुंद एकांत हा,हृदयी प्रीत जागते, आज कुणीतरी यावे, का रे अबोला, या सुखांनो या, एकाच या जन्मी जणू, चंद्र आहे साक्षीला, अशी कितीतरी

आर. डी., गुलजार आणि आशाताई हे एक वेगळंच त्रिकुट आहे. मोठ्या दवाखान्यात कसे वेगवेगळे स्पेशालिस्ट असतात तसं होतं यांचं. एक लेखणीचा जादुगार, एक तालासुरांशी रममाण झालेली वल्ली आणि एक - झालं का तुमचं फायनल, तर द्या इकडे - इतक्या सहजतेने गाणारा गळा. काय गाणी आहेत एकेक तिघांची. मेरा कुछ सामान जेंव्हा चाल लावण्यासाठी दिलं तेंव्हा पंचम म्हणाला होता, हे काय गाणं आहे?? उद्या टाइम्सची हेडलाईन द्याल चाल लाव म्हणून. गुलजार म्हणाले, खरा संगीतकार त्याला सुद्धा चाल लावेल. मग जे काही आर. डी. ने तयार केलंय ते मात्र चिरंतन आहे, ही तिन्ही माणसं काळाच्या पुढे होती, काळाशी जुळवून घेणारी होती, लवचिक होती. यांचा आवाका मुळातच मोठा. म्हणूनच तेरे बिना जिंदगी से लिहिणारा गुलजार छैया छैया, कजरा रे, नीले नीले जिंदे शामियाने के तले लिहू शकतो. सुनो चंपा सुनो तारा देणारा आर. डी. चिंगारी कोई भडके, मेरे नैना सावन भादो आणि रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम पण देऊ शकतो. आशाताईंबद्दल काय बोलणार. पाण्यासारखा गळा, तुम्ही टाकाल तो रंग दाखवणारा

त्यांची आर. डी. बरोबरची गाणी बघा : हसीना जुल्फोंवाली, मेरे सोना रे, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, पिया तू अब तो आजा, दम मारो दम, मोनिका माय डार्लिंग, चुरा लिया हैं तुमने, आपके कमरे में, लेकर हम दिवाना दिल, जानेजाँ ढूंढता फिर रहा, खाली हाथ शाम आयी हैं, कतरा कतरा, छोटीसी कहानी से, मरिया, रोज़ रोज़ आँखों तले, पिया बावरी, जाना मेरी जाना, हैं अगर दुश्मन, ये लड़का हाए रे अल्लाह...  किती देणार यादी!!! 

हृदयनाथ मंगेशकरांकडे सुद्धा त्यांनी काही अप्रतीम गाणी गायिली आहेत. ती ही अशीच - गुणगुणायला जरी सोप्पी वाटली तरीही…. बघा तपासून : सखी मुरली मोहन मोही मना, तरुण आहे रात्र अजुनी, मी मज हरपून, जांभूळ पिकल्या झाडाखाली, कोन्या राजानं राजानं, काजल रातीनं ओढून नेला, आला आला वारा, उषःकाल होता होता, गेले द्यायचे राहून, केंव्हा तरी पहाटे, चांदण्यात फिरताना, चांदणे शिंपित जाशी, पांडुरंग कांती, मागे उभा मंगेश, ये रे घना ये रे घना, समईच्या शुभ्र कळ्या, ही वाट दूर जाते…. किती अवीट गोडीची गाणी आहेत ही सगळी… 

संगीतकार नवीन असो वा प्रथितयश, त्या त्यांचं शंभर टक्केच देतात. बघा ना
रवि बरोबर तोरा मन दर्पण कह्लाए, आगे भी जाने ना तू, दिन हैं बहार के, दिल की कहानी रंग लाई हैं, इन हवाओं में इन फिजाओं में, ज़िन्दगी इत्तेफ़ाक़ हैं
एस. डी. बर्मन बरोबर अच्छा जी मैं हारी, नज़र लागी राजा, जानू जानू रे काहे खनके हैं तोरा कंगना, काली घटा छाए मोरा जीया घबराय, अरे यार मेरे तुम भी हो ग़जब, अब के बरस भेज भैया को बाबुल, रात अकेली हैं (हे आणि होठों पे ऐसी बात आर. डी. नेच दिलंय म्हणे. ठेका बघितला तर मान्य आहे);                  
अनु  मल्लिक कडे किताबें बहोत सी पढ़ी होंगी तुमने; रहमान कडे रंगीला रे, तनहा तनहा यहाँ पे, राधा कैसे जले, मुझे रंग दे, भँवरे; मदन मोहन कडे झुमका गिरा रेसलिलदांकडे कडे जानेमन जानेमनसंदीप चौटा कडे कम्बख्त इश्क़ आणि खय्याम कडे अख्खा उमराव जान…. 

अनेक पुरस्कार मिळाले. फिल्मफेअर, आयफा, गिनीज बुक मध्ये नाव गेलं, जीवन गौरव मिळालं, फाळके पुरस्कार, पद्मविभूषण मिळालं. पण काहीतरी राहून गेलंच. मेरा नाम जोकर च्या अपयशाबद्दल बोलताना राज कपूर म्हणाला होतामाझं थोडं आई सारखं झालंय. थोडं मागे पडलेलं, अशक्त, अपयशी मुल तिच्या जास्तच जवळचं असतं, तसं माझं मेरा नाम जोकर च्या बाबतीत झालंय. तो माझ्या हृदयाच्या जवळ आहे. आधीचं आणि नंतरचं उत्तुंग यश नाही त्याच्या हृदयाजवळ आलं. निसटलेलं, अपयश, हुकलेली संधी असंच शिल्लक रहात असेल का मनात?? आशाताईंच्या मनात किती गर्दी असेल ना अशा गोष्टींची. ऐनवेळी नाकारलं गेलेलं मेरे वतन के लोगों, डावललं गेल्याची अनेक शल्य, आर. डी. गेल्यानंतर झालेला मनस्ताप आणि खूप काही.   


एक उत्कृष्ठ सुगरण, एक गोड गळ्याची लोभस खळ्यांची गायिका, एक बिनधास्त बाई, एक मिश्किल नकलाकार, एक यशस्वी उद्योजिका, टीका आणि हारतुरे एकाच भावनेने स्वीकारणारं एक दिलखुलास व्यक्तिमत्व, एकटी पडली (किंवा पाडली) म्हणून हार मानता यशस्वी होणारी जिद्दी स्त्री आणि उशीरा यश मिळालंय म्हणून कसलीही कटुता ठेवणारी

आपण फक्त एवढच लक्षात ठेवायचं. आत्मचरित्र आलं की वाचायचं…. जमलं तर बिटवीन लाईन्स.     


-- जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment